marathi blog vishwa

Friday 22 April 2011

सुट्टीचे दिवस आणि मी..


मित्रांनो, शाळेची सुट्टी सुरु झालीये..घरोघरी सुट्टीचे प्लान तयार झालेत..कित्येक मंडळी गावाला गेलीसुद्धा..गल्लीबोळातून क्रिकेटच्या match  रंगू लागल्याहेत..हे सगळे आता दुरून पाहताना जीव कासावीस होतो..!! लहानपणी वाटायचे कधी मोठे होऊ..अन आता मोठे झाल्यावर वाटते नको हे annual  प्लान्स आणि ती कधीच न जमणारी targets ..नको ती पगारवाढ आणि नकोत ते नवे नवे खर्च..!!
छान मस्त झुक्झुक्गाडीत बसून जावे दूर गावाला..प्रत्यक्ष तर जाता येत नाही पण मन मात्र केंव्हाच बालपणात निघून गेलेलं असतं..

आमच्या सुट्टीत आम्ही खेळायचो तर खूपच..अगदी सकाळी ७ वाजल्यापासून क्रिकेट सुरु व्हायचे..तर दुपारच्या सुट्टीत सावलीत लपाछपी आणि भोज्ज्या..! संध्याकाळी पुन्हा लगोरी किंवा क्रिकेट..! कधी दुपारी आम्ही बँक बँक पण खेळायचो..पण दुपारसाठी आवडता खेळ होता गाड्यांचा.. पुत्ठ्याच्या गाड्या बनवून तोंडाने धर्र्र धार्र आवाज काढत आम्ही लोकांच्या झोप उडवायचो..तर अनेकदा कुणाच्या झाडावरचे पेरू काढायला जायचो..नंतर नंतर नदीवर पोहायला जाउ लागलो आणि संध्याकाळची धमाल अजूनच वाढली..

पण त्याबरोबर मला सुट्टीत वाचायलाही खूप मिळायचे..तेंव्हा आम्ही चाळीत राहायचो चिपळूण ला.. २-३ शेजाऱ्यांच्या घरातले पेपर वाचून काढायचे..कुणाच्या घरी चांदोबा यायचा..कुणाच्या घरी किशोर तर कुणाच्या घरी इंद्रजाल कॉमिक्स..!! त्या सगळ्या गोष्टीमध्ये, मी एवढा हरवून जायचो की जेवण देखील विसरायचो..आमच्या शेजारीच आमच्या शाळेतील परांजपे madam  राहायच्या.. त्यांच्या घरातील एका कोपऱ्यात त्या पत्र्याच्या खुर्चीत बसून मी अनेक पुस्तके वाचली..तसेच ज्यांच्याकडे वाचनालयातून मोठी मोठी चांगली पुस्तके आणली जात त्या केळकर काकांच्या घरी मी चौथीत असतानाच रशियन क्रांतीवरचे "व्होल्गा जेंव्हा लाल होते" हे पुस्तक वाचल्याचे आठवते. त्याच सुट्टीत बाबांनी घरी विकत आणून ठेवलेले मृत्युंजय व श्रीमान योगी सुद्वा वाचल्याचे आठवते..तेंव्हापासून खरच माझा "सखाराम गटणे " झाला . (thanks to पुलं ..!)  आणि त्यातून मग वाचनाची, लिखाणाची आवड निर्माण झाली असावी..


मे महिना लागताच आम्ही मग मामा, मावशी, काका आत्या यापैकी बहुतेक सगळ्यांकडे जाऊन येत असू.. माझ्या मामाचे घर कर्नाटकातील संकेश्वर जवळचे एक चिमुकले गाव. मामाच्या गावी जाताना संकेश्वर च्या बस स्थानकात खाल्लेला डोसा अजून आठवतो..आणि आठवतो तो शेजारी दिसणारा वल्लभगड  . ..जो शिवाजी महाराजांची आठवण करून देई..
एकदा गावी गेले की आजी मायेने जवळ घेई.. मग २-३ दिवस भरपूर लाड केले जात. नंतर तिकडे अजून धमाल असे..मस्त विहिरीत पोहायचे..शेतातून हुंदडायचे , सतत काही न काही खायचे,  क्रिकेट खेळायचे..आणि रात्री चांदण्यात मस्त भुताच्या गोष्टी सांगत - ऐकत झोपायचे..असा जणू नेहमीचा दिनक्रम..
.तिथे आम्ही लहान मुले विहिरीवरून पाणी आणायचो..दुपारी मामीच्या मागे लागून ओढ्यावर ती कपडे धुवायला जाई तिकडे जायचो..झाडाझुडपातून मस्त भटकायचो..आणि दंगा धुडगूस घातला की मामाचा मारही  खायचो...!! पण पुन्हा सकाळी चहा प्यायला सोबत मामाच हवा असायचा..!! किती निरागस आनंदाचे दिवस होते ते..! दुपारी येणारा गारेगार वाला आणि गुलाबी केस वाला ( जो घरातले केस घ्यायचा आणि ती गुलाबी मुंबई मिठाई द्यायचा तोंडात पटकन विरघळणारी .) कसा विसरता येईल.. ? कुणी हातावर गुळाचा खडा, एखादा लाडू दिला तरी खूप काही मिळाल्याचे समाधान व्हायचे..आणि आता..???

सुट्टी संपण्याचा दिवस जवळ येऊ लागला की आजीची धावपळ सुरु व्हायची..घराच्या शेतातले दाणे, डाळ, मूग असे काही छोट्या पिशव्यातून भरून द्यायची..परतीच्या दिवशी सकाळी बैलगाडी दारात आली की मग मात्र आजी, मामा - मामी आणि शेजारच्या बायका या सगळ्यांचेच डोळे भरून यायचे..पुन्हा वर्षभर भेट नसल्याचे दुक्खं पाय जड करून जाई..आम्हाला मात्र बैलगाडीतून जायची घाई झालेली असे..!! 
सकाळ सकाळ गावाच्या वेशीतून बाहेर पडताना दिसणारा देखणा लालभडक सूर्य..आजूबाजूचे माळरान , कुठे कुठे असलेली डेरेदार हिरवी झाडे आणि बैलगाडीतून जाताना पुन्हा पुन्हा मागे वळून पाहणाऱ्या आईचे भरून आलेले डोळे...हे माझ्या मनावर कायमचे ठसलेले चित्र आहे..!!

घरी परताना आम्हाला न्यायला आलेले बाबा दिसताच खूप आनंद व्हायचा पण इतके दिवस आपण त्यांना कसे विसरून गेलो ह्याचेही आश्चर्य वाटायचे..!! घरी आल्यानंतर लगेच १-२ दिवसात मग बाबा आम्हाला
बाजारात घेऊन जात आणि नवी पुस्तके घरी आणली जात.. त्या कोऱ्या पुस्तकांचा तो छान वास मग आम्हाला पुढच्या वर्षाच्या शाळेची आठवण करून देई आणि सुट्टी संपली कशाला असे वाटू लागे..

आज दिवस बदलेत..आजची मुले वेगवेगळ्या कॅम्प मधून जातात.. पण जे आम्हाला अनुभवायला मिळाले तेही कोणताही खर्च न करता त्याचे मोल कसे करणार..? कुणी ह्याला nostalgia म्हणोत .. पण ह्याच दिवसांनी आमचे बालपण समृद्ध केले..आणि त्याचे ऋण कसे विसरता येईल..??
-----सुधांशू नाईक , कल्याण
०९८३३२९९७९१. (email- nsudha19@gmail.com)

Wednesday 13 April 2011

आस


दूर ची ही वाट ....लांबचा प्रवास
मनी ध्यान तुझे.... भेटायची आस..

सुकला रे घसा ...थकली पाऊले
विरहाश्रूनी झाले ...डोळे माझे ओले..

सुख आणि दुख्ख ...भोगले रे सारे..
तरीही अतृप्त हे.. मन ऊरे मागे...

अजुनी किती धाऊ ...सांग रामराया
"सुधा" म्हणे तुझ्याविना ...जन्म जाई वाया..

-- सुधांशु नाईक, कल्याण -09833299791
(रामनवमी ला सुचलेली कविता)