marathi blog vishwa

Tuesday 8 December 2015

नवी स्वप्नं व नव्या दिशा !

२०१५ हे वर्ष सुरु झालं तेंव्हा असं वाटलं होतं की हे वर्ष लवकर संपणारच नाही. संपू नयेच. डोंगराएवढी कामं समोर होती. समोर असलेल्या अडचणी पाहता ही सारी कामं खरंच हातावेगळी करता येतील का असं एक मन विचारत होतं तरीही त्यातून जमेल तसं मनापासून” हे सदर माझ्या ब्लॉगवर लिहित गेलो आणि आता बहुदा हा या वर्षातला शेवटचा लेख...उर्वरित दिवसांत काही लिहायला जमलं तर छानच, अन्यथा पुढच्या वर्षी नवं काही....

चहुबाजूनी अनिश्चितता, क्लायन्ट्सच्या वाढत्या व नवनवीन अपेक्षा, उद्दिष्ट पूर्ततेसाठी स्वतः आखलेली धोरणे यामुळे जानेवारी २०१५ मध्ये आम्ही सर्वजण अक्षरशः “युद्ध सदृश” परिस्थितीचा अनुभव घेत होतो. साधारण मे अखेरपर्यंत हीच परिस्थिती होती. सोबतच्या व हाताखालच्या सहकाऱ्यांना प्रोत्साहन देणे, त्यांचा व स्वतःचा धीर सुटू न देणे, घाई गडबडीत संपूर्ण टीमकडून नव्या काही चुका होऊ न देणे, सतत चर्चा करून क्लायन्ट्सच्या मंडळींचं मन वळवणे यात आम्ही सर्व गळयाइतके बुडलो होतो. २० मे नंतर मग चित्र हळूहळू पालटू लागले. ज्या गोष्टी क़तार मध्ये कधीच कुणी केल्या नव्हत्या ते आम्ही करू लागलो. यशस्वीपणे एकेक टप्पे पूर्ण होऊ लागले. आणि मग मला भारतात पुन्हा परतायचे वेध लागले.
२०१२ मध्ये हे नक्की ठरलं होतंच की शक्यतो २०१६ ची सुरुवात पुन्हा आपल्या देशात करायची. पण कशी, कधी व कुठे याचं चित्र स्पष्ट नव्हतं.

पाहता पाहता घडामोडी जुळून आल्या. गेली ७-८ वर्षं ज्यांच्या सोबत होतो त्या L&T सारख्या कंपनीतील सर्व स्नेह्यांना सोडून येणं जड गेलंच पण सर्वांनी समजून घेतलं. मला माझ्या स्वप्नांसाठी काही वेळ मोकळं सोडलं. त्यातच माझे मित्रवर्य पी.डी. उर्फ प्रमोदजी देशपांडे यांचं मार्गदर्शन मिळालं आणि गेल्या महिन्यात थेट भारतात दाखल झालोच.

एक नक्की ठरवलं होतं की Engineering चं field पुनश्च जरा बाजूला ठेवून इतर तितक्याच आवडीच्या क्षेत्रात काही करू पाहायचं. बरोबर १५ वर्षापूर्वी हे केलं होतंच. कुठलीही पदवी न घेता वृत्तपत्र संपादन क्षेत्रात काही वर्षं आनंदानं घालवली होती. यावेळी आता ठरवलंय की मनुष्य कौशल्यविकास, पर्यटन, व्यवस्थापन व बालशिक्षण प्रशिक्षण, अपारंपरिक उर्जा यापैकी किमान एक-दोन क्षेत्रात आणि त्याबरोबर सामाजिक क्षेत्राशी संबंधित काही करायचंय. अनेक मित्र मंडळी सोबत / साथ करायला आहेतच. घराच्या जबाबदाऱ्या सांभाळून किमान दोन-तीन वर्ष स्वतःची चाचणी घ्यायचीय.

त्याचबरोबर लेखन तर चालू राहणार आहेच. मुख्यतः “शिव-चरित्र व सध्याची युवा पिढी, आणि त्या अनुषंगाने सध्या भारताचे आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील वाढते महत्व” याबाबत व्याख्यानाचे काही विषय प्रत्यक्षात उतरावयाचे आहेत. पश्चिम घाटातील धोक्यात येणारं पर्यावरण, जलसंवर्धन यासाठी काय करता येईल, आपल्या देशातील नवशिक्षित पिढी आंतरराष्ट्रीय मानांकनाच्या दृष्टीने कशी कार्यक्षम होईल याबाबत मनातलं काही सुहृदांशी, नवं काही शिकू पाहणाऱ्या मंडळींसोबत शेअर करायचं आहे. त्याबाबत काम करायची इच्छा आहे. अडचणी येणारच आहेत पण सोबत्यांच्या साथीनं त्यांचं निराकरण करू शकू असा विश्वास वाटतोय. याचबरोबर मुख्य म्हणजे गेली काही वर्षे दुरावलेली डोंगरयात्रा पुन्हा सुरु करायची आहेच...!

म्हणून मग कोल्हापुरात दाखल झालो आणि आल्या-आल्या थेट दुसऱ्याच दिवशी भल्या पहाटे ज्योतिबा डोंगरावर चालत निघालो.

पहाटेची वेळ. आजूबाजूला फुललेल्या प्राजक्त व सोनचाफ्याचा दरवळ घराच्या परिसरात. तो उरात भरून पुढे निघालो. सोबत्याबरोबर पंचगंगा नदी ओलांडून पलीकडे गेलो. उसाच्या शेतातून येणारा गारवा अंगावर हवीहवीशी शिरशिरी उमटवून गेला. संपूर्ण शहर जेंव्हा धुक्याची किंचित दुलई पांघरून अजून गाढ झोपेत होतं तेंव्हा नदीपलीकडे लहानग्या गावात मात्र जाग होती. कुणी गोठ्यात गाई-म्हशीन्सोबत होतं, कुणी माऊली अंगण सारवून रांगोळी रेखाटत होती. कुणी शेताकडे निघाले होते. कुठे चुली पेटल्या होत्या. कुठे कुणी शेकोटी पेटवून बसला होता. तो शेण-गोठ्याचा, सडा-सारवणं केलेल्याचा, पेटलेल्या चुलीतील धुराचा, कुठल्या तरी पाना-फुलांचा येणारा वास आसमंतात होताच. त्यातच दूर कुठूनतरी गुऱ्हाळातून आलेला गोडूस वासही दरवळत मिसळला होता. किती वर्षं झाली हे सगळं असं उरात भरून घेऊन...! ही आपली माती, हा आपला निसर्ग हेच आपलं जीवन, आता यापासून पुन्हा दुरावायचं नाही असं वाटून गेलं.
डोंगर चढायची सवय मोडलेली. दम लागत होताच. अधूनमधून क्षणभर थांबत, चौफेर पहात गेलो सहज चढून.

वाटेत जुन्या काळात लोकांनी निगुतीनं खोदलेली तळी, विहिरी पहिल्या. यावर्षी तसं दुष्काळी वातावरण असूनही त्या पाण्यानं तुडूंबलेल्या. मात्र तरीही त्यांची पुरेशी निगा राखली जात नाहीये हे दिसत होतंच. जे आपल्या आधीच्या पिढ्यांना शेकडो वर्षापूर्वी जमलं ते आम्हाला का जमू नये असा प्रश्न पडला. मग लक्षात आले की बहुदा आपण आपला परीघ संकोचून घेतल्यामुळे हे घडत असावं. आजकाल कमी होणाऱ्या संवादामुळे हे घडत असावं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गेल्या तीन चार दशकात “जे काही करायचं ते सरकारने करावं” असा जो सार्वत्रिक समज निर्माण झालाय त्यामुळेही हे घडत असावं.

अचानक आठवलं की या वर्षी दरमहा जे ब्लॉग लेखन केलंय त्यात दोन-तीन लेख पाण्यावर आहेतच. मी तर देशापासून / राज्यापासून दूर राहून लिहित होतो. जे कदाचित अनेकांनी वाचलंसुद्धा नसेल. पण तसंच इथंही अनेक विचारवंत, कार्यकर्ते, पत्रकार या विषयावर लिहित होतेच ना. तरीही दुर्दैवाने आपण जल-संधारण यासाठी खूप कमी काम करतोय हे मात्र खरंच. आता “जल-शिवार” योजनेमुळे सरकारी खात्यात जरा हालचाल दिसतेय आणि कामसुद्धा सुरु झालेय ही आनंदाची बाब म्हणायला हवी. पण एकूण सर्व-सामान्य जनता जोपर्यंत हिरीरीने अशा समाजासाठी अत्यावश्यक गोष्टींसाठी स्वतःचा खारीचा वाटा उचलणार नाही तोपर्यंत बदल कसा होणार? हाती असलेल्या “सोशल मिडिया”चा आज कार्यकर्ते प्रभावी वापर करताहेत, ती चळवळ अधिक खोलवर न्यायला हवी. त्याला प्रत्यक्ष कृतीची जोड द्यायला हवी. तरच चित्र बदलता येईल.यासाठी सुद्धा काही करायचं आहे.

“मी एकटा काय करणार, मी एकट्याने केलेल्या किरकोळ कामांमुळे असा काय बदल होणार, मी सांगितलेलं ऐकलं तरी जाईल का ?” असा मी विचार करू लागलो किंवा दुसरा एखादा माणूस हेच प्रश्न मला विचारू लागला तर कदाचित कशाचीच सुरुवात होणार नाही. किंबहुना प्रत्येकाची सदसदविवेकबुद्धी जेंव्हा त्याला काही करायला उद्युक्त करते तेंव्हा स्वतःच्या व दुसऱ्याच्या मनातील हे असेच प्रश्न आपले मानसिक खच्चीकरण करतात. त्यांच्या जाळ्यात न सापडता जे पुढे जातात त्यांना आपोआप सोबती मिळून जातात. एकमेकांचे हात पकडून पुढे जातानाच कार्य उभं राहते. नवा दिवस दिसू लागतो.

त्यामुळे आता जास्त विचार करत बसणारच नाहीये. नव्या-दिशा व नव्या स्वप्नांचा ध्यास घेणार आहे. जसं जमेल तसं नियोजन करून कामाला सुरुवात करणार आहे. चुकत-माकत का असेना पण पुढे जाणार आहे.  
जेंव्हा अगदीच गरज भासेल तेंव्हा तुम्ही सर्व मित्र पाठीशी उभे राहाल अशी आशा उराशी बाळगतो...!
-    सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)

Saturday 10 October 2015

गारुड “अमिताभ” नावाचं !


अभिनयाची उंची, जबरदस्त आवाज, रिएलिटी शो मधील सहज व आदबशीर वावर, सामाजिक प्रकल्प, कविता व निसर्ग याविषयीची संवेदनशीलता आणि त्यासोबतच अत्यंत व्यावसायिक वर्तणूक हे सर्व एखाद्या व्यक्तीने वक्तशीरपणे सतत दाखवत राहणे हे एखाद्या चमत्कारासारखेच. 
म्हणूनच गेले ४० वर्षे संपूर्ण भारतीय मनावर अमिताभचे गारुड कायम आहे.


अमिताभ बच्चन. जन्म ११ ऑक्टोबर १९४२. अरेच्चा, म्हणजे माझ्या बाबांच्या पेक्षा फक्त २ दिवसांनी मोठा असलेल्या या ७३ वर्षाच्या माणसामध्ये अजूनही कार्यरत असण्याची उर्मी व उर्जा कशी येते ?
जेंव्हा कालपरवा प्रसिद्धी मिळालेले नट सेटवर तमाशा करतात, उशिरा येतात तेंव्हा सिनेजगतातील मोठी मोठी माणसे आजही सांगतात की शुटींगच्या वेळेपूर्वी अमिताभ बच्चन नियमितपणे हजर असतात. दिग्दर्शक जे म्हणेल त्याचा आदर करत असतात. अमिताभभोवती नेहमीच लोकप्रियतेचे वलय राहिले. लोकप्रियतेबरोबर वादाचे, मसालेदार चर्चांचे गहिरे नाते. तरीही राजकारणातील वादग्रस्त काळ, एबीसीएल कॉर्पोरेशनचं कर्जबाजारी होणं या व्यतिरिक्त इतर वेळी त्याच्याबाबत नकारात्मक भावना कमीवेळाच पाहायला मिळाली त्याला कारण अर्थातच त्याचं संपूर्ण व्यावसाईक व वक्तशीर वागणे आणि संवेदनशीलता.

अमिताभ हे नाव सुमित्रानंदन पंत या काविमित्राच्या सांगण्यावरून वडील व ज्येष्ठ कवी हरिवंशराय बच्चन यांनी ठेवलेलं. त्याचा अर्थच मुळी कधीही न विझणारा प्रकाश. आज कविवर्य जर हयात असते तर काळाने नाव खरं ठरवलंय हे पाहून त्यांना अत्यानंद झाला असता..!

१९७० च्या दशकात सात हिंदुस्तानी या सिनेमातून लौकिकार्थाने अमिताभची कारकीर्द सुरु झाली.  सुपरस्टार राजेश खन्नाने गाजवलेला तो काळ. कुठेही अमिताभला ठळक लक्षात येईल असे काम मिळत नव्हते. त्यापूर्वी व नंतरही अनेक ठिकाणचे अपयश सतत पाठीशी होतेच. अमिताभच्या जादुई आवाजाची निरंतर आठवण काढणाऱ्या आपल्याला खरंही वाटणार नाही की एकेकाळी त्याचा आवाज आकाशवाणीने नाकारला होता. नोकरीच्या शोधात असलेला अमिताभ निराश मनाने तिथून परतला होता.
१९७१ मध्ये आलेल्या आनंद मध्ये अमिताभने उभा केलेला बाबू मोशाय व रेश्मा और शेरा मधला छोटासा रोल सर्वांच्या लक्षात होताच पण म्हणावं तसं यश मिळत नव्हतं.

अपयशाने थकलेला अमिताभ मुंबईतून परत जायला निघालेला. अशात त्याला अडवलं विनोदवीर मेहमूदनं. दिलदार मैत्रीसाठी प्रसिध्द अशा मेहमूदने त्याच्या बॉम्बे टू गोवा मधील एक मुख्य भूमिकाच अमिताभला दिली. सिनेमा लोकप्रिय ठरला. मात्र त्याच्या धडपडीला यशाची खरी कमान लाभली ती १९७३ च्या जंजीरमुळेच. राजकुमार आदि दिग्गजांनी नाकारलेला रोल अमिताभच्या वाट्याला आला आणि अमिताभची घोडदौड सुरु झाली. त्यानं पहिलं फिल्मफेअर अवार्डच मिळवलं त्यासाठी.
स्वराज्याची स्वप्नं पाहिलेली/ साकारलेली पिढी मागे पडून आता कोणत्याही मार्गे लवकर पैसे कमवून श्रीमंत होऊ पाहणारी जमात उदयास येत होती. भ्रष्टाचार ठसठशीत दिसू लागला होता. त्यासोबत आजूबाजूला वाढलेल्या गुंडगिरीने तत्कालीन समाजाला एक नैराश्य आलेलं. त्यात अमिताभचा तो थंड पण क्रुद्ध अवतार जणू मशालीसारखा तेजाळून उठला. लोकांना मानसिक समाधान देऊ लागला.
त्यामुळे १०-२० जणांशी एकटा लढणारा, लढून जिंकणारा तो नायक कितीही खोटा असला तरी त्याला अमिताभच्या चेहऱ्याने, आवाजाने, अभिनयाने एक वेगळेच परिमाण दिले हे नक्की.
प्रत्यक्षात हिंसेच्या विरुद्ध असणारा, कविता, सतारवादन यात रुची असणारा अमिताभ पडद्यावर मात्र उलट प्रतिमा साकारत होता. तसेच कधीही आयुष्यात दारू न पिणाऱ्या या माणसाने अट्टल दारुड्याचे वठवलेले सीन त्याची अभिनय क्षमता दाखवतात हेच खरे.

 त्रिशूल, दिवार, डॉन, देशप्रेमी, आखरी रास्ता, अमर अकबर अन्थोनी, रोटी कपडा और मकान, लावारीस अशा अनेक सिनेमातले त्याचे अवतार गाजलेच. मात्र १९७५ च्या शोले ने दैदिप्यमान यश दिले. त्यानंतर तसे यश मिळाले ते मुकद्दर का सिकंदर साठी. त्याचा तो रुद्रावतारी नायक लोकप्रिय असतानाच त्याने केलेले अन्य चित्रपटसुद्धा मला तितकेच महत्वाचे वाटतात. ह्रिषीकेश मुखर्जींचा चुपके चुपके, अभिमान, संजोग, सौदागर, कभी कभी, सिलसिला, कस्मे वादे, दोस्ताना "शराबी" यातला अमिताभ नेहमीच लक्षात राहणारा.

कभी कभी मेरे दिल में खयाल आता है हा त्याचा डायलॉग व सिलसिला मधील ते प्रणयरम्य संवाद विसरणं कसं शक्य आहे? त्याच्यावर चित्रित झालेली शेकडो गाणी विसरणं कसं शक्य आहे?
आपल्या या प्रवासात अमिताभ ने संपूर्ण चित्रपट क्षेत्रात उलथापालथ घडवली. इतर अभिनेत्यांना अक्षरशः बाजूला फेकले असता अमिताभ आपल्या सहनायकांशी नेहमीच चांगला वागलाय (काही अपवाद वगळता). शशी कपूर, धर्मेंद्र, ऋषिकपूर, विनोद खन्ना, मिथुन चक्रवर्ती यांच्याबरोबर त्याची जोडी चांगलीच गाजलीच. तसेच त्याच्या समोर असणारे खलनायक सुद्धा तितकेच महत्वाचे. अजित, रणजीत, कादर खान याबरोबर अमजद खान सारख्या खलनायकांचा त्याच्या यशात निश्चित सहभाग होताच. तेच त्याच्या नायिकांच्या बाबतीत. अमिताभच्या चित्रपटात नायिकांना फार काम नसले तरीही रेखा, जयाप्रदा, राखी, हेमा मालिनी यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटवलाय. जया भादुरी-बच्चनवर तर एक वेगळा लेखच लिहायला हवा. स्वतः सुप्रसिद्ध असतानाही तिनं या नवोदित अभिनेत्यासाठी, त्याच्या संसारासाठी आपलं करिअर बाजूला ठेवलं..!
सहनायक, नायिका, खलनायक, गायक व संगीतकार अशी सर्व टीम असली तरी मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा आदि निर्मात्यांची सर्व भिस्त अमिताभवर असायची. आपल्या परिपूर्ण मेहनतीने अमिताभने त्यांच्या विश्वासाला कधी धक्का लागू दिला नाही. म्हणूनच १९७३ च्या जंजीर, अभिमान पासून सुरु झालेला यशस्वी प्रवास १९८२ पर्यंत चालू होता. मात्र १९८२ मध्ये याला प्रचंड धक्का बसला.
निमित्त होतं कुली सिनेमावेळी झालेला अपघात. बंगलोर मध्ये त्या अपघातात अमिताभ जबर जखमी झाला. नंतरचे कित्येक महिने मग फक्त हॉस्पिटल एके हॉस्पिटल. ज्याचा जीव वाचवा म्हणून मुंबईतच नव्हे तर देशभर सर्वधर्मियांनी प्रार्थना म्हटल्या असा हा माणूस त्यातून तो काही महान नेता वैगैरे नव्हे तर होता फक्त एक अभिनेता..!
असं असलं तरी माध्यमांशी त्याचे संबंध तितकेसे चांगले नव्हते. त्याच्याशी असलेल्या वादामुळे विविध मासिकांनी, पत्रकारांनी कित्येक वर्षे त्याच्यावर अघोषित बंदीच घातलेली. तर त्याने पत्रकारांना सेटवर यायला मज्जाव केलेला.
हे चित्र पालटलं ते २००० च्या दशकात कौन बनेगा करोडपती हा शो सुरु झाल्यावर. तोपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. १९८४ मध्ये इंदिराजींच्या हत्येनंतरच्या कालखंडात अमिताभ जुना मित्र राजीव गांधी यांच्या मदतीला राजकारणात गेला. मात्र हे राजकारण त्याच्या भलतंच अंगाशी आले. कसाबसा त्यातून अमिताभ सहीसलामत बाहेर पडतो न पडतो तोच एबीसीएल कॉर्पोरेशन कर्जबाजारी परिस्थितीला सामोरे जावे लागले. शहेनशहा जादूगर, अजूबा अशा काही चित्रपटांना याच काळात अपयश पाहावे लागले. सर्वत्र एकाच हाकाटी सुरु झाली, अमिताभ संपला...! आणि अशावेळी नेमकं अमिताभ समोर प्रपोजल आलं केबीसी चं. 


या रिअलिटी शोने मात्र भारतात इतिहास घडवला. अर्थात त्यात स्वतः अमिताभचा देखील कायापालट झालेला.
माध्यमांशी नम्रतेने वागणारा, सर्व सामान्य जनतेला अत्यंत आदराने, ऋजुतेने वागवणारा, नर्मविनोदाची पखरण करणारा हा बुद्धिवान नवा अमिताभ पुन्हा सर्वांचा लाडका बनला. त्यानंतर आले अमिताभच्या सुपरस्टार पदाचे दुसरे पर्व.
आमीर, सलमान व शाहरुख ही खानत्रयी, सोबत अनिल कपूरसारखे अन्य तगडे अभिनेते असूनही अमिताभचे चित्रपट गर्दी खेचत राहिले. मोहोब्बते, कभी ख़ुशी कभी गम, बागबान, खाकी असे एकसे बढकर एक चित्रपट लोकांची पसंती मिळवत राहिले.

ब्लॅक, सरकार, पा, चीनी कम पीकू " भूतनाथ" सारखे चित्रपट उतारवयातील अमिताभ ज्या निष्ठेने करतो ते निश्चितच कौतुकास्पद आहे. असं ऐकलंय की अमिताभचा दिवस भल्या पहाटे ३ वाजता सुरु होतो. तो सकाळी आजही जिममध्ये व्यायाम करतो. सकाळी ६ वाजल्यापासून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत आणि कधी रात्री उशिरा १० वाजेपर्यंत तो व्यस्त असतो.


वयाच्या साठीनंतर जेंव्हा लोक स्वतःच्या समस्यांनी गांजून, थकून जातात, एकतर देवा-धर्माच्या मागे लागतात किंवा दुसऱ्याची उणी-दुणी काढत समाधान मिळवू पाहतात तेंव्हा हा माणूस दिवसाचे १२-१४ तास काम करतोय याचं खरंच कौतुक वाटते.

अमिताभचं सगळं आयुष्य लोकप्रियतेने वेढलेलं. आजही त्याच्या घरासमोर त्याचं किमान एकदा दर्शन मिळावे या हेतूने चाहते गर्दी करतात. त्याच्या आयुष्यात प्रायव्हसी हा भाग कमीच. कारण तो जिथे जाईल तिथे गर्दी जमतेच. त्याचं ते पहाटे उठून सिध्दीविनायकापर्यंत चालत जाणे असू दे किंवा एखाद्या सामाजिक घटनेवर ट्विटरच्या माध्यमातून केलेलं भाष्य असू दे. त्याच्या प्रत्येक वागण्याचा इवेन्ट होतो, बातमी होते. हे सगळं होत असूनही अजूनही तो जमिनीवर आहे, आपल्या क्षेत्रात नेहमीच्याच काटेकोर वक्तशीरपणे काम करतोय. त्याचबरोबर सरकारी योजनांसाठी स्वतःच्या नावाचा, प्रसिद्धीचा वापर करू देत आहे. जगात अनेक थोर अभिनेते झाले, भारतात सुद्धा अभिनयाच्या बाबतीत अमिताभला वरचढ ठरू शकतील असे कित्येक अभिनेते होते व आहेत. तरीही अमिताभला आठवत राहणे, पुनपुन्हा पहावासा वाटणे यातच त्याचं वेगळेपण आहे.

एखाद्या दिवशी आपण थकून घरी येतो. सगळ्या जगाचा राग आलेला असतो. टीव्हीवर शेकडो च्यानेलांच्या गर्दीतून सर्फिंग करताना अचानक जंजीर, दोस्ताना, त्रिशूल, किंवा डॉन लागलेला दिसला की हात थबकतोच. अनेकदा पाहिलेला तो सिनेमा आपण पुन्हा पाहू लागतो. अनेकदा ऐकून पाठ झालेले डायलॉग आपणही त्याच्यासोबत म्हणू लागतो..! आपल्याच नकळत अन्यायाविरोधात उभे राहणाऱ्या अमिताभच्या जागी स्वतःला पाहू लागतो. मनावरचा ताण हळूहळू निवळत जातो. रोजच्या लढाईसाठी उभे राहण्यास पुन्हा नवी उर्जा मिळू लागते. सगळं भासमान आहे हे माहीत असूनही आपण त्या खेळात रंगून जातो...! हेच अमिताभचं वेगळेपण.
म्हणूनच अमिताभ नावाचं गारुड असेच वर्षानुवर्षे कायम राहणार आहे !

-    सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)

Thursday 1 October 2015

दोन घोट पाण्यासाठी...!



आज हे सोबतचे छायाचित्र पहिले. टीव्हीवर बातमीसुद्धा पाहिली. लोक ज्याकडे तमाशा म्हणून पाहत होते, त्या या गोष्टीने मात्र मला कासावीस केलं. गेले कित्येक महिने लिहायला जराही वेळ मिळाला नव्हता. आज लिहिण्याची उर्मी अनावर झालीच त्याला हे चित्र कारणीभूत ठरलं.
काय आहे ही बातमी? म्हटलं तर साधीच. राजस्थान मधल्या एका गावात तहानेने व्याकुळलेला एक बिबट्या आला. त्याने एका घागरीतलं पाणी प्यायला त्यात तोंड घातले. मग त्यातच त्याचे तोंड अडकून पडले.
अगदी पंचतंत्राच्या गोष्टीत शोभेल अशीच ही कहाणी.
पण मग ती गावातली माणसे कशी वागली? त्यांनी त्याला पट्कन मोकळं केलं का?
आणि तिथेच तर खरा प्रश्न आहे.
जो माणूस स्वतःला विश्वातील सर्वात बुद्धिमान प्राणी समजतो त्या माणसाने त्या बिबट्याला त्या बिकट अवस्थेतून सोडवायला चक्क सहा-सात तास घेतले. काय करत होती ही माणसे मग?

ती गोष्ट घडल्याक्षणी सगळ्यात प्रथम माणसांनी आपले मोबाईल सरसावले. किती तरी जण जमले. कुणी फोटो काढतोय. कुणी वीडीओ शुटींग करतोय. कुणी त्या बिबट्याच्या असहायतेचा फायदा घेऊन त्याला काठीने टोचतोय. तर कुणी त्या बिचाऱ्याची शेपटी धरून ओढतोय. काय चाललंय हे???
खरंच आपण माणूस म्हणून उरलोय की आपलं सगळं माणूसपणच विसरलोय? ज्या प्राण्यांची घरं असलेली  ती जंगलं आम्ही वेगानं नष्ट करत सुटलोय, त्या प्राण्यांची काळजी घ्यावी अशी बुद्धी का होत नाही आम्हाला? खरंच आमच्यात माणूसपण उरलं आहे का?

या घटनेवेळी अपेक्षित होतं काय तर पट्कन माणसांनी त्या बिबट्याला हुशारीने मोकळे करून एखाद्या घरात कोंडून ठेवणे व नंतर वन विभागाद्वारे त्याला योग्य तिथे जंगलात सोडणे. अगदीच ते नाही जमलं तर वन-विभागाच्या लोकांना पट्कन बोलावून आणणे. मात्र त्या ठिकाणी वन-खात्याची माणसे यायलाच जणू सहा तास लागले. या कालावधीत ते भांबावलेले व तहानलेले जनावर मरून गेले असते तरी आम्हाला काय त्याचे? समजा त्या जनावराच्या जागी एखादा धुळीनं माखलेला गरीब माणूस असता तर काय केलं आम्ही? का चोर म्हणून त्यालाही मारून टाकलं असतं? पण आम्हाला काय त्याचं ? आमची तर करमणूक झाली नं? मस्त सोशल मिडियावर लाइव्ह अपडेट्स टाकता आले, आणि काय पाहिजे?

त्याच बरोबर बिबट्या पाण्याच्या शोधात घरात का घुसला त्याबद्दल विचार करणे आवश्यक होतं. ही बातमी  दाखवणाऱ्या मिडियानेही अशा काही गोष्टींचा उहापोह करायला हवा होता.
उदाहरणार्थ गावाबाहेर पाणवठे का असू नयेत? तिथे आसपासच्या प्राणीमात्रांना घोटभर पुरेल इतकं पाणी कसं जमा करता येईल याबाबत गावकरी मंडळी काय करू शकतात?. तसेच गावात प्राणी येऊ नयेत यासाठी काय करायला हवंय? आज आपली ही प्राणीसंपदा सुद्धा अस्तंगत होते आहे. त्याच्या संवर्धनासाठी काय उपाय करायला हवेत? असं काही चर्चेतून किंवा विशेष फीचर्स मधून सांगायला हवं होतं. त्यासाठी स्वतः पुढाकार घ्यायला हवा होता. मात्र ते झालं नाही. किंवा कुणी केलं असल्यास माझ्यातरी नजरेस आले नाही.
आज माणसांनी सगळीकडे कब्जा केलाय. जंगलं उध्वस्त होत आहेत. पाणीसाठे नष्ट होत आहेत. कुठेतरी कोकण व घाटमाथ्याजवळची धरणे तेवढी भरलेली. ती देखील अजून ४-५ महिन्यासाठीच. त्यातील पाणीसुद्धा आम्ही बंद पाईपातून शहरात आणणार. पुन्हा त्या पाण्यावर अनेकांचे हक्क. मग त्यावरून भांडणं व राजकारणाचे आखाडे रंगणार. एवढं झाल्यावर सुद्धा ते पाणी जास्त करून सर्व धनदांडगे, कारखाने यांनाच मिळणार. गरिबांना कशाला लागतंय पाणी? आणि गरिबांनाच जिथे पाणी मिळेनासं झालंय तिथे हे जंगलातले प्राणी म्हणजे किस झाड की पत्ती. त्यातही या गरीब बिचाऱ्या प्राण्यांना ना अशा गोष्टींविरुद्ध आवाज उठवता येत ना सार्वजनिक नळावर जाऊन आपल्या घरातली भांडी भरून आणून ठेवता येत..! टँकर वगैरे तर दूरच्या गोष्टी. काय करतील बिचारी जनावरं?
या वर्षी सर्वत्र दुष्काळाची विषण्ण छाया आहे. पण तरीही असं वाटतंय की भविष्यात काय वाढून ठेवलं आहे त्याचा अजून पुरता अंदाज आलेला नाहीये. पावसाच्या पाण्यासारखी अत्यंत मौल्यवान गोष्ट नीट जपून वापरायची अक्कल कधी येणार आहे आपल्याला?
सगळे मिडियातले लोक किंवा अन्य मोठे राजकारणी तावातावाने फक्त सांगणार की तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठीच घडणार आहे.... अरे पण ते घडू नये म्हणून तुम्ही काय करताय?

आपले ते थोर पाणीवाले बाबा राजेंद्र सिंहजी गेली अनेक वर्षे कंठशोष करतायत की महाराष्ट्रात्तील परिस्थिती भयानक आहे. इथे इतका पाऊस पडूनही जलसंधारण झाले नाहीये. अजूनही होत नाहीये. धरणांच्या मागे लागू नका. लहान लहान गाव पातळीवर कामं करून पाणी अडवा. राजेंद्रसिंहजी प्रमाणेच अण्णा हजारे, पोपटराव पवार अशासारखी मंडळी, काही ठराविक गावातून खरंच कार्यरत असणारी अनेक माणसे, संस्था यांच्याव्यतिरिक्त बाकी आपण सगळे काय करतो आहोत ?? की अगदी दुष्काळाची सावली आपल्या उंबरठ्यावर पडेपर्यंत आम्हाला जाग येणारच नाहीये?

इकडे तिकडे पाहिलं तर असं दिसतंय की आम्ही सगळे मस्त आपापल्या कामात, उत्सवी मौजमजेत किंवा मोबाईलमध्येच गुंतलो आहोत. आपल्या वागण्याला बेफिकीरीबरोबरच जे काही करायचे ते फक्त सरकारने करावं, आम्ही कर भरतोय ना?? अशा उद्दामपणाचीही थोडीशी झाक नक्कीच आहे.
मात्र याच महाराष्ट्रात गाव करील ते राव काय करील? अशी म्हण जन्माला आली होती हे बहुदा आजची पिढी विसरली असावी. त्यात त्यांचा काय दोष म्हणा? आम्ही त्यांना हल्ली मराठी शिकवतच नाही नं? मराठीतून शिक्षण म्हणजे कसं आउटडेटेड वाटतं नं??

इथे प्यायला पाणी नाहीये, शेतीला पाणी नाहीये, प्राणी-पक्षी यांना पाणी नाहीये तरी आमच्या जीवनात काही फरक पडणार आहे का? आम्ही पाणी कमी वापरायचे काही उपाय आपापल्या घरी अमलात आणणार का? आपल्या घरात, सोसायट्यामधून काही करणार का? काही अपवाद वगळता कुणी असं काही मनावर घेऊन करत नाहीये .
उलट  त्या अमक्या तमक्या मोठ्या बिल्डींगवाल्यांना /त्यांच्या स्विमीग पूलला पाणी मिळतंय, त्या पंचतारांकित हॉटेलला टबबाथ साठी पाणी मिळतंय मग मीच का काटकसर करायची? अशीच वृत्ती अनेक ठिकाणी दिसून येतेय.
आपल्या मस्तीतून, मिडियाच्या व सोशल मिडियाच्या आभासी दुनियेतून सगळ्यांना खडबडून बाहेर काढण्यासाठी काहीतरी चरचरीत घडायला हवंय हेच खरं.

-    सुधांशु नाईक (Nsudha19@gmail.com)

Saturday 10 January 2015

“तिची” गोष्ट !

“रोजच आयुष्य जगताना संसारी बाईची तारांबळ होते. दुसऱ्याच्या सुखाचे क्षण वेचताना स्वतःकडे तिचं दुर्लक्ष होतं. कधीकधी सगळं काही नकोसं वाटू लागतं.  तरीही तिला सुट्टी क्वचितच मिळते आणि तिची एनर्जी कायम इतरांसाठीच खर्च होत राहते....”
पहाटेचे ५.४० वाजले. मोबाईलमधील घड्याळाचा गजर झाला. डोळ्यातील झोप आवरत ती उठून बसली. उठून बसतानाच पाठीतून सरसरत कळ गेली मस्तकापर्यंत. काल उशिरा दमून झोपताना पाठीला क्रीम/बाम लावायचं विसरलेलं आता पुन्हा जाणवलं. आज रात्री तरी याच्याकडून लावून घेऊ असं म्हणत तिनं विस्कटलेले केस नीट बांधले. बाजूला घोरत असलेल्या “त्या”च्या अंगावरचं पांघरूण नीट केलं. क्षणभर वाटलं तिला, “त्याच्या” कुशीत शिरावं. पण... दिवसभरातील पुढल्या कामाची लिस्ट आठवली.
स्वतःच्या इच्छेविरुद्ध ती उठली. गिझर चालू केला. तोंडात ब्रश ठेऊनच बाहेर आली. दूधवाला नुकतीच दुधाची पिशवी ठेऊन गेला होता. ते घेऊन घरात आली. तोंड धुवून मोठ्या लेकाला उठवायला मुलांच्या खोलीत शिरली.
रात्री अभ्यास केल्यावर तसाच पसारा करून दोन्ही मुलं झोपून गेली होती. तिने ती सगळी पुस्तकं नीट आवरून टेबलावर ठेवली. थोरल्याचा सकाळी ७.३० चा क्लास. त्याआधी त्याचं व धाकटीची स्कूलबस पावणे नऊ वाजता येणार. त्याआधी तिचं आवरलं पाहिजे. त्याप्रमाणे तिची गणितं सुरु रोज व्हायची. लेकाला उठवलं. त्याला तिथल्या बाथरूममध्ये ढकलून मग किचनमध्ये आली. दुधाच्या पिशवीतलं दूध पातेलीत ओतलं. ती पिशवी धुवून स्वच्छ करून ठेवली. मग घराचा केर काढला. नंतर ती बाथरूममध्ये शिरली. बाथरूम मध्ये शिरता शिरता तिच्या मनात विचार आलाच. “पूर्वी छोट्या घरात राहायचो तर एकच बाथरूम सगळ्यात मिळून वाटून घ्यावी लागे. आपला नंबर लागेपर्यंत शरीरेच्छा सुद्धा दडपावी लागे. आता किमान सकाळी बाथरूममध्ये तरी शांतपणा मिळतो हे ही नसे थोडके..!”
 
जरा वेळाने आवरून ती बाहेर आली. दूध गरम करायला ठेवलं. काल रात्रीच निवडून, कापून ठेवलेली भाजी फ्रीजमधून बाहेर काढली. ती कुकरला लावली. चपातीची कणिक मळून ठेवली. मग देवापुढं दिवा-उदबत्ती लावली. एव्हाना मुलगा आंघोळ उरकून आला. मग त्याला चहा लाडू आणि चिवडा असं काही खायला दिलं. भरभर आवरून तो कॉलेजला गेला. मग बेडरूम मध्ये जाऊन “त्याला” उठवलं. काल रात्री तो उशिरा टूरवरून आलेला. त्यामुळे जरा जास्त थकलेला. “तरी आजच्या मिटींगसाठी जायला पाहिजेच ऑफिसला” असं म्हणणाऱ्या त्याच्याशी बोलत असतानाच तिनं छोटीला उठवून तिचं आवरायला सुरुवात केली. तिला सगळं नीट, पटपट नाही आवरता येत. सारखं मागे लागून सांगून करून घ्यावं लागतं. नाहीतर मग उशीर होतो. स्कूलबसवाला मामा चिडून कधी तसाच निघून जातो. तसं आज नको व्हायला म्हणून तिच्या मागे मागे लागतं सगळं आवरून झालं. छोटीसाठी पट्कन तिनं २ चपात्या केल्या. डबा भरून ठेवला. तिला सकाळी फक्त होर्लीक्स घातलेलं दूध आवडतं. पण ते नेमकं संपलंय, आणि काल संध्याकाळी गडबडीत दुसरी बाटली आणायची राहून गेली हे आता लक्षात आलं. मग छोटीची कशीबशी समजूत काढली. आज “बाबासोबत मी पण चहा पिणार, sandvich खाणार” या अटीवर छोटीने तह मंजूर केला. इतक्यात तो आला आंघोळ करून. तिनं तोपर्यंत त्याचे कपडे, सॉक्स, टाय सगळं नीट जागेवर आहे नं हे नजरेनं पाहून घेतलं. शक्यतो तो रात्रीच सगळं नीट पाहून ठेवतो, पण काल रात्री उशिरा टूरवरून आला होता नं...!
 
 
तिनं त्याना ब्रेड-ओम्लेट दिलं. एकीकडे छोटीशी बोलत, एकीकडे हातात पेपर घेऊन तो  बसला चहा-नाश्ता करत.
छोटीचा चहा-नाश्ता संपेतो स्कूल बस आलीच. “चल गं, बूट घाल पट्कन. मामा जातील हं निघून.” असं सांगत तिचं दप्तर आपल्या खांद्याला लावून एका हातानं तिला जरा ओढतच ती लिफ्टमधून खाली गेली. तिला सोडून परत घरी आली. “हुश्श..” करत दोन मिनिटं बसून राहिली.
एव्हाना “तो” ऑफिसला जायला तयार झालेला.
“आज मला कदाचित उशीर होईल हं घरी यायला. परवाच्या कॉन्फरन्सचं ट्रायल प्रेझेन्टेशन करायचंय आज. तेंव्हा तुम्ही माझी जेवायला वाट नका पाहू, मी उशिरा येऊन जेवेन.”
“अरे, किती दगदग करून घेतोस, जरा वेळच्या वेळी येत जा नं घरी. आठवड्यात शक्यतो एकही संध्याकाळी घरी नसतोस तू. हल्ली रोज तुझं उशिरा येणं त्यांना नाही रे सहन होत.. मुलं आठवण काढतात रे नेहमीच संध्याकाळी अभ्यास करताना, जेवताना..”
“काय करू मग? नोकरी सोडून घरी बसू? माहितेय नं तुला बाहेरच्या जगात कसली जीवघेणी स्पर्धा चाललीये ती. एकदा आत शिरलं की मध्येच थांबता येत नाही. त्या लोकलमध्ये कसं आपण गर्दीच्या लोंढ्याबरोबर ढकलले जातो तसं जात राहायचं फक्त. आणि नोकरी सोडून काय करू? हे घराचं लोन कसं फेडायचं? भावनेच्या आहारी जाऊन कसं चालेल एवढं साधं कसं समजत नाही तुम्हा बायकांना??”
“असं टोकाला जाऊन काय बोल्तोयस? आणि मी पण छोटी नोकरी करून हातभार लावतेयच नं? तसं तुझ्यावाचून काही अडत नाही मुलांचं, पण त्यांच्या मनानं एकदा विचार करून बघ इतकंच म्हटलं मी..”
आता उगाच शब्दाला शब्द वाढवत बसलो तर उगाच दिवसभर मन कल्लोळत राहील हे समजून दोघांनी तो विषय बंद केला. तो म्हणाला, “तुला मी सोडू जाताजाता की तू नंतर जाणार स्कूटीवरून?”
त्याचा डबा त्याच्या हातात देत ती म्हणाली, “तू जा पुढे. मी नंतर येईन. माझी मैत्रीण, ती कालिंदी पण येणार आहे आज. कालच सुट्टीवरून आलीय ती परत.”
तो निघून गेला. अचानक समोरच्या कोपऱ्यात लक्ष गेलं तिचं. तिथे नटराजाची ४ फुट उंच मूर्ती होती. तिच्यावर कोळीष्टकं जमली होती.  (ती ओडिसी नृत्य करायची तेंव्हा तिला एका कार्यक्रमात ही मूर्ती भेट मिळालेली. एकेकाळी चांगल्या समीक्षकांनी तिला गौरवलेलं. पण “त्याच्या” प्रेमात पडली. लग्न झालं आणि या संसारात ती गळयाइतकी बुडून गेली. जेंव्हा पैसे कमवायला काही करायची गरज निर्माण झाली तेंव्हाही तिला नृत्य आठवलंच नाही..! तिनं तिच्या कॉमर्सशी संबंधित अकौंटंटची नोकरी तेंव्हा पत्करली.)
गेले आठवडाभर कामवाली बाई आलेली नाही. घरात सगळीकडे पसारा झालाय. कितीतरी गोष्टी कराव्याश्या वाटतायत पण वेळ पुरतच नाहीये. गेल्या काही वर्षातलं जगणं आठवलं. “त्या” च्या कर्तबगारीमुळे त्याला मोठ-मोठ्या ऑफर्स येत गेल्या. नोकरीत तो उच्च पदाला पोचला. सुरुवातीला वन बीएचके, मग टू बीएचके, गेल्या २ वर्षापूर्वी घेतलेलं हे थ्री-बीएचकेचं घर, गाडी, घरातील वस्तू यातच सुख-समाधान मानत बसलो. ज्या अपार्टमेंट मध्ये राहायचं तिथल्या इतरांप्रमाणे आपण प्रत्येक वस्तूच्या मागे लागायचं. कारण सगळ्याजणींच्यात चर्चा चाले नं. मग ते हप्ते, त्यासाठी दोघांना हवी अधिक पगाराची नोकरी...सगळं मेलं दुष्टचक्रच हे.. कसं आपण अडकलो?
अचानक तिला जाणवलं, कामावर जायची वेळ होत आलीये. चपाती-भाजीचे चार घास गडबडीत तिनं पोटात ढकलले. स्वतःचा डबा सोबत घेतला. दुपारी मुलगा घरी येईल त्याच्यासाठी टेबलवर जेवण झाकून ठेवलं.
सगळीकडचे लाईट बंद केले. दरवाजा लॉक करून ती बाहेर पडली.
मुख्य रस्त्यावर येण्यापूर्वीच ट्राफिक. त्रासून त्यातूनच वाट काढत निघाली. वाटेत कालिंदीला पिकअप करून ऑफिसला कशीबशी वेळेत पोचली ती. लेटमार्क अगदी थोडक्यासाठी वाचवला तिनं.
 
 
आपल्या टेबलावर येऊन बसली. पण काहीच करावंसं वाटेना. विलक्षण मानसिक थकवा आला तिला. गेले काही दिवस आयुष्यात एक उदास पोकळी निर्माण झाल्यासारखं उगाच वाटत होतं. आज तर सगळं नकोसं वाटू लागलंय. किती आयुष्याची फरफट करायची? धड मुलांशी बोलायला वेळ मिळत नाही, नवऱ्याची सोबत मिळत नाही आणि मिळाली की ती अगदी “तेवढ्या”पुरती. गेल्या ५-१० वर्षात सगळं झपाट्यानं बदललं खरं. पण आयुष्य का आणि कसं यंत्रवत झालं? एकेकाळी “त्याच्या”सोबत कॉलेज व नंतर नोकरीच्या सुरुवातीच्या दिवसात छोट्याछोट्या गोष्टीत किती आनंद शोधायचो आपण. “युवा मंचद्वारे आजूबाजूच्या वाईट घटनांच्या निषेधार्थ रस्त्यावर शांततामय निदर्शनं करायचो आपण. मग आता का आपल्याला आनंदाचे क्षण का सापडत नाहीयेत? का आपल्याला समस्या दिसत नाहीयेत? आता कशाचंच काही कसं वाटेना झालंय? कशाला माणूस म्हणायचं स्वतःला? काय करतो आपण, मनसोक्त माणसासारखे जगायला? प्रश्न...प्रश्न..प्रश्न. या प्रश्नांनी तिचं डोकं भंडावून सोडलं.
इतक्यात बॉसने तिला बोलावल्याचा निरोप आला. ती समोरच्या क्युबिकलकडे गेली.
“ दोन दिवसानंतर हेड ऑफिसमध्ये ऑडीट असणार आहे. त्यासाठी तुम्ही या ऑफिसचे सर्व फायनान्शियल डिटेल्स, इतर रिपोर्टस  नीट तयार करून आजच तिकडे पाठवून द्या..” बॉसने सांगितलं. मग ती पूर्ण कामात बुडून गेली. दुपारचा डबासुद्धा तिनं तिथं टेबलावरच संपवला.
मध्येच मुलाला फोन करून तो घरी आल्याची खात्री करून घेतली. मुलीच्या शाळेत फोन केला. तिच्या प्रगतीची चौकशी केली. या सगळ्या खरंतर तिच्या रोजच्या दिवसभरातील गोष्टी. पण अशा सगळ्याचाच आज तिला मनस्वी तिटकारा आला. एका भयंकर न्युनगंडानं तिचं मन झाकोळून गेलं. येत्या १-२ दिवसात हे वर्ष संपून जाईल. कितीही समस्या असल्या समाजात, तरी ३१ डिसेंबर जोरात पार्ट्या होतील सगळीकडे. मग पुन्हा नवीन वर्ष सुरु होईल. लोकं अशीच डोळे मिटून धावत राहणार.पण आपल्या आयुष्याचं काय? ते असंच राहणार की.. शी..काय झालंय आपल्या आयुष्याचं हे? तिला प्रथमच स्वतःचीच घृणा वाटू लागली.
संध्याकाळी घरी परतताना वाटेत तिनं स्कूटी सर्विसिंगला दिली. त्याला सकाळी ९ पर्यंत ती घरी आणून द्यायला सांगितलं. आणि मग ती चालत चालत येऊ लागली. आज नवरा घरी उशिरा येणार, इथून पुढे जाऊन स्वैपाक करायचा, तो रात्री उशिरा जेवल्यावर मग कधीतरी झोप मिळणार असा विचार करत चालताना तिला अधिकच थकवा आला. पण करणार काय ? घरात आणायच्या वस्तूंची यादी आठवली. वाटेत त्या वस्तू, दुसऱ्या दिवसासाठी भाजी, मुलीचं होर्लीक्स असं काही काही घेत-घेत परत येताना तिला जरा उशीरच झाला. घरी येऊन पहाते तर आज नवरा चक्क तिच्या आधीच आला होता..!
मुलांना काही खायला देऊन त्यानं खेळायला पाठवलं होतं. आणि तो स्वतः संध्याकाळी मस्त “राजमा मसाला”  बनवायच्या तयारीला लागला होता.
ती सोफ्यावर बसली. हातातल्या पिशव्या तशाच ठेवल्या. तो जवळ आला. म्हणाला “दमलीस ना?”.
आणि ती कोसळली. अक्षरशः गदगदून रडूच आलं तिला.
 
तो गडबडला. त्यानं तिला जवळ घेतलं.
“अगं, काय झालं? कुणी काही बोललं का? ऑफिसमध्ये काही झालं का? गप,गप..रडू नको. डोळे पूस बघू आधी. हे पाणी पी...”
भावनावेग संपून गेल्यावर ती सावरली.
“नाही रे. कुणी काहीच नाही बोललं. मलाच सगळं नकोसं वाटू लागलंय. किती तारांबळ करून घ्यायची रे आपण.. किती बेकार बनलंय रे हे रोजचं जगणं. एका छताखाली राहतो आपण म्हणून फक्त कुटुंब म्हणायचं का? महागाई वाढलीय, गरजा वाढल्याहेत हे सगळं खरं. पण आपण या सगळ्यात अमाप वेगानं वाहून चाललोय असं वाटू लागलंय. आणि इतके दिवस प्रवाहासोबत जातोय असं वाटत होतं. पण आता वाटतंय आपण या प्रवाहाच्या वेगाने भरकटत तर नाही न?  भयानक वेगानं दुसरीकडंच कुठं पोचू असं वाटू लागलंय. धीर सुटलाय आणि दमलेय मी आता... फक्त माझंच नव्हे तर तुझंही हल्लीच वागणं असं आहे हे जाणवलंय का तुला? भीती वाटतेय रे आता सगळ्याची...” तिला पुढं काही बोलताच येईना.
त्यानं शांतपणे तिला कुशीत घेतलं. म्हणाला, “हो गं, जाणवलंय मला हे केंव्हाच. पण म्हणून काय करूया? सगळं सोडून कुठं जायचं? कसं राहायचं? या प्रवाहात वाहतोय आपण हे खरंच. पण धीर का सोडायचा? आणि धीर सोडला तर आपणच बुडून जाण्याची भीती आहे गं. त्यापेक्षा डोकं शांत ठेऊ. या वाहताना सोबतचे काठ दिसत राहतात दोन्ही बाजूचे. एखादं उत्तम ठिकाण सापडेल नं आपल्याला. तिथं सावकाशपणे बाजूला यायचं. पण तोपर्यंत प्रवाहाला आपल्यावर शिरजोर होऊन नाही द्यायचं. सगळं ठीक होणारेय. काही काळजी करू नकोस.. उठ, तोंड धुऊन ये स्वच्छ. मी भाजी आणि कोशिंबीर करतो. तू आज मस्त पराठे कर. इतक्यात मुलं येतीलच...”
 
तो असं म्हणेपर्यंत मुलं आलीच. “आई...” म्हणत तिला बिलगली.
“बाबा, यावर्षी ३१ डिसेंबरला काय करणारेय आपण, आपण कुठं पार्टीला जायचं?” मुलानं विचारलं.
“यावर्षी नो पार्टी. आपण ट्रीपला जाणार सगळे. उद्या रात्री निघायचं. मस्त जंगल भ्रमंतीला. मी आज रिझर्वेशन करूनच आलोय. आणि “हिच्या” बॉसला गपचूप पटवून मी सुट्टी पण मंजूर करून घेतलीय. सरप्राईज आहे ना? त्यामुळे आता आपण चार दिवस जंगलात मस्त तंबूत राहायचं. अगदी मोबाईलची रेंजसुद्धा नाही अशा ठिकाणी.” ती आश्चर्यानं त्याच्याकडं पहात राहिली...!
 
तो पुढं म्हणाला, “ या निसर्ग भ्रमंतीने आपण नवीन वर्षाची वेगळीच सुरुवात करायची. आणि तुम्हा सगळ्यांसाठी मी नवीन वर्षाचा संकल्प पण सुचवणार आहे. तोही बघा तुम्हाला आवडेल, पण नीट करायचं हं सगळं. या हिरोला टेनिस खेळायला आणि नाटकात काम करायला आवडतं ना, मग त्याने त्यापैकी एक काहीतरी शिकायला सुरु करायचं. छोटीला ओरिगामी आणि इकेबाना पुष्पसजावट करायला आवडते, तर तिने आता जपानी भाषा पण शिकायला सुरुवात करायची. इथे आपल्या गावात नुकतेच जपानी, जर्मन व फ्रेंच भाषा शिकायची सोय झालीय त्याचा फायदा घ्यायचा. आणि आमच्या बायकोने पुन्हा “ओडिसी” नृत्याचा सराव-अभ्यास सुरु करायचा आणि या वर्षअखेरीपर्यंत नोकरीतून हळूहळू बाहेर पडायचं. करणार नं तुम्ही सगळे ?”
“ आम्ही करू रे...पण  बाबा तू काय करणारेयस ते का नाही सांगितलंस ?”
“माझं काम सुरूच राहणारेय. आणि आज मला २ चांगले सहाय्यक अधिकारी मिळालेत. त्यामुळे मी आता रोज लवकर घरी येणार आणि रात्रीची भाजी-आमटी मी करणार आणि तुमच्या सोबत थोडा जास्त वेळ घालवणार...!”
“हेय्य..” मुलं आनंदानं चित्कारली. उत्साहानं घरातलं वातावरण बदलून गेलं.
पट्कन ती उठून निघाली.
“कुठं चाललीस गं आई” मुलीनं विचारलं.
“ट्रीपची तयारी नको का करायला.. हा तुमचा बाबा, अगदी शेवटच्या क्षणी सांगणार. कधी भरायचं सामान सगळं?”
जेवण, सामानाची बांधाबांध, मग भांडी आवरणे हे सारं होईपर्यंत उशीर झालाच. मुलांना जंगलात राहिलेल्या जिम कॉर्बेटची गोष्ट सांगता सांगता तोही तसाच झोपून गेला. जरा वेळाने ती झोपायला आली. अंथरुणावर बसली न आठवलं की मुलांच्या कानटोप्या, सॉक्स हे सारं भरायचं राहिलं. परत उठली. कपाटातील त्या वस्तू शोधून काढून सामानात ठेवल्या. मग झोपयला आली.
 
लाईट बंद करून झोपताना पाठीतून कळ आलीच.
“सगळ्याच्या नादात आजही दुखण्याकडे पाहायचं राहूनच गेलंय, उद्या सकाळी तरी याच्याकडून पाठीला क्रीम लावून घ्यायला हवं...” मिटल्या डोळ्यांनी झोपेच्या अधीन होताना हाच विचार तिच्या मनात पुन्हा येऊन गेला..!
-  सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)