इतिहासात रमलेली देखणी ओरछा नगरी..!
-सुधांशु नाईक
#सुधा_म्हणे...
०१/०१/२०२५
आपल्या देशातील खूप माणसं मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश पाहायला जातात. आग्रा, मथुरा, ग्वाल्हेर, झांसी, खजुराहो, भोपाळ, इंदूर, उज्जैन आदि पाहून परत येतात. मात्र झांसी – खजुराहोच्या परिसरात असलेली, बुंदेल राजपूत घराण्याचा तेजस्वी इतिहास सांगणारी,अतिशय देखण्या वास्तू आजही जपणारी ओरछा नगरी मात्र पहायचं राहून जातं. बेटवा नदीच्या काठी असलेल्या या नगरीतील भव्य वारसास्थळांनी इथला इतिहास उरात जपून ठेवला आहे. स्वातंत्र्यप्रिय बुंदेलवंशांच्या राजांनी मनापासून घडवलेली इथली वारसास्थळे पाहताना दिवस कसा संपून जातो कळतच नाही. काही दिवसांपूर्वी आवर्जून ओरछा पाहिलं होतं. त्या गौरवशाली इतिहासाचा ओळख करून देणारा हा लेख...
(रात्री केलेल्या रोषणाईने झळाळून जाणारे स्थापत्य )
ओरछाचे मूळ निर्माते राजा रुद्र प्रताप सिंह. 1530-31च्या सुमारास त्यांनी तत्कालीन परिस्थितीचा फायदा उठवत बुंदेलखंडच्या राज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्यानंतर त्यांच्या मुलाने मधुकर शाह याने अफगाणी सुलतान इस्लामशहा सूरी (1550 च्या सुमारास) आणि त्या नंतर मुघल बादशहा अकबर (1550-1605) यांच्या काळात चांगला लढा दिला. त्यांच्याच कारकिर्दीत इथल्या ऐतिहासिक राजा राम मंदिराची घटना घडली. तेंव्हापासून इथला राज्यकारभार प्रभू रामचंद्र करतात असे मानले जाते. ओरछा नगरी ही रामराजाची नगरी मानली जाते आणि आजही इथल्या प्रभू रामाच्या मूर्तीला, राजा मानून पोलिसांच्या वतीने रोज “गार्ड ऑफ ऑनर” दिला जातो. एखादा चमत्कार मानावी अशीच ही घटना मुळापासून समजून घ्यायला हवी.
( रामराजा मंदिर )
तर घडलं असं की, राजा मधुकर शाह हे कृष्ण भक्त तर त्यांची पत्नी गणेशकुमारी देवी ही राम भक्त. दोघांना इथे एका भव्य मंदिराची उभारणी करायची होती, मात्र राणीसाहेबांना इथं रामाचे मंदिर हवे होते तर राजाला कृष्ण मंदिर. जर राणीने अयोध्येला स्वतः जाऊन रामाची मूर्ती आणली तरच तिच्या प्रतिष्ठापनेसाठी अनुमति देण्याचे राजाने मान्य केले. त्यातून इथे चतुर्भुज मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली. काही दिवसांनी राणीसाहेब राम मूर्ती आणायला अयोध्येला गेल्या. इकडे मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू राहिले. अयोध्येत गेल्यावर त्यांनी कित्येक दिवस तपश्चर्या सुरू केली. पण रामाचे दर्शन होईना. कंटाळून शेवटी आता आपले जीवन संपवून टाकावे असं जेंव्हा त्यांनी ठरवलं तेंव्हा अखेर प्रभू रामाने दर्शन दिले आणि झालेल्या दृष्टान्तानुसार काही अटीवर तिकडे येण्याची तयारी दर्शवली.
त्यातील पहिली अट अशी होती की राणीने अयोध्येपासून ओरछा पर्यन्त अनवाणी चालत जायचे. दुसरी अट अशी होती की एकदा जिथे मूर्ती ठेवली जाईल तिथून परत मूर्ती हलवता येणार नाही आणि तिसरी अट म्हणजे ज्या ठिकाणी मूर्ती विराजमान होईल, तिथे राजा हे केवळ प्रभू राम असतील आणि त्यांच्याच नावे राज्य चालेल. राणीने तिन्ही अटी मान्य केला आणि ती रामाची मूर्ती घेऊन ओरछाकडे निघाली. राणीसरकार जेंव्हा थकून भागून ओरछाला पोचल्या तेंव्हा अतिभव्य अशा त्या चतुर्भुज मंदिराची उभारणी अंतिम टप्प्यात आली होती आणि केवळ गर्भगृहाचे काही दिवसांचे काम बाकी राहिले होते. राजा रामाची मूर्ती सुरक्षित राहावी म्हणून राणीने आपल्याच जवळ महालात ठेवली. एकदाचे मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आणि प्रतिष्ठापनेसाठी उत्तम मुहूर्त निश्चित करण्यात आला.
जेंव्हा मंडळी राममूर्ती न्यायला राणीमहालात आली तेंव्हा आश्चर्य घडले. ती मूर्ती तिथून हलवताच येईना. कितीतरी दिवस सारे प्रयत्न झाले पण मूर्ती तिथून हलेच ना.. मग सर्वाना रामरायानी सांगितलेली अट आठवली..! अनेक प्रयत्न करूनही ती राममूर्ती तिथून हलवता आली नाही आणि त्या राणीमहालातच शेवटी राजा राम मूर्ती विराजमान झाली..! तो महाल हेच रामराजा मंदिर झाले. पुढे कित्येक काळ ते चतुर्भुज मंदिर देवाच्या मूर्तीविना तसेच पडून राहिले आणि सारे राज्य हे राणी महालात स्थापन झालेल्या राजा रामाच्या नावे सुरू राहिले. कितीदा तरी मुस्लिम आक्रमकांनी मंदिर उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न केले मात्र ते विफल झाले. पुढे कित्येक वर्षानी त्या भव्य चतुर्भुज मंदिरात एका लहानशा कृष्णमूर्तीची स्थापना करण्यात आली. आज ही आपण शेजारी शेजारी असलेली ही दोन्ही मंदिरे पाहतो तेंव्हा साध्या हवेलीतील रामराजा मंदिरात असलेलं चैतन्य आणि दुसरीकडे भव्यता असूनही उदासवाणी, दीनवाणी असलेली चतुर्भुज मंदिराची वास्तू आपल्याला स्तीमित करत राहते.