marathi blog vishwa

Tuesday 3 January 2012

जुन्या वर्षाला निरोप..रायगडावरून..!

जवळपास रोजच विचार करायचो की रायगड ला जायला हवे..पण काही ना काही कारणे आडवी येत होती..गेल्या वर्षात इतर अनेक दुर्गांच्या भेटी झाल्या पण रायगड आपला दूर दूरच..!! शेवटी तडकाफडकी ठरवले आणि वर्ष अखेर रायगडावरच करायची ठरवून ३० डिसेम्बर ला रायगडवर डेरेदाखल झालो.."अगदी निश्चित येणार.." असे सांगणारे सोबती ऐनवेळी गाळले आणि मी, बायको व आमच्या छोट्या दोन कन्या तेव्हढ्या सोबत आल्या..पण रायगडावर पोचलो की खरच मला कुणा मित्राची कमतरता जाणवत नाही.अगदी तसेच झाले..

वर पोचलो तो रायगड जणू माणसांनी गजबजला होता..शाळांच्या अनेक सहली आलेल्या..त्या चिमुकल्या डोळ्यातून इतिहासाचा वेध घेतला जात होता.."इथे शिवाजी महाराज बसायचे..इथूनच ते लढाईची योजना आखायचे.." अशा कल्पनांनी त्या चिमुकल्या मनांना भारावून टाकले होते..काही इतिहासप्रेमी, जातिवंत गड-भटके, rope way  सुरु झाल्यामुळे येऊ शकलेले काही वृद्ध अशीही मंडळी होतीच..!
कित्येक जण म्हणतात की आता रायगडावर बाजार झालाय माणसांचा...! पण मला नाही तितकेसे पटत..उलट असे वाटते की जास्तीत जास्त लोकांनी गडावर यावे..गड नीट निरखून पाहावा..इथले अनेक अवशेष पाहावेत..गड बांधकामाची वैशिष्ट्ये पहावीत..मनाने  त्या काळात जावे..विचार करावा की अतिशय  प्रतिकूल परिस्थिती असूनही त्या थोर राजाने आपले जीवन कसे दैदिप्यमान करून दाखवले..उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्याचा अपूर्व नमुना पेश केला..!! मात्र या सगळ्या लोकांना थोडी शिस्त लावणे आपल्या हातात आहेच ना..आपण तिथे कमी पडतो म्हणून "बाजार झाल्यासारखा" वाटतो.. आज शिवप्रेमाने भरलेले अनेक ग्रुप हे काम निश्चित करू शकतील...

राजांच्या काळी सुद्धा गडावर हजारो माणसांचा राबता होता..पण केवढी शिस्त होती...कुणी कधी यायचे, कुणी कुठे राहायचे, कुणी कोणत्या बुरुजावर पहारा करायचा हे सगळे कठोरपणे अंमलात आणले जाई. गडावरील पाण्याची व्यवस्था, सांडपाण्याची व्यवस्था, पावसाचे जास्तीचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था, अठरा कारखान्यांचे कामकाम..असे किती आणि कायकाय इथे नेटकेपणाने होत असे..!! कुणाची काय बिशाद होती नियमभंग करायची..ते गरुडासारखे भेदक डोळे सगळीकडे पाहत होते ना..!!
यावरून एक अजून सांगावेसे वाटते..

आपण जेंव्हा गडावर जातो तेंव्हा फक्त शिवाजी महाराजांचाच विचार करतो हे किती चुकीचे आहे ना?? १६८० मध्ये शिव छत्रपती गेल्यानंतर १८१८ च्या त्या मे महिन्यात रायगड इंग्रजांच्या ताब्यात जाईपर्यंत या गडावर जे काही घडले ते का आठवत नाही आपण??

हाच तो रायगड जिथे शंभूराजांच्या विरोधात कारस्थाने झाली..पहिल्या वेळी त्यांनी सर्वाना माफ ही केले..पण दुसऱ्या वेळी मात्र त्यांचे उग्र रूप आणि कठोर शासन याच गडाने पहिले..१६८१ मध्ये औरंगझेब स्वराज्यावर चालून आल्यावर याच शंभूराजांनी त्या आलमगीराला  जी प्रखर झुंज दिली त्याचे नियोजन येथूनच झाले असेल ना..?
१६८९ मध्ये शम्भूराजाना क्रूरपणे संपवले तेंव्हा याच रायगडावरून महाराणी येसूबाई यांना कैद करून नेण्यात आले..त्यापूर्वी याच गडाच्या वाघ दरवाज्यातून कड्यावरील अवघड वाटेने त्यांनी भावी राजे म्हणून राजाराम महाराज व ताराराणी यांना जिंजीकडे पाठवले नसते तर कदाचित इतिहास वेगळाच झाला असता..!! तो वाघ दरवाजा इथल्या गडयात्रेत पाहायलाच हवा ना..!!

त्यानंतर १७३४ पर्यंत मोगल व नंतर सिद्दी यांच्याकडे रायगडचा ताबा होता..त्या काळात इथे काय काय झाले असेल त्याच्या आठवणीने इतिहास ही जणू मूक झाला आहे..!! पुन्हा पहिल्या बाजीरावाच्या काळात आणि सातारच्या पहिल्या शाहू राजांच्या तीव्र इच्छेमुळे रायगड मराठ्यांकडे आला तो १८१८ पर्यंत..या काळात रायगडची कशी देखभाल होत होती याची नेटकी वर्णने पेशव्यांनी कागदपत्रात लिहिली म्हणून आपल्याला त्याकाळची थोडी तरी कल्पना येते..मात्र १८१८ मध्ये शिवरायांचा तीव्र दुस्वास करणाऱ्या इंग्रजांनी रायगड जिंकूनच मग भारतावर पूर्ण कब्जा केला..असे म्हणतात की रायगड तेंव्हा ६ महिने जळत होता..राजवाडा आणि अनेक घरांचा त्यांनी जाणीवपूर्वक नाश केला..येथून कुणाला स्फूर्ती मिळू नये म्हणून..!! पण ज्या महाराष्ट्रातील दगडा दगडावर बलिदानाचा इतिहास आहे तिथे स्वातंत्र्याचा हुंकार दाबून टाकणे कसे शक्य होते..!!
रायगडावर पोचलो की असंच मन कुठे कुठे भटकत राहत..आणि मी वेड्यासारखा पुन्हा पुन्हा गडावरचे लहान मोठे अवशेष पाहत राहतो..यावेळी अजून एक ठरवले होते की राणी काशीबाई यांची समाधी व कुशावर्त तलावाजवळील दोन समाध्या (त्यातील एक ही शिवाजी महाराजांचे विश्वासू पंतप्रधान मोरोपंत यांची असावी असे काही अभ्यासकांचे मत आहे) यांची स्वच्छता करावी..ते एक काम केले. मग जेवढा जमेल तेव्हडा कचरा रोज येता जाता जमा केला..शिव प्रतिष्ठान चे जे कार्यकर्ते आले होते त्यांच्या बरोबर शिवसमाधी, शिव पुतळ्याची पूजा केली..काही ग्रुपना थोडा इतिहास सांगितला..असे जेव्हढे जमले ते केले..

रायगडावर आलो की विठ्ठलदादा आवकीरकर ला भेटतोच..यावेळी तर कुटुंबकबिला घेऊन त्यांच्याच झोपडीत डेरेदाखल झालो..विठ्ठल दादा अप्पांचा - गोनीदांचा लाडका..त्याला रायगड अक्षरश इंच इंच माहित आहे..हिरकणीचा कडा, वाघ दरवाज्याचा कडा, भवानी कडा तो तर चढून आलाच आहे  पण त्याच्या लेकीही चढून आल्या आहेत..!! असा हा विठ्ठल --त्याला आता पणतू ही झालेत पण अजूनही तो मात्र तसाच कटक आणि कणखर आहे..!! ६०-७० किलोचे ओझे डोक्यावर घेऊन तो सहजपणे रायगड चढून येतो आणि आमची तरुण पिढी मात्र धापा टाकत गड चढते..!! त्त्याच्याबरोबर थोडा फिरलो..काही महत्वाचे अवशेष गायब झाल्याचेही त्याच्या नजरेतून सुटलेले नाही..पण कोण रोखणार हे सगळं ?

दिवसभर गडाच्या मुख्य भागात तेव्हडी गर्दी असते पण बारा टाकी, दारूकोठाराचे टोक, हिरकणी कडा, भवानी टोक इकडे फारसे कुणी फिरकत नाही..तिकडे मस्त फिरावे, रात्री विठ्ठल च्या झोपडीत पिठले भाकरीचा स्वाद घेऊन अंगणात तारे मोजत अलगद झोपेच्या आधीन होण्यातले सुख अलिशान हॉटेलमधील तैनातीमध्ये नाहीच नाही..!!
म्हणूनच तीन दिवस राहूनही मन काही तृप्त झाले नाही..पण शेवटी गड उतरावा लागलाच.. आता पुन्हा जाताना मात्र थोडी अधिक मंडळी बरोबर घेऊन जायचे आहे..थोडी कामे करायची आहेत गड स्वच्छतेची..मग येणार ना तुम्ही पण??
--सुधांशू नाईक, कल्याण
- ०९८३३२९९७९१