marathi blog vishwa

Thursday 26 September 2013

प्राजक्ताची फुलं

दक्षिणोत्तर धावणाऱ्या डोंगर रांगेत एका मोक्याच्या जागी सुंदरगड वसलेला. त्याच्या डावीकडून एक घाटवाट थेट खाली उतरत जाते ती तळातल्या कोकणापर्यंत. तिच्या एका बाजूस उंच काळाकभिन्न सह्याद्रीचा कडा आणि दुसरीकडे खोल दरी. त्या घाटमाथ्यावरून ती दरी भीतीदायक वाटते खरी पण ती नवख्यालाच. बाकी सगळी मंडळी उलट या डोंगर रांगेशी एकजीव झालेली.
जिथं घाट वाट तळातल्या इवलुश्या नदीजवळ पोचते तिथं तसंच एक छोटं गाव- दुर्गेवाडी. गावात अवघी दो – तीनशे घरं. त्यातली ४-५ ब्राह्मणाची, १०-12 मुसलमानांची आणि बाकी बहुतेक कुणब्यांची व नवबौद्धांची.
विष्णू दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दादा त्यातले एक. गावातले प्रथम मानकरी. गडावरील वरदायिनी देवीची यात्रा असो की गावच्या सुन्दरेश्वराची पूजा असो, त्यांच्याशिवाय कुणाचे पान हलायचे नाही.
दादांचं वागणंही तसंच. शांत, ऋजू व्यक्तिमत्वाचे दादा तसे सजग. दूर तिकडे अमेरिकेनं मंगळावर यान पाठवलंय इथपासून ते वश्या सुताराची बायको आजारी आहे इथपर्यंत सगळं ठाऊक असणारे. गावात त्यांचं किराणा मालाचं दुकान. त्यामुळे कायम लोकांची वर्दळ. मग अडी अडचणीला लोकं त्यांच्याकडे यायची. मदत घेऊनच माघारी जायची.
दादांना दोन मुलं आणि सुवर्णा, अवघ्या गावाची “वहिनीमाय..”. त्यांच्यासारखीच आल्यागेल्याचं पाहणारी. एक मुलगा –अविनाश, अतिशय बुद्धिमान, डॉक्टर होऊन पुण्यात आपल्या संसारात स्थायिक झालेला. दुसरा आशुतोष, मोठ्यापेक्षा जरा कमी हुषार. पण दुकानात नीटपणे लक्ष घालणारा. गावातली कामं सांभाळणारा. सगळ्यांशी संबंध राखून असलेला ;पण विलक्षण अबोल.

मात्र आता वहिनी थकली. घरचं आणि दारचं आता एकटीनं जमेना. जरा उठून बसलं किंवा, जरा चालून आले की गुढघे दुखायचे. अधून मधून कुणी न कुणी कसली कसली तेलं आणून देत. ती लावत त्या बसून राहत.
येताजाता लेकाला म्हणत, “ शुत्या, अरे, एकदा तुझे लग्न उरकून टाकले की मी मरायला मोकळी...पण बाबा तू असा ह्या गावात राहिलेला, हल्ली कोणा मुलीला गावाचे स्थळ नको हो..! सगळ्या मेल्या शहरात जायला सोकावलेल्या. तुझ्या सारख्या मुखदुर्बळ शंकरासाठी कोण पार्वती कुठं हरितालिका पुजतेय कुणास ठाऊक..! ये गो बाय, लवकर..सोडव मला म्हातारीला...”
तशा आजूबाजूच्या गावातल्या काही मुली सांगून आल्यावत्या. पण त्या बहुदा कुठे लग्न न ठरत असलेल्या. काही ना काही कमी असणाऱ्या. मग वहिनीच काही ना काही कारण सांगून त्यांना वाटेला लावत. “कुणीतरी मुलाच्या गळ्यात कशी बांधायची हो..शेवटी संसार आहे हा, शेवटापर्यंत नीट नको का व्हायला..?” असं मग येणाऱ्या जाणाऱ्यालाही सांगत.. सगळ्यावर आशुतोषची शून्य प्रतिक्रिया असे. अगदीच जास्त झालं तर तो मंद हसून म्हणे, “आई, कशाला गो इतकी बडबड करतेस, तू कोणतीही मुलगी निवड, मला चालेल...”

एकदिवस पहाटे बाहेरच्या अंगणात तुळशीला पाणी घालताना वाहिनीचं लक्ष कोपऱ्यात गेलं, आणि मनोमन सुखावल्या त्या. कोपऱ्यात आज किती तरी वर्षानंतर प्राजक्ताचा सडा पडला होता..! कित्येक वर्षापूर्वी माहेरून येताना त्यांनी हे प्राजक्ताचं रोपटं सोबत आणलेलं. अंगणाच्या एका कोपऱ्यात स्वतः लावलं. त्याच्या शेजारी बसायला एक चौथरा करून घेतलेला. तिथून दूर तळातल्या नदीपर्यंत सगळं कसं सुस्पष्ट दिसायचं. त्या प्राजक्ताशी त्यांचं भाबडं प्रेमळ नातं होतं. कारण माहेराशी जोडणारी ती एकच गोष्ट आता त्यांच्यासाठी जिवंत राहिली होती...!

मात्र कित्येक वर्ष झाली तरी तो प्राजक्त काही बहरला नाही.
वहिनीनं तर किती स्वप्नं पाहिलेली. “रोज सकाळी इथे छान सडा असेल, मी न्हाहून मस्त बाहेर तुळशीला पाणी घालायला आले की तेंव्हा तिथं मंद सुवास असेल त्याचा..! मग मी छान परडी भरून फुलं गोळा करेन, अगदी हलक्या हातानं, आणि देव्हाऱ्यासमोर छान सजावट करेन, रोज...तीही वेगवेगळी...! अगदी एक सुद्धा फूल तुडवलं जाणार नाही याची काळजी घेईन...! पण हा मेला प्राजक्त बहरेल तेंव्हा ना..? नुसताच आपला मोठा झालाय...!”

 
आणि तोच  प्राजक्त आज भरभरून बहरला होता..! त्यांना तो शुभशकुन वाटला. आपल्या गुढघ्यातली वेदना विसरून वहिनी घरात धावल्या...परकऱ्या मुलीच्या उत्साहानं परडी घेऊन आल्या...एकेक टपोरं फूल वेचू लागल्या...! 
परडी भरून गेली, तरी फुलं संपेनात. साडीच्या पदरात मग उरलेली फुलं गोळा करून त्या घरात आल्या. दादा एव्हाना आंघोळ करून अंग पुसत उभे होते.
“अहो, आपला प्राजक्त फुलला हो आज शेवटी...मला मेलीला वाटलं होतं की त्याची फुलं या जन्मी काही पाहायला मिळायची नाहीत..पण फुलला आता..! माझ्या लहानपणी हीच परडी घेऊन मी फुलं वेचताना अगदी थकून जाई. आज अगदी तस्सचं वाटतंय बघा..आता शुत्याचं लग्न निश्चित ठरणारच..”

बरेच दिवसानंतर तिचा तो सुखाने ओथंबलेला चेहरा पाहून दादानाही बरंच वाटलं.

आणि बोलाफुलाला गाठ पडावी तसं त्याच दिवशी पत्र आलं. थेट दूर सोलापुरातल्या जनू अण्णांचं - एका जुन्या मित्राचं. आपली तिसरी मुलगी- नलिनी, हिला दादांनी सून म्हणून स्वीकारावी अशी थेट विनंतीच त्यानं केली होती. तरीही समंजस दादांनी उलट टपाली कळवलं,
“ आमचा आशुतोष हा असा खेड्यातला. हे घरही तसं जुनं. तुम्ही सगळे अनेक वर्षं शहरात राहिलेले. तेंव्हा एकदा मुलीला घेऊन या. तिला घर, हे गाव, परिसर आणि आमचं जगणं पसंत पडले तरच मग कार्य उरकून टाकू...”

मग एकदिवस संध्याकाळी जनू अण्णा नलिनीला घेऊन आलेच गावात. घाट माथ्यावरून ते सगळं विलोभनीय दृश्य पाहून ती विलक्षण हरखूनच गेली. तसं त्यांचं मूळ गाव गुहागरजवळ. पण गेली अनेक वर्ष संपर्कच तुटलेला. तिच्यासाठी कोकण अगदी अगदी नवं होतं !
घरासमोर येताच ते जुनं डौलदार कौलारू घर, घराच्या मागून थेट दूर नदीपर्यंत उतरत गेलेली हिरवीगार डोंगर रांग, घरासमोरच मोठं अंगण, दुतर्फा असणारी झाडं, बाजूला फुललेला गुलाब, चाफा आणि तो प्राजक्ताच्या जवळचा बसायचा कट्टा...! ती खुळावल्या सारखी ते सगळं पहातच राहिली !

“अगो, तिथेच का उभी राहणारेस ? घरात तर येशील ना? वेडी गो पोर माझी...!” असं म्हणत वहिनी तिला सामोऱ्या गेल्या. तिला खांद्यावरून हात टाकून आपल्याबरोबर घरात घेऊन आल्या. समोरच्या बैठकीवर बसवत चेष्टेच्या सुरात म्हणाल्या, “ पहिल्यांदाच पाहतेस म्हणून कौतुक वाटतंय हो, नंतर कंटाळशील बघ..”
भानावर आलेल्या नलिनीने उठून त्यांना व दादांना वाकून नमस्कार केला. प्रेमळ पण ठाम सुरात म्हणाली,
“माई, पहिल्यांदाच हे पाहतेय ही खरी गोष्ट. पण कंटाळणार मात्र मुळीच नाही...आमच्या भागात तर दूर दूर दिसतात नुसत्या मोकळ्या जमिनी. माळराने. हिरवाई अगदी अधून मधून. तीही बाभळी किंवा कडुलिंबाची. आता आधी पाय धुवून येते मग पाहीन सगळं नीट तुमच्या बरोबर..”

 
तिचं बोलणं, त्यातला तो नकळता होकार समजून हरखलेल्या वहिनी तिला घेऊन आत गेल्या. दादा आणि जनू अण्णा ओटीवर बोलत बसले.

 
“दादा, गाव अजून अगदी तसंच आहे बघ. येताना पहात आलोय. ते कोपऱ्यावरचं गण्या तांब्याचे पत्र्याचे हॉटेल असो, कि गंगारामची पिठाची गिरणी असो, सगळे तसेच आहे रे. नाही म्हणायला चार सहा नवी चकचकीत दुकानं उभी राहिलीयेत, रस्ते डांबरी झालेत आणि ट्युबा बसल्यात इथे तिथं..!”

“अण्णा, रें आपली ही दुर्गेवाडी आहे इतकीशी. काय नवीन होणार इथं. त्यात हल्ली जो तो उठतो तो तिकडे चिपळुणाकडे धावतो कामाला. उरलेली जातात गुहागरच्या एनरॉनकडे मजुरी करायला. हल्ली शेती, बागायत करायचीय कुणाला ? सगळ्याना कमी कष्टात जास्त पैसे देणारी नोकरी हवी..”
 
रात्रीची जेवणं उरकून मंडळी झोपून गेली. नलू वहिनींच्या जवळ गप्पा गोष्टी करत करत पट्कन झोपून गेली. शांत झोपलेल्या तिच्याकडे वहिनी बराच वेळ पहात राहिल्या..कधी त्यांचा डोळा लागला त्यांनाच कळले नाही.
 
पहाटे वहिनींना जाग आली. पाहतात तो शेजारी ती नाही. लगबगीनं त्या उठल्या. दार उघडून बाहेर आल्या पहाटेचा मंद प्रसन्न प्रकाश पसरला होता. नलिनी हलक्या हातानं प्राजक्ताची फुलं गोळा करत होती. आणि तिच्या मागे पूर्वेकडे आकाश हळूहळू प्रकाशत होतं...जणू एका नव्या युगाचा उदय होत होता..! वहिनी मुग्ध होऊन ते पहातच राहिल्या. जरा वेळाने भानावर येत म्हणाल्या,
 
नलिनी, अगो इतक्या लवकर उठलीस तू ? आणि थेट बाहेर कशी काय आलीस ?”
 
“माई, मला या फुलांचं भारी वेड. माझ्या लहानपणी आम्ही सोलापुरात एका छोट्या घरात भाड्याने रहात होतो. तिथं असंच एक छान पारिजातकाचे झाड होतं. मी परकराच्या ओच्यातून खूप फुलं पहाटे पहाटे गोळा करून आणायची बाबांच्या पूजेसाठी. नंतर घरं बदलत गेली आणि मी दुरावले या आनंदाला. काल तुमच्या दारात हे झाड पाहिलं आणि मनोमन ठरवलंच होतं आज पहाटे उठून फुलं गोळा करायची म्हणून...!”
 
“तुला मी नलूच म्हणते बाई आता...तर नले, अगं हा प्राजक्त म्हणजे देवांचा वृक्ष. कुणी म्हणतात की समुद्रमंथनाच्या वेळी तो बाहेर आला, कुणी त्याला कृष्णाच्या कथेत गुंतवतात पण मला बाई हळव्या मनाच्या संन्याशासारखा वाटतो हा प्राजक्त. पहाटे पहाटे भरभरून फुलतो, आणि सूर्योदयाला अर्घ्य दिल्यासारखं सगळं दान वाटून निःसंगपणे उभा राहतो, कुणी ती फुलं गोळा करोत अथवा तुडवून जावोत, याला त्याशी काही देणंघेणं नाही. फुलं सुद्धा किती नाजूक. प्रत्येक फूल, फिकट केशरी झाक असलेला त्या इवल्याशा पांढऱ्या पाकळ्या, त्याचा तो केशरी देठ पुन्हा मला संन्याशाचीच आठवण करून देतो बघ. माणसानं असंच वागावं, आपलं काम करत राहावं, दुसऱ्याचा विचार न करता. पण तसं होत नाही बघ, आपण स्वतःपेक्षा दुसऱ्याकडे जास्त बघत बसतो आणि मग दुःखी, मत्सरी होत राहतो..”

 “माई, किती छान बोलता हो तुम्ही..”
 “अगं हे काही माझं शहाणपण नव्हे, या आजूबाजूच्या निसर्गानं शिकवलं बघ हे... आमचं माहेर तसं बऱ्या पैकी श्रीमंताचं. तेही रत्नागिरी सारखं मोठ्या गावातलं. त्यामानानं सासर तसं गरीबच अन या अशा आडगावातलं. मी सुरवातीला फार धुसफूस करायची. यांच्या शांत स्वभावाचा तर कित्येकदा राग राग करायची. पण हळू हळू बदलत गेले. एक माझी मेली सततची बडबड सोडली तर बाकी साफ बदलले बघ.. पण तू तशी नाहीस. तू जास्त समंजस दिसतेस. आणि परिस्थिती पहात वाढलीयेस. तुला बघितलं कालपासून आणि माझी काळजी मिटली बघ. मी आता मरायला मोकळी. सांभाळशील न आपलं घर नीट??”

 “माई, सांभाळीन हो. पण तुम्ही मरायच्या गोष्टी नाही करायच्या. मग मला सासुरवास कोण करेल...?”
दोघी मग खळखळून हसत होत्या, तोच दादा बाहेर आले. त्यांना पाहून मिश्किलपणे म्हणाले,

“अरे तुम्हा दोघींचं गुळपीठ चांगलं जमलेलं दिसतंय. बरय बघ नलिनी, आता माझ्या मागची कटकट तुझ्या मागे लागणार..सुटलो एकदाचा..”
“सुटकेचा श्वास सोडू नका असे. नाही सोडणार तुमचा पिच्छा असा सरळ पणे..” माई उत्तरल्या.
 “ बराय बाई, आता चहा तरी करशील, का बसणार तुम्ही दोघी अश्या इथेच ?”
 मग सगळे घरात गेले. चहा घेताना माई आशुतोषला म्हणाल्या,
“शुत्या, आज तू दुकानात नको बसूस. ह्या नलेला घेऊन वर गडावर जाऊन ये. तिच्याशी चार गोष्टी कर. तिला आपला परिसर दाखव. आज हे सांभाळतील दुकान..”
 आशुतोष च्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद नलिनीने अचूक हेरला.

आंघोळी झाल्यावर गूळ पोहे, नाचणीचे पापड अन मऊ भात खाऊन मग दोघे बाहेर पडले.
घराच्या मागचा एक छोटा डोंगर चढून अर्ध्या तासात ते मधल्या सपाटीवर पोचले तोवर नलिनी घामानं चिंब भिजली होती. आधीच गोरापान असणारा तिचा चेहरा लालबुंद झाला होता. तिथल्या एका दगडावर टेकत म्हणाली,
“अहो, तुम्ही सपासप चालत निघालाय पुढे, एकदा तरी मागें पहा ना..माझी कशी तारांबळ उडतेय ते. मला हे सगळं आवडतं, पण असे डोंगर चढायची सवय नाहीये हो..जरा इथे थांबू या..”
“ओ, सॉरी..माझ्या लक्षातच आले नाही. मी घराबाहेर पडलो की या निसर्गात वेडावून जातो. तसं मी बोलतो कमीच आणि त्यात हे आजूबाजूचे पर्वत, दऱ्या, पावसाळ्यातले झरे, धबधबे, धुकं पाहून अजूनच थक्क होऊन जातो. माझी बोलतीच बंद होते निसर्गापुढे. किती वर्षापासून हे सगळं इथं आहे. काय काय पाहिलं या डोगर दऱ्यानी..


असं म्हणतात की, एकदा कोकणातल्या स्वारीच्या वेळी शिवबाराजे आले होते. परत जाताना शेजारच्या त्या  घाटाने जाणार होते. तू बसलीयेस नं तसेच म्हणे ते या पठारावर थांबले. आणि समोरचा तो कडा, त्याचं आभाळात घुसलेलं टोक पाहून उद्गारले...”कशी सुंदर जागा..कसा हा निसर्ग..!.या समोरच्या कड्याच्या माथ्यावर एक छोटा गड बांधून त्याचं नाव ठेवा “सुंदरगड”. या घाट वाटेवर लक्ष ठेवायचे काम करेल तो...”
आणि मग त्यांच्या माणसांनी हा गड बांधून काढला. वर तिथे काही फार शिल्लक नाही आता. चार दोन बुरुज आहेत. पडका दरवाजा आणि आवश्यक तेथेच बांधलेली थोडकी तटबंदी..पण तिथून खालचे कोकण असं काही दिसतं की आपण पहातच राहतो. त्यातही नवरात्र –दिवाळीच्या नंतर अवघं कोकण दाट धुक्यात बुडून जातं तेंव्हा सकाळच्या वेळी जे काही दृश्य दिसतं तसं बहुदा जगात कुठेच नसावं...सुंदरगड नाव खरंच अगदी समर्पक ठेवलंय राजांनी ! “
 “तुम्हीपण तुमच्या आईसारखंच किती सुंदर बोलता हो..उगाचच लोकं सांगत होती आम्हाला, “ हा मुलगा घुम्या आहे म्हणून !” हसून नलिनी बोलली. 
तिच्या बोलण्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करत आशुतोष म्हणाला, “इथून पुढे गडावर जायला दोन वाटा आहेत. एक समोरच्या कड्याला पूर्ण वळसा घालून जाणारी, जरा सोपी पण जास्त वेळ घेणारी, दुसरी थेट कड्याच्या पोटात शिरते. तिथं एक “कळकी ची शिडी” आहे. ती चढून थेट कड्यावर पोचता येतं.. पण उभा कडा चढावा लागतो..कुठून येशील?”
“कळकीची शिडी म्हणजे?”
“अगं, आमच्याकडे बांबूला कळक म्हणतात, बांबू जोडून केलेली ती ही शिडी.”
“तुम्ही नेहमी कसे जाता?
“शिडीच्या वाटेनं”
“मग तसेच जाऊ या..फक्त जरा माझ्याकडे लक्ष असू दे म्हणजे झाले. नाहीतर कड्यावर पोचल्यावर मागे बघाल..तर कुणीच दिसणार नाही..” मिस्कीलपणे ती म्हणाली.

अर्धा तास पायपीट करून दोघे कड्याजवळ पोचले. ती शिडी म्हणजे चक्क जुने बांबू होते, एकमेकात घट्ट बांधत वरपर्यंत नेलेले. आणि त्या शिडीचे टोक दिसतसुद्धा नव्हते इतका उंच कडा...!

ती डोळे विस्फारून ते पहात राहिली...!
“भीती वाटत असेल तर राहूदे. आपण नंतर कधी येऊ.”
क्षणभर तिची द्विधा मनस्थिती झाली. मग निर्धाराने म्हणाली, “ नाही परत नको..जाऊया. इथूनच..”
-----
गडावर पोचली तेंव्हा हात भरून आलेले. चट्कन आशुतोषने जवळच्या एका दगडी टाक्यातले पाणी आणले. खांद्यावरच्या स्याकमधून एक मुगाचा लाडू काढून तिच्या हातात दिला..
तो लाडू, आणि ते अमृतासारखं पाणी पिऊन ती जरा कुठे भानावर आली..! समोरचं ते अवघं दृश्य भान हरपून पहात राहिली...

काही वेळानं शेजारच्या आशुतोषचा हात पकडून म्हणाली,
“माझ्या आयुष्यातला सर्वात अपार आनंद देणारा हा क्षण..तुमच्यामुळेच..मी सदैव ऋणी राहीन तुमची...तुम्ही मला नापसंत केलीत तरीसुद्धा...!”
----
नापसंतीचा प्रश्नच आता उरला नव्हता. लवकरच एका सुमुहूर्तावर लग्न झाले सुद्धा.
आशुतोष, नलिनी दोघानाही निसर्गाचं, पानाफुलांचे वेड. अगदी गोठ्यातल्या गुरांची काळजी घेण्यापासून ते स्वैपाकापर्यंत तिनं सगळं पाहता पाहता सांभाळायला सुरुवात केली. सोमवारी दुकान बंद असे. तेंव्हा दोघं डोंगरात फिरायला जात. जवळचा वासोटा किंवा व्याघ्रगड, नागेश्वर, रामघळ अशी अनेक ठिकाणं बघून झाली. पण तो सुंदरगड मात्र त्यांच्या सर्वात आवडीचा. कित्येकदा दोघं तिथं जात.
त्यांचं पाहता पाहता एकमेकात गुंतून गेलेलं आयुष्य पाहून वहिनी सुखावल्या. संसारातून हळू हळू लक्ष काढून घेऊ लागल्या. आणि त्यातच येणाऱ्या महाशिवरात्रीचे वेध लागले. त्यांनाच नव्हे सगळ्या गावाला..!
----
गावातले  सर्वात मोठे उत्सव तीनच, महाशिवरात्र, शिमगा आणि गणपती. दरवर्षी महाशिवरात्रीला गावातील सुन्दरेश्वराला अभिषेक असायचा. आधी तीन दिवस रात्री कीर्तन, छबिना असायचा. शिवरात्रीच्या आधीची रात्र जागवली जायची. सूर्योदयाला अभिषेक सुरु होई. त्यासाठी वरच्या गडावरच्या टाक्यातले पाणी आणले जाई. गावातल्या तरुण मुलांना डोळ्यासमोर ठेऊन मग स्पर्धा सुरु केली दादांनी. पहाटे गडावर जायचं आणि सूर्योदयापूर्वी कळशीभर पाणी घेऊन मंदिरात पोचायचं. गेली दोन वर्षं हा मान पटकावण्यात आशुतोष मागे पडत होता. त्याने फक्त एकदा ती स्पर्धा जिंकली होती. इतर वेळी त्याचा दुसरा नंबर येई. त्याचाच मित्र असलेला कदमांचा सुरेश दोन्ही वेळेला पहिला आला होता.
शिवरात्रीच्या आधी मग सगळे जण खूप तयारी करायचे. एकदा सगळे थकून परत आले तेंव्हा चहा घ्यायला आशुतोष बरोबर घरी आले.
गप्पा मारताना नलिनीला सुरेश म्हणाला,
“वहिनी, यंदा पण मी नाही हो तुमच्या नवऱ्याला जिंकू देणार..मला hat trick करायचीय यंदा.”
“भाऊजी, यंदा मीपण सामील होणारेय तुमच्या शर्यतीत..”
“नको वहिनी, तुला इतकं वेगानं चालणं जमणार नाही.  तसा अंधार असतो पहाटे..पाहिजे तर तू शिडीपर्यंत ये फक्त..”
“बघूया कुणाला काय काय जमतंय ते..!” हसून नलिनी म्हणाली.
------
शिवरात्रीला अवघं गाव स्वच्छ झालं. पताका, तोरणं लावून सजलं. मंदिराची रंग रंगोटी झाली. आणि स्पर्धा सुरु झाली.. शिरस्ता असा की खाली गावातील मंदिरातून दर्शन घेऊन वाट चालायला सुरुवात करायची, चढ सुरु होई तिथं वाटेत दादांच्या घराजवळ दोन मिनिटे थांबायचं. नेहमीप्रमाणे प्राजक्ताच्या कट्ट्यावर बसून वहिनी जाणाऱ्या प्रत्येकाच्या हातावर काही ना काही प्रसाद ठेवत होत्या...आणि वर बोलणं सुरूच होतं,
“मेल्या जगन्या, नीट जा हो, नाहीतर अंधारात गडावर जायच्या ऐवजी जंगलात शिरशील..”
आशुतोष आणि नलिनी जेंव्हा दोघं समोर आले, तेंव्हा त्या म्हणाल्या, “शुत्या, तुझी स्पर्धा मरूंदे, माझ्या पोरीला नीट जपून ने आणि परत आण म्हणजे झालं..”
सगळे निघून गेले. वहिनी तिथंच बसून राहिल्या. उत्तर रात्रीची शांत वेळ. गावातून मंदिरात रात्रभर रंगलेल्या कीर्तनाचा उत्तररंग सुरु होता. स्वतः दादा रात्रभर कीर्तन करीत उभे राहात. त्यांच्या आवाजातला अभंग इथं बसलेल्या वहिनीना कर्ण्यातून छान ऐकू येत होता,

 “वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे ! पक्षीही सुस्वरे आळविती !!

आकाश मंडप प्रिथवी आसन ! रामे तेथे मन क्रीडा करी !!

तुका म्हणे होय मनासी संवाद ! आपुलाची वाद आपणासी !!”

ऐकता ऐकता वहिनीचा डोळा लागला. इतक्यात त्यांच्या माथ्यावर टपकन एक प्राजक्ताचं फूल पडलं, त्या जाग्या झाल्या. बाजूला फुलं टपटपत होती. समाधानाने उठून आत गेल्या. परडी घेऊन आल्या..तिथं बसून. स्वतःशीच बोलत पुटपुटत फुलं वेचू लागल्या;
“प्राजक्ता, तुझं आपलं बराय बाबा. रोज फुलतोस आणि रिकामा होतोस, निःसंगासारखा. आम्हाला आमची नाती सोडवून घेताना मात्र उरात दुखत राहते. या आयुष्यातून बाहेर तर पडायचे पण कसे ते काही उमगत नाही बाबा..”
------
 
सूर्योदयाच्या काही वेळ आधी धावत पळत आशुतोष येत होता...चक्क नलिनीसुद्धा त्याच्या बरोबर होती. त्यानं दूरवरून प्राजक्ताला टेकून बसलेल्या वहिनींना पाहिलं. दूर कुंपणापलीकडून हाक दिली,
“आई, मी पुन्हा पहिला येतोय गं यंदा..”
तो तसाच पुढे चालला होता..पण आई बोलली कशी नाही हे उमगून अचानक थांबला...

कुंपण ओलांडून आत आला..
वहिनी झाडाला टेकून तशाच बसलेल्या होत्या आणि त्यांच्या माथ्यावर प्राजक्ताची फुलं पडली होती. हातातली परडी फुलांनी भरून गेली होती आणि उरलेल्या शेकडो फुलांचा आजूबाजूला सडा पडला होता.
जवळ येऊन त्यानं हात लावताच वहिनींचा निष्प्राण देह त्या फुलांवर पसरला..आणि...

 “आई गं....” त्याच्या तोंडून आलेली किंकाळी आसमंतात गुंजत राहिली...!!

-    सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)