marathi blog vishwa

Wednesday, 4 October 2023

माणसं आणि कला..!

#सुधा_म्हणे: माणसं आणि कला..!  

04 ऑक्टोबर 23

जन्माला आलेल्या प्रत्येक माणसासाठी अन्नपाणी, वस्त्र, निवारा, शरीरसुख आदि प्राथमिक गरजा असतातच. त्याची पूर्तता तो आपापल्या परीने करत राहतो. अनेकदा यांच्यातच तो कायमचा गुंतून राहतो. तरीही प्रत्येक माणसात कोणती ना कोणती कलाविषयक जाणीव ही असतेच. “जगण्यासाठी कला की कलेसाठी जीवन” यावर अनेक दशके घनघोर चर्चा होत असली तरी जगण्याच्या प्राथमिक गरजा भागल्याशिवाय कलेसाठी जगणे खूप कमी जणांना शक्य होते. मात्र कला ही जणू आकाशीची वीज असते. आपल्या अंगी कोणती कला आहे याची जाणीव बरेचदा बालवयात किंवा पौगंडावस्थेत स्वतःला किंवा आपल्या पालक/शिक्षकांना होते. आणि आयुष्यात एक वेगळाच रंग निर्माण झाल्याची निर्मळ भावना जीवन उजळून टाकू लागते. आपल्या आसपास घडणाऱ्या गोष्टी वेगळ्या नजरेने दिसू लागतात. त्या गोष्टी मग चित्र, शिल्प,शब्द,सूर आदि माध्यमातून व्यक्त करण्यासाठी आपले तनमन अधीर होऊन जाते.

मनात ज्या क्षणी जाणीव उमटते तो क्षण म्हणजे जणू एखाद्या वीजेचा कल्लोळ स्वतःमध्ये उतरावा तसा असतो. नेमकी ही जाणीव, तो विचार, ती कल्पना कशी सुचली हे सांगणे अवघडच. मात्र मनात लख्खकन चमकून उठलेली ती कल्पना प्रत्यक्षात साकार करता येणे इथे कलाकारांचे कसब कामी येते. कलाकार स्वयंभू असावेत किंवा असतात असे कितीही म्हटले तरी जन्माला आलेली ही कल्पना किंवा तो विचार हा जणू नग्न असतो. त्याला विविध शब्द/सूर/रंग/आकार यांच्या सहाय्याने घडवत असताना कलाकाराच्या प्रतिभेचा जणू कस लागतो आणि तिथेच रियाजदेखील कामी येतो. नुसतीच प्रतिभा असून पुरत नाही तर त्या प्रतिभेला घासून पुसून अधिक टोकदार करण्यासाठी अथक रियाजाची आवश्यकता असते. रियाजामुळे ज्यांची कला अधिक झळाळून उठते ती मग कालातीत होऊन जाते.

गायक, लेखक, कवी किंवा चित्रकार आपल्या मनात जन्मलेल्या विचाराला, कल्पनेला असे काही मूर्तरूप देतात की त्यासाठी आपण अगदी वेडावून जातो. मग ती आरती प्रभू यांनी लिहिलेली “ये रे घना..” सारखी एखादी कविता असो किंवा कुमार गंधर्वांनी रंगवलेली “नयन में जल भर आये..” सारखी बंदिश असो, हे सारे कलाविष्कार आपले जिवलग बनून जातात. कायम मनाच्या कुपीत दरवळत राहतात आणि कायमच आपल्याला आपले भान विसरायला लावतात अशा गोष्टी..!

मात्र जगण्यासाठी धडपड करताना अनेकदा कला बाजूला राहते आणि एखादा कलाकार योग्य संधीची वाट पहात पहात संपून जातो. तर एखाद्या कलाकाराच्या बाबतीत कुणाच्या तरी रूपाने संधी दार ठोठावते आणि तो कलाकार कुठल्याकुठे निघून जातो. बस मध्ये कंडक्टरची नोकरी करणारा रजनीकांत असो, हसरत जयपुरी असो की जॉनी वॉकर, या कलाकारांच्या अंगी असलेल्या प्रतिभेची जाणीव कुणाला तरी झाली म्हणून त्यांचे आयुष्य बदलले. त्यामुळे आपल्या आसपास असणाऱ्या कलाकारांना आपण ओळखायला हवे. त्यांना त्यांची कला फुलवायला बळ द्यायला हवे. 

फुलून आलेला, समृद्ध कलाविष्कार भरभरून देणारा एक कलाकार मग हजारो- लाखों लोकाना जगण्याची प्रेरणा देत राहतो. म्हणून कलाकार जगले पाहिजेत, वाढले पाहिजेत, समाजाने त्यांच्यासाठी सहकार्याचा हात सदैव पुढे करत राहायला हवे. त्यांच्या कलेमुळे तर रोजचे आयुष्य अधिक रंगतदार करणे, नजाकतीने फुलवणे आपल्याला शक्य झाले आहे असं मला वाटते. तुम्हाला काय वाटतं ?

-सुधांशु नाईक (9833299791)



Tuesday, 3 October 2023

माणसं..!

#सुधा_म्हणे: माणसं..!  

03 ऑक्टोबर 23

माणसं. होमो सेपियन्स असे शास्त्रीय भाषेतील नाव असलेली एक प्रजाती.  ही प्रजाती इतर प्राण्यांच्यापेक्षा फार वेगळी. जे कुणी खूप चांगले वागते त्यांना आपण देव माणूस म्हणतो तर कुणी वाईट वागले तर त्यांना दानव किंवा असुर म्हणतो. मात्र एकट्या मानवाने स्वतःच देवत्व किंवा दानवत्व नक्कीच दाखवून दिले आहे. त्यातही गंमत अशी की, बहुसंख्य वेळा एक माणूस हा कधीच पूर्णपणे देव नसतो आणि दानव देखील. तो कमी जास्त प्रमाणात दोन्हीही असतो हेच खरे.

किती प्रकारची असतात ना माणसे? उंच, बुटकी, आडव्या देहाची, उभट शिडशिडीत, जलद चालणारी, संथ चालणारी. त्यांची नजर देखील किती वेगळी. कुणी भिरभिरत्या नजरेची, तर कुणी उदासीन थंड नजरेची. कुणी खुनशी तर  कुणी स्वप्नील नजरेची. कुणी संशयी नजरेची तर कुणी वासनेने ओतप्रोत भरलेली. एखाद्या माणसाला नुसते बघितले तरी अपार जिव्हाळा, माया आपल्या मनभर दाटून येते. तर कुणाला बघितले की शिसारी येते.  कुणा कर्तबगार माणसाला पाहिले की थक्क व्हायला होते तर कुणा कमनशिबी व्यक्तीला बघताना मनात कणव दाटून येते. एखाद्या माणसाने अतिशय गरीबीतून पुढे येत आपले आयुष्य घडवलेले असते. तो आदरणीय ठरतो. एखादा माणूस कधी भल्या तर कधी बुऱ्या मार्गाने पटापट मोठ्या यशाच्या पायऱ्या चढताना दिसतो. तर कधी एखाद्या सुप्रसिद्ध किंवा श्रीमंत माणसाची आयुष्य जगताना अगदी वाताहत होऊन जाते. कुणी एखाद्या व्यसनात अडकतो तर कुणी सगळ्या आशा, अपेक्षा यांच्या पलीकडे जात साधू, संन्यासी बनून जातो. 

प्रत्येक माणसाची स्वतःची अशी एक कहाणी असतेच असते. कधी सुखद, तर कधी दुःखद अशी. कधी सुख किंवा दुःख यांच्या पलीकडे जाणारी. प्रत्येक कहाणीची आपली आपली ताकद असते. सगळ्यांच्याच कहाण्याना प्रसिद्धी मिळत नाही याचा अर्थ असा नव्हे की त्यांच्याकडे काहीच नाहीये.

माणूस का आणि कसा घडतो याबाबत अथक संशोधन होते आहे. मानसशास्त्र, समाजशास्त्र यासारख्या शाखांतून याबाबत केवढा तरी अभ्यास होत आहे. वेगवेगळी माणसं कशी घडली हा प्रवास जाणून घेणे देखील फार सुरेख असते. समाजात असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे काही ना काही कर्तृत्व असतेच. त्याला चांगले किंवा वाईट असे लेबल न लावता त्याच्याकडे एका तटस्थ नजरेने आपल्याला पाहता यायला हवे. ही व्यक्ती अशी का घडली, याचे व्यक्तीविशेष काय आहेत हे जेंव्हा आपल्याला उमगेल तेंव्हा माणसाची माणसाकडे पाहायची नजर बदलून जाईल. विशिष्ट चष्म्यातून आपल्याला काही पाहण्याची गरज उरणार नाही. 

जगात सगळे चांगले असतेच असे नाही. मात्र वाईट कमी करून चांगले जास्त घडत राहावे यासाठी माणसेच एकमेकाना मदत करू शकतील हे नक्की.

 - सुधांशु नाईक (9833299791)

Saturday, 30 September 2023

गणेशोत्सव आणि वातावरणातील पावित्र्य..

#सुधा_म्हणे: गणेशोत्सव आणि वातावरणातील पावित्र्य..

30 सप्टेंबर 23

पावसाळा सुरू होत असतानाच गणपती येण्याचे वेध लागलेले असतात. कित्येक महिने आधीच गणेश मूर्ती तयार करण्यास सुरुवात झालेली असते. विशिष्ट माती आणून मूर्ती तयार करण्यासाठी खटपट सुरू होते. बहुतांश सर्व सार्वजनिक गणेश मूर्ती या पीओपी किंवा अन्य साहित्यातून बनवल्या जात असल्या तरी शाडूच्या / मातीच्या गणेशमूर्तीचे महत्व सर्वात जास्त असतेच. मुळात गणपती उत्सवात “पार्थिव” गणेशमूर्ती आणणे हेच अभिप्रेत आहे. गणपती मातीपासून बनवला जायला हवा. लहान मुलांना आजकाल शेकडो इंग्रजी शाळेत अॅक्टिविटी करताना “ क्ले पॅकेज” दिली जातात. त्याच धर्तीवर मुलांना आपण गणपतीच्या काळात मातीचे गणपती बनवायला, त्यांना उत्तम रंग द्यायला नक्कीच शिकवू शकतो ना? त्यामुळे मुलांची निरीक्षण शक्ती वाढेल, त्यांना तशी मूर्ती करण्यातील आनंद अनुभवता येईल.

गणपतीला विविध पत्री, दूर्वा, फुले अर्पण करण्यासाठी लहान गावात अजूनही आसपासच्या बागेत, रानात जाऊन फुले, दूर्वा गोळा केल्या जातात.  मातीशी असणारे नाते अधिक वृद्धिंगत होत राहते. त्याचबरोबर गणपती विसर्जनानंतर ही माती पुन्हा मातीत मिसळून जाणे हेही पर्यावरणासाठी आवश्यक नव्हे का ?


गणपतीच्या काळात अवघे वातावरण मोठ्या साऊंड सिस्टिमच्या आवाजात दणाणून टाकले जाते. खरंच याची गरज आहे का हे पाहायला हवे. वातावरणात, अवकाशात सुंदर सूर पसरवत राहण्यासाठी विविध वाद्यांचा सुयोग्य उपयोग करायला हवा. गाणी, वाद्य संगीत यांच्या सुरांनी लोकांच्या चित्तवृत्ती उल्हसित होणे अधिक गरजेचे असते. विशिष्ट डेसीबल्स पेक्षा अधिक आवाज जास्त वेळ ऐकणे लोकांच्या तब्येतीसाठी हितकारक नसते मग अतिशय मोठ्या आवाजाचा अट्टहास का? हे आवाज सुखकारक वाटावे इतक्याच मर्यादेत असावेत हे भान आपण नक्कीच सांभाळायला हवे. प्रत्येक गोष्टीसाठी कायदेशीर बडगा उगारणे हेच जर गरजेचे होणार असेल तर ते आपल्या माणूसपणासाठी नक्कीच योग्य नव्हे.

वातावरणातील महत्वाचा घटक म्हणजे पाणी. गावोगावी असणारे पाण्याचे स्त्रोत अधिकाधिक दूषित होत आहेत. गणेशोत्सवाच्या काळात तरुण मंडळानी एकत्र येऊन नदी, विहिरी यांच्या स्वच्छतेची मोहीम राबवायला हवी. अनेक ठिकाणी सरकारी योजनांमध्ये त्रुटी राहिलेल्या असतात. सांडपाणी प्रक्रिया केंद्रे बंद पडलेली असतात. गटारे तुंबलेली असतात. कित्येक ठिकाणी सांडपाणी थेट नदीत सोडलेले असते. या सगळ्याविरुद्ध गणेश मंडळाच्या माध्यमातून एकत्र झालेली तरुणाई या सगळ्याविरुद्ध जर एकवटली तर यंत्रणा सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण होऊ शकतो. नदी, नाले, तलाव यामध्ये गणेश विसर्जन केल्याने प्रदूषण कमी होण्यासाठी जरी खूप मोठा हातभार लागणार नसला तरी खारीचा वाटा तर नक्कीच असेल. तसेच गणपती विसर्जन झाल्यानंतर पुढील 2-4 दिवसांत तिथे स्वच्छता मोहीम देखील राबवायला हवी. त्यामुळे आपला परिसर, नदी, तलाव हे आपल्यासाठीच चांगल्या अवस्थेत उपलब्ध असतील. ईश्वराने निर्माण केलेल्या या सृष्टीचे, या वातावरणाचे पावित्र्य ईश्वरी उत्सवाच्या नावाखाली बिघडू न देणे हे आपल्याच हाती आहे असे मला वाटते.

- सुधांशु नाईक (9833299791)



Friday, 29 September 2023

गणेशोत्सव आणि शिक्षणविषयक उपक्रम...

#सुधा_म्हणे: गणेशोत्सव आणि शिक्षणविषयक उपक्रम...

29 सप्टेंबर 23  

गणपतीला आपण विदयेची देवता मानतो. मात्र गणेशोत्सवात खूपच कमी प्रमाणात शालेय विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबवलेले दिसतात. एकतर बहुसंख्य शाळांना/ कॉलेजला गणपतीत सुट्टी असते आणि मुलेही सुट्टीचा आनंद घेत असतात. त्यामुळे बहुतेकदा त्यांच्याकडे आपले दुर्लक्ष होत असते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने खरेतर कितीतरी उपक्रम करणे शक्य आहे. 

गणपतीमध्ये फुले,पाने यांचे फार महत्व असते. विविध पत्री आणून त्यांचा पूजेत वापर होत असतो. या दरम्यान पाऊस होऊन गेलेला असल्याने रानात, डोंगरात अनेक प्रकारच्या वनस्पती उगवलेल्या असतात. मुलांना घेऊन अशावेळी डोंगरात, रानात जायला हवे. विविध चांगल्या वाईट वनस्पती, फुले हे सारे समजून द्यायला हवे. आपण फक्त मुलांना इंजिनियर, डॉक्टर किंवा आय टी इंजिनियर बनवण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्यासोबत त्यांना आपले पर्यावरणदेखील समजाऊन दिले पाहिजे असे मला वाटते.

आपल्या गावी नदी, तलाव, ओढे असतात. जवळपास एखाद्या गावी एखाद्या नदीचा उगम असतो. नदी कशी उगम पावते, तिचा विस्तार कसा होतो, तीच्या आसपास जैवसाखळी कशी निर्माण होते, कोणते प्राणी, पक्षी, कीटक नदीच्या, या जंगलांच्या सहवासात वाढतात हे सारे मुलांना शिकवायला हवे. त्यातही निसर्गात हिंडून येणे शक्यतो सर्व मुलांना अवडतेच. त्यांना ही आवड आपणच लावायला नको का ?


आपल्या गावात अनेक गरीब लोकांची वस्ती असते. तात्पुरती किंवा कायमचे झोपडे असणारी कित्येक माणसे असतात. वीटभट्टीवरील कामगार, बांबूच्या टोपल्या विणणारे कारागीर, कुंभार, भांडीवाले, लोहार आदि कित्येकजण आपल्याकडील पिढीजात उद्योगात कार्यरत असतात. त्यांच्याकडे जाऊन त्यांचे काम कसे असते, त्यांना त्यांच्या कामातून अधिकाधिक प्राप्ती कशी होईल याबाबत मार्गदर्शन करायला गणेश मंडलांनी पुढाकार घ्यायला हवा. यामुळे आपली मुले आणि या पालांवर किंवा झोपडीत राहणारी माणसे यांच्यात एक सहकार्यांचा बंध तयार होईल असे मला वाटते.

आपल्या आसपास असणाऱ्या गरीब मुलांना, पुस्तके – वह्या, शाळेची बॅग, युनिफॉर्म आदि वस्तूंचे वाटप करणे यासारखी कामे तर गणेशोत्सव मंडळे आवर्जून करू शकतात असे मला वाटते.

शेजारच्या गरीब घरात किंवा झोपडपट्टीत जाऊन मुलांना कॉम्प्युटर शिकवणे, गणित-सायन्स सारख्या विषयाचे क्लास घेणे असे उपक्रम गणेश मंडळाचे कार्यकर्ते नक्कीच करू शकतात. त्यांनी तशी योजना जाहीर केली तर समाजातील इतर लोकसुद्धा सहकार्याचा हात नक्कीच पुढे करतील. समाजातील दुफळी कमी होऊन अधिकाधिक एकात्मता वाढीस लागावी यासाठी हे आवश्यक आहे ना? तुम्हाला काय वाटते ?

-सुधांशु नाईक (9833299791)