marathi blog vishwa

Wednesday 30 August 2017

सह्याद्रीतील अनोखी प्रयोगभूमी

🍂
भारतातलं सामाजिक व भौगोलिक वैविध्य इतकं आहे की एका ठिकाणी यशस्वी झालेला प्रयोग दुसरीकडे राबवता येईलच याची शाश्वती नाही व राबवलाच तर यशस्वी होईल याची खात्री नाही. हे अन्य कार्यकर्त्यांप्रमाणेच  मंडळींना ठाऊक होतं. त्यामुळे आपल्या अडचणींवर आपणच उपाय शोधत पुढे जायचं तत्व अनुसरुन कामाला सुरुवात झाली. त्यातूनच एक नवी प्रयोगभूमी लवकरच निर्माण होणार होती..!

कोयना ते चिपळूण हा घाटमाथा ते पायथ्यापर्यंतचा प्रवास डोळ्यांना नेहमीच अवर्णनीय सुख देत रहातो. त्यात पावसाळ्यातले दिवस म्हणजे सगळीकडे घनदाट हिरवाई. एक कुंभार्ली घाटाची वाट व किरकोळ रस्ते सोडले तर सारं काही झाडी झुडुपात दडून गेलेलं असतं.

घाटाची दहाबारा वळणं ओलांडत खाली उतरलं की हवेतला गच्च दमटपणा लगेच जाणवू लागतोच.
घाट संपवून खाली उतरल्यानंतर जरा गाडी बाजूला थांबवून मागे पाहिलं की दिसते सह्याद्रीची उभी कातळभिंत. माथ्यावरचा जंगली जयगड धुक्यातून मधूनच डोकावतो. काही विशिष्ट ठिकाणाहून जर धुकं नसेल वासोटा, नागेश्वर, चकदेव आदि गिरीशिखरं अधूनमधून दर्शन देतात.

या सगळ्या पर्वतरांगा, त्यांच्या खालपर्यंत उतरलेल्या सोंडा व त्यातल्या द-याखो-यात इथली खरी स्थानिक प्रजा अनेक दशकं रहातेय. तीही लहानसहान झोपडी किंवा झापांतून.

ते आहेत गवळी- धनगर आणि कातकरी.

प्राचीन काळी कधीतरी घाटवाटांच्या संरक्षणासाठी, व्यापारी तांड्याना मदत करताना ही मंडळी इथं स्थिरावली. कोणत्याही शहरी सुविधांचा फारसा लाभ यांच्या अनेक पिढ्यांना फारसा कधीच लाभला नाही. इथं मुलं जन्माला येत राहिली, गुरंढोरं व वन्य प्राण्यांच्या साथीनं जगत मरत राहिली. क्वचित कुणी शिक्षणाची वाट चालू लागला तर दारिद्र्यानं त्याची पाऊलं रोखली.


इथल्या मुलांचं शिक्षण हाच मुख्य विषय डोक्यात ठेवून मग " श्रमिक सहयोग" या संघटनेचं काम सुरु झालं. राष्ट्र सेवादलाचे संस्कार रक्तात भिनवलेली ही मंडळी. सानेगुरुजी, एस एम जोशी, ना. ग. गोरे, प्रधान सर आदि मंडळींचं शिक्षणविषयक तत्वज्ञान " साधना"तून व अन्य प्रकारे तनामनात झिरपलेलं होतंच. त्याला आता अनुभवाची जोड मिळू लागली.

भारतातलं सामाजिक व भौगोलिक वैविध्य इतकं आहे की एका ठिकाणी यशस्वी झालेला प्रयोग दुसरीकडे राबवता येईलच याची शाश्वती नाही व राबवलाच तर यशस्वी होईल याची खात्री नाही. हे अन्य कार्यकर्त्यांप्रमाणेच याही मंडळींना ठाऊक होतं. त्यामुळे आपल्या अडचणींवर आपणच उपाय शोधत पुढे जायचं तत्व अनुसरुन कामाला सुरुवात झाली. त्यातूनच एक नवी प्रयोगभूमी लवकरच निर्माण होणार होती..!

संस्थेच्या उभारणीत सुमारे तीस वर्षांपूर्वी सहभागी असलेल्या राजन इंदुलकर यांच्याशी बोलताना मग हा सारा इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा राहू लागतो.

आजही कोळकेवाडी, ओमळी, अडरे, अनारी, तिवरे, कळकवणे, धामणंद, चोरवणे या सा-या पट्ट्यात वाहतुकीची मर्यादित साधनं उपलब्ध आहेत मग 30 वर्षांपूर्वीच्या परिस्थितीची कल्पनाच न केलेली बरी.

जिथं रोजचं तेल मीठ आणायलाही कित्येक मैल चालून जावं लागे, कुणाच्या घरी, शेतात दिवसभर  गड्यासारखं राबावं लागे तेव्हा कुठे दोन चार दिवस पोट भरेल इतके तांदूळ मिळत. रानातलंच काहीतरी शिजवून खायचं याचीही पोटाला सवय झालेली.

रोज जगणं व पोट भरणं हेच इतकं संघर्षपूर्ण होतं की शिक्षणबिक्षण यासाठी वेळ कुठून आणायचा?
त्यातही जवळच्या गावात जास्तीत जास्त चौथीपर्यंतची शाळा. तिथंही विविध अडचणी.

 त्यातही ते चारभिंतीतलं शिक्षण या रानोरानी हिंडणा-या कातक-यांसाठी अगदीच निरुपयोगी होतं. झाडांवरचा मध कसा काढायचा, फळं कशी काढायची, घर शाकारणी कशी करायची, गाईगुरांना रोग होऊ नये म्हणून काय करायचं, लहानसहान आजारावर कोणतं अौषध द्यायचं याचं कोणतंही शिक्षण त्या शाळेत मिळत नव्हतं.

या सा-यांसाठी मग श्रमिक सहयोग कष्ट करु लागलं. अनेक धनगरवाडे, वस्त्यांमधे कुणीतरी एखादा शिक्षक पोचू लागला. कधी काही डोंगर चालत ओलांडावे लागायचे तर कधी अनगड डोंगरधारेवरुन खडा चढ चढून जावं लागे. इतके श्रम करुन तिथं पोचावं तर मुलं बापासोबत डोंगरात काही कामाला गेलेली असायची.

1992 ते 2004 या काळात तरीही संस्थेनं एकदोन नव्हे तर तब्बल 26 शाळा आडवाटेवर विविध ठिकाणी चालवल्या. मुलांना शिकवतांनाच तिथलं जीवन, त्यांचं राहणीमान, भाषा, जगण्यासाठीचे आडाखे याची नोंद घेण्यात आली.
या कामात सर दोराबजी ट्रस्ट, इंडो जर्मन सोशल सर्व्हिस सोसायटी, सेव्ह द चिल्ड्रन कॅनडा आदि संस्थांचंही सहकार्य मिळालं.

या सगळ्या मदतीतून सह्याद्रीच्या उभ्या कड्याच्या पायथ्याशी व कोळकेवाडी जलाशयाच्या पिछाडीस ( कोयनेचं पाणी वीज निर्मितीनंतर डोंगराच्या पोटातून याच जलाशयात येतं. पुन्हा त्यावर वीजनिर्मिती होते व मग ते वाशिष्ठी नदीत सोडलं जातं.) सुमारे 17 एकर जागा ताब्यात आली.


आणि इथे सुरु झालं एक प्रामाणिक कार्य. तीच ही प्रयोगभूमी.

राजन इंदुलकर, मंगेश मोहिते व त्यांचे सहकारी गेली 10-12 वर्षे इथं एक आगळीवेगळी निवासी शाळा चालवत आहेत. कातकरी, गवळी-धनगर आदि वनवासी मंडळींची सुमारे 30 - 40 मुलं सध्या इथं रहाताहेत.

सकाळी त्यांचा दिवस नेहमीप्रमाणे सुरु होतो. शालेय शिक्षण व विविध खेळ खेळतानाच त्यांना जंगलांची जोपासना कशी करायची, शेती कशी करायची, पाणी जपून कसं वापरायचं आदि जीवनावश्यक गोष्टींचंही शिक्षण मिळतं. जगण्यासाठीची कौशल्यं विकसित करायचं शिक्षण मिळवतानाच संगीत, गायन, चित्रकला आदि छंदांचंही शिक्षण मिळतं. मुलं मस्त आनंदात शिकत रहातात.

या प्रकल्पाच्या सुरुवातीला कोल्हापूरच्या शिक्षणतज्ज्ञ लीलाताई पाटील यांनी अर्थसहाय्य दिलं. मुलांच्या गरजा ओळखून आवश्यक तशी इमारत उभी राहिली. रत्नागिरी, पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर आदि जिल्ह्यांतूनही काही ना काही मदत मिळत गेली. त्यातून संस्थेचं काम सुरु राहिलंय.

यापुढेही इथं बरंच काही घडवायची या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र विविध साधनं, त्यासाठीचे पैसे हे सारं कमी पडतंय.
शेकडो हातांच्या मदतीची त्यांना गरज आहेच. जेव्हा मुंबई पुण्यात एकेका मुलाच्या शिक्षणासाठी वर्षाला दीड दोन लाख रुपये सहज खर्च केले जातात, त्याचवेळी प्रयोगभूमीतील निवासी शिक्षणव्यवस्थेत 30-40 मुलांचा दरमहाचा खर्च सुमारे 70 हजारांपर्यंत जातोच. केवळ लोकांच्या सहकार्यानेच हा प्रकल्प कार्यरत आहे व यापुढेही कार्यरत राहिला हवा.

इथल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, त्यांना काही स्वयंरोजगार करता यावा यासाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे करायला हवा. आपला घरसंसार सांभाळून, चैन व मौजेच्या सर्व मोहांना बाजूला करत जी मंडळी इथं निरंतर राबताहेत त्यांना मनोमन सलाम करावासा वाटतो.

त्यांचं काम पुढे जोमाने वाढावं व या दुर्गम आदिवासी मुलांनाही सुखाचे चार क्षण मिळावेत म्हणून शहरांतील अनेकांनी या संस्थेला भेट द्यायलाच हवी. त्यांच्याशी संवाद साधायला हवा. त्यानंतर मग जमेल तशी मदतही करायला हवी. तीच एक उत्तम देवपूजा व तेच अतिशय पवित्र असं काम ठरेल हे निश्चित.

आज देशविकासाचं आवाहन सर्व स्तरांवरुन होत असताना गावोगावी,  दुर्गम ठिकाणी राहणा-या, साध्यासुध्या  सोयींपासूनही वंचित असलेल्या  आपल्या अशा  देशबांधवांना मदत केली तर हीच सगळ्यात मोठी देव, देश अन् धर्मसेवा ठरेल असं मला वाटतं. तुम्हांला ?

- सुधांशु नाईक ( nsudha19@gmail.com) 🌿

सर्व वाचकांनी जरुर भेट द्यावी म्हणून संस्थेचा पत्ता, कार्यालयाचा पत्ता व फोन नंबर पुढे देत आहे.

संस्थेचा पत्ता :-
प्रयोगभूमी, कोळकेवाडी, कोयना प्रकल्पाच्या  चौथ्या टप्प्याजवळ, ता. चिपळूण.

श्रमिक सहयोग कार्यालय:-
मु. पो. सती चिंचघरी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी. - 415604.

फोन - 02355- 256004, 256027

मोबाईल - 9423047620.

ईमेल - shramik2@rediffmail.com

( नोंद - संस्थेला देणगी दिल्यास कलम 80 G अंतर्गत आयकर सवलत उपलब्ध आहे. )

Friday 25 August 2017

🍁

आज रजनीताईंचा वाढदिवस. तोही पंच्याहत्तरीचा. एक खास दिवस. त्या मात्र गेले वीस दिवस सतत झुंजताहेत, तेही थेट मृत्यूसोबत.

झुंजणं, झगडणं हा तर त्यांचा जणू स्थायीभावच बनलेला. करणार तरी काय? १५ आॅगस्टला जेव्हा भारत स्वतंत्र होत होता तेव्हा कोकणातल्या तुरळ या एका लहानशा गावात एक चार वर्षांची चिमुरडी आजाराशी झुंजत होती. त्या पोलियोनं, तापानं तिला जन्मभर पुरेल असं अधूपण दिलं अन् त्याचबरोबर झुंजत रहायची एक अजोड ताकद.

तेव्हापासून गेली सत्तर वर्षं ती चिमुरडी झुंजतेच आहे..! नुकताच मृत्यूही थक्क होऊन मग लांबूनच दर्शन घेऊन परतलाय जणू.

सत्तर वर्षांपूर्वी महानगरातही अपंग व्यक्तींचं जिणं भीषण होतं, तिथं लहान लहान गावांतल्या परिस्थितीबद्दल काय बोलायचं? वाढत्या वयाबरोबर या मुलीनं कायकाय अन् कसं सोसलं असेल याची कल्पनादेखील अंगावर काटा आणते अन् डोळ्यात पाणी.

एखाद्या जिवलगाला सहज सोबत मिरवावं तसं मग रजनीताईंनी हे पांगळेपण सोबत मिरवलं. कधीच त्याचा बाऊ केला नाही व त्याचा वापर करत कुणाची दया, करुणाही मिळवली नाही.

स्नेहल रजनीताईंना दैवानं तीन महत्वाच्या गोष्टी मात्र दिल्या. कुशाग्र बुध्दी, धैर्य अन् कंठातला सुंदर कोमल सूर. केवळ अन् केवळ या तीन गोष्टींच्या जोरावर मग त्या जग जिंकत निघाल्या.


शिक्षण तर पूर्ण केलंच पण गाण्याचं शास्त्रीय शिक्षणही आत्मसात केलं. आज आपण किधीही प्रगतीच्या गप्पा मारल्या तरी आजही अपंग व्यक्तीची कुचेष्टा समाजात होतेच किंवा उगाच केविलवाण्या नजरांना सामोरं जावं लागतं त्यांना.

रजनीताई काखेत कुबडी घेऊन या दोन्हीविरुध्द कणखरपणे उभ्या राहिल्या.

आपल्या काॅलेजच्या दिवसांविषयी सांगताना एकदा म्हणालेल्या, " तुम्हाला सांगते सुधांशु, अख्खं काॅलेज, म्हणजे मुलं व शिक्षक सगळे घाबरायचे मला. काय बिशाद कुणी वेडंवाकडं वागेल. मी सरसावून तयारच असे. मीच नाही तर अन्य कुणाशीही कुणी वावगं वागलेलं मी कधीच सहन केलं नाही." नेहमी कोमल सूर गाणारा त्यांचा गळा तीव्र सुरांचं खास सौंदर्यही सहज दाखवून जायचा मग.

त्यांचा स्वभाव तर एकदम रोखठोक. 'एक घाव दोन तुकडे'वाला. वागण्या-बोलण्यातलं व्यंग त्यांना चटकन् समजतं, अन् मग थेट मुळावरच घाव. " उध्दटासी व्हावे उध्दट" असं आचरण असलं तरी त्यांच्याइतकी माया करणं फारच कमी लोकांना जमतं.

गेली काही वर्षे तर त्या अंथरुणालाच खिळून. तरीही शेकडो परिचितांचे वाढदिवस वगैरे सगळं त्यांना मुखोद्गत. त्या त्या दिवशी त्या व्यक्तीचं कौतुक होणारच. विविध माणसांच्या आवडीनिवडी ही त्यांनी अचूक टिपून ठेवलेल्या. त्यानुसार घरी डबा पोचणारच. पूर्वी स्वैपाकघरात स्वत: पदर खोचून निगुतीनं सारं करायच्या. हल्ली ते जमत नसलं तरी कोणत्या रांगेत कोणत्या डब्यात काय ठेवलंय हे बेडवरून सहज सांगू शकतात त्या.

खाणं अन् गाणं यावर मनापासून प्रेम.
मध्यंतरी एकदा अचानक त्यांच्याकडे गेलो. जाताना गरमागरम बटाटेवडे नेलेले. त्यादिवशी काहीतरी बिनसलेलं त्याचं.
वड्याचा पहिला घासही गिळता येईना. तिखट लागलं. अन् डोळ्यात पाणी आलं त्यांच्या.
वैतागून म्हणाल्या, " सुधांशु, सगळं सगळं नकोसं झालंय आज मला. मगाशी तर अनिताला म्हणत होते की मला पलिकडे रंकाळ्याकडे घेऊन चल. जीवच देते आता..."

गंमतीनं मी म्हटलं," ताई, अहो, जीव द्यायचाय ना, मग रंकाळा कशाला? वास मारतोय हल्ली पाण्याला. तुम्हाला चांगल्या निसर्गरम्य ठिकाणी नेतो आम्ही, तिथं हवंतर करा विचार मग..."

" तुम्ही गंमत करत माझा मूड चेंज करायचा प्रयत्न करताय हे कळतंय मला. पण नकोसं झालंय सगळं आता. मला खूप फिरायला आवडायचं तर माझं फिरणं बंद केलं देवानं. मला तिखट, चमचमीत खायला आवडायचं तर तेही आता खाता येत नाही. सतत तोंड आलेलं असतंय. गाणं म्हणायला आवडायचं तर आता गातानाही दम लागतोय हो. " सांग ह्या कोजागिरीच्या चांदण्याला.." ही ओळ म्हणतानाही आता दमतेय मी. कसं जगू हो या सुरांशिवाय???"

त्या मुक्तपणे रडत राहिल्या काही क्षण. आम्ही शांतपणे त्यांना मोकळं होऊ देत राहिलो.... काय करणार होतो आम्ही?

त्यांनी मात्र आयुष्यात इतरांच्या अडचणींवेळी नेहमीच धावून जात मदत केली. त्या व त्यांची मैत्रीण नसीमादीदी हुरजूक यांनी " अपंगांच्या मदतीसाठी व स्वावलंबी बनण्यासाठी संस्थेचं" स्वप्न पाहिलं. अनंत अडचणींवर मात करत उभं राहिलेल्या " हेल्पर्स आॅफ दि हॅन्डिकॅप्ड" या संस्थेचा आज वटवृक्ष झालाय. संस्थेच्या माध्यमातून अनेकांना नाजूक क्षणी मदत मिळत गेली व स्वत:चं अपंगत्व जमिनीत गाडून अनेक गुणवंत आज समाजात धीराने काम करु लागले.


या सगळ्या कामात रजनीताईंना कधीही कौतुकानं मिरवताना आम्ही पाहिलं नाही. आज किरकोळ कामं करुन पदव्या-पुरस्कार पदरात पाडून घेणारी मंडळी पाहिली की त्यांचं मोठेपण अजून भव्य वाटू लागतं. गायिका रजनी करकरे-देशपांडे व समाजसेविका रजनीताई या दोन्ही आघाड्यांवर त्या डौलानं कार्यरत राहिल्या. अनेकांना स्फूर्ती देत राहिल्या.

त्यांचं सर्वात मोलाचं काम कुठलं असेल तर अपंगाची लग्न जुळवणं. अपंगत्वाचे शेकडो प्रकार आहेत. मात्र याचा अर्थ असा नव्हे की त्यांचं सहजीवन असूच नये. दैवजात मिळालेलं एकटेपण भोगणं ही फार कठीण व वेदनादायी गोष्ट असते याचा प्रखर अनुभव असलेल्या रजनीताईंनी अनेक अपंगांचे, संस्थेच्या कार्यकर्त्यांचे संसार उभे करुन दिले. त्यापूर्वी त्यांना स्पष्ट व अत्यावश्यक सर्व समजावून देत उत्तम समुपदेशन केलं. त्याचं ऋण विसरणं अशक्यच.

तीच त-हा गाण्याची. अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी घडवताना त्यांच्याकडून कठोर मेहनत करुन घेतली त्यांनी. सर्वपरिचित कोसंबी बंधूंसारख्या अनेकांना त्यांनी केलेलं मार्गदर्शन भविष्यातील वाटचालीसाठी बळ देणारंच होतं.

इतरांचं सहजीवन फुलवणा-या, सुरांत रमलेल्या रजनीताईंचं भाग्य तरीही थोर म्हणायला हवं म्हणून पी. डी. देशपांडेंसारखा पती त्यांना लाभला. वयानं १६-१७ वर्षं लहान पीडींना लग्न करताना प्रखर विरोध सहन करावा लागला पण प्रेम जिंकलं शेवटी. संगीत, साहित्य, समाजकार्य अशा तिन्हीत रमणारा साथीदार व मित्रवर्ग यासह दिवस फार आनंदाचे होते !
म्हणतातच ना, " काव्यशास्त्रविनोदेन कालौ गच्छति धीमताम्" अन् म्हणूनच दिवस नव्हे वर्षं कशी गेली तेही कळलं नाही.

ते हल्ली हल्ली त्यांना जाणवू लागलं अंथरुणाला खिळल्यावर. तरीही काहीतरी करायची उर्मी असायचीय.

जानेवारीतलीच गोष्ट. माझी आई व सासरे कॅन्सरमुळे मृत्यूशय्येला खिळलेले. पहिलं कोण जाणार अशी जणू शर्यतच होती घरात. आमची धावपळ सुरु होती व अचानक पीडींना घेऊन रजनीताई दत्त म्हणून दारात उभ्या.

मी म्हटलं पीडींना, " अहो, त्यांची तब्येत बरी नाही, कशाला त्रास देत घेऊन आला त्यांना?"

ताडकन् म्हणाल्या, " त्यांनी मला नव्हे, मी आणलंय त्यांना. आज सकाळी उठल्यावर ठरवलेलं आज यायचंच. इथं तुमच्यावर पहाडावर संकट अन् मी घरात कशी बसून राहून हो?"

मग दोघांशीही बोलत बसल्या.
सास-यांनी खोल गेलेल्या आवाजात विचारलं, काही गाउन दाखवायला जमेल का?"

मग त्यांच्या आग्रहाखातर गळा साथ देत नसूनही गाणी म्हटली.  डोळ्यात पाणीच उभं राहिलं सर्वांच्या.

डोळे टिपत ताई म्हणाल्या," तुम्ही काहीतरी मागितलं व मी देऊ शकले.. फार बरं वाटलं बघा. नाहीतर मी काय देणार होते तुम्हाला...!"

त्यानंतर दहा दिवसांच्या दोघेही गेलेच. पण त्या ३-४ महिन्यात जवळपास रोज त्या फोनवरुन चौकशी करत होत्या. कुणाबरोबर तरी सूप, सार असं काहीबाही करुन पाठवत होत्या!

आज ७५ वा वाढदिवस त्यांचा. गेले वीस दिवस सर्वांच्या तोंडचं पाणी पळालेलं. झुंज देत त्या ICU मधून तर बाहेर आल्या आहेत व हळूहळू प्रकृती सुधारतेय. त्यातच योगायोगानं आज गणेशचतुर्थी.
भारावलेल्या मनानं व भरुन आलेल्या डोळ्यांनी इतकीच प्रार्थना करतो की
त्यांना सुखात ठेव. बाकी काही नको, बाकी काहीच नको.
- सुधांशु नाईक ( 9833299791) 🌿

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁