marathi blog vishwa

Saturday, 11 April 2020

अघळ पघळ मायदेव काका...

कित्येक माणसे आपल्या आसपास वावरलेली असतात. कालांतराने आपण  कुठेतरी लांब निघून जातो, कधी ती माणसेही कायमची दुरावतात. मात्र एखादी गोष्ट अशी घडते की त्यांची पट्कन आठवण होते. मायदेव काका अशांपैकी एक. काही दिवसांपूर्वी रस्त्यावरून जाताना एक माणूस अचानक “गुरुदेव दत्त..” असं जोरात म्हणाला आणि मला पट्कन मायदेव काका आठवले. “गुरुदेव दत्त..” आणि “स्वामी समर्थ” या जयघोषावर जणू त्यांचाच कॉपीराईट असावा इतकं ते त्यांच्याशी जोडलं गेलं होतं..!

“वेष असावा बावळा परंतु अंतरी नाना कळा..” ही ओळ बहुदा त्यांच्या सारख्या लोकांसाठीच असावी. ढगळ खाकी कपडे, गळ्यात घाम पुसायला गुंडाळलेला मोठा रुमाल, हातात सायकल आणि कपाळावरचा घाम पुसत जाणारी व्यक्ती म्हणजे मायदेव काका. समोर कुणीही असो, दिसल्याक्षणी “गुरुदेव दत्त” अशी त्यांची हाक ऐकू यायची आणि मग सुरु होई त्यांचं अखंड बोलणं. त्यांना बोलणं अत्यंत प्रिय. समोर लहान-मोठी, गरीब-श्रीमंत अशी कुणीही व्यक्ती असू दे मायदेव काका त्यांच्याशी मनसोक्त बोलत बसायचे. अवघ्या चिपळुणात सर्वांना त्यांची ही सवय माहिती. त्यामुळे कित्येक जण अनेकदा “मायदेव हल्ली कुठे दिसला नाही..” असं औपचारिकपणे न म्हणता, “ गुरुदेव दत्त कुठायत सध्या? दर्शन नाही बरेच दिवस..” असंच विचारायचे.
 अघळपघळ बोलणारे मायदेव काका गावभर सर्वत्र सुखेनैव संचार करायचे. सर्वांशी खूप बोलायचे. कुणाला ते आवडायचं...कुणी त्यांची टिंगल करायचं. त्यांनी मात्र मोकळं वागणं कधी सोडलं नाही.
मायदेव काका उर्फ चंद्रकांत मायदेव हे पंचायत समितीत शिपाई होते. चिपळुणात पागेवर आम्ही तात्या चितळेंच्या घरी राहायचो. तिथं मला आयुष्यात पहिले दोन मित्र मिळाले. एक म्हणजे बर्व्यांच्या चाळीत राहणारा वासुदेव चंद्रकांत मायदेव आणि दुसरा पलीकडे गोडसे चाळीत राहणारा मिलिंद तांबे. बालवाडीपासून आम्ही तिघे एकत्र असायचो. वासुदेव ला आम्ही सगळे कायम “माय God” या नावाने हाक मारीत असू. त्यामुळे पागेवर सर्वत्र भटकणे, विविध उत्सवात सहभागी होणे, खेळणे, पोहणे हे सगळं सुरु असे.
बर्व्यांच्या चाळीत जिन्याच्या खाली साधारण १० बाय १० च्या खोलीत मायदेव काकांचा संसार. काका-काकू आणि माझा मित्र असे तिघे तिथे राहायचे. ती लहानशी खोली अजून आठवते. एका बाजूला अंघोळ करायला लहानशी मोरी, पलीकडे एका टेबलवर gas शेगडी, पलीकडे काही डबे ठेवायला लहानसं कपाट, मध्ये दोरीवर अनेक कपडे टाकलेले, पलीकडे असलेली एक कॉट म्हणजे तिथली बेडरूम. तरी त्या खोलीत काका सुखाने राहायचे. आपलं घर लहान आहे, इतरांच्या तुलनेनं खूप नीटनेटकं नाही यामुळे खिन्न न राहता आल्यागेल्याचं छान आदरातिथ्य करायचे. आम्ही कुणी कधी घरी गेलो की, “बस रे..चहा टाकतो पट्कन..” असं म्हणून चहाच्या तयारीला लागायचे. सोबत बोलणं सुरूच असायचं. शाळेत काय सुरु आहे.. नवीन पाठांतर काय केलं वगैरे चौकशा सुरु असायच्या.
मायदेव काका मूळचे माखजन जवळील बुरुम्बाड चे. गरीब ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या काकांचे प्राथमिक शिक्षण तिथे झाले. त्यासोबत पुरुषसूक्त, श्रीसूक्त, रुद्र, सौरसूक्त, पूजाविधी आदि गोष्टीही तिथेच शिकले. पुढे कवी वा. गो. मायदेव ( गाई घरा आल्या या प्रसिध्द कवितेचे कवी) यांच्या परिचयातून त्यांना अमरावतीला नोकरी मिळाली. तिथे २-४ वर्षे राहिले. तिथंच तबला ही शिकले. मात्र माडा-पोफळीत, आंब्या-फणसात रमणारा हा कोकणी माणूस तिथं रमू शकला नाही. मग चिपळुणात दाखल झाले. पडेल ते काम करू लागले. कधी लघुरुद्र कर, कधी पूजा कर, कधी कुणासाठी काही कामं कर हे सांभाळून नोकरी देखील.
आम्ही नंतर पागेवरचे घर सोडून पंचायत समितीसमोर पाटकर चाळीत राहायला गेलो, त्यानंतर बुरूमतळीला केतकरांच्या घरात. इथे दोन्हीकडे मायदेव काका नेहमी यायचे. कुणाच्याही घरी त्यांचा सहज संचार अगदी थेट स्वैपाकघरापर्यंत असायचा.
आमच्याकडे आले की थेट आईला सांगायचे, “ वहिनी घोटभर चहा टाका हो..”.. आणि मग थेट, “काय म्हणतायत सगळे..” असं काहीबाही विचारून गप्पांना सुरुवात. बाबा असले की म्हणायचे, “ तुम्ही रुद्र वगैरे संथा घनुअण्णांकडून घेतलीये. तुमचे उच्चारही खणखणीत आहेत. तुमचं वाचन भरपूर. तुमच्याकडून नवी माहिती मिळते..वगैरे..वगैरे..” बाबांना उगीचच मोकळ्या-धाकळ्या गप्पा आवडत नाहीत हे कधीतरी त्यांच्या लक्षात आले. मग अवांतर फारस बोलायचे नाहीत. ते घरी आले की आम्हा मुलांच्या पोटात मात्र गोळा यायचा. कारण ते किंवा भार्गवकाका काळे हे नेहमी आम्हाला स्तोत्रं किंवा सुक्तांची कोडी घालायचे.
मायदेव काका देखील आल्यावर जरा वेळानं विचारायचे.. “ अमुष्यत्वत्सेवा समधीगतसारंभुजवह...” च्या पुढचं सांग पाहू.. मग आमच्या मेंदूतलं केंद्र ही ओळ कशातली हे शोधायला धडपडे. जर पट्कन “ बलात कैलासेपित्वधीवसत...” असं आम्ही पुढे म्हटलं की एकदम खूष होऊन जात. कधी महिम्न, कधी सौरसूक्त कधी रुद्र यातील काहीतरी विचारायला आवडे त्यांना. आम्हा मुलांना मात्र भीती वाटे चुकलं तर ओरडतील याची. पण ते कधी ओरडले नाहीत. त्यांचा स्वभाव मायाळू होता. स्वतःच्या आणि इतरांच्याही मुलांवर जीव होता त्यांचा. पुढे मोठं झाल्यावर देखील अनेकदा ते हायस्कूलमध्ये किंवा कॉलेजला वगैरे आले तरी मला सांगायचे, “आमचा वासुदेव आहे ना रे नीट. करतो ना रे अभ्यास. त्याच्यावर सगळी आशा आमची. सांभाळून घ्या रे तुम्ही सगळे त्याला.” असं काहीतरी सांगून मग सगळ्या मुलांना काही खाऊ द्यायचे. कधी लाडू, कधी फरसाण, कधी चकली, कधी चिवडा... त्यांची परिस्थिती कशी हे पूर्ण माहिती होतं सगळ्यांना. त्यामुळे त्यांनी कधी काही दिलं नसतं तरी कधी राग आलाच नसता. मात्र ते कधीही रिकाम्या हाताने वावरले नाहीत. कित्येकदा रस्त्यात भेटले तरी पट्कन खिशातून चणे – शेंगदाणे काढून देत.
त्यांच्या अघळपघळ स्वभावामुळे, उगीचच प्रत्येकाशी घसट करत बोलण्यामुळे अनेकजण त्यांना नावंही ठेवत. त्यांची चेष्टा करत. मात्र त्या चेष्टेला त्यांनी कधी चिडून दुरुत्तरे केली नाहीत. कधी वादावादी केली नाही. मात्र स्वतःचा स्वभावही बदलला नाही. वासुदेवची आई अंगणवाडी सेविका होती. तिथे शाळेत शिकवायची. कधी त्याही आमच्याकडे यायच्या. आईसोबत गप्पात रमायच्या. नवऱ्याच्या तऱ्हेवाईक स्वभावाबद्दल, कधी कुठे दुखलं खुपलं असेल तर त्याबाबत सात्विक संतापानं बोलत बसायच्या. मन मोकळं करायच्या. हे असं सगळ्या संसारात असतंच. मात्र त्या दोघांचं नातं हे काही खास असायचं. दोघांचा आपल्या मुलावर प्रचंड जीव होता. आपला मुलगा मोठा व्हावा यासाठी खरंच अखंड राबले दोघंही.
त्यांना आपल्या मुलाचं मोठं होणं पाहता आलं. लहानशा त्या एक खोलीच्या संसारात या तिघांचं जगणं कसं असेल याची कल्पनाही करवत नाही. मात्र माझा मित्र हा वासुदेव उर्फ मायgod हाही वेगळाच. त्यानंही कधी जे नाही त्याबद्दल तक्रारीचा सूर काढला नाही. जे जसं मिळेल त्यात तोही मजेत राहिला. खेळ, नाटक, बासरी वाजवणे, अभ्यास या सगळ्यात मनापासून सहभागी होत राहिला. इंजिनिअर झाला. 
आपला मुलगा गुणी आहे याचा अभिमान मायदेव काकांच्या बोलण्यात नेहमीच असायचा. आज तो मुंबईत आहे. वीज कंपनीत मोठ्या पदावर आहे. तो तेंव्हा नुकता कुठे स्थिरावलेला. ते पाहून एकदिवस मग काका हे जग सोडून निघून गेले.
हल्ली माझंही चिपळूणला जाणंही कमी झालंय. कधी गेलो की रस्त्यावरून जाताना अवश्य वाटतं की कुठेतरी मायदेव काका सायकलवरून येताना दिसतील...आणि कानावर खणखणीत हाक येईल... “गुरुदेव दत्त..स्वामी समर्थ...”
 “कधी आलायस रे..घरचे सगळे कसे आहेत..?” असं विचारत नेहमीच्या पध्दतीने ते गप्पा मारायला सुरुवात करतील. बघता बघता २०-२५ मिनिटं निघून जातील. मग जाता-जाता हातावर थोडेसे चणे ठेवतील.. “ छान सुखी रहा रे सगळे..” असं सांगत सायकलवरून निघून जातील. त्या हातावरच्या चण्याना नेहमीप्रमाणे निःस्वार्थी स्नेहाचा सुगंध असेल.
दरवेळी असं वाटतं की लहानपणी पाहिलेली ही अशी माणसं अजूनही तशीच असतील..तशीच भेटत राहतील.. पण आता ते कधीच घडणार नसतं...कधीच घडणार नसतं..!
-    सुधांशु नाईक (९८३३२९९७९१), कोल्हापूर.

Sunday, 5 April 2020

तेजस्वी सुनीताबाई....

सुनीताबाई. काही मोजके साहित्यप्रेमी वगळता त्या आता जणू सर्वांच्या विस्मरणातच गेल्याहेत. मंगला गोडबोले यांच्या " सुनीताबाई" या पुस्तकानं त्यांच्याबाबतच्या विचारांना पुन्हा चालना दिली. त्यानिमित्ताने हे लेखन....

पु.ल. देशपांडे या खेळिया ची ही अर्धांगिनी. त्यांच्याइतकीच कर्तृत्ववान, त्यांच्यारखीच प्रतिभावान अन् त्यांच्यापेक्षा सामर्थ्यवानही!
सुनीताबाईंचं सामर्थ्य अनेक बाबतीत लख्ख जाणवणारं आहे. एका चांगल्या घरची ही मुलगी पुढे बेचाळीसच्या चळवळीत भूमिगत क्रांतिकारक/ कार्यकर्तीचं काम धडाक्यात अन् जबाबदारीने पार पाडते. नंतरच्या आयुष्यात जेव्हा स्वातंत्र्यसैनिकांच्या पेन्शनचा मुद्दा येतो तेव्हा नया पैसा घ्यायलाही नाकारत म्हणते, " देशसेवा हे माझं कर्तव्य होतं. मी केलं. ती काय नोकरी नव्हती पेन्शन घ्यायला." खोटे दाखले जोडून जेव्हा काहीजणांकडून आयुष्यभर पेन्शन मिळवली जाते तेव्हा असं करणा-या सुनीताबाईंचं तेजस्वीपण अधिक तळपदारपणे समोर येतं. 

त्यांचा सर्वत्र संचार असाच होता हे अनेकजण सांगतात. खरंतर आम्ही जरा कुठे वयात आलो, चार गोष्टी उमगू लागल्या तेव्हा  हे दोघंही उतारवयात होते. बहुतेक सर्वच कार्यक्रम बंद झालेले. क्वचित कुठेतरी भाषणाला पु. ल. जात असायचे. आमच्या चिपळूणच्या वाचनमंदिराच्या इमारतीचा जीर्णोध्दार झाला तेव्हा पुलंनी केलेलं भाषण ऐकलेलं. तितपतच त्यांचा वावर उरलेला.

त्यामुळे माझ्या पिढीला पु.ल.- सुनीताबाई भेटले ते मुख्यत: पुस्तकांतून, आॅडियो- विडियो रेकाॅर्डिंग्ज मधूनच.
" आहे मनोहर तरी.." मधून किंवा " जीएंच्या पत्रसंवादातून" सुनीताबाई सामो-या आल्या होत्याच. तर नंतरच्या काळात सोयरे सकळ किंवा मण्यांची माळ सारख्या पुस्तकांतूनही. मात्र त्यापेक्षा जास्त ठसठशीत असं त्यांचं दर्शन जे घडलंय ते इतरांच्या लेखनातून.

***
बहुतेकांच्या लेखनात त्यांचं कठोरपण, करारीपण, बारीक बारीक तपशील पहाण्याची काटेकोर नजर व छानछोकीत न रमलेलं साधेपण जाणवतंच. त्या पलीकडे जात आपल्या नव-याला जपणारी, त्याचं कलाविश्व फुलतं रहावं म्हणून अनेक गोष्टी सांभाळणारी, प्रसंगी बदनामी स्वीकारायला तयार अशी जी खमकी स्त्री दिसते ती भन्नाट आहे. 
त्यात परत गंमत अशी की त्यांनाही प्रतिभेचं वरदान आहे, त्यांच्याही अंगी उत्तम अभिनयक्षमता आहे, त्यांच्याही लेखणीवर सरस्वतीचा वरदहस्त आहे तरीही कोणतीही ईर्षा न बाळगता, त्या स्वत:चं सगळं बाजूला सारुन नव-याला फुलू देतात. तेही पुन्हा युगायुगांच्या सोशिक स्त्रीमूर्तीसारखी न बनता..! प्रसंगी नव-याला लेखनातल्या चुका परखडपणे सुनावतात. कित्येक गोष्टी पुन्हा लिहायला उद्युक्त करतात.
नव-याच्या सवयींचे लाडकोड पुरवताना त्याच्यासोबत अनेक कार्यक्रमात सक्रीय सहभाग नोंदवतात. प्रसंगी कौतुकाची अपेक्षा न करता, झालेल्या कौतुकानं शेफारुन न जाता नवनिर्मितीचा ध्यास बाळगतात. 
हे सारं करताना त्यांच्यातलं गृहिणीपण कधीही सुटत नाही. म्हणूनच पैसा असो वा ओढग्रस्तीचे दिवस, त्या सगळ्या गोष्टी निगुतीनं निभावून नेतात. परत काहीही करताना तडजोड करत कसंतरी न उरकता केलेल्या प्रत्येक गोष्टीत सर्वोत्तम दर्जा जपायची अथक धडपड करतात.

***
मंगला गोडबोलेंच्या पुस्तकात या सर्व गोष्टी जाणवू देणारं मग बरंच काही दिसत रहातं. 
उदा. हे पत्र पहा.. मोहन ठाकूर हे बंधू त्यांच्या पत्रात सुनीताबाईंविषयी लिहितात, 
" माईच्या काटकसरी रहाण्याची आम्ही काहीजण खूप चेष्टा करायचो. उधळपट्टी न करण्यामागे तिचा एक उद्देशही होता. सांसारिक गरजा अधिक असल्या की मग त्या भागवण्यासाठी पैसे कमवायचे आणि ते कमवण्यासाठी काही न काही  तडजोडी करायच्या. भाईंना आपल्या आयुष्यात अशा कोणतीही तडजोड करायला लागू नये यासाठी माईच्या काटकसरी वागण्याचा खूप फायदा झाला. 
पुढे जेव्हा स्वकष्टार्जित पैसे मिळू लागले तेव्हासुध्दा जास्ती पैसे आले तर ते समाजकार्याला खर्च करावे पण स्वत:च्या गरजा विनाकारण वाढवू नये हा दोघांचाही स्वच्छ उद्देश राहिला.."

हे समाजकार्य करतानाही सुनीताबाईंनी कधी स्वत:चा उदोउदो केला नाही हे मला फार महत्वाचे वाटते. आजकाल पतीची ऐपत, त्याची पदं, त्याची प्रतिष्ठा इतकंच नव्हे तर मुलांची शाळा त्यांच्या अॅक्टिव्हिटीज याबाबत कित्येकजणी इतकी फुशारकी मारत असतात की ऐकायचा वीटच येतो. त्याचवेळी सुनीताबाईंचं हे निस्पृह वागणं मनाला भिडतं. त्या बहुतांश कार्यक्रमात कधीही स्टेजवर पुलंसोबत बसल्या नाहीत. इतकंच नव्हे तर निमंत्रण पत्रिकेतदेखील आपलं नाव येणार नाही याची दक्षता अनेकदा घेत राहिल्या. ज्या अनेक संस्थांना लाखो रुपये ' पु ल देशपांडे प्रतिष्ठान' मार्फत दिले गेले तिथे कुठेही आपलं नाव येऊ नये यासाठी सजग राहिल्या.
अपवाद काही 2, 3 संस्थांच्या वेगळ्या कार्यक्रमांचा. 
एक वेगळा प्रसंग मंगलाबाईंनी नोंदवलाय तो खरंच कौतुकास्पद. "रत्नागिरीच्या पटवर्धन हायस्कूलला 100 वर्षं झाल्याबद्दल त्यांनी एक वैयक्तिक धनादेश दिला. मात्र ते पैसे कोणताही वर्ग किंवा अन्य काही बांधायला नव्हे तर शाळेच्या परिसरातील मुलींच्या प्रसाधनकक्षाच्या बांधकामाला दिले. आज अनेक शहरातील बहुतेक सर्व शाळांमधली प्रसाधनगृहं ही अस्वच्छ, गलिच्छ असतातच. मात्र त्यासाठी कुणीच मदत करत नाही. सुनीताबाईंचं मोठेपण यासारख्या कृतीतून ठळकपणे नजरेत भरतं. इतकंच नव्हे तर त्यांनी मुद्दाम आपल्या देणगीचा फलक त्या प्रसाधनगृहावर लावायला सांगितला व हे पाहून आता इतरही लोक याचे अनुकरण करतील हे सूचित केले."
आपण एकट्यानं दान देऊन फार मोठा फरक पडणार नाही पण त्यामुळे इतरांच्या मनात दानाची जाणीव निर्माण व्हावी यासाठी त्यांची धडपड असायची.

***
सुनीताबाईंचे विचार व आचार यात कधी तफावत नसायची. त्यांचे तिखट विचार त्या स्वत: आधी आचरणात आणून दाखवायच्या. अगदी देवपूजा, कर्मकांडांचंच उदाहरण घ्या ना. 
त्यांना स्वत: ला कधीच दैववाद मंजूर नव्हता. आयुष्यात कधीही त्यांनी देवपूजा केली नाही. मात्र याबाबत इतरांचे स्वातंत्र्य कधी नाकारले नाही. ' वा-यावरची वरात' च्या काळात त्यांच्याकडे गफूर नावाचा एक मदतनीस होता. प्रयोगापूर्वी नारळ फोडणे, धूपदीप करणे हे त्याला गरजेचं वाटे. त्याला सुनीताबाईंनी कधीच हरकत घेतली नाही. तसंच सहवासात आलेल्या पं. मल्लिकार्जुन मन्सूर, साधनाताई आमटे, विजया राजाध्यक्ष आदि स्नेह्यांची पूजापाठाची वेळ, त्याची साधनं हे सांभाळत राहिल्या. 
पुलंचे आजारपण असो किंवा तत्पूर्वीच्या आयुष्यातील अनेक अडचणीचे दिवस असोत त्या नेहमीच प्रयत्नवादी राहिल्या. कधीही नवसायास, पूजापाठ करत राहिल्या नाहीत. आपल्या कर्तव्यात कधीही कुचराई करत राहिल्या नाहीत.
पुलंच्या मातुश्री लक्ष्मीबाई एका पत्रात म्हणतात की, " सुनीता खंबीर आहे म्हणून भाई आहे. नाहीतर त्याची परवड झाली असती. सिनेमाच्या दिवसात भाई रात्रीचं शूटिंग करुन पहाटे चारला घरी यायचा. तेव्हा सुनीता तोवर उपाशी असायची. रात्री दोन नंतर स्वैपाक सुरु करायची, चारला नव-याला जेवायला गरमगरम वाढून मगच स्वत: जेवायला बसायची."
हे करणा-याही सुनीताबाईच असतात !
गृहिणीपण त्यांना मनापासून आवडत असे. साधी भाजी चिरतानाही त्यात नीटनेटकेपणा असे. त्यांनी वाटण केल्यानंतर पाटा वरवंटा किंवा जेवल्यानंतरचं ताट ही पहात रहावं असं असे. किचनमधली प्रत्येक वस्तू जागच्या जागीच असायच्या. अगदी तसंच प्रत्येक पदार्थाची चवदेखील. कोणत्या पदार्थात काय घालायचे याबाबत त्या नेहमीच दक्ष असायच्या. तो पदार्थ चविष्ट बनवतानाच त्या पदार्थाचं रुपही देखणं असावं यासाठी बारीक सरीक काही करत रहायच्या.

***

सुनीताबाई स्वत: स्वतंत्र प्रतिभेच्या व्यक्ती होत्या. मात्र बिजवर अशा पुलंच्यासोबत प्रेमाचा संसार सुरु केल्यावर त्यांनी पुलंमधला खेळिया फुलवत ठेवायला जणू स्वत:च्या आवडीनिवडींना बाजूला ठेवलं. डोळ्यात तेल घालून पुलंवर लक्ष ठेवलं. पुलंचे एकपात्री प्रयोग हे तसे दमछ्क करणारेच. सुनीताबाई तेव्हा पटकन् घेता येईल इतकं घोटभर पाणी घेऊन विंगेत उभ्या रहात. रंगमंचावरच्या एखाद्या गिरकीत पटकन् पुलं तिथं येऊन ते घोटभर पाणी पिऊन पुढचा खेळ रंगवत, समोर प्रेक्षकांना याचा पत्ताही लागत नसे! 
पुलंच्यात असामान्य प्रतिभा नक्कीच होती मात्र त्याचे थक्क करणारे प्रकट आविष्कार तसंच पुलंचं अष्टपैलू असं जे व्यक्तित्व आपल्यासमोर उभं राहिलं त्यामागे सुनीताबाईंच्या अथक परिश्रमांचा, पूर्वतयारीचा मोठा भाग आहे. ज्याकडे कधीच दुर्लक्ष करता येणार नाही. 

हे सांभाळताना त्यांनी त्यांच्यातली लेखिका जरुर जागवत ठेवली मात्र स्वत: ला कधी लेखिका म्हणवून घेतलं नाही. त्या नेहमीच स्वत:च्या जाणिवांविषयी लिहीत राहिल्या. निसर्ग, माणूस, पशु पक्षी, झाडं- पानं फुलं अन् अनेक अनुभवांविषयी लिहीत राहिल्या. त्या नेहमीच स्वत: ला वाचक, एक रसिक मानत राहिल्या.

***
आयुष्यभर अनेक मानसन्मान, गौरव, कौतुकसोहळे करवून घेणं त्यांना सहज शक्य होतं. मात्र त्यांनी सदैव एकटेपण स्वीकारलं. पुलंच्या निधनानंतर मोजक्या व्यक्ती सोडल्या तर बहुतेकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. मात्र त्याचा त्यांना कधीच विषाद नव्हता. किंबहुना हे असंच घडणार यासाठी जणू त्यांची मानसिक तयारीच होती. 
आयुष्याच्या अखेरच्या दिवसातही त्यांनी शांतपणे सगळ्याची तयारी ठेवत स्वत: ला चार भिंतीतच ठेवलं. अखेरच्या क्षणांपर्यत त्यांच्या सोबतीला राहिली त्यांची लाडकी कविता. कवितेवर त्यांचं इतकं प्रेम की शेवटच्या काही दिवसात माणसांशी बोलणं, ओळखणं कमी झालं तरी कवितेविषयीची जाणीव लख्ख जागी राहिली. पडल्यापडल्या त्या कित्येक कविता पुटपुटत राहिल्या. कधी आरती प्रभूंची, कधी बोरकरांची, कधी मर्ढेकरांची....त्या कवितेनं त्यांची खरंच अखेरपर्यंत सोबत केली. 
एक तेजस्वी, कणखर, बाणेदार अशी स्त्री चंदनासारखी आयुष्यभर झिजत राहिली अन् शांतपणे अनंतात विलीन झाली.
आज अनेक वर्षांनी त्यांच्याविषयी वाचताना ही किती थोर बाई होती या जाणिवेनं ऊर भरुन येतो. त्यांच्या आयुष्यातील कळालंल्या, न कळालेल्या अनेक जागा मग मनात आठवत राहतात... कधी सुखावतात...कधी अस्वस्थ करतात.
- सुधांशु नाईक(९८३३२९९७९१) , कोल्हापूर. 🌿

Wednesday, 25 March 2020

कणखर पोलादी असा ग्राहम होप्स

गेल्या 27 वर्षात नोकरी व्यवसायामुळे अनेक माणसांशी संपर्क आला. त्यातील ज्या काही मोजक्या व्यक्ती कायम लक्षात राहतील त्यातच एक होता ग्राहम होप्स ( Graham Hopps). कित्येक रात्री आम्हाला झोपू न देणारा हा माणूस नंतर माझा छान मित्रही बनला..!


ग्राहम मूळचा इंग्लंडचा. कतारमधील एका अत्यंत कठीण अशा प्रोजेक्टवर काम करत असताना तो भेटला. नकोसा झालेला तो आमच्या कंपनीला. मात्र त्याच्यासोबतच मला मात्र जुळवून घेत काम करावं लागणार होतं...!
बहारीन मधला L&T चा आमचा प्रोजेक्ट संपत आलेला. पुढच्या प्रोजेक्ट साठी मी दुबई- अबुधाबी ला कुठेतरी जायचं असं वरिष्ठ पातळीवर ठरत होतं. आणि अचानक बॉम्ब पडला. आमच्या गल्फ हेडनी सांगितलं की, “कतार मधल्या हलुल आयलंड प्रोजेक्टवर गोंधळ सुरु आहे. दोन प्रोजेक्ट manager पळून गेलेत. दोन जणांना क्लायंट ने नाकारलं आहे. तिथे महत्वाचा माणूस हवाय. तू ताबडतोब तिकडे जायला हवं”. त्या प्रोजेक्ट बाबत कळले होतेच. जायची मुळीच इच्छा नव्हती मात्र सर्वोच्च पोस्टवरील साहेबाचं म्हणणंही टाळणं शक्य नव्हतं.
विविध सोपस्कार पार पाडून मी गडबडीने क़तार ला कंपनीच्या गेस्ट हाउस मध्ये दाखल झालो. त्यापूर्वी क्लायंटसमोर मला दाखवण्याचे” “ होकार मिळवण्याचे सोपस्कार पार पडले गेले होतेच.

मी दुपार नंतर पोचलो आमच्या प्रोजेक्ट ऑफिसला. माझ्या हाताखाली तुलनेनं नवीनच असलेली ४-५ मंडळी असणार होती. आपलं मुख्य ऑफिस तुम्हाला सगळा सपोर्ट देईल वगैरे आश्वासनं घेऊन मी माझ्या टीमकडे वळलो. सगळे प्रचंड घाबरलेले होते कारण दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता weekly progress review मिटिंग होती..! आणि ती मीटिंग ग्राहम च्या नेतृत्वाखाली होत असे..!

मिटिंग मध्ये कोणते महत्वाचे प्रश्न समोर येतील, आपण आपला बचाव कसा करायचा वगैरेबाबत चर्चा, रिपोर्ट फायनल करणे यात रात्रीचे १० वाजून गेले होते. त्यानंतर कधीतरी गेस्ट हाउस ला येऊन जेवून झोपी गेलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी ५.३० वाजता ग्राहम चा फोन. सुप्रभात वगैरे ५-१० सेकंदांची औपचारिकता संपल्यावर त्याची तोफ सुरु झाली... साईट वर काय काय झालं काल समजलं काय? त्याबाबत सगळे डीटेल्स घेऊन या तुम्ही... तुमची कंपनी युसलेस आहे... तुम्ही कधीच हा प्रोजेक्ट पुरा करू शकत नाही वगैरे...वगैरे..
सकाळ झाली होती..! पुढचे कित्येक दिवस रोजचा दिवस कसा उजाडणार त्याची ही नांदी होती..!
ही दर आठवड्याची मिटिंग होऊच नये, काही न काही कारणाने रद्द व्हावी असं आमच्या टीमला सतत का वाटत असे हे तिथे गेल्यावर कळले.
----
हलुल आयलंड. क़तार पासून १०० किमी आत समुद्रात असलेलं हे बेट. येथे क़तार च्या समुद्रात सापडणारे सर्व खनिज तेल एकत्रितपणे मोठमोठ्या टाक्यांमधून साठवले जाते. त्याविषयी जास्त काही मी सांगणार नाही कारण ते सर्व गोपनीय आहे. तिथे तोपर्यंत वीजपुरवठा हा जनरेटर्स च्या माध्यमातून होत होता. त्या ऐवजी कतार पासून हलुल पर्यंत समुद्राच्या तळाशी १०० किमी लांबीची १३२ केव्ही या उच्च दाबाची वीजवाहिनी टाकायची. दुसऱ्या टोकाला वीज केंद्र उभं करून सगळं त्याला जोडायचं असा हा प्रकल्प. पहिल्यांदाच त्या सर्व भागात घडणारा..!

क़तार पेट्रोलियम चा हा प्रोजेक्ट. ते प्रमुख. केबलचं काम करायला एक कोरियन कंपनी आणि बाकी सर्व कामं करायला आम्ही L&T चे भारतीय. ग्राहम त्या कोरियन कंपनीचा २ नंबर फळीतला अधिकारी होता, आणि त्याच्यासोबत आम्हाला रोज सर्व कामांचे नियोजन, निगराणी करायची होती..!
 समुद्र किनाऱ्याजवळील प्रवाळ खडकांना धक्का बसू नं देता त्यांना दुसरीकडे हलवणे, प्रोजेक्ट ला काम करायला साईटवर येणाऱ्या लोकांसाठी कॉलोनी उभी करणे, सुमारे चार-पाचशे लोकांचं जेवण दिवसात दोनदा बनू शकेल असं मोठं किचन, जेवणाचा हॉल उभा करणे, पाणी पुरवठा आणि ड्रेनेज सिस्टीम तयार करणे अशी अन्य कामही मुख्य कामासोबत करावी लागणार होती... आणि या सर्वांसाठी logistics यंत्रणा नव्हतीच. ती नव्याने घडवावी लागणार होती..!

मुख्य वीजकेंद्र उभं करणं या व्यतिरिक्त अन्य कामांपैकी बहुतेक कोणतीही गोष्ट माझ्या हाताखालील टीमला फारशी माहितीच नव्हती..! आमच्या वरिष्ठांना कामाची कल्पना असली तरी दूर समुद्रातील बेटावर हे सगळ कसं उभं करायचं याचा प्रत्यक्ष अनुभव नव्हता. त्यामुळे जे बजेट तयार केलं गेलं होतं तेही अंदाजाने.
अशा परिस्थितीत तिथं कामासाठी जाणे म्हणजे जणू आत्महत्याच अशी सर्व अन्य प्रोजेक्ट managers भावना असल्याने सर्वांनी पळ काढला होता आणि मी तिथे पोचलो होतो..! आणि मला रोज ग्राहम ला तोंड द्यायचं होतं.



---
२०१३ मधल्या त्या पहिल्या वीकली मिटिंगचं दृश्य आजही मी विसरू शकत नाही. एका खूप मोठ्या टेबलच्या समोरच्या बाजूला त्या कंपनीचे ७-८ गोरे लोक बसलेले. ३-४ जण ब्रिटीश, कुणी तुर्कीचे, कुणी स्पेन चे आणि २ -३ कोरियन ही. इन्जिनिअरिन्ग डिझाईन, परचेस, contract, finance, Health and safety, क्वालिटी कंट्रोल आदि डिपार्टमेंटचे. सगळ्यांच्या समोर आम्ही ४ जण.

एक ज्वलंत विषय गेले दोन दिवस चर्चेत होता, आमची साईट वरील टीम तिथे एरियात खोदकाम आणि लेवालिंग करत होती. त्यांनी खोदकाम करताना पाण्याची एक लहानशी 1 इंची लहानशी पाईपलाईन तोडली होती. ती पुन्हा काही मिनिटात जोडलीही गेली, मात्र ग्राहम चे म्हणणे होते की आमचा साईट वरील manager अननुभवी आहे आणि त्याला ताबडतोब काढून टाकावे.

मग मी शांतपणे सागितले की काही लहानशी चूक झाली म्हणून एखाद्याला ताबडतोब काढून टाकणे हे योग्य नव्हे. आपण योग्य ती खबरदारी घेऊ. तसेच तिथे साईटवर योग्य नकाशे आपल्याला मिळालेले नाहीत, जमिनीखाली खूप पूर्वी काही काम केलं असेल तर त्याची  as built drawings आम्हाला ताबडतोब मिळवून द्यावीत, ती जर दिली नाहीत तर असं पुन्हा घडणे शक्य आहे.

आणि मग ग्राहम पेटला. त्याची अपेक्षा होती की मी लगेच त्याचं ऐकेन, आमच्या साईट manager ला परत बोलवेन... मात्र मीही बाह्या सरसावलेल्या त्याला पसंत पडले नाही. मी माझ्या टीमच्या पूर्ण पाठीशी उभा राहिलो. प्रत्येक गोष्टीबाबत योग्य documents बनवून ठेवायच्या सर्वांना सूचना दिल्या हेही त्याला आवडलं नाही.

आणि तिथून मग जवळपास रोजची फोनवरून होणारी भांडणं, इमेल वरूनची भांडणं सुरु झाली. मला पाठवलेल्या मेल ची कॉपी तो माझ्या व त्याच्या वरिष्ठांना मुद्दाम मार्क करायचा. जणू त्यामुळे मी घाबरून जाईन असं त्याला वाटत असावे. मी उलट याच गोष्टींचा फायदा करून घेतला.
एकूणच प्रोजेक्ट स्पेसिफिकेशन मध्ये किती त्रुटी आहेत, कोणती गोष्ट आमच्या अखत्यारीत नाही, कोणत्या कामाला क्लायंट मुळे उशीर होतोय किंवा झालाय हे सगळं मी त्यात सांगू लागलो. दिवसात १०-१२ मेल यायचे त्याचे. त्यावर उत्तरं द्यावी लागायची. ते सगळं सांभाळून अन्य कामं करायची. त्यात पुन्हा लोकांचे कॉल्स, यंत्र-सामुग्री देणाऱ्या venders च्या मिटींग्स या सगळ्यात रात्रीचे १० कधी वाजून जात ते कळत नसे.

मग मी अधिकृत पत्रव्यवहार करून सगळ्याचं रेकॉर्ड तयार केलं. ती पत्र जशी वरिष्ठांना मिळू लागली त्यामुळे ग्राहम अधिकाधिक भडकू लागला. कारण मी त्याच्या वरिष्ठांना पत्र लिहिणं त्याला मंजूर नव्हते. आणि मग रोजच्या भांडणांना अधिकाधिक धार येऊ लागली. रोज कुठलातरी एक मुद्दा घेऊन आम्हाला छळणे हा त्याचा जणू छंद बनला. त्याच्या प्रत्येक इमेल ला, प्रत्येक पत्राला मी तितकच ठोस उत्तर देत होतो मात्र शांत भाषेत. कारण शेवटी तो आमचा क्लायंट होता..!
या माणसाला कामाची अचूक माहिती आहे मात्र त्याला इतका इगो का, इतका superiority complex याचा मग मी शोध घेऊ लागलो.
-----
ग्राहम विविध प्रोजेक्ट्सवर काम करून आलेला. त्याहीपेक्षा महत्वाचं काही त्याच्यासोबत घडलं होतं ते इराकमध्ये.
इराकमध्ये तो २००३ मध्ये एका प्रोजेक्टवर काम करत होता. बसरा या शहरात. तेंव्हा तिथे युद्धजन्य परिस्थितीच होती. साईटवर जायचं तर सोबत सैनिक घेऊन जावं लागे. एक दिवस काही कामासाठी त्याला बाहेर जायचं होतं तर काही रस्ते बंद केलेले. कार मधून ते जात होते आणि रस्त्यावर बॉम्बस्फोट झाले. ग्राहम ला जेंव्हा शुध्द आली तेंव्हा कळले की शेजारी असलेल्या इराकी माणसाचे डोकेच गायब आहे आणि त्याला खूप ठिकाणी लागलं आहे. तो पुन्हा बेशुद्धावस्थेत गेला.

हॉस्पिटलमध्ये कित्येक तासानंतर तो शुद्धीवर आला. प्रथम बसरा मध्ये आणि नंतर इग्लंडमध्ये तो कित्येक महिने हॉस्पिटलमध्येच होता. त्याचा उजवा खांदा पूर्ण निकामी झालेला आणि शरीरात लहानमोठ्या अशा १३६ शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या..!

त्याच्या पत्नीला प्रथम सांगण्यात आले की त्याला थोडीफार दुखापत झालीये. मात्र ती जेंव्हा हॉस्पिटलमध्ये त्याला पाहायला आली तेंव्हा त्याचा अवतार पाहून खुर्चीतून ती खालीच कोसळली...! इतकं सगळं ग्राहम ने सोसलं. त्या वेदना, तो त्रास सहन करत तो त्या अंथरुणातून उठून बसला. इतकंच नव्हे तर त्याने इराकी मिलिटरी आणि त्याच्या कंपनीवर केस देखील केली. माझ्यासोबत सैनिक न दिल्याने मला इतका शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला..असं सांगत त्याने 1 मिलिअन युरो चा खटला दाखल गेला. कोर्टात तो खूप भांडला. मात्र सैनिक असता तर त्याला इजा झाली नसती असं काही शक्य नव्हते त्यामुळे त्याचा दावा मंजूर होऊ शकला नाही. या अपघातानं त्याला भरपूर शारीरिक इजा झाली. त्याच्या उजव्या हाताने साधा बल्ब बदलणे इतकं काम ही तो करू शकत नसे. अनेक रात्री मानसिक अस्वास्थ्यामुळे झोप येत नसे.
या सगळ्यातून सावरून तो पुन्हा कामाला लागला होता.! विविध प्रोजेक्ट्सवर काम करत होता.. मला त्याच्याविषयी खूप कौतुक वाटलं. साध्या साध्या अपघाताने, आजारपणाने आपण हतबल होऊन जातो तिथं हा पठ्ठ्या मात्र पुन्हा पाय रोवून उभा होता..!
---
दुसऱ्या दिवशी कामानिमित्त आम्ही भेटलो. त्यानंतर मी त्याच्याशी गप्पा मारत बसलो. त्यानं जे भोगलं, सोसलं त्याविषयी कौतुक आणि सहानुभूती व्यक्त केली. ग्राहम सुखावला. मात्र म्हणून त्याचं वागणं बदलणार नव्हतंच.

मी माझ्यापरीने काम करत राहिलो. मुख्यतः आम्ही कतार च्या राजधानीत दोहा येथे राहत होतो. मात्र साईटवर सुरु असलेल्या कामाची पाहणी करायला हेलिकॉप्टर ने जात होतो. साईटवर सध्या खिळ्यापासून ते फळे, भाजीपाला, धान्य, टिशू पेपर्स सह मोठ्या मशिनरी पर्यंत कोणतीही वस्तू केवळ बोटीने पाठवावी लागे. दर ८-१५ दिवसांनी जाणाऱ्या बोटीवर काय काय पाठवायचं याचं खूप बारकाईने प्लानिंग करावं लागे. अनेकदा त्यासाठीही, सेफ्टी डिपार्टमेंटच्या कामांसाठी साईटवर जावं लागे. कित्येकदा मग ग्राहम ही सोबत यायला लागला.
आपलं जिथे काही चुकेल तिथं सरळ ते कबूल करायचं. जिथे एखादी गोष्ट समजत नाही तिथे त्याबद्दल नीट खुलासा मागायचा ही माझी नेहमीची पद्धत. माझ्या पारदर्शक कामामुळे त्याला माझ्याविषयी विश्वास वाटू लागला. इतका विश्वास की त्याच्या अनुभवामुळे त्याला समजू शकणाऱ्या, कामाबाबतच्या काही खास गोष्टी तो मलाही सांगू लागला. प्रोजेक्ट्स ला पुढे कोणते प्रॉब्लेम्स येऊ शकतात याबाबत आधीच त्याला काय वाटतं ह्याबाबत चर्चा करू लागला. कित्येकदा त्याचं मत मला पटायचं नाही कारण सतत तो कुणाला तरी दोष देत असायचा. कधी कोण्या उत्पादकाला कधी कुणा इंजिनिअर ला, कधी कुण्या सहकाऱ्याला..

मात्र मी शांतपणे त्याचं ऐकून घ्यायचो. आमच्या सगळ्या टीमला ही सांगून ठेवलं होतं की ग्राहम तुमच्यापेक्षा वयाने मोठा आहे, घरात एखादा खडूस ज्येष्ठ माणूस असतो तसा तो आहे असं समजा. त्याला उगीच उलट उत्तरं देऊ नका. जे काही सांगायचं ते मी सांगेन. तुम्ही त्याला उगीच चिथावू नका...
तरीही तो काही खूप प्रेमाने वागू लागला असं नव्हे. सतत समोरच्याला घाबरवत राहणं त्याला बहुदा आवडत असावं. आम्ही त्याला घाबरायचं बंद केलं. त्याचा मान जरूर ठेवला मात्र कोणत्याही चुकीच्या आरोपांना कधीच स्वीकारलं नाही.. त्याचा प्रतिवाद आम्ही करत राहिलो. मात्र त्यात आता कटुता उरली नव्हती. तो त्याच्या कंपनीच्या बाजूने आम्हाला टार्गेट करायला पाही. आम्ही आमच्या कंपनीचं भलं पाहत होतो.

एक दिवस त्याला म्हटलं की, ग्राहम, तू आमच्या टीमला रोज शिव्या देत राहिलास तरी हा प्रोजेक्ट फक्त आम्हीच पूर्ण करून दाखवू शकतो, अक्ख्या कतार मध्ये दुसरी कोणतीही कंपनी हे करून दाखवू शकणार नाही हे तुलाही माहिती आहे. तेंव्हा तुझा कडवटपणा, हे सतत नावं ठेवणं कमी कर. जी मानसं खरंच चांगलं काम करतायत मग त्यात एखादा कामगार असेल, एखादा सुपरवायझर असेल एखादा इंजिनिअर असेल, किचन सांभाळणारा कुक असेल किंवा मालवाहतूक करणारा ड्रायव्हरही. तुझ्यासारख्या ज्येष्ठ माणसाने त्याचं जरा कौतुक करायला हवं. ही माणसे घरापासून दूर राबतायत त्यानाही कधीतरी प्रोत्साहनपर शब्दांची गरज असते. वयानं मोठा असूनही ग्राहमनं ते ऐकलं. यापुढे नक्की मी हे लक्षात ठेवेन असं म्हणाला...! नेहमी ताठ्यात वागणारा तो कधीकधी छान मित्रासारखा वागायचा माझ्याशी. त्या दिवशी त्याचा मूड असाच छान होता. आपला संसार, बायको, मुलगी यांच्याविषयी तो भरभरून बोलत राहिला.
त्यानंतर २-३ दिवस गेले असतील.

आणि एक दिवस अचानक...
शुक्रवार हा आमचा क़तार मधील सुट्टीचा दिवस. शनिवारी सकाळी ७ वाजता ऑफिसमध्ये पोचलो आणि वसिलिअस या अन्य सहकारी मित्राचा कॉल आला. ग्राहम ला खूप मोठा अपघात झालाय. आयसीयु मध्ये आहे तो.

त्याचं झालं असं की, शुक्रवार सुट्टीचा दिवस. सगळी मित्रमंडळी फिरायला बाहेर पडली होती. दोहा पासून ५०-६० किमी अंतरावर वाळूच्या टेकड्या आहेत. तिथे ग्राहमसह काही जण वाळवंटात बाईक चालवायला गेलेले. वाळूच्या लहान टेकड्यांवर चार चाकी मोटारसायकल चालवायची असते त्याला तिथे quad biking असं म्हणतात. बाईक चालवताना एका उंचवट्यावरून खाली येताना जोरदार झटका बसला आणि ग्राहम चं डोकं त्याच्याच बाईकवर प्रचंड वेगाने आदळलं. तो आघात इतका वेगवान होता की कपाळ फुटलं, डोळ्याला मोठा मार लागला, प्रचंड रक्त वाहू लागलं आणि ग्राहम क्षणात बेशुध्द झाला.
जवळच्या लोकांनी वेगवान हालचाली केल्या. डॉक्टर्स आले. हेलिकॉप्टरमधून लगेचच त्याला दोहा मध्ये मोठ्या हॉस्पिटलला आणलं गेलं.
--

२-३ दिवसांनी तो शुद्धीवर आला. विविध ऑपरेशन्स झाली होती. डोळ्याला मोठा मार लागलेला. डोक्याला मोठ्या जखमा.. त्यानंतरही कुणालाही भेटायची परवानगी नव्हती. ७-८ दिवस अजून गेले. मग भेटायला गेलो आम्ही काहीजण.
ग्राहमचा हात हाती घेतला. काळजी घे. लगेच धडपडत ऑफिसमध्ये यायची गडबड करू नको असं सांगितलं. बँडेज मध्ये बांधलेल्या त्याच्या फुटक्या चेहेऱ्यावर हसू फुटलं. क्षणात त्याचे डोळे भरून आले.. म्हणाला, “ दुसऱ्यांदा मोठ्या अपघातातून वाचलो. का देव असे हाल करतो माझे? ह्या वेदनांपेक्षा पट्कन गेलेलं बरं..

मी म्हटलं, ग्राहम आमच्याकडे भारतीय तत्त्वज्ञान असं सांगते की, “ तुम्ही जेवढं सहन करू शकता तेवढ्याच वेदना देव तुम्हाला देतो. तू खूप शूर आणि पोलादी माणूस आहेस. तूच हे सगळं सोसू शकतोस. ते आम्हाला जमणार नाही..! लवकर बरा हो. काळजी घे स्वतःची..
ज्याच्याविषयी आम्हा सर्वांच्या मनात गेली वर्षं-दोन वर्षं राग असायचा, त्याची ती अवस्था बघवली नाही. त्या दिवशी तरी वाटत होतं यातून ग्राहम काही बरा होत नाही. पण हा माणूस त्या मोठ्या जखमांवरही मात करून पुन्हा काही आठवड्यांनी ऑफिसमध्ये दाखल झाला. खरंच त्याच्या जिद्दीचं, कणखर मनाचं कौतुक वाटत राहिलं सर्वांना..!
---
पुढच्या काही महिन्यात प्रोजेक्टवर खूप मोठ- मोठी कामं आम्ही पार पाडली. मोठ्या बार्जेस मधून टनावारी वजनाचे ट्रान्सफॉरमर्स, स्वीचगिअर्स वगैरे बरंच काही पहिल्यांदाच त्या बेटावर आम्ही सुरक्षितपणे नेऊ शकलो. या सगळ्या कामातून एक नवीन प्रकल्प तिथे उभा राहिला. कतार पेट्रोलियम, एल एस केबल ही कोरियन कंपनी आणि आमची एल & टी या तीन कंपन्यांनी मिळून सुरुवातीला अशक्य वाटणारं असं ते सारं शक्य करून दाखवलं. खूप वेळा विविध मुद्द्यांवरून वाद-विवाद झाले, प्रसंगी काही माईलस्टोन गाठल्यानंतर सेलिब्रेशन्स झाली आणि एक इतिहास निर्माण झाला. त्यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सारं निर्माण करताना जी शेकडो माणसे तिथे राबत होती त्यातील एकालाही साईटवर साधी लहानशी जखमही झाली नाही. हेल्थ आणि सेफ्टी चे सर्व निकष पळून हे काम निर्माण झालं. त्याबाबतची सर्टिफिकेटस सर्वांना वाटली गेली.

आज मागे वळून पाहताना वाटतं, ग्राहम सारखं सतत चुका काढायला तत्पर असं व्यक्तिमत्व तिथं होतं म्हणूनच कदाचित आम्ही खूप बारकाईने काळजी घेऊन काम करू शकलो. साईटवरील सुपरवायझर पासून सर्वांच्या मनात ग्राहम चा आरडाओरडा नकोहा विचार असायचाच. त्यामुळे सगळे नेहमीच सतर्क राहिले.

 केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार,
मनुजा चातुर्य येत असे फार..

असा एक सुभाषितवजा श्लोक आहे. खूप फिरल्यामुळे मला चातुर्य प्राप्त झालंय की नाही हे माहिती नाही मात्र टणक पोलादी अशा ग्राहमसारखी वेगळी माणसं जवळून पाहता आली. त्यांच्याकडून कळत नकळत काही शिकायला मिळालं हे मात्र नक्की.
प्रोजेक्ट सोडून नंतर आम्ही कुठं कुठं निघून गेलो. ग्राहम पुन्हा ब्रिटनला गेला. मग परत गल्फमध्ये कामासाठी आलाय. आजही तो फेसबुक लिंक्ड इन च्या माध्यमातून संपर्कात आहे. कित्येकदा फोनवर गप्पा मारतो आम्ही. जुन्या गोष्टी आठवतो... एकमेकांना नावं ठेवतो, एकमेकांचं कौतुक करतो.. उज्ज्वल भविष्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देत राहतो..!

-    सुधांशु नाईक


Wednesday, 8 January 2020

चैतन्यदायी उर्जा देणारं दैवी गाणं..!

आयुष्यात अनेक संकटं, कष्ट, मनस्ताप, अपमान, फसवणूक, निराशा, दु:ख आदि भावभावनांचा पावलोपावली सामना करावा लागतोच. मात्र हे सोसत जगावंच लागतं अन् त्यासाठी सतत गरज लागते कसल्यातरी उर्जेची, चैतन्याची. अगदी अशीच चैतन्यदायी उर्जा घेऊन आलेलं गाणं सादर करुन वेंकटेशकुमार यांनी कोल्हापूरच्या संगीतप्रेमींना एका दैवी गायकीची अनुभूती दिली..
शिवगंधार संस्थेने आयोजित केलेल्या  " तपस्या" या विशेष कार्यक्रमात त्यांनी तेजस्वी गाणं सादर करुन रसिकांना शब्दातीत स्वरानंद दिला.
विविध कारणांमुळे प्रत्यक्ष गायन सुरु होण्यास जवळपास दीड तासांचा वेळ लागल्यानं रसिकांमध्ये असलेली अस्वस्थता, पं. वेंकटेश कुमारांचं गाणं सुरु होताच एकदम संपुष्टात आली. 

शुध्द कल्याण रागालील " तुमबिन कौन.." या बंदिशीनं सुरुवातीपासूनच रसिकांच्या मनावर पकड घेतली. मुळात बुवांचं गाणं धारदार. प्रत्येक स्वर गोलाईयुक्त, अचूक बाणासारखा वेध घेणारा. त्यांचं गाणं कधीही ऐकायला बसलं की असं वाटतं हे जणू यापूर्वी 2,3 तास रियाज करुन गळा तापवूनच आलेत.
 प्रत्येक स्वराची शुध्दता, तालावरची भक्कम पकड, लयीचा अचूक अंदाज पहातापहाता समोरच्याला संमोहित करुन सोडतात. किराणा घराण्याच्या परंपरेला साजेशी स्वरांची भावनाप्रधान आळवणी करतानाच ग्वाल्हेरी गायकीप्रमाणे शांत, शिस्तबध्द विस्तार करत बुवा मैफलीवर अक्षरश: राज्य करत होते. 
बोलआलाप, हुंकाराची लघु तान ( मुखबंदीप्रमाणे ), प्रत्येक आवर्तनाला विविध मात्रांवरुन उठत समेवर डौलदारपणे येताना सर्व रसिक मनात एक वेगळा आनंद फुलत होता.
मुख्य बंदिशीनंतर त्यांनी " मौंदर बाजे" ही महमदशा यांची गाजलेली चीज सादर केली. बेंगळूरच्या केशव जोशीनी त्रितालाचा दमदार ठेका, तर सतीश कोळ्ळी यांनी वेंकटेश कुमारांच्या सुरांचा मागोवा घेत जाणारी सुरेख समर्पक  संवादिनी साथ केली. बोलताना, सपाट ताना आदि सर्व वैशिष्ट्यांनी रंगलेली शुध्द कल्याणची द्रुत चीज संपली तेव्हा एका वेगळ्या आनंदानं मन प्रफुल्लित झालं होतं. 

कोणत्याही उत्तम संगीताची जादू अशीच तर असते. ती नेहमी तुम्हाला तुमच्या रोजच्या जगण्यातून वेगळ्या अन् अधिक देखण्या विश्वात कुठंतरी दूर घेऊन जाते.  तिथं नसतो भेदभाव अन् द्वेष. राग, लोभ, मत्सर असलं काही काही नसतं तिथं.  असतो फक्त निरामय निरपेक्ष चिदानंद! कुठल्याही स्वरांतून मग दिसत राहतं लोभस तरीही तेजस्वी ईश्वराचं रुप... मग निराशा, दमछाक हे सारं निवळून जातं अन् पुन्हा भरभरुन जगावं असं वाटू लागतं.

वेंकटेश कुमारांच्या स्वरांतही हीच ताकद आहे. तुम्हाला त्या विश्वात नेण्याची. भरपूर दमसास, तिन्ही सप्तकातला सहज व तेज:पुंज वावर अनेक वर्षांच्या रियाजानं मनाबरहुकूम कधीही कुठेही अन् कसाही वळणारा गळा मग त्यांना स्वत: लाही गाताना खूप आनंद देत रहातो अन् तोच आनंद मग प्रेक्षागारातील प्रत्येक मनामनांपर्यंत पोचतो, सुरेख दरवळत रहातो.
नंतरच्या टप्प्यावर वेंकटेश कुमारांनी पुरंदरदासांचं प्रसिध्द असं भजन " सौभाग्यद लक्ष्मी बारम्मा" सादर केलं. देवीच्या दर्शनाला मगाशी गेलो अन् आज हे सादर करावंसं वाटलं. पहिल्यांदा हे इथं सादर करतोय असं त्यांनी कोल्हापूरकरांना आवर्जून सांगितलं. 

त्यानंतर सादर केला सोहनी. मुळात हा उत्तरांगप्रधान राग. वरच्या स्वरांवर भिरभिरत रहाणारा. वेंकटेशकुमारांच्या धारदार स्वरांना साजेसा. त्यामुळे सोहनी ऐकायला मजा आली.
 त्यानंतर जनाबाईंचा " ये गं ये गं विठाबाई" हा अभंग खूप छान पेश केला. " समझ मना.. कोई नही अपना" ही  भैरवी सादर करुन त्यांनी मैफिलीचा समारोप केला तेव्हा रसिक अक्षरश: देहभान विसरले होते! परमेश्वराशिवाय कुणीच आपलं नसतं, सगळं काही त्या निर्गुण निराकाराच्या रुपात विलीन होणारं. इथली नाती, इथली कमाई, इथलं श्रेय, इथले सन्मान- अपमान हे सारं क्षणभंगूर वाटायला लावणारी ही भावना. संपूर्ण मैफील एका स्वरभक्तीनं भारलेली. दिव्यत्वाचा अनुभव देणारी. पुन्हा आपल्या रोजच्या जगण्याकडे वळूच नये असं वाटायला लावणारी! 

मात्र रोजचं जगणं कुठं चुकलंय.. ते निभावायलाच लागतं त्यासाठी
या अशा संगीतमैफलीत जाणं गरजेचं असतं. वेंकटेश कुमारांसारख्या सच्च्या संगीतसाधकाचं गाणं तना-मनात साठवत रहाणं म्हणजे जणू आपलीच बॅटरी घासूनपुसून लख्ख करुन चार्ज करुन घेण्यासारखं!

तोच अनुभव मनात साठवत देहानं घरी परतलो मात्र मन त्या सुरांमध्येच गुंतून राहिलंय...अजूनपर्यंत..!
- सुधांशु नाईक( 9833299791)
कोल्हापूर 🌿

🌼🌼🌼🌼🌼