marathi blog vishwa

Sunday, 16 April 2023

झुक झुक झुक झुक आगीनगाडी...

🍁🍁
#सुधा_म्हणे
#सहज_सुचलेलं
मित्रहो, सुप्रभात. मुंबई ते ठाणे ही पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 रोजी धावली. त्याला आज 170 वर्षे पूर्ण झाली. तेंव्हा आगगाडी आली म्हणजे जणू भूत आलं असं लोकांना वाटायचं. मात्र पाहतापाहता ही गाडी आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनून गेली.

"झुक झुक...झुक झुक ... आगीनगाडी.. " म्हटलं की आपली मनं थेट बालपणात जातात. एकमेकांच्या शर्टाला धरून केलेली खेळण्यातली आगगाडी आठवते, तोंडाने वाजवलेली शिट्टी आठवते. मन पिसासारखं हलकं हलकं होऊन जातं.

आकाशात उडणाऱ्या विमानाचा आवाज ऐकू आला की पावलं अंगणाकडे धावायची. विमान दिसू लागलं की चेहऱ्यावर एक अनामिक आनंदी हसू फुलायचं. विमान
पाहायला असं आवडत असलं तरी मला ही आगगाडी किंवा ट्रेन अधिक जवळची वाटते.

 कोकणात चिपळूणला राहत असताना, कोकण रेल्वे हॊणार असं किती वर्षं ऐकलं होतं. पण आगगाडी काही पाहायला मिळत नव्हती.
त्यामुळे कोल्हापूर, सांगली, बेळगाव, पुणे, रायबाग, मुंबई असं कुठेही नातेवाईकांकडे कडे गेलं की आम्हां बच्चेकम्पनीचा मुक्काम रेल्वे रुळाच्या, स्टेशनच्या आसपास असायचा.
 आगगाडीच्या शिट्टीचा आवाज ऐकला की कोणत्या दिशेने गाडी येईल, किती डबे असतील अशी पैज लागे. गाडी दूर असताना अगदी रुळावर डोकं ठेवून थरथर, धडधड ऐकू येतेय का हेही पाहण्याचे उद्योग आम्ही करायचो. स्टेशनवर गाडी येताना तो धूर, ते झेंडा दाखवणारे स्टेशन मास्तर, ते रिंग टाकणं, फुस्स असा आवाज करून गाडीने दम टाकत थांबणं, मग हमाल, पाणीवाले , 'चॉय - चॉय करणारे' चहावाले यांची लगबग. गाडी निघून गेली की  सारं शान्त शान्त. एक सुस्तपणा पुन्हा सर्वत्र भरून जायचा. हे सारं चित्र मी मन लावून पाहत बसायचो. त्या लंपन सारखं " म्याड " होऊन!

गाडीच्या प्रवासात तर मज्जाच मज्जा असे. सतत काहीतरी खात राहायचं. स्टेशन, नद्यावरचे मोठे मोठे पूल पहायचे. रेल्वे क्रॉसिंग वरच्या वॉचमन ला टाटा करायचा असं सगळं फार निरागस बाळपण होतं ते. अगदी " रेलगाडी.. झुक झुक.. झुक.. " गाणाऱ्या अशोककुमार ने समोर आणलं होतं तसं! स्टेशनमास्तरचा रुबाब मोठा असला तरी मला  इतकं मोठं धूड लीलया हाताळणारा इंजिन ड्रायव्हर बनावं असं वाटायचं.. म्याडच असतो ना आपण त्या वयात...!

आणि एकदिवस अचानक मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडिस, श्रीधरन यांच्यामुळे "कोकण रेल्वे" चं थेट कामच सुरु झालं. अत्यंत कठीण अशी भौगोलिक आव्हाने पार पाडत इंजिनियर दौडू लागले. कॉलेजच्या त्या दिवसात काही जवळच्या मित्रांमुळे बोगदे खणण्याची कामं, स्लीपर्स बनवणे, रूळ जोडणे, सिग्नल यंत्रणा हे सारं जवळून पाहता आलं. आणि खूप छान वाटत राहिलं.

जी गावं स्टेशन किंवा रेल्वेच्या अगदी जवळ त्यांचं तर रोजचं जगणं त्या वेळापत्रकाशी जुळलेलं असतं. लोकांचं येणं जाणे, बदल्या, ते क्वार्टर्स मधलं राहणं हे सगळं विश्व वेगळंच. रेल्वेस्टेशनचे परिसर मुंबईसारख्या ठिकाणी बकाल. पण त्या ट्रेन, त्या लोकलशिवाय जगणं ही अशक्यच. गेल्या काही वर्षात भारतीय रेल्वेने अक्षरशः कात टाकली. अनेक सुधारणा झाल्या. नवनवीन ऍप्स च्या माध्यमातून प्रवास अधिक सोईस्कर झाले. भारतीय रेल्वे आपल्या आयुष्याचा अधिकाधिक भाग व्यापून राहिलीय.

वय वाढत गेलं तसं  रेल्वेगाडी अधिक आवडत गेली.  खूप प्रवास केले. त्या धावत्या तालात मनात कविता, गाणी, लेखन सुचत गेलं. .  आजही विमानापासून सगळे प्रवास घडले तरी रेल्वेच्या प्रवासासाठीच मन कायमच आतुरलेलं असतं.
रेल्वेचा प्रवास म्हटलं की मला ' पाकिजा " सिनेमातील दृश्य आठवतं. मीनाकुमारी आठवते आणि " आपके पांव देखे, बहुत हसीन हैं... इन्हें जमीन पें मत उतारिएगा , मैले हॊ जायेंगे... " असं म्हणणारा राजकुमार आठवतो. सिनेमातला तो पूल आठवतो. मन हळवं हळवं होऊन जातं.! 

आजही स्वप्न आहे की आपण रेल्वेतून कुठंतरी जात राहावं, आपलं जिवलग माणूस सोबत असावं आणि दिवस-रात्री न मोजता फ़क्त फ़क्त प्रवास करत राहावं.  नवनवीन गावं पाहावीत, डोंगर पाहावेत, नद्या पाहाव्यात, हिमशिखरे पाहावीत, खावं प्यावं आणि आनंदाने हिंडत राहावं...एकमेकांसोबत प्रत्येक दिवस नव्याने जगत राहावं.. !

तुम्हालाही असं वाटतं का?
 तुम्हीही तुमच्या रेल्वेप्रवासाच्या आनंददायी आठवणी अवश्य सांगा ना... 
- सुधांशु नाईक (9833299791)🌿
🍁🍁🍁🍁🍁

Saturday, 18 March 2023

अशा घटना रोखायला हव्यात..!

किती क्रूर आहें हे...!
चार वर्षाची छोटुली मुलगी. निसर्गाने तिला अपंग बनवलं. आणि प्रत्यक्ष बापाच्या हातून भयानक मृत्यू.. असं कोणतं दुर्दैव घेऊन जन्माला आलेली ही की अवघ्या चार वर्षात हे सगळं नशिबी यावं ? बातमी काल वृत्तपत्रात वाचली आणि दिवसभर अस्वस्थ वाटत राहिलं.
आपल्या आजूबाजूला सगळीकडे असं काहीसं घडतंय. का..?
अपंग मूल कुणाच्या पदरी असणं हे किती यातनामय हे आपण समजू शकतो. त्या जीवाला स्वतःला त्रास होत असतातच, मात्र त्याच्या आई-बाबांना देखील खूप सहन करावं लागतं. रोजच्या जगण्यात शेकडो तडजोडी कराव्या लागतात. दिलीप प्रभावळकर, अतुल परचुरे यांच्या गंभीर अभिनयाने गाजलेलं " नातीगोती" सारखं नाटक असो की " कळत नकळत", " आम्ही असू लाडके", " यलो " " ब्लॅक " या सारखे चित्रपट... अपंग व्यक्तीची आणि सोबतच्या लोकांची धडपड आपण पाहिलेली आहें. समजू शकतोय ते दुःख.
पण आपल्या पोटच्या पोराचा जीव घेण्याइतका ताण त्या पालकावर का आला याचा विचार आसपासच्या लोकांनी करायला हवाय. कोल्हापूर मध्यें आमच्या " Helpers Of The Handicapped-HoH सारखी संस्था असो किंवा पुण्यातील Vanchit Vikas असो, अपना घर असो...नगरचे स्नेहालय असो, इथं दुर्बल व्यक्तीला सन्मानपूर्वक जगायला मदत केली जाते. त्यांची कौशल्य विकसित केली जातात. या संस्थांव्यतिरिक्त राज्यात आणि देशांत अनेक संस्था कार्यरत आहेत. इथं अशा मुलांना, पालकांना नक्कीच आधार मिळू शकतो. मात्र अशा घटना पहिल्या की वाटतं किती अपुरे आहेत आपले प्रयत्न. किती धडपड केली तरी कमी पडतेय. आपण पोचतच नाही लोकांपर्यंत असं वाटतंय..
आपल्या आसपास वाढलेल्या, स्वतःच्याच अपंगत्वावर मात करून लढत राहणाऱ्या कित्येक व्यक्ती आहेतच. आमच्या हेल्पर्स मधले Awinash Kulkarni Rekha Desai असोत किंवा गाजत असलेली लोकप्रिय लेखिका अशी मैत्रीण सोनाली नवांगुळ Sonali Navangul वल्लरी करमरकर, ठाण्याच्या Smita Kulkarni आणि Sandeep Kulkarni यांची गुणी कन्या मनाली असोत.. यांचं जीवन आदर्श मानलं तर अशा घटना घडणं कमी करता येईल.
यासाठी सर्वाधिक गरज आहें समाजात अधिकाधिक अवेअरनेस निर्माण होण्याची. आपण सगळ्यांनी काहीतरी करत राहण्याची. चांगल्या संस्था, आपल्या अपंगत्वावर मात केलेल्या लोकांच्या कहाण्या अशा निराश व्यक्तीपर्यंत पोचवण्याची.
सर्वांनीच आपापल्या परीने हे करायला हवं. मूक आणि निष्पाप असे लहान जीव वाचायला हवेत म्हणून ही कळकळीची विनंती. तुमच्या तुमच्या परिसरात जागरूकता वाढवूया.
- सुधांशु नाईक, 9833299791🌿

#सहज #सुचलेलं

Friday, 10 March 2023

मुसाफिर हूं यारो...


" सहज सुचलेलं... " या लेखमालेतील हा आठवा लेख आजवरच्या प्रवासाविषयी...
- सुधांशु नाईक.
केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार।
शास्त्रग्रंथविलोकत, मनुजा चातुर्य येतसे फार।।'
असं कवी मोरोपंतांनी कित्येक वर्षांपूर्वी सांगून ठेवलंय. माणूस चतुर, हुषार होण्यासाठी ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्यात प्रथम स्थान त्यांनी देशाटन, प्रवास किंवा भटकंतीला दिलंय. आजवर खूप भटकंती केली, त्यामुळे चातुर्य अंगीं आलं नसलं तरी या प्रवासात खूप आनंद मात्र नक्की मिळत राहिलाय. आजचा हा लेख आजवरच्या प्रवासातील काही आठवणीविषयी ..
≈≈
1998 डिसेंबर. सवाई गंधर्व चा समारोप झाला आणि मी खांद्यावर सॅक टाकून पुण्यातून भीमाशंकरला निघालो. दुपारी पोचलो. दर्शन घेतलं. चहूबाजूने हिंडून मंदिर पाहिलं.  मग बाहेर पडलो. मुक्काम करायचा होता तिथं बॅग ठेवली आणि एका स्थानिक मुलाला सोबत घेऊन जंगलात शिरलो. गुप्त भीमाशंकर पाहणं. जन्गल पाहणं हाच मुख्य उद्देश होता.  इथलं खास वैशिष्ट्य असं शेकरू पाहिलं. कितीतरी परिचित पक्षी दिसलें. 2,3 तास हिंडलो.
 कोकण कड्याजवळून दूरवर रात्रीच्या कुशीत जाऊ पाहणारे सूर्यबिंब पाहिलं. मग परतलो. गरमागरम पिठलं भाकरी खाल्ली. आणि रात्री नागफणी कड्याजवळ आणि हनुमान तळ्याजवळ गेलो. आवडतं असं शान्त चालत राहणं. आकाशात शेकडो तारका. बसून राहिलो तळ्याजवळ. आसमंतात भरून राहिलेली शांतता, रातकिड्यांची किरकीर. वाऱ्याची मधूनच येणारी झुळूक... आणि तेवढ्यात कानावर ऐकू आलं गावातून कुणाच्या रेडिओवर उमटलेलं गाणं....
जिंदगी का सफर... हैं ये कैसा सफर
कोई समझा नही, कोई जाना नही...

खरंच असतं ना हे? आजचा दिवस आपला. उद्या उजाडणार आहे का, कसा असेल उद्याचा दिवस, कुठं असू, काय करत असू कुणाला कुठं माहिती असतं? आपण फ़क्त शेकडो प्लॅन करत असतो अमरत्वाचे वरदान मिळाल्यासारखं.

आता भीमाशंकर तितकं शान्त उरलं नाही. तिथं हनुमान तळ्याजवळ पुन्हा तसंच निःशब्द बसता येईल का हेही माहिती नाही. पण आजही हे गाणं लागलं की, मला त्या परिसरात असल्याचीं, त्या शांततेची अनुभूती येत राहते.
≈≈≈≈
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून जुन्नरकडे गेलो.

तिथून जरा आडबाजूला असलेली तुळजा लेणी पाहायला गेलो. इतका रम्य परिसर पण कुणीही नव्हतं.
एकटाच हिंडत बसलो.
तिथून मग मुक्कामाला लेण्याद्री. भक्त निवासमध्यें रूम घेतली.सॅक ठेवली. बाहेर टपरीवर मस्त चहा भजी खाऊन वर निघालो. खूप माकडं त्रास देतात वाटेत. ( सध्याचं माहिती नाही ) काही लेणी, गणेश दर्शन करून एका बाजूला बसलो. समोर भला थोरला शिवनेरी खुणावत होता. उद्या तिथं पोचायचं होतं.
चौकशी केली तर सकाळी 9 पर्यंत कोणतीच गाडी नाही कळलं. मग वेगळाच प्लॅन ठरवला आणि झोपी गेलो. पहाटे काकडआरती चीं वेळ. आवरलं पटापट. आणि चालत चालत निघालो. एकटाच. 7,8 किमीवर जुन्नर आणि तिथून 4,5 किमीवर शिवनेरी. त्यावेळेस Aiwa कंपनीचा छान वॉल्कमन होता माझ्याकडे. आणि पं. ओंकारनाथ ठाकूर यांच्या देसी तोडी रागाची कॅसेट. " म्हारे डेरे आओ... हा विलंबित ख्याल आणि करमकी छ्हैया...ही दृत बंदिश.. आणि त्या नंतर त्यांनी गाजवलेलं मिश्र भैरवी तील मीरा भजन.. " मत जा. मत जा.. जोगी.. मत जा.. "
पं. ओंकारनाथ हे खूप सुप्रसिद्ध नाव. प्रत्यक्ष कुमारजी त्यांना मानायचे. त्यांच्या भावव्याकुळ गायनाचे देशभर चाहते.
त्यांची ती कॅसेट नुकतीच पुण्यात मिळालेली. भान हरपून ऐकत राहिलो. चालत राहिलो. पहाटे 5 ला चालत चालत जाताना ऐकलेली ती मैफिल आजही कानात तशीच ऐकू येतेय.
शिवनेरी पाठोपाठ हडसरचा पर्वतगड पाहून मग परतीच्या मार्गाला लागलो होतो. मात्र आजही एकट्याने केलेल्या प्रवासतील सर्वात आनंदी आठवण म्हणजे पहाटे केलेली तंगडतोड आणि ओंकारनाथ ठाकुरांचे गायन.
≈≈≈≈
प्रवास करायचं वेड हे बाबांच्याकडून आलेलं. त्यांनी अनेक ठिकाणी लहानपणापासून नेलेलं. मोठेपणी आमचं आम्ही हिंडू लागलो. सोबतीला कुणी आपलं असलं तरी त्याची नशा काही वेगळीच.  विमान, रेल्वे, होडी, बस, जीप, ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडी असं मिळेल त्या वाहनाने हिंडलो. प्रसंगी जे मिळेल ते खाल्लं. कळकळत्या उन्हात हिंडलो आणि कडक्याच्या थंडीत देखील. पावसात हिंडायला तर मी नेहमीच चटावलेला.
थंडीवरून आठवला भेडाघाट चा किस्सा.
≈≈≈

संदीप आगवेकर या मित्राच्या कामानिमित्त जमशेदपूर ला जायचं होतं. बहुदा 2002/ 03 चं वर्षं. कामं झाली की भटकंती करायची असेल तरी येतो असं सांगून मग प्लॅन ठरवला आणि दोघेच निघालो. जमशेद्पुर, रांची, मग परत मागे येऊन दुर्गं भिलाई ला आलो. रेल्वे स्टेशन वर असलेल्या निवासगृहात रूम घेतली. अचानक वाटलं जबलपूर जवळचे भेडाघाट पाहू. रेल्वेची चौकशी केली आणि रात्रीची ट्रेन पकडून निघालो. जागा मिळेल असं वाटलंच नव्हतं.. मात्र टीसीसोबत चर्चा करून दोघांत एक बर्थ मिळवली.

एकीकडे माझं डोकं दुसरीकडे त्याचं. झोपलो. प्रचंड थंडी. खिडकी नीट बंद होत नसल्याने गार गार झोंबणारा वारा.. त्याला म्हटलं, " अरे तुझ्याऐवजी सोबत प्रेयसी असती तरी जास्त बरं झालं असतं. किमान थंडी तरी नसती वाजली... "
झोपच लागत नसल्याने मग तो रफीची गाणी गात बसला. मी ऐकत... एकदाचे जबलपूर ला पोचलो सकाळी. 4,5 कप गरम चहा घेतला तरी थंडी जाईना.
मग तिथून भेडाघाट.
तिथं पोचलो. एक खोली घेतली आणि थेट नर्मदेंकडे धावत सुटलो. हवेत गारवा असूनही कपडे झुगारून दिले. त्या हिरव्या निळ्या पाण्यात स्वतः ला झोकून दिलं. चार हात मारत पोहत राहिलो. मैय्यानें मायेने जवळ घेतलं. तो ऊबदार स्पर्श अजून आठवत राहिलाय.

दुपारी धुवाधार धबधबा पहिला. मग नदीतून होडीने हिंडायचं होतं. दो बाजूला ते संगमरवरी पहाड.. मावळतीचे सोनेरी किरण, त्यांचं या खडकावरून प्रतिबिंबित होणं, नदीचा वेगवान प्रवाह आणि होडीचा आवाज. तो होडीवाला काही सांगू लागला. इथं या सिनेमाचं शूटिंग झालं, ती हिरोईन इथं होती वगैरे. त्याला म्हटलं, बाबा तू कसलीच कहाणी सांगू नकोस. आम्हला शान्तपणे अनुभवू दे हा प्रवाह आणि हे वातावरण.

फिरून आल्यावर मस्त गरमागरम पुरी भाजी खाल्ली. त्या होडीवाल्यालाही खिलवलं. तोही खुश. रात्रीपण आम्हाला एकदा नदीतून फिरवून आण्याबाबत शिक्का मोर्तब करून घेतलं. त्या रात्री त्या संगमरवरी खडकातून होडीने हिंडून आलो. किती भन्नाट अनुभव होता तो. शब्दांत सांगणं अवघडच. निसर्ग तुम्हाला अंतर्मुख करतो. हेच खरं. आकाशात टिपूर चांदणं, नर्मदेचा वाहता प्रवाह, दूरवरून येणारा धुवाधार धबधब्याचा गंभीर नाद आणि होडीचा आवाज. अर्ध्यातासाने परतलो.
मग पाण्यात पाय सोडून काठावर बसून राहिलो. संदीप मुक्त कंठाने गाऊ लागला..
" हे मना.. आज कोणी बघ तुला.. साद घाली.."
≈≈≈
ट्रेकसाठी केलेली भटकंती हा तर एक वेगळाच प्रदीर्घ असा विषय. मोजके सवंगडी, लहान मोठे ग्रुप्स, सोबत घेतलेले डबे, गडावर केलेले मुक्काम, बनवलेली दाल खिचडी किंवा मॅगी.. ऊन वारा पाऊस कशाची तमा ना बाळगता केलेली तंगडतोड... सगळ्यांच्या किती गोष्टी.. माझ्याच नव्हे तर ट्रेक करणाऱ्या प्रत्येकाच्याच. अगदी घरात देखील गोड ना खाणारी मंडळी ट्रेक मध्यें कुणीतरी आणलेल्या श्रीखंडाच्या डब्याचा एकेक बोटाने श्रीखंड चोखत, अगदी चाटूनपुसून फन्ना उडवतात तेंव्हा भरभरून हसू येतं. ती जादू सहवासाची. त्या वातावरणाची.

अशा ट्रेकमध्येंच मग प्रेम कहाण्या सुरु होतात. टिकतात किंवा तुटतात देखील. मात्र सोबत जगलेले ते निखळ निर्मळ क्षण कायमच सोबत करतात आयुष्यभर.
≈≈≈≈≈≈
विमान प्रवास केला खूप. 2004-05 पासून...
मात्र मला त्यात अवघडल्यासारखं होतं. लोक उगीचच मुखवटे चढवून बसलेत असं वाटत राहतं. अगदी इकॉनॉमी क्लास मध्यें बसलेला एखादा देखील आपण कंपनी चा मालक असल्याचा आव आणत बसतो.
मात्र लांबचा विमान प्रवास असेल तर काही काळाने लोक मोकळेपणाने बोलू लागतात. त्यात ही जे ड्रिंक्स घेणारे असतात, ते पटकन संवाद सुरु करू शकतात असं माझं लहानसे निरीक्षण आहे. विमानात जागाही कमी असते. एखादयाला उठून बाथरूमला जायचं असलं तरी असं अंग वाकडं वाकडं करत जावं लागतं. प्रसंगी सह प्रवाशाला उठवावं लागतं.
आतमध्ये फ़क्त हवाई सुंदरीच असतात असा एक लोकांचा समज असायचा पूर्वी. आणि त्या " सगळी " काळजी घेतात ना? हा दुसरा गैरसमज! यात किंगफिशर सारख्या विमानातील सुंदऱ्या, त्यांचे तोकडे पोशाख याबाबतीत बाहेरच्या जगात अनेक कल्पना पसरलेल्या...

किमान एका तरी व्यक्तीने सुरुवातीला मला विचारलं आहे, त्या सुंदऱ्या नक्की काय काय करतात रे...?
मग आपण सांगतो, " आपल्याला सेफ्टी बाबत सूचना देतात. जेवणं, ड्रिंक्स वगैरे देतात. विमानात कुणाला त्रास होणार नाही याची काळजी घेतात. पायलट सोबत इमर्जन्सी वेळी सगळ्यांना सम्भाळून बाहेर काढतात... " मग त्यांना असं वाटे की हा काहीतरी लपवतोय. याने भरपूर मजा मारली असणारे मात्र इथं उगीचच खोटं सांगतोय.
2010 नंतर भारतात अंतर्गत विमानातून, टूर्स मधून जास्त लोक हिंडू लागले, विविध सिनेमातून विमानातील जग समोर आलं आणि लोकांना वस्तुस्थिती कळलीये. त्यामुळे आता असे खट्याळ प्रश्न कमी होत गेलेत.
विमानात माणसं पाहत बसायला मजा येते. टेकऑफ किंवा लँडिंग वेळी घाबरून डोळे मिटून घेणारी मंडळी, आपली सीट सोडून इतरत्र हिंडणारे लोक, भरपूर वजन घेऊन येणारे लोक, सीटमोरील टीव्ही स्क्रिन वर सतत चॅनेल सर्फीन्ग करणारे अस्वस्थ लोक, आपली कामं करत असलेल्या हवाई सुंदरीकडे सतत आशाळभूतपणे पाहणारे लोक, नाश्ता जेवण, कॉफ़ी / ज्यूस किंवा दारू सर्व्ह होत असताना थोडंसं का असेना पण एक्स्ट्रा मिळावं म्हणून धडपडणारे लोक... ही सगळी माणसं वाचत बसणं खूप छान वाटतं.
≈≈≈≈≈
प्रवास करताना बाजूला छान देखणी स्त्री येऊन बसणं याबाबत ही किती फँटसीज आहेत ना सर्वांच्या. रेल्वेत, विमानात, बसमध्ये शेजारी कुणी स्त्री असणं यात इतकं रंगवून काय सांगायचं? पण लोक किती मनगडन्त कहाण्या सांगत बसतात. देखणी स्त्री सहप्रवासी असणे मग तिच्यासोबत भरपूर गप्पा वगैरे मारायला मिळणे हा भाग्य योग काही माझ्या नशिबी मात्र नव्हता.
मात्र आसपास बसलेल्या प्रवाशांमधील असं प्रेमकूजन करणारे युगुल पाहत बसणं मला आनंददायी वाटतं बुवा.

किती मस्त एकमेकांत रमलेले असतात ते. एकच बिस्कीट किंवा चॉकलेट अर्ध अर्ध खाणे, त्याच्या विस्कटलेल्या केसांना तिने सारखं करत राहणं, त्याच्या आश्वासक खांद्यावर डोकं ठेऊन मस्त झोपून जाणारी ती... तिला ऊन लागू नये म्हणून हळूच ओढणी चा पडदा करणारा तो... ते समजून त्याच्या अधिकच जवळ जात बिलगून बसलेली ती हे सगळं फार तरल, मुलायम असतं. आपलं आपण समजून घ्यायचं असतं... तिसऱ्याने त्यात फार लक्ष घालू नये हेच बरं.
≈≈≈
प्रवासात भेटणाऱ्या आजी आजोबांची साथ ही मला आवडते. सुरुवातीला काहीजण जरा किरकिर करतात. आमच्याकडे किंवा आमच्यावेळी असं.. आमच्यावेळी तसं.. ही रेकॉर्ड असतेस. पण हळूहळू त्यांच्यातील माया दिसू लागते. सोबत आणलेल्या लाडू, चिवडा, बर्फी, थालीपीठ, अशा गोष्टीत आपल्याला हक्काने सामील करून घेतल जातं. " कसली रे तुम्ही आजची मुलं, पोटभर खात देखील नाही.. " असा लाडीक त्रागा करून दोन घास जास्त खिलवले जातात.

एकदा मुंबई ते नागपूर रेल्वे प्रवासात एका आजोबानी तर भरपूर मिठाई आणलेली. आणि आम्हाला सगळ्यांना वाटत सुटलेले. त्यांना घ्या असं म्हटलं. तुम्ही सगळंच आम्हाला का देताय असं विचारलं तेंव्हा म्हणाले, " अरे बाळा, मला गोड खायचं नाही असं सांगितलंय डॉक्टरनें. मला आवडतात गोड पदार्थ. पण खाता येत नाहीत. मग असं तुम्हाला खाताना पाहिलं की मलाच खाल्ल्याचे समाधान मिळते. "
ऐकल्यावर गलबलून आलं.
खेड्या पाड्यात एसटीनें फिरलोय. तिथं तर भाजी विकणाऱ्या, फळं विकणाऱ्या कित्येक मामी / मावश्या संध्यकाळच्या गाडीत उरलेले सगळे उदार हस्ते वाटून टाकायच्या. किती अल्प तो  त्यांचा रोजचा व्यापार.  पण त्यातही समाधानी असायच्या. आपल्यालाच वाटतं मग, इतकी मेहनत, इतके पैसे कमवून देखील आपण बाकीचे सगळे का सुख मानत नाही...? प्रश्न तसेच मनात राहतात. आठवत राहते त्या निष्पाप मावशीची माया.
≈≈≈≈≈
आजवर च्या प्रवासात चोरीचे फसवणूकीचे अनुभव मात्र कधीच आले नाहीत. जरा धांदरट असल्याने प्रसंगी कित्येकदा गाडीत पाकीट विसरलोय. मोबाईल विसरलोय. बॅग विसरलोय. पण सगळं परत मिळालं. त्या बाबत कतार मधला किस्सा तर भारीच.
एल अँड टी तर्फे कतार पेट्रोलियम च्या एका मोठया प्रोजेक्टचा प्रमुख म्हणून काम करत होतो. दोहा या मुख्य ठिकाणापासून समुद्रात 100 किमीवर एक बेट. तिथं कामं सुरु होती. आठ दहा दिवसातून एक फेरी असायची. तिथ फ़क्त हेलिकॉप्टरनेंच जाता येई. प्रोजेक्टचा असा विशिष्ट पोशाख ( coverall) घालूनच जावं लागायचं.

जाताना त्या हेलिपॅड वर कुठंतरी माझं पाकीट पडलं. मी साईटवर पोचलो. मिटिंग्ज झाल्या. साईट व्हिजिट झाल्या. संध्याकाळी मग लक्षात आलं की पाकीट गायब. मग साईटवरच्या कॉन्ट्रॅक्टरचीं मुलं सगळीकडे पाकीट शोधतायत. कुठं सापडलं नाही. मग एकाने सिक्युरिटी डिपार्टमेंट ला कळवून ठेवलं. मिळालं तर मिळालं म्हणून.
पाकिटात पैसे होतेच पण national ID card, कंपनीचं कार्ड, बँक card, कतार चं ड्रायव्हिंग लायसन्स असं सगळं होतं जे जास्त महत्वाचं होतं. मी तर हे सगळं नवीन कस बनवायची याचीच माहिती घ्यायला सुरुवात केली.

दुसऱ्या दिवशी पुन्हा परतीचा प्रवास. इथल्या हेलिकॉप्टर नें परत जाताना निरोप मिळाला की तुमचं पाकीट मिळाले आहे आणि 3 दिवसांची सुट्टी संपल्यावर घेऊन जा.

3 दिवसांनी गेलो. तिथल्या एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने ते माझंच पाकीट आहे याची चौकशी केली आणि एकाही वस्तूला हात ना लावता सगळं परत दिलं. वर कोणतीही बक्षीसी घ्यायलाही नकार दिला.

असे किती किस्से सांगावेत तेवढे कमीच. खूप प्रवास करत राहिल्याने " जगात माणुसकी आहे.. " या गोष्टीवरचा माझा विश्वास मात्र पक्का झालाय.
"  केल्याने देशाटन " मला चातुर्य मिळालं का हे माहिती नाही.  पण मिळालेले हे शेकडो लोभस अनुभव हेच माझं संचित आहे. जे सतत मनाला सुखावत राहणार आहे. " आयुष्य हाच एक प्रवास असतं, तो सुंदर करणं आपल्याच हातात असतं.
परिचय चित्रपटात गुलजार लिहितात ना ते मला खूपदा माझ्या मनातलं आहे असं वाटतं. आयुष्य अनेक वाटांनी आपल्या समोर येत असतं. आपण स्वच्छ मन, कोरी पाटी घेऊन त्याला सामोरं जायला हवं असं मला वाटतं.

ते म्हणतात,
एक राह रुक गई, तो और जुड़ गई
मैं मुड़ा तो साथ-साथ, राह मुड़ गई
हवा के परों पे, मेरा आशियाना
मुसाफ़िर हूं यारो......

आयुष्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत आपले पाय नवनव्या वाटेवर हिंडत राहावेत, रोजचे सूर्योदय सूर्यास्त मोहवत राहावेत, जिथं जे जे उत्तम मिळेल ते खात राहावे आणि आपला प्रवास आपल्याच नादात धुंद सुरु राहावे इतकीच अपेक्षा.
- सुधांशु नाईक, 9833299791🌿
( ब्लॉगवर कमेंट करताना आपलं नांव गाव अवश्य सांगावे. म्हणजे तुम्हाला तसा प्रतिसाद देता येईल. ) 

Sunday, 26 February 2023

हे सावरकर कायमच लक्षात ठेवायला हवेत!

हे सावरकर कायमच लक्षात ठेवायला हवेत! 
- सुधांशु नाईक.
" सहज सुचलेलं " या लेखमालेतील हा आठवा लेख.
 26 फेब्रुवारी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्मृतिदिन. आपलं अवघे आयुष्य ज्यांनी देशहितासाठी झिजवलं त्यांना सादर प्रणाम. सावरकरांनी अफाट क्रांतिकार्य तर केलंच मात्र तितक्याच नव्हे तर त्यापेक्षा जास्त तळमळीने सामाजिक सुधारणांचा आग्रह धरला. कर्मठ ब्राह्मणांचे गाव असं मानल्या गेलेल्या रत्नागिरीसारख्या ठिकाणी स्पृश्यास्पृश्यता मिटवण्यासाठी 1925 नंतर अथक प्रयत्न केले. अनेकांनी टिंगल केली, निंदा केली पण सावरकर शांतपणे आपलं कार्य अधिक जोमाने करत राहिले. लेखक आणि कवी म्हणून सावरकर थोर आहेतच. मात्र समाजासाठी अत्यन्त आवश्यक असे त्यांचं पुस्तक म्हणजे " विज्ञाननिष्ठ निबंध ".

त्याकाळी किर्लोस्कर - मनोहर आदि मासिकातून त्यांनी जे लेखन केलं, जे पुरोगामी विचार मांडले ते आजही आचरणात आणताना आपल्याला झेपतील का असंच वाटतं. मात्र नेहमीच भविष्याचा वेध घेणारे सावरकर त्याचा पाठपुरावा करत राहिले..

 एका ठिकाणी ते स्वतः म्हणतात, " यापुढे क्रांतिकारी सावरकर जरी तुम्ही विसरून गेलात तरी चालेल मात्र सुधारक सावरकर विसरू नका."

क्रांतिकारक सावरकर, विदेशी कपड्यांची पहिली होळी करणारे सावरकर, मदनलाल धिंग्रा- अनंत कान्हेरे- सेनापती बापट आदि वीरांना सदैव मार्गदर्शक असेल सावरकर, सागरा प्राण तळमळला सारख अजरामर काव्य लिहिणारे सावरकर, बोटीतून उडी मारून सुटकेची धडपड करणारे सावरकर, दोन जन्मठेपेची सजा होऊनही अंदमानच्या कारागृहात सुधारणा करू पाहणारे सावरकर... अशी त्यांची विविध रूपं आपल्याला माहिती असतात. मात्र समाज सुधारक सावरकर याकडे आपलं तुलनेने दुर्लक्ष होतं. हे पुस्तक खास " समाज सुधारक सावरकर " यांचं आहे. 
आपला समाज प्रगत व्हावा, भारतीय म्हणून हिंदू म्हणून एकजुटीने उभा राहावा आणि विज्ञानयुगाची कास धरून जगात अग्रगण्य व्हावा ही त्यांची तळमळ. त्यासाठीच 1925 नंतर त्यांनी किर्लोस्कर, मनोहर आदि मासिकातून जे विज्ञाननिष्ठ लेखन केलं ते आजही अनुकरण करावं असंच आहे. मात्र ते इतकं धगधगीत तेजस्वी आहे की आपल्याला पचवणे अजूनही जड जाते.
हिंदुत्वाचा आग्रह धरणारे सावरकर, आपल्या रूढी, अंधश्रद्धा, धर्मभोळेपणा यावर इतका कडाडून आघात करतात की परधार्मिय व्यक्ती देखील इतकं कठोर बोलणार नाही.
गाय हा एक उपयुक्त पशु आहे हे त्यांचं वाक्य " गोपालन हवे, गोपूजन नव्हे" या लेखातलं. तो या पुस्तकातच आहे. गायीचं दूध, शेण, चर्म यांचा अवश्य वापर करावा, त्यासाठीच अधिकाधिक गोपालन करा. त्यानिमित्ताने अनेकांना लाभ होईल मात्र गोपूजनाचा अतिरेक करू नका असं ते सांगतात. गाय असो की आपली यज्ञसंस्था यांच्याकडे उपयुक्तता म्हणून पहा, त्याचं आवडम्बर माजवू नका असं सांगतात.

" दोन शब्दांत दोन संस्कृती " हा त्यांचा लेख तर सदैव सर्वांनी वाचावा असा. अद्ययावत या शब्दाची गरज आणि श्रुतीस्मृतिपुराणोक्त या शब्दाला टाकून देणे याची गरज ते परखडपणे व्यक्त करतात.
विज्ञानाची कास धरली म्हणूनच आज पाश्चिमात्य राष्ट्रे बलवान झाली. आपले ग्रंथ, आधीच्या लोकांनी लावलेले शोध याचं अंधानुकारण न करता त्यांनी त्यावर पुन्हा पुन्हा संशोधन केलं, त्यात योग्य तेवढं घेतलं नको वाटलं ते वगळून नवीन त्यात वाढवलं. त्यामुळे ते अद्ययावत बनले. आपल्याला असं व्हायला हवंय. उत्तम वस्तू, उत्तम यंत्रे, उत्तम बंदूका, उत्तम विमाने, उत्तम बसगाड्या, उत्तम रेल्वे असं विज्ञानाच्या बळावर आपण बनवलं पाहिजे. यंत्रांची कास धरा, जुन्या पोथ्या पुराणांना कवटाळत बसू नका असं पोटतिडिकीने ते सांगत राहिले.

" ईश्वराचे अधिष्ठान म्हणजे काय?" या लेखात धर्मभोळेपणाच्या कल्पनांवर आघात करताना ते म्हणतात, " सामर्थ्य आहे चळवळीचे.. " असं समर्थ रामदास सांगून गेले. मराठ्यांनी ते आचरलं म्हणून 1600 ते 1800 या दोन वर्षात इतिहास बदलला. कारण मराठ्यांनी आपलं सामर्थ्य विकसित केलं. 
त्यापूर्वी अनेक पूजा, अनेक यज्ञ करत असूनही परकीय आक्रमकांनी आपलं आयुष्य मुळासकट उध्वस्त केलं. कोणताही देव तिथं मदतीला आला नाही. त्यामुळे धर्मभोळेपणा टाकून द्या, बळवंत व्हा, जे जे नवीन ते ते आत्मसात करा. जुन्या काळात जे लोक जगले ते त्यांनी त्या काळशी सुसंगत असं सगळं केलं होतं. ते सगळं एका भव्य युगाचा इतिहास म्हणून अवश्य अभ्यासावं मात्र त्याचं अंधानुकारण करू नका. वेद हे कुणा ऋषींना स्फुरले, विविध उपनिषदे, ग्रंथ त्या त्या काळाची निर्मिती होती आता तुम्ही तुमचा इतिहास घडवा असं रोखठोक सांगत राहिले.

अस्पृश्यता निवारण करण्यासाठी सर्व जातीतील लोकांचे सहभोजन करा , रूढी बंदी करत नवीन रूढी निर्माण करा , बेटीबंदी नष्ट करण्यासाठी आंतरजातीय विवाह करा, सिंधुबंदी मोडीत काढत जगभर जा, नवं शिकून देश समृद्ध करा असं सांगत राहिले. 
हिंदू समाज खूप सारा निद्रिस्त असतो. सगळं काही देव करेल या विचारात भ्रमित असतो त्याचाच फायदा आजवर मुस्लिम, ख्रिश्चन आक्रमक देशांनी घेतला. यापुढे असं होऊ देऊ नका. एकजुटीने उभे रहा. आपला धर्म आणि आपला देश जगात उच्चस्थानी हवा असेल तर आपल्यात जे जे चुकीचं आहे ते ते काढून टाकायला हवं. विज्ञानाची कास धरून नवं सगळं प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करायला हवं. या भावनेने ते प्रसंगी कठोर आणि परखड बोलत राहिले.

" मनुस्मृतीमध्यें " न स्त्रिस्वातंत्र्यम अर्हति " असं म्हटलं आहे यावर आपण सतत टीका करतो. मात्र त्याच ग्रंथात " यत्र नारयस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता" असंही म्हटलंय. आपण स्त्रियांना अधिक चांगलं वागवलं पाहिजे. त्यांना समाजात समानतेने सर्वत्र कार्यरत व्हायला प्रोत्साहन दिले पाहिजे. जसं परदेशी लोकांच्यात स्त्रियांवरील निर्बंध आता हटवले गेले, अगदी सैन्यातही स्त्रिया लढताहेत ते आपण करायला हवं... " असं सावरकर 1930/40 च्या सुमारास सांगत होते हे पाहून थक्क व्हायला होतं.
खरतर त्यांना आधीच लोकांनी देवत्व दिलं होतं. लोकांना गोड वाटतील अशी भाषणे, लेखन करून ते आयुष्यभर लोकप्रिय राहिले असतेच. मात्र लोकांचा अनुनय करण्यापेक्षा सतत देशहित त्यांच्या नजरेसमोर होतं, त्याला प्राधान्य होतं.  
 तरीही कित्येक वर्षं आपण त्यांचे विचार बाजूला ठेवले. नेहमीच आपल्याकडे सावरकरांची अवहेलना होत राहिली. आज नवीन टेक्नॉलॉजीमध्यें, संरक्षण क्षेत्रात, नौदल, हवाई दलात भारताने जी मुसंडी मारली आहे ते पाहायला सावरकर असते तर त्यांना नक्कीच कृतकृत्य वाटत राहिलं असतं असं वाटतं. सावरकरांच्या सारख्या व्यक्तिमत्वाला नुसते जयजयकार नको असतात ते देशहितासाठी केलेल्या प्रत्यक्ष कृती हव्या असतात. आपण ही आपला देश बलवान व्हावा यासाठी काहीतरी सतत करत राहू हीच त्यांना खरी आदरांजली असेल. 
या तेजस्वी व्यक्तिमत्वाला पुन्हा एकदा सादर प्रणाम.

- सुधांशु नाईक, 9833299791🌿
( छ. शिवाजी महाराज, भगवान श्रीकृष्ण, स्वा. सावरकर,यांच्या विविध पैलूविषयी अधिक माहिती देणारी व्याख्याने मी नेहमीच देत आलोय. महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात कुठेही बोलवलं तर अवश्य येईनच. ) 
#सहज #सुचलेलं