marathi blog vishwa

Wednesday, 5 June 2013

आज अचानक गाठ पडे..

सुचेल तसं” लेखमालेतील हा १२वा लेख माझ्या एका ज्येष्ठ मित्रावर..!

 आजवर मला जी काही माणसे भेटली होती त्यातील एक छानसं व्यक्तिमत्व म्हणजे माझा हा मित्र..! खरं तर माझ्या बाबांपेक्षाही वयाने मोठा असलेला माणूस..पण असं काही छान मैत्र जुळलं की कोल्हापुरातील माझे ते दिवस सुरेल आठवण बनून गेले. “आज अचानक गाठ पडे...” हे गाणं आठवलं की त्या स्वरप्रेमी दोस्ताची आठवण ठरलेलीच..!

कालिदास मोहोळकर...आमचे भाऊकाका. माझी त्यांची भेट झाली तेंव्हा त्यांनी पंच्याहत्तरी पार केली होती..! माझ्या वयाच्या दुप्पटीपेक्षा जास्त वय असलेल्या या दोस्ताने मनाचा एक कोपरा व्यापून टाकला.. कायमचा..!
 
 

 २००१ मध्ये कोल्हापुरात दाखल झाल्यावर आमच्या एका नातेवाईक काकूंनी मला सांगितलं,“तुम्ही आमच्या भाऊकाकांशी ओळख करून घ्या..तुमचं छान जमेल..त्यानाही तुमच्या सारखी गाण्याची, पुस्तकांची फार आवड आहे..”

“काकू, कुठे भेटतील ते..?”

“बहुदा कुठे मैफिली वगैरे चालू असतात..तिथे भेटतील..विजय तेंडुलकरांसारखी दाढी असलेले म्हातारे गृहस्थ म्हणजे आमचे भाऊकाका..”
------
नेमकं त्यावेळी कोल्हापुरात शास्त्रीय संगीताचं “घराणा संमेलन” सुरु होतं. अवघ्या भारतातून ग्वाल्हेर, किराणा, जयपूर, इंदौर, मेवाती इ. घराण्यांचे अनेक दिग्गज कलावंत ३-४ दिवसासाठी येऊन दाखल झालेले. मी “तरुण भारत” साठी त्याचा वृत्तांत आणि मुलाखती कव्हर करत होतो. सकाळ पासून रात्री पर्यंत मैफिली ऐकतानाच ह्या “भाऊकाकाना” शोधत होतो.
एका रात्री एक तसेच दाढीवाले गृहस्थ दिसले. वर्णन जुळत होतं. गाण्याला मनमुराद दाद देत होता तो माणूस..!
मैफिलीनंतर भेटलो त्यांना..थेट गप्पा मारल्या भरपूर...शेवटी कळले आपल्याला हवा तो माणूस हा नव्हे..! हे कुणी दुसरेच.
मात्र दुसऱ्या रात्री एकदाचे ते कालिदास मोहोळकर उर्फ भाऊकाका भेटले...! आणि थेट घरातलेच झाले.
----
दुसऱ्याच दिवशी घरी हजर.
“सकाळी चालायला निघालो होतो. आज कुणाकडे जावं सुचत नव्हतं, म्हटलं तुमच्याशी नवी ओळख झालीय. तिला वाढवूया..”
बायकोनं– स्वरदा नं, चहा पोहे केले. मलाही त्या दिवशी सुट्टी होती. बसले खूप गप्पा मारत.
आमचं ते घर छोटंसं होतं. पण त्याच्याशी भाऊकाकांना काही देणं घेणं नव्हतं. पुस्तकांनी भरलेली कपाटे आणि शास्त्रीय संगीताच्या कॅसेट्स-सीडीज पाहून ते हरखले...त्यातही कुमारजी, भीमसेनजी आणि मन्सूर यांचं कलेक्शन पाहून आनंदले. एका हातात साधनाताईन्चे “समिधा” वाचायला घेत, “कुमारजींचे “भैरव के प्रकार” ऐकत म्हणाले,
“व्वा, आज हवा छान आहे आणि तुम्ही सकाळ अजून प्रसन्न केलीत..मजा आली..तुमचं घर आवडलं. मी कधीही आलो तर चालेल न??”
विचारताय काय, तुमचेच घर समजा. मला कधीही ऑफिसला जावं लागतं. त्यामुळे मी असलो नसलो तरी काही फरक पडत नाही. तुम्ही येत जा..”
आणि मग ते येत राहिले. मी नसलो की स्वरदाशी बोलत बसायचे. त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टी सांगायचे. चार अनुभवाचे बोल सांगायचे. मी असलो की मात्र कधीच खाजगी काही बोलायचे नाहीत. आणि अनेकदा सांगूनही मला कधी अरे-तुरे करायचे नाहीत..मलाच ओशाळायला व्हायचं.
त्यांच्या आयुष्याचा महत्वाचा कालखंड हैद्राबाद मध्ये गेला. तिथल्या सांस्कृतिक वर्तुळात त्यांना मानाचे स्थान असावे. त्यामुळे उतारवयात कोल्हापुरात मुलाकडे जरी राहिले असले तरी मनाने ते त्या दिवसातूनच रमायचे. त्यांना आयुष्यात कुमारजी, भीमसेन, पुलं, तेंडूलकर अशा अनेक थोर माणसांचा सहवास लाभला. त्यांनी स्वतःही कित्येक नाटकातून तिकडे हैद्राबादमध्ये कामे केली. “गिधाडे” नाटकात काम करण्यापूर्वी तेंडूलकरांनी केलेलं त्याचं वाचन त्यांच्या स्मरणात लख्ख जागं होतं. ऐकलेल्या अनेक मैफिली कानात गुंजतच होत्या. वाचलेली शेकडो पुस्तकं डोळ्यासमोर होती. या सगळ्या “श्रीमंती”ची त्यांना जी “नशा” चढली होती ती कधी उतरलीच नाही..! मात्र म्हणून नवीन कलावंताविषयी उगाचच त्यांनी टीकेचे उद्गार नाही काढले. चांगलं चित्र, चांगलं गाणं, छानसं पुस्तक, प्रवास आणि माणसांचं भेटत राहणं ही सगळी त्यांची औषधं होती ! आमच्या गप्पात ते मग त्या मंडळींच्या लाभलेल्या सहवासाबद्दल, ऐकलेल्या अनेक खाजगी मैफिलींबद्दल बोलत राहायचे. एकदा कुमारजींच्या विषयी बोलताना म्हणाले,
“कुमारजी, माणूस म्हणून फार ग्रेट होते. त्यांचं गाणंच नव्हे तर वागणं बोलणं, राहणं सगळंच वेगळे होते. एकदा मी देवासला त्यांच्याकडे राहिलो होतो. सकाळी शिळ्या चपातीला फोडणी देऊन केलेला छान नाश्ता खाऊन झाला. मग त्या दिवशी कुठेतरी मैफिलीला जायचं होतं. बहुदा बंडू भैय्यांकडे असावं. ते तयार झाले. मीही आपला साधा शिक्षक माणूस. पट्कन तयार झालो.
इतक्यात ते म्हणाले, “ मोहोळकर, कुठलं अत्तर हवं तुम्हाला?”
मी आधीच संकोचलेला. चट्कन नावही आठवेनात अत्तरांची. मग पट्कन आठवत ते दिलं एक नाव ठोकून.. ”हीना.”.
“या इकडे..” असं म्हणत त्यांनी एक कपाट उघडलं.
तिथे आत मोठ्या बुधल्यामधून अत्तरं भरलेली होती..! त्यातली हिनाची बाटली उघडली कुमारजींनी. म्हणाले..
“हात करा पुढे..”
मी आपला उपडा हात नेहमीप्रमाणे पुढे केला. त्यावर अत्यंत रागाने त्यांनी माझा हात झटकून टाकला. म्हणाले,
“अत्तर कधी असं लावतात का??”
मग त्यांनी आपल्या हाताच्या ओंजळीत ते अत्तर ओतलं, दोन्ही हात एकमेकावर चोळले बराच वेळ...आणि मग माझ्या सदऱ्याला अंगभर लावत म्हणाले...
“मोहोळकर, आयुष्यात संकोच नसतो करायचा..भरभरून जगायला शिकलं पाहिजे आपण. अत्तर असं अंगभर लाऊन जायचं.. बघा आता कसा सुरेख गंध दरवळेल तो..”
मी अंगभर संकोचलो होतो...आणि त्यापेक्षा मोहरलो होतो..! ज्यांच्याशी हात मिळवणं सुद्धा आम्हाला किंमती वाटायचं ते कुमारजी माझ्या सदऱ्याला अत्तरात अक्षरशः बुडवत होते..!! मग त्यांचंच गाणं आठवलं..मला सर्वात आवडणारे..
“निसटुनी जाई संधीचा क्षण..सदा असा संकोच नडे..आज अचानक गाठ पडे...”
कधीही कुणाची फर्माईश न स्वीकारणाऱ्या कुमारजींनी त्या दिवशी माझ्या विनंतीवरून ते गाणं म्हंटलं याचंच समाधान माझ्यासाठी लाख मोलाचं होतं...”
असे शेकडो किस्से त्यांच्या आठवणीत होते.
---
कोल्हापुरात ते रोज सकाळी ८ पासून दुपारी १२-१ पर्यंत चालत फिरायचे वयाची ८० वर्षे उलटून गेल्यावरही..! रोज  कुणाला तरी भेटून यायचे. कोल्हापुरात आधीच खूप कलावंत आहेत. कुणाकडे तरी फेरी ठरलेलीच. त्यातून कंटाळा आला की मग प्रवास सुरु. नातेवाइकांबरोबर मित्रमंडळी, विद्यार्थी सुहृद, अशा कोणाकडेही गावोगावी जात. ते ज्या विवेकवर्धिनी हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले तिथल्या अनेक विद्यार्थ्यांवर त्यांचं फार प्रेम. कोण कसा मोठा झालाय, कुठे असतो इ. सगळं मग पत्र लिहून आम्हाला कळवायचे. कोणतीही चांगली गोष्ट, मग ती एखादी छान बंदिश असो वा ताटातला छानसा पदार्थ, त्याला दाद तर द्यायचेच, पण ते दुसऱ्या “समानशीले...” मित्राला कधी सांगतोय असं त्यांना व्हायचं नेहमी. समोर असले की दिलेली “व्वा, क्या बात है..” ही अशी  दाद ठरलेलीच..!
त्यांचं ते पोस्टकार्डवरच पत्रही वेगळंच. अगदी एक मिलीमीटर जागाही कधी रिकामी ठेवायचे नाहीत कार्डावर..! आमचे वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस न चुकता लक्षात ठेवायचे. तेंव्हा आम्ही दोघंच होतो कोल्हापुरात. मुलंही झाली नव्हती तेंव्हा. त्यामुळे गावात असले की मुद्दाम आम्हाला भेटायला यायचे. आणि नसले तर तारीख चुकणार नाही याची दक्षता घेऊन आधीच लिहिलेलं पत्र आम्हाला वेळेवर मिळायचेच..!
कधी मला आणि स्वरदाला वेगवेगळी पत्रं लिहायचे.
तिच्या पत्रात लिहायचे,
“तुझा संसार वेगळा आहे. नवराही कलंदर. त्याला इतरांच्या फुटपट्ट्यानी मोजू नको. त्याचं विश्व वेगळंच आहे. धडपड्या आहे, जिथे जाईल तिथं गोतावळा जमवेल, पण पैशाचा विचार नाही करणार. तेवढं तू सांभाळ. तू गुणी आहेसच करशील नीट संसार...” आणि मग स्वतःची काही आठवण लिहायचे.
माझ्या पत्रात इतर काही लिहून झालं की हळूच लिहायचे,
“खूप छान पत्नी मिळालीय तुम्हाला. तिला जपा. तुमचे छंद, आवडी सगळं जपा पण एक घर बांधा आधी कुठेतरी.. तुमची हक्काची जागा हवी..स्वतःची..!”
आणि आम्ही कोल्हापुरात घर बांधायचं ठरवलं. माझे आई-वडील, तिचे आईवडील सगळे होतेच सोबतीला. पण त्यांच्या इतकाच आनंद भाऊकाकांना झालेला..!
----
त्यांच्या परीचयामुळे मलाही अनेक नवी नाती जोडता आली. कोल्हापुरातील एक ज्येष्ठ गायक (आणि यशस्वी बांधकाम व्यावसायिक) विनोदजी डिग्रजकर, देवल क्लबचे श्रीकांत डिग्रजकर, प्रभाकर वर्तक, ज्येष्ठ चित्रकार शामकांत जाधव अशा अनेकांशी त्यांच्यामुळेच ओळखी झाल्या, वाढल्या. एकदा कुमारजींच्या कन्या कलापिनीताई कोल्हापुरात आलेल्या. विनोद्जींच्या घरी मी त्यांची मुलाखतही घेतली. खूप गप्पा मारल्या. मग भाऊकाका तिथे आले.
“मोहोळकर काका..किती दिवसानंतर भेटताय..” असं म्हणणाऱ्या, उठून त्यांना नमस्कार करणाऱ्या कलापिनीताईना “पिना, किती मोठी झालीस गं, तुम्हाला बाबांनी पहिली तालीम दिली होती तेच आठवतंय बघ अजून मला...” असं म्हणत आशीर्वाद देणारे, कुमारजींच्या आठवणींनी गहिवरलेले प्रेमळ भाऊकाका आठवले की अजूनही अंगावर रोमांच उभे राहतात..!
(कुमारजींच्या कन्या कलापिनीताई, विनोदजी, मी आणि भाऊकाका)
त्यांच्यामुळेच पुण्याच्या “वंचित विकास” या समाजसेवी संघटनेची आणि संस्थापक “विलासकाका चाफेकर” यांचीही  ओळख झाली. त्यांच्यावर लिहायला भाऊकाकानीच मला उद्युक्त केलं. पुढे जाऊन विलासकाकांचा जो स्नेह आजपर्यंत मिळालाय त्याला निमित्त ठरले भाऊकाका..!
----
माझ्या आग्रहाखातर त्यांनी “तरुण भारत” मध्ये “अशी माणसे..अशा आठवणी..” नावाचे सदर आणि इतर काही लेखही लिहिले. “जगातला कुठलाच माणूस फक्त चांगला नसतो, मीही त्यातलाच एक आहे..मला असं स्वीकारा..”  असे म्हणणाऱ्या त्यांना कुणाविषयी वाईट बोलताना, शिव्या देताना मी कधीच नाही पाहिलं. त्यांच्या आयुष्यातही अनेक कडवट प्रसंग आलेले. पण कधी त्यांनी त्याचा उच्चार नाही केला. उलट नेहमी म्हणायचे,
“दुःख हे आपल्या पाचवीलाच पुजलेलं असतं. त्यामुळे त्याबद्दल काय वेगळे बोलायचे..उलट आनंद देणाऱ्या गोष्टी माणसाने जास्त सांगाव्यात. आपलं दुःख उरात गाडून टाकावं..दुसऱ्याचं दुःख हलकं करावं..”
----
पुढे माझं कोल्हापूर पर्व संपलं. पुन्हा भटकंती सुरु झाली. थेट परदेशातही पोचलो...पण त्यांच्याशी संपर्क होता. मस्कत, अबुधाबीलाही त्यांची पत्रं यायची..भारतात आलो की भेट व्हायची. पुन्हा २००९ मध्ये मी भारतात परतलो. कल्याणला नवं घर घेऊन राहू लागलो. तिथल्या घरी त्यांना यायचं होतं..पण शेवटी नाहीच जमलं..नंतर त्यांची पत्नी गेल्याचं कळल्यावर भेटूनही आलो. गप्पा मारल्या. तेही थकत गेल्याचं जाणवलं.
-----
तो दिवस अजून लख्ख आठवतोय... मी पुण्यातल्या मित्राबरोबर “कास पठारावर” भटकून आलो होतो. खूप फोटो काढले होते. ती रम्य इवली इवली फुलं पाहून अक्षरशः आम्ही तहानभूक विसरलो होतो..पुण्यात परत आलो आणि निरोप मिळाला “भाऊकाकाना heart attack आलाय. ८५% blockage आहे...शक्यतो भेटून जा.”
 पुण्यातून कल्याणला न जाता थेट कोल्हापुरात पोचलो. माझे सासरे बसजवळ आले होते. त्यांच्या टू- व्हीलरवरून तसेच दवाखान्यात गेलो. “ICU मध्ये आहेत” असं कळले. एकानं त्यांचा बेड दाखवला.
अंग सुजलं होतं. नाकातोंडात नळ्या अडकवलेल्या होत्या..”काही तास काढतील” असं नर्स म्हणाली.
एवढी वाईट अवस्था असेल असं वाटलं नव्हतं. मी जवळ बसलो. विचारपूस केली. त्यांनी खुणेनं उत्तर दिली. “छान आहे” म्हणाले..
मी विचारलं, “कुमारजींचं काही ऐकणार?”
“हो..” खुणेनच हात हलवला..
“अवधूता, युगन युगन हम जोगी..” मोबाईलवर निर्गुणी भजन लावलं.
मस्त मान हलवून ते दाद देऊ लागले. ते निर्गुणी भजन संपता संपता त्यांचे डोळे भरून आले..माझा हात त्यांनी घट्ट धरून ठेवला..!
इतक्यात, नर्स म्हणाली, “त्यांचा नातू आहे इथंच..”
“नातू?? अहो, पण यांना तर फक्त नाती आहेत इथं कोल्हापुरात...मग नातू कुठून आला..?” मी विचारलं.
इतक्यात तो युवक जवळ आला. आपल्या आजोबांना आवडलेलं ते गाणं मलाही द्या म्हणाला..मी त्याला दिलंसुद्धा..
पण विचारात पडलो होतो..हा नातू कुठला?? इतक्यात नर्सनं म्हटलं, मारूळकरांजवळचे सगळे बाहेर जा..
अरे, हे तर मोहोळकर न??” मी चमकून पुन्हा विचारलं..
“छे..छे..मोहोळकर तिकडे पलीकडच्या खोलीत आहेत..!!!”
मी थक्क..!
म्हणजे इतका वेळ कुमारजींचं ऐकून मन भरून आलेले हे कुणी दुसरेच...?? माझं मलाच प्रचंड हसू आले...त्या तसल्या परिस्थितीतही...!
मग आम्ही पलीकडे गेलो. “आमचे भाऊकाका” मस्त पलंगावर बसले होते. मला पाहताच आनंदले.
“या..या. कसे आहात सगळे? तुम्हाला कुणी कळवलं? उगाच इथे अडकवून ठेवलंय हो..काही नाही झालंय..जरा श्वास घ्यायला त्रास होतोय, चक्कर करतेय म्हणून सांगितलं तर इथे अडकून ठेवलाय..”
मग मी मगासचा सगळा किस्सा सांगितला...
मस्त खळखळून हसले...म्हणाले “चला, त्यानिमित्ताने, त्या म्हाताऱ्याला कुमारजी लाभले. बिचारा आनंदाने मरेल आता, मग मलाही पुन्हा ऐकवा कुमारजी..”
मग त्यानाही कुमारजी ऐकवले. त्यांचं आवडतं “आज अचानक गाठ पडे...” ऐकवलं. त्यांचा तो मनसोक्त दाद देणारा चेहरा पाहिला. त्यांना भेटून मलाच कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं..
-----
परत भेटतील का? हाच विचार करत कल्याणला परतलो. ३१ जानेवारी त्यांचा वाढदिवस. त्या दिवशी त्यांना भेटायला जायचंच असं ठरवलं...मात्र ते होणार नव्हतं. जानेवारी सुरु झाला..आणि एकदिवस कळलंच.. “भाऊकाका गेले..”
त्यांची पहिली आणि शेवटची भेट. दोन्हीवेळा माझ्याकडून चुकामूक झालेली..दोन्ही घटना आठवून पुन्हा हसू आले.. आणि हसता हसता कधी डोळे पाण्याने भरले, माझं मलाच कळलं नाही.. माझं मलाच कळलं नाही..!!
-    सुधांशु नाईक. (nsudha19@gmail.com)
 
 
 
 
 
 
 
 
 

 
 

 

Monday, 3 June 2013

तू जिवलग..


 
 
 
 
 
 
तू वेडा... मस्त रंगात येणारा...
तू हलकट.. अगदी त्रासून सोडणारा...
तू मूर्ख ... पाहिजे तेंव्हा जवळ नसणारा...
                    तरीही तू जिवलगच....पुन्हा पुन्हा हवासा वाटणारा ....


तू धसमुसळा... माझी पार भंबेरी उडवणारा...

तू बालिश...वेडावाकडा भरकटत जाणारा...
तू हट्टी ... मनसोक्त गोंधळ घालणारा...

                  तरीही तू हळवा...पुन्हा पुन्हा कुशीत घेत जपणारा....


तू अजागळ... हल्ली बेशिस्त झालेला...
तू उदास...  अचानक रुसणारा...
तू अथांग... सगळे अपराध पोटात घेणारा...
तू लाडका..तू माझा..माझा पाऊस..
पुन्हा पुन्हा बरसत येणारा...पुन्हा पुन्हा बरसत येणारा...
 -- -सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)
 
 
 
 

Sunday, 19 May 2013

ती - एक मनस्वी गडवेडी...

“सुचेल तसं” लेखमालेतील लेखांना मिळणारा तुमचा प्रतिसाद व प्रेमळ सूचना अशाच सुरु राहोत, पुढचा लेख पुन्हा एकदा भटकंतीशी नातं जोडणाऱ्या एका आगळ्या-वेगळ्या व्यक्तिमत्वाविषयी..
ती मनस्वी. मुक्त स्वच्छंद जगणारी. पानाफुलांवरच नव्हे तर निसर्गातील किड्यामुंग्यांवर देखील प्रेम करणारी. चालताना पायाखाली आलेलं इवलसं फूल देखील जपणारी. चिंब पावसात भिजणारी. ऐन वैशाख वणव्यात देखील जंगलातून भटकणारी. कधी कुण्या ग्रुपमधून तर कधी एकटीच..!
 
तिच्या बरोबर फिरणं हा एक सुखद अनुभव असतो सगळ्यांसाठी...दूर कुठे एखाद्या झुडुपात लपलेल्या Giant spider पासून झाडावरच्या एखाद्या चिमुकल्या ऑर्किडपर्यंत सगळीकडे तिची नजर फिरायची. हे सगळं नुसतं सोबत्यांना दाखवण्यात समाधान न मानता त्या सगळ्याची इत्यंभूत माहितीही देऊन मोकळी व्हायची ती..!
अशातच कधी भर पावसात एकदा राजमाची आणि एकदा राजगड करून आली ती...! आणि मग हे तटा-बुरजांची लेणी मिरवणारे, उध्वस्त अवशेष ही सन्मानानं अंगा –खांद्यावर बाळगणारे गडकोट तिचे सोयरे बनले.
इवल्याशा पूर्णगडापासून ते अवाढव्य अशा मांडवगडापर्यंत, केरळातल्या वायनाडपासून हिमालयातील गिरीशिखरापर्यंत, आणि भूजच्या वाळवंटी किल्ल्यापासून ते आसामपर्यंत ती मग फिरफिर फिरली. पण मैत्र जुळलं ते राजगड –रायगड या वाटेवर, राजमाचीवर आणि हिमशिखरांवर ..!
 
तिला कसली भीती वाटायचीच नाही. कुणी काही म्हटलं तर थेट उत्तरायची,हा निसर्ग, या डोंगर दऱ्या हेच माझे जिवलग...त्यांच्या सोबत असताना समजा मी जरी मेले, कुठे दरीत कोसळले तरी मजेत मरेन..तुम्ही मंडळी काळजी नका करू माझी..भूत होऊन नाही बसणार कुणाच्या खांद्यावर..!
तिच्याशी जवळीक साधायचा प्रयत्न तर अनेकांनी केला. पण तिला लग्नच करायचं नव्हतं. भटकंतीच्या आड येणारी कोणतीही गोष्ट तिला मंजूर नव्हती.
----------
एकदा असंच तिच्या मनात आलं, पुण्यातून आपल्या घरातून थेट उठली भल्या पहाटे आणि निघाली रायगडाकडे..कुठून तर बोराट्याच्या नाळेच्या वाटेनं, तेही एकटीच..!
रस्ता तर तिच्या पायाखालचाच होता, अनेक वेळा हा ट्रेक केलेला.. वाटेतल्या वस्त्या, माणसं हीही ओळखीची..सगळ्यांना अचंबा वाटला.
“बाई गं, खुली की काय...एकट्यानं कशापायी चाललीस गं? सोबत दिऊ का धाकट्या भीमाला लिंगाण्यापत्तूर..? वाटेत कुण्या ओळखीच्या गाववाल्या वहिनीनं विचारलं.
हिनं हसून फक्त मान हलवली.. म्हणाली,
“वयने, अगं वाट माहितेय मला, आणि इथं नाही येत कुणी बिबट्या..मला खायला..तू नुको काळजी करू..मी जाईन नीट..”
शेवटी पोचली रायगडाजवळ नीट..
पायथ्याला विठ्ठलदादा (आवकीरकर) च्या घरात जेंव्हा ही रात्री शिरली, तो आणि त्याची बाईल थक्क झाले तिला असं रात्री बेरात्री एकटीलाच आलेलं पाहून.
“ अनेकदा अप्पा आलवते असं रातच्याला एकलेच...पण ते तर पुरुष माणूस..तू बाईमाणूस. कशापायी असं येडं धाडस केलंस? रानात कुठं किडा मुंगी, जनावर काही चावलं असतं म्हणजे..”
गरम गरम दुधाचा पितळी ग्लास घेऊन येत विठ्ठल म्हणाला...
“जाऊ दे रे दादा..मीही अप्पांचीच लेक समज. आणि आले न आता इथं..मग झोपते छान..उद्या मग चल माझ्याबरोबर..आपण वाघ दरवाज्याचा कडा चढून जाऊया गडावर..”
असं म्हणत पट्कन तिथंच आपली स्लीपिंग ब्याग पसरून शहाणी झोपून सुद्धा गेली दोन मिनिटात..
दुसऱ्या दिवशी दोघे कडा चढून गेले गडावर सकाळ सकाळीच..
गडावर बाजारपेठेच्या मागे विठ्ठलाचा झाप. तिथं सुलोचनाताईशी गप्पा मारत बसून राहिली, चुलीवर तापवलेलं गरम दूध पीत.. विठ्ठल पुन्हा आपल्या कामाला गडाखाली निघून गेला.
 
दुपारनंतर ही मग गडावर भटकायला निघाली. सुरुवात केली भवानी टोकापासून. खांद्यावर कॅमेरा, गळ्यात दुर्बीण, अंगात ढगळ टी-शर्ट आणि खाली एक थ्री फोर्थ जीन्स..! तिला पाहून कुणालाच वाटलं नसेल की या बाईची चाळीशी उलटून गेलीय..!
गडावर रोप वे झाल्यापासून शनिवार- रविवार हल्ली प्रचंड गर्दी उसळते..म्हणूनच ती बुधवार धरून आली होती..शांत शांत रायगड अनुभवायला. पण तरीही तुरळक पर्यटक मंडळी होतीच..बहुतेक जण परतीच्या मार्गाला लागलेले.
बाजारपेठेजवळ ताक दही, लिंबू पाणी विकणाऱ्या माम्याही आता परतून गेलेल्या. संध्याकाळच्या त्या सोनेरी किरणात रायगड वेगळाच रंगला होता.
 
बाजारपेठेजवळ ती एका पडक्या घरात शिरली. नेहमीच्या नजरेनं काही अवशेष पहात..तेवढ्यात तिला जाणवली आणि २-३ माणसांची चाहूल..ती मागे वळून पाहीपर्यंत कुणीतरी तिला मागून जोरात मिठी मारून पकडलं. तिघं जण होते ते. २०-२२ वर्षाचे..फिरायला आलेले. मगापासून तिच्या मागावर होते.. ती एकटीच आहे हे हेरून योग्य संधीची वाट पाहत होते. त्या पडक्या घरातल्या त्या कोपऱ्यात तिघांनी तिला घट्ट पकडली..
क्षण दोन क्षण ती भांबावली..मग सावरली..
एक मिनिट, थांबा, एक मिनिट..तुम्हाला काय हवंय ते समजू शकते मी..पण मित्रांनो, ही ती जागा नव्हे..आपण दुसरीकडे जाऊ या का...?”
तिच्या अनपेक्षित पवित्र्याने ते गडबडले..सुस्तावले..
“संभ्या, म्हटलं नव्हतं तुला लेका, चालू माल हाय हा..! उगाच भटका लागलीय होय एकटीच..” दोस्ताशी बोलताना  मग तिच्यावरची पकड न सोडवताच त्यातला एकजण म्हणाला,
“ए भवाने, उगा शानपना नाय दाखवायचा..तूबी मजा मार..अन आमालाबी मजा करू दे..बोल कुठं नेतीस?”
“असं करा..तुम्हाला वाघ दरवाजा, कुशावर्त तलाव माहितेय का? बारा टाकी, दारूकोठारा कडे जाणारा रस्ता..काही माहितेय का?
“नाय बा. आम्ही सगळे पयल्यांदा आलोय इथं..तूच दाखव..पण पळून जायचा प्रयत्न केलास तर खबरदार..”
“मित्रा, ठीक आहे पळून नाही जाणार....चला माझ्या बरोबर..”
ती त्यांना घेऊन वाघ दरवाज्याचा रस्ता चालू लागली.
सोबत येणाऱ्या त्यांचं अचकट विचकट बोलणं सुरु होतं. दुर्दैवानं वाटेत कुणीही दिसलं नाही..हाक मारायला..
 मग पायऱ्या उतरून ती कुशावर्ताजवळ पोचली..तिथं तलावाच्या बाजूला एक छोटंसं देखणं पण एकाकी शिवमंदिर.
 
ती त्यांना म्हणाली,
“तिथं  पलीकडे दिसतायत त्या दोन समाध्या ? असं म्हणतात की एक समाधी आहे त्या पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांची. जे राजांचे सर्वात विश्वासू सहकारी होते.. तिथून पुढे वळून पूर्वेकडे चालू लागलं की वाटेत लागते समाधी काशीबाई राणीसाहेबांची. तिथलं वृंदावन आता मोडकळीस आलंय..आणि पार पलीकडे समोर त्या बामनवाड्याच्या पलीकडे दिसतय न ते जगदीश्वराचं मंदिर. त्याच्याच पुढ्यात आहे समाधी आपल्या शिवबा राजांची..
 
तुम्हाला इथं आणलं कारण ही जागा तुमच्यासाठी अगदी मोक्याची..! म्हणजे कसं, तर आपल्या राज्यात एकाही आई-बहिणीच्या अब्रूवर कुणी हात टाकू नये म्हणून राजांनी स्वराज्य बनवलं. इथल्या माय-बहिणीच्या मनात विश्वास जागवला. मोरोपंत असोत, नेताजी असो वा दौलतखानसारखा मुसलमान शिपाई..स्वराज्यातील एकाही स्त्रीची अब्रू जाऊ नये म्हणून यांनी आणि त्यांच्या नंतरही हजारो वीरांनी रक्त सांडलं, घाम गाळला तो याच गड-कोटांवर. तेंव्हा यांच्या समाध्यांसमोर तुम्ही लुटा माझी अब्रू..मनसोक्त...समजू दे त्यांना..हा महाराष्ट्र आता आपला राहिला नाही..इथंही पुन्हा मोगलाई आली आहे..आणि तुम्हालाही कसली भीती नाही.. कारण बलात्कार केला म्हणून हात पाय छाटणारा कुणी दुसरा शिवबा पुन्हा पुन्हा इथं जन्म घेणार नाहीये...”
असं म्हणत क्षणात तिनं आपला टी –शर्ट काढून बाजूला भिरकावला..जीन्स आणि अंतर्वस्त्रे ही फेकून देत ती क्षणात त्यांच्यासमोर पूर्ण नग्नावस्थेत उभी राहिली...कणखर आवाजात म्हणाली,
 “ हे पहा माझं शरीर. याचीच गरज आहे न तुम्हाला...पहा ही माझी योनी.. तुम्ही आणि मीच नव्हे तर हे अवघं विश्व इथूनच जन्माला आलंय.. मी नुसती एक स्त्री नव्हे तर जन्मदात्री आहे..जगत्जननी आहे..त्यामुळे.. म्हणूनच एकेकाळी याचं विश्वात लोक माता म्हणून आमची पूजा करायचे...
हे माझं पोट..तुमच्या सारख्या लाखो बाळांना “एक थेंब” होतात ना, तेंव्हापासून इथंच या गर्भाशयात सांभाळतो आम्ही स्त्रिया..तुम्हाला..! त्या नऊ महिन्यातला प्रत्येक क्षण करतो विचार तोही तुमच्या सारख्या बाळांचा..! तुम्ही सुखरूप जन्माला यावं म्हणून करतो उपास तापास.. करतो सगळे श्रम पण नाही होऊ देत तुम्हाला त्रास..
आणि तुम्ही मगाशी ज्याबद्दल अचकट विचकट बोलत होता नां, ते हे माझे स्तन...जन्मल्या बरोबर त्या इवल्याश्या जीवाला प्रचंड भूक लागलेली असते, ती भूक फक्त याचं स्तनातले दूध भागवू शकतं...जगातलं दुसरं कोणताही अन्न त्यांना आपण त्यावेळी देऊ शकत नाही असं आपलं विज्ञान सांगतं...आणि हे स्तन फक्त दूधच देत नाहीत त्या इवल्यश्या जीवाला, तर देतात एक अशी रोगप्रतिकार शक्ती की जी अजूनही औषधातून नाही मिळत...आणि त्या स्त्रीच्या, त्या स्तनपानाच्या जीवावर मग ते बाळ मोठं होतं असं तुमच्यासारखं बळकट..धडधाकट...दुसऱ्या स्त्रीची अब्रू लुटायला सज्ज झालेलं..”
बघता काय आता, या चालून पुढे..या वीरांच्या समाधीच्या साक्षीनं करून टाका माझ्या शरीराची विटंबना..भोगा पुन्हा पुन्हा हे शरीर.. तुमची वासना शांत होईपर्यंत..आणि मग माझा चोळामोळा झालेला देह ढकलून द्या या खालच्या दरीत...कारण उद्या उठून मी नाही जाऊ शकणार राजांच्या समाधी समोर मुजरा करायला...मलाच लाज वाटत राहील की माझ्याच लहान भावांकडून विटंबलेलं हे शरीर त्या राजाला कसं दाखवू ? ज्यानं आयुष्यभर स्त्रीची अब्रू सांभाळण्यासाठी आपलं शरीर कष्ट्वले होते....!”
 शांतपणे तिनं आपले हात डोळ्यावर घट्ट दाबून धरले इतक्यात त्यातला एकजण पुढे झेपावला.. आणि...
 तिच्या पायावर लोळण घेत रडत म्हणाला;
ताई, चुकलो..माफ कर मला..
दुसऱ्यानं पट्कन आपल्या स्याकमधून शाल काढली, तिच्या अंगावर टाकत म्हणाला;
“ताई, लाज वाटते आम्हाला आमचीच..खरंच आम्हाला माफ कर..आम्ही तिकडं तोंड करून उभं राहतो..तू कपडे घालून घे..”
 
तिघांनी डोळे पुसत आपली तोंडं पलीकडे फिरवली. तिनं शांतपणे आपले कपडे पुन्हा अंगावर घातले. मग त्यांच्या जवळ जात त्यांच्या पाठीवर हात ठेऊन म्हणाली..
“अरे आता रडू नका...कळली न चूक तुम्हाला...आणि तुम्ही माझ्या लहान भावासारखे..फक्त वाट चुकलावतात. वासनेच्या जंगलात भरकटला होतात.. तरी तुमच्यातला माणूस कुठतरी जिवंत आहे हे पाहून बरं वाटलं. खरं म्हणजे आज माझ्या अंगाला झोंबणारे हे तुमचे बळकट हात, आणि तुमच्या सारखी हजारो बळकट मुलं जेंव्हा  एखाद्या निर्लज्ज, हरामखोर माणसांची मानगूट पकडतील, त्याला शासन घडवतील  तेंव्हाच मला खरं आनंद होईल...आणि तेंव्हाच आपण राजांना मुजरा करायला ताठ मानेनं जाऊ असं वाटतं मला.. आता जास्त विचार नका करू..चला आता माझ्या सुलुताईच्या झापावर..”
 सुलुताई च्या झापावर येताच ती बाहेरूनच म्हणाली;
“ताई माझी भावंडं आलीयेत गं.. पहिल्यांदा शहाण्या माणसासारखी वागलीयेत ती..आज ती तुझी गावठी तांदळाची छान खीर करूया आपण चुलीवर त्यांच्यासाठी...”
 ------------
त्या झोपडीत मग मिणमिणत्या प्रकाशात चुलीवरच्या खिरीचा मस्त सुगंध दरवळू लागला आणि दूर उगवलेल्या चंद्राकडे पहात ती समाधानाने शांत बसून राहिली...!
 -    सुधांशु ाईक (nsudha19@gmail.com)