marathi blog vishwa

Friday 26 January 2024

कार्यरत होऊया…!

मना सज्जना... भाग : 07
कार्यरत होऊया… 
- सुधांशु नाईक
शुक्रवार 26/01/24
आपल्या मनाची मोठी गंमत असते. जोवर आपण काही ना काही काम करत असतो तोवर मन अगदी गपगुमान असतं. बऱ्यापैकी एकाग्रतेने आपण आपली कामं करत असतो. मात्र जरा कुठं रिकामपणे बसलो, निवांत बसलो की मग मनात शेकडो विचार येत राहतात.
विविध माणसं, गावं, कित्येक आठवणी असं काय काय मनात पिंगा घालत राहतं. कुठून कुठली आठवण येईल आपल्याला हे काही सांगता येत नाही. कोणतं काम आठवेल हे सांगता येत नाही. विचारांच्या गलबल्यात मन अगदी पतंगसारखं हेलकावत राहते. म्हणूनच तर idle mind is devil's workshop..! असं इंग्रजीत किंवा “ रिकामं मन सैतानाचेच..” असं मराठीत म्हटलं जाते.
मनाला जितकं वेसण बांधायला जाऊ तितकं ते अधिकच उधळते असं अनेक तत्ववेत्ते, अध्यात्मिक जाणकार लोक सांगतात. मनाला उलटं मोकळं सोडा, मनात येणारे विचार तटस्थपणे पहायला शिका असं सांगितलं जातं. इतकं सोपं असतं का हे?
जेंव्हा मन रिकामं असतं तेंव्हा अशा मोहाना अधिक चटकन बळी पडत असावं. जेंव्हा आपण खूप कामात असतो तेंव्हा आपण म्हणतोच ना, “ अगदी तहान भूक विसरून गेलो बघ हे काम करताना…” पण तेच आपण अगदी रिकामे आहोत, आणि रस्त्यावरून जाताना एखाद्या गाडीवर कुणी गरमगरम वडा किंवा भजी तळत असेल तरी आपलं मन लालचावते. डाएट वगैरेची सगळी बंधने आपण काही दिवस फक्त पाळतो आणि असं दिसलं की पटकन वडापावची ऑर्डर देतो. वडापाव हे एक प्रातिनिधिक उदाहरण झालं. असे कितीतरी प्रकारचे मोह आपल्याला भुरळ घालत असतात.
जेंव्हा माणूस अशा मोहात अडकते तेंव्हा मग कामाकडे, अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ लागते. त्यामुळे घरात कुणी विद्यार्थी असेल तर त्याने इतकाच वेळ टीव्ही पाहावा इत्यादी बंधने घातली जातात.
समाजात देखील आपण पाहतो, जे तरुण भरपूर अभ्यासात रमले आहेत, जे तरुण नोकरी धंद्यात कष्ट करताहेत ते स्वतःची एक नवीन जागा निर्माण करून दाखवतात, त्याचवेळी काही रिकामटेकडे युवक मात्र गल्लीच्या तोंडाशी अचकट विचकट गप्पा मारत वेळ फुकट घालवतात. आज जगातील सगळ्यात जास्त युवाशक्ती आपल्या देशात आहे असं मानलं जाते. या सगळ्या युवशक्तीची मने विधायक विचाराने प्रेरित झाली तर अजून कितीतरी मोठे काम आपण करून दाखवू शकतो. मनाला विधायक कार्यात गुंतवले की स्वतः आणि इतरांसाठी देखील ते हितकारक असते हे माहिती असल्यामुळे समर्थ म्हणतात;
अखंड कामाची लगबग
उपासनेस लावावे जग
लोक समजोनी मग,
आज्ञा इच्छिती ||
आजच्या प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने अशा कार्यरत लोकांच्या झुंडीच्या झुंडी देशहित जपायला कार्यरत होवोत हीच प्रार्थना.
-सुधांशु नाईक(9833299791)🌿

Saturday 20 January 2024

प्रभाते मनी राम चिंतीत जावा...

मना सज्जना... भाग : 06
प्रभाते मनी राम चिंतीत जावा...
सुधांशु नाईक
शनिवार 20/01/24
अवघ्या दोन दिवसांवर देशात एक मोठी गोष्ट घडणार आहे. पुन्हा एकदा प्रभू रामचंद्राचे निर्माण झालेले मंदिर अयोध्येत सर्वांसाठी खुलं होत आहे. गेली पाच सहाशे वर्षे अनेकदा अयोध्येने परकीय आक्रमणे अनुभवली. प्रचंड विध्वन्स आणि रक्तरंजित इतिहास अनुभवला. आपलं स्वातंत्र्य, आपला धर्म जपायला हजारो लोकांनी प्राणार्पण केले होते. त्यातील अनेकांची नांवेही आपल्याला ठाऊक नाहीत. हे सगळं लोकांनी का केलं तर राम आपल्या मनात युगानुयुगे वसला आहे म्हणून.
इथला माणूस सकाळी उठला की एकमेकांना भेटताना राम राम म्हणायचा. इथला माणूस मरताना देखील राम राम म्हणायचा. इतकंच नव्हे तर कधी आपल्या आयुष्याचा, रोजच्या रुटीनचा कंटाळा आला तरी “सध्या जगण्यात राम उरला नाही..” असं म्हणायचा. राज्य कसं हवं तर रामाने केलं तसं सुखदायी हवं असं लोक कायम म्हणत आले. आणि हे काही 50,100 वर्षं घडलं नाहीये तर किमान 4 हजार वर्षं इथल्या लोकांनी राम असा मनाशी धरून ठेवला आहे. हे खूप विचार करण्यासारखे आहे.
राम का इतका पूजनीय आहे? आपण अगदी जवळचं माणूस असल्यासारखं रामाला एकेरी संबोधन का करतो? कारण रामाने सतत दुसऱ्याचा विचार केला. सर्व सामान्यांना सुख मिळावे याचा विचार केला. प्रसंगी आपले सुख बाजूला ठेवून त्याने इतरांचे मन राखायला मोठे त्याग केले. ऋषीं मुनींच्या पूजेत, यज्ञ यागात विघ्ने आणणाऱ्या अनेक राक्षसांचे पारिपत्य रामाने केले. पुन्हा राम कोणत्या मोहात अडकला नाही. स्वतःचेच राज्य इतरांना देणे असो किंवा जिंकलेला भाग स्वतःच्या उपभोगासाठी न वापरणे हे फार अवघड असते.
दुसऱ्यासाठी चंदनासारखं झिजणे सर्वांनाच जमत नाही. ज्याला जमतं तो रामासारखा पुरुषोत्तम होऊ शकतो. म्हणूनच समर्थ मनाचे श्लोक लोकांना शिकवताना म्हणतात,
मना चंदनाचे परी त्वा झिजावे
परी अंतरी सज्जना निववावे…
रामाने उदंड अभ्यास केला. शस्त्र आणि शास्त्रपारंगत असा राम सर्व थोर लोकांपुढे कायम नम्र राहिला. आईबाप, गुरुजन, सज्जन माणसे यांच्यापुढे राम सदैव नतमस्तक राहिला. लोकांच्या अडीअडचणीत मदतीला धावला. समाजातील नावाडी असो किंवा एखाद्या देशाचा राजा असो, रामासाठी सगळी माणसं समान होती. भेदभाव त्याने कधी केला नाही.
 रावणाने एकेकाळी सर्वत्र अहंकारी होऊन अनन्वित अत्याचार केले होते. अन्यायाच्या निवारणासाठी त्याने रावणाचा वध केला पण शत्रूच्या चांगल्या गुणांचाही आदर करणारा राम होता. रामाने बंधुता, पुत्र कर्तव्य, राजाचे कर्तव्य करताना कधीच दिरंगाई केली नाही. लोक कल्याणसाठी राम सदैव तत्पर राहिला म्हणून आज हजारो वर्षे प्रभू रामचंद्र म्हणून पूजनीय आहे. आईने सांगितलेल्या राम कृष्णाच्या गोष्टी ऐकून शिवाजी महाराजांच्यासारखं अनेकांनी स्फूर्ती घेतली. सतत कार्यतत्पर होऊन नवीन विश्व घडवून दाखवले.
म्हणूनच पुन्हा एकदा समर्थांच्या शब्दांचा आधार घेतं असं सांगावेसे वाटते, 
मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥
तुमच्या माझ्या सर्वांच्या आयुष्यात सदैव ‘राम’ असू दे हीच प्रार्थना! 
- सुधांशु नाईक(9833299791)🌿

Friday 19 January 2024

आधी कष्ट मग फळ…

मना सज्जना... भाग : 05
आधी कष्ट मग फळ…
- सुधांशु नाईक
शुक्रवार 19/01/24
आपले मन किती उदंड विचार करत असते ना? जणू तिन्ही लोकांत भरारी मारत असते मन. कधी कोणते विचार करेल आणि त्यानंतर कोणती कृती करायला आपल्याला भाग पाडेल हे कधीकधी सांगताही येत नाही. मनात विचार येतो म्हणजे तो मेंदूत विचार तयार होतो, त्याआधी किंवा नंतर विशिष्ट संप्रेरके स्त्रवतात, मेंदूत केमिकल लोचे होतात त्यामुळे शरीरातील अवयवांना आज्ञा मिळते वगैरे सगळं आता विज्ञानाने सिद्ध केले आहे.ते आपल्याला माहितीही असतं पण जेंव्हा एखादं काम करायची वेळ येते तेंव्हा आपण चटकन ते करायला सुरुवात करतोच असं नाही. 
उत्साह, निराशा, राग, मत्सर, लोभ आदि सगळ्या भावना आपल्या कृतिमध्ये अडसर ठरू शकतात हे शास्त्रज्ज्ञानी आणि प्राचीन काळात ऋषीं मुनी, संतांनी सांगितलं आहे. या सगळ्यांत एक महत्वाची एक गोष्ट त्यांनी नोंदवली ती म्हणजे कृती करण्यातील आळस.
आपण कितीदा ठरवतो की हे असं काही करूया, या दिवसापासून करूया.. इतकेच नव्हे तर मनात स्वप्नांचे इमले रचतो. शेखचिल्लीसारखी कित्येक स्वप्नं पहातो. कृतीची वेळ आली की मात्र आपल्याला कुणीतरी हे सगळं करून द्यावे असं वाटते. दरवेळी काही कारणे देऊन आपण कृती टाळतो. इतरांना दोष देतो. आपणच आळस करतो आहोत याकडे मात्र दुर्लक्ष करतो. मानसशास्त्रात त्याला “डिफेन्स मेकॅनिझम” म्हणतात. आपल्या हातून कृती होत नाही म्हणून इतरांना दोष देणे, परिस्थितीला दोष देणे आदि प्रकार त्यात केले जातात.
‘आळसे कार्यभाग नासतो…’ आदि सुविचार माहिती असले तरी अंगातला आळस झटकून टाकणे ही मोठी गोष्ट. ती चटकन घडत नाही. त्यातही आपल्याला कष्ट न करता आयते काहीतरी मिळावे ही अनेकदा आपली मानसिकता असते. कमी कष्टात भरपूर पगार देणारी नोकरी, अभ्यास न करता परीक्षेत पास होण्याची हमी हे सगळं आपल्याला हवं असतं. जेंव्हा आपण आळस झटकून टाकतो तेंव्हा आपल्याला समोर सगळं लख्ख दिसू लागतं.

आपल्याला जे काम करायचे आहे त्याचा नीट अभ्यास करणे, त्यासाठी नियोजन करणे आणि नियोजनानुसार कृती केली तर यश नक्की मिळू शकते. या देशात अनेक थोर राजे, उद्योजक निर्माण झाले. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीमधूनच वाटचाल केली. आधी अपार कष्ट केले, प्रसंगी कित्येकदा अपयशाचा धीराने सामना केला मग हळूहळू त्यांना त्यांची योग्य वाट सापडली.
 समर्थ तर 400 वर्षांपूर्वी सांगून गेलेत;
आधी कष्ट मग फळ, कष्टची नाही ते निरफळ |
साक्षेपेवीण केवळ, वृथापुष्ट ||

इंग्रजीत देखील work, work, work until you achieve your goal ! असं म्हटलं जातं. कर्तृत्ववान व्यक्तीसाठी नवनवीन डेस्टिनेशन सतत तयारच असतात. या देशातील तुम्ही, आम्ही सगळेच जेंव्हा कष्ट करू, कर्तृत्व दाखवू तेंव्हा त्याची फळे आपोआप फक्त आपल्यालाच नव्हे तर सम्पूर्ण समाजाला, देशाला नक्की मिळतील असं मला वाटते.
- सुधांशु नाईक(9833299791)🌿

Saturday 13 January 2024

मुलं आणि सामाजिक जाणीव

मना सज्जना... भाग : 04: मुलं आणि सामाजिक जाणीव 
- सुधांशु नाईक
शनिवार 13/01/24
काही दिवसापूर्वी मुलांसोबत फिरायला गेलो होतो. एका प्राचीन मंदिराचा तो नितांतसुंदर परिसर होता. चालता चालता लक्षात आलं की काही लोकांनी वेफर्सची पाकिटे, चॉकलेटचे व्रॅपर वगैरे इथं तिथं टाकलं आहे. पटकन मी एकेक उचलायला सुरुवात केली. मग आमच्या मुलांनीही कचरा उचलायला सुरुवात केली. ते पाहून इतर जे काही लोक आसपास होते त्यानी, त्यांच्या मुलांनीदेखील दिसेल तो कचरा उचलायला सुरुवात केली. पाहता पाहता अवघ्या 15,20 मिनिटात त्या प्राचीन मंदिराच्या परिसरातील सगळा कचरा उचलून बाहेर ठेवलेल्या पिंपात जमा झाला. ते पाहून तिथं जवळच बसून पाहणारे एक आजोबा पुढं आले. बाहेर टपरीवरून त्यांनी चॉकलेट आणली आणि सगळ्यांना बक्षीस म्हणून वाटली. त्याचवेळी “ आप ये चॉकलेट खाओ और उसका वो कव्हर मुझे वापस दो…” असं सांगून ते व्रॅपर स्वतः बाहेर नेऊन टाकले. आपण कचरा गोळा केला म्हणून या आजोबानी आपल्याला बक्षीस दिले याचा मुलांना खूप आनंद झाला.
एका छोट्याश्या कृतीमुळे मुलांना किती सहज संदेश गेला जो कदाचित मोठ्या व्याख्यानामुळेदेखील आचरणात आला नसता. आपलं घर आपण स्वच्छ ठेवतो मात्र आपल्या उंबऱ्याबाहेरचं जग देखील आपलंच आहे तेही स्वच्छ सुंदर राखायला हवं ही जाणीव मुलांमध्ये विकसित होणे खरंच खूप आवश्यक आहे.
लहान मुलं कायमच अनुकरणप्रिय असतात. जर आई किंवा वडील, रस्त्यावर चालत जाताना, कारमधून जाताना काही कचरा रस्त्यावर फेकत असतील तर मुलं तसंच वागणार ना? आपला मोठा दादा किंवा एखादा काका - मामा किंवा शाळेतले शिक्षक तंबाखू किंवा गुटखा खाऊन रस्त्यावर किंवा एखाद्या इमारतीच्या कोपऱ्यात पिचकारी मारताहेत हे जर मुलं पाहत असतील तर त्यांच्याकडून स्वच्छ राहणीमानाची अपेक्षा आपण कसं करणार? आपलं जग किती सुंदर आहे आणि ते अधिकाधिक सुंदर करणे, नीट जपणे ही आपलीच जबाबदारी आहे हे जेंव्हा आपल्या वागण्यातून, रोजच्या आपल्या लहानसहान कृतीमधून दिसत राहील तेंव्हाच मुलं आणि पुढील पिढ्या त्याचं अनुकरण करतील.
आज आपण अनेकदा किल्ल्यावर जातो, जुनी मंदिरे किंवा वास्तू पाहायला जातो तिथं नेमकं कसं फिरायला हवं, काय पाहायला हवं हे त्यांना आपण समजावून द्यायला हवं. स्वतःच घर आपण जसं स्वच्छ सुंदर ठेवायला धडपडतोय तसंच आपली गल्ली, आपला परिसर, आपलं गांव आणि आपला देश स्वच्छ सुंदर ठेवणं ही नुसतीच काळाची गरज नसून आपलंच कर्तव्य आहे ही सामाजिक जाणीव आधी आपल्या मनात रुजली तरच मुलांच्या मनात रुजणार आहे हे नक्की. तेंव्हा नवीन वर्षात आपल्या मुलांना, आसपासच्या तरुण पिढीला सामाजिक भान मनात जागृत करता यावे यासाठी तुम्हीही प्रयत्न करणार ना?
- सुधांशु नाईक(9833299791)🌿

Friday 12 January 2024

बालमन आणि आपण...

मना सज्जना... भाग : 03 बालमन आणि आपण
सुधांशु नाईक
शुक्रवार 12/01/24
आपण जेंव्हा लहान असतो तेंव्हा लवकर लवकर मोठे व्हावेसे वाटत असते. मोठे झाल्यावर मात्र " बालपणीचा काळ सुखाचा…" असे वाटू लागते. लहानपणापासून अंगात भिनलेल्या किंवा आपल्याला आवडलेल्या सवयी, वागण्याची तऱ्हा आयुष्यात बरेचदा तशीच रहाते. कारण मुख्यत: लहानपणी आपण निरीक्षणातून किंवा अनुकरणातून शिकत जातो.
लहानपणी आई बाबा, काका काकू, मावशी आत्या, आजी आजोबा, दादा ताई इत्यादी नातेवाईकांइतकेच काही शेजारी देखील आपल्या आसपास असतात. त्यांच्याबाबत काहीतरी घडलेलं किंवा पाहिलेलं बरोबर लक्षात रहाते. त्या अनुषंगाने आपल्या वागण्याचा प्रयत्न होत रहातो.
लहान मुलांचं विश्व वेगळंच असतं. त्यामुळे लहान मुलांना नेमकं काय हवं हे समजून घेता येण्यासाठी आपल्याला पण मुलात मूल होता यायला हवं. कित्येकदा नेमकं आपल्याला काय हवंय हे त्यांना काहीवेळा सांगता येत नाही पण त्यांचं आणि आपलं ट्युनिंग जमलं की खूप मनमोकळेपणाने ती वागू, बोलू लागतात. लहान मुलांचा विश्वास मिळवणे, तो टिकवून ठेवणे यासाठी प्रामुख्याने गरज असते ती निरीक्षण करण्याची. एखाद्या मुलाचे बारीक निरीक्षण करून त्याच्या आवडीनिवडीचा अंदाज घेऊन आपण त्याला योग्य छंदात गुंतवलं तर त्या मुलाला अधिक उत्साहाने रोजच्या विविध गोष्टी करता येतात. 
“ बच्चे मन के सच्चे…” असं गाण्यात जरी आपण म्हटलं तरी कित्येकदा मुलांना नीट हाताळले नाही तर मुलं मनात कुढत बसून रहातात. त्यांचे गुण झाकलेले राहतात. एखाद्या माणसाची मनोवृत्ती विकसित होणे किंवा एखाद्याला मानसिक आजार होणे यासाठी बालपणातील कित्येक गोष्टी कारणीभूत ठरतात. त्यासाठी लहानपणापासून मुलांना विविध गोष्टी हळूहळू शिकवणे गरजेचे असते. बालमानसशास्त्र हे खूप महत्वाचे शास्त्र आहे आणि त्यासाठी मुलांचे विविध प्रसंगी बारीक निरीक्षण करणे ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे.
त्यांना प्रत्येक गोष्टीतून आनंद कसा मिळेल हे पाहणं महत्वाचं ठरतं. मुलांचा कल पाहून, त्यांची चित्तवृत्ती लक्षात घेऊन, त्यांच्या आवडीनिवडी जाणून जर मुलांना शिकवले तर अनेक गोष्टी मुलं पटकन शिकतात. त्यातला आनंद मुले अधिक चांगल्या प्रकारे अनुभवू शकतात.
बालमन हे टीपकागदासारखं असतं. त्यांना अधिकाधिक आनंददायी गोष्टी देण्यासाठी खूप पैसे लागत नाहीत. मुख्यत: जगाकडे, निसर्गाकडे डोळस नजरेने पाहायला शिकवता यायला हवं.इतकंच नव्हे तर यश आणि अपयश हे दोन्ही सहजपणे कसं स्वीकारावं हे देखील मुलांना आपल्या वर्तणुकीतून दाखवता यायला हवं. हे जमलं तर मुलं नक्की अधिक चांगल्या प्रकारे विकसित होत राहतात. एक सुजाण नागरिक बनू शकतात असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं?
- सुधांशु नाईक(9833299791)🌿

Saturday 6 January 2024

दिनचर्या नियमित का हवी?

मना सज्जना...भाग : 02 : दिनचर्या नियमित का हवी?
- सुधांशु नाईक 
शनिवार 06/01/24 
मनाचे बोलणे आपल्याला ऐकता यायला हवे आणि मनाशी संवाद असायला हवा असं काल म्हटलं होते. हे इतक्या सहजासहजी घडत नाही कारण जन्मल्यापासून विविध गोष्टींमुळे आपल्या मनाचे कंडिशनिंग झालेले असते. आपल्या सवयी, आपल्या पालकांच्या किंवा घरातील इतर ज्येष्ठ सदस्यांच्या सवयी यामुळे मुलाचे मन तयार होत असते.
 सकाळी उठल्यावर प्रात:स्मरण करावे, ईश्वराची, या भूमातेची आळवणी करावी, त्यांना आणि घरातील मोठ्या माणसांना वंदन करावे असे संस्कार पूर्वी घरात शिकवले जात. हल्ली आपल्याला हे सगळं जुनाट वाटतं. पण त्यामागे असलेला विचार आपण समजून घ्यायला हवाय.
Gratitude किंवा कृतज्ञता हा गुण मुलांच्यात लहानपणी रुजला गेला तर त्यांना जगणे अधिक सुंदर जाते. त्यासाठी आपले पालक, गुरुजन, शेतकरी, हा निसर्ग, इथली झाडें फुले, प्राणी - पक्षी या सगळयाविषयीं मुलाच्या मनात आपुलकी आणि कृतज्ञता निर्माण झाली की एक उत्तम नागरिक बनण्याकडे त्याची वाटचाल सुरु राहते. समर्थ दिनचर्येविषयी सांगताना म्हणतात,
प्रात:काळी उठावे | काही पाठांतर करावे
येथाशक्ती आठवावे | सर्वोत्तमासी ||
यासाठी त्या दिनचर्येची सुरुवात वंदनाने व्हायला हवी. इथं समर्थ अमुक एका देवास आठवा असे म्हणत नाहीत तर सर्वोत्तमाचा ध्यास घ्या असं सांगतात हे लक्षात घेण्यासारखे आहे.
त्यानंतर शरीर स्वच्छता, व्यायाम या गोष्टी महत्वाच्या ठरतात. आपल्या प्राचीन योगशास्त्रात असं म्हटलं आहे की एका विशिष्ट वेळी, एखादी कृती सलग 33 दिवस केली तर मनाला त्याची सवय होऊ लागते. त्यामुळे सकाळी ठराविक वेळी उठणे, आवरणे, व्यायाम करणे, अभ्यास करणे या गोष्टींना फार महत्व आहे. आपण ठरवल्यानुसार वागायला सुरुवात जरूर करतो पण मध्यें अनेकदा मोहाचे क्षण येतात. कधी सकाळी उठायचा आळस येतो कधी व्यायाम करायचा कंटाळा येतो. एकदोन दिवस जरा खंड पडला की मग त्या आळसाचीच सवय होऊन जाते. त्यामुळे मनाला पुन्हा पुन्हा ठरलेल्या आखलेल्या मार्गाकडे वळवावे लागते.
आपलं मन कसं हे सांगताना बहिणाबाई म्हणूनच तर म्हणाल्या होत्या, 'मन वढाय वढाय…उभ्या पिकातला ढोर…' त्याला प्रसंगी चुचकारावे लागते, प्रसंगी वेसण घालावी लागते तर कधी मायेने समजावावे लागते.
हे सगळं करण्यासाठी जर नेमकी आखून घेतलेली दिनचर्या असेल तर मनाला नियंत्रित करण्यासाठी महत्वाचे आयुध आपल्याला मिळाले आहे असं समजायला हरकत नाही.
- सुधांशु नाईक(9833299791)🌿

Friday 5 January 2024

माझिया मना...

मना सज्जना... भाग : 01
शुक्रवार 05/01/24
माझिया मना...
आपल्या शरीरातील न दिसणारी तरीही अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे मन. मनाची शक्ती इतकी मोठी की समर्थ रामदास तर "अचपळ मन माझे नावरे आवरिता..." असे म्हणून जातात. समर्थांसारख्या तनमनावर अतिशय कठोर नियंत्रण मिळवलेला सिद्ध पुरुष जिथं असं म्हणून जातो तिथं आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी मनावर विजय मिळवणे ही किती अवघड गोष्ट. मनावर विजय मिळवणे वगैरे दूरची गोष्ट. आपल्याला आपलंच मन धड उमगत देखील नाही.
आपलं मन कधी कोणता विचार करेल हेसुद्धा आपल्याला कळत नाही. त्यामुळे तर 'मन चिंती ते वैरी न चिंती' , ' मनी वसे ते स्वप्नी दिसें...' अशा कितीतरी म्हणी आपल्या बोलीभाषेत रुजल्या आहेत. कधी कधी मन अगदी छान सरळमार्गी असतं तर कधी वेडीवाकडी वळणे घेत आपल्याला गुंतवून टाकतं. कोणत्या क्षणी कोणता विचार करेल हेसुद्धा सांगता येत नाही.
एकदा एक मित्र सांगत होता, " अरे, नुकतीच एक गंमत झाली. सकाळी नेहमीसारखं पोहायला गेलो होतो. पोहताना मनात विचार आला की आपण एखाद्या डोंगरावर गेलोय आणि तिथं पाय घसरून पडलोय. पाय मोडलाय... आता पोहत असताना असा विचार का आला असेल? असं वाटलं. पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अचानक आमच्या ऑफिसची ट्रिप ठरली. आम्ही सगळे कर्नाळा किल्ल्यावर गेलेलो आणि येताना पाय घसरून पडलो. नशीब चांगलं की पाय मोडला मात्र नाही. किरकोळ खरचटलं फक्त... काहीच कुठले चिन्ह नसताना मला अचानक का असं वाटलं याचं अजूनही आश्चर्य वाटतंय..!" आपल्या योगाभ्यास आणि अध्यात्मिक क्षेत्रात असं मानतात की आपले मन आपल्याला अशा पूर्वसूचना देत असतं, फक्त आपण त्याच्याशी संवाद साधायला हवा.
इथं हल्ली आपला इतरांशी तर जाऊ दे पण स्वतःशी तरी कुठे फारसा संवाद होत असतो? आपली कामं, नोकरी - व्यवसाय, कौटुंबिक जबाबदारी, मीडिया आणि आसपास वावरणारी माणसे यांच्या कलाने वागताना आपल्याला नक्की काय हवंय हे आपले मन सांगत असूनही आपलं दुर्लक्ष होतं. एकामागून एका नव्या गुंत्यात अडकत जातो आणि मग त्यातून बाहेर पडणे अवघड होते.
कित्येकदा आपल्या मनातील गुंते आपल्याला कळतात पण त्यातून पुढं कसं जायचं हे समजत नाही. आपल्या शरीरावर अनेकदा आपण नियंत्रण मिळवून दाखवतो पण मुठीतून निसटणाऱ्या वाळूसारखे मनातले विचार आपल्या हातून निसटत राहतात. मनावर विजय मिळवणे अवघड नसते असं योगी किंवा विद्वान लोक सांगत असतात ते सत्यच आहे. पण आधी मनातले गोंधळ, मनोव्यापार आणि मनाचे गुंते आधी नुसते तटस्थपणे पाहता यायला हवेत. मग मनाशी संवाद साधायला हवा. ते जमू लागलं की मग आपण आपल्या मनाला सांगू शकतो, माझिया मना.. जरा थांब ना..!" 
सुधांशु नाईक(9833299791)🌿
(ही लेखमाला दर शुक्रवारी आणि शनिवारी दै. नवशक्तीच्या सर्व आवृत्तीमध्यें अग्रलेखाच्या खाली वाचायला मिळेल. ऑनलाईन ई पेपरवर ही पाहू शकता.)