marathi blog vishwa

Sunday 31 December 2023

जरा विसावू या वळणावर...

#सुधा_म्हणे: जरा विसावू या वळणावर...
31 डिसेंबर 23
काही सुहृदांच्या प्रेमळ आग्रहाखातर गेले वर्षभर ‘सुधा म्हणे..’ लिहीत होतो. मित्रांच्या सहकार्याने मग ‘दै.नवशक्ती’मधून त्याची ही लेखमाला रविवार वगळता रोज प्रसिद्ध होत राहिली. मुक्त मनोगत लिहायचं ज्यामुळे वाचकांना आपल्या स्वतःच्या आठवणी आठवतील,वाचलेली पुस्तकं, ऐकलेली गाणी आठवतील आणि रोजच्या दगदग आणि धावपळीने भरलेल्या आयुष्यात 5 मिनिटं आनंद निर्माण करू शकतील असा हा विचार. त्यासाठी माझ्यापरीने केलेला एक छोटासा प्रयत्न होता. तुम्हाला तुमच्याच आयुष्यातील सुखाचे क्षण आठवले असतील तर माझं छोटंसं लेखन सफल झालं असं म्हणूया. त्याचाच अधिक आनंद आहे. आज या लेखमालेतील हा शेवटचा लेख. नवीन वर्षात नवं काही घेऊन ‘नवशक्ती’ मधून पुन्हा भेटत राहूया..
मित्रहो, बालपण,तारुण्य आणि वृद्धत्व या तीन टप्प्यातून पुढे पुढे जाताना शेकडो भले-बुरे अनुभव आपण गाठीशी बांधत राहतो. आणि एक दिवस अशा टप्प्यावर पोचतो की यापुढे आपल्या जिवलग माणसाविना कुणी सोबत नसले तरी आयुष्यभर एक शांतता भरून राहते. कधी आयुष्यात ऊन असते तर कधी सावली, कधी दुःख असते तर कधी ओसंडून वाहणारे सुख. उन्हाच्या तापत्या झळा जसे जगणे असह्य करतात तसेच चंद्राचे चांदणे अवघी दुःखे विसरायला भाग पाडते. आयुष्यात कोणतीच गोष्ट कायम नसते, कायम असते फक्त जिवलगाची साथ. ती सर्वाना आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत मिळत राहायला हवी.

एक टप्पा गाठला की आपले हव्यास, अपेक्षा सगळे सगळे किती क्षणिक आहे याची जाणीव होते तरीही ते ते क्षण आपण अतीव उत्कटतेने जगणे महत्वाचेच. आयुष्याचा उत्तरार्ध, तो टप्पा, ते वळण अपरिहार्य असते. तिथून पुढील प्रवास शांत,सुखी होण्यासाठी या वळणावर क्षणभर स्थिरावणे गरजेचे. आपल्या एका अतिशय आशयघन कवितेत सुधीर मोघे हेच तर सांगत राहतात..

भले बुरे जे घडून गेले,
विसरून जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर..
कसे कोठुनी येतो आपण
कसे नकळता जातो गुंतून
उगाच हसतो उगाच रुसतो
क्षणात आतुर क्षणात कातर...

कधी ऊन तर कधी सावली
कधी चांदणे कधी काहिली
गोड करूनिया घेतो सारे
लावुनिया प्रीतिची झालर...

खेळ जुना हा युगायुगांचा
रोज नव्याने खेळायाचा
डाव रंगता मनासारखा
कुठली हुरहुर कसले काहूर....
एकेकाळी आलेला “तुझ्या वाचून करमेना..” हा चित्रपट अनेकांच्या लक्षात देखील नसेल पण सुहासचंद्र कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेली आणि अनुराधा पौडवाल यांनी अतिशय सुरेल गायलेली ही कविता म्हणजे आपल्यासाठी कायमच असणारे एक हवेहवेसे वळण आहे.
आपल्या जिवलगाच्या सोबत बसून, हाती हात घेऊन जेंव्हा दोन थकलेले जीव उर्वरित आयुष्य एकत्र घालवू पाहतात तेंव्हा त्यांचे ते एकमेकांत बुडून जाणे किती सुंदर भासू लागते ना?
-सुधांशु नाईक (9833299791)🌿
सर्वांना नवीन वर्षं उत्कट आनंदाचे, सुखदायी असावे हीच मनःपूर्वक शुभेच्छा. 🌹🌹🌿

Saturday 30 December 2023

मज आवडले हे गांव...

#सुधा_म्हणे: मज आवडले हे गांव...
30 डिसेंबर 23
‘ पोटासाठी भटकत जरी... दूरदेशी फिरेन.. मी राजाच्या पदरी अथवा घोर रानी शिरेन.. नेवो नेते जड तनुस या दूर देशास दैव, राहे चित्ती प्रिय मम परी जन्मभूमी सदैव... “ अशी कविता मनाच्या एका उत्कट अवस्थेत वासुदेवशास्त्री खरे लिहून गेले. दूर वैराण प्रांतात जगताना मनातील हिरवेगार कोकण जपत राहिले.
आपण ज्या गावी जन्मलो, जिथं वाढलो किंवा जे गांव आपले कर्मभूमी बनले ती ती सारी गांवे आपल्या मनात एक खास अशी जागा निर्माण करतात. प्रत्येक गावाचे काहीतरी वैशिष्ट्य असतेच. माणसे, खाणे पिणे, निसर्ग, रूढी किंवा गांव परंपरा हे सारं काही त्या वातावरणाचा एक भाग बनून जातं. गावाची आठवण आली की सगळं सगळं नजरेसमोरून तरळत रहातं. प्रत्येक माणसाच्या मनात एक स्वप्नातले गांव असते. ते रम्यच असते. श्रेष्ठ कवी ग दि माडगूळकर अशाच एका स्वप्नातील गावाविषयी किती सुंदर लिहून गेलेत पहा ;
मजे आवडले हे गाव !
नदी वाहती घाट उतरते
तीरावरती गोधन चरते
हिरवी मळई जळा चुंबिते
इकडून तिकडे, तिकडून इकडे
खेपा करिते नाव
मज आवडले हे गाव !

चहु बाजूला निळसर डोंगर
मधे थिटुकले खेडे सुंदर
निंब, बाभळी, अंबा, उंबर
हलुनी डुलुनी सपर्ण फुलुनी
करिती शीतळ छांव
मज आवडले हे गाव !

घरे ठेंगणी, वळत्या वाटा
चावडीपुढचा रुंद चव्हाटा
राऊळ शिखरी उंच बावटा
भगव्या रंगे जगास सांगे
वंश कुळाचे नाव
मज आवडले हे गाव !
वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत “गाठ पाडली ठका ठका” या चित्रपटसाठी लतादीदीनी गायले होते. हे गीतच इतके चित्रदर्शी आहे की डोळ्यासमोर नदीकाठी असलेला तो चिमुकला गांव दृग्गोचर होऊन जातो. डोंगराच्या बेचक्यात असलेलं ते हिरवंगार गांव, तिथं असलेली वनराई, गावातील मंदिर, जवळच्या नदीकाठी कुरणात चरणारे गोधन, त्यांच्या गळ्यातील घंटेचा किणकिणाट हे सारं सारं नुसतं आठवलं, कल्पनेतून दिसलं तरी मनाला फार सुखावत राहते. एक हवीहवीशी शांतता देऊन जाते.
हल्लीच्या आपल्या प्रचंड धावपळीच्या जगात आपण शांतताच हरवून बसलो आहोत. दरवर्षी नवीन धोरणे, नवे उद्दिष्ट, नवीन स्पर्धा यात गुरफटून गेलो आहोत. आपल्या जगण्यामुळे गावांचे गावपण देखील हरवून गेले आहे. मात्र असं शान्त सुंदर गांव तुम्हाला मला सगळ्यांना कायमच हवं असतं. नवीन वर्षात आपापल्या स्वप्नांचे गांव सर्वांना मिळत राहोत अशी प्रार्थना करून आपण जुन्या वर्षाला आता निरोप देऊया असं मला वाटतं.
- सुधांशु नाईक (9833299791)🌿

Friday 29 December 2023

पंचतुंड नररुंड मालधर…

#सुधा_म्हणे: पंचतुंड नररुंड मालधर…
29 डिसेंबर 23
आज 100व्या मराठी नाट्यसंमेलनाची सांगलीत सुरुवात होत आहे. एकेकाळी विष्णुदास भावे यांनी इथंच पहिले नाटक सादर केले होते. त्यानिमित्ताने मराठी संगीत नाटक आणि नांदीविषयी आजचं मनोगत....
अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी लिहिलेल्या “पंचतुंड नररुंड...” या नांदीने मराठी संगीत नाटक परंपरेची एक वैभवशाली सुरुवात झाली. हे विश्वच वेगळे होते. आम्ही वयात येईपर्यंत मराठी संगीत नाटकें बहुतांशी बंद होत गेली. शिलेदार कंपनीची काही नाटकें आणि प्रसाद सावकार यांची नाटकें वगळता आमच्या पिढीने मुख्यत: संगीत नाटक हे ध्वनीफिती आणि विविध पुस्तकातून मिळणाऱ्या दर्शनातून अनुभवलं.
किर्लोस्कर, खाडिलकर, देवगंधर्व भास्करबुवा बखले, पं. रामकृष्णबुवा वझे, गोविंदराव टेंबे, देवल, गडकरी, बालगंधर्व, मा. दीनानाथ, केशवराव भोसले, ज्योत्स्ना भोळे, माणिक वर्मा यांच्यासारख्या अनेकांनी नाट्यसंगीताला सोनेरी दिवस दाखवले.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची परंपरा फार फार जुनीच. मात्र नाट्यसंगीतात झालेल्या राग संगीताच्या वापराने सर्वसामान्य जनतेसाठी राग संगीत सुलभ झालं. नाथ हा माझा... म्हणजे यमन राग, सुजन कसा मन चोरी... म्हणजे भूप राग, नमन नटवरा म्हणजे हमीर आणि प्रभू अजि गमला म्हणजे भैरवी... हे असे आडाखे बांधले जाऊ लागले. त्यातूनच मग रागसंगीताशी जवळीक वाढली. भव्य अशा त्या महासागराची भीती कमी झाली. विविध राग, त्यातील बारकावे समजून घेण्याकडे, शिकण्याकडे कल वाढला. महाराष्ट्रातील कित्येक पिढ्याना नाट्यसंगीताने भुलावलं.
फक्त संगीत इतकंच नव्हतं तर नाटक पाहायला जाणे हा एक हृदयंगम सोहळा बनला. नाटक असलं की त्याची तयारी सकाळपासून होऊ लागली. स्त्री पुरुषांनी एकत्रित जाऊन नाटक पाहणे ही त्याकाळी जणू एक सामाजिक क्रांतीच ठरली.! बालगंधर्वांच्या काळात तर ते जशी साडी नेसत त्याप्रकारच्या साड्यांची फॅशन आली. नाटकाच्या पडद्यावरील कलाकुसरीला मुख्य पडदा उघडताच कडकडून टाळ्यांची दाद मिळू लागली.

गंधर्व नाटक मंडळी, ललितकलादर्श,बळवन्त आदि नाटक कम्पनी महाराष्ट्र नव्हे तर आसपासच्या इतर राज्यात देखील नाटकें घेऊन जात. तिथेही मराठी संगीत नाटक आणि नाटकातील पदे यांना उदंड लोकप्रियता मिळाली. एकेका पदाला सहा सात वन्समोअर मिळणे ही बाब फार गौरवाची वाटे. त्याकाळी गायकांना शिकवायला, दिवसभरात भरपूर रियाज करवून घ्यायला गानगुरू असायचे. नांदी, दिंड्या, साकी आदि गानप्रकार सहजतेने नाटकात सामील होऊन गेले. मराठी संगीत नाटकातील फक्त "नांदीचे सादरीकरण" असंही एखादा प्रयोग जाणकार गायक वादक करू शकतील इतकी याची लोकप्रियता अजूनही आहे.
आजही कानावर पंचतुंड सारखी नांदी ऐकू आली की उदा- धूपाचा वास जाणवू लागतो. तिसरी घंटा कानी वाजू लागते आणि मखमली पडदा उघडून कोणत्याही क्षणी समोर देखणं भव्य नाटक दिसू लागेल असं वाटत राहतं. नव्या वर्षात या मराठी संगीत रंगभूमीला पुन्हा नव्याने झळाळी मिळायला हवी असं वाटतं. तुम्हालाही असंच वाटतं का?
- सुधांशु नाईक(9833299791)🌿
पुढील लिंकवर प्रथमेश आणि मुग्धाच्या आवाजात अवश्य ऐका ही नांदी.
https://youtu.be/pImx6xq6vok?si=YMgr1mGXU9iTZPyQ

Thursday 28 December 2023

मी मज हरपून बसले गं...

#सुधा_म्हणे: मी मज हरपून बसले गं...
28 डिसेंबर 23
सुरेश भट यांच्या हातून ज्या काही लोभस रचना निर्माण झाल्या त्यातील ही मला आवडणारी एक अग्रगण्य रचना. हृदयनाथ मंगेशकर यांनी त्याला यमन कल्याण रागाचे रुपडं आणि आशाबाईंच्या स्वरांचे लखलखते कोंदण दिले.
मी मज हरपून बसले गं...
आज पहाटे श्रीरंगाने
मजला पुरते लुटले गं,
साखरझोपेत मध्येच अलगद
प्राजक्तासम टिपले गं...
भल्या पहाटे घडून गेलेल्या मोहक शृंगाराचे धाडसी वर्णन करणारे हे गीत. त्याला संगीत देताना हृदयनाथ यांना संध्याकाळचा यमनकल्याण हाच राग का निवडावासा वाटला असेल बरं? आपल्याला याचं उत्तर माहिती नसतं. मुळात सर्जनाचा तो क्षण असाच असतो. तिथं कसलेच कारण आपल्याला देता येत नाही.
सर्जनाचा हा सुंदर क्षण एखाद्या कवितेच्या निर्मितीचा असतो, एखाद्या शिल्पकाराच्या नजरेसमोर साकार झालेल्या मूर्तीचा असतो किंवा एखाद्या नात्याची सुरुवात होणारा देखील हाच क्षण असतो.का, कधी, कसं असे कोणतेच प्रश्न तिथवर पोचू न शकणारा असा हा स्वयंभू देखणा क्षण.

या गीतातील त्या दोन जीवांच्या मिलनाचा क्षणही असाच. प्रकृती आणि पुरुषाच्या मिलनातून तर सृष्टी निर्माण झाली. हा क्षण वाईट कसा असेल. मात्र अनेक मुखवटे पांघरून जगणाऱ्या समाजाने नात्यातील हळवेपण कप्पेबंद करून टाकले. एकेकाळी जिथं मंदिरावर देखील मीलनशिल्पे कोरली गेली होती तिथं या विषयाचा एकदम टॅबू केला जाऊ लागला. अनेक बंधने घातली गेली. ही बंधने इतकी कडक की साधा शब्दोच्चार देखील करणे अवघड होऊन बसलेले.
सुरेश भट या सगळ्यांना जणू भिरकावून देत गाणं लिहून जातात. मात्र त्यांचे भान जराही सुटत नाही. या शृंगाराचे धाडसी वर्णन करतानाही त्यांची लेखणी मृदू मुलायम होऊन जाते.
 त्या श्वासांनी दीपकळीगत
पळभर मी थरथरले गं
त्या स्पर्शाच्या हिंदोळ्यावर
लाजत उमलत झुलले गं...
ही ओळ त्यांच्यासारख्या पुरुषाने लिहून देखील एखाद्या युवतीच्या मनातील ते अलवार तरंग हळुवार टिपत जाते असं मला वाटते. प्रतिकात्मक म्हणून तिथं कदाचित कृष्ण राधा असावेत पण गीतातून जन्मलेली ही कहाणी तुमची, माझी सर्वांची असते. त्यासोबत आपल्या जिवलगाची याद वेलीसारखी बिलगून येते म्हणून तर वर्षानुवर्षे हे गाणं आपल्याला तितकंच ताजे तरुण भासत रहाते. पुन्हापुन्हा ऐकावेसे वाटते. बरोबर ना?
- सुधांशु नाईक (9833299791)🌿

Wednesday 27 December 2023

हम को मन की शक्ती दे ना…

#सुधा_म्हणे: हम को मन की शक्ती दे ना…
27 डिसेंबर 23
संगीत हे शब्दातीत असतं असं म्हटलं जातं. स्वर स्वयंभू असतात. शान्तपणे कुणी स्वर साधना करत असेल तर जे गारुड वातावरणात निर्माण होतं ते फार अलौकिक भासते हे खरेच. पण म्हणून शब्दांचे महत्व कमी होत नाही. जेंव्हा अलौकिक स्वरांना शब्दांच्या सामर्थ्याची जोड लाभते तेंव्हा ते संगीत सामान्य माणसांना जास्त भुरळ घालते. त्यातही दिग्गज गीतकार जेंव्हा ईश्वर प्रार्थनेसाठी गीत लिहितात त्यावेळी त्याला एक वेगळाच आयाम मिळून जातो.
आता हेच पहा ना, एखाद्याला आपण 'राग केदार ऐकूया' असं सांगितल्याने कदाचित सामान्य लोकांना नेमकं काय ऐकतोय हे कळणार नाही पण कोकिळा गा... हे गाणं किंवा जिवलगा कधी रे येशील तू… हे गाणं किंवा हिंदीतला गाजलेला चित्रपट गुड्डी मधले " हम को मन की शक्ती देना…" हे गाणं ऐकायला त्यांना नक्कीच आवडते. ती गाणी केदार रागावरच आधारलेली.
हम को मन की शक्ती देना यासाठी दिग्दर्शक हृषीदा यांनी गुड्डी चित्रपटात किती सुंदर जागा तयार केली. गुलजार यांनी लिहिलेले गाण्याचे बोल देखील अतिशय सुंदर आणि ज्येष्ठ संगीतकार वसंत देसाई यांचे संगीत देखील. वाणी जयराम यांच्या आवाजातील हे गाणं अनेक पिढ्यामध्ये उत्तम प्रार्थना म्हणून गाजलं नसतं तरच नवल होतं.
हम को मन की शक्ति देना, मन विजय करें
दूसरोंकी जय से पहले, खुदकी जय करें
हम को मन की शक्ति देना ...
भेद-भाव अपने दिलसे, साफ़ कर सकें
दूसरोंसे भूल हो तो, माफ़ कर सकें
झूठ से बचे रहें, सचका दम भरें
दूसरोंकी जयसे पहले, खुदकी जय करें
हम को मन की शक्ति देना ...
सतत अनेक प्रकारे आपण भेदभाव करत असतो. उच्च नीच जाती किंवा धर्माच्या आधारावर, गरिबी किंवा श्रीमंतीच्या जोरावर एक दुसऱ्याला हिणवत रहातो. आपल्या मनातील ही सारी जळमटे आता स्वच्छ व्हायला हवीत, क्षमाशील वृत्ती आपल्यात वाढायला हवी. भांडणे, दुस्वास, मत्सर हे सारे दोष आपल्या मनातून दूर जावेत ही प्रार्थनाच किती विशाल हृदयाचे दर्शन घडवते. आता 4,5 दिवसात नवे वर्ष नवीन स्वप्ने, नवीन उमेद घेऊन येईल. त्यावेळी आपल्याला असं प्रसन्न आणि निकोप मनानं त्याचं स्वागत करता आलं तर किती छान असेल ना?
- सुधांशु नाईक (9833299791)🌿

Tuesday 26 December 2023

हृदयी माझ्या नित्य विराजे....

#सुधा_म्हणे: दत्त दिगंबर दैवत माझे..हृदयी माझ्या नित्य विराजे...
26 डिसेंबर 23
“जय करुणाघन, निजजनजीवन अनसूया नंदन..” अशी करुणात्रिपदी म्हणत बाबा घरात शतपावली घालत असायचे. घरातील पिवळ्या बल्बचा मंद प्रकाश आणि त्या स्वरातील जाणवत राहणारी आर्तता ही अगदी बालपणातील एक सुरेख अशी आठवण आहे. अगदी 3-5 वर्षांचा असेन मी पण आजही ते सूर जसेच्या तसे आठवत राहतात. लहानपणापासून भगवान दत्ताचे चित्र पाहिल्यावर ती गाय, ते कुत्रे यांच्यासोबत सहज उभी असलेली ती प्रसन्न स्मितहास्य करत असलेली मूर्ती पहात राहणे फार आवडायचे.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी एस टी स्टॅन्ड किंवा डेपोच्या आवारात दत्त मंदिर असायचे. डेपोतील मंदिरात संगमरवरातील प्रसन्न दत्त मूर्ती आपल्याला आनंद द्यायची. तिथे दत्त गीते सुरु असायची. आणि स्टॅण्डवर असायचे नवनाथ रसवंती गृह. घुंगरू वाजत तो उसाचा चरका सुरु असायचा आणि समोर दत्तगुरूंचे आशीर्वाद घेणारी नाथाची तसबीर असायची. लहानपण सम्पून गेले तरी ते मंदिर, ते नवनाथ रसवंती गृह आणि कवी सुधांशु यांची दत्त गीते हे मनात रुजलेलं समीकरण आहे.
आज दत्तजयंती. दत्त म्हटले की कवी सुधांशु यांची दत्तभक्तीगीते आठवणे आपल्यासाठी साहजिकच आहे ना? गेली सुमारे 30,35 वर्षे आकाशवाणीच्या माध्यमातून ही दत्तगीते आपल्याला शान्त शान्त अनुभूती देताहेत. किती सोपे शब्द आणि त्यातून घडणारे लोभस असे दत्त दर्शन.
दत्त दिगंबर दैवत माझे
हृदयी माझ्या नित्य विराजे
असं जेंव्हा पराडकर यांच्या आवाजात कानावर पडते तेंव्हा आपल्या मनातील अन्य विचार किती चटकन बाजूला होतात ना. गीतातून दिसणारे रूप नजरेसमोर जणू सगुण साकार होऊन जाते.
अनुसूयेचे सत्त्व आगळे,
तिन्ही देवही झाली बाळे
त्रईमूर्ती अवतार मनोहर,
दीनोद्धारक त्रिभुवनी गाजे
दत्त दिगंबर दैवत माझे
पाहुनी प्रेमळ सुंदर मूर्ती,
आनंदाचे आसू झरती
सारे सात्विक भाव उमलती,
हळूहळू सरते मीपण माझे
दत्त दिगंबर दैवत माझे
डोळ्यासमोर साकार झालेली ती प्रेममय गुरु मूर्ती पाहून अगदी असेच वाटू लागते. मनातील तामसी भाव, त्रागा, शोक, अहंकार आदि सगळे सहज मावळून जाते. माझे मीपण संपून जाते. स्वामी स्वरूपानंद म्हणतात तसं, “ मी तू पण जगन्नाथा.. होवो एकची तत्वता.. “ ही जाणीव आत्म्यापर्यंत स्निग्धपणे पसरत जाते. प्रगाढ शान्ततेने मन भरून जाते.
सुधांशु नाईक (9833299791)🌿

Monday 25 December 2023

जगी ज्यास कोणी नाही...

#सुधा_म्हणे: जगी ज्यास कोणी नाही..
25 डिसेंबर 23
शास्त्रीय संगीताचे विश्व म्हणजे जणू महासागर. दुरून एखाद्याला त्याचं अथांगपण उमगत नाही. त्यात हळूहळू शिरत गेलं की मग खूप काही जाणवत राहतं. सगळं व्याकरण कळायलाच हवं असं नव्हे. पण एखाद्या रागातील हा स्वर किती मधुर आहे, एखादा स्वर किती कारुण्य निर्माण करतोय, एखाद्या आलापामुळे किती शान्त भाव मनात निर्माण होतायत, एखादी बोलतान, एखादी ठुमरी आपल्या चित्तवृत्ती कशा उल्हासित करते आहे हे सगळं जेंव्हा आपोआप अनुभवता येते तेंव्हा रोजचा दिवसदेखील नवीन भासू लागतो. तो सूर्योदय, ते पक्षांचे किलबिलणे, फुलणारा तो प्राजक्त हे सगळं नव्याने आपल्याला मोहवू लागतं. मग एकेका रागाचे आकृतिबंध दिसू लागतात. मनाला मिळणारे चैतन्य कधी बिहाग बनून येते तर कधी भैरव.

या भैरव रागाचे तर किती प्रकार. पं. कुमार गंधर्व यांनी तर भैरव के प्रकार या नावाने प्रात:कालीन मैफिली सादर करून रसिकांना भैरव चे विविध प्रकारे दर्शन घडवले. तरीही त्याहून तो अजूनही काही वेगळा उरतोच. बैरागी भैरव हा असाच एक सुंदर अनुभव. सकाळच्या प्रसन्न वेळी हे सूर एका गूढ विश्वात घेऊन जातात जिथं असते केवळ भक्ती आणि समर्पण.
मधुकर जोशी यांनी एक सुंदर गीत लिहिले. ते वाचल्यावर संगीतकार दशरथ पुजारी यांच्या मनात बैरागी भैरव चे स्वर घुमू लागले. सुमन कल्याणपूर मग ते शब्द आणि हे सूर घेऊन येतात,
जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे
निराधार आभाळाचा तोच भार साहे….
अत्यंत लडीवाळ असे ते स्वर जेंव्हा कानी पडतात तेंव्हा खूप आश्वस्त वाटू लागते. सदैव अनेक अडचणी सोसतांना स्वतःला आपण एकटे समजू लागतो पण कुणीच जगात एकटं नसतं. ज्या क्षणी आपल्याला ईश्वराची सोबत हवीशी वाटते तेंव्हा तो कोणत्या तरी रूपात शेजारी असतोच. हे सारं मधुकर जोशी विविध पौराणिक कथाचे संदर्भ देत छोट्याश्या ओळीतून लिहून जातात.
बाळ सोडुनी ते दिधले कुंतीने जळात
घरी रधिकेच्या परि ते वाढले सुखात
कर्णराज म्हणुनी त्याचे नाव अमर आहे..

भक्त बाळ प्रल्हादाला छळीले पित्याने
नारसिंह रूपे त्याला रक्षिले प्रभूने
अलौकिक त्याची महती अजुनी विश्व गाये...

साधुसंत कबिराला त्या छळिति लोक सारे
पांडुरंग रक्षी त्याला प्राशुनी निखारे
आसवेच त्यांची झाली दुःखरूप दोहे…
कर्ण असो, प्रल्हाद असो, संत कबीर असो की ज्ञानेश्वर अशा प्रत्येकासाठी ऐन संकटात असताना ईश्वर पाठीशी उभा राहतो.जीव वाचवतो. आपल्याला देखील तो अशीच सोबत करत असतो. एकदा ते उमगलं की जगण्याविषयी असलेली असुरक्षितता संपून जाते. अवघे जीवन सुंदर, सुखद भासू लागते. बैरागी भैरवच्या त्या मध्यम पंचमसारखे !
- सुधांशु नाईक (9833299791)🌿

Friday 22 December 2023

जिथे सागरा धरणी मिळते...

#सुधा_म्हणे: जिथे सागरा धरणी मिळते...
22 डिसेंबर 23
रेडिओवरून कायम ऐकू येणारी मराठी भावगीते आणि चित्रपटातील भावगीते हा मराठी जनांसाठी एक अनमोल असा ठेवा आहे. सी. रामचंद्र, सुधीर फडके, वसंत पवार, राम कदम आदि गुणवान संगीत दिग्दर्शकांमध्ये वसंत प्रभू यांचे नाव देखील अग्रगण्य आहेच. अतिशय मधुर अशा त्यांच्या कितीतरी रचना सहज आपल्या ओठावर रुळत राहतात. हे गीत असेच. शब्दातून भाव-भावनांचे प्रत्ययकारी चित्रण करणाऱ्या जनकवी पी. सावळाराम यांनी लिहिलेले हे गाणे. काल 21 डिसेंबर त्यांचा स्मृतिदिन होता. त्यांच्यासारख्या कलाकाराला आपण विसरणे अशक्य!
 पुत्र व्हावा ऐसा.. या चित्रपटातील सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील हे गाणे ऐकले की कुठेही असलात तरी आपले पाय क्षणभर थबकतात. गाणे ऐकताना मनात जणू आनंदाची कारंजी थुई थुई उडू लागतात. एका अनोख्या तरल भावनेने आपले मन प्रफुल्लित होऊन जाते. ही किमया असते त्या सुरांची,लयीची आणि आवडत्या जिवलग व्यक्तीच्या प्रतिक्षेची.
नदी आणि समुद्र हे असेच जिवलग. तो तिच्यासाठी उसळत राहतो, गर्जत राहतो. पुकारत राहतो. ती डोंगर उतरून भन्नाट वेगाने त्याच्याकडे धावू लागते. वाटेतील डोंगर, दऱ्या, गावे यांना वळसा घेत, प्रसंगी काळे कभिन्न कठीण कातळ फोडून त्यातून वाहत राहते. कधी अडखळते,ठेचकाळते, कधी मनसोक्त उचंबळत राहते.
त्याची भेट दृष्टिक्षेपात येताच शांत शांत होऊन जाते. अलगद त्याच्या कुशीत शिरते.
अशा जागी मी तुला भेटायला येऊन थांबते ही कल्पनाच किती रम्य आहे. मनोहर आहे. अनेक वर्षे आवडत असणारे हे गीत कधीही ऐकत राहावे असेच आहे.

जिथे सागरा धरणी मिळते, तिथे तुझी मी वाट पाहते
डोंगर-दरिचे सोडून घर ते, पल्लव-पाचूचे तोडून नाते
हर्षाचा जल्लोष करुनी जेथे प्रीत नदीची एकरुपते..

वेचित वाळूत शंख-शिंपले, रम्य बाल्य ते जिथे खेळले
खेळाचा उल्हास रंगात येउनी धुंदीत यौवन जिथे डोलते
बघुनी नभींची कोर ती,सागर हृदयी ऊर्मी उठती
सुखदुःखाची जेथे सारखी प्रीतजीवना ओढ लागते..

बालपणी याच समुद्राकाठी लहान मुले खेळत राहतात तर याच संगमी दोन प्रेमी जीव एकमेकांच्या कुशीत विसावा शोधतात. चंद्राला पाहून सागराला भरती येते हा रुक्ष वैज्ञानिक वाक्यासाठी “बघूनी नभीची चंद्रकोर ती.. सागर हृदयी उर्मी उठती..” इतके लोभस, हळूवार पी. सावळाराम लिहून जातात तेंव्हा अक्षरश: सलाम करावासा वाटतो त्यांच्या प्रतिभेला. 
तिच्या कपाळावरील नाजूक चंद्रकोर पाहून प्रत्यक्ष चंद्राच्याही मनी प्रेमाचे भरते येत असेल ना? असे विचार मनी येत रहातात. हे गोड गाणे आपल्या हृदयी जो हर्षोल्हास निर्माण करते ते ते सगळे शब्दात कसे मांडायचे? सगळे काही शब्दांच्या पलिकडले आहे..!
-सुधांशु नाईक (9833299791)

Thursday 21 December 2023

मी ही सुंदर, तू ही सुंदर...

#सुधा_म्हणे: मी ही सुंदर, तू ही सुंदर...
21 डिसेंबर 23
देवा तुझे किती सुंदर आकाश.. असे गीत लहानपणी आपण म्हणत होतो. ईश्वराने हे सर्व विश्व सुंदर घडवले आहे हे खरेच. पण आपण त्याकडे कसे पाहतो हेही महत्वाचे असते. महाभारताचा संदर्भ घेऊन एक कथा सांगितली जाते. एकदा युधिष्ठिर आणि दुर्योधन दोघेही कृष्णाकडे येतात. हे जग कसे आहे त्याबद्दल त्याला विचारतात. कृष्ण म्हणतो तुम्हीच सांगा पाहू आधी, तुम्हाला हे जग कसे वाटते?
दुर्योधन म्हणाला, “सगळे लोक खूप वाकड्या स्वभावाचे आहेत. संशयी आहेत. सतत दुसऱ्याला त्रास देण्याचा विचार करतात. त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवायला नको. त्यांना कडक नियम आणि कडक शिक्षा देऊन कायम टाचेखाली ठेवायला हवे.” मग कृष्णाने युधिष्ठिरला विचारले, बाबा रे, तुला काय वाटते?
युधिष्ठिर म्हणाला, “लोक तर खूप चांगले आहेत. किती कष्ट करतात. शेतात राबतात, युद्धात शौर्य गाजवतात, एकमेकांशी प्रेमाने वागतात. एखाद्याच्या अडचणीत मदतीला धावून जातात.त्यांना अजून मोकळेपण द्यायला हवे म्हणजे त्यांच्या गुणांना अधिक वाव मिळेल.”
कृष्ण म्हणाला, पाहिलेत तुम्ही.. आपण जसे असतो तसे आपल्याला जग दिसते..! तुम्ही सुंदर, निर्मळ, प्रसन्न आणि दुसऱ्यावर विश्वास ठेवून जगत असाल तर तुम्हाला हे जग छान दिसतेच.
अशावेळी मग ओठावर ही सुंदर कविता येते,
मीही सुंदर, तूही सुंदर,
आज भासते सारे सुंदर
जग हे सुंदर, नभ हे सुंदर
जे जे दिसते, ते ते सुंदर ..
प्र. के. अत्रे आपल्याला घणाघाती भाषणे, अग्रलेख यांच्यासाठी माहिती असतातच. त्यांनी लिहिलेल्या लोकप्रिय नाटकासाठी माहिती असतात. मात्र ही सुंदर सोपी कविता त्यांची आहे हे आपल्याला माहिती नसते. त्यांनी ही कविता लिहिली ज्याला दत्ता डावजेकर यांनी संगीत दिलेले आणि गायले होते पं. उदयराज गोडबोले यांनी.
निळेभोर हे आभाळ मोकळे,
रविकिरणांचे मळे उमलले
स्वर्गाचे बघ दार उघडले,
अमृतरसांचे सांडती पाझर..
सुंदरतेचा पहा उसळला
जिकडे तिकडे अथांग सागर..

आधी माणसांनी स्वतःवर प्रेम करायला हवे. आणि मग अवघ्या चराचरावर. आपोआप अवघी सृष्टी सुंदर दिसू लागते. रोज सूर्योदय, सूर्यास्त, चंद्र, तारे, नदी, वारे, समुद्र, झाडे, पाने,फुले असे सारे काही दिसत असते. आपण त्याकडे प्रेमाने पाहतो का? रोज नव्याने अवघी सृष्टी ताजीतवानी होत असते. आपण स्वतः तसे रोज नव्याने जागे होतो का?

स्वच्छ निर्मळ नजरेने आपण विश्वाकडे पहात राहिलो तर सर्वत्र सुंदरतेचा अथांग सागर पसरलेला दिसेलच. आपल्या मनातील शंका, संशय, दुसऱ्याविषयीचा अविश्वास हे सारे कायमचे नष्ट झाले तर या विश्वात फक्त आनंद भरून राहील असे मला वाटते.
-सुधांशु नाईक(9833299791)🌿

Wednesday 20 December 2023

जग दोघांचे असे रचू की....

#सुधा_म्हणे: जग दोघांचे असे रचू की....
20 डिसेंबर 23
आयुष्यात आपल्याला काय हवे असते? उत्तम शिक्षण, आपले आयुष्य सुरळीत सुरू राहावे यासाठी उत्तम आर्थिक तरतूद आणि हवीहवीशी साथसंगत. माणसे आयुष्यात शिक्षण, नोकरी/व्यवसाय हे सगळे आपल्या पायावर धडाडीने उभे करू शकतात. जेंव्हा आपल्याला हवी तशी सोबत लाभते तेंव्हा मग आयुष्याला दृष्ट लागू नये असे वाटू लागते.
एखाद्या चित्रपटासाठी गीत लिहिताना देखील ते किती सुंदर लिहिता येते हे आपल्याला मराठीत गदिमा, जगदीश खेबुडकर, शांता शेळके, सुधीर मोघे आदि प्रतिभावान गीतकारांमुळे कळले. सिनेमासाठी गीत लिहायचे असले तरी ते सुंदरच असायचे. “माझं घर माझा संसार” या चित्रपटातील हे गाणे तुलनेने कमी ऐकले जाते पण त्यातील भावना आणि गोडवा नक्कीच कुठे उणावत नाही.
एखादी उत्तम कविता असावी असे हे गीत आणि त्याला अरुण पौडवाल यांनी दिलेली छान चाल. अरुण पौडवाल एक गुणी संगीतकार होते. अनिल मोहिले आणि अरुणजी यांनी अनेक चित्रपटांसाठी सुरेख रचना दिल्या. सुधीर मोघे यांचे हे गीत सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल नेहमीच्याच सुबकतेने गातात पण गाणे ऐकून संपले तरी यातील शब्द आपली पाठ सोडत नाहीत.

दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे !

एकमेकांचे झालेले दोघेजण नवा संसार सुरू करतात. त्यासाठी कितीतरी स्वप्ने पाहतात. ती फक्त स्वप्ने नसतात तर त्या स्वप्नाना पूर्ण करायला दोघे सिद्ध होतात. त्यांना खूप मोठ्या ऐषोरामाची ओढ नाहीये. आपले घर असे हवे की जिथे दोघांची स्वप्ने साकार होतील. आपल्या दोघांचे जग इतके सुंदर असावे की तिथे जगातील सारी सुखे फिकी पडावीत. तिथे असावा आनंद आणि समाधान.

स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे
दोघांनाही जे जे हवे ते होईल साकार येथे
आनंदाची अन्‌ तृप्तीची शांत सावली इथे मिळे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे !

मुळात आपल्याला हवे तसे नाते जन्म-जन्मातून कधीतरी लाभते. आपल्याला एकमेकाना जपायचे आहे हे त्या दोघांना जितके उमगलेले असते तेवढे अन्य कुणाला समजणार? तिथे ईर्षा नसते तर आपल्या जिवलगाचे गुण फुलवत नेण्यासाठी दिलेला आधार असतो. त्याने उत्तम आयुष्य आनंदात घालवावे यासाठी दिलेली सोबत असते.

जुळलेले नाते अतुट घडे जन्मजन्मांची भेट
घेऊनिया प्रीतिची आण एकरूप होतील प्राण
सहवासाचा सुगंध येथे आणि सुगंधा रूप दिसे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे !

एकमेकांच्या प्रेमाचा, सहवासाचा सुगंध लाभलेली अशी नाती असताना मग स्वर्ग देखील इथेच निर्माण होतो, वेगळ्या स्वर्गाची आसक्ती उरतच नाही हेच खरे. जगभर सर्वत्र असे लोक सुखाने जगत राहिले तर अवघे जगच किती सुंदर होईल ना ?
-सुधांशु नाईक (9833299791)🌿

Tuesday 19 December 2023

उषाताई आणि ससा तो ससा...

#सुधा_म्हणे: उषाताई आणि ससा तो ससा..
19 डिसेंबर 23
उषा मंगेशकर. नुकताच त्यांचा वाढदिवस साजरा झालाय. लता आणि आशा या दोन दिग्गज बहीणींच्या नंतर असलेले तितकेच गुणी व्यक्तिमत्व. उषा मंगेशकर उत्तम चित्रकला जाणतात, फोटोग्राफी जाणतात आणि गाणे तर ईश्वरानेच या सर्वांच्या गळी उतरवले आहे.
आपल्या घरात असलेल्या दोन दिग्गज बहीणींच्या विषयी त्यांना कधीच असूया नव्हती आणि त्यांचे जगणे त्या अतीव आनंदात जगत राहिल्या. त्यांच्या वाट्याला आलेल्या गाण्यांचा कॅनव्हास किती मोठा आहे. किती व्हर्साटाइल आहेत त्याही. जाऊ देवाचीया गावा, रचिल्या ऋषिमुनिनी आदि भक्तिगीते / अभंग गाणे असो किंवा छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, मला लागली कुणाची उचकी.. सारख्या धुंद मादक लावण्या असोत उषाताईनी प्रत्येक गीत मोठ्या झोक्यात सादर केले. किती सुंदर शोभून दिसतो त्यांचा गळा विविध गाण्यांना. असे वाटते की दुसऱ्या कुणाला हे गाणे इतके छान जमलेच नसते.
“जे तुझ्याचसाठी होते केवळ फुलले, वाटेत तुझ्या मी फूल ठेवूनी आले..” असे गाणे जेंव्हा त्या गातात तेंव्हा त्या हळव्या कातर भावनेला समजून घेताना मन भरून येते. केळीचे सुकले बाग सारखे गाणे असो किंवा जय जय संतोषी मा असो किंवा मुंगळा मुंगळा.. सारखे तडकभडक गाणे असो, उषाताईनी आपली जी स्वरमुद्रा त्यावर उमटवली आहे ती फार सुरेल आहे. अविस्मरणीय आहे.

त्यांनी गायलेली बालगीते हे पुन्हा एक वेगळे दालन. आपल्यासारख्या असंख्य मुलांना, किमान 5-10 पिढ्यांना त्यांच्या या बाळगीतांनी आजवर अपार आनंद दिलाय. आई आणि बाबा यातून, कोण आवडे अधिक तुला.. एक कोल्हा बहु भुकेला, गोड गोजिरी लाजलाजरी होणार ताई तू नवरी.. अशी लहान मुलांची गाणी गाताना उषाताईंचा आवाज इतका गोड, मधाळ होतो की कोणतेही लहान मूल त्याच्याकडे पटकन आकर्षित होऊन जाते.
ससा आणि कासवाच्या शर्यतीची गोष्ट ही किती दशके प्रत्येक पिढी ऐकते आहे आणि त्या गोष्टीचा आनंद घेते आहे. त्याच गोष्टीचे एक सुंदर बालगीत बनवले शांताराम नांदगावकर यांनी आणि लहान मुलांच्या ओठावर पटकन रुळेल अशी भन्नाट चाल दिली अरुण पौडवाल यांनी. हे गाणे इतके गाजले कारण त्याला उषाताईंचा लोभस हवाहवासा आवाज लाभला होता...
ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली..
वेगेवेगे धाऊ आणि डोंगरावर जाऊ
चल शर्यत रे आपुली..
हे गाणे आजही अनेकांना तोंडपाठ असेल. मॅनेजमेंट स्टडीज करताना या कथेची किती नवीन रुपे ऐकली पण मूळ गाणे आजही तसेच आहे. अजरामर आहे. आपल्यानंतर देखील ते अनेक चिल्ल्या-पिल्ल्याना मोहवत रहाणार आहे. आपण फक्त ते पुढील पिढ्यांना आपल्याकडून ऐकवत राहूया.
-सुधांशु नाईक (9833299791)🌿

Monday 18 December 2023

नमस्कार माझा हा ज्ञानमंदिरा...

#सुधा_म्हणे: नमस्कार माझा हा ज्ञानमंदिरा...
18 डिसेंबर 23
शाळा. आपल्या आयुष्याला खरा अर्थ देणारी जागा. जरासे कळू लागते आणि आपल्याला शाळेत नेऊन सोडले जाते. घरातील मायेच्या माणसांमधून आपण एकदम मोकळ्या जगात येतो. विविध परिस्थितीत जगणारी कित्येक मुले आजूबाजूला असतात. सगळ्यांशी जुळवून घ्यावे लागते. शिकवणाऱ्या शिक्षकांशी देखील आपले नाते जुळते. कित्येकदा असे होते की घरात आई-बाबांनी सांगितलेली एखादी गोष्ट कदाचित मूल ऐकत नाही. पण शाळेतील बाईनी सांगितले तर हमखास ऐकते.
बाई,ताई,मॅडम असे तुम्ही त्यांना काही म्हणा, बालवाडी आणि प्राथमिक शाळेत असणाऱ्या या शिक्षिका मुलांना फार मायेने सांभाळतात. विविध बडबडगीते शिकवताना उत्तम अशी गाणी, प्रार्थना हे देखील मुलांना सहज शिकवतात. भावगर्भ आशय असलेल्या कविता, त्या प्रार्थना मुलांच्या मनात खास असा ठसा उमटवून जातात. पुढील आयुष्यात जेंव्हा कधी एखाद्या वेळी एखादी प्रार्थना किंवा गीत आठवते तेंव्हा शाळेतील त्या प्रसन्न दिवसांची आठवण मनात दरवळू लागते. मन प्रसन्न होऊन जाते. सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांच्या मधुर स्वरात सजलेली ही प्रार्थना देखील अशीच.. शाळेला वंदन करणारी..!

नमस्कार माझा हा ज्ञानमंदिरा ।
सत्यम शिवम सुंदरा ।। धृ ।।
शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे ।
प्रगतीचे पंख दे, चिमण पाखरा ।
ज्ञानमंदिरा, सत्यम शिवम सुंदरा ।। १ ।।

आयुष्यात आपल्याला काय हवे असते ? शक्ति, भक्ती, युक्ती, नीती आणि प्रगती. हे सगळे इतक्या छोट्याशा प्रार्थनेत बसवताना खेबुडकर किती सुंदर शब्द वापरुन जातात. आपले आयुष्य घडवायला पैसा लागतो ही जाणीव खूप उशिरा येते. तोवर शाळा आपल्याला अभ्यास शिकवते, वागावे कसे, बोलावे कसे हे शिकवते. आपल्यात जन्मजात एखादे कला गुण असल्यास त्याला प्रोत्साहन देते.

विद्याधन दे आम्हास, एक छंद एक ध्यास ।
नाव नेई पैलतीरी दयासागरा ।
ज्ञानमंदिरा, सत्यम शिवम सुंदरा ।। २ ।।
होऊ आम्ही नितीमंत, कला गुणी, बुद्धीमंत ।
कीर्तीचा कळस जाई, उंच अंबरा ।
ज्ञानमंदिरा, सत्यम शिवम सुंदरा ।। ३ ।।

जेंव्हा एखादे मूल उत्तम शिक्षण घेऊन, आपले कलागुण विकसित करून मोठे होते, नावलौकिक कमावते तेंव्हा त्याच्या घरातील सदस्याइतकेच त्याला शाळेतील शिक्षक देखील सहाय्यक ठरलेले असतात.
आपण मोठे झाल्यावर जेंव्हा कधी आपल्या शाळेतील बाईंना, सरांना भेटतो, त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार करतो तेंव्हा पाठीवरून फिरणारा त्यांचा हात हा ईश्वराचा आशीर्वाद असतो. कोणतीच मागणी नसते त्यांची आपल्याकडे. अशा शिक्षकांमुळे तर ती शाळा ज्ञानमंदिर होऊन जाते. असे ज्ञानमंदिर आपल्याला लाभले, तसेच पुढल्या पिढ्यांना देखील मिळायला हवे ना?
-सुधांशु नाईक (9833299791)🌿

Saturday 16 December 2023

या लाडक्या मुलांनो...

#सुधा_म्हणे: या लाडक्या मुलांनो..

16 डिसेंबर 23

शाळेतील दिवस हे शक्यतो सर्वांसाठी न विसरता येणारेच असतात. मित्र, खेळ, वह्या पुस्तके, पीटीचा तास, प्रयोगशाळा, ते फॉर्मलीनचे वगैरे वास या सगळ्यासोबत न विसरणारी आठवण असते ती शाळेतील प्रार्थनेची. प्रत्येक शाळेची प्रार्थना ठरलेली असते. आपली शाळा संपून किती वर्षे झाली तरी शाळेतील ती प्रार्थना आठवतेच. शाळेची घंटा, त्यानंतर लाऊडस्पीकरवरुन दिलेल्या सूचना झाल्या की शाळेतील सुरेल मुलांच्या आवाजात प्रार्थना सुरू होई. 

कित्येक शाळातून आता रेकॉर्डिंग ऐकवले जात असले तरी आपल्याच ओळखीच्या मुलांनी म्हटलेली प्रार्थना, ती विशिष्ट लय हे सगळे मनात अगदी फिट्ट बसून जात असे. प्रार्थनेपूर्वी शाळेत पोचायला हवे नाहीतर हातावर छडी बसेल ही भीती जसे असायची तसेच आज पुन्हा दोस्त नव्याने भेटतील, आज अमुक तासाला काहीतरी नवीन शिकवतील याचीही ओढ असायची. तो परीपाठाचा तास, एखादी प्रार्थना, मार्गदर्शन करणारे एखादे भाषण किंवा गाणे  हे कायम लक्षात राहत असे. 

मधुकर जोशी यांनी लिहिलेले हे गीत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात जेंव्हा आपण ऐकतो तेंव्हा कुणीतरी मायेने आपल्याला शिकवत आहे असेच वाटून जाते. लहानशी मुले देखील चटकन आकर्षित होतील अशी साधी सुरेख चाल त्याला दिली होती दशरथ पुजारी यांनी.

या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार

नव हिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार..

आईस देव माना, वंदा गुरूजनांना

जगी भावनेहूनी त्या कर्तव्य थोर जाणा

गंगेपरी पवित्र ठेवा मनी विचार..

शिवबापरी जगात दिलदार शूर व्हावे

टिळकांपरी सदैव ध्येयास त्या पूजावे

जे चांगले जगी या त्याचा करा स्वीकार..

एखाद्या दूरच्या वस्तीमधून मुले दोन तीन किलोमीटरचे अंतर चालत एखाद्या गावी शाळेत येतात. कित्येकदा त्यांना उपाशीदेखील यावे लागत असेल. अशा मुलांना आपण का शिकायला हवे, शिक्षण घेतल्याने आयुष्यात काय फरक पडणार आहे आपले आदर्श कोण असायला हवेत हे सगळे अशा एखाद्या गीतातून जेंव्हा सहजपणे 2 मिनिटात त्यांना समजते तेंव्हा आपल्या भविष्यात आपण सुरेख काही करूया असा आत्मविश्वास त्यांच्यात वाढणारच. 

एखादे मूल मोठे झाल्यावर पुढे जाऊन जेंव्हा सांगते की, “अमुक एक गाणे ऐकले किंवा एखादे पुस्तक वाचले किंवा  अमुक एक भाषण ऐकले आणि त्यामुळे मी बदलून गेलो..” तेंव्हा त्या रचनाकर्त्या लोकांना किती समाधान होत असेल ना?

-सुधांशु नाईक (9833299791)

Friday 15 December 2023

अवघा आनंदी आनंद...

#सुधा_म्हणे: अवघा आनंदी आनंद..
15 डिसेंबर 23
बाळ कोल्हटकर हे मराठी नाट्यसृष्टीतील एक फार मोठे नाव. त्यांच्या प्रतिभेच्या, त्यांनी केलेल्या निर्मितीच्या अनेक गोष्टी सर्वाना ठाऊक आहेत. देव दीनाघरी धावला, वाहतो ही दुर्वाची जुडी, दुरितांचे तिमिर जाओ अशा नाटकांचे त्याकाळी सुमारे दीड दीड हजार प्रयोग त्यांनी केले. उठी उठी गोपाळा, ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, आई तुझी आठवण येते आदि त्यांनी लिहिलेल्या गीतांना अपार लोकप्रियता लाभली. दुर्वाची जुडी या शब्दांचे वापर करून त्यांनी त्या नाटकात केलेल्या चारोळीवजा रचना एकेकाळी अतिशय गाजल्या होत्या. मराठी प्रेक्षकांना नाटकात नेमके काय पाहायला हवे असते याचे त्यांनी बांधलेले आडाखे तेंव्हा अचूक ठरले होते. जरा जास्त भावनोत्कट असलेली त्यांची नाटके म्हणूनच गाजली होती.
पं. कुमार गंधर्व, भालचंद्र पेंढारकर यांच्याप्रमाणे त्यांनी पं. भीमसेन जोशी यांच्या रसिकप्रिय आवाजाचा आपल्या नाटकासाठी समावेश केला होता. इतकेच नव्हे तर नाटकाला संगीत देण्यामध्ये देखील त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले होते. आपण नेहमी विविध प्रार्थना म्हणत असतो. बाळ कोल्हटकर यांनी लिहिलेली ही प्रार्थनाच आहे जणू. भीमसेन जोशी यांच्या घनगंभीर आवाजात ऐकताना आपलेही मन विशाल व्हावे असे वाटू लागते. आयुष्यात आपल्याला आनंद हवा असतो. पण आनंद नेमका कशात असतो, तो फक्त पैशात थोडाच असतो ? आनंदाच्या प्रत्येकाच्या कल्पनाही भिन्न असतात. इथे आनंद कसा हवा हे सांगताना कोल्हटकर लिहितात,
अवघा आनंदी आनंद
मना घे हा छंद
नलगे धनसंपदा
शुद्ध बुद्धी देई सदा
नांदो जनात आनंद
सत्य सदा समतानंद..

समदृष्टी विश्व पहावे
दुसरा आपण होऊन जावे
जीव शिवाला भेटतो,
तेथे होतो नामानंद...
"आता विश्वात्मके देवे... "असं म्हणणारे ज्ञानोबा असोत किंवा अन्य संत, ते सगळे हेच तर सांगत असतात. “समदृष्टी विश्व पहावे, दुसरा आपण होऊन जावे..” ही भावनाच किती सुरेख आहे ना? प्रत्येक माणसाला आयुष्यात फक्त शुद्ध आनंद मिळत राहावा ही जाणीव प्रत्येकाला होणे म्हणजेच इथले जीवन सुखदायी होणे नव्हे का ?
-सुधांशु नाईक (9833299791)🌿

Thursday 14 December 2023

भक्तीवाचून मुक्तीची...

#सुधा_म्हणे: भक्तीवाचून मुक्तीची...

14 डिसेंबर 23

मनुष्य रोजच्या आयुष्यात आपापली कामे करतो आणि ईश्वराची भक्ती करतो ती बहुतेकदा कोणतातरी

हेतू मनात ठेऊन. ज्या माणसांना निरपेक्ष जगता येते ती संत माणसे. कित्येकदा अशी माणसे आसपास

दिसतात आणि त्यांच्याकडे पाहून एक शांत जाणीव आपल्या मनभर पसरून जाते. अशाच एका माणसाची

आठवण या गाण्यामुळे आठवणीत भरून राहिली आहे.

एकेकाळी रोज सकाळी लवकर उठून कामावर गेल्यावर तिथे एका टपरीवर आम्ही मित्रमंडळी चहा

प्यायचो. टपरी चालवणारे पांडूमामा वारकरी होते. सगळ्यांशी प्रसन्न हसत बोलायचे. ते नोकरीचे

सुरुवातीचे दिवस. खूप कमी पगार असायचा. कधी रोजच्या चहाला देखील पैसे नसायचे. त्यामुळे टपरीवर

आमची उधारी असायची. तिथे वही ठेवलेली असे. त्यात आपणच आपली नोंद करायची, महिन्याचा पगार

झाला की पैसे द्यायचे अशी पद्धत.

एकदिवस त्यांना विचारले की मामा कुणी काय नोंद केलीये हे तुम्ही बघत नाही. प्रत्येकाला आपला हिशोब

स्वतःच बघ सांगता आणि महिनाअखेरीला तो देईल ते पैसे घेता. पण तुम्हाला कुणी फसवले तर..?

ते फक्त हसले म्हणाले, अरे, दहापैकी एखादा असतो, कधी 10-20 रुपये कमी लिहितो वहीत. त्याचे

त्याला माहिती असते की आपण या मामाला फसवले आहे. त्याच्याशी माझी वागण्याची पद्धत बदलत

नाही. त्यामुळे माझ्या मनावर कसलेच टेन्शन नसते, त्याला मात्र आपण केलेल्या एका चुकीचे कायम

स्मरण राहते. त्याचे मन एकतर स्वतःला खात राहते किंवा तो अधिक मोठे गुन्हे करायला निर्ढावतो.

दोन्हीमध्ये नुकसान त्याचेच.


मी म्हटले, मामा तुम्ही तर संत माणूस आहात. मग हसले आणि म्हणाले, तसे नाहीये. माझीही कुठे

सुटका झालीये सगळ्यातून. पण कुठे जायचे आहे हे आता कळू लागलंय. आपण कायम आपल्या मस्तीत

जगतो. लहानपण,तरुणपण उलटून अगदी अंथरुणावर पडलो की मग देव आठवू लागतो. आपण फक्त

पोटासाठी, आपल्या घरच्यांच्यासाठी कामे करतो आणि आयुष्याच्या शेवटी काहीही न करता देवाने कृपा

करावी, मुक्ती द्यावी असे म्हणतो. देव कनवाळू आहे म्हणून तो नीट वागतो पण आपण खरे त्याचे

अपराधीच आहोत. त्याच्यातले कनवाळूपण आपल्यात आले तर जगण्याला खरा अर्थ आहे. त्यापुढे काही न

बोलता मग गाऊ लागले;

भक्ती वाचून मुक्तीची मज, जडली रे व्याधी

विठ्ठल मीच खरा अपराधी || धृ ||

ज्ञानेशाचे अमृत अनुभव, अनुकम्पेचे नेत्री आसव

स्वप्न तरल ते नकळे शैशव, विरले त्यांत कधी... विठ्ठला || १ ||

संत तुक्याची अभंगवाणी, इंद्रायणीचे निर्मळ पाणी

मीच बुडविला दृष्ट यौवनी, करुणेचा हा निधी.. विठ्ठला || २ ||

सरले शैशव स्वच्छंदीपण, नुरले यौवन नुरले मी पण

परी न रंगले प्रमत्त हे मन, तुझ्या चिंतनी कधी.. विठ्ठला || ३ ||

आज जवळपास तीस वर्षे उलटून गेली. रस्त्याच्या रुंदीकरणात कधीतरी ती टपरी पण गेली. त्या भागात

अनेक वर्षे गेलोदेखील नाही. आता मामा कदाचित या जगात नसतील देखील. रोजच्या धावपळीत कधीतरी

जेंव्हा जेंव्हा हा अभंग कानावर पडतो तेंव्हा त्यांची हमखास आठवण येते. अस्वस्थ असलेलं मन शांत

शांत होऊ लागते..!

-सुधांशु नाईक (9833299791)

Wednesday 13 December 2023

पान जागे फूल जागे, भाव नयनी जागला..

#सुधा_म्हणे: पान जागे फूल जागे,भाव नयनी जागला..

13 डिसेंबर 23

मराठी भावगीतातील युगुल गीतांची परंपरा फार जुनी. त्यातही आशा भोसले आणि सुधीर फडके यांची युगल गीते गेली कित्येक दशके लोकांना सदैव भुरळ घालतात. त्या गाण्याना सामान्य माणसाच्या हृदयापर्यन्त पोचवण्यासाठी महत्वाचे ठरायचे ते त्या गीताचे सहजसुंदर शब्द. ग दि माडगूळकर आणि त्यांच्या पाठोपाठ जगदीश खेबुडकर यांनी कायमच अत्यंत सोप्या शब्दातील आशयसंपन्न गाणी लिहिली. प्रणयरम्य गीते लिहिताना देखील त्यांचा तोल कधी ढळला नाही. उलट प्रेम, प्रीती आदि भावनाना त्यांनी एक सुरेख रुपडे दिले. खेबुडकर यांनी लिहिलेले हेदेखील त्यातलेच एक अग्रणी गीत.

चंद्र,चांदण्या, वारे, फुले आदि प्रतीके तर कायमच सगळीकडे वापरली जातात. मात्र त्यांचा सुयोग्य क्रम साधत खेबुडकर लिहितात तेंव्हा ते शब्द प्रत्येकाला आपलेसे वाटतात. मुळात नाना उर्फ जगदीश खेबुडकरांची शब्दरचना अतिशय सोपी. कोल्हापूर जवळच्या गावातला त्यांचा जन्म. पुढे नानानी शिक्षणसंस्थेत अनेक वर्षे उत्तम नोकरी केली. लहान मुलांपासून अनेकांशी त्यांचा वैयक्तिक संपर्क. प्रत्येकाला समजेल उमजेल अशी भाषा त्यातूनच फुलत गेली असावी. त्यामुळे सामान्य लोकांना त्यांचे गाणे आपले गाणे वाटू लागते. आशाताई आणि बाबूजींचा आवाजात जेंव्हा हे प्रणयरम्य गीत ऐकू येते तेंव्हा भर दुपारी देखील चांदण्यांची शीतलता अनुभवत आहोत असे भासू लागले नाही तरच नवल...

पान जागे फूल जागे भाव नयनी जागला

चंद्र आहे साक्षिला, चंद्र आहे साक्षिला !

चांदण्यांचा गंध आला पौर्णिमेच्या रात्रिला

चंद्र आहे साक्षिला, चंद्र आहे साक्षिला !

स्पर्श हा रेशमी हा शहारा बोलतो

सूर हा ताल हा जीव वेडा डोलतो

रातराणीच्या फुलांनी देह माझा चुंबिला !

“चांदण्याचा गंध आला.. पौर्णिमेच्या रात्रीला..” असे हळवे हळवे तरल बोल लिहिणे ही किती कठीण गोष्ट. नाना सहजपणे जे अलवार लिहून जातात त्याची नजाकत ओळखून मग बाबूजी आणि आशाताईनी या गाण्याला एक वेगळाच लाडीक स्वर लावलाय. ते शब्दांत सांगून थोडेच कळणार? गाणे ऐकताना ते आपोआप मनात झिरपत जाते..उमगत जाते.

लाजरा बावरा हा मुखाचा चंद्रमा

अंग का चोरिसी दो जिवांच्या संगमा

आज प्रीतीने सुखाचा मार्ग माझा शिंपिला !

मधुकंस रागाच्या जवळपास जाणारी ही सुरावट इतकी मधाळ आहे की  हे गाणे ऐकत ऐकत निःशब्द व्हावं. जिवलगाच्या जवळ बसून बागेत फुललेल्या रातराणीचा धुंद गंध अनुभवत राहावं. तो चंद्र, ती पौर्णिमा, तो सहवास आणि तो सुगंध यांचीच मग एक कविता बनून जाते..! आयुष्य सुंदर आहे यावरील विश्वास अधिकाधिक दृढ होऊ लागतो.

-सुधांशु नाईक (9833299791)

Tuesday 12 December 2023

कबिराचे विणतो शेले..

#सुधा_म्हणे: कबिराचे विणतो शेले..

08 डिसेंबर 23 

मराठी भावगीते आणि भक्तिगीते यांच्या क्षेत्रात माणिक वर्मा यांचे स्थान फार वरचे. त्यांचा तो जरा ढाला तरीही मनात सहज उतरणारा सूर कानी पडला की आपली मनस्थिती पटकन बदलून जाते. अमृताहुनी गोड हे गाणे असू दे किंवा क्षणभर उघड नयन देवा हे गाणे असू दे, माणिकबाईंचा आवाज कानी पडला की एक प्रेमळ मायाळू व्यक्ती सोबत असल्यासारखे वाटू लागते. त्या जेंव्हा “घननिळा लडिवाळा...” गातात तेंव्हा तेही गाणे आपल्या हृदयापर्यन्त सहज पोचते. पु.ल. देशपांडे यांना तर त्यांचा आवाज कायमच आवडत असे आणि त्यांनी संगीतकार म्हणून काम करताना त्यांना महत्वाची गाणी दिली होती. 


देव पावला या चित्रपटासाठी गदिमानी एक सहजसुंदर भक्तीगीत लिहिले आणि संगीतकार पुलंनी त्याला यमन रागाचे सुरेख रुपडे दिले. गदिमा लिहिताना इथे धनुर्धारी राम, बंधविमोचन राम आदि सुप्रसिद्ध उपमा न वापरता कौसल्येचा राम असे म्हणत त्याला लोभसवाणे मूल बनवून टाकतात. हा राम शूर वीर पराक्रमी नाही तर अगदी मायाळू आणि कनवाळू असा आहे. आणि अगदी हीच भावना माणिकबाईंच्या सुरातून पाझरत राहते. आपल्याला शांतवत राहते.

कबिराचे विणतो शेले, कौसल्येचा राम

भाबड्या या भक्तासाठी, देव करी काम !

कबीर. 16/17 व्या शतकात असलेले एक महान व्यक्तिमत्व. उत्तम कवी असलेले कबीर तितकेच फक्कड होते. रोखठोक व्यक्त होणारे कवी होते. समाजाने सुधारावे यासाठी तळमळणारे होते. अशा कबिरासाठी राबणारा राम या पुराणकथेवर अवलंबून असलेले हे गाणे.  ईश्वर आपल्या भक्ताची खूप काळजी घेतो या भाबड्या भक्तीसाठी पूरक असलेले हे शब्द.

एक एकतारी हाती, भक्त गाई गीत

एक एक धागा जोडी, जानकिचा नाथ

राजा घनःश्याम !

दास रामनामी रंगे, राम होइ दास

एक एक धागा गुंते, रूप ये पटास

राजा घनःश्याम !

राजा असलेला राम, जानकीपती राम कबिरासाठी हे करत बसतो. जगाच्या दृष्टीने कबीर हा केवळ एक विणकर. समाजात अगदी खालच्या थरात असलेल्या एखाद्या भक्तासाठी ईश्वराचे हे रूप आपल्या स्वरातून माणिकबाई अगदी सगुण साकार करून दाखवतात.

विणुन सर्व झाला शेला, पूर्ण होइ काम

ठायि ठायि शेल्यावरती, दिसे रामनाम

गुप्त होई राम !

कबिराचे ते सगळे काम पूर्ण केल्यावर राम तिथे अजिबात थांबून राहत नाही. आपण केलेल्या कामाचा डंका पिटत बसत नाही ही गोष्ट गदिमा सूचकपणे लिहून जातात. आज काही लहान मोठी कामे केली तरी स्वतःची पाठ थोपटून घेत फिरतो आपण. इथे राजा रामासारखा एक महान माणूस कबिरासारख्या छोट्या व्यक्तीसाठी निःस्वार्थीपणे कसे राबतो हे सांगून आपण देखील जगावे कसे हे गदिमा नकळत शिकवून जातात असे मला वाटते.

-सुधांशु नाईक (9833299791)

Monday 11 December 2023

कुठे शोधीसी रामेश्वर...

#सुधा_म्हणे: कुठे शोधीसी रामेश्वर..
11 डिसेंबर 23
ईश्वराविषयी आपल्याला कायमच कुतूहल. अगदी आदिमानव टप्प्यापासून प्रत्येक टप्प्यावर माणसाने कुणाला तरी देवत्व दिले आहे. अग्नी, वारा, नदी,समुद्र, पाऊस,सूर्य, चंद्र आदि निसर्गाची रुपे असोत किंवा अनेक ऋषि, महान माणसे असोत या सगळ्याना देवत्व द्यायची आपल्याला फार घाई असते.
आपल्याला कितीही काही मिळाले तरी मागण्या मात्र संपत नाहीत. त्यासाठी मग या देवाचे देऊळ, त्या संतांची समाधी, हे तीर्थक्षेत्र असे लोक भटकत राहतात. कित्येकदा देवाची कृपा व्हावी यासाठी फिरणारी ही माणसे आसपासच्या लोकांशी मात्र अजिबात माणुसकीने वागत नाहीत.
त्यांच्यावर सणसणीत चाबूक ओढताना मग मंगेश पाडगावकर म्हणतात;
कुठे शोधिसी रामेश्वर अन्‌ कुठे शोधिसी काशी
हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी..

ईश्वर काय फक्त मंदिरात असलेल्या दगडांच्या, धातूच्या मूर्तीत असतो का? जगायला उपयुक्त असे सगळे जिथून मिळते त्याला ईश्वर मानायला काय हरकत आहे? ही माणसे या सगळ्याकडे का देव समजून बघत नाहीत. त्यातही झाडे, नदी, पाऊस हे सगळे किती निःस्वार्थी असतात. जे आपल्याकडे आहे ते सारे मुक्तपणे इतराना वाटून टाकतात. माणसे मात्र अशी वागत नाहीत.

हे सोप्या भाषेत पाडगावकर सांगत राहतात;
झाड फुलांनी आले बहरुन, तू न पाहिले डोळे उघडुन
वर्षाकाळी पाउसधारा, तुला न दिसला त्यात इषारा
काय तुला उपयोग आंधळ्या दीप असून उशाशी..

सुधीर फडके यांच्या आवाजात मुळातच एक नैसर्गिक गोडवा. हे गीत त्यामानाने परखड. कठोर ताशेरे ओढणारे. तरीही या गीतातील तो भाव अगदी चटकन त्या सुरांतून आपल्या हृदयापर्यन्त पोचतो ही त्यांची जादू. आपला पोषाख, वर्तणूक यामधून जे विसंगत वर्तन विविध बुवा, महाराज करत राहतात ते देखील त्यांच्या नजरेतून अजिबात सुटत नाही.

रुद्राक्षांच्या गळ्यात माळा, लाविलेस तू भस्म कपाळा
कधी न घेउन नांगर हाती, पिकविलेस मातीतुनि मोती
हाय अभाग्या भगवे नेसून घर संन्यासुन जाशी..

ईश्वर कुठे आहे हे कितीदा सांगितले तरी लोकाना उमगत नाही. त्यामुळे त्यांना ते कळावे यासाठी पोटतिडकीने स्पष्टपणे सांगत बाबूजी गात राहतात;

देव बोलतो बाळमुखातुन, देव डोलतो उंच पिकांतुन
कधी होऊनी देव भिकारी, अन्नासाठी आर्त पुकारी
अवती भवती असुन दिसेना, शोधितोस आकाशी..

ज्याना या झाडा-फुला-पानात-शेतात आणि दीनदुबळ्या लोकांमध्ये ईश्वर दिसतो तीच खरी देवमाणसे. समाजातील असुरप्रवृत्ती नष्ट होऊन देवप्रवृत्तीची वाढ व्हावी यासाठी पथदर्शक असणारे हे गीत आपल्या सर्वानाच आवडते. ते नुसते न आवडता आपल्या आचरणात उतरावे याची आता अधिकाधिक गरज आहे असे मला वाटते.
-सुधांशु नाईक (9833299791)🌿

Saturday 9 December 2023

या बकुळीच्या झाडाखाली...

#सुधा_म्हणे: या बकुळीच्या झाडाखाली...
12 डिसेंबर 23
विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर यांच्यासारखेच मराठी काव्यसृष्टीवर आपला सुरेख ठसा उमटवणारे कवी म्हणजे वसंत बापट. “गौरीशंकर उभ्या जगाचा मनात पूजीन रायगडा..” उत्तुंग आमुचि उत्तरसीमा इंच इंच लढवू, जय महाराष्ट्र प्रियतम देश महान.. अशी स्फूर्तिदायक गीते लिहिणारे वसंत बापट हे अत्यंत प्रतिभावंत असे कवी. त्यांची कविता एक अंगभूत अशी लय घेऊन येणारी. त्यामुळे संगीतकारांना देखील त्याला सुरांची अंगडी-टोपडी चढवणे सहज सोपे वाटत असावे.
अनेक नामवंत संगीतकरांनी त्यांच्या भावगीताना सुरेल संगीत देत अविस्मरणीय अशी गाणी बनवली. संगीतकार म्हणून भानुकान्त लुकतुके हे नाव खूप कमी जणांनी ऐकले असेल. त्यांनी वसंत बापट यांचे हे गीत निवडले त्याचे शब्दच पहा ना किती मुलायम आणि हळुवार आहेत.

जेंव्हा एखादी प्रौढा आपल्या माहेरी जाते, तिथल्या घराच्या दारातील बकुळीजवळ बसते, तिथली फुले ओंजळीत घेऊन तो गंध उरात भरून घेते तेंव्हा अवघा जीवनपट तिच्या नजरेसमोर दिसू लागतो. या भावगीताचे नुसते शब्द वाचताना देखील आपल्या मनात बकुळीचा गंध दरवळू लागतो;

*या बकुळीच्या झाडाखाली
आठवणींची लाख फुले
इथेच माझ्या स्वप्नासाठी
एक रेशमी झुला झुले...

इथेच माझी बाळ पाऊले
दवांत भिजली बाळपणी
दूर देशीच्या युवराजाने
इथेच मजला फूल दिले...

तिने आसवे पुसली माझी
हृदयामधला गंध दिला,
चांदण्यातले सोनकवडसे
माझ्यासाठी अंथरले...

बकुळी माझी सखी जीवाची,
जन्मान्तरीचे प्रेम जुने,
तिला पाहता खुलते मीही,
मला पाहता तीही खुले...

प्रत्येक माहेरवाशिणीचे आपल्या माहेरातील माणसे, तिथली झाडे, फुले यांच्याशी एक अबोध मुग्ध असे नाते असते. त्यातले नाजूकपण शब्दात उतरवणे किती अवघड. पण या कवितेत तिच्या नाजूक भावना भावना वसंत बापट अतिशय समर्थपणे व्यक्त करतात. बालपण ते पुढील आयुष्य सगळे 5-7 ओळीत इतक्या नजाकतीने रंगवतात की त्या शब्दांची मोहिनी कितीवेळ तरी मनात भरून राहते. आयुष्य असे गंधभारलेले असणे किती सुखाचे आहे ना?
-सुधांशु नाईक (9833299791)🌿

Friday 8 December 2023

किलबिल किलबिल पक्षी बोलती...

#सुधा_म्हणे: किलबिल किलबिल पक्षी बोलती...

08 डिसेंबर 23

मराठी बालगीतांचे विश्व फारच मनोहर आहे. अनेक लहान थोर साहित्यिकानी मोठ्या जिव्हाळ्याने बालगीते लिहिली. “उठा उठा चिऊताई..” सारखे बालगीत कुसुमाग्रजांनी लिहिले आहे तर “घरात हसरे तारे असता मी पाहू कशाला नभाकडे..” असे सुंदर गीत द. वि. केसकर लिहून जातात. “टप टप थेंब वाजती.. गाणी गातो वारा.. असो किंवा सांग सांग भोलानाथ,पाऊस पडेल काय..  ” यासारखी कितीतरी बालगीते पाडगावकर लिहून जातात. तर “एक कोल्हा बहू भुकेला..” असे छान बालगीत गदिमा लिहून जातात. विंदांनी तर मुलांसाठी चांगली बालगीते कमी लिहिली जातात म्हणून “राणीचा बाग, सशाचे कान, परी ग परी..” असे संग्रह काढून त्यात सुंदर सुंदर बालगीते लिहिली. त्यात शांता शेळके यांचे नाव विसरून कसे चालेल ? श्रीनिवास खळे यांच्यासारख्या दिग्गज संगीतकाराने जी अनेक सुरेख बालगीते आपल्या संगीताने सजवली. त्यातलेच हेही एक गोड गाणे.

किलबिल किलबिल पक्षी बोलती, झुळझुळ झुळझुळ झरे वाहती,

पानोपानी फुले बहरती, फूलपाखरे वर भिरभिरती,

स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई !


असे चित्रमय बालगीत जेंव्हा त्यांच्या हातून उतरते त्यावेळी अवघे दृश्य डोळ्यासमोर दिसू लागते. आपल्या आसपासचा प्रदेश सुंदर हिरवाईने नटलेला असो वा रुक्ष वाळवंटी, हे गीत ऐकले की डोळ्यासमोर किती सुंदर जग येते. लहान मुलांना सतत आपण हे करू नको, तिकडे जाऊ नको असे सांगत असतो किंवा काकांचे ऐकायचे, बाबांचे किंवा दादाचे ऐकायचे असे सांगतो. मात्र जे गांव शांताबाई मुलांना दाखवतात तिथे सगळीकडे फक्त मुलेच मुले. छान आनंदाने नाचणारी, गाणारी.

त्या गावाची गंमत न्यारी, तिथे नांदती मुलेच सारी

कुणी न मोठे कुणी धाकटे, कुणी न बसते तिथे एकटे

सारे हसती, गाति नाचती, कोणी रडके नाही

असे गांव मुलांना आवडतेच आणि त्यात पुन्हा तिथे पुस्तकं-वह्या, शाळा, अभ्यास काही नाही. भरपूर खेळायचे आणि मनमुराद हुंदडायचे. तिथे पऱ्यांचे राज्य आणि ऐकायला आनंदगाणी. जे जे मुलांना हवे ते ते देणारे हे गाव. कोणत्या मुलांना असा गाव नकोसा वाटेल ?

नाही पुस्तक, नाही शाळा, हवे तेवढे खुशाल खेळा

तिथल्या वेली गाणी गाती, पऱ्या हसऱ्या येती जाती

झाडावरती चेंडु लटकती, शेतामधुनी बॅटी

म्हणाल ते ते सारे होते, उणे न कोठे काही..

सतत मुलांना उपदेशाचे डोस पाजण्यापेक्षा असे सुंदर स्वप्न रंजन मुलांना मिळायला हवे. ही गाणी टीव्हीवर, यू ट्यूबवर पाहण्यापेक्षा लहान मुलांनी ऐकायला हवीत. स्वर्गीय सुंदर गांव त्यांच्या नजरेसमोर साकार व्हायला हवं. जेंव्हा मुलांना असे गाव डोळ्यासमोर दिसते, तेंव्हा त्यांच्या चहऱ्यावरील निर्मळ निरागस हसू फुलते. त्यांचा तो आनंदी चेहरा पाहत राहणे किती मोहक असते ना?

-सुधांशु नाईक (9833299791)