marathi blog vishwa

Sunday 13 October 2013

प्रेम म्हणजे...


लोकं म्हणतात “ माझं तुझ्यावर प्रेम आहे..असं सांगावं लागतं..”

मी मात्र म्हणतो, सगळं विश्वच तर प्रेममय असतं..!

प्रेम म्हणजे भल्या पहाटे आईनं करून दिलेली भाजी भाकरी असतं,

थकून झोपलेल्या मुलाच्या कपाळावरून फिरलेला बापाचा हात असतं...

प्रेम म्हणजे इवल्याश्या बाळाने घेतलेला पापा असतं,

हात चाटताना गायीची ओलसर खरखरीत जीभ असतं...

तिच्या मिठीत घुसमटत जाणे म्हणजेही प्रेम असतं,

कातरवेळी जिवलगाची वाट पहात तेही दारात उभं असतं...

प्रेम म्हणजे कुटुंबाला दोन घास मिळावे म्हणून राबणारा हमाल असतं,

उरलेली अर्धी भाकरी दुसऱ्याला वाढून आपण उपाशी राहात असतं...

प्रेम म्हणजे सांत्वनाचा धीरोदात्त स्पर्श असतं,

खूप दिवसांनी भेटल्यावर गळ्यात पडलेला मित्र असतं...

प्रेम म्हणजे गोधडीत झोपून ऐकलेली आजीची गोष्ट असतं,

तर कधी भल्या पहाटे उठून डोंगरातून केलेली भटकंती असतं..

प्रेम म्हणजे सुनसान एकाकी रस्त्यावर मिळालेली लिफ्ट असतं...

तहानलेल्या पांथस्थाला दिलेलं ओंजळभर पाणी असतं...

प्रेम जसं बहिणीनं बांधलेली राखी असतं

तसं सोनं म्हणून दिलेलं आपट्याचं पान असतं...!
 
 
“शुभ विजयादशमी”

n     सुधांशु नाईक, क़तार (nsudha19@gmail.com)

No comments:

Post a Comment