marathi blog vishwa

Wednesday 30 September 2020

#जादूचीपेटी : किस्सा क्र 6 ज्येष्ठ नागरिक समस्या


#ज्येष्ठनागरिक #भाग पहिला
नमस्कार मित्रहो. जादूची पेटी या मोफत उपक्रमातून लोकांनी मनमोकळा संवाद साधावा, आपल्या मनातील निराशा, उद्वेग झटकून पुनश्च धीरानं जगण्याला सामोरं जावं हीच आमची इच्छा. त्यासाठी 9833299791 या क्रमांकावर काॅल करा किंवा nsudha19@gmail.com यावर पत्र लिहा असे आवाहन केले त्याचा लाभ घेत खूप वेगवेगळ्या वयोगटातील स्त्री व पुरुषांचे काॅल येतायत. कोरोनाग्रस्त किंवा भीतीनं घाबरलेल्यांचे काॅल येतायत. 
यातच महत्वाचा एक घटक आहे ज्येष्ठ नागरिकांचा. एकतर कोरोनासंकटाच्या पहिल्या दिवसापासून सतत सांगितलं जातंय की ज्येष्ठ नागरिकांना याचा जास्त धोका, ब्लडप्रेशर व शुगर असलेल्यांना जास्त धोका... या ज्येष्ठांनी कुठेही बाहेर पडू नये वगैरे वगैरे.
 त्यामुळे आधीच हजारो ज्येष्ठ व्यक्ती प्रचंड मानसिक ताण सहन करतायत. घरात सतत 6 महिन्याचा जणू बंदिवास... मग घरातले ताणतणाव...
ज्येष्ठ नागरिकांना सतत प्रचंड दडपणाला सामोरं जावं लागतंय. किती वेगवेगळ्या समस्या आहेत ज्येष्ठांच्या. त्यापैकी अगदी दोन परस्परविरोधी उदाहरणं, त्यांच्याशी झालेला संवाद हाच आजच्या लेखाचा विषय...

1 :- एकाकी पण चिडखोर असे देशमुख काका

देशमुख काका. सरकारी नोकरीतून उच्चपदावरुन निवृत्त झालेत 5,6 वर्षांपूर्वी. त्यांना दोन मुली व 1 मुलगा. मुलींची लग्नं झालीयत. मुलगा खाजगी नोकरीत चांगल्या पदावर. सून शिक्षिका. त्यांना 1 मुलगा. म्हटलं तर सगळं छान स्थिरस्थावर असा संसार. सोबतीला सेवाभावी अशी बायको. पण घरचे सगळे यांना वैतागलेत. कारण यांचा संतापी स्वभाव व सतत घरातली धुसफूस.
मुलगा व सून वैतागून त्यांच्याविषयी बोलत होते...

खरंतर सगळे त्यांची काळजी घेतात पण यांची सदैव हुकूमशाही वृत्ती. एकेकाळी ज्या अधिकारानं आॅफिसला तालावर नाचवलेलं तसं घरच्यांना नाचवायची वृत्ती. मुलगा तुलनेनं दुर्लक्ष करतो. कधी जास्तच घरात आरडाओरडा करु लागले तर बोलतोही. पण सुनेचा व बायकोचा कोंडमारा अधिक. 
अन् यांच्यामुळे सासू व सुनेत खटके सुरु झालेत. आपल्या नव-याचं चुकतं हे कळतं पण नवरा कुणाचं ऐकत नाही तर इतरांनी माझ्यासारखं गप्प बसावं ही त्यांची वृत्ती... तर सून म्हणते रोज हगल्या मुतल्या कोणत्याही कारणावरुन हे काहीही बोलणार, माझ्या आईबाबांचाही प्रसंगी उध्दार करणार... का ऐकून घ्यायचं मी? बरं मी सगळी कामं करते, स्वैपाकातही सासूला कामाला लावत नाही फारसं... तरी रोज उठून काही कारणं काढून हा माणूस मला शिव्या देतो. कधी पदार्थांवरुन, कधी एखाद्या वस्तूवरुन, कधी टीव्हीवर अमुकच सिरीयल पाहते म्हणून.. कशाहीवरुन सतत आरडाओरडा करतात.. कोणताही पदार्थ केला की नावं ठेवायची. सतत कुठल्या तरी हाॅटेलातून काहीतरी आणून खायचे. या 6 महिन्यात हाॅटेलं बंद, बाहेर जाता येत नाही मग रोज चिकन करा, मटन करा सांगतात. ते तरी कुठं मिळतंय...

पण आम्ही वीकली 1/ 2 दा तरी त्यांना द्यायचो. मग त्याला नावं ठेवायची.. हे कमी म्हणून.वर सतत यांना खायला काही लागतं. चिवडा, लाडू, काजू-बदाम, फळं असं सगळं घरी असतं. तेही कधी आमच्या मुलांनी त्या डब्यातून घेऊन काही खाल्लं की यांचा संताप.. लगेच म्हणणार, " आपल्या पोरांना तेवढं घाला..मला उपाशी मारा..". शोभतं का हे असं बोलणं? आमच्या घरी शेजारीपाजारी देखील हल्ली फारसे येत नाहीत. सरळ म्हणतातच, ते तुमचे बाबा आमच्यासमोरच तुम्हाला काहीतरी ओरडतात..ते बरं वाटत नाही... यांच्यासोबत 1 दिवस रहाणंही नकोसं झालंय. कितीही समजून सांगितलं तरी यांचा हेकेखोर व संतापीपणा कमीच व्हायला तयार नाही.

देशमुख काकांचा हा असा प्रश्न तर यादव काकांची कथा वेगळीच.

 2 :- भीतीनं गांगरलेले यादवकाका

यादवकाका. एका खाजगी बॅन्केतील निवृत्त कर्मचारी. साधा शांत स्वभाव. आपण भलं व आपलं काम बरं. पत्नीचं 4 वर्षापूर्वी निधन झालंय. यांना 2 मुलं व 1 मुलगी. सगळे आपल्या संसारात सुखी. घरात दोन नाती. एका मुलाकडे हे कोल्हापुराजवळच्या तालुक्याच्या ठिकाणी रहातात. काकांना देवाधर्माचं वेड जरा जास्त. पण गेले काही महिने देवळं बंद. जवळच्या शंकराच्या मंदिरातील पूजा, तिथले उत्सव हे सगळं काका हौसेनं मॅनेज करायचे. आता एकदम त्यांना रिकामपण आलंय. त्यात त्यांचे जे काही मित्र होते त्यापैकी दोघांचा मृत्यू त्यांना चटका लावून गेलाय. एकदम घरी गप्प गप्प बसून असतात. तोंडात " पांडुरंगहरी.." किंवा विठ्ठल विठ्ठल सदैव. मध्येच "ओम नम:शिवाय" चा जोरजोरात जप करु लागतात. एकटेच बसून रडतात. कुणी काही विचारपूस करु गेलं की काबरेबावरे होतात. काही नाही.. काही नाही म्हणत रुममध्ये गप्प बसून राहतात. जेवणातही धड लक्ष नसतंय. मन कुठेतरी कसल्यातरी विचारात.. रात्री झोपेतही अचानक ओरडत उठतात... मला भीती वाटतेय.. मी मरेन बहुदा असं म्हणतात..

त्यांच्या सर्व तपासण्या झाल्याहेत. ब्लडप्रेशर व्यतिरिक्त काही फारसा त्रास नाही त्यांना. डाॅक्टरांनीही समजावलंय की काका तुम्ही खंबीर एकदम फिट आहात...पण ते मात्र मनात मरणाची भीती घेऊन बसलेत.
त्यांची काळजी करुन मुलगा व सून अस्वस्थ. दोघेही काकुळतीने बोलत होते... वडिलांनी साधं तरी कष्टाचं जीवन जगलंय. त्यांना कसला त्रास होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेतोय, जपतोय. पण आई गेल्यापासून ते एकाकीच झालेत. मित्रांबरोबर सकाळ संध्याकाळ फिरुन येत. देवळात रमायचे. पण आता तेही विस्कटल्यासारखं झाल्यानं त्यांची विक्षिप्त वागणं वाढलंय. खूप कसल्यातरी विचारात एकटेच बडबडत असतात. कधी रात्री अपरात्री उठून बसतात. खोलीतच मोठ्यानं रामरक्षा वगैरे म्हणतात.  विचारलं की घाबरतातच एकदम... गप्प होतात... तुम्ही बोलाल का त्यांच्याशी?
###
मी बोललो. दोन्ही काकांशी बोललो. यादवकाकांना खरंतर मृत्यूची प्रचंड भीती वाटत होती. मुलगा व सून किंवा अन्य कुणाबद्दल त्यांना तक्रार नव्हती. आपण कोरोनानं गेलो तर कुणीही अंत्यसंस्कारही करणार नाहीत. मला शेवटच्या क्षणी मुलं, नातवंडं या कुणाचं तोंडही पहायला मिळणार नाही.. नकोय असलं मरण.. असं सांगून ते बोलता बोलता रडलेच चक्क. 
काकांना म्हटलं, " मी तुमच्या मुलाच्या वयाचा. मी काही तुमची समजूत काढू शकत नाही. तुम्हाला सल्ला देण्याइतका मी मोठा नव्हे. पण काका प्रेमानं इतकं सांगू शकतो की तुम्ही देवाधर्माचं इतकं सगळं करता मग मरणाला का घाबरता? आज तुम्ही वयाच्या सत्तरीत पोचलाय. सगळं छान झालंय तुमचं. मुलं व सुनाही छान आहेत. त्यांचाही संसार नीट सुरु आहे. मग खरंतर तुम्ही तृप्त असायला हवं. आपल्याकडे पूर्वी वानप्रस्थासारखी पध्दत होती. तुम्ही खरंतर तसंच वागताय. मुलगा व सुनेच्या संसारात ढवळाढवळही करत नाही. मग फक्त मरणाची भीती कशाला? उलट उद्या मरण येणार आहे असं समजून आजचा दिवस छान आनंदात घालवावा असं म्हणतात जाणती माणसं. 
तुम्ही छान नातवंडासोबत खेळा, मुलगा व सुनांसोबत गप्पा मारा, छान पूजा अर्चेत वेळ घालवा... जुनी गाणी आवडतात तुम्हाला.. दिवसभर रेडियोवर विविध भारती ऐका...मस्त जाईल तुमचा दिवस. रात्री झोपताना दिवस छान गेला म्हणून आपण देवाला हात जोडतोच... त्यातही कोरोनाची भीती नकोच. आता बरेच वेगवेगळे उपचार सुरु झालेत. 90 टक्के लोक बरे होतायत. तुम्ही नीट काळजी घ्या, समजा ताप वगैरे आलाच तर 1 दिवसही फुकट न घालवता डाॅक्टरांचा सल्ला घेतला तर काहीच होणार नाही तुम्हाला... 
काका म्हणाले, " खरंय हो. माझं मलाच कळतंय सगळं पण सुधरत नाही. कितीही मनाला धीर द्यायचा प्रयत्न केला तरी रिकामं बसलं की मनात तेच विचार येतात. मग भीती वाटू लागते. 

मी म्हटलं, " काका, मनाला एकटं सोडूच नका आता. घरच्या सर्वांशी छान बोलत रहा. अगदी घरी सूनबाई किचनमधे काम करत असेल तर तुम्हीही खुर्ची घेऊन बसा तिथं. गप्पा मारत. नातींसोबत खेळा. त्यांचा अभ्यास घ्या. तुमच्या दुस-या मुलाला-सुनेला- नातवाला काॅल करा... मित्रमंडळी इतके दिवस भेटू शकत नव्हती. आता हळूहळू लाॅकडाऊन संपतोय. तुम्ही भेटू शकता मित्रांना. उत्साहानं पण सगळी काळजी घेऊन भेटा. मस्त काही आवडते पदार्थ खा... असा दिवस एन्जाॅय करा की उद्याची सकाळ पहाण्यापूर्वी जरी मरण आलं तरी हसतमुखानं जावंसं वाटेल... हे फक्त तुमच्यासारख्या सिनियर्स साठी नव्हे तर प्रत्येक व्यक्तीसाठी गरजेचं आहे. आजचा दिवस आपला...तो आनंदात जावा म्हणून जे करायचं ते करुया."

काकांच्या परिसरातच राहणा-या इतर काही मित्रांनीही आता त्यांना नियमित काॅल करायचं ठरवलंय. एकमेकाला धीर देत ते यातून बाहेर पडतील असे वाटते.

देशमुख काका व त्यांचा मुलगा सून यांच्याशीही बोललो. देशमुख काका प्रचंड गर्विष्ठ तर आहेतच पण इतरांना कस्पटासमान वागवणं हे जणू रक्तात भिनलंय त्यांच्या. आज शहरात विविध ज्येष्ठ नागरिकांचे ग्रुप आहेत. त्यातही फारसे ते कुठे नसतात. विचारलं तर म्हणाले, " ही मंडळं सतत रडगाणी गातात. लोअर मिडलक्लास वाले सगळे. " 

यांच्या सुपिरिएरिटी काॅम्प्लेक्सला हाताळणं अवघडच. शेवटी त्यांना सांगावं लागलं की तुम्ही घरच्याशी नीट वागणारच नसाल तर या तुमच्या स्वत:च्या  घरात तुम्ही एकटेच रहा, हे सगळे नवीन घर घेऊन भाड्यानं राहतील. तुमची काळजी घेतायत ते, पण रोज उठून तुम्ही शिव्या दिलेलं कोण ऐकेल. तुमचा मुलगा व सून हेही चुकत असतीलच कधीतरी. तेच योग्य व तुम्हीच दोषी असं नसेलही प्रत्येक वेळी. पण तुम्ही सिनियर आहात. बाप आहात. तुम्हीच मन मोठं करुन त्यांना समजून नको घ्यायला? तुमची बायकोही तुमच्यावर चिडते, मुलगा, सून, मुलगी सगळे तुम्हालाच शिव्या देतायत. काय कमवलं आपण आयुष्यात याचा काका विचार करायला हवा...
 तुम्ही आॅफिसमध्ये जे अधिकारपद भोगत होता त्याला धाक म्हणून लोक सलाम मारायचे. तुम्हाला आता कोण तिकडचं विचारतही नाही मग कशाला इतका ताठरपणा? आणि आपल्याच मुलाबाळांशी प्रेमानं, मन मोठं करुन वागायला तुम्हाला कमीपणा का वाटतो? उलट तुम्ही प्रेमानं 2 शब्द बोलून पहा...मग समोरचे 4 शब्द प्रेमानं बोलतील. पण याक्षणी त्यांना तुमची नव्हे तर तुम्हाला त्यांची गरज आहे हे लक्षात ठेवायला नको का? 

काकांना पटत तर होतं पण त्यांचा इगो, अहंकार त्यांना स्वत:लाच कंट्रोल करता येत नाही हे दिसत होतं. मी यापुढे नीट वागायचा प्रयत्न करेन असं ते म्हणाले पण घडेल याची खात्री वाटली नाहीच. मुलगा व सुनेलाच शेवटी म्हटलं की तुम्ही एकदा ठामपणे काही दिवस जवळच वेगळं घर करुन रहा. तुमची कमतरता त्यांना जाणवू दे. यामुळे काय गैरसोयी होतात तेही त्यांना कळूदे. त्यांच्या 2 वेळच्या जेवणाचे व नाश्त्याचे डबे तुम्ही देत रहा व दिवसातून एकदा येऊन चौकशी करुन जा... पाहायचं काही दिवसानं फरक पडतो का काही...जर नरमले तर पुन्हा सगळे रहा एकत्र आनंदानं..

याव्यतिरिक्तही ज्येष्ठांच्या अनेक समस्या आहेत. काहीजणांना घरात खरंच वाईट वागणूकही मिळतेय त्याविषयी पुढच्या लेखात...त्यांनी खरंच मन घट्ट करुन वृध्दाश्रमाचा पर्याय स्वीकारायला हवाय.

शहरात अनेक ज्येष्ठ नागरिक संघ आहेत. तिथल्या मंडळींनीही आपल्या विविध मेंबर्सशी व त्यांच्या कुटुंबियांशी सतत सध्या संपर्क ठेवायला हवा. प्रत्यक्ष भेटी जरा अवघडच पण किमान फोनवरुन बोलणं, ज्येष्ठ नागरिकांना आॅनलाईन माध्यम शिकवून त्यांना ग्रुप काॅलिंग करायला लावणं हे असं काही व्हायला हवंय.
ज्या मंडळींना वाचनाची आवड असेल त्यांच्यासाठी घरच्यांनी किंवा तरुण मुलांनी समोर बसून पुस्तकं वाचून दाखवावीत, आॅनलाईन पुस्तक वाचनाचा आनंद द्यावा असे सुचवावेसे वाटते. 
सध्या कोरोनामुळे सर्वात जास्त घाबरलेला समूह ज्या ज्येष्ठांचा आहे. त्यांना आपणच धीर देऊया. गाणी, गप्पा, पुस्तकव्चन असे काही उपक्रम करुन ज्येष्ठ नागरिकांना आनंद देऊया.

ज्या ज्येष्ठ नागरिक समूहाला असं काही पुस्तक अभिवाचन ऐकायचं असेल तर मी स्वत: त्यांच्यासाठी ते करु शकतो. तसेच अन्य लोकही करु शकतात. ज्या ज्येष्ठ नागरिकांना माझ्याशी मनमोकळं बोलायचंय ते मला #जादूचीपेटी उपक्रमासाठी 9833299791 या नंबरवर कधीही  काॅल करु शकतातच! 
बोलत राहूया. एकमेकाला धीर देत राहूया...
- सुधांशु नाईक, कोल्हापूर(9833299791)🌿

Thursday 24 September 2020

जादूची पेटी उपक्रमाची दै. सकाळ कडून दखल

#जादूचीपेटी हा उपक्रम स्वयंस्फूर्तीने समाजातील घाबरलेल्या, गोंधळलेल्या लोकांना धीर देण्यासाठी सुरु केला. त्याला अनेकांचा छान प्रतिसाद लाभत आहे.
या उपक्रमाप्रमाणेच समाजात सकारात्मक काम सुरु रहावं, विविध लोकांनी एकमेकांना सहकार्य करत, धीर देत या संकटकाळातून समाजाला पुढे नेत रहावं हीच इच्छा मनात होती. त्यामुळे या समुपदेशनातील अनुभव व माझं मनोगत याबाबत सोशल मिडियात लिहीत गेलो. 
या सकारात्मक अशा लहानशा उपक्रमाला दै. सकाळमधूनही प्रिन्ट व यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून प्रसिध्दी देण्यात आली. याबद्दल Sambhaji Manohar Gandmale  Bhikaji Checher व दै. सकाळ टीमचे मी मनापासून आभार व्यक्त करतो.

समाजात आनंद पसरवूया. एकमेकांना धीर देऊया. अडचणींवर मात करत माणुसकीची नाती घट्ट जपूया. 
ज्यांना कुणाला काही मानसिक त्रास, ताणतणाव असेल ते अवश्य 9833299791 या आमच्या नंबरवर काॅल करु शकतात. किंवा nsudha19@gmail.com यावर पत्र लिहू शकता. 
🙏

सकाळनं यूट्यूबवर जो विडियो दिलाय त्याची लिंक ही ;

https://youtu.be/lEVdw0L8f_A

जादूची पेटी किस्सा 5 :- स्किल्स डेव्हलपमेंट क्षेत्रावरही संकट

या वर्षभरातील अचानक आलेल्या संकटांच्या मालिकेनं समाजमनात प्रचंड अस्वस्थता, नैराश्य पसरलंय. अनेक क्षेत्रातील उद्योग बंद पडलेत. माणसं मुकी मुकी झालीयत. सगळ्यांनाच काही ना समस्या. कुणी कुणाशी काय बोलायचं असं झालंय अनेकांना. पण मंडळी बोलायला हवं एकमेकांशी. धीर द्यायला हवा. 
भले आपण पैसे, वस्तूरुपानं मदत करु शकणार नाही पण " मी तुमच्यासोबत आहे, या संकटांतून एकत्र तरुन जाऊया" हा विश्वास देणं गरजेचं. त्यासाठीच सुरु केलाय आपण #जादूचीपेटी हा उपक्रम. लोकांना मानसिक धीर, प्रेम देण्यासाठी. ज्यांना कुणापाशी मन मोकळं करता येत नाहीये त्यांनी अवश्य आम्हाला काॅल करा 9833299791 या नंबरवर किंवा पत्र लिहू शकता nsudha19@gmail.com या मेल आयडीवर....
या कोरोना काळात अनेकांचे उद्योगधंदे विस्कळीत झालेत,अनेकांचं काम गेलंय, काहीजण आधीच अडचणीत होते त्यात हे परत मोठं संकट. यावर मात करायची तर अंगी असलेली स्किल्स वापरुन काही काम करायला हवं असं अनेक मार्गदर्शक मंडळी सांगतील. पण प्रत्यक्ष स्किल डेव्हलपमेंट क्षेत्रात किती भयावह परिस्थिती आहे याबाबतचा माझ्याच एका मित्राशी झालेला हा संवाद. स्किल डेव्हलपमेंट क्षेत्रात आम्ही कार्यरत होतो पण या 2 वर्षात या क्षेत्रात भयंकर प्रश्न आहेत. हा संवाद परिस्थितीचं गांभीर्य, भयानक रुप अधोरेखित करणारा...

#जादूचीपेटी # 05

" गुडमाॅर्निंग सुधांशु. प्रवीण बोलतोय. कसे आहात..पूर्ण बरे झालात ना?"
गुडमाॅर्निंग प्रवीण. आहे बघा आता ठीक. लढलो कोरोनाशी... काय म्हणतंय ट्रेनिंग सेंटर...?"

" बंदच की सगळं. ना सरकारी बॅचेस ना खाजगी बॅचेस. मोठा गाजावाजा करुन योजना सुरु केल्या.  लाखो रुपये खर्चून सेंटर्स बनवायला लागली. विद्यार्थ्यांकडून फी न घेता सरकारी अनुदानावर शिकवायचं. इतकं काम देऊ, हा प्लान तो प्लान.. सगळं झालं सांगून. प्रत्यक्षात हाती धुपाटणंच. खर्च तेवढे प्रचंड. ना सरकारी काम करता येतंय ना खाजगी. थकलेली भाडी, लोकांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत. तुम्हाला माहितीये काही जणांनी राज्यात आत्महत्याही केल्याहेत. भयंकर झालंय सगळं. काय करू काय सुचत नाहीये..

" प्रवीण, हे कोरोनाचं जाऊद्या. पण तसंही गेली 2 वर्षं केंद्र व राज्य सरकारी पातळीवर स्किल डेव्हलपमेंट क्षेत्राकडे पूर्ण कानाडोळाच केला गेला हे सत्य. या क्षेत्रात काम करणारे आपण बरेचजण सरकारी योजनेतून भरपूर काम मिळेल या विचारांनं निर्धास्त होऊन शासनाच्या खांद्यावर डोकं ठेवून बसलो हे चुकलंच. एकतर मुलांना फुकट शिकवणे हा निर्णय घ्यायलाच नको होता. त्यामुळे काय झालं की मुलं फुकट मिळतंय म्हणूनच कोर्सला येऊ लागली. पैसे देऊन त्याच कोर्सची जी ट्रेनिंग आपण पूर्वीपासून प्रामाणिकपणे सगळे करत होतो ती बंद पडली मग. सरकारच्या अनुदानाचे निकष पहाता या योजनेत " मुलांनी ट्रेनिंग नंतर नोकरी काही मुदतीत पूर्णवेळ केली तर अमुक एक रक्कम ( 30, 40 टक्के वगैरे) मिळेल" या निकषाचा मोठा फटका स्किल्स सेंटर्सना बसला कारण एकतर  बरीच मुलं नोकरी करायला तयार नव्हती, सर्टिफिकेट घेऊन पुन्हा निवांत हिंडत बसायची, त्यात काहीजण नोकरीवर गेलेच तर पूर्ण कायम होत नव्हते व अनेकांना नोकरीच मिळत नव्हती.
ट्रेनिंग सेंटर्सचं बजेट कोलमडायला मग सुरुवात झाली. त्यातच सरकारच्या प्रायरिटीज या 3 वर्षात बदलल्या. सुरुवातीला कौशल्य योजनांना भरपूर निधी मिळाला पण यात प्रचंड कपात होत गेली. सर्व निधी अन्य क्षेत्राकडे वळवला गेला. किरकोळ निधी या क्षेत्राकडे. ज्या ट्रेनिंग सेंटर्सना दरमहा 300, 400 मुलांचं ट्रेनिंग द्यायचं होतं तिथं कसंबसं 30,50 मुलांपर्यंतची मंजुरी मिळू लागली. खर्च तितकेच राहिले व कमाई शून्य होऊ लागली.
या क्षेत्रात मग काही संघटना उभ्या राहिल्या. मुंबई/ दिल्लीपर्यंत निवेदनं, आंदोलनं हेही झालं पण हाती अजूनही ब-यापैकी शून्यच आहे.

" बरोबर सुधांशु. पण आता काय करायचं ? हेच सुचेना."

" तुमच्या कदाचित लक्षात असेल की एकदा ब-याच संस्थांची मिटिंग झालेली. त्यात एक मुद्दा मांडलेला की सरकारी मदतीवर जराही विसंबून न रहाता काही करता आलं तर करायला हवं. या क्षेत्रात किंवा अन्य आवडीच्या क्षेत्रात. नुसतंच जागेचं भाडं, काॅम्प्युटर्स आदि उपकरणांचे खर्च वाढवत बसण्यापेक्षा कुठं थांबायचं हे ठरवायला हवं. सरकार अधूनमधून एकदम नवी योजना, नवे निकष असं काहीतरी पुढे करतं अन् जरा चलनवलन सुरु झालं की परत आडवा दांडा. पैसे मिळत नाहीतच पण खर्च वाढत रहातोय.. बहुदा कुणाला तेव्हा ते पटलं नव्हतं...."

तसंच प्रवीण आता कोरोनाचं संकट. जगभरची अस्थिरता यामुळे ट्रेनिंग अॅन्ड डेव्हलपमेंट या क्षेत्रात प्रचंड बदल होणार. मुळात नोक-याच नाहीत. घराघरात पैसे कमी होतायत. त्यामुळे पैसे देऊन स्किल्स शिकायला कमीच लोक येणार. बरचसं आॅनलाईन व फ्री असं सुरु झालंय. ज्याच्याकडे खरंच काही भन्नाट कोर्स असेल त्याच्याकडेच पैसे देऊन मुलं शिकायला येतील. पण त्याचीही गॅरंटी सध्या देता येत नाही. सरकारही सर्वाधिक गरजेच्या अशा शेती, आरोग्य, रस्ते/ पाणी/ वीज आदि क्षेत्रातच जास्त निधी वळवणार या सगळ्याचा विचार करता " स्किल डेव्हलपमेंट क्षेत्रातील संस्थांनी" कुठं थांबायचं याचा निश्चित आराखडा ठरवायला हवा. झालं नुकसान तेवढं पुरे अजून परत स्वत: च्या लायबिलिटीज वाढवू नयेत. भाड्यानं जागा घेतल्या असल्यास त्या परत देऊन टाकाव्यात किंवा सरकारी योजनेची आशा सोडून लहान जागेत शिफ्ट व्हावं. लहानप्रमाणात खाजगी कोर्स, 10वी, 12 वी किंवा इंजिनियरिंग/ अकौंटन्सी/ JEE वगैरेचे क्लासेस यात लक्ष द्यावं. पुढील दीडदोन वर्षं अधिक आव्हानात्मक असणार आहेत. कमीत कमी खर्च करुन आपण दोन वेळचं जेवून जगू कसं शकू यावर लक्ष द्यायला हवं.
इतकंच नव्हे तर प्रसंगी किराणा, भाजी किंवा अन्य दुकान चालवणे, आॅनलाईन ट्रेडिंग, काही मेडिकल प्राॅडक्टस् चं मार्केटिंग सेल्स, मेडिकल क्षेत्रासाठी आॅनलाईन किंवा खाजगी ट्रेनिंग्ज असं काही वेगळं करायला हवं तरच जिवंत रहाता येईल.
" बरोबर आहे. हे सगळं कळतंय पण अजूनही जीव तुटतोय. 20,22  लाख घालून जे सेंटर उभं केलं ते बंद करायचं याचं दु:ख फार आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आगामी खर्च शून्य करायचे असतील तर याला पर्याय नाहीच. करायला लागणार.. कारण आता सरकार आपल्याला या क्षेत्रात  मदत करेल या आशेवर रहाण्यात काहीच अर्थ उरला नाही हेच सत्य.."

मंडळी, आम्ही स्वत: ज्या क्षेत्रात कार्यरत त्याच क्षेत्रातील ही भयावह परिस्थिती. म्हटलं तर कुणाचीच चूक नाही..म्हटलं तर सगळीच गणितं चुकलीयत.  राज्यभर हजारो स्किल ट्रेनिंग सेंटर्स अशी बंद पडलीयत. तिथल्या कित्येक कर्मचा-यांची नोकरी गेलीच. मालकालाच जिथे पैसे मिळत नाहीत तिथे त्यांना कुठून पगार.. ?

Change is inevitable...थोडक्यात  बदल हा अपरिहार्य असतो हे जगप्रसिध्द वाक्य. कधी स्वत: हून बदल करावा लागतो तर कधी परिस्थिती आपल्याला वाकवून, मोडून बदलायला भाग पाडते. जे बदललतात ते टिकायची शक्यता जास्त असते. आपण सर्वांना या संकटकाळात टिकायचंय. म्हणून जे काही झालं ते मागे सोडून नवं काही करायला हवंय. खर्च त्वरीत कमी करुन किमान तुटपुंजं काही कसं कमवता येईल याचे अन्य पर्याय शोधायला हवेत असं मला वाटतं.
याक्षणी या समस्येवर तसं ठोस उत्तर इतकंच असू शकतं असं मला वाटतं. 
परिस्थितीनं हताश होऊन जीव मात्र कुणी गमवू नका, एकमेकांशी बोलूया, एकमेकांना धीर देऊया... जगायला बळ देऊया.

ज्यांना आमच्यापाशी मनमोकळा संवाद साधायचाय ते कधीही 9833299791 या नंबरवर काॅल करु शकतात. काॅलिंगची सेवा मोफतच आहे. ज्यांना काही जास्त समुपदेशन, मानसोपचार यांची गरज असेल त्यांना त्या पध्दतीची ट्रीटमेंट योग्य व्यक्ती किंवा संस्थांमधून देण्याची आपण नक्की व्यवस्था करु.

मन मोकळं बोलूया. तणावातून बाहेर पडूया.
- सुधांशु नाईक, कोल्हापूर( 9833299791)🌿

जादूची पेटी किस्सा- 4 नाती संपल्यानं नैराश्य

घरबसल्या रिकामा वेळ होता, लोकांना प्रत्यक्ष भेटण्यावर जरा बंधनं आलेली मग परस्पर संवादासाठी #जादूचीपेटी या उपक्रमाची सुरुवात केली. 
ज्यांना काही ना काही मानसिक समस्या भेडसावतेय, भीती, निराशा, एकटेपण, कुणापासून त्रास वगैरे गोष्टींमुळे मानसिक तणावाचा त्रास होतोय त्यांच्याशी आम्ही बोलू लागलो. सर्वांना आवाहन केले की तुमची समस्या मनमोकळेपणाने 9833299791 या माझ्या नंबरवर काॅल करा किंवा nsudha19@gmail.com या इमेलवर कळवा. तुमची समस्या आमच्या पेटीत टाका, आम्ही योग्य समुपदेशन करु तेही मोफत. तसंच अधिक काही सहकार्य अावश्यक असेल तर विविध संस्था, यंत्रणांच्या योग्य उपयोगानं समस्येवर मात करायचे प्रयत्न करुया. 
सध्या कोरोनामुळे बाधित झालेले तसेच अन्य समस्यांनी ग्रस्त असे अनेकजण सध्या आमच्याशी बोलतायत, त्यांना धीर देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय. त्यातील हा एक संवाद..गेल्या आठवड्यातला...( अर्थातच नावं बदलली आहेत.) अनेकदा एखादी गोष्ट विसरणं किती गरजेचं आहे हे सुचवणारा...

#जादूचीपेटी #04

" सुधांशु सर, नमस्कार. मी अजित पाटील. तुमच्या जादूच्या पेटी उपक्रमाविषयी व्हाटसअपवर मेसेज वाचायला मिळाला. म्हणून काॅल करतोय. मला मदत हवीये. 
" बोला अजित. तुम्ही कुठे असता, काय करता, काय समस्या जाणवतीये तुम्हाला..?"

" सर, माझं आयुष्यच संपवलं हो कोरोनानं..."

असं म्हणून तो रडायलाच लागला. 2,5 मिनिटांनी सावरला.. बोलू लागला..

" सर, मे अखेरीस माझ्या आई वडिलांना कोरोना झाला. त्यात गेले दोघंही. माझं लग्न ठरलेलं. तेही आता मोडलं. जिच्याशी लग्न ठरलेलं, साखरपुडा झालेला तिनं तिच्याच जुन्या मित्राशी पळून जाऊन जुलैमध्ये लग्न केलंय. किमान ती तरी मला साथ देईल वाटलेलं तर तिनंही पाठ फिरवली...मी आई वडिलांचा एकुलता एक मुलगा. आता जगावंसंच वाटेना..." तो भडभडून सगळं सांगत होता..

मीही सुन्न होऊन ऐकत होतो. मलाही क्षणभर काय बोलावं सुचेना. आपल्या पोकळ शब्दांनी काय व किती धीर द्यायचा याला असंच वाटलं मलाही.... माणसं इतकं सोसतायत, हे दिवस का दाखवलेत नियतीनं असंच वाटून गेलं. मग जरासा धीर गोळा करुन मी बोलू लागलो...

" अजित, मित्रा, खरंच भयंकर आहे रे सगळं. मी व माझी बायको दोघंही कोरोनाग्रस्त आहोत.  सध्या घरीच औषधं घेतोय. रिकामा वेळ व हाती फोन म्हणून समुपदेशन वगैरे कामं करतोय. खरंच बाहेरची परिस्थिती फार अवघड आहे. कुणी कुणाचं सांत्वन करायचं? प्रत्येकजण काही ना काही अडचण, संकट सोसतोय. तुझ्यासमोर जे नियतीनं दान वाढून ठेवलं ते खरंच वाईट. कुणाच्या नशिबी असे दिवस नको यायला.
मला सांग तुझी नोकरी/ व्यवसाय वगैरे काय आहे?

" सर मी एका कंपनीत एमआयडीसीत सुपरवायझर आहे. 4 महिने कंपनी बंद होती. सप्टेंबरपासून सुरु झालंय काम पण मलाच जावंसं वाटत नाहीये.

" तुझी मनस्थिती मी समजू शकतो पण घरी नुसतंच बसून तुला जास्त त्रास होतोय असं वाटत नाही का? आपण पाॅझिटिव्ह थिंकिंग वगैरे बोलतो खूप.. एकवेळ ते नुसतं बोलणं बाजूला ठेवू. कारण खूप अडचणीत माणूस असला की तत्वज्ञान नको असतं तर आधार हवा. याक्षणी तुला तुझ्या नोकरीचा आधार घ्यायला हवा.

तू म्हणतोस ना की तुझं सगळं आयुष्य संपवलं या कोरोना साथीनं. तसं नाहीये. तुझं आयुष्य संपवायचं असतं तर तुलाही मरण आलं असतं ना.. पण तू धडधाकट राहिलास ही मोठी गोष्ट आहे. आपल्या आईवडिलांचं हे असं अचानक कायमचं दुरावणं ही फार धक्कादायक गोष्ट, त्यात तुझी भावी वधू तसं वागली. तिनंही तुझ्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे प्रचंड दु:ख किंवा एकूण सर्वांविषयी तुझ्या मनात प्रचंड संताप असणं समजू शकतो. मात्र या सगळ्या गोष्टी तुला हळूहळू विसरायला हव्यात. तोच त्यावरचा एकमेक उपाय. बोलायला- ऐकायला कठोर वाटेल पण ज्या गोष्टींच्या आठवणी मनाला त्रास देतायत ते विसरायचं. ' लेट ईट गो' म्हणून त्याच त्रासदायक विचारांकडे पाठ फिरवायची. हे सोपं नाहीये पण करायला हवं. जगायचंय अजून तर हे करायला हवं.

" कसं विसरु हो सर. अंथरुणावर पडलो तरी आईबाबा आठवतात. आमच्या मावशीनं घराजवळच्या एका ठिकाणाहून दोन वेळच्या डब्याची सोय करुन दिली व ती तिच्या गावी गेली निघून. आता जे जेवण आल्यावर जेवताना आईची आठवण येते. घास उतरत नाही घशाखाली..."

" अजित, अशीच अवस्था सगळ्यांची असते. प्रत्येकाला आईवडिलांचं किंवा जिवलग व्यक्तीचं निधन असंच घायाळ करतं. यावरचा एकमेव उपाय म्हणजे आपलं मन कामात गुंतवणं. त्याला पर्याय नाही. तू जगावर राग काढतोयस पण एक लक्षात घे आज अनेकांच्या नोक-या गेल्याहेत. धंदा उद्योग बुडालाय. तुझी किमान नोकरी टिकलीये. तुला कामावर बोलवतायत. तुझ्याकडे काही गुण आहेत म्हणूनच तुला तिथे बोलवतायत की. मग तू नाकारतोस का? उलट तिथे गेलास की कामात मन रमेल. मित्र, सहकारी, बाॅस यांनाही तुझी कंडिशन माहितीये. काही चूक झाली हातून तर ते समजून घेतील. तू लवकरात लवकर कामावर जायला सुरुवात कर."

" सर, लग्न मोडलंय... तेही मनातून जाईना. मी कुणालाच नको, माझं कुणीच नाही मग कशाला जगू असं वाटलं..

" खरंतर लग्न होण्यापूर्वी तुझ्या त्या भावी बायकोनं आधीच हा निर्णय घेतला ही चांगली गोष्ट. त्यामुळे तुमच्या भविष्यातील अडचणी वाचल्या. ती मनाविरुध्द संसारात पडली असती तर कदाचित तुमच्यात सतत भांडणं झाली असती. सुख मिळालंच नसतं. मग परत वाद विवाद, घटस्फोट, कोर्ट..वकील वगैरे.. ते जास्त त्रासदायक झालं असतं तुम्हाला. तिनं भले धाडकन् निर्णय घेतला पण तो तिच्यासाठी व तुझ्यासाठीही योग्यच होता. 
आता ते सगळं तू हळूहळू विसरणं हाच त्यावरचा उपाय. 
यापुढे काही काळात तुझ्या मित्रांकडून, नातेवाईकांकडून एखाद्या अधिक चांगल्या मुलीचं स्थळ सुचवलं जाईलच की. तसेच तुलाही एखादी मुलगी अपेक्षेनुसार भेटू शकते. जे जे वाईट घडणार होतं ते सगळं आता घडून गेलं, यापुढे फक्त चांगले दिवसच येतील असा विचार करुन तूच नव्हे तर अशा इतरांनीही जगायला हवंय..."

" सर, तुम्ही सांगताय. प्रयत्न करतो सगळं विसरायचा. कामावर जायचाही विचार करतो.." असं म्हणून पटकन् त्यानं फोन ठेवूनच दिला. मला वाटलं कदाचित त्याला सल्ला पटला नसावा...

##
आज अचानक त्याचा परत फोन आला.
" सर नमस्कार. मी अजित पाटील. ओळखलंत का?

" हो ओळखलं की रे. बोल कसा आहेस..?

सर, त्यादिवशी तुमच्याशी बोललो अन् संध्याकाळी आॅफिसमधले सगळे सहकारी भेटायला आले. त्यांनीही तेच सांगितलं. खास मस्त जेवणाचे डबे, बिर्याणी वगैरे घेऊनच आलेले सगळे घरी. एकत्र गप्पा मारल्या खूप. जेवलो. सगळ्यांनी सांगितलं की काम सुरु कर लवकर...मग आज कामावर गेलो. मी ज्या मशिनवर काम करतो ते सगळं पाहिल्यावर बरं वाटलं. अनेकांना कोरोनानं कसा त्रास दिला हेही ऐकलं. आपणपण त्यातलेच एक. 
यापुढे घरी बसून नाही रहायचं...हे ठरवलं सर. त्या होणा-या बायकोलाही हे घडल्यानंतर पहिल्यांदा काॅल केला व सांगितलं की तू फार चुकीची वागलीयस. भरपूर राग आहेच मनात... पण बाई तुझी तू रहा आता सुखी. किमान ज्यासोबत लग्न केलंय त्याला तरी परत धोका देऊ नकोस. रोखठोक बोलल्यानं मलाही मोकळं वाटलं बघा.. तुमचे धन्यवाद. ' नकोसं सगळं विसरायचं' हा तुमचा मंत्र आता चांगला लक्षात ठेवणार बघा...! "
मंडळी, अजित हा मंत्र नक्की ठेवेल लक्षात. आपणही लक्षात ठेवायला हवंय. दु:ख, अपमान, अपयश, त्रास, जवळच्यांचे मृत्यू असा ज्या गोष्टी त्रासदायक ठरतात त्यांना विसरण्यासाठी खास प्रयत्न करुया. अनेक चांगल्या गोष्टी आयुष्यात घडलेल्या असतात त्या आठवत राहूया!

तुम्हालाही कुणाशी तरी मनमोकळं बोलायचं असेल, मनातली व्यथा कुणाला सांगता येत नसेल तर आमची #जादूचीपेटी तुमच्यासाठीच आहे. नक्की 9833299791 या नंबरवर काॅल करा किंवा nsudha19@gmail.com यावर इमेल करा. मनमोकळं बोलायला कोणतीही फी नाहीच. बोलत राहूया एकमेकांचं जगणं सुसह्य करुया. आनंदी करुया...!
- सुधांशु नाईक, कोल्हापूर( 9833299791)🌿

जादूची पेटी - किस्सा 3 :- छेडछाड अन् मुलीची काळजी

मित्रहो सुप्रभात. एकमेकांशी सुसंवाद असावा, लोकांनी मनमोकळं व्यक्त व्हावं, मानसिक ताणावर मात करावी यासाठी आपण सुरु क्लेला उपक्रम म्हणजे #जादूचीपेटी. तुमच्या समस्यांविषयी आमच्याशी बोला, आम्हाला 9833299791 या नंबरवर काॅल करा किंवा nsudha19@gmail.com या ईमेलवर पत्र लिहा व तुमचं मन मोकळं करा इतकं साधं हे सूत्र. या मनमोकळ्या संवादातून तुम्हालाच तुमचा मार्ग सापडावा ही अपेक्षा.
 तसंच जिथं जरा अधिक गंभीर समस्या आहे तिथं विविध सामाजिक संस्थांची मदत घेत अडचणी सोडवायचे प्रयत्न आपण करतो आहोत. 
या मोफत उपक्रमाला अनेकांचा प्रतिसाद मिळत आहे त्यापैकी हा एक संवाद... 
( अर्थातच नाव बदलून लिहिलेला.)

#जादूचीपेटी #03

"नमस्कार सुधांशुसर,  मी मालती बोलतेय. माझ्या मुलीबाबत मला बोलायचंय. ती दहावीला आहे.

" बोला मालतीताई...जरा तुमच्या कुटुंबाविषयी संक्षिप्त माहिती द्याल का"

"सर, आम्ही शहराजवळच्या उपनगरात राहतो. माझे मिस्टर पुण्यात नोकरी करतात. वीकेंडला घरी येतात. आम्हाला दोन मुलं, आमची मुलगी 10वी ला तर मुलगा 7वीला आहे. दोघांचाही अभ्यास नीट सुरु आहे. मी घरीच असते पण मुलांच्या शाळा, क्लास, अभ्यास यातच वेळ जातो. यंदा कोरोनाचं लाॅकडाऊन झाल्यावर आम्हाला शेजारच्या मुलांकडून जरा त्रास सुरु झालाय..."

" ताई, त्रास होतोय म्हणजे नेमकं काय? 

" सर, आमच्याच परिसरातील काही मुलं आहेत. काॅलेजला जाणारी. ओळखीतलेच आहेत. गेली 5,7 वर्षे इथेच वाढलीयत. ती कायम रस्त्यावरच्या चौकात उभी असायची. त्यांच्यात्यांच्यात असायची... गप्पा, आरडाओरडा, टोमणे वगैरे सुरु होतं. तसा फारसा त्रास पूर्वी नव्हता आम्हाला.. पण लाॅकडाऊनमध्ये घरातलं सामान वगैरे संपलं तर हीच मुलं सगळीकडे मदतीला येऊ लागली. काकी, तुम्हाला काही लागलं तर सांगा आम्ही देऊ असं सांगून दूध, किराणा, भाजी असं काही ते आम्हाला घरी आणून देत होते... त्यातूनच लक्षात आलं की त्यातील 2 मुलं आमच्या मुलीशी थोडं जास्त जवळीक साधताहेत. तिच्याशी बोलायचे चान्स मारतायत.."
" तुमच्या मुलीची प्रतिक्रिया काय होती.. तिलाही त्यातला मुलगा आवडतो का..? ती काय म्हणाली ?"

मालती ताई म्हणाल्या, " सर, लहान आहे हो ती. त्यांच्याशी बोलायची. चॅटिंग ही सुरु झालेलं. मग मी ते थांबवायला लावलं. कुठं काय कळतंय तिला.. तिला मी सांगितलेलं की मुलं वाईट असतात, जपून रहा."

" ताई, हे असं त्रोटक सांगण्याला काही अर्थ नसतो. तुम्हालाही ठाऊक आहे मुली हल्ली लवकर वयात येतात. वयाच्या 10,12 वर्षापासून त्यांना बरंच काही कळत असतं. प्रत्येक गोष्ट नीट समजावून सांगितली तरच मुलं ऐकतात. आज पटकन् एखादी गोष्ट कर म्हटलं तर आमच्याही मुली लगेच ऐकतातच असं नाही. मात्र एखादी गोष्ट पटली तर नक्की ऐकतात. तुमचा आता नेमका प्राॅब्लेम काय आहे?"

" सर, त्यानंतर आता ती दोन मुलं आमच्या लेकीवर पाळत ठेवतात. ती कुठं मैत्रिणीकडे निघाली तर किंवा जवळच क्लास ला जाते तेव्हा तिच्या मागावर असतात. तिला टोमणे मारतात.. त्यातला एकजण सतत लव्हशिप दे, दुस-या कुणा मुलाशी बोललीस तर याद राख वगैरे सांगतो.. दुसरा त्याला सपोर्ट करतो. काही दिवस हे मुलीनं सांगितलं नव्हतं. ती चिडून काही त्यांना बोलली म्हणून ते जास्त चिडलेत. आता लाॅकडाऊन वगैरे नसल्यानं त्यांना घरापर्यंत येता येत नाही मग कुणाच्यातरी अन्य फोनवरुन काॅल ही करतात.

गेल्या आठवड्यातच मी लेकीसोबत भाजी आणायला जाताना त्यांनी गलिच्छ शेरेबाजी केली. मी त्यांना जाब विचारला तर अंगावर आले. म्हणाले, " काकी, जास्त बोलायचं नाही, आम्ही तुम्हाला मदत केलीये.. आम्ही त्रासही देऊ शकतो.. तुमच्या लेकीनं बोलणं थांबवलंय आमच्याशी.. ते चालणार नाही.." 

मी मग त्या मुलांच्या घरी गेले. त्यांना सांगितलं. पण ते घरचे एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत. वडील घरी नव्हते पण आईनं सांगितलं की, " आमच्या मुलाला समजावतो आम्ही. पण प्रत्येकनं आपापली मुलगी जपायला पाहिजे. रस्त्यावर शंभर मुलं असणारच. किती जणांना तुम्ही समजवणार. तिनंच यांना खाणाखुणा करुन भुलवलं असेल...वगैरे वगैरे.."

त्यानंतर त्या मुलांना जरा अधिक चेव चढल्यासारखं झालंय.. मला खूप भीती वाटतीये हो. मी घरी जायला नको होतं का? आता काय करु हे. मुलीचं दहावीचं वर्षं.. त्यात शाळा बंदच अजून.. शाळा, गाव बदलूनही जाता येत नाही...मुलगी तर मला म्हणाली "त्याला हो म्हणते किमान रोजचा त्रास तरी नाही..." काही सुचेना झालंय हो...

" ताई, तुम्ही घरी गेलात हे बरोबरच आहे. तुम्ही आधी स्वत: हून मुलांना समजावयाचा प्रयत्न केला, आता घरच्यांनाही.. तुम्ही योग्य तेच सामोपचाराने करताय. तुम्ही सर्वात प्रथम 1 गोष्ट करा. मुलीला धीर द्या. तिची मनस्थिती ढासळू देऊ नका. तसेच मैत्रीच्या नात्यानं तिला खरंच तो मुलगा आवडतो का, की नाही आवडत.. तुम्ही मध्यंतरी हस्तक्षेप केला म्हणून ती घाबरुन त्याला नकार देऊ लागली का याचा स्पष्ट खुलासा करुन घ्या. जर मुलीच्या मनाविरुध्द तुम्ही रोखलं असेल तर एखाद्या क्षणी तीच त्याच्यासोबत जाऊ शकते... सध्या मी काही चुकत नाही हे तुम्हाला दाखवण्यापुरतं ती सरळमार्गी असल्याचं दाखवू शकते.. अर्थातच यामुळे प्रश्न मात्र वाढतो. अशावेळी तुम्हाला आधी मुलीचं समुपदेशन करायला हवं. तिचं शिक्षण, करियर, घराची जबाबदारी हे समजावून सांगायला हवं.

जर तिच्या मनात त्या मुलाविषयी आकर्षण वगैरे काही नसेल तर मात्र तिच्या संरक्षणासाठी तुम्ही कठोर होणं गरजेचं आहे. 

तुम्ही पुन्हा एकदा पतीसह किंवा तुमच्या घरातील/ परिचयातील अन्य ज्येष्ठ व्यक्तीसह  त्या मुलाच्या पालकांना भेटावं. त्यांनी आपल्या मुलाला कठोर समज द्यावी यासाठी स्पष्ट सुनावावं.

जर त्यातून मार्ग निघत नाही असं वाटलं तर त्वरीत पोलिसात तक्रार द्यायला हवी. कोणालाही अजिबात घाबरु नका. त्याचबरोबर महिला दक्षता समिती, विविध पोलिस स्टेशन्सच्या हद्दीतील महिला कार्यकर्त्यांची ' भरारी पथक' व्यवस्था यांच्याशी संपर्क साधायला हवा. हे सांगून त्यांना माझ्या परिचयातील काही कार्यकर्त्यांचे फोन नंबर्स दिले.
" ठीकेय सर.. मी प्रयत्न करते.. मुलीला जपण्यासाठी काहीही करेन मी. पण वाईट वाटतं हो, या फेजमध्ये अभ्यासाऐवजी तिला या ताणाचा सामना करावा लागतोय..."

##

मंडळी, मालती ताईंनी महिला दक्षता समितीशी संपर्क साधलाय व पोलिसातही साधी तक्रार नोंदवली आहे. त्या मुलांना सध्या पोलिसांमार्फत समज देण्यात आली आहे. 

समाजात हे आजच नव्हे तर अनेक वर्षं सुरु आहे. वयात येणा-या शाळकरी मुलींपासून ते वयाच्या पन्नाशीत पोचलेल्या महिलेपर्यंत अनेकींना विविध प्रसंगी पुरुषांकडून अर्वाच्य शेरेबाजी, मुद्दामून केलेलं लगट, घाणेरडे स्पर्श, छेडछाड यांचा सामना करावा लागतो हे समाज म्हणून आपल्यासाठी घृणास्पद , निंदनीय आहे. 
स्त्री पुरुष नातं, त्यांना एकमेकांविषयी प्रेम- आकर्षण वाटणं हे नैसर्गिक असलं तरी प्रत्येक स्त्री आपल्यासाठी उपलब्ध असावी हे चूक आहे. यातून अनेकदा मुलींना जबरदस्तीला सामोरे जावे लागते, प्रसंगी प्रेमाच्या आणाभाकांना भुलून लहान वयात मुली प्रेमविवाह करु पहातात किंवा कधी ताण असह्य झाला तर  जीव देतात. तुमच्या आसपास जर कुठे मुलींवर जबरदस्ती होत असेल, मुलींची छेडछाड होत असेल तर अवश्य जवळच्या पोलिस स्टेशनला कळवा, महिला कार्यकर्त्यांना कळवा. प्रत्य्क मुलीला निर्भयतेनं जगता यावं यासाठी समाज म्हणून पाठीशी उभं राहूया.

अशाच विविध समस्या जर कुणाला भेडसावत असतील तर अवश्य संपर्क साधा आमच्याशी 9833299791 या नंबरवर किंवा पत्र लिहू शकता nsudha19@gmail.com  या ईमेल आयडीवर. तुमची सिक्रेटस् नक्की जपली जातील अन् या तुमची अडचण मांडायच्या संवादासाठी कोणतीही फी नाही याची नोंद घ्यावी. 
- सुधांशु नाईक, कोल्हापूर (९८३३२९९७९१)🌿

जादूची पेटी - किस्सा 2 : कोरोनाग्रस्ताच्या मनातलं भीतीचं सावट

सध्याच्या परिस्थितीतच नव्हे तर इतर वेळीदेखील आपल्या ताणतणावांचा निचरा व्हावा यासाठी विविध प्रकारे बोलतं व्हावं याच उद्देशानं, तुमच्या मनातील दडपणं, भीती, चिंता, समस्येबाबत मोकळं होणं ह्यासाठी #जादूचीपेटी ही संकल्पना लोकांसमोर आणलीये. लोकांनी आपले प्रश्न मोकळेपणानं आम्हाला कळवावेत, संवाद साधावा, मन मोकळं करावं या आवाहनाला छान प्रतिसाद मिळतोय.
असाच एक संवाद.. एका कोविडग्रस्त पेशंटसोबतचा...
 ( अर्थातच नावं बदलून..)
#जादूचीपेटी #02

सुधांशुदादा, नमस्कार. मी जितेंद्र बोलतोय. कोल्हापुरातूनच. तुम्हाला वेळ आहे का जरा..मला थोडं बोलायचंय.
नमस्कार जितेंद्र. बोला.. मनमोकळं बोला. 
दादा, मला स्वत: कोरोना झालेला. गेल्या महिन्यात. सरकारी दवाखान्यात 15 दिवस अॅडमिट होतो. शेजारी काही पेशंट रोज मरत होते. माझ्या आईवडिलांचाही काही महिन्यापूर्वी अन्य आजारानं मृत्यू झालाय. माझा मोठा भाऊ दुर्घर रोगानं ग्रस्त होता.. तोही नुकताच गेला सर... गल्लीत, भागातही काही लोक मेले...मला प्रचंड भीती वाटतीये. मीही आता मरणार असं वाटतंय.. एका खोलीत बसून राहिलोय काही दिवस.. काय सुचत नाहीये.. खूप भीती वाटतीये. बाहेर गेलं की मला लगेच मरण येईल असं वाटतंय...नोकरीवरही इतक्यात येऊ शकत नाही असं कळवलंय. रात्री झोपेची गोळी घेतल्याशिवाय झोप येत नाही सध्या...

कोविडकाळात लोक किती भयभीत झालेत याचं हे उदाहरणच जणू. 
मी त्याच्याशी जरावेळ बोलत बसलो अवांतर काही. अजून अविवाहित आहे तो. एका संस्थेत नोकरी करतो. वाचनाची आवड आहे. देवाधर्मावर श्रध्दा आहे. दत्तमंदिरात जात होता नियमित. व्यसनही नाही.. असा एक हा सरळमार्गी युवक. अचानक आलेल्या संकटांनी एकदम भयव्याकुळ झालेला. मोठ्या भावाची मुलं शाळेत, काॅलेजात जातायत. घरी वहिनी सांभाळतेय बाकी सारं...

त्याच्याशी जनरल गप्पा मारल्यावर म्हटलं, " मित्रा जितेंद्र, मरण येईल म्हणून बाहेर जायचं नाही असं काही करु नको. तुला मरणच येणार असेल तर घरात बसल्याबसल्या देखील येऊ शकतं. जेव्हा मरण येणार तेव्हा येऊ दे. ते नशिबात असतं तेव्हा होईलच. पण त्या भीतीनं आजचा दिवस फुकट नको घालवूस. रोजचा दिवस आनंदी कसा जावा, रोज हातून नवं काही काम घडावं यासाठी सगळं जग प्रयत्न करत असतं. तूही करत होतासच की असं काही. 
सध्या या 6,8 महिन्यात आलेल्या जीवघेण्या दु:खानं तू गडबडून गेलायस. हे साहजिक आहे. अरे भलीभली माणसंदेखील अशा प्रसंगी व्यसनाधीन होतात किंवा निराशेनं आत्महत्याही करतात. तुला किमान तुझा प्रश्न समजतोय. तू विचार करतोयस त्यावर हेही मोठं आहे. आता तू रिकामा बसू नको अजिबात. म्हणतात ना रिकामं मन हे सैतानाचं.. तू मनाला गुंतवलं पाहिजे कशात तरी...

" बरोबर बोलताय दादा तुम्ही...पण नेमकं मी आता काय करु? काही सुचत नाहीये.."

" जितेंद्र, तू म्हणालास ना तुला वाचायची आवड आहे. जुनी गाणी ऐकायला आवडतात. दत्तमंदिरात जायला आवडतं. कोणती पुस्तकं आहेत का घरी तुझ्या? त्यातलं एखादं पुस्तक निवड. तुला बाहेर फिरायला जायला आवडतं तर सध्या गावाजवळच्या टेकडीवर सकाळी व संध्याकाळी चालत चालत जा. तिथे पुस्तक घेऊन जा. 2 तास वाचत बस. बरं वाटलं की घरी ये.घरी पुतण्यांसोबत गप्पा मार. त्यांनाही वडिलांच्या माघारी एकटेपण वाटत असेल. पत्ते, बुध्दिबळ, कॅरम असं काही खेळा. देवळात जाऊन काही प्रार्थना म्हणत बस.. पण मनाला एकटं सोडू नकोस. तुला कधीही अस्वस्थ वाटलं तर जवळचे कुणी मित्र असतील त्यांना किंवा मला काॅल कर...तू एक चांगला मुलगा आहेस असं तुझ्याशी बोलताना जाणवतंय. तू नक्की या परिस्थितीवर मात करशील बघ...बेस्ट लक.. "

बरं दादा.. प्रयत्न करतो.. तुम्हाला कळवेन मी. करेन फोन परत.. 

#
काल संध्याकाळी त्याचा फोन आला. 
" दादा, तुम्ही सांगितलेलं ऐकलं परवा. मग कपाटात शोधलं तर युगंधर हे पुस्तक दिसलं. दादानं आणलेलं. ते घेऊन मी बाहेर पडलो. दिवसभर गावाबाहेरच्या टेकडीवर वाचत बसलो. भगवान कृष्णाच्या चरित्रात रमून गेलो. मग घरी परतलो. गाणी ऐकली. देवापुढे दिवा लावून संध्याकाळी छान पूजा केली. वहिनीशी बोलत बसलो खूप वेळ. तीही खूप टेन्शनमध्ये होती. 
कालही सकाळी व संध्याकाळी चालत चालत फिरुन आलो. पुतण्यांना सोबत नेलेलं. बाहेरचा प्रसन्न निसर्ग पाहून कुठाय कोरोना असंच वाटलं. उगीचच आपण फार घाबरलोय असं वाटलं. कित्येक लोक रस्त्यावर भाजी वगैरे विकत होते. त्यांच्या नोक-या गेल्यात. त्यांच्यापेक्षा आपलं बरं.. किमान नोकरी तरी आहे हाताशी असं वाटलं बघा. आॅफिसच्या सायबाना काॅल करुन सांगितलं की मी 16 तारखेपासूनच नोकरीवर येतोय... उद्या सकाळी कामावर जातोच मी. तेवढंच कामात मन रमलं की बरं वाटेल.. घरासाठी मला उभं राहायचंय दादा..."

" व्वा जितेंद्र.. कौतुक वाटतं तुझं. इतक्या लवकर तुझं तुला समजलंय सारं. स्वत: ची जबाबदारी तुला कळतीये याचा आनंद वाटतोय मला. तुला खूप खूप शुभेच्छा.. बाहेर फिरताना स्वत:ची काळजी घे. मास्क वगैरे नीट वापर. तुझी जी औषधं सुरुयत ती न चुकता घेत रहा...."
आज सकाळी परत त्याचा फोन आला. दत्त भिक्षालिंग मंदिरात नमस्कार करुन पुढे कामावर जाताना मला फोन केला. तुमच्याशी दोन दिवस तास तासभर बोललो अन् खरंच मन मोकळं झालं. काल रात्री झोपेची गोळी न घेता शांत झोप लागली. आता एकदा तुम्हाला प्रत्यक्ष भेटूनही जाईन. नमस्कार दादा.."

###
निव्वळ मनमोकळं बोललं की इतकं छान काही घडू शकतं हे जाणवून आज मलाच खूप आनंद झालाय. कालच्या दै. सकाळ मध्ये हे एक सुंदर आर्टिकल आलंय. आनंदी जगणं का गरजेचे हे सांगणारं. सर्वांनी अवश्य वाचावं असं.
तुमच्यापैकी कुणाला काही मनातलं कुणाशी बोलता येत नसेल तर अवश्य आपल्याशी संपर्क साधा. तुमच्या परिचितांत कुणाला समुपदेशन हवं असेल तर अवश्य ही माहिती, ही पोस्ट त्यांच्यापर्यंत पोचवावी ही विनंती. 

#जादूचीपेटी ची किल्ली म्हणजे  आमचा नंबर  9833299791 व इमेल आयडी आहे nsudha19@gmail.com 

संपर्क व काॅलवर बोलायला कोणतीही फी नाही.
मंडळी, मनमोकळं बोलत राहूया. आनंदी राहूया..!
- सुधांशु नाईक, कोल्हापूर(९८३३२९९७९१)🌿

जादूची पेटी- किस्सा 1 : लाॅकडाऊन अन् आर्थिक अडचण

मंडळी, सध्याच्या धूसर वातावरणात मनावरचं मळभ हटवायला बोलतं व्हा, माझ्याशी संवाद साधायला कधीही काॅल, मेसेज करा असं सांगितल्यावर सर्वदूरवरुन विविध मेसेजेसचा , काॅल्स चा वर्षाव झाला. तुमच्या मनातील चिंता दूर करायला आमची #जादूचीपेटी अवश्य वापरा हे आवाहन अनेकांना मात्र नक्की आवडलंय.
अनेकांसह मलाही वाटलेलं की लोकांना प्रश्न आहेत, लहानसे किरकोळ किंवा मोठे गंभीरही. पण शक्यतो लोक विविध काॅम्प्लेक्सेस मुळे बोलायला धजावत नाहीत. कुणाला त्यात न्यूनगंड वाटतो, तर कुणाला खरं सांगून स्वत:चं आभासी चित्र उघड कसं करायचं असंही वाटतं. कुणाच्यात बोलायचं धाडस नसतं तर कुणाला इतकं भरुन आलेलं असतं की बोलायला शब्दच सापडत नाहीत...मात्र काहीजणांनी खरंच काॅल केला. 
त्यातील तुलनेनं साधं, हलकंसं उदाहरण आज सांगतो. त्यांना कसं लगेच बरं वाटलं याविषयी...कोविड पेशंट असलेल्यांच्या एका गंभीर प्रश्नाबद्दल जी एका व्यक्तीशी चर्चा झाली त्याबद्दल उद्या सांगेन.
#जादूचीपेटी  कहाणी क्र #01
 ( कहाण्या सांगताना सर्वांची नावं व स्थळंही बदलूनच सांगणार आहे. त्यामुळे गोपनीयतेचा भंग अजिबात होऊ देणार नाही.)
तर काल सकाळीच काॅल आला एक. त्यांचं नाव निलीमा आहे असं समजूया.

निलिमा : सर, नमस्कार. तुमची पोस्ट सोशलमिडियात पाहिली व लगेच बोलावसं वाटलं. मला माझ्या मिस्टरांबद्दल बोलायचंय. ते गेले 2 महिने माझ्याशी जवळपास बोलतच नाहीत हो.
' नमस्कार. काय करतात तुमचे मिस्टर.. तुम्हीही नोकरी वगैरे करता का?. अाणि सर नका हो म्हणू.. सुधांशु म्हणा फक्त...
' अहो आमचा व्यवसाय आहे. दुकान आहे इंडस्ट्रियल मटेरियल्सचं. 3,4 महिने बंद होतं. आॅगस्टपासून पुन्हा हळूहळू सुरु केलंय.
' धंदा सध्या होत नाही, आर्थिक अडचण आहे असं काही बोलले का ते तुम्हाला यावर आपण नंतर बोलू. आधी मला सांगा, घरी त्यांचं एकंदरीत वागणं कसं असतं नेहमी, घरी कोणकोण असता तुम्ही, तुमची जराशी माहिती...वगैरे.'

त्या बोलू लागल्या;
' सुधांशु सर, ते खूप शिस्तीचे आहेत. एकदम सगळं नीटनेटकं, जागच्याजागी लागतं त्यांना. रोजच्या वेळाही ठरलेल्या असतात..
घरी आम्ही दोघं व माझा इंजिनियरिंगचा मुलगा. सासूसासरे वारलेत. घरी जवळची अशी कुणी नातेवाईक मंडळी नाहीत फारशी. माझी नणंद असते याच गावात पण असं खूप रोज बोलणं वगैरे नसतंय. माझे भाऊ व वहिनी नाशिकला असतात. इथं मनमोकळं कुणाशी बोलावं असं खूप जवळचं कुणी नाहीये. मीही रिकाम्या वेळेत शाळेतील मुलांचे गणित इंग्रजीचे क्लासेस घ्यायचे, उगीच हौस म्हणून पण सध्या बंद आहे सगळंच.. एकदम सगळं थांबल्यासारखं झालंय हो...

' होय खरंय. तुम्हाला मिस्टरांचं वागणं अचानक खटकायला लागलं की हे असं अधूनमधून अबोला वगैरे असतं घरी.'

' तसे ते कमी बोलतात. चिडत वगैरे नाही कधी. सकाळी लवकर उठून आपलं आवरणं, देवपूजा वगैरे करुन नाश्ता करुन दुकानात जातात. दुपारी बहुदा घरी येत नाहीत कुणाला तरी डबा आणायला घरी पाठवतात. संध्याकाळी 7,8 पर्यंत येतात घरी. मग टीव्ही, बातम्या, व्हाटसअप असतं. कधी बोलतात कधी नाही. पण या 2 महिन्यात ते गप्प गप्प झालेत. मुलाशीही फारसं बोलले नाहीयेत. परवा मी काही म्हणायला गेले तर फाडकन् म्हणाले जीव द्यायला हवा म्हणजे सुटू सगळेच...' 

मला भीती वाटू लागलीये हो असं म्हणत त्या रडू लागल्या. त्यांचा आवेग ओसरु दिला. जरासा इतर काही बोललो. मग म्हटलं;
" हे पहा निलिमा, आज तुम्ही तुमची सगळी कामं लवकर आवरुन ठेवा. ते आले की प्रसन्नपणे त्यांना सामोरं जा. चहा नाश्ता वगैरे हवं तर तुम्ही द्यालच पण जरा शेजारी हात हाती घेऊन बसा. आईच्या मायेनं विचारपूस करा... तुम्ही त्यांची बायको आहातच.. जरासा आज आई व्हायचा प्रयत्न करुन पहा.
 जमल्यास कुठंतरी बाहेर जाऊन या. गाडीतून जा, मंदिरात जायला आवडत असेल तर तसं जा किंवा नुसतंच एकत्र बाहेर जोडीनं चालून या... जे काही सहज वेगळं बोलता येईल ते बोला.. त्यांना बाहेर भेळ वगैरे आवडत असेल तर खिलवा...मग येऊन जेवण...त्यांना आज तुमच्यातील आई किती प्रेमळ आहे हे दिसेल यासाठी जे जमेल ते करा. कारण पुरुषाला नेहमी बाई हवी असतेच हो पण त्यापेक्षा जास्त अनेकदा त्याला आई हवी असते, पॅम्पर करणारी..माया करणारी... आधार देणारी. त्यांना सांगा की त्यांच्या अडचणीत तुम्ही सदैव सोबत आहात...हा एक प्रयत्न करा.. मग उद्या बोलू परत आपण...गुडलक👍.

##
मी आपलं त्याक्षणी पटकन् जे मनापासून सुचलं ते सांगितलं. त्यांना कितपत पटलं, त्या करतील का याचा खरंच अंदाज आला नाही. आज साधारण 10.30 च्या दरम्यान त्यांचा काॅल आलाच... आवाजातला बदलच सांगत होता की त्यांचा ताण हलका झालाय...

#
" सुधांशुसर, गुडमाॅर्निंग. तुमचे खरंच मनापासून धन्यवाद हो. काल संध्याकाळी त्यांच्याजवळ बसले. मायेनं विचारपूस केली. नंतर त्यांच्यासह मी बाहेर पडले. इथलं गणपतीमंदिर प्रसिध्द आहे. सध्या बंद असलं तरी परिसरात जाऊन बसता येतं. बरं वाटतं. आम्ही चालत चालत गेलो. तिथे मग बसलेलो. कसल्या टेन्शनमध्ये आहात, मला नाही का सांगणार? काहीही अडचण असली तर सांगा आपण दोघं मिळून लढूया. तुम्ही एकटं नाही हे बोलले. 
मग म्हणाले की ज्यांना मटेरियल दिलंय 6 महिन्यांपूर्वी त्यांचे पैसे आले नाहीयेत. आपण ज्यांच्याकडून घ्यायचो ते, त्यानं तगादा लावलाय. त्याचीही अडचण, याचीही अडचण, माझीही अडचण... कुठून कोण कसे पैसे देणार??मग आम्ही त्या व्यक्तीला काॅल केला. त्यांना मी स्वत: सांगितलं की साहेब आम्ही तुमचे पैसे बुडवणार नाही यावर विश्वास ठेवा. त्या पार्टीकडून आले की नक्की देऊ. तुमचा विश्वास बसत नसेल तर घरी या. माझे दागिने तुम्ही घ्या. तारण म्हणून... नंतर परत द्या. 
त्या साहेबांनी लगेच सांगितलंय की बहेनजी दागिने नही चाहिये लेकीन 1-2 महिने में पैसे मिल जाने के लिए कुछ करना होगा... मै भी मुश्कीलमें हू. मग हप्तानं काही पैसे देता येतील का याबाबत तिन्ही पार्टी एकमेकांशी बोललो. खरंच खूप हलकं झाल्यासारखं वाटलं.
हे म्हणाले, मी सगळ्यांशी बोलतोय पण कुणी मानायलाच तयार नव्हतं. तू एकदम दागिन्यांचा विषय कशाला काढलास? त्यांनी दागिने मागितले असते तर...
मी म्हटलं अहो दिले असते की. तुम्ही सगळं पार पाडायला, पुन्हा मिळवायला खंबीर असताना मी का दागिन्याच्या मोहात अडकू... कितीतरी दिवसांनी यांचा चेहरा छान प्रसन्न वाटला मला...

घरी आलो. छान जेवलो. रात्री एखाद्या लहान मुलासारखे  मला मिठी मारुन शांत झोपले ते कुशीत शिरुन. कितीतरी वेळ थोपटत बसले मी.. खरंच बरं वाटलं. सकाळी रोज मुलगा जाॅगिंगला जातो तर आज त्याला म्हणाले, मीही येतो रे तुझ्यासह. जरा चालून येऊ. तू धावू नको आज. गप्पा मारत चालून येऊ. येताना मस्त गरमगरम भजी घेऊन आले आज... लेक ही म्हणाला आई बाबा आज किती फ्रेश दिसताहेत गं... असेच मस्त वाटतात बाबा नेहमी...!

" खरंच सुधांशु सर, तुमच्याशी बोलले हा योगायोगच. पण एकदम सगळं स्वच्छ झाल्यागत वाटलं पहा. यापुढेही अधूनमधून  बोलत राहीन हं मी. तुम्ही हवंतर चार्ज घ्या माझ्याकडून.. 

" निलिमाजी, अहो मी निमित्तमात्रच हो. सगळं तुम्हीच तर केलंत. हे असंच असतं. मन मोकळं झालं की आपोआप नवं काही सुचतं. मार्ग सापडतात. म्हणून बोललं पाहिजे. मनाचं आभाळ स्वच्छ राहिलं पाहिजे. आता तुमच्या ह्यांची आई बनला ना, असं कधीतरी करावं लागतं हे लक्षात ठेवा. पण म्हणून सतत आईपण नका हं दाखवू. नाहीतर यांनी ' बायको' सारखंही प्रेम करावं म्हणून वेगळं काऊन्सिलिंग करावं लागेल आम्हाला...'

निलिमा खळखळून हसल्या... ' तुमची फी...'
' छे, हो, साध्या एक दोन काॅल्स ना कसली आलीये फी. हाती फोन आहे, जेव्हा वेळ मिळंल तेव्हा बोलत रहायचं. तुम्हाला छान वाटलं हीच आमची फी. मात्र जर काही प्रसंगी प्रत्यक्ष भेट, चर्चासत्र, काऊन्सिलिंग, ट्रीटमेंट असं काही गरजेचं वाटलं तर नक्की आम्ही फी घेऊच.मात्र मनातल्या चिंता, टेन्शन्स, भीती, राग, हे सगळं आमच्या #जादूच्यापेटीत टाकायला काहीच चार्ज नाही. तुम्ही असंच इतरांनाही अवश्य सांगा काॅल करायला. आम्ही त्यांच्याशी बोलायला नेहमीच तयार आहोत..!

##

मंडळी, निलिमाताईंना एकदोन काॅलवर काही मिनिटं बोलून छान वाटलं. त्यांनाच त्यांचा मार्ग सहज दिसू लागला. नातेसंबंध घट्ट झाल्यासारखं वाटलं त्यांना.
हीच तर गंमत आहे. तुमच्यासाठीही आहे  आपली #जादूचीपेटी. यात टाकून द्या तुमचे प्रश्न, चिंता...
तुम्हाला किंवा तुमच्या मित्रमंडळीत कुणाला मनस्वास्थ हरवल्यासारखं वाटतंय का? तसं वाटत असेल तर अवश्य आम्हाला काॅल करा 9833299791 या नंबरवर. व्हाटसअप काॅल, मेसेजेसही चालतील. किंवा बोलायचं कसं असं वाटत असेल तर nsudha19@gmail.com  यावर मला इमेल पाठवा. 

जे कोरोना संकटातून जातायत, घरात वगैरे आजारपण सोसतायत त्यांनीही मानसिक आधार हवा असल्यास काॅल करावा ही विनंती.

नि:संकोचपणे मनमोकळं बोलत राहूया!
- तुमचाच 
सुधांशु नाईक, कोल्हापूर ( 9833299791)🌿
( सध्या आत्महत्यांच्या प्रमाणात जी वाढ झालीये त्याबद्दलच्या बातमीचं कात्रण अवश्य पहा. लोकांनी मनमोकळा संवाद साधला तर नक्कीच आत्महत्यांचं प्रमाण कमी होऊ शकतं. म्हणून सुखसंवाद अत्यावश्यकच. इतरांशीही ही पोस्ट अवश्य शेयर करा!)

Saturday 19 September 2020

आणि आम्ही कोरोनामुक्त झालो....

✒️
 आणि डाॅ चव्हाण यांच्या सहकार्यानं आम्ही कोरोनामुक्त झालो...
- सुधांशु नाईक.

30 तारखेला स्वरदाला अंगदुखी व ताप आला. तर 1 सप्टेंबरला मलाही तेच. लगेच आमच्याच बिल्डिंगमध्ये रहाणारे आमचे शेजारी व अत्यंत मनमिळावू असे डाॅ. कुणाल चव्हाण यांचा सल्ला घेतला. 
ते कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आहेत अन् नागाळा पार्कात अनेक रुग्णांना मार्गदर्शन करतात. गेले 6 महिने ते अनेक कोरोनाग्रस्तांवर उपचार करत आहेत. त्यांना गृह विलगीकरणात ( home isolation) ठेवून उत्तम उपचार करुन बरं करत आहेत.

त्यांनी लगेच दोघांना औषधोपचार सुरु केले. त्यात मुख्यत: पॅरॅसिटिमाॅल, अॅन्टिबायटिक्स, सी विटॅमिन हे होतंच. तसेच लगेच स्वॅब टेस्ट व HRCT टेस्ट करायला लावली. माझा स्कोर 1/ 40 तर स्वरदाचा 11/40 होता.

मग त्वरीत विविध औषधं देत  15 दिवसांचा कोविड निवारण असा औषधांचा कोर्स सुरु केला. रक्ततपासणी करायला सांगून रक्त गोठण्याचे, गुठळी होण्याचे प्रमाण, किडनी व लीव्हर चं कार्य याबाबतचे पॅरॅमिटर्स तपासून घेतले व त्यानुसार औषधं सुरु केली.
स्वरदाला वास येणे व चव नाही हहीही लक्षणं दिसू लागली. मला त्यामानानं घसादुखी व अशक्तपणा वगळता अन्य काही त्रास नव्हता. ताप 2 दिवसांनंतर परत आलाच नाही.

तरीही दर 3 तासांनी आॅक्सिजन लेव्हल, ताप चेक करणे हे सुरु होतं. डाॅक्टर सतत फोनवरुन संपर्क ठेवत होते. स्वत: येऊन भेटून जात होते. स्वरदाच्या फुफ्फुसातील सुमारे 28 टक्के इन्फेक्शन लक्षात घेऊन सलाईनमधून काही इंजेक्शनचाही कोर्स त्यांनी सुरु केलेला. तसेच शरीरात किल केलेल्या व्हायरसचा निचरा होणे, अशक्तपणा कमी होणे, मेंदू किंवा हृदयावर ताण न येणे यासाठी विविध चौकशा सतत ते करत होते. जुलाब होणे, चक्कर येणे वगैरे काही लक्षणं मधूनच दिसली की लगेच त्यावर विचार करुन औषधं देत होते.

पहिल्या 8 दिवसातच आम्हाला पूर्ण फरक पडला. अशक्तपणा वगळता कोणताही त्रास नव्हता.

तरीही रोजचे डाॅक्टरांचे 2 फोन कधीही चुकले नाहीत. अधूनमधून ते येऊन भेटून जात होतेच.
 घरात दोन्ही मुली व 74 वर्षाच्या  वयस्कर सासूबाईंच्या स्वॅब टेस्ट सुदैवाने निगेटिव्ह होत्या. आम्ही त्वरीत स्वत:चे विलगीकरण केले व डाॅ. चव्हाण यांनी त्वरीत व सर्व अचूक उपाययोजना सुरु केल्याने आम्ही सहीसलामत कोविडमुक्त झालो आहोत.

यापूर्वीदेखील आमची आई, सासू व सासरे यांच्या जीवघेण्या आजारपणात कधीही पैसे न घेता डाॅक्टरांनी मनापासून मदत करत शेजारधर्म निभावला होताच. यावेळी आम्हालाही त्यांनी या गंभीर आजारातून इतक्या सहजपणे बाहेर काढले आहे की आता कोरोना या शब्दाची, रोगाची अजिबात भीती वाटत नाही. आपण योग्य दक्षता घेतली, त्वरीत योग्य उपचार केले तर नक्कीच आपण या रोगावर सहज मात करु शकतो हे स्वानुभवातून शिकायला मिळाले.
याच काळात घरात बसून असल्याने कंटाळा आला होता. मग विविध कोरोनाग्रस्तांना धीर देणे, मार्गदर्शन करणे, तसंच ज्यांना अन्य मानसिक ताणतणाव आहेत त्यांचं फोनवरुन समुपदेशन करणे हा उपक्रम सुरु केला. विविध कोरोनाग्रस्तांना रेफरन्स दिल्यावर आमचे डाॅ. चव्हाणदेखील त्यांच्याशी बोलायचे. त्यांना धीर देत होते. सर्वांच्यात जनजागृती व्हावी तसेच सर्वांना वेळेत योग्य उपचार मिळावेत यासाठी गेले 6 महिने डाॅ. चव्हाण यांनी आमच्यासह ज्या शेकडो पेशंटस् ना मदत केलीये त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायला माझ्याकडे शब्द नाहीत.

आम्ही घरात आयसोलेट झालो तरी आपलं " खमंग" तिथल्या मावशी व दादांनी सुरु ठेवलं. सगळीकडे जेवणाची पार्सल्स पोचवताना आम्हालाही घरी तिन्ही वेळा नाश्ता जेवण वेळेत पोचवलं. 
आमच्या बिल्डिंगमधील विविध शेजा-यांनी रोज विचारपूस केली. औषधं आणून देणे काही बाहेरचं काम असल्यास करुन देणे अशी मदत केली याबद्दल या सर्वांचे जितके आभार मानावेत तितके कमीच आहेत.
ज्या व्यक्तींना कोरोना झालाय त्यांना किंवा ज्यांच्या मनात भीती आहे त्यांनी आमच्या डाॅ. कुणाल चव्हाण यांच्याशी 9405277901 या नंबरवर अवस्य संपर्क साधावा. ते योग्य उपचार व मार्गदर्शन करतील याचा विश्वास बाळगावा.
गेल्या 5 वर्षात घरात सतत कुणाचं ना कुणाचं लहानमोठं आजारपण सुरुच होतं तरी अनेक उपक्रम आम्ही हिरीरीने करतोच आहोत. आता कोरोनाही घरात हिंडून गेलाय, यापुढे नवीन कोणता आजार कुठेही येऊ नये हीच सदिच्छा व्यक्त करत पुनश्च कामाला सुरुवात करतो!
- सुधांशु नाईक, कोल्हापूर (9833299791)🌿

🙏🏼