marathi blog vishwa

Thursday 29 October 2020

जादूची पेटी :- किस्सा 10 वा. शिक्षण व युवा पिढी

#जादूचीपेटी # भाग 11 :- हा समारोपाचा भाग 
शिक्षण व युवा पिढी याबाबत.
नमस्कार मित्रहो, या सिरीजची दोन अडीच महिन्यापूर्वी सुरुवात केली ती दोन उद्देशाने. एक म्हणजे विविध लोकांना समुपदेशनाची गरज आहे हे जाणवलं. तर दुसरा उद्देश म्हणजे कोरोना संकटानं गांगरलेल्या लोकांना योग्य माहिती मिळावी, ज्यायोगे त्यांना शारिरीक व  मानसिक स्वास्थ टिकवता यावं यासाठी माझी एक लहानशी मदत. 

या दोन महिन्यात सुमारे सव्वाशे ते दीडशे लोकांशी बोललो. त्यात युवा पिढीपेक्षाही जेष्ठ नागरिक व महिलांचा अधिक सहभाग होता. युवापिढीच्या मुख्य समस्या या रोजगाराशी संबंधित होत्या तर इतरांच्या समस्या दैनंदिन जीवनातील अशा. या समुपदेशनाचा मुख्य उद्देश हा घाबरलेल्या, अडचणी कुणासोबत शेयर करु न शकणा-या लोकांना मनमोकळ्या संवादाची एक संधी देणे इतकाच होता. अनेकदा केवळ मनातलं बोलता आलं नाही म्हणून पुढे मोठे प्रश्न निर्माण होतात. ते घडू नयेत यासाठी मोफत समुपदेशनाचं हे उचललेलं एक लहानसं पाऊल होतं.
ज्यांना मदत झाली त्यांनी प्रत्यक्ष भेटून किंवा फोनवरुनही नंतर कृतज्ञता/ आभार व्यक्त केले. ज्या केसेस खरंच गंभीर होत्या त्यांना वैद्यकीय सल्ल्यासाठी, मदतीसाठी संपर्क करुन दिला. माझ्या परीने जे जे जमलं ते केलं.
एक यातीलच केस होती विक्रमची. (नाव बदललं आहे) 
विक्रम 23 वर्षाचा एक मुलगा. शिक्षणाच्या जाळ्यात अडकलेला. मध्यमवर्गीय कुटुंबातील विक्रमला मनापासून खेळाची व जंगल भटकंतीची आवड. फुटबाॅल, पोहणं अन् क्रिकेटमध्ये रस. मात्र आईची इच्छा त्यानं डाॅक्टर / इंजिनियर बनावं. आमच्यासारखं तडजोडी करत जगू नकोस हे सतत कानीकपाळी ओरडलं जाई. त्याला खेळायलाच पाठवलं जात नसे. गडकिल्ले किंवा जंगल भ्रमंतीला मात्र अधून मधून पाठवलं जाई त्याला. इच्छा नसूनही त्याला 10/ 12 वी ला विविध क्लासेस लावले गेले. त्याला कधीच 75 टक्क्यापेक्षा जास्त मार्क्स पडले नाहीत. खरंतर उत्तम ग्रहणशक्तीचा ( Grasping power) हा मुलगा. जंगलात गेला की विविध झाडांची, पाना/ फुलांची/ फुलपाखरांची माहिती देणारा. मात्र त्याचं मन त्या शिक्षणात रमत नव्हतं.

12 वी नंतर हट्टानं त्याला Electronics and telecommunication साठी इंजिनियरिंगला घातलं गेलं. कुठूनतरी कर्ज काढून पैसे जमा करत होते आईबाबा. नंतर मग त्यावरुन त्याला बोललं जाई. " बघ, ऐपत नसताना प्रसंगी पोटाला चिमटे घेऊन कर्ज काढलंय. तुझ्या शिक्षणासाठी.. जरा चांगले दिवे लावा.." मग विक्रम अधिक कसनुसा होई. पहिल्या दोन्ही वर्षी नापास होत, एटीकेटी घेत तो पुढं रडतखडत होता. अन् मग मात्र सगळं हाताबाहेर गेलं. मित्रांच्या संगतीनं त्याला दारुचं व्यसन लागलं. भांडणं, रडारड, मारणं हे घरात मग नित्याचं बनलं.
एकदिवशी त्यानं घर सोडून पळून जायचा प्रयत्न केला. एका दूरच्या गावी गावठी दारु पिऊन स्टॅन्डवर झोपलेल्या त्याला आईबाबा पोलिसांच्या मदतीनं घरी घेऊन आले. आई व तो दोघांचंही मानसिक संतुलन बिघडलेलं. हे घडेतोवर यंदाच्या वर्षी काॅलेजेस ही बंद झाली. 

खूप काही लोक त्यांच्याशी बोलले. त्यांचे नातेवाईक, डाॅक्टर्स, व्यसनमुक्ती क्षेत्रातले त्यांचे स्नेही वगैरे वगैरे. सगळ्यांचं मत होतं की त्याला हव्या त्या क्षेत्रात शिकू दे. या गोष्टीला आई बाप तयार नव्हते. आपला निर्णय बदलायला लागणे ही गोष्ट अपमानास्पद वाटत होती त्यांना. 

मग बोललो त्यांच्याशी. मूल आपलंच. त्यानं छान जगावं, आनंदी रहावं हीच तर आपली अपेक्षा असते. मग का त्याच्यावर करियरचा आॅप्शन लादायचा? चांगले सल्ले देणं मान्य परंतु मुलांच्या आयुष्यात किती गुंतायचं हे आपल्याला कळतच नाही अजून. खरंच परदेशातील व्यवस्था यामानानं जरा बरी. प्रत्येक मुलाला जे आवडतं ते करायचं स्वातंत्र्य मिळतं. अर्थात आपल्याकडे " चांगल्या पगाराची नोकरी किंवा भरपूर पैसे मिळवून देणारा व्यवसाय" यालाच सर्वत्र उगीच प्रतिष्ठा मिळते व त्यामुळे अनेक वेगळे पर्याय निवडायला मुलं बावरतात. 

आर्थिक स्थैर्य हवं म्हणून आम्ही सांगतोय ही पालकांची बाजू जितकी बरोबर तितकंच ज्यामध्ये मन रमत नाही ते का करु ही मुलांचीही बाजू बरोबरच. मात्र आपल्या मुलांनी त्यांना आवडत्या क्षेत्रात आनंदी रहावं याकडे पालकांचा कटाक्ष हवा असं मला वाटतं. मी विक्रमच्या आईबाबांना म्हटलं की आज इंजिनियर झालेलीही हजारो मुलं बेकार आहेत. त्याचवेळी वनस्पतीशास्त्र वनस्पतींचे औषधी गुणधर्म याबाबत संशोधन करणा-या क्षेत्रात मुलांची कमतरता आहे. आज आयुर्वेदिक क्षेत्रात उत्पादन करणा-या विविध कंपन्यांना देखील या क्षेत्रातली मंडळी हवी आहेत. तुमच्या मुलाला जर या क्षेत्रात आवड असेल तर का नाही करु देत ते? तसंच 10वीत असतानाच विविध कलचाचणी (aptitude test) चे पर्याय हल्ली उपलब्ध आहेत. ते तुम्ही का तपासले नाहीत असं विचारल्यावर दोघे गप्प बसले. शेवटी त्यांना पटलं की आपल्याकडून उगीचच फार दडपण आणलं गेलं. विक्रमला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण घ्यायला त्यांनी आता तयारी दर्शवलीये. फक्त त्यानं दारुच्या व्यसनापासून दूर रहावं ही त्यांची अपेक्षा. 
मात्र या सगळ्यात त्याच्या तरुणपणातील 2,4 वर्षं वाया गेली. इतर व आपल्यापेक्षा वयानं लहान मुलांसोबत वेगळ्या काॅलेजमध्ये जाऊन शिकताना त्यालाही विविध तणावांचा सामना करावा लागणार आहे. त्यासाठी तो तयार झालाय हीच मोठी गोष्ट. व्यसनमुक्ती क्षेत्रातले त्यांचे परिचित व्यसन सोडवायला मदत नक्की करतील मात्र जी मोलाची 4 वर्षं वाया गेली त्याचं मलाच वाईट वाटलं. 

आपल्या मुलांसाठी आपण दिवसरात्र मेहनत करतो मात्र अनेकांनी हजारो वेळा सांगूनही घरातून मुलांवर स्वप्नं लादणं काही कमी होत नाही. पालकांचा अहंकार, त्यांच्या मनातील प्रतिष्ठेच्या तकलादू कल्पना व त्यामुळे मुलांवर होणारी जबरदस्ती यामुळे अनेक चांगले संशोधक, कलाकार, खेळाडू यांना कदाचित आपण मुकलो असू.
यंदाच्या वर्षात जगभरातील सर्वच क्षेत्रात प्रचंड उलथापालथ झालीये. जे काही आगळं वेगळं असेल, सदैव लोकांच्या उपयोगी पडेल त्या क्षेत्रातच नोकरी/ धंदा चालू राहील. तसेच पूर्वीच्या तुलनेनं शेकडो नवीन क्षेत्रात संधी उपलब्ध होताहेत. तिथं आव्हानंही असणारच. त्यामुळे मुलांना विविध पर्याय समोर ठेवायला जरुर हवेत. त्यातील फायदे तोटेही आपण समजावून सांगायला हवेत. मात्र त्यानंतर त्यांना निर्णय स्वातंत्र्य ही द्यायला हवं. चुकेल तिथं अवश्य कान पकडावा मात्र सतत टीका- टोमणे व अपमानास्पद बोलून मुलांची मन:स्थिती कमजोर नको करायला.

हीच मुलं यापुढं देशाचं भवितव्य असतील,  त्यांना छान जगायला प्रोत्साहन द्यायला हवं असं मला वाटतं. आपल्या आसपासच्या मुलांसाठी आपणही प्रयत्न करुया!
####
आजही ज्यांना विविध कारणांमुळे मानसिक तणाव जाणवत असेल त्यांनी मन मोकळं करायला बोलतं व्हावं आणि  #जादूचीपेटी या मोफत उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी 9833299791 या नंबरवर किंवा nsudha19@gmail.com या ईमेलवर अवश्य संपर्क साधावा ही विनंती. 
यापुढे या सिरीजमधील लेख / केस स्टडीज् मी लिहिणार नाही,  मात्र ज्यांना खरंच मनमोकळं बोलायचंय ते कधीही संपर्क साधू शकतात.

अनेकांनी या उपक्रमाबद्दल फोन करुन अभिप्राय दिले त्यांचे मनापासून आभार. केवळ माझ्या शब्दांतून काही लोकांना माझा आधार वाटला, त्यांच्या समस्या सोडवण्यात खारीचा वाटा देता आला यातच मला समाधान आहे. भेटत राहूया. 
- सुधांशु नाईक, कोल्हापूर( 9833299791)🌿

Sunday 18 October 2020

जादूची पेटी: किस्सा क्र 09- वैवाहिक जीवनातील समस्या

कोरोनाकाळात "जादूची पेटी" हा उपक्रम सुरु होऊन कित्येक दिवस झाले. या काळात अनेकांशी बोललो. कोरोनाची भीती व उपचार याव्यतिरिक्त जे काॅल्स येत होते त्यात सर्वाधिक समस्या ह्या महिला व ज्येष्ठ नागरिकांशी संबधित होत्या. सर्वात जास्त गुंतागुंतीचे प्रश्न हे घरातील महिलेबाबत आहेत अन् सुशिक्षित व कमी शिक्षित अशा दोन्ही प्रकारच्या घरात हे घडलं आहे, घडत आहे. आजचा हा लेख घटस्फोटासाठी धडपडणा-या महिलांबाबत अन् घरातील समस्यांबाबत....
- सुधांशु नाईक

#जादूचीपेटी #09 #वैवाहिकजीवन
भारतीय समाजात लग्न ही एक सहज साधी गोष्ट नसतेच मुळी. दोन वयात आलेल्या स्त्रीपुरुषांनी वैवाहिक जीवनातील आनंद लुटायला, नव्या पिढीची निर्मिती करायला एकत्र यावे इतकं साधं नसतंच मुळी हे. म्हणूनच तर चांगल्या व वाईट अशा दोन्ही अर्थानं असं म्हटलं जातं की, " भारतीय घरात लग्न हे दोन व्यक्तींचं नसून दोन कुटुंबांचं असतं." याचे फायदे तोटे भरपूर आहेत अन् ते मुख्यत: व्यक्तीसाक्षेप आहेत.
 म्हणजे एखाद्या कुटुंबात एकत्र कुटुंब पध्दती असल्याने घरातील अडचणी एकमेकाच्या सहकार्यानं सोडवल्या जातात. तर दुस-या ठिकाणी एकत्र कुटुंब हेच भांडणाचं कारण बनलेलं.

या काही आठवड्यात मी किमान 15, 20 अशा महिलांशी बोललो की ज्या  घटस्फोटित / घटस्फोटाचा अर्ज केलेल्या / घरात त्रास होतोय म्हणून माहेरी आलेल्या अशा आहेत. 

प्रत्येकीची दुर्दैवी कर्मकहाणी वेगळीच. बहुतांश बाबतीत नव-याचं व्यसन, घरात मारहाण करणं, शारिरीक मानसिक त्रास, लैंगिक संबंधातील दु:खद अनुभव असं काही आहेच. प्रत्येक बाबतीत पुरुष चुकीचा आहे किंवा सासरचेच चुकीचे आहेत असंही नाही. मात्र शेवटी संसार तुटला तर त्याचा त्रास त्या स्त्रीलाच जास्त होतो हे मात्र खरं व दुर्दैवी. 

एका केसमध्ये त्या ताईंचा पती दारुच्या व्यसनात बुडालाय. लग्नाला केवळ 2 वर्ष झालीयत. ह्या व्यसनाबाबत घरच्यांना कल्पना असूनही सासर बड्या घरचं आहे व हळूहळू होईल दारु पिणं कमी अशी समजूत घालत लग्न करुन दिलं गेलं. प्रसंगी तिनं नव-याचं मन राखायला त्याला 2,4 दा कंपनी दिली. मनातून प्रचंड घाण वाटत असताना दारुचे घोट घेतले. नंतर त्याची लैंगिक भूक, विकृत चाळे हेही सहन केले. पण सगळंच असह्य झाल्यावर ती माहेरी परत आली. नशिबानं मूल झालं नाहीये. तर माहेरी स्वत:चा भाऊ- वहिनी व आईबाबांकडून तिला रोज ऐकून घ्यावं लागतंय. त्यातच तुझे मित्र भरपूर... तुझंच कुणाशी तरी लफडं आहे म्हणून तूच पळून आलीयस असा संशयही प्रत्यक्ष आईबापानं घेतला. घटस्फोटाची केस कोर्टात 3,4 वर्षं आहे व कासवगतीनं काम सुरु आहे. या कोरोना काळात सगळेच घरात त्यामुळे सततचे टोमणे ऐकून तिला प्रचंड मानसिक त्रास होत होता. तिकडे नवरा तसा इकडे आपली माहेरची माणसं अशी... काय करु? जीवच देते या विचारांकडे ती वळत होती सतत.. सुदैवानं तिची मावशी, एका मैत्रिणीच्या कुटुंबानं तिला धीर दिलाय. ती सध्या मावशीकडे जाऊन राहिलीये व एका महिला संघटनेमार्फत तिच्याशी संवाद सुरु झालाय. 
गेल्या काही आठवड्यात तिचं समुपदेशन तर केलंच पण खटला लवकर निकाली निघेल यासाठी त्या संघटनेमार्फतचे प्रयत्न त्यांच्या शहरात सुरु झालेत. तसेच तिला काॅम्प्युटर आॅपरेटरच्या एका लहानशा नोकरीचीही संधी मिळाली आहे. काहीशी स्थिती सुधारत आहे सध्या.

दुस-या घटनेत घरात नवरा बायकोची भांडणं तशी नाहीयेत. दोघेही नोकरी करतात. दुर्दैवानं या कोरोनाकाळात नव-याची नोकरी गेली तर आयटीत काम करणारी ती वर्क फ्राॅम होम करत होती. आॅफिस जवळच असल्यानं काहीवेळा तिथं जात होती. मग घराकडे कसं तुझं दुर्लक्ष होतंय, तू स्वत:ला मोठी समजतीयस, तुझं आॅफिसात कुणाशी तरी अफेयर आहे असे आरोप करत तिला त्रास सुरु झाला. तिचे मोबाईल प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चेक करणं, तिच्यावर पाळत ठेवणं इथपासून प्रसंगी मारहाण करण्यापर्यंत मजल गेली. अनेकदा तिनं सांगितलं की तुला नोकरी मिळेल रे, निराश होऊ नकोस. जरा धीर धर.. तर त्याचे विपरीत अर्थ काढले गेले. तिच्यावर जबरदस्तीनं शारिरीक संबंध लादून स्वत:चं वर्चस्व सिध्द करायचे प्रयत्न केले गेले. 
सासू सास-यांनी 2-4 दा मुलाला समजवायचा प्रयत्न केला मग घाबरुन त्यांनी एका बेडरुममध्ये स्वत:ला अडकवून घेतलं. तुझं तू पहा बाई... नको राहूस हवं तर असं सांगितल्यावर ती अधिकच खचली.

 तिची एटीएम कार्डस् ताब्यात घेणं, मोबाईल मधील व्हाटसअप फेसबुक आदि अॅप जबरदस्तीनं डिलीट करणं, रोज मुद्दाम घरात वेगवेगळे पदार्थ करायला लावणं, तिची कामं थांबवून घरकाम करायला लावणं, दिवसा वा रात्री शारिरीक संबंध लादणं हे सारं सुरु होतं.  सुशिक्षित अशा त्या घरात हे असह्य झाल्यावर शेवटी तिनं घर सोडलं. आता घटस्फोटाची केस दाखल झालीय अन् तिच्या पोटात 5 महिन्याचा गर्भ आहे. मात्र ती जिद्दीनं लढतीये पण तिचे आईबाबा खूप मानसिक तणावात होते. त्यांना सतत ही भीती की आम्हाला काही झालं तर या एकुलत्या एका मुलीचं कसं होईल? पण तिचे काकाकाकू, चुलतभाऊ हे सारे तिच्या पाठीशी आहेत हाच दिलासा. तिच्या आईवडिलांशीच जास्त बोलावं लागलं. त्यांनाच धीर द्यावा लागला...

 एकूणच या लाॅकडाऊनच्या काळात घरातील अत्याचारांमध्ये वाढ झालीये हे जे वृत्तपत्रांतून, मिडीयातून सांगितलं जात होतं त्याचं हे केवळ एक टोक आहे.

तिस-या केसमध्ये घरातल्या त्या स्त्रीला सगळे समजून घेत होते. फेब्रुवारीत तिचं लग्न झालेलं अन् मार्चपासून लाॅकडाऊन. तिला घरकामाची काही सवय नव्हती माहेरी अन् इथं सगळ्या कामाचा बोजा पडला. सासू किचनमध्ये मदत करायची पण केरवारे, फरशी पुसणे, भांडी घासणे, स्वैपाकात नवनवीन पदार्थांची मागणी हे काही तिला जमेना. मग त्यावरुन नवरा बायकोची धुसफूस. नव-यानं तिला मदत करायचा प्रयत्न केला की सासू भडकायची. 4 खोल्यांचं तर घर... त्यात स्वैपाक तर निम्मा मीच करतेय... ही फक्त पोळ्या करते व काही सॅलड वगैरे. एवढीही कामं करायला नवरा कशाला हवा. त्याला करु दे ना त्याच्या आॅफिसचं काम.

अवघ्या सहा महिन्यात नव्या संसाराची नवलाई उरली नाही. रोजच्या वादावादीनंतर मग हिच्याकडून लैंगिक संबंधात असहकार असतो. नवरा त्यामुळेही वैतागलाय. बायको म्हणून हिला आणलं पण ना हिचा घराला फायदा ना मला वैयक्तिक... हे वाक्य ऐकायला कटू वाटलं पण त्यात तथ्यही होतंच. आता घरी कामवाल्या मावशी येताहेत गेल्या महिन्यात. पण त्यांचं नवरा बायकोचं नातं ताणलं गेलंय. त्यांच्यात शारिरीक जवळिकीचा प्रसंग आला की ती जणू गोठून जाते. तो भडकत राहतो. 

लग्नाचं मुख्य कारण हे खरंतर निरामय कामजीवन असतं. त्यामुळे शरीर व मनावर चांगले परिणाम होतात. हार्मोनल बॅलन्स नीट राहतो वगैरे गोष्टी त्यांना कुणी समजावून सांगितल्या नाहीयेत. त्यांचं ते महत्वाचं नातं खरंतर या सहा महिन्यात छान सहवासातून फुलायला हवं होतं मात्र यांच्यात तेच उरलं नाहीये. शेवटी त्यांना आता आधी गायनाॅकाॅलाॅजिस्टसोबत बोलायला सांगितलंय. स्पष्टपणे आपले प्रश्न / अडचणी सांगा हे सुचवलंय. तसंच प्रसंगी अधिकृत मानसोपचार तज्ञांकडून काहीदिवस थेरपीची गरज लागल्यास ती करावी हे सुचवलं.
या दोघांनाच नव्हे समाजातील शेकडो युवक युवतींना आजही या नाजूक गोष्टीबद्दल पुरेशी माहिती नाहीये हे दुर्दैवी वास्तव. पुरुषार्थाच्या चुकीच्या कल्पना, स्त्रिया- स्त्रियांमधील किंवा पुरुषांमधील अवास्तव गप्पा/ फुशारक्या/ टोमणे यामुळे अनेक नवविवाहितांना नेमकं काही कळत नाही. अनेकजण चुकत चुकत शिकतात तर बहुसंख्य वेळा स्त्री सोशिकपणे जे घडेल ते सोसत बसते. कित्येकदा आततायी स्त्री मुळे पुरुषांचीही कुचंबणा होते. अनेक मनोविकार तज्ज्ञांचा असा निष्कर्ष आहे की कित्येकदा एखाद्या मानसिक आरोग्य समस्येच्या मुळाशी बिघडलेलं कामजीवन असू शकतं.

प्रत्येकानं संकटकाळात खरंतर एकमेकाला आधार, प्रेम द्यायला हवं. मात्र त्याऐवजी नाती तुटेपर्यंत ताणली जातात. पशू करत नाहीत असं वागणं माणसांकडून घडतं. हे वेदनादायी आहे. कुणीही अन्याय वा अत्याचार सोसू नयेत ही माझी नेहमीची भूमिका आहे. 
आजही जिथं कुठे कुणाला काही मानसिक, भावनिक  समस्या भेडसावत असतील तर त्यांनी आपल्या या #जादूचीपेटी उपक्रमाचा लाभ घ्यावा व 9833299791 या नंबरवर काॅल करुन मनमोकळा संवाद साधावा. ह्या काॅलिंगसाठी कोणतीही फी नाही तसेच तुमची सिक्रेटस् कुणालाही सांगितली जाणार नाहीत याची खात्री देतो. ज्यांना बोलायला संकोच वाटतो त्यांनी nsudha19@gmail.com यावर इमेल पाठवावा.

#जादूचीपेटी या उपक्रमातील काही मोजके प्रश्न या सिरीजमधून मी मांडत गेलो. यानंतरचा भाग हा शेवटचा भाग असेल. त्यानंतरही संवाद, समुपदेशन सुरु राहील व ज्यांना गरज आहे ते नक्की काॅल करु शकतात.
- सुधांशु नाईक, कोल्हापूर(9833299791)🌿

Monday 5 October 2020

जादूची पेटी : किस्सा 8 ऑनलाईन औषधोपचार

#जादूचीपेटी #08
मंडळी, जादूचीपेटी या उपक्रमांतर्गत ज्यांना मनातली काही सलणारी गोष्ट, आपल्या मनावर ज्यामुळे ताण येतोय ती व्यथा, भीती मनमोकळेपणे सांगा असे आवाहन केले त्यानुसार जे विविध काॅल्स येत होते त्यात ही एक जरा वेगळी गोष्ट. ( नावं बदलली आहेत.) 
ही एका जोडप्याची कथा. रविंद्र आणि दीक्षा यांची. शहरात रहाणा-या, नोकरी करणा-या या दोघांना दुसरीत जाणारा मुलगा आहे आणि मूळ गावी रहाणारे सासू सासरे, जे अधूनमधून येऊन रहातात. यंदाही ते मुलाकडे आले अन् लाॅकडाऊनमध्ये अडकले. तसं सर्वांचं एकमेकांशी छान पटतं पण सगळ्यांनी कोरोनाची प्रचंड भीती घेतली. घरात दोन ज्येष्ठ नागरिक. मग त्यांना जराही सोसायटीत फिरु दिलं जाईना. 
सुरुवातीचे 2 महिने सर्वांनीच सगळे नियम पाळले मग मात्र हळूहळू सगळे सोसायटीत फिरु लागले पण या दोघांना मात्र घरातून सोडेनात.

सर्वात मोठा प्रश्न यांचा तो कोरोनापेक्षाही औषधोपचारांबाबतचा होता. नेहमीप्रमाणे रविंद्रच्या वडिलांनी त्यांच्या बीपी व शुगरच्या गोळ्या डाॅक्टरांकडून विचारुन घेतलेल्या. पण आता रविंद्रने सांगितलं की या गोळ्या घेऊ नका. मी गुगलवर या गोळ्यांची माहिती घेतलीये यामुळे तुम्हाला अमुकअमुक साईड इफेक्ट होईल. तुम्ही मी सांगतो त्या दुस-या गोळ्या घ्या. मी आॅनलाईन मागवतो. त्याचे बाबा म्हणाले, अरे बाबा गेली 5,7 वर्षं याच गोळ्या घेतोय मी. मला काही त्रास नाही तू माझ्या गोळ्या बदलू नको. शेजारच्या मेडिकलवाल्याला सांगितलं की तो घरपोच देतोच.
बाबांनी स्पष्ट सांगितल्यामुळे रविंद्रचा नाईलाज झाला पण त्यावरुन 3,4 दिवस धुसफूस झालीच. रविंद्र व दीक्षाची हीच सवय. काहीही हवं म्हटलं की आधी गुगलबाबाला शरण जायचं. गुगल जे सांगेल त्यानुसार अॅक्शन घ्यायची. लाॅकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात वाफ घ्या, काढे घ्या वगैरे जे सांगितलं जात होतं तेव्हापासून आजवर गेल्या 5 , 6 महिन्यात यांनी किमान 18,19 प्रकारचे काढे ट्राय केलेत. 
नवीन काही नेटवर वाचायला मिळालं की जुनं बाजूला टाकायचं व नवीन सुरु करायचं. त्यांच्या मुलाला मधेच 2 दिवस डिसेन्ट्री सुरु झाली. यांनी गुगल सर्च करुनच काही औषधं ठरवली. पुढचे 4,5 दिवस जेव्हा त्याला फारसा फरक पडेना मग शेवटी शेजारच्या डाॅक्टरकडे गेले. तेही बाबांनी हट्टानं पाठवलं म्हणून. 2 दिवसात लगेच मग फरक पडला.
त्यानंतर जर आपल्याला कोरोना झालाच तर काय करायचं यासाठी त्यांनी अॅझिटॅब पासून सगळी औषधं घरात आणवून ठेवली. कोरोनाची लागण झाल्यास रक्तवाहिनीत गुठळ्या होतात, त्यामुळे आपल्या रक्तवाहिन्या मोकळ्या हव्यात, रक्त पातळ हवं असं आॅनलाईन कुठंतरी वाचल्यामुळे, कुणालाही न विचारता हे दोघे  कारण नसताना इकोस्प्रीन सारखी गोळी गेले 5 महिने घेतायत. तरीही एक  दिवस शेवटी रविंद्रला ताप आलाच. मग त्याचा मला काॅल आला. मला ताप आलाय हा कोरोनाच असेल का? मी गुगलवर सगळं चेक केलंय लगेच औषधं सुरु करु का?

मी म्हटलं पहिली गोष्ट म्हणजे अशी आपल्या मनानं कोणतीही औषधं घेणं चूक आहे. एकतर त्वरीत तुमच्या डाॅक्टरांसोबत बोला आणि दुसरं म्हणजे स्वॅब टेस्ट करुन घ्या. किमान तुमच्या मनातील शंका तरी दूर होईल. पाॅझिटिव्ह असलाच तर मग डाॅक्टर सांगतील त्यानुसारच औषधं घ्या. आपल्याकडे असं म्हणतात की अर्धवट ज्ञान हे नेहमीच जास्त धोकादायक असतं तेव्हा कृपया स्वत:वर किंवा इतरांवर प्रयोग करु नका. 
तसेच गुगलसह विविध नेटवरील प्लॅटफाॅर्म्स हे मागेल ती माहिती देण्यापुरतेच असतात. त्या प्रत्येक माहितीसह ते फूटनोट देतात की तज्ज्ञांच्या सल्ल्यानिसार औषधं घ्यावीत. त्यांना ते पटलं व त्यांनी स्वॅब टेस्ट केली जी सुदैवानं निगेटिव्ह आली. 

आज या रविंद्रसारखीच हजारो माणसं आहेत की जी गुगलवर अवलंबून काहीतरी करतायत असं सोबतच्या बातमीचं कात्रणही सांगतंय.
मंडळी, आपल्या आसपास आपली माणसं असताना असं आॅनलाईन गोष्टीवर पूर्णत:  विसंबून राहू नये असं मला वाटतं. एखाद्या गोष्टीबाबत जरुर नेटवरुन माहिती घेऊया मात्र औषधोपचार सारख्या महत्वाच्या गोष्टींबाबत नुसतंच गुगल वगैरेवर आॅनलाईन पाहून थेट उपचार करणं  हे धोकादायक ठरु शकतं.
तुम्हाला कोणत्याही गोष्टीमुळे मानसिक ताण जाणवत असेल तर अवश्य आपल्या #जादूचीपेटी या मोफत उपक्रमाचा लाभ घ्या. 9833299791 या नंबरवर काॅल करा. मनमोकळं बोला, मनावरचा ताण हलका करायला आम्ही नक्की प्रयत्न करु!
- सुधांशु नाईक, कोल्हापूर(9833299791)🌿

Sunday 4 October 2020

जादूची पेटी : किस्सा 7 ज्येष्ठ व्यक्तींच्या अशाही कथा

#जादूचीपेटी या उपक्रमांतून गेले तीन आठवडे विविध लोकांशी बोलतो आहे. अनेकांच्या खरंच गंभीर समस्या ऐकताना मलाच शब्द सुचेनासे होतात. मग जमेल त्या मार्गानं त्यांना इतरांशी जोडून द्यायचे प्रयत्न करतो. ज्यांच्या समस्या या मुख्यत: मानसिक दडपणाच्या आहेत, कोरोनाच्या भीतीबाबत आहेत त्यांना माझ्या शब्दांचा दिलासा देत रहातो.
ज्या समस्या मलाही अंतर्मुख करतात त्यात ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या समस्या सर्वात जास्त प्रमाणात आहेत.  9833299791 या नंबरवर ते काॅल करतायत, संवाद साधतायत. ज्येष्ठ नागरिकांबाबत दोन गोष्टी गेल्यावेळी सांगितलेल्या, आजही दोन अगदी परस्परविरोधी किस्से..

#जादूचीपेटी #ज्येष्ठनागरिक #07

यातली एक गोष्ट तर माझ्या परिचयातील व्यक्तीबाबतची. माझा एक स्नेही व त्यांची पत्नी ( त्यांची नावं अनिकेत व अश्विनी आहेत असं समजूया) माझ्याशी बोलत होते त्यांच्या वडिलांविषयी. 
अनिकेत एमआयडीसीतील एका नामवंत कंपनीत मॅनेजर आहे तर अश्विनी एका मोबाईल कंपनीच्या आॅफिसात पार्ट टाईम 5,6 तास काम करते. घरी त्याचे वडील एकटेच व या दोघांचा 7वीतला मुलगा. असं मर्यादित कुटुंब. मात्र सततच्या भांडणांनी तणावात धुमसतय घर. कारण अनिकेतचे बाबा. त्यांनी एका कंपनीत पुण्यात अनेक वर्ष अॅडमिन आॅफिसरची नोकरी केलेली. मग रिटायर्ड झाल्यावर सगळे कोल्हापुरात दाखल झालेले. अनिकेतनं स्वत:च्या कर्तृत्वावर आपलं स्थान मिळवलेलं. वडिलांचा फारसा सपोर्ट नाही. त्यात त्यांना दारुचं व्यसन. त्यावरुन घरी आई व वडिलांची भांडणं सतत त्यांनं पाहिलेली. तो कायम दारुपासून दूरच राहिला त्यामुळे. 
अनिकेत सांगत होता, " 7 वर्षांपूर्वी हार्टफेलनं अचानक आई गेली अन् मग वडिलांना जणू मोकळं रान मिळालंय रे. रोज पितात. संध्याकाळी एकतर कुणा मित्राकडे जाऊन बसतात किंवा घरीच हाॅलमध्ये मोठमोठ्यानं टीव्हीवर गाणी लावायची व एकटंच पीत बसायचं. मुलाचा अभ्यास असतो, हिची काही कामं असतात, फोन सुरु असतात, कुणी येत जात असतं याचं कसलं भान नाही त्यांना. वर वेगवेगळ्या हाॅटेलमधून मनाला येईल ते मागवायचे. ते तसंच टेबलवर कसंही पडलेलं असतं. त्यांच्या खोलीत जाऊन काय ते करा असं ही एकदा म्हणाली तर अंगावरच आले. हे माझंही घर आहे मी हाॅलमध्येच बसणार, बघू कोण मला हलवतो ते.. अशी भाषा.."

अश्विनी मग सरसावली.." त्यांचं तोंड पाहिलं तरी माझ्या डोक्यात तिडीक जाते. मी आॅफिसला निघाले की यांचं तोंड सुरु होतं.. निघाली हिराॅईन हिंडायला. कुठं जाते काय करते देव जाणे. तो सकाळी 9 ला गेला रात्री 8 ला येतो. हिची मजा..
कितीवेळा सांगितलं अहो काहीही काय बोलता. मी कुठं जाते, काय करते हे पहा येऊन एकदा. सकाळी 10 ला अंकितचा क्लास असतो, त्याला सोडते मीच..त्याचा डबा मीच करते.. मग 11 ला शाळेत मीच सोडते.. 5 वाजता परत त्याला आणायचं. पटकन् खायला देऊन ज्युदोच्या क्लासला सोडते. मग घरी येतो दोघेही सोबत. मग घरचं स्वैपाक पाणी. यांचं जेवण बनवून ठेवलेलं असतं. पण अनेकदा ते तसंच व यांनी शेजारच्या हाॅटेलमधून काही मागवून ठेवलेलं असतं. अर्धवट उरलेलं अन्न धड फ्रीजमधे ठेवत नाहीत. निम्मं सांडलेलं, निम्मं खराब... घरभर पसारा... नकोच वाटतं मला घरी यायला खरंतर.. वर यांची बडबड. सतत केवळ मला टोमणे मारत असतात. खरंतर 10 वर्षांपूर्वी यांचं मोठं आजारपण झालेलं. तेव्हा सगळी सेवा, अगदी शी शू काढण्यापासून मी केलेली. पण आता त्यांना कसली जाणीवच नाही. सतत मला टोमणे मारुन काय मिळतं त्यांना देव जाणे. वर इतरांसमोर, नातेवाईकांसमोर माझी विनाकारण बदनामी सुरु असते ती वेगळीच.  मी शक्यतो कधीच त्यांना काहीच बोलायला जात नाही. आमचे नातेवाईक कधी कुणी आलेच घरी तर जाताना म्हणतात, अगं तू छान आहेस की आम्हाला वेगळंच वाटलेलं..."
आता या लाॅकडाऊनमध्ये तर दिवसभर त्यांची घरातली बडबड, चिडचिड ऐकून दोघांनाही प्रचंड त्रास झालाय. एका बाजूला मुलाशी गोड बोलणारे हे वडील सून व नातवाशी मात्र फटकून वागतात. सतत बोलायला निमित् शोधतात. काही कारणानं जर अनिकेत अश्विनीवर ओरडला तर लहान मुलासारखे खूष होतात. त्यांचं भांडणं व्हावं हीच जणू इच्छा... यामुळे अश्विनीची मनस्थिती बिघडलीये. दोघांच्यातलं नवरा बायकोचं नातं, शरीरसंबंध यातही अंतर पडत चाललंय. कशातून आनंद मिळत नाही अशी गत. तिनं मध्यंतरी तर काही दिवस डाॅक्टरांकडून होमियोपॅथीची ट्रीटमेंटही घेतलेली..

हे सगळं  सांगतानाही त्या दोघांना कसंतरी होत होतं. त्यांच्या घरी काहीतरी सुरु असतं इतकंच आम्हाला माहिती. पण हे हाताबाहेर जाणं योग्य नव्हतं. खरंतर इतका छान संसार आहे मस्त मजेत रहावं, प्रेमानं चांगलं बोलावं तर ते या काकांना का करायचं नाही याला उत्तर नाही. घराबाहेर सर्वांशी छान वागणारे काका घरात मात्र वाईट वागताहेत. त्यांना या उतारवयात एकटं सोडणं, कुठेतरी वृध्दाश्रमात ठेवणं या दोघांना नको वाटतं म्हणून तेही सहन करतायत अन् आपल्या चांगल्या दिवसांची माती करुन घेतायत. काकांच्या मित्रामार्फत, नात्यातील काही ज्येष्ठ व्यक्तींमार्फत काकांना समजुतीच्या चार गोष्टी सांगायचे प्रयत्न करुनही झालेत पण पालथ्या घड्यावर पाणी. आता शेवटी कधीतरी जास्त काही बोलले तर मी तरी कायमचं घर सोडून दुसरीकडे राहीन नाहीतर त्यांनी वृध्दाश्रमात जाऊन राहावं. माझा संसार विस्कटू नये त्यांनी ही अश्विनीची अपेक्षा योग्यच आहे. सध्यातरी सगळं धुमसतंय. दोघेही सहन करतायत पण ही मंडळी अशी एकत्र न  रहाणं हाच जणू यावरचा कटू उपाय आहे. हे सगळं नकोसं वाटतं पण नाईलाज झालाय...

तर दुसरी गोष्ट यापेक्षा जरा वेगळी आहे रामचंद्र जोशीकाका-काकूंची. तेच परवा बोलत बसलेले. जोशीकाका म्हणजे एकदम नीटनेटका माणूस. पापभीरु माणूस. रस्त्यात पायात किडामुंगी आली तरी त्यावर पाय न देता बाजूनं जाणारा. ते व त्यांची बायको आपल्या आपल्यात छान रमलेले. पहाटे उठून फिरणं, मग घरातील केरवारे, रो हाऊस समोरच्या मोकळ्या जागेतील लहानशी बाग नीट करणे हे सगळं होईपर्यंत मुलगा सून झोपलेलेच असतात. मुलाचा एक चांगला व्यवसाय आहे तर सून घरीच बसून त्यांची अकौंटस वगैरेची कामं पहाते. प्रसंगी आॅफिसातही जात येत असते. दोन्ही मुलांपैकी 1 काॅलेजला तर दुसरा शाळेत. त्यांच्या स्कूलबसेस वगैरे सगळंही आजी- आजोबांनीच जास्त माहिती. सुनेचा व त्यांचा जणू 36 चा आकडा आहे. 
घरात सकाळी किचनमध्ये काम करताना चुकून हातातून एखादं भांडं सांडलं तरी आभाळ कोसळल्यासारखं तांडव करते सून. घरातील 1 वस्तूही इकडे तिकडे उचलून ठेवलेली तिला पसंत नसते. स्वैपाकाला येणा-या बाईला आम्ही काहीही फर्माईश केलेली तिला चालत नाही. कधी काही खावंसं वाटलं तरी सांगायला मन संकोचतं. त्यात लाॅकडाऊनमुळे 5 महिने घरी बायका येत नव्हत्या. काही किचनमध्ये करु गेलं तरी हिची धुसफूस चालू. तरी बरं हिला आम्ही आॅर्डरी सोडत नाही. 
आमच्या लेकाला तर ताटाखालचं मांजर करुन ठेवलंय. घरात वयात येणारी मुलं आहेत पण यांचं जे सुरु असतं ते पाहून आम्हालाच कानकोंडं होतं. तिच्या सौंदर्यापुढं त्याच्यातला पुरुष पार नामोहरम झालाय पहा. तिच्याशिवाय राहायला नको म्हणून तो तिच्या शब्दाला अवाक्षरही विरोध करत नाही. उलट आम्हालाच म्हणतो, नशीब समजा तुम्हाला इतरांसारखं वृध्दाश्रमात रहावं लागत नाही हे... ना आमच्या औषधांकडे त्यांचं लक्ष, ना आमच्या आवडीनिवडींकडे. स्वत: उठून किचनमध्ये काही करु गेलं तर तेही नकोसं तिला.
काकू म्हणाल्या, ' यांना भजी फार आवडतात हो. मध्ये एकदा मीच सगळ्यांसाठी भजी करते म्हटलं तर अंगावरच आली. कोरोनाच्या या दिवसांमध्ये तेलकट खाऊ नका असं डाॅक्टर बोंबलतायत, तुम्हा वयस्कर लोकांना तेवढंही समजत नाही का हल्ली. भजी नाही खाल्ली 2 महिने तर मराल काय? असं म्हणाली ही... यांच्या तर डोळ्यात पाणीच आलं. म्हणाले, मी मेलो तरी चालेल पण परत भजीचं नाव काढणार नाही. या वयात अशा अपेक्षा तरी किती उरल्याहेत पण त्या क्षुल्लक गोष्टींसाठी मनं मारत जगण्यापेक्षा या कोरोनानं मरण तरी पदरी द्यावं.. कुणाला आपण नकोसे झालो असलो तर तिथं राहू नये हेच खरं...

काकांना व काकूंना मी वेगळं काय सांगणार होतो.? जमेल तितकं दुर्लक्ष करा, नका मनाला लावून घेऊ इतकच सांगू शकत होतो. लाॅकडाऊन मुळे ते कुठेही घराबाहेर किंवा नातेवाईकांकडे परगावी जाऊ शकले नव्हते. आॅक्टोबर नंतर कुठेतरी 2,3 महिने हिंडून या. तुम्हालाही तुमची स्पेस मिळेल व त्यांच्यापासून दूर राहिल्याचं समाधान...इतकच बोललो.

माणसं एकमेकांच्या जवळ असूनही द्वेष, मत्सर, इगो, ईर्षा हे सगळं का मनाशी धरुन बसतात हेच उमगत नाही. प्रेमानं आनंदानं रहावं, जे काही आपल्याकडे आहे ते छान सर्वांनी शेयर करावं, या संकटकाळात भांडणं शक्यतो टाळून आनंदानं वागून एकमेकाला धीर, दिलासा व आधार द्यावा असं का वाटत नसेल या माणसांना? असा प्रश्न मलाच पडतोय. 
मात्र जरा मनमोकळं बोलल्यानं या मंडळींना जरा बरं वाटलं. माझ्याकडून मी इतकंच तर सध्या करु शकत होतो...यापेक्षा जास्त काही करता येत नाही ही खंत मात्र जरुर वाटते.

तुम्हालाही तुमच्या मनातली व्यथा, ताण तणाव कुणाशी बोलता येत नसतील तर अवश्य आपल्या #जादूचीपेटी उपक्रमांतर्गत मला 9833299791 या नंबरवर काॅल करा किंवा nsudha19@gmail.com यावर पत्र लिहा. तुमच्या मनातील चिंतेची जळमटं दूर करायचे जरासे प्रयत्न करुया.

आनंदी जगूया, इतरांना आनंद देऊया.
- सुधांशु नाईक, कोल्हापूर (9833299791)🌿