marathi blog vishwa

Wednesday 17 April 2024

तुजवीण रामा मज कंठवेना…

मना सज्जना: तुजवीण रामा मज कंठवेना…

रामनवमी, १७/०४/२४

सुधांशु नाईक  

आज रामनवमी आणि समर्थ रामदास यांचीसुद्धा जयंती. आपण ज्याला सर्वाधिक जवळचा, जीवीचा जिवलग मानतो, प्रत्येक क्षण आपण ज्याचा निदिध्यास घेतो, त्याचा आणि आपला जन्मक्षण सारखाच असणे ही किती अलौकिक आणि भाग्याची गोष्ट. हे भाग्य समर्थांच्या वाट्याला आले. तरी आयुष्यभराची दगदग टळली नाही. त्या रामरायाचे पिसे लागले आणि मग समर्थांच्या पायाला चक्र लाभले. 

घर सोडून पळून गेलेल्या त्या लहान मुलाने मग अखंड पायपीट केली. एकीकडे “तन-मन-धन माझें राघवा रूप तुझें...” असे मानणारे समर्थ, लोकांना आपलेसे करणारे समर्थ गावोगावी जोडलेल्या नाती-गोती-माया-जिव्हाळा यांच्या बेड्याना  नक्कीच उमजून असणार. विरागी विरक्त संन्यासी मनोवृत्तीच्या मनाला हे सारे बंध नाजूक पण कठोर हातानी अलगद दूर करणे किती कष्टदायक..!

समर्थ हे सारे अनुभवत पुढे जात होते. जिथे जिथे लोकसंग्रह करायचा आहे, लोकांचा समूह बनवायचा आहे, ते घडवून त्यांना नि:स्वार्थी, निस्पृह बनवून पुन्हा त्यातून बाहेर पडत होते. “दास डोंगरी राहतो...यात्रा देवाची पाहतो...” अशा तटस्थभावाने पुढे जात राहिले. तरीही मैत्रीचे, जिव्हाळ्याचे, गावोगावी भेटणाऱ्या मायाळू माऊल्यांचे वात्सल्यबंध निश्चयाने दूर करताना त्यानाही किती यातना झाल्या असतील. ते स्वतःच हे सारे मोजक्या शब्दात अतीव परिमाणकारकरित्या सांगताना म्हणतात,

चपळपण मनाचें मोडितां मोडवेना । सकळ स्वजनमाया तोडितां तोडवेना ॥
घडि घडि विघडे हा निश्चयो अंतरीचा । म्हणवुनि करूणा हे बोलतो दीनवाचा ॥

या सगळ्यातून जाताना त्यांच्या मनातील लोककल्याणाचा विचार कधीही दुर्लक्षित राहिला नाही. जनजागरण, भ्रमंती, बलोपासनेचे धडे, देशभर विविध मठांची निर्मिती हे सारे कार्य जोमाने सुरु असताना मनात मात्र सदैव रामरायाला भेटण्याची, जगातून मुक्त होण्याची तीव्र इच्छा बळावलेली होतीच. नियतीने हाती सोपवलेले कार्य पूर्ण होण्यासाठी एखाद्याला जगणे क्रमप्राप्त होते तेंव्हा तळमळणारे मन मग मोक्ष आणि मुक्तीच्या अपेक्षेने आक्रंदन करत म्हणू लागते;

आम्हां अनाथांसि तूं एक दाता । संसारचिंता चुकवीं समर्था ॥
दासा मनीं आठव वीसरेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥

आयुष्य रामरायाला समर्पित केलेल्या रामदासांना सुद्धा जेंव्हा रामाचा विरह सोसवेनासा होतो तिथे आपल्यासारख्या बापुड्यानी काय करायचे? रामाची आणि रामदासांची आठवण आली की हमखास करुणाष्टके आठवतातच आणि भावविभोर मन हेलावून जाते.

-सुधांशु नाईक(९८३३१२९९७९१)🌿

Saturday 30 March 2024

केल्याने होत आहे रे...

मना सज्जना... भाग २५ : केल्याने होत आहे रे...

-सुधांशु नाईक

शनिवार, ३०/०३/२४

“मना सज्जना..” या तीन महिने सुरु असलेल्या लेखमालेचा उद्देश हाच होता की मनाला अधिकाधिक सक्षम करता येणे, आपल्यातील न्यून जाणून घेऊन त्यावर तोडगा काढायला उद्युक्त होणे, आपल्यातील सुप्त गुण ओळखणे, आपल्या आणि इतरांच्या भल्यासाठी काही कृती करायला सुरुवात करणे ज्यायोगे सर्वांच्या आयुष्यात चार क्षण आनंदाचे असू शकतात. आयुष्यात चांगले दिवस येण्यासाठी वाईट क्षण अनुभवणे, त्यावर तोडगा काढून पुढे जाणे क्रमप्राप्त असते म्हणूनच  गेल्या काही भागात आपण चिंता, स्वार्थ, भय, क्रोध आदि गोष्टीबाबत विचार केला. आयुष्यात या सर्व गोष्टी आपल्या कृतीच्या, प्रगतीच्या आड येत असतात. त्याचबरोबर आर्थिक सहाय्य, फसवणूक, नैसर्गिक आपत्ती आदि अडचणींमुळे आपण निश्चित केलेले ध्येय गाठण्यात आपल्याला अनेकदा अपयश येते. कधी आपलेच निर्णय चुकल्याची जाणीव होते. कोणतीही चूक ही अजिबात वाईट नसते अशा अर्थाचे एक वचन आहे, त्याचा अर्थ हाच की झालेली चूक, पदरी पडलेले अपयश हे तुम्हाला उलट ज्ञान देऊन जाते. काय करायचे नाही हे आपल्या मनाला ठाम ठरवता आले की मग काय करायला हवे यावर लक्ष केंद्रित करता येते.

ज्या ज्या थोर माणसांची चरित्रे आपण वाचलेली असतात, किंवा काही मोठ्या व्यक्तींचे आयुष्य घडताना पाहिलेले असते त्यांना देखील या सगळ्या अडचणी भेडसावत होत्याच. तरीही मोठ्या जिद्दीने, चिकाटीने ते पुढे पुढे वाटचाल करत राहिले. मोठ्यांच्या चरित्रातून हेच तर आपल्याला शिकता येते. कित्येक वेळा असे घडते की आपण अमुक केले तर असे होईल, ही अडचण येईल, ते जमणार नाही असे म्हणून कृती करण्यापूर्वी सुरुवातीलाच माघार घेतो. तर कित्येकदा हाती एखादे काम घेतल्यावर लगेचच धरसोड करत ते काम टाकून देतो. इथे आपली प्रगल्भता न दिसता केवळ आरंभशूरता दिसते. 

त्यामुळे या सगळ्याविषयी सारासार विचार करून मग पाऊल उचलणे आवश्यक ठरते. केवळ गप्पा मारल्याने, मोठमोठ्या बढाया मारण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती घडणे महत्वाचे. त्यातही योग्य ती कृती घडणे अधिक महत्वाचे. म्हणूनच समर्थ म्हणतात की,

केल्याने होत आहे रे । आधी केलेचि पाहिजे ।

यत्न्य तो देव जाणावा । अंतरी धरता बरे ।।

जेंव्हा विचारपूर्वक आपण कृती करू जातो तेंव्हा मन आत्मविश्वासाने भरून जाते. छत्रपती शिवाजी महाराज, शंभू राजे, पहिले बाजीराव पेशवे यांची चरित्रे अभ्यासली की असे दिसते की हजारो अडचणी त्यांच्या समोर होत्या. मात्र ध्येयनिश्चिती केल्यानंतर, वाटचाल करताना कितीही अडचणी आल्या तरीही त्यांनी आपले लक्ष कधीच विचलित होऊ दिले नाही. कठोपनिषदात म्हटल्यानुसार “उत्तिष्ठ...जागृत: प्राप्य वरान्निबोधत...” हेच महत्वाचे. पोकळ गप्पांमध्ये न रमता समाज कृतीशील होणे हे फलदायी आहे यात शंकाच नाही.

-सुधांशु नाईक (९८३३२९९७९१)

गेले तीन महिने या लेखमालेद्वारे मनाविषयीचे हे लेख लिहिले. आता गुढीपाडव्यापासून अजून काहीतरी वेगळे लिहायचा प्रयत्न असेल. ही लेखमाला तुम्हाला कशी वाटली, मन याविषयी तुम्हाला अजून काय जाणून घ्यायला आवडेल हे आवर्जून सांगावे ही विनंती.

Friday 29 March 2024

चिंता

मना सज्जना भाग २४ : चिंता

-सुधांशु नाईक

शुक्रवार २९/०३/२४

चिंता, काळजी या भावना आपल्याला कधी आणि कशा येऊन चिकटतात हे आपल्यालाच कळत नाही. जन्माला आल्यापासून सतत कसली ना कसली चिंता आपली पाठ सोडत नाही. दोन वेळचे जेवण, झोप, शिक्षण, नोकरी, घर संसार, दुखणी खुपणी, इतरांची आजारपणे, रोजच्या जगण्यातील स्पर्धा अशा अनेक गोष्टींच्या मुळे आपण वारंवार चिंतीत होत राहतो. माणसाने चिंतामुक्त राहावे असे कितीही आपण सांगितले तरी प्रत्यक्षात ते घडत मात्र नाही. 

आधी स्वतःच्या आयुष्याबद्दल आपण चिंता करत राहतो आणि जसे संसारी होऊन जातो तसे मग मुलं, आपला जोडीदार, आईबाप, आपल्यावर असलेली नोकरी-व्यवसायातील जबाबदारी या सगळ्याचे ओझे घेत जगतो. तुलनेने आपलं आयुष्य तसे बरेच सरधोपट असले तरी ज्यांना रोजच्या आयुष्यात जगण्यासाठीच संघर्ष करावा लागतो त्यांना या चिंता अक्षरशः जाळत राहतात. पण चिंता करून काही फरक पडतो का? ज्या कृती करणे क्रमप्राप्त असते ते तर आपल्याला करावेच लागते. भूतकाळात काय घडले याच्या विचाराने किंवा भविष्यात काय घडणार या काळजीने चिंताक्रांत होऊन बसणे हा मूर्खपणा आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात,

मना मानवी व्यर्थ चिंता वहाते

अकस्मात होणार होऊनि जाते...

जे घडणार आहे ते घडणारच. मात्र आपण चिंता करत बसल्याने हातात असणारा वर्तमानकाळ देखील वाया घालवतो याकडे समर्थ किंवा अन्य संत, विचारवंत वारंवार लक्ष वेधताना दिसतात. उद्याचा विचार करून, येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्यानुसार आपल्या कृतीत सुधारणा करून कामाला लागणे त्यांच्या दृष्टीने महत्वाचे होते. नुसतेच चिंता करत हातावर हात धरून बसणे यात पुरुषार्थ नाही तर आल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी झडझडून कामाला लागणे त्यांना अपेक्षित होते.

समर्थ असोत किंवा आजच्या काळातील मानसशास्त्रज्ञ, हे सारे जण नेहमीच सांगतात की अति विचार करत न बसता पहिले पाऊल उचला. आधी आज, आत्ता कार्यरत व्हा. एकदा मार्गक्रमण सुरु केले की आपोआप पुढे वाटा सापडत जातातच. भूतकाळातील चुकांवर काम करावे आणि भविष्यात चुका होऊ नयेत, हाती घेतलेले काम तडीस जावे यासाठी अधिकाधिक बारकाईने नियोजन करणे म्हणूनच गरजेचे ठरते. अचूक यत्न केले तर आपल्या कृती अधिकाधिक सफाईदार होतात. आपोआप मग आत्मविश्वास वाढतो. कामाचे डोंगर उपसायला बळ मिळते. जेंव्हा आपण असे वागू लागतो तेंव्हा चिंतामुक्त होण्यासाठीची ती सुरुवात असते हेच खरे.

-सुधांशु नाईक (९८३३२९९७९१)

Friday 22 March 2024

स्वार्थ

मना सज्जना...भाग २३ : स्वार्थ

-    सुधांशु नाईक 

   शुक्रवार २२/०३/२४

   लहानपणापासून आपण शिकतो की दुसऱ्याचा विचार करावा, इतरांना त्रास देऊ नये आणि तरीही आपण प्रत्यक्षात जगात वावरताना खूप स्वार्थीपणे वावरत राहतो. तहान, भूक अशा आदिम नैसर्गिक जाणिवांच्या बाबत आपले स्वार्थीपण एकवेळ समजू शकते मात्र त्या व्यतिरिक्त अनेक लहान मोठ्या गोष्टींबाबत आपण स्वार्थी होताना दिसतो. एखाद्या घरात सगळे कुटुंबीय जेवायला एकत्र बसलेले असतात. समोरचे पदार्थ संपता संपता लक्षात येते की एखादी भाकरी शिल्लक आहे. मग आई किंवा बाबा ती भाकरी स्वतः न घेता मुलांना देऊ पाहतात. त्याचवेळी दोन मुलातील एखादे मूल मात्र ती भाकरी फक्त स्वतःलाच हवी यासाठी चपळाईने ती भाकरी घेऊन टाकते. नि:स्वार्थी आणि स्वार्थी वृत्ती दोन्हीचे एकाचवेळी आपल्याला दर्शन घडते. 

   हे तर खूपच क्षुल्लक उदाहरण आहे. अनेक घरात पैसा, प्रॉपर्टी, घर किंवा अन्य स्थावर मालमत्ता यासाठी सख्खे जवळचे नातेवाईक सुद्धा एकमेकांच्या जीवावर उठतात हे आपण प्रत्यक्षात अनेकदा पाहतो. मुळात कष्ट न करता स्वतःला सगळे काही मिळावे, इतरांपेक्षा जास्त मिळावे यासाठी अनेकजण हपापलेपणा दाखवतात. हा हव्यास, ही स्वार्थबुद्धी मग आपल्याच विनाशाला कारणीभूत ठरते.  कित्येक कर्तबगार व्यक्ती केवळ स्वार्थी वृत्तीपायी विविध समस्यांमध्ये अडकून जातात. इतिहास पाहू गेले तर पृथ्वीराज चौहान पासून छत्रपती शंभूराजांच्या पर्यंत अनेक थोर माणसांना जवळच्या व्यक्तींच्या स्वार्थी वृत्तीमुळे मोठे नुकसान सोसावे लागले, प्रसंगी जीव गमावण्याची वेळ आली.

म्हणूनच समर्थ रामदास म्हणतात,

नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे,

अति स्वार्थबुद्धी नुरे पाप साचे 

घडे भोगणे पाप ते कर्म खोटे,

न होता मनासारिखे दु:ख मोठे || 

एखादी चांगली व्यक्ती स्वार्थी मनोवृत्तीमुळे संपून जाते. ही प्रसंगी कुटुंबाची हानी असतेच पण समाजाची, देशाचीही यामुळे हानी होतेच. 

हे सगळे घडू नये म्हणून लहानपणापासून मुलांवर नि:स्वार्थी वृत्तीचे संस्कार व्हायला हवेत. मी, माझे यातून बाहेर पडून व्यक्तीने आपले, आपल्या परिवाराचे, देशाचे भले होईल याचा विचार करायला हवा. दुसऱ्याला ज्यामुळे आनंद होतो अशी कृती करता आली, असे देणे आपल्याला देता आले तर त्यासारखे दुसरे समाधान नाही हेच खरे. सर्वांच्या मनातील स्वार्थी वृत्ती हळूहळू लोप पावून नि:स्वार्थी वृत्तीचा सर्वत्र उदय होईल  ही भ्रामक कल्पना किंवा पोकळ आशावाद आहे हे खरे. मात्र अधिकाधिक लोकांच्या मनात निस्वार्थी वृत्ती जागवण्यासाठी आपण प्रयत्न करत राहणे सहज शक्य आहे असे मला वाटते.

-सुधांशु नाईक (९८३३२९९७९१)🌿

Friday 15 March 2024

भय इथले...

मना सज्जना... भाग 22 : भय इथले...

-    सुधांशु नाईक, 

शुक्रवार १५/०३/२४

प्राण्यांच्या आयुष्यातील ज्या मूलभूत जाणीवा आहेत त्यात आहार,निद्रा आणि मैथुन यासोबत असणारी महत्वाची जाणीव म्हणजे भय. जन्माला येण्यापूर्वी गर्भावस्थेत असलेले मूल देखील भीतीच्या प्रभावाखाली असते. विशिष्ट आवाज त्याला घाबरवत राहतात. जन्माला आल्यापासून तर भीतीची छाया सतत असतेच. परक्या व्यक्तीकडे मूल जात नाही. आईवाचून दूर राहायला तयार नसते. वय वाढेल तसं भीतीची जाणीव कमी न होता वाढतच राहते. एखाद्याला विशिष्ट माणसांची भीती असते तर कुणाला एखाद्या ठिकाणाची भीती. कुणाला वाहन चालवण्याची भीती वाटते तर कुणाला बसच्या प्रवासात उलटी होईल याची भीती वाटते. कुणाला उंच डोंगरावर उभे राहण्याची भीती तर कुणाला लिफ्ट मधून जाण्याची भीती वाटते. असे भीतीचे कितीतरी प्रकार. त्याला मानसशास्त्रीय भाषेत फोबिया असे म्हणतात. भीतीचे काही प्रकार हे जन्मजात असतात तर काही प्रकार हे विशिष्ट घटनेचा परिणाम म्हणून सुरु होतात.

प्रणव हा एक कॉलेजला जाणारा मुलगा. यंदा बारावीला असलेला. कॉलेजमध्ये काहीतरी घडले. त्याचा त्याने इतका धसका घेतला की “यापुढे कॉलेजला अजिबात जाणार नाही..” असेच घरी जाहीर केले. काय घडले असे कित्येकदा सर्वांनी विचारून देखील त्याने अजिबात उत्तरे दिली नाहीत. मग त्याला घेऊन आई बाबा मानसोपचार तज्ञाकडे गेले. कित्येक दिवस त्याच्याशी बोलून त्याची भीती कमी करण्याचे प्रयत्न केले गेले. आज प्रणव थोडासा सावरला आहे, आता परीक्षा देतो आहे तरी काही गोष्टींच्या भीतीचा पगडा आजही तो झुगारून देऊ शकत नाहीये.

भीती फक्त लहान किंवा मोठ्या मुलांना वाटते असे नाही तर मोठ्या व्यक्तीलादेखील वाटते. ज्या गोष्टीमुळे भीती वाटते त्या गोष्टी सुरुवातीला टाळण्याकडे आपला कल असतो. पण अशी चालढकल केल्याने काहीच साध्य होत नाही. भय इथले संपत नाही...” ही गोष्ट कितीही खरी असली तरी त्या भीतीच्या जाणीवेला आपल्याला भिडावेच लागते. तरच भीतीच्या जाणीवेवर मात करणे शक्य होते.

भित्यापाठी ब्रह्मराक्षस अशी तर आपल्याकडे म्हण आहे.त्यामुळे घाबरत राहणे हे समस्येवरील उपाय असू शकत नाही. प्राचीन साहित्य असो वा सध्याच्या आधुनिक मानसोपचार पद्धती असोत, सगळे काही भीतीवर मात करून पुढे जाण्यासाठीच उद्युक्त करतात. आपल्या पाठीशी प्रसंगी आप्तेष्ट, मित्रमंडळी, गुरुसमान व्यक्ती असतातच,म्हणूनच समर्थ म्हणतात...

भवाच्या भये काय भीतोस लंडी। धरीं रे मना धीर धाकासि सांडी॥

रघूनायकासारिखा स्वामि शीरीं। नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी॥

भीतीच्या जाणीवेवर मात केली की पुढे आत्मविश्वासपूर्ण वाटचाल आणि यश असणार हे नक्की.

-सुधांशु नाईक(९८३३१२९९७९१)

Saturday 9 March 2024

नको रे मना क्रोध हा अंगिकारू....

मना सज्जना... भाग २१ : नको रे मना क्रोध हा अंगिकारू...

-    सुधांशु नाईक

शनिवार ०९/०३/२४

जन्माला आल्यापासून आपण लहानाचे मोठे होत जातो. अनेक गोष्टी नव्याने शिकतो. उठतो, बसतो, चालतो, धावतो... अभ्यास करतो, कामे करतो. कित्येकदा आपण यशस्वी होतो तर कित्येकदा अयशस्वी. ज्या ज्या वेळी आपल्या मनाप्रमाणे काही घडत नाही त्या त्या वेळी मनावर सर्वाधिक पगडा असतो तो क्रोध आणि निराशा यापैकी एका भावनेचा किंवा दोन्ही भावनांचा. काम, क्रोध, मोह, मत्सर आदि गोष्टींचा अतिरेक झाला तर ते मानवाचे सहा शत्रू होऊन जातात असे आपले ग्रंथ सांगतात. मनाचे श्लोक लिहिताना क्रोधाला सर्वात वर ठेवत समर्थ म्हणतात;

नको रे मना क्रोध हा खेदकारी।

नको रे मना काम नाना विकारी॥

नको रे मदा सर्वदा अंगिकारू।

नको रे मना मत्सरु दंभ भारु॥

का बरे त्यांनी क्रोधावर जास्त लक्ष केंद्रित केले असेल ? रागाच्या भरात काहीही करणाऱ्या व्यक्तीला आपण “ तो म्हणजे ना, जमदग्नीचा अवतारच आहे..” असे गमतीने जरी म्हणत असलो तरी जमदग्नी ऋषीसारख्या ज्ञानी व्यक्तीने रागाच्या भरात काय केले हेही आपल्याला ठाऊक असते. क्रोध ही गोष्टच अशी की त्यामुळे आपला सारासार विचारच खुंटतो. एका क्रोधापायी माणूस इतकी चुकीची पाऊले उचलतो की नंतर पश्चात्ताप करून काहीच फायदा नसतो.

छत्रपती संभाजीराजे जेंव्हा सिंहासनावर बसले तेंव्हा कारभाऱ्यांच्या कारस्थानाने उद्विग्न आणि क्रोधित होऊन गेले. प्रसंगी अनेकांना शिक्षा दिल्या. मात्र यातून पुढे जायला हवे, पुन्हा सगळी घडी नीट बसवायला हवी हे सांगण्यासाठी समर्थांनी त्यांना पत्र लिहिले. त्यातील उपदेश हा केवळ राजासाठीच नव्हे तर एखाद्या नेत्यासाठी, कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्यासाठी, कुटुंबातील प्रमुख व्यक्तीसाठी अत्यंत उपयुक्त असाच आहे;

कांहीं उग्र स्थिति सांडावी । कांहीं सौम्यता धरावी।

चिंता लागावी परावी । अंतर्यामीं ॥

मागील अपराध क्षमावे । कारभारी हातीं धरावे।

सुखी करूनि सोडावे । कामाकडे ॥

ऐसें सहसा करूं नये । दोघे भांडतां तिसर्यासी जय।

धीर धरोण महत्कार्य । समजून करावें ॥

समय प्रसंग ओळखावा । राग निपटून काढावा।

आला तरी कळों न द्यावा । जनांमध्यें ॥

या ओळी आजदेखील किती समर्पक आहेत ना..!

क्रोध किंवा राग येणे ही नैसर्गिक उर्मी असते. सर्व प्राणिमात्रांच्यात असलेली. त्याच्या मुळाशी मुख्यतः अपेक्षाभंग, अपयश किंवा फसवणूक या घटना असतात. घडलेली वाईट घटना आपण बदलू शकत नाही. ज्यामुळे घडली त्याला प्रसंगी शिक्षादेखील करतो मात्र तरीही माणसे क्रोधाने धगधगत राहतात. हा क्रोध इतरांना त्रास देतोच पण त्या व्यक्तीला देखील हानिकारक असतो असे आता सिद्ध झाले आहे. ज्या गोष्टीमुळे आपल्याला राग येतो त्या गोष्टीकडे अधिक बारकाईने पाहायला हवे. ज्या व्यक्ती किंवा प्रसंग आपल्याला सतत चिडवतात त्या गोष्टी टाळायला हव्यात. अनेकदा एखाद्या दुर्वर्तनी व्यक्तीशी थेट भिडणे किंवा अंगावर घेणे यापेक्षा त्याला पूर्ण टाळणे, संवाद न साधणे किंवा त्याला वळसा घालून आपल्या वाटेने पुढे चालत राहणे जास्त इष्टकारक. 

ज्या गोष्टीमुळे आपल्याला उत्कट आनंद, सुख, शांतता, कर्तव्यपूर्तीचे समाधान मिळते तिथे आपण लक्ष केंद्रित केले तर आपोआप मन अधिक प्रफुल्लित होऊन जाते. आयुष्यात राग येणारे क्षण आपण टाळू शकत नाही मात्र ते क्षण आल्यावर कमीत कमी राग येईल किंवा आपल्या रागावर आपण नियंत्रण मिळवणे इतके तर नक्कीच करू शकतो ना?

-सुधांशु नाईक (९८३३२९९७९१)

Tuesday 5 March 2024

देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी....

मना सज्जना... भाग 19 : देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी....
- सुधांशु नाईक
05/03/24
आज समर्थ रामदास यांची पुण्यतिथी. त्यांना मनापासून वंदन.
निर्भय, नि:स्पृह, नि:स्वार्थी विचारशील आणि लोकांच्या अंगातील रक्त सळसळते राहावे यासाठी आयुष्यभर धडपड केलेले कार्यमग्न व्यक्तिमत्व होते हे. ते सदैव आचार्याच्या भूमिकेतून वावरले असे मला वाटते. अन्याय सहन करावे लागू नयेत यासाठी, लोकांनी स्वतःची आणि समाजाची ताकद वाढवण्यासाठी सदैव खटपट करावी असे ते कायम सांगत राहिले.
त्यांचे आयुष्य किती खडतर असेल हे आता त्यांच्या आयुष्याचा अभ्यास करू जाता वारंवार जाणवते. वयाच्या १२ व्या वर्षी घरातून पळून ते नाशिक /टाकळी परिसरात आले. तिथे माधुकरी मागून एकवेळचे पोट भरले. शारीरिक आणि मानसिक ताकद वाढवण्यासाठी अपार मेहनत घेतली. नाशिक मध्ये त्या काळी किती ग्रंथालये होती, तिथे कोणते ग्रंथ अभ्यासासाठी उपलब्ध होते याची इतिहासात नीटशी नोंद नाही. मात्र समर्थांच्या हातून लिहिले गेलेले साहित्य वाचले की त्यांनी विविध विषयांचा किती अभ्यास केला होता हे त्वरित जाणवते. आज वयाच्या १२-14 व्या वर्षात असणारे एखादे मूल आपल्या आईकडे कितीवेळा “भूक लागली..खायला दे...”असे म्हणत हट्ट करते हे आपण पाहतोच, अशावेळी त्या काळी या १२ वर्षाच्या मुलाने कसे दिवस काढले असतील याची कल्पनादेखील कासावीस करते.
नाशिकमध्ये आल्यावर जेंव्हा विद्याभ्यास पूर्ण झाला असे वाटले तेंव्हा समर्थ भारतभ्रमणासाठी बाहेर पडले. त्यावेळी आसपास अनन्वित अत्याचार चालू असताना ते सर्वत्र हिंडले. नवीन लोक जोडले. आजही केवळ करमणुकीसाठी म्हणून गाडीतून भारत फिरायचा म्हटलं तरी लोकांच्या जीवावर येते मग त्याकाळी लोकसंग्रह आणि बलोपासना यासाठी समर्थ रामदासांनी कसे पदभ्रमण केले असेल याची कल्पना करायला हवी. त्यावेळी मोठी जंगले होती, वन्य श्वापदे होती, शत्रूचे सैनिक होते, चोर –दरोडेखोर होते... या सगळ्यांना तोंड देत त्यांनी केलेले काम जाणवून मन थक्क होते. समाजशास्त्र, मानसशास्त्र, नीतीशास्त्र, राजकारण यासाठी समर्थांनी लिहून ठेवेलेले साहित्य इतके चपखल ठरते की त्यांच्या लेखनातील अवतरणे ४०० वर्षानंतर आजही सहज वापरली जातात. त्याचे मुख्य कारण म्हणजे ते फक्त लेखन नव्हते तर प्रचितीचे बोलणे होते.

समाजाची मानसिकता समजून घेत त्यांना प्रेमाने समजावत उपदेश करण्यासाठी दासबोधासारखा ग्रंथ तर समर्थांनी लिहिलाच पण त्यासोबत सामान्य माणसाला सहज उमगतील असे मनाचे श्लोक लिहिले. सुरेख अशा विविध आरत्या लिहिल्या. गावोगावी कीर्तने, प्रवचने दिली. अंगचे कलागुण विकसित करतांनाच लोकांनी शक्तीची उपासना करावी आणि स्वतः देशासाठी कार्यरत व्हावे यासाठी सदैव प्रोत्साहित केले. आयुष्यभर इतके सारे काम करताना लोकांकडून स्वतःसाठी कोणतीही गोष्ट घेतली नाही. डोंगरात, गुहेत, मंदिरात राहून आयुष्यभर फक्त जनकल्याणाचा विचार केला. समर्थांचा सर्वात विशेष गुण म्हणजे ते पोकळ तत्त्वज्ञान न सांगता अनुभवसिद्ध असे मत कळकळीने सांगत राहतात. त्यामुळे ते मनावर ठसते. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर, “हे तो प्रचितीचे बोलणे । आधीं केलें मग सांगितले।!
माणसाला नरजन्म वारंवार मिळत नाही या जन्मी असे काही भव्य दिव्य काम करावे ही प्रेरणा इतरांना देताना ते तसेच जगून दाखवतात.
आज देशातच नव्हे तर परदेशात देखील समर्थांचे साहित्य अभ्यासले जाते. लोक त्यातून प्रेरणा घेतात. माणसाने कर्तृत्ववान व्हावे कारण माणसे देहरुपाने नष्ट झाली तरी आपल्या कार्यामुळे अजरामर होतात. त्यापासून स्फूर्ती घेत नवनवीन माणसे उभी रहातात. देश पुढे जात राहतो.
आपल्या जगण्यातून हेच सिद्ध केलेल्या समर्थांची “देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी....” ही ओळ म्हणूनच फार महत्वाची ठरते. प्रेरणास्त्रोत बनून राहते.
-सुधांशु नाईक (९८३३२९९७९१)🌿

Friday 1 March 2024

सातत्य

मना सज्जना...भाग : 18 : सातत्य
- सुधांशु नाईक
शुक्रवार ०१/०३/२४
शिवाजी पार्कचे ते मैदान. तीन स्टंप रोवलेले. त्यावर एक नाणे ठेवलेले. एक मुलगा फलंदाजीचा सराव करतोय. कितीतरी वेळ ते सुरु असतं. जेंव्हा सत्र संपते, तोवर ते नाणे तसेच असते. एकदाही त्याने आपले स्टंप पडू दिलेले नसतात. एकदाही त्याला चुकवून बॉल स्टंपवर आदळत नाही. सराव संपतो. त्याचे गुरु समाधानाने पुढे येतात, स्टंपवरचे ते नाणे उचलतात आणि त्या मुलाला बक्षीस देतात. अनेकदा असा सराव होत राहतो आणि त्या मुलाकडे नाणी जमा होत राहतात. त्या गुरुचे नाव असते रमाकांत आचरेकर आणि तो मुलगा म्हणजे अर्थातच तुमचा आमचा आवडता खेळाडू सचिन तेंडुलकर. आपल्या आयुष्यातील अनेक क्षण आजही जपणाऱ्या सचिनने ती नाणी जपून ठेवली आहेत...! सचिन खेळताना एखादा फटका असा काही मारायचा की अवघे स्टेडियम टाळ्यांच्या कडकडाटात दुमदुमून जात असे. असे सिद्धहस्त होण्यासाठी अचूक प्रयत्न तर लागतातच पण त्यापेक्षा महत्वाचे ठरते ते सातत्य.
तुम्ही जंगलात फिरायला जाताना किंवा अगदी घराच्या आसपास सुद्धा परिसर निरखून पहाता ना? लहानसहान प्राणी पक्षी नित्यनेमाने काहीतरी करत असतात. अगदी क्षुल्लक भासणारा एखादा कोळी आपले जाळे विणत असतो. त्यावेळी तुम्ही कधी त्याचे निरीक्षण केले आहे का? कित्येकदा त्याचा धागा तुटतो, कधी त्यात काही अडथळे येतात मात्र तो हार मानत नाही. नेटाने आपले जाळे पूर्ण करतो. कोळ्याने बनवलेले ते जाळे नुसते पाहत राहायला देखील किती सुंदर भासते कारण त्याला त्याच्या श्रमाचा, सातत्याचा परीसस्पर्श झालेला असतो.
कित्येक शास्त्रज्ञ संशोधन करत असतात. कुणी एखादे उपकरण बनवायचा प्रयत्न करत असतो तर कुणी एखादे औषध. त्यांना हवे तसे निष्कर्ष मिळायला कित्येकदा काही आठवडे जातात तर कधी कित्येक वर्षे. मात्र ते सातत्याने प्रयत्न करतच राहतात. त्यानंतर जेंव्हा यश मिळते त्या यशाची चव अवर्णनीय असते. आपण कोणतेही काम करू गेलो की अडथळे येतात, आळस येतो, औदासिन्य येते, आणि ठरवलेल्या गोष्टीतील सातत्य खंडित होते. अभ्यास, खेळ, कलेची साधना या सगळ्यात असा खंड पडला की आपण पुन्हा शून्यावर येऊन पोचतो. तिथून पुन्हा उठून पुढे जाता यायला हवे.
आपले ध्येय गाठण्यासाठी पुन्हा भरारी घेता यायला हवी. आपल्याच मनाला आलेली मरगळ झुगारून देता यायला हवी. जेंव्हा सातत्याने आपण असे स्वतःला नव्याने बळ देत राहू तेंव्हा प्रगतीची नवनवीन क्षितिजे आपल्याला नव्याने जाणवू लागतील हे नक्की.
- सुधांशु नाईक(9833299791)🌿

Saturday 24 February 2024

अहंकार

मना सज्जना...भाग : 17 : अहंकार
सुधांशु नाईक
शनिवार 24/02/24
आपल्या प्रगतीच्या आड ज्या अनेक गोष्टी येतात त्यातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे अहंकार. आपले रूप, आपले अक्षर, आपली संपत्ती, आपली बुद्धी, आपले एखादे कौशल्य अशा कोणत्याही गोष्टीचा जेंव्हा अहंकार निर्माण होतो तेंव्हा त्या माणसाची अधोगती होण्याची ती सुरुवात असते असे खुशाल समजावे.
प्राचीन पुराणकथा घेतल्या तरी रावण, हिरण्यकश्यपू, गजेंद्र हा हत्ती अशा कित्येकांच्या अहंकाराच्या कहाण्या आपण आजवर ऐकत आलो आहोत. तुम्ही कोणत्या जातीत-कोणत्या धर्मात जन्म घेतलाय याचा अहंकारांशी काही संबंध नसतो. मात्र जेंव्हा अहंकार निर्माण होतो तेंव्हा आपल्या अंगी असलेले ते कौशल्य, ते गुण पूर्ण झाकोळून जातात हे मात्र खरे. एकदा का अहंकार निर्माण झाला की आपल्याच विचारांवर त्याचा पडदा तयार होतो. आपल्या चुका, आपले अज्ञान आपल्याला उमगेनासे होते. कुणी जाणतेपणाने काही सुचवले, उपदेश केला तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. सगळे काही मला समजते या अहंकारामुळे मग नवीन गोष्टी शिकणे तर दूरच राहते मात्र जे कलागुण आपल्या अंगी होते त्याचीही माती होऊन जाते.
अहंकार अमुक एका वयात निर्माण होतो असे नाही. अगदी चौथी पाचवीतील एखादा लहान मुलगा सुद्धा माझे पेन, माझा डबा किंवा माझी वही सगळ्यात भारी असा अहंकार उराशी घेऊन फिरताना दिसू शकतो. केवळ वस्तूच नव्हे तर आपले रूप, आपली भाषा, आपले मत याबद्दल देखील माणसांना अहंकार उत्पन्न होतो. पुढे त्याचे रूपांतर गर्वात होते. अहंकार आणि गर्व या दोन गोष्टी पुढे जाऊन मग आपल्याच नाशाला करणीभूत ठरतात. रावणाचेच उदाहरण घेऊया ना. ब्राह्मण घरातील, विद्यावान आणि पराक्रमी असा रावण. मात्र त्याला झालेल्या अहंकारामुळे त्याने सर्व देवांना बंदी बनवले. ऋषि-मुनिना त्रास देऊ लागला. सीतेला जबरदस्तीने उचलून नेण्याइतका तो अध:पतित झाला आणि शेवटी मारला गेला. मनाच्या श्लोकात समर्थ किती सहजपणे हे सांगून जातात;
मना सांग पा रावणा काय झाले,
अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले,
म्हणोनि कुडी वासना सांडी वेगी,
बळे लागला काळ हा पाठीलागी....
आपल्याला कधीच अहंकाराचा वारा लागू नये म्हणून तर तुकाराम महाराज “लहानपण दे गा देवा” असे म्हणतात. सर्वांशी नम्रतेने वागायला फार कष्ट घ्यावे लागत नाहीत. मात्र त्यासाठी अहंकार त्यागावा लागतो हे मात्र खरे.
- सुधांशु नाईक(9833299791)🌿

Friday 23 February 2024

शिकवण

मना सज्जना...भाग 16: शिकवण 
- सुधांशु नाईक
शुक्रवार 23/02/24
अवघे आयुष्यभर आपल्याला सदैव सोबत करणारी एक गोष्ट म्हणजे शिक्षण. असे म्हणतात की आपण जन्मभर विद्यार्थीच असतो. लहानपणापासून भाषा शिकतो, रीतीरिवाज शिकतो, बोलावे कसे, चालावे कसे, लिहावे कसे, वागावे कसे हे सारे शिकतच असतो. आपले वय जसे वाढते तसे आजूबाजूचे जग देखील बदलते. तंत्रज्ञान बदलते. हे सारे पुनःपुन्हा आपल्याला आत्मसात करत राहावे लागते. शाळा,कॉलेज यामधून उपजीविकेसाठी घेतले जाणारे शिक्षण तर अपरिहार्य असते. शिकावे कसे आणि शिकवावे कसे हे सांगणारे देखील अभ्यासक्रम आपल्याला शिकावे लागतात हे किती गमतीशीर आहे ना ?
मानवी मन हे मुळात चंचल असते. त्याला एखादी गोष्ट शिकवण्यासाठी किती यातायात करावी लागते हे अनेक अभ्यासक्रमातून आपल्याला पाहायला मिळते. अक्षरश: प्रसंगी आमिष दाखवून, प्रसंगी दरडावून आपल्याला एखादी गोष्ट स्वतःच्याच मनाला शिकवावी लागते. तीच तऱ्हा दुसऱ्याला शिकवण्याची. इथे तर समोरच्याच्या मनाचा कल आधी अजमावा लागतो. विद्यार्थ्याना हवीशी गोष्ट त्यांच्या गळी उतरवणे प्रसंगी सोपे असते मात्र कठीण किंवा नीरस वाटणाऱ्या गोष्टी ज्याना सहजपणे शिकता आणि शिकवता येतात त्यांना शिक्षण प्रक्रिया उमगली आहे असे म्हणावेसे वाटते.
एखाद्या शाळेतील वर्गात आपण गेलो तरी किती प्रकारची मुलं आपल्याला दिसतात. शांत,दंगा करणारी, लाजाळू, आगावू, भांडकुदळ, भित्री अशा मुलांना आधी ओळखण्यातच आपले कित्येक दिवस जातात. मग त्यांना शिकवावे लागते.

एकाच पध्दतीने सर्वाना शिकवता येत नाही. त्यातही वाईट सवयी जितक्या चटकन मुलांना लागतात तितक्या प्रमाणात चांगल्या सवयी लागत नाहीत. त्यामुळे लहान असो वा मोठी व्यक्ती, त्यांना चांगल्या सवयी लावण्यासाठी नेटाने प्रयत्न करणे अत्यावश्यक ठरते.
शाळा-कॉलेजमधील अभ्यास तर बऱ्यापैकी घडत राहतो मात्र उत्तम नागरिक कसे बनावे यासाठी पालक आणि शिक्षक यांनी विशिष्ट मुद्दे घेऊन जर शिकवण दिली तर समाजात उत्तम नागरिक घडू शकतात. एखाद्या मुलाला किंवा व्यक्तीला शिकवणे तुलनेने सोपे असते मात्र समूहाला शिकवणे अवघड असते.
म्हणून तर समर्थ म्हणतात,
मुलाचे चालीने चालावे,
मुलाच्या मनोगते बोलावे,
तैसे जनास सिकवावे, हळूहळू ||
जेंव्हा अशी उत्तम शिकवण मिळालेले नागरिक सर्वत्र वाढतील तेंव्हा आपले जगणे अधिक सुंदर होईल असे मला वाटते.
-सुधांशु नाईक(9833299791)🌿

Saturday 17 February 2024

यू टर्न

मना सज्जना...भाग 14: यू टर्न
सुधांशु नाईक
शनिवार 17/02/24
आपल्या मनाची जडणघडण विविध प्रकारे होत असते. आई वडील, गुरुजन आदि ज्येष्ठ व्यक्तींनी केलेले मार्गदर्शन, आपल्या लहानपणापासून घेतलेले अनुभव, आपले शिक्षण, आसपासच्या लोकांचे, समाजाचे आपण केलेलं निरीक्षण आदि गोष्टीमुळे आपली एक धारणा बनलेली असते. अमुक एक गोष्ट घडली तर आपण कसे वागावे, कसे बोलावे याबाबत आपल्या मनाचे कंडीशनिंग झालेलं असते. त्यामुळे कित्येकदा असे घडते की कुणी कितीही काही सांगितले तरी आपल्याकडून पुन्हा पुन्हा तेच आणि तसेच घडत राहते. एखादे काम करायला मोठ्या उत्साहात सरसावून जाणारी माणसे काही वेळातच पुन्हा माघारी येतात. किंवा त्याच त्याच चौकटीत गोलगोल फिरत राहतात. “अरुन फिरून गंगावेस...”, “फिरून फिरून भोपळे चौक...” “ये रे माझ्या मागल्या..” असे वाक्प्रचार लोकांच्या या वागण्यामुळे निर्माण झाले आहेत. असे का घडते? त्याचे मुख्य कारण म्हणजे असुरक्षित वाटणे.
आपण आपले कम्फर्ट झोन सोडायला अनेकदा तयार नसतो. त्यामुळे एखाद्या क्षणी भारावून जाऊन आपण काहीतरी कृती करायला जरूर तयार होतो मात्र अर्ध्या वाटेवर जाताना ज्या क्षणी आपल्याला भीती वाटते, असुरक्षित वाटते, स्वतःचा आत्मविश्वास डळमळीत झाल्यासारखे वाटते तेंव्हा आपण पटकन यू टर्न मारून आहोत तिथे परत येतो. अशा वेळी स्वतःचे पूर्ण निरीक्षण आणि परीक्षण करणे गरजेचे असते.
आपण जी कृती करायची ठरवली त्यातील खाचखळगे, त्यातील अडचणी, त्यातील बऱ्यावाईट गोष्टी यांचा नीट अभ्यास जर आपण केला असेल तर असे यू टर्न मारायची वेळ शक्यतो येत नाही. आपल्या मनात अनेक विचार येत असतात. नवनव्या कल्पना आपल्याला भुरळ घालत असतात. अशावेळी त्या कल्पना किंवा स्वप्नांना सत्यात आणायचे असेल तर प्राक्टिकल विचार अमलात आणावे लागतात. मग ते अभ्यास करणे असो, एखादा व्यवसाय उभा करणे असो किंवा नोकरीतील कामे. इतकच नव्हे तर नातेसंबंध, घराचे व्यवस्थापन, आर्थिक नियोजन अशा सगळ्या गोष्टीबाबत “यू टर्न” घ्यावा लागणे जितके टाळता येईल तितके बरे असते. त्यासाठी त्या वाटेवर चालायला सुरुवात करण्यापूर्वी अधिकाधिक बारकाईने नियोजन करणे, येणाऱ्या अडचणींचा अंदाज घेऊन आपले risk management नियोजन तयार ठेवणे क्रमप्राप्त ठरते.
जेंव्हा एखाद्या ध्येयाने प्रेरित होऊन आपण वाटचाल करतो तेंव्हा त्यात शक्यतो माघार घ्यायला लागू नये. मात्र तरीही कधीतरी एखादी वाईट वेळ येतेच.

प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या आयुष्यात देखील पुरंदरच्या तहासारखी वेळ आली होती. जिथे बहुतांश स्वराज्य शत्रूला द्यावे लागणार होते. त्याही वेळी महाराजांनी अधिक चतुराईने हालचाली केल्या आणि ती माघार अशा प्रकारे घेतली की पुन्हा नव्याने भरारी घेण्यासाठी कधीही सज्ज होता येईल. आपल्यालाही आपल्या लहानमोठ्या कामात तसेच वागण्याचा प्रयत्न करायला हवा म्हणजे अपयश, पराभव यांच्यासारखे क्षण येऊन यू टर्न घ्यावा लागणार नाही.
- सुधांशु नाईक(9833299791)🌿

Friday 16 February 2024

द्विधा मनस्थिती

मना सज्जना...भाग 13: द्विधा मनस्थिती ...
- सुधांशु नाईक
शुक्रवार 16/02/24
आपल्या मनाशी ठरवलेले कार्य आपण करायचे ठरवले की त्यात स्वतःच आपण विविध अडचणी तयार करतो. आपल्या वर्तणुकीमुळे कित्येकदा ठरवलेले नियोजन फिसकटते. त्यासाठी कधी आळस कारणीभूत असतो तर कधी आपली मनस्थिती. कोणतेही महत्वाचे काम करण्यासाठी पूरेपर नियोजन आणि एकाग्रता जशी महत्वाची असते तसेच महत्वाचे आहे ते म्हणजे आपली मनस्थिती द्विधा नसणे. आपल्या आसपास वावरणाऱ्या व्यक्तीमधील एखादी व्यक्ती तरी अशीच द्विधा मनस्थिती असणारी असते.
माझे एक जवळचे नातेवाईक असेच होते. कोणत्याही गोष्टीत त्यांची द्विधा मनस्थिती असायची. जेवायला बसले तरी पोळी आधी खायची की भात आधी खायचा, अशा अनेक छोट्या मोठ्या प्रश्नात ते गुंतून जात. कामाच्या ठिकाणी पण हाच गोंधळ सुरु असे. त्यामुळे लहान मोठे निर्णय घेण्यात उशीर होत असे. कित्येकदा योग्य निर्णय खूप उशिरा घेतला जाई त्यामुळे त्याचा फायदा दिसत नसे. अशी कितीतरी माणसे आपण आसपास पाहतो. आपली द्विधा मनस्थिती का होते यावर खरच गांभीर्याने विचार करायला हवा.
द्विधा मनस्थितीची मुख्य कारणे बरीच आहेत. लहानपणी पाहिलेले, अनुभवलेले काहीतरी हा सगळ्यात महत्वाचा भाग. त्यामुळे माणूस बुजरा होऊ शकतो आणि आक्रमकदेखील. आपण नीट काम करू शकत नाही असे स्वतःला वाटत असेल किंवा मग इतरानी सतत तसे ऐकवले असेल तर मग सतत आपण निवडलेला पर्याय चूक तर नाही यासाठी अधिक विचार केला जातो. आणि मोक्याच्या क्षणी चुकीचा पर्याय निवडला जाऊ शकतो. कित्येकदा अतिविचार करणारी माणसे द्विधा मनोवृत्तीत सापडलेली दिसतात. नुसत्या विचार करत बसण्याच्या नादात कृती करायची वेळ निघून जाते.
कित्येकदा परिस्थिती स्वीकारायची तयारी नसली तरीही माणसे द्विधा मनस्थितीत सापडतात. नेमके काय करायला हवे हे माहिती असूनही इतर पर्याय शोधत बसतात. वेळेवर निर्णय न घेतल्याने मग खर्च जास्त करावा लागणे, वेळेत काम पूर्ण करता न येणे, प्रसंगी अपयशी ठरणे आदि गोष्टीना सामोरे जावे लागते. द्विधा मनस्थिती ही सर्व वयोगटातील माणसांना सतावते. अगदी पारमार्थिक कार्यात, योगविद्या, तपाचरण करणाऱ्या लोकांना देखील याचा त्रास होतो. नेमके भजन कसे करावे, कोणत्या पद्धतीने करावे, कुणाचे ऐकावे हे सगळं उमगेनासे होते. मन गोंधळून जाते. आणि जेंव्हा मन गोंधळते तेंव्हा हमखास चुका करते.
आपण तर सामान्य माणसे. समर्थ रामदासांसारखा विरागी योगीसुद्धा म्हणतो,
सुख सुख म्हणतां हे दुःख ठाकूनी आले ।
भजन सकळ गेले चित्त दुश्चित जाले ।
भ्रमित मन कळेना हीत ते आकळेना ।
परम कठिण देही देहबुद्धी वळेना ॥
द्विधा मनस्थिती म्हणजे चित्त दुश्चित झाले की आपण मूळ विचारापासून, ध्येयापासून भरकटत जाणे सहज घडते. एखाद्या योग्यासाठी, एखाद्या व्यवसायासाठी असे भरकटत जाणे म्हणजे जणू पुन्हा शून्यवत होणे असते. त्यामुळे ज्याला आयुष्यात खूप काही करून दाखवायचे असते त्याने या मनोवृत्तीवर विजय मिळवणे अपरिहार्य ठरते.
- सुधांशु नाईक(9833299791)🌿

Saturday 10 February 2024

परोपकार

मना सज्जना...भाग : 11: परोपकार..
सुधांशु नाईक
शनिवार 10/02/24
आपण माणसे बहुतेकवेळा स्वतःचा जास्त विचार करतो. मात्र दुसऱ्याच्या हिताचा विचार करणे, त्यासाठी प्रसंगी आपला वेळ, आपली शक्ती खर्च करणे हे आपल्यातील माणुसकी जिवंत असल्याचे लक्षण आहे. परोपकार किंवा दुसऱ्याला सहकार्य करत राहण्याची सवय ही लहानपणापासून अंगी बाणवायला हवी. परोपकार करण्याविषयी समर्थ म्हणतात,
शरीर परोपकारी लावावे,
बहुतांच्या कार्यास यावे,
उणे पडो नेदावे,
कोणीएकाचे !
परोपकार करण्यासाठी खूप मोठी धनसंपत्ती सोबत असायला हवी असे नाही. समोरच्या व्यक्तीची गरज ओळखून त्याला सहकार्य करणे, त्या व्यक्तीला त्याचा इच्छित मार्ग मिळावा यासाठी कृतीशील वर्तणूक ठेवणे हा देखील परोपकारच आहे.
आपले शरीर, आपल्या इच्छा, आपली स्वप्ने, आपले कुटुंबीय यांच्यासाठी सगळेच येनकेन प्रकारे प्रयत्न करत असतात. पण आपल्या सामान्य परिघाबाहेर असणाऱ्या व्यक्ती, प्राणी-पक्षी-वृक्षराजी यांनी भरलेले विश्व या सगळ्याचा विचार आपल्याला करता यायला हवा. मुळात असा विचार करण्याचे संस्कार हे पालकातून मुलांच्यात आपोआप येतात ही जाणीव निर्माण व्हायला हवी.
लहानपणी घरी आई स्वयंपाक करत असताना, भर दुपारी दाराशी एखादा बैरागी, एखादा गरीब माणूस येतो. आई पटकन एक भाकरी आणि त्यासोबत थोडी भाजी, एखादी चटणी एका पानावर घेते. लहान मुलाला सांगते, “बाळ, जरा त्या बुवाला हे एवढे खायला दे रे..” लहान मूल त्याला खायला देते. त्या व्यक्तीच्या चेहेऱ्यावर लगेच एक समाधान विलसू लागते. भुकेलेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी द्यावे हा विचार त्याच्या कृतीत भिनतो.
शाळेत, कॉलेजमध्ये शिकत असताना, नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी आपल्या आसपास काहीजण असे दिसतात की ते बिकट परिस्थितीतून वाटचाल करत आहेत. अंगी असलेल्या स्वाभिमानामुळे कदाचित ते मदत मागणार नाहीत, पण ते ओळखून आपल्याला सहकार्याचा हात पुढे करता यायला हवा. एखादी उपयुक्त वस्तू, वह्या-पुस्तके, हॉस्टेलची फी अशी लहानमोठी मदत न मागता आपल्याला करता यायला हवी. एखाद्याला एखादी गोष्ट जमत नसेल तर ती शिकवता यायला हवी.
एखाद्याला शारीरिक दुर्बलतेमुळे काही काम करणे नीट जमत नसेल तर कित्येकदा लोक त्याची टिंगल करतात. त्याऐवजी त्याला हातभार लावायला हवा. एखाद्या कलाकाराला प्रसंगी स्टेज मिळवून द्यावे, एखाद्या गरजावंत व्यक्तीला नोकरी मिळवून द्यावी अशी जी जी लहानमोठी कृती आपण करतो यामुळे माणूस माणसाशी जोडला जातो. नातेसंबंध हृद्य बनतात. "पुण्य परउपकार... पाप ते परपीडा.. " असं म्हणूनच तर तुकोबा सांगून गेले आहेत. परोपकार करणाऱ्या व्यक्ती उत्तमगुणी मानल्या जातात. आपण उत्तमगुणी व्हावे असे कुणालाही वाटतेच. बरोबर ना?
- सुधांशु नाईक(9833299791)🌿

Friday 9 February 2024

नियोजन!

मना सज्जना...भाग 12: नियोजन 
सुधांशु नाईक
शुक्रवार 09/02/24
आपल्या मनाला स्वस्थता जर हवी असेल तर ज्या महत्वाच्या गोष्टी आपल्या जगण्याचा भाग बनायला हव्यात त्यातील नियोजन ही एक अग्रगण्य गोष्ट. ध्येय आणि ते साध्य करण्यासाठीची कृती यातील महत्वाचा दुवा म्हणजे नियोजन. नियोजन आणि दूरदृष्टीसाठी समर्थ रामदास दीर्घसूचना असा शब्द दासबोधात वापरतात. एके ठिकाणी ते म्हणतात;
म्हणौन असावी दीर्घ सूचना | अखंड करावी चाळणा |
पुढील होणार अनुमाना | आणून सोडावें ||
भविष्यात काय घडेल याचा अंदाज घेऊन योग्य ते नियोजन करावे, विविध कामाची आखणी करावी, अनेक लोक जोडून घ्यावेत, त्यांच्या कुवतीनुसार काम द्यावे असे सगळे केले तर त्यानुसार कार्य सिद्धीस जाते असे समर्थांना वाटते.
 ज्या व्यक्तीना योग्य नियोजन करता येते ते कायमच त्यांच्या बहुतेकशा कामात यशस्वी होतात. प्रत्येकवेळी यश मिळेलच असे नव्हे पण योग्य नियोजन केले तर आपल्याला विविध चुका टाळता येतात. प्रसंगी ज्यातून नुकसान होत आहे असे जाणवते ते निर्णय बदलण्यासाठी आपण आधीच नियोजन केलेले असल्याचा फायदा मिळतो. नियोजन आणि दूरदृष्टी या जणू हातात हात घालून येणाऱ्या गोष्टी. भविष्यातील कामाकडे असे पाहता यायला हवे. आजच्या काळात ज्याला risk mitigating planning म्हणतात ते करता यायला हवे. आणि हे सर्व क्षेत्रात जरुरीचे आहे. ज्यांना हे सारे जमते त्यांच्या कृती यशस्वी होण्याची जास्त शक्यता असते. म्हणून समर्थ दुसऱ्या ठिकाणी लिहितात;
दीर्घ सूचना आधी कळे । सावधपणे तर्क प्रबळे । 
जाणजाणोनि निवळे । यथायोग्य ।।
ते किंवा सध्याच्या काळातील विविध लहानमोठे मानेजमेंट गुरु हे प्लानिंग किंवा नियोजनासाठी कायमच प्राधान्य देताना दिसतात. मुळात प्लानिंग किंवा नियोजनाची सवय लहानपणापासून लावावी लागते तर ती पुढे आयुष्यभर अंगी टिकून राहते.
 शाळेत जायचं असेल तर आपले दप्तर, पाण्याची बाटली, वेलापत्रकानुसार वह्या पुस्तके घेणे हे सगळे लहान मुलांना त्या वयात शिकवले पाहिजे. तिथपासून मोठ्या माणसांची घरची आणि कार्यालयीन कामे या सगळ्यासाठी अशा सवयी अंगी बाणवणे गरजेचेच. परगावी जायचे असेल तर किती वाजता उठावे, किती वाजता जावे हे सारे आपण कसे करतो, रोजच्या कामाचे आपण कसे नियोजन करतो, आपण ऐनवेळी धावपळ करतो का, आपण आपली कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी नेमके काय करतो इत्यादी इत्यादी गोष्टी मुले पाहत असतात. त्यांना हे असे अप्रत्यक्ष शिक्षण आपल्याकडून मिळायला हवे.
 तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असला तरी नियोजनबद्ध केलेले काम हे यशस्वी होण्याची शक्यता अधिकाधिक असते हेच खरे. 
- सुधांशु नाईक(9833299791)🌿

Saturday 3 February 2024

मृदुवचने बोलत जावे...

मना सज्जना...भाग : 10
मृदुवचने बोलत जावे..
सुधांशु नाईक
शनिवार 03/02/24
जन्म झाल्यापासून काही दिवसात माणसाचे बोलणे सुरू होते. प्रत्येक प्राणी त्याच्या विशिष्ट भाषेत बोलत असला तरी माणसाला जे बोलता येते ती देणगी फारच मोलाची आहे असे मला वाटते. आपल्या मनातील भावना, आपले विचार, एखाद्या गोष्टीला दिलेले उत्तर, हे सारे आपल्याला व्यक्त करता येते हे किती आश्वासक आहे. माणसाला बोलता यायला लागल्यावर विविध भाषा तयार झाल्या. त्याच्या लिपी तयार झाल्या. फक्त मौखिक अशा भाषा आणि लिपीबद्ध झालेल्या भाषा यांच्यात फरक असला तरी हजारो भाषा आज जगभर बोलल्या जातात. त्या त्या भाषेत अफाट असे शब्दभांडार आपणच हजारो वर्षात निर्माण करून ठेवले आहे. संवादाची भाषा, लिखित प्रमाणित भाषा असे भाषेचे वर्गीकरण असले तरी “मनापासून साधलेला संवाद” सर्वश्रेष्ठ ठरेल हे नक्की.
प्रेमाची भाषा बोलायला लिपी लागत नाही. ते सारे हृदयापासून त्या हृदयापर्यन्त पोचणारे बोलणे असते.
एका शब्दाखातर दोन माणसे, दोन समूह जोडले जातात तर एखाद्या वाक्यासाठी प्रसंगी मोठमोठी युद्धे घडतात. क्रोध, मोह, मत्सर यांच्यापायी आपण कित्येकदा कठोर बोलतो. समोरच्याला त्यामुळे किती वेदना झाली असेल याचा विचार भावनेच्या भरात बोलताना लक्षात येत नाही.
प्रसंगी एखाद्याची चूक दाखवून देतानादेखील आपल्याला शांत आणि प्रेमाने बोलता यायला हवे. “पेरिले ते उगवते.. बोलण्यासारखे उत्तर येते..” हे आपल्याला माहिती असते तरी आपण का कठोर बोलतो याचा विचार व्हायला हवा. आपले कठोर बोलणे, शिव्या देणे, दुसऱ्यावर संशय घेऊन त्याला दूषणे देणे हे सारे प्रयत्नपूर्वक टाळायला हवे. कमी करत न्यायला हवे.
एकाने कटू शब्द उच्चारले की आपण तसे वागणे हे साहजिकच. मात्र त्यामुळे आपण सुसंस्कारित असल्याचे वेगळेपण ते मग काय उरले हे आपल्याला जाणवले पाहिजे. आपल्याला एखाद्याने शिव्या दिल्या, दूषणे दिली, आपल्यावर आरडाओरडा केला की आपण दुःखी होतो मग आपण असे वागणे टाळायला हवे. अगदी हेच समर्थ दासबोधात सांगताना दिसतात, ते म्हणतात,
कठीण शाब्दे वाईट वाटते, हे तो प्रत्ययास येते
तरी मग वाईट बोलावे ते, काय निमित्त्ये..
आपणास चिमोटा घेतला, तेणे कासावीस झाला
आपणावरून दुसऱ्याला, राखीत जावे..
म्हणूनच कटू न बोलता यापुढे आपण अधिकाधिक मृदुवचने बोलत जाऊ असे आता ठरवायला हवे. तुम्हाला काय वाटते?
- सुधांशु नाईक(9833299791)🌿

Friday 2 February 2024

उत्तम श्रोते होऊया...

मना सज्जना...भाग : 09
उत्तम श्रोते होऊया..
- सुधांशु नाईक
शुक्रवार 02/02/24
रोजच्या व्यावहारिक आयुष्यात आपण खूप गोष्टी करत राहतो. त्यासाठी समाजात वावरावे लागते. आपली इच्छा असो वा नसो, अनेकांशी चर्चा करावी लागते. काम करावे लागते, काम करवून घ्यावे लागते. प्रत्येक वेळी होणारे संभाषण हे आपल्याला रुचेल, हवे असेल तसेच असेल असे घडत नाही. कित्येकदा असे घडते की समोरची व्यक्ती आपल्याला काय नेमकं सांगायचे आहे ते समजून न घेताच बोलत राहते. आपल्या मनाने ती व्यक्ती विविध अर्थ काढत राहते आणि मग आपलेच मन अस्वस्थ होऊन जाते. कित्येकदा पूर्ण अभ्यास न करताही माणसे बोलत राहतात. त्यामुळे मॅनेजमेंटच्या क्षेत्रात, शिक्षणक्षेत्रात आणि समुपदेशन क्षेत्रात श्रोता होणे फार गरजेचे ठरते.
उत्तम श्रोता होणे हे फार मोठे कौशल्य आहे. A Good listener gains half of the knowledge by careful listening while other half can be gained by deep thinking process असे म्हणतात. आपल्या संस्कृतीतदेखील उत्तम श्रवण, मनन आणि चिंतन या गोष्टीना अतिशय महत्व दिले आहे. डॉक्टर, वकील, समुपदेशक, मानसोपचार तज्ञ आदि सर्वाना समोरच्या माणसाचे सारे काही नीट ऐकून घ्यावे लागते. कोणतीही गोष्ट समजून घेण्यासाठी शांतचित्ताने श्रवण करणे गरजेचे असते.
एकदा का आपण श्रोत्याची भूमिका स्वीकारली की समोरच्या व्यक्तीची भाषा, शब्द संग्रह, देहबोली, त्या विषयातील त्याचा अभ्यास हे सारे आपल्याला अधिक बारकाईने न्याहाळता येते, ऐकता येते. आपल्या मनातील शंका नष्ट होतात. नव्या ज्ञानाकडे मन चटकन वळते.
एखाद्या क्षणी ऐकलेला एक उत्तम विचार आपले आयुष्य बदलायला कारणीभूत ठरतो. कधी तो विचार एखाद्या मित्राने सांगितलेला असतो, कधी शिक्षकानी सांगितलेला असतो तर कधी आई वडीलानी सांगितलेला असतो. अनेकदा लहानपणी ऐकलेली एखादी गोष्ट मनात कायमची ठसून जाते. कधी ती दानशूर शिबी राजाची असते, कधी राम-कृष्णाच्या पराक्रमाची असते, कधी एकमेकाना मदत करणाऱ्या मित्रांची असते. मन लावून आपण जे ऐकतो त्याचा मनावर खोलवर ठसा उमटतो आणि आपल्या आयुष्यावर त्याचा बरा वाईट परिणाम होतो.
अनेक ज्येष्ठ व्यक्तींची चरित्रे, मनोगते, भाषणे जेंव्हा आपण ऐकतो तेंव्हा लहानपणी ऐकलेली एखादी गोष्ट,एखाद्या व्यक्तीचे बोलणे याची आठवण सांगितलेली आहे हे लक्षात येते. उत्तम श्रोता झाल्याने आपलेच भले होते त्याची शेकडो उदाहरणे देता येतील. म्हणूनच समर्थ म्हणतात,
श्रवणे आशंका फिटे, श्रवणे संशय तुटे
श्रवण होता पालटे, पूर्वगुण आपुला .. ||7-8-5
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जे काही गुण अंगी बाणवावे लागतात त्यात “उत्तम श्रोता होणे” हा गुण नक्कीच समाविष्ट करायला हवा असे मला वाटते.
- सुधांशु नाईक(9833299791)🌿

Friday 26 January 2024

कार्यरत होऊया…!

मना सज्जना... भाग : 07
कार्यरत होऊया… 
- सुधांशु नाईक
शुक्रवार 26/01/24
आपल्या मनाची मोठी गंमत असते. जोवर आपण काही ना काही काम करत असतो तोवर मन अगदी गपगुमान असतं. बऱ्यापैकी एकाग्रतेने आपण आपली कामं करत असतो. मात्र जरा कुठं रिकामपणे बसलो, निवांत बसलो की मग मनात शेकडो विचार येत राहतात.
विविध माणसं, गावं, कित्येक आठवणी असं काय काय मनात पिंगा घालत राहतं. कुठून कुठली आठवण येईल आपल्याला हे काही सांगता येत नाही. कोणतं काम आठवेल हे सांगता येत नाही. विचारांच्या गलबल्यात मन अगदी पतंगसारखं हेलकावत राहते. म्हणूनच तर idle mind is devil's workshop..! असं इंग्रजीत किंवा “ रिकामं मन सैतानाचेच..” असं मराठीत म्हटलं जाते.
मनाला जितकं वेसण बांधायला जाऊ तितकं ते अधिकच उधळते असं अनेक तत्ववेत्ते, अध्यात्मिक जाणकार लोक सांगतात. मनाला उलटं मोकळं सोडा, मनात येणारे विचार तटस्थपणे पहायला शिका असं सांगितलं जातं. इतकं सोपं असतं का हे?
जेंव्हा मन रिकामं असतं तेंव्हा अशा मोहाना अधिक चटकन बळी पडत असावं. जेंव्हा आपण खूप कामात असतो तेंव्हा आपण म्हणतोच ना, “ अगदी तहान भूक विसरून गेलो बघ हे काम करताना…” पण तेच आपण अगदी रिकामे आहोत, आणि रस्त्यावरून जाताना एखाद्या गाडीवर कुणी गरमगरम वडा किंवा भजी तळत असेल तरी आपलं मन लालचावते. डाएट वगैरेची सगळी बंधने आपण काही दिवस फक्त पाळतो आणि असं दिसलं की पटकन वडापावची ऑर्डर देतो. वडापाव हे एक प्रातिनिधिक उदाहरण झालं. असे कितीतरी प्रकारचे मोह आपल्याला भुरळ घालत असतात.
जेंव्हा माणूस अशा मोहात अडकते तेंव्हा मग कामाकडे, अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ लागते. त्यामुळे घरात कुणी विद्यार्थी असेल तर त्याने इतकाच वेळ टीव्ही पाहावा इत्यादी बंधने घातली जातात.
समाजात देखील आपण पाहतो, जे तरुण भरपूर अभ्यासात रमले आहेत, जे तरुण नोकरी धंद्यात कष्ट करताहेत ते स्वतःची एक नवीन जागा निर्माण करून दाखवतात, त्याचवेळी काही रिकामटेकडे युवक मात्र गल्लीच्या तोंडाशी अचकट विचकट गप्पा मारत वेळ फुकट घालवतात. आज जगातील सगळ्यात जास्त युवाशक्ती आपल्या देशात आहे असं मानलं जाते. या सगळ्या युवशक्तीची मने विधायक विचाराने प्रेरित झाली तर अजून कितीतरी मोठे काम आपण करून दाखवू शकतो. मनाला विधायक कार्यात गुंतवले की स्वतः आणि इतरांसाठी देखील ते हितकारक असते हे माहिती असल्यामुळे समर्थ म्हणतात;
अखंड कामाची लगबग
उपासनेस लावावे जग
लोक समजोनी मग,
आज्ञा इच्छिती ||
आजच्या प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने अशा कार्यरत लोकांच्या झुंडीच्या झुंडी देशहित जपायला कार्यरत होवोत हीच प्रार्थना.
-सुधांशु नाईक(9833299791)🌿

Saturday 20 January 2024

प्रभाते मनी राम चिंतीत जावा...

मना सज्जना... भाग : 06
प्रभाते मनी राम चिंतीत जावा...
सुधांशु नाईक
शनिवार 20/01/24
अवघ्या दोन दिवसांवर देशात एक मोठी गोष्ट घडणार आहे. पुन्हा एकदा प्रभू रामचंद्राचे निर्माण झालेले मंदिर अयोध्येत सर्वांसाठी खुलं होत आहे. गेली पाच सहाशे वर्षे अनेकदा अयोध्येने परकीय आक्रमणे अनुभवली. प्रचंड विध्वन्स आणि रक्तरंजित इतिहास अनुभवला. आपलं स्वातंत्र्य, आपला धर्म जपायला हजारो लोकांनी प्राणार्पण केले होते. त्यातील अनेकांची नांवेही आपल्याला ठाऊक नाहीत. हे सगळं लोकांनी का केलं तर राम आपल्या मनात युगानुयुगे वसला आहे म्हणून.
इथला माणूस सकाळी उठला की एकमेकांना भेटताना राम राम म्हणायचा. इथला माणूस मरताना देखील राम राम म्हणायचा. इतकंच नव्हे तर कधी आपल्या आयुष्याचा, रोजच्या रुटीनचा कंटाळा आला तरी “सध्या जगण्यात राम उरला नाही..” असं म्हणायचा. राज्य कसं हवं तर रामाने केलं तसं सुखदायी हवं असं लोक कायम म्हणत आले. आणि हे काही 50,100 वर्षं घडलं नाहीये तर किमान 4 हजार वर्षं इथल्या लोकांनी राम असा मनाशी धरून ठेवला आहे. हे खूप विचार करण्यासारखे आहे.
राम का इतका पूजनीय आहे? आपण अगदी जवळचं माणूस असल्यासारखं रामाला एकेरी संबोधन का करतो? कारण रामाने सतत दुसऱ्याचा विचार केला. सर्व सामान्यांना सुख मिळावे याचा विचार केला. प्रसंगी आपले सुख बाजूला ठेवून त्याने इतरांचे मन राखायला मोठे त्याग केले. ऋषीं मुनींच्या पूजेत, यज्ञ यागात विघ्ने आणणाऱ्या अनेक राक्षसांचे पारिपत्य रामाने केले. पुन्हा राम कोणत्या मोहात अडकला नाही. स्वतःचेच राज्य इतरांना देणे असो किंवा जिंकलेला भाग स्वतःच्या उपभोगासाठी न वापरणे हे फार अवघड असते.
दुसऱ्यासाठी चंदनासारखं झिजणे सर्वांनाच जमत नाही. ज्याला जमतं तो रामासारखा पुरुषोत्तम होऊ शकतो. म्हणूनच समर्थ मनाचे श्लोक लोकांना शिकवताना म्हणतात,
मना चंदनाचे परी त्वा झिजावे
परी अंतरी सज्जना निववावे…
रामाने उदंड अभ्यास केला. शस्त्र आणि शास्त्रपारंगत असा राम सर्व थोर लोकांपुढे कायम नम्र राहिला. आईबाप, गुरुजन, सज्जन माणसे यांच्यापुढे राम सदैव नतमस्तक राहिला. लोकांच्या अडीअडचणीत मदतीला धावला. समाजातील नावाडी असो किंवा एखाद्या देशाचा राजा असो, रामासाठी सगळी माणसं समान होती. भेदभाव त्याने कधी केला नाही.
 रावणाने एकेकाळी सर्वत्र अहंकारी होऊन अनन्वित अत्याचार केले होते. अन्यायाच्या निवारणासाठी त्याने रावणाचा वध केला पण शत्रूच्या चांगल्या गुणांचाही आदर करणारा राम होता. रामाने बंधुता, पुत्र कर्तव्य, राजाचे कर्तव्य करताना कधीच दिरंगाई केली नाही. लोक कल्याणसाठी राम सदैव तत्पर राहिला म्हणून आज हजारो वर्षे प्रभू रामचंद्र म्हणून पूजनीय आहे. आईने सांगितलेल्या राम कृष्णाच्या गोष्टी ऐकून शिवाजी महाराजांच्यासारखं अनेकांनी स्फूर्ती घेतली. सतत कार्यतत्पर होऊन नवीन विश्व घडवून दाखवले.
म्हणूनच पुन्हा एकदा समर्थांच्या शब्दांचा आधार घेतं असं सांगावेसे वाटते, 
मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥
तुमच्या माझ्या सर्वांच्या आयुष्यात सदैव ‘राम’ असू दे हीच प्रार्थना! 
- सुधांशु नाईक(9833299791)🌿

Friday 19 January 2024

आधी कष्ट मग फळ…

मना सज्जना... भाग : 05
आधी कष्ट मग फळ…
- सुधांशु नाईक
शुक्रवार 19/01/24
आपले मन किती उदंड विचार करत असते ना? जणू तिन्ही लोकांत भरारी मारत असते मन. कधी कोणते विचार करेल आणि त्यानंतर कोणती कृती करायला आपल्याला भाग पाडेल हे कधीकधी सांगताही येत नाही. मनात विचार येतो म्हणजे तो मेंदूत विचार तयार होतो, त्याआधी किंवा नंतर विशिष्ट संप्रेरके स्त्रवतात, मेंदूत केमिकल लोचे होतात त्यामुळे शरीरातील अवयवांना आज्ञा मिळते वगैरे सगळं आता विज्ञानाने सिद्ध केले आहे.ते आपल्याला माहितीही असतं पण जेंव्हा एखादं काम करायची वेळ येते तेंव्हा आपण चटकन ते करायला सुरुवात करतोच असं नाही. 
उत्साह, निराशा, राग, मत्सर, लोभ आदि सगळ्या भावना आपल्या कृतिमध्ये अडसर ठरू शकतात हे शास्त्रज्ज्ञानी आणि प्राचीन काळात ऋषीं मुनी, संतांनी सांगितलं आहे. या सगळ्यांत एक महत्वाची एक गोष्ट त्यांनी नोंदवली ती म्हणजे कृती करण्यातील आळस.
आपण कितीदा ठरवतो की हे असं काही करूया, या दिवसापासून करूया.. इतकेच नव्हे तर मनात स्वप्नांचे इमले रचतो. शेखचिल्लीसारखी कित्येक स्वप्नं पहातो. कृतीची वेळ आली की मात्र आपल्याला कुणीतरी हे सगळं करून द्यावे असं वाटते. दरवेळी काही कारणे देऊन आपण कृती टाळतो. इतरांना दोष देतो. आपणच आळस करतो आहोत याकडे मात्र दुर्लक्ष करतो. मानसशास्त्रात त्याला “डिफेन्स मेकॅनिझम” म्हणतात. आपल्या हातून कृती होत नाही म्हणून इतरांना दोष देणे, परिस्थितीला दोष देणे आदि प्रकार त्यात केले जातात.
‘आळसे कार्यभाग नासतो…’ आदि सुविचार माहिती असले तरी अंगातला आळस झटकून टाकणे ही मोठी गोष्ट. ती चटकन घडत नाही. त्यातही आपल्याला कष्ट न करता आयते काहीतरी मिळावे ही अनेकदा आपली मानसिकता असते. कमी कष्टात भरपूर पगार देणारी नोकरी, अभ्यास न करता परीक्षेत पास होण्याची हमी हे सगळं आपल्याला हवं असतं. जेंव्हा आपण आळस झटकून टाकतो तेंव्हा आपल्याला समोर सगळं लख्ख दिसू लागतं.

आपल्याला जे काम करायचे आहे त्याचा नीट अभ्यास करणे, त्यासाठी नियोजन करणे आणि नियोजनानुसार कृती केली तर यश नक्की मिळू शकते. या देशात अनेक थोर राजे, उद्योजक निर्माण झाले. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीमधूनच वाटचाल केली. आधी अपार कष्ट केले, प्रसंगी कित्येकदा अपयशाचा धीराने सामना केला मग हळूहळू त्यांना त्यांची योग्य वाट सापडली.
 समर्थ तर 400 वर्षांपूर्वी सांगून गेलेत;
आधी कष्ट मग फळ, कष्टची नाही ते निरफळ |
साक्षेपेवीण केवळ, वृथापुष्ट ||

इंग्रजीत देखील work, work, work until you achieve your goal ! असं म्हटलं जातं. कर्तृत्ववान व्यक्तीसाठी नवनवीन डेस्टिनेशन सतत तयारच असतात. या देशातील तुम्ही, आम्ही सगळेच जेंव्हा कष्ट करू, कर्तृत्व दाखवू तेंव्हा त्याची फळे आपोआप फक्त आपल्यालाच नव्हे तर सम्पूर्ण समाजाला, देशाला नक्की मिळतील असं मला वाटते.
- सुधांशु नाईक(9833299791)🌿

Saturday 13 January 2024

मुलं आणि सामाजिक जाणीव

मना सज्जना... भाग : 04: मुलं आणि सामाजिक जाणीव 
- सुधांशु नाईक
शनिवार 13/01/24
काही दिवसापूर्वी मुलांसोबत फिरायला गेलो होतो. एका प्राचीन मंदिराचा तो नितांतसुंदर परिसर होता. चालता चालता लक्षात आलं की काही लोकांनी वेफर्सची पाकिटे, चॉकलेटचे व्रॅपर वगैरे इथं तिथं टाकलं आहे. पटकन मी एकेक उचलायला सुरुवात केली. मग आमच्या मुलांनीही कचरा उचलायला सुरुवात केली. ते पाहून इतर जे काही लोक आसपास होते त्यानी, त्यांच्या मुलांनीदेखील दिसेल तो कचरा उचलायला सुरुवात केली. पाहता पाहता अवघ्या 15,20 मिनिटात त्या प्राचीन मंदिराच्या परिसरातील सगळा कचरा उचलून बाहेर ठेवलेल्या पिंपात जमा झाला. ते पाहून तिथं जवळच बसून पाहणारे एक आजोबा पुढं आले. बाहेर टपरीवरून त्यांनी चॉकलेट आणली आणि सगळ्यांना बक्षीस म्हणून वाटली. त्याचवेळी “ आप ये चॉकलेट खाओ और उसका वो कव्हर मुझे वापस दो…” असं सांगून ते व्रॅपर स्वतः बाहेर नेऊन टाकले. आपण कचरा गोळा केला म्हणून या आजोबानी आपल्याला बक्षीस दिले याचा मुलांना खूप आनंद झाला.
एका छोट्याश्या कृतीमुळे मुलांना किती सहज संदेश गेला जो कदाचित मोठ्या व्याख्यानामुळेदेखील आचरणात आला नसता. आपलं घर आपण स्वच्छ ठेवतो मात्र आपल्या उंबऱ्याबाहेरचं जग देखील आपलंच आहे तेही स्वच्छ सुंदर राखायला हवं ही जाणीव मुलांमध्ये विकसित होणे खरंच खूप आवश्यक आहे.
लहान मुलं कायमच अनुकरणप्रिय असतात. जर आई किंवा वडील, रस्त्यावर चालत जाताना, कारमधून जाताना काही कचरा रस्त्यावर फेकत असतील तर मुलं तसंच वागणार ना? आपला मोठा दादा किंवा एखादा काका - मामा किंवा शाळेतले शिक्षक तंबाखू किंवा गुटखा खाऊन रस्त्यावर किंवा एखाद्या इमारतीच्या कोपऱ्यात पिचकारी मारताहेत हे जर मुलं पाहत असतील तर त्यांच्याकडून स्वच्छ राहणीमानाची अपेक्षा आपण कसं करणार? आपलं जग किती सुंदर आहे आणि ते अधिकाधिक सुंदर करणे, नीट जपणे ही आपलीच जबाबदारी आहे हे जेंव्हा आपल्या वागण्यातून, रोजच्या आपल्या लहानसहान कृतीमधून दिसत राहील तेंव्हाच मुलं आणि पुढील पिढ्या त्याचं अनुकरण करतील.
आज आपण अनेकदा किल्ल्यावर जातो, जुनी मंदिरे किंवा वास्तू पाहायला जातो तिथं नेमकं कसं फिरायला हवं, काय पाहायला हवं हे त्यांना आपण समजावून द्यायला हवं. स्वतःच घर आपण जसं स्वच्छ सुंदर ठेवायला धडपडतोय तसंच आपली गल्ली, आपला परिसर, आपलं गांव आणि आपला देश स्वच्छ सुंदर ठेवणं ही नुसतीच काळाची गरज नसून आपलंच कर्तव्य आहे ही सामाजिक जाणीव आधी आपल्या मनात रुजली तरच मुलांच्या मनात रुजणार आहे हे नक्की. तेंव्हा नवीन वर्षात आपल्या मुलांना, आसपासच्या तरुण पिढीला सामाजिक भान मनात जागृत करता यावे यासाठी तुम्हीही प्रयत्न करणार ना?
- सुधांशु नाईक(9833299791)🌿

Friday 12 January 2024

बालमन आणि आपण...

मना सज्जना... भाग : 03 बालमन आणि आपण
सुधांशु नाईक
शुक्रवार 12/01/24
आपण जेंव्हा लहान असतो तेंव्हा लवकर लवकर मोठे व्हावेसे वाटत असते. मोठे झाल्यावर मात्र " बालपणीचा काळ सुखाचा…" असे वाटू लागते. लहानपणापासून अंगात भिनलेल्या किंवा आपल्याला आवडलेल्या सवयी, वागण्याची तऱ्हा आयुष्यात बरेचदा तशीच रहाते. कारण मुख्यत: लहानपणी आपण निरीक्षणातून किंवा अनुकरणातून शिकत जातो.
लहानपणी आई बाबा, काका काकू, मावशी आत्या, आजी आजोबा, दादा ताई इत्यादी नातेवाईकांइतकेच काही शेजारी देखील आपल्या आसपास असतात. त्यांच्याबाबत काहीतरी घडलेलं किंवा पाहिलेलं बरोबर लक्षात रहाते. त्या अनुषंगाने आपल्या वागण्याचा प्रयत्न होत रहातो.
लहान मुलांचं विश्व वेगळंच असतं. त्यामुळे लहान मुलांना नेमकं काय हवं हे समजून घेता येण्यासाठी आपल्याला पण मुलात मूल होता यायला हवं. कित्येकदा नेमकं आपल्याला काय हवंय हे त्यांना काहीवेळा सांगता येत नाही पण त्यांचं आणि आपलं ट्युनिंग जमलं की खूप मनमोकळेपणाने ती वागू, बोलू लागतात. लहान मुलांचा विश्वास मिळवणे, तो टिकवून ठेवणे यासाठी प्रामुख्याने गरज असते ती निरीक्षण करण्याची. एखाद्या मुलाचे बारीक निरीक्षण करून त्याच्या आवडीनिवडीचा अंदाज घेऊन आपण त्याला योग्य छंदात गुंतवलं तर त्या मुलाला अधिक उत्साहाने रोजच्या विविध गोष्टी करता येतात. 
“ बच्चे मन के सच्चे…” असं गाण्यात जरी आपण म्हटलं तरी कित्येकदा मुलांना नीट हाताळले नाही तर मुलं मनात कुढत बसून रहातात. त्यांचे गुण झाकलेले राहतात. एखाद्या माणसाची मनोवृत्ती विकसित होणे किंवा एखाद्याला मानसिक आजार होणे यासाठी बालपणातील कित्येक गोष्टी कारणीभूत ठरतात. त्यासाठी लहानपणापासून मुलांना विविध गोष्टी हळूहळू शिकवणे गरजेचे असते. बालमानसशास्त्र हे खूप महत्वाचे शास्त्र आहे आणि त्यासाठी मुलांचे विविध प्रसंगी बारीक निरीक्षण करणे ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे.
त्यांना प्रत्येक गोष्टीतून आनंद कसा मिळेल हे पाहणं महत्वाचं ठरतं. मुलांचा कल पाहून, त्यांची चित्तवृत्ती लक्षात घेऊन, त्यांच्या आवडीनिवडी जाणून जर मुलांना शिकवले तर अनेक गोष्टी मुलं पटकन शिकतात. त्यातला आनंद मुले अधिक चांगल्या प्रकारे अनुभवू शकतात.
बालमन हे टीपकागदासारखं असतं. त्यांना अधिकाधिक आनंददायी गोष्टी देण्यासाठी खूप पैसे लागत नाहीत. मुख्यत: जगाकडे, निसर्गाकडे डोळस नजरेने पाहायला शिकवता यायला हवं.इतकंच नव्हे तर यश आणि अपयश हे दोन्ही सहजपणे कसं स्वीकारावं हे देखील मुलांना आपल्या वर्तणुकीतून दाखवता यायला हवं. हे जमलं तर मुलं नक्की अधिक चांगल्या प्रकारे विकसित होत राहतात. एक सुजाण नागरिक बनू शकतात असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं?
- सुधांशु नाईक(9833299791)🌿

Saturday 6 January 2024

दिनचर्या नियमित का हवी?

मना सज्जना...भाग : 02 : दिनचर्या नियमित का हवी?
- सुधांशु नाईक 
शनिवार 06/01/24 
मनाचे बोलणे आपल्याला ऐकता यायला हवे आणि मनाशी संवाद असायला हवा असं काल म्हटलं होते. हे इतक्या सहजासहजी घडत नाही कारण जन्मल्यापासून विविध गोष्टींमुळे आपल्या मनाचे कंडिशनिंग झालेले असते. आपल्या सवयी, आपल्या पालकांच्या किंवा घरातील इतर ज्येष्ठ सदस्यांच्या सवयी यामुळे मुलाचे मन तयार होत असते.
 सकाळी उठल्यावर प्रात:स्मरण करावे, ईश्वराची, या भूमातेची आळवणी करावी, त्यांना आणि घरातील मोठ्या माणसांना वंदन करावे असे संस्कार पूर्वी घरात शिकवले जात. हल्ली आपल्याला हे सगळं जुनाट वाटतं. पण त्यामागे असलेला विचार आपण समजून घ्यायला हवाय.
Gratitude किंवा कृतज्ञता हा गुण मुलांच्यात लहानपणी रुजला गेला तर त्यांना जगणे अधिक सुंदर जाते. त्यासाठी आपले पालक, गुरुजन, शेतकरी, हा निसर्ग, इथली झाडें फुले, प्राणी - पक्षी या सगळयाविषयीं मुलाच्या मनात आपुलकी आणि कृतज्ञता निर्माण झाली की एक उत्तम नागरिक बनण्याकडे त्याची वाटचाल सुरु राहते. समर्थ दिनचर्येविषयी सांगताना म्हणतात,
प्रात:काळी उठावे | काही पाठांतर करावे
येथाशक्ती आठवावे | सर्वोत्तमासी ||
यासाठी त्या दिनचर्येची सुरुवात वंदनाने व्हायला हवी. इथं समर्थ अमुक एका देवास आठवा असे म्हणत नाहीत तर सर्वोत्तमाचा ध्यास घ्या असं सांगतात हे लक्षात घेण्यासारखे आहे.
त्यानंतर शरीर स्वच्छता, व्यायाम या गोष्टी महत्वाच्या ठरतात. आपल्या प्राचीन योगशास्त्रात असं म्हटलं आहे की एका विशिष्ट वेळी, एखादी कृती सलग 33 दिवस केली तर मनाला त्याची सवय होऊ लागते. त्यामुळे सकाळी ठराविक वेळी उठणे, आवरणे, व्यायाम करणे, अभ्यास करणे या गोष्टींना फार महत्व आहे. आपण ठरवल्यानुसार वागायला सुरुवात जरूर करतो पण मध्यें अनेकदा मोहाचे क्षण येतात. कधी सकाळी उठायचा आळस येतो कधी व्यायाम करायचा कंटाळा येतो. एकदोन दिवस जरा खंड पडला की मग त्या आळसाचीच सवय होऊन जाते. त्यामुळे मनाला पुन्हा पुन्हा ठरलेल्या आखलेल्या मार्गाकडे वळवावे लागते.
आपलं मन कसं हे सांगताना बहिणाबाई म्हणूनच तर म्हणाल्या होत्या, 'मन वढाय वढाय…उभ्या पिकातला ढोर…' त्याला प्रसंगी चुचकारावे लागते, प्रसंगी वेसण घालावी लागते तर कधी मायेने समजावावे लागते.
हे सगळं करण्यासाठी जर नेमकी आखून घेतलेली दिनचर्या असेल तर मनाला नियंत्रित करण्यासाठी महत्वाचे आयुध आपल्याला मिळाले आहे असं समजायला हरकत नाही.
- सुधांशु नाईक(9833299791)🌿

Friday 5 January 2024

माझिया मना...

मना सज्जना... भाग : 01
शुक्रवार 05/01/24
माझिया मना...
आपल्या शरीरातील न दिसणारी तरीही अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे मन. मनाची शक्ती इतकी मोठी की समर्थ रामदास तर "अचपळ मन माझे नावरे आवरिता..." असे म्हणून जातात. समर्थांसारख्या तनमनावर अतिशय कठोर नियंत्रण मिळवलेला सिद्ध पुरुष जिथं असं म्हणून जातो तिथं आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी मनावर विजय मिळवणे ही किती अवघड गोष्ट. मनावर विजय मिळवणे वगैरे दूरची गोष्ट. आपल्याला आपलंच मन धड उमगत देखील नाही.
आपलं मन कधी कोणता विचार करेल हेसुद्धा आपल्याला कळत नाही. त्यामुळे तर 'मन चिंती ते वैरी न चिंती' , ' मनी वसे ते स्वप्नी दिसें...' अशा कितीतरी म्हणी आपल्या बोलीभाषेत रुजल्या आहेत. कधी कधी मन अगदी छान सरळमार्गी असतं तर कधी वेडीवाकडी वळणे घेत आपल्याला गुंतवून टाकतं. कोणत्या क्षणी कोणता विचार करेल हेसुद्धा सांगता येत नाही.
एकदा एक मित्र सांगत होता, " अरे, नुकतीच एक गंमत झाली. सकाळी नेहमीसारखं पोहायला गेलो होतो. पोहताना मनात विचार आला की आपण एखाद्या डोंगरावर गेलोय आणि तिथं पाय घसरून पडलोय. पाय मोडलाय... आता पोहत असताना असा विचार का आला असेल? असं वाटलं. पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अचानक आमच्या ऑफिसची ट्रिप ठरली. आम्ही सगळे कर्नाळा किल्ल्यावर गेलेलो आणि येताना पाय घसरून पडलो. नशीब चांगलं की पाय मोडला मात्र नाही. किरकोळ खरचटलं फक्त... काहीच कुठले चिन्ह नसताना मला अचानक का असं वाटलं याचं अजूनही आश्चर्य वाटतंय..!" आपल्या योगाभ्यास आणि अध्यात्मिक क्षेत्रात असं मानतात की आपले मन आपल्याला अशा पूर्वसूचना देत असतं, फक्त आपण त्याच्याशी संवाद साधायला हवा.
इथं हल्ली आपला इतरांशी तर जाऊ दे पण स्वतःशी तरी कुठे फारसा संवाद होत असतो? आपली कामं, नोकरी - व्यवसाय, कौटुंबिक जबाबदारी, मीडिया आणि आसपास वावरणारी माणसे यांच्या कलाने वागताना आपल्याला नक्की काय हवंय हे आपले मन सांगत असूनही आपलं दुर्लक्ष होतं. एकामागून एका नव्या गुंत्यात अडकत जातो आणि मग त्यातून बाहेर पडणे अवघड होते.
कित्येकदा आपल्या मनातील गुंते आपल्याला कळतात पण त्यातून पुढं कसं जायचं हे समजत नाही. आपल्या शरीरावर अनेकदा आपण नियंत्रण मिळवून दाखवतो पण मुठीतून निसटणाऱ्या वाळूसारखे मनातले विचार आपल्या हातून निसटत राहतात. मनावर विजय मिळवणे अवघड नसते असं योगी किंवा विद्वान लोक सांगत असतात ते सत्यच आहे. पण आधी मनातले गोंधळ, मनोव्यापार आणि मनाचे गुंते आधी नुसते तटस्थपणे पाहता यायला हवेत. मग मनाशी संवाद साधायला हवा. ते जमू लागलं की मग आपण आपल्या मनाला सांगू शकतो, माझिया मना.. जरा थांब ना..!" 
सुधांशु नाईक(9833299791)🌿
(ही लेखमाला दर शुक्रवारी आणि शनिवारी दै. नवशक्तीच्या सर्व आवृत्तीमध्यें अग्रलेखाच्या खाली वाचायला मिळेल. ऑनलाईन ई पेपरवर ही पाहू शकता.)