marathi blog vishwa

Tuesday 16 December 2014

चिमण्यानो, परत फिरा, घराकडे...

लहान मुलींच्या लैंगिक शोषणाबद्दल जागतिक अहवाल असं सांगतो की किमान ६०% प्रकरणातील पुरुष हा त्या मुलीच्या परिचयाचा असतो. दुर्दैवाने हे कटू सत्य आहे की, स्वतःला प्रगत समजणाऱ्या तथाकथित पांढरपेशा समाजापासून अडाणी व अशिक्षित समाजापर्यंत सर्व थरातून मुलीचे लैंगिक शोषण हे जवळच्या ओळखीच्या माणसाकडून होते. हे थांबवायला हवं.


सुमित्रा. नेपाळ मध्ये उच्च माध्यमिक शाळेत शिकणारी. आई-बाप मोल मजुरी करणारे. घरी तिच्या व्यतिरिक्त आणि ३ बहिणी २ भाऊ. दहावी झाल्या-झाल्या बापानं सांगितलं, “पोरी, बास बाई आता तुझं शिक्षण. यापुढे तुला शिकवायला पैसे नाहीत माझ्याकडं. चार कामं कर. तेव्हढंच चार पैसे मिळतील, तुझं लगीन होईपर्यंत.” पण तिला शिकायचं होतं. मोलकरणीसारखं न राबता मोठ्या पगाराची नोकरी करायची होती. छान हौसे-मौजेत राहायचं होतं. मग आई-बापाशी वादावादी सुरु झाली.

त्यातंच एक दिवस मुंबईतून तिची मामे-बहिण गावाकडे आलेली. तिचं नटणं-मुरडणं, झकपक कपडे याची भूल पडली तिला. अल्लड कोवळं भिरभिरतं वय ते. बहिणीच्या बोलण्याला भुलली. चक्क नेपाळमधून पळून आली मुंबईला तिच्याबरोबर. बहिणीच्या घरात काही दिवस राहिली. तिचा नवरा बाहेर काही काम करे. एकदिवस त्यांच्या ओळखीची एक बाई आली. बहिणीने सांगितलं हीच तुला काम देईल, जा. “काही दिवस छोट्या चाळीत धुणी-भांडी करायचं काम कर. हजार रुपये मिळतील महिन्याचे. मग हळू हळू नोकरी शोध,” असं ती बाई म्हणाली.

सुमित्रा तिच्या घरी पोचली.

इंद्रधनुषी स्वप्न पाहणाऱ्या तिच्या फुलपंखी आयुष्यात मग अक्षरशः नरकयातना आल्या. कदाचित नरकयातना कमीच असतील..! त्या वेश्यावस्तीत या कोवळ्या मुलीवर एका दिवसात किती बलात्कार व्हावेत त्याची गणतीच नाही. कित्येक महिन्यानंतर अगदी योगायोगाने स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने तिची व अन्य ५-६ नेपाळी युवतींची सुटका झाली. या संस्थेतून त्या संस्थेत असं करत करत त्यांना सुखरूप नेपाळला पोचवले गेले. मात्र तिच्या घरच्यांनी तिला घरी घेतले नाही. आता ती नेपाळच्या प्रसिद्ध अशा “माईती फौडेशन” च्या पंखाखाली सुखरूप आहे.

हे असं रोज सर्वत्र का घडतंय याचा आपण विचार करणार? कधी?

वेश्या व्यवसाय हा जगात नवीन नाही. पण वेश्या व्यवसायात लहान मुलामुलींना अडकवण्याच्या प्रकारात गेल्या काही वर्षात जबरदस्त वाढ झाली आहे. नेपाळसह भारत, बांगलादेश, थायलंड, फिलिपिन्स असे आशियाई  देश आज जगभरात अत्यंत कुप्रसिद्ध आहेत ते या child Trafficking साठी. हजारो लहान लहान मुली या देशातून परदेशी पाठवल्या जातात. यापैकी कित्येकींना जबरदस्तीने पकडून, अपहरण करून तर कित्येकींना गोड बोलून फसवून जगभर पाठवले जात आहे. कधी कुणाची तरी नातेवाईक मुलगी यात फसवली जाते तर कधी अनोळखी मुलीचे अपहरण करून तिला त्यात अडकवले जाते. असे फसवणाऱ्या लोकांच्यात त्या मुलीच्या आई-बापापासूनचे अनेक नातेवाईक सामील आहेत. प्रत्येकाची कारणे फक्त वेगळी. जगभरच्या तमाम पुरुषांच्या विकृत वासनातृप्तीसाठी केवळ या मुलीच नव्हे तर लहान लहान मुलेसुद्धा राबवली जात आहेत. हे सर्व भयानक आहे. सामान्य माणसाच्या विचारापलीकडले आहे.

मध्यंतरी एका कार्यक्रमात चर्चा सुरु असताना एक प्रतिष्ठित गृहस्थ म्हणाले, “वेश्या वस्ती आहे म्हणून आमच्या घराच्या मुली-बाळी सुखरूप आहेत”. त्यांचे वक्तव्य अनुदार आहेच कारण आपल्या सुखासाठी जो समाज दुसऱ्याच्या आयुष्याचा नरक बनवतो, तो माणूस नव्हेच. त्यामुळे त्यांच्या विचारांना तीव्र विरोध केला गेलाच. मात्र त्याही पुढे जाऊन असे म्हणावेसे वाटते की दुर्दैवाने आपल्या मुली-बाळी सुखी राहण्याचे दिवसही आता झपाट्याने बदललेत. आज माजोरी पुरुषत्व जे समाजात थैमान घालतेय ते फार फार चिंताजनक आहे आणि यावर वेळीच उपाय केले नाहीत तर परिस्थिती अक्षरशः हाताबाहेर जाणार हे नक्की.

सगळ्यात मोठी चिंता वाटते ती मिडियाची. इतक्या उथळपणे या गोष्टीची चर्चा केली जाते की त्यामुळे सत्ताधीशांवर दबाव निर्माण होतंच नाही. अपवाद “निर्भया” सारख्या बलात्कारांच्या काही प्रकरणांचा. समाजातील प्रतिष्ठित लोकं “मेणबत्ती मोर्चा” काढून प्रचंड काहीतरी केल्याचं समाधान मिळवतात. तरीही ठराविक दिवसांनी अशा अत्याचारांच्या बातम्या येतंच राहतात. टीव्हीवर थोर थोर विचारवंत तावातावाने फक्त चर्चा करतात. पेपरची पाने लेखांवर लेख छापून भरली जातात. पाने नंतर कचऱ्यात टाकली जातात. टीव्हीचे च्यानेल बदलले जातात. पुन्हा सगळं जैसे थे. पुढे काय ? काही नाही. पुन्हा येरे माझ्या मागल्या...!

आज तथाकथित सुखमय जीवनाची झिंग चढलेल्या आपल्या मनांना जाग कधी येणार? या समस्यांच्या मुळाशी आपण कधी पोचणार?


एखाद्या घरातील छोटी मुलगी आपल्या घरी /शाळेत किंवा ओळखीच्या माणसांच्या घरी निरागसपणे खेळत असते. तिला अजून सेक्स काय हे माहितीही नसतं. शरीर व मन त्यासाठी तयार झालेलं नसतं. अशावेळी आपल्याच परिवारातील, आसपासचा ओळखीचा कुणीतरी, शाळेतला कुणीतरी किंवा एखादा अनोळखी माणूसही त्या मुलीला ( किंवा मुलालासुद्धा) काही आमिष दाखवून चक्क आपले खेळणे बनवतो. स्वतःची विकृत भूक भागवून घेतो. त्या धक्क्यातून जर जगली वाचलीच तर ती मुलगी आयुष्यभर तो तसला प्रसंग विसरू शकत नाही. अशा हजारो मुली मग एकतर मोडून पडतात व आयुष्य संपवून घेतात किंवा वेश्यावस्तीत आणून पोचवल्या जातात. हे कितीही भयानक असलं तरी दुर्दैवाने आज वास्तव बनलंय.

“मग काय करायचं? आपल्या मुलांना घरात कोंडून ठेवायचं का ?” असं कदाचित उद्विग्नपणे विचारावं असं तुम्हालाही वाटेल. पण रागाच्या भरात, भावनेच्या भरात वागून हे प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी स्वतःपासून काही कृती सुरु करायला हवी. बहुसंख्य मुलांच्या बाबतीत “बालपणीचा काळ सुखाचा” असतो आणि तो तसाच “सुखाचा” असावा यासाठी मुलांचे आईबाप व शिक्षक हेच अत्यंत महत्वाची भूमिका बजावू शकतात. आपल्या मुलांच्या आवडी-निवडी, हट्ट पुरवताना त्यांना बऱ्या-बाईट गोष्टींची जाणीव करून देणं अतिशय गरजेचं बनलं आहे.

लहान मुलांचं शोषण करणारी माणसे ही काही आकाशातून पडत नाहीत. त्यांना गोष्टीतल्या राक्षसासारखे जास्त हात, शिंग असलं काही नसतं. ती तुमच्या आमच्यासारखीच माणसं असतात फक्त त्यांचा स्वतःवरचा ताबा सुटलेला असतो. इथे थोडंसं विज्ञानाचा आधारसुद्धा जरुरी आहे. मुळात स्त्री आणि पुरुष यांची शारीरिक रचना अतिशय भिन्न आहे. त्यांची मानसिकता, त्यांच्यातील हार्मोन्स (संप्रेरके) ही भिन्न आहेत. त्यामुळे चित्रपटातील एखादं अश्लील गाणं किंवा मासिकातले फोटो पाहून जसं एखादा पुरुष उद्दीपित होऊ शकतो आणि बलात्काराची इच्छा बाळगतो तसं दुसरा पुरुष करेलच असं नाही. तो अनेकदा दुर्लक्ष करून मोकळा होईल. किंवा आपल्या कायदेशीर जोडीदाराशी संबंध ठेऊन मनातील कामभावनेचा निचरा करेल.


प्रत्येक माणसाच्या मनातील “केमिकल लोचा” काही वेगळी समीकरणं बनवतो. आणि यामध्ये मेंदूचा मोठा सहभाग असतो. म्हणूनच सर्व मुलांना जर त्यांच्या उमलत्या वयात या सर्वांचं योग्य शिक्षण / लैंगिक शिक्षण मिळालं तर मोठेपणी त्यांच्या प्रतिक्रिया चांगल्या असू शकतात. त्या तशाच चांगल्या हव्यात. अन्यथा माणूस म्हणून त्याची गणना कशी करायची? “आहार, निद्र, भय आणि मैथुन” या चार आदिम भावना सर्व प्राण्यांमध्ये असतातच. मात्र माणसाला त्यापुढे जाऊन संवेदनशीलता, परस्पर सहकार्याची आणि समतेची जाणीव, बंधुत्व अशा प्रेरणांचे वरदान मिळाले आहे. मात्र या प्रेरणा लहापणापासून विकसित व्हाव्या / कराव्या लागतात. त्या जाणीवा तशा विकसित झाल्या तरच त्याच्या मध्ये माणूसपण निर्माण होतं. आणि मगच त्याच्याकडून आपण नेहमी चांगल्या वर्तणुकीची अपेक्षा ठेऊ शकतो.

उदाहरण घेऊ एखादं. लहान मुलांना मुळात नवीन समजून घ्यायची उत्सुकता जास्त असते. ती विचारतातच तुम्हाला, “माझा जन्म कसा झाला? लग्न म्हणजे काय? माझी मैत्रीण अमुक तमुक आहे, तिच्याशी माझं लग्न होईल का? आम्हालापण छान बाळ होईल का? इ.इ.” त्या प्रश्नांची त्यांना समाजातील अशा भाषेत उत्तर दिली पाहिजेत. इथे काहीतरी बोलून त्यांना टाळू नये. तसं टाळण्याने मग काय होतं, की मुलं स्वतःहून उत्तर शोधू पाहतात. आणि जर अशावेळी त्यांच्या हातात अयोग्य पुस्तकं, चित्रपट, ब्ल्यू फिल्म्स असं काही सापडलं की मग त्या मुलाची विचारक्षमता त्या पद्धतीने विकसित होते.

याउलट त्या मुलाच्या आई-वडिलांनी किंवा शिक्षकांनी जर त्याला, “एक ठराविक वयाचा टप्पा गाठल्याशिवाय लग्न करता येत नाही. त्यासाठी आधी खूप शिकायला लागतं. स्वतः कमवावे लागते. प्रत्येक मुलाने मुलीचा, व मुलीने मुलाचा आदर केला पाहिजे. एकमेकांचं स्वातंत्र्य जपलं पाहिजे. आज शाळकरी असणारी मुलगी उद्या जशी कुणाची तरी आई असणार आहे, तसाच मुलगा सुद्धा कुणाचा तरी बाप असणार आहे” असं समजावलं तर त्याच्यावर अधिक योग्य संस्कार होऊ शकतात. तसंच प्रत्येक मुलगी ही स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, तिच्या मनाविरुद्ध आपण वागायचं नाही हे शिकवलं पाहिजे. त्यामुळे ते मूल “पुरुषत्वाचा” बुरखा बाजूला करून माणूस म्हणून जगू शकेल. यामुळे मग ज्या-ज्यावेळी त्याच्या सभोवतीची परिस्थिती त्याच्या मनात कामवासना निर्माण करेल, तेंव्हा त्याची “सत्सद्विवेकबुद्धी” त्याला वाईट कृती करण्यापासून रोखत राहील.

आज सुदैवाने सेक्स-एज्युकेशनची मोकळेपणाने चर्चा होते. मात्र हल्ली मुलांचं लवकर वयात येणं लक्षात घेता हे शिक्षण वयाच्या १०-१२ व्या वर्षापासून सुरु व्हायला हवे. मुलींना पाळीविषयी, स्वतःच्या अवयवांविषयी शास्त्रीय माहिती दिली पाहिजे. आजकाल भरपूर प्रकारचं शिक्षण, त्यानंतरची नोकरी- व्यवसायातील स्पर्धा यामुळे मुलांचं लग्नाचं वय पुढे गेलं आहे. त्यामुळे सुरक्षित लैंगिक संबंध, कामभावनेचा नैसर्गिक निचरा करणारे हस्तमैथुनासारखे उपाय सांगितले पाहिजेत. कामभावनेचा निचरा करण्याचा “बलात्कार” हा मार्ग नव्हे हे प्रत्येक मुलाला शिकवलं गेलंच पाहिजे. तरच प्रत्येक स्त्री कडे भोगवस्तू म्हणून पाहण्याची पुरुषी वृत्ती कमी करता येईल.

अर्थात हे सर्व आदर्श परिस्थितीचे चित्र आहे. आणि समाजातील पुरुष-प्रधान संस्कृती पाहता सर्व मुलांना असं उत्तम शिकवलं जाईल अशी अपेक्षा करणं वास्तवाला धरून नाहीच. मात्र सर्वत्र आई-वडील आणि शिक्षकांसाठी कार्यशाळा (workshops) घेतली गेली तर काहीप्रमाणात सुधारणा नक्कीच होऊ शकते.

लहान मुलींच्या लैंगिक शोषणाबद्दल जागतिक अहवाल असं सांगतो की किमान ६०% प्रकरणातील पुरुष हा त्या मुलीच्या परिचयाचा असतो. दुर्दैवाने हे कटू सत्य आहे की, स्वतःला प्रगत समजणाऱ्या तथाकथित पांढरपेशा समाजापासून अडाणी व अशिक्षित समाजापर्यंत सर्व थरातून मुलीचे लैंगिक शोषण हे जवळच्या ओळखीच्या माणसाकडून होते. हे थांबवायला हवं. कधी एखादा काका, चुलत भाऊ, मामा, मामेभाऊ, भावाचा मित्र आणि कित्येक प्रसंगात प्रत्यक्ष बाप आपल्या मुलीचं शोषण करताना सापडला आहे. ती लहान मुलगी या सगळ्या आपल्या आधी जन्मलेल्या माणसांची मानसिकता कशी बदलवू शकेल? ते अशक्य आहे. त्यामुळे कोणत्याही लहान मुलांच्या बाबतीत काही वाईट घडू नये म्हणून आपणच काळजी घ्यायला हवी.

 

प्रत्येक घरातील आईला वाटत असतंच की शाळा, क्लास किंवा कॉलेजसाठी बाहेर गेलेली आपली मुलं सुखरूप घरी परत यावीत आणि मग प्रत्येक संध्याकाळी या गाण्याच्या ओळी नेहमीच काळजावर सुरी चालवून जातात;

दहा दिशांनी येईल आता अंधाराला पूर,
अशा अवेळी असू नका रे आईपासुन दूर
चुकचुक करिते पाल उगाच, चिंता मज लागल्या...

या चिमण्यांनो, परत फिरा घराकडे अपुल्या, जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या....

  लहानग्या मुलांना भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागू नये म्हणून काय केलं पाहिजे हे आता आपण शिकवलंच पाहिजे. त्यासाठी पुढील काही छोटे छोटे उपाय आपण निश्चित अंमलात आणू शकतो;

१.      प्रत्येक वेळी आपल्या लहान मुलीला कोणत्याही वेळी, कोणत्याही पुरुषासोबत कधीही एकटे सोडू नका. समजा आई स्वैपाकात मग्न आहे आणि घरातील शाळकरी मुलगी काका, मामा, आजोबा किंवा शेजारचे काका यांच्यासोबत आहे, तरी अधून मधून तिच्याकडे लक्ष द्या. ते दोघं ज्या खोलीत असतील तिथे चक्कर मारा.

२.      आपल्या मुलीला तिच्या अवयवांची माहिती करून द्या. तसेच तिला असे सांगा की, “जर कुणी काका- मामा किंवा अन्य मुलगा तिच्या छातीवरून, पाठीवरून, मांड्यावरून हात फिरवत असेल, तिच्या शू च्या जागी मुद्दामहून हात लावत असेल, तर त्याला तसे मुळीच करू देऊ नका”. सतत सांगूनही तो माणूस ऐकत नसेल तर त्यानं असं करताच “अगदी मोठ्याने ओरडायचं, कुणालातरी बोलवायचं” असं मुलींना सांगा. त्यामुळे मुलगी जेंव्हा अशी मोठ्याने ओरडेल तेंव्हा तिची आई-बाप, शिक्षक किंवा अन्य कुणी पट्कन तिथे येऊ शकेल आणि त्यामुळे एखादा कटू प्रसंग टाळता येईल. आपली मुलगी जेंव्हा अशी मोठ्याने ओरडेल, किंवा अन्य कुणी मुलगी कुठेही अशी ओरडताना आढळली, तर हातातले काम सोडून प्रथम तिच्याकडे जा. तिला काही त्रास नाही ना हे विचारा.

३.      अनेकदा मुलं सांगतात, की मला अमुक एक काका आवडत नाहीत. ते त्रास देतात. तेंव्हा अशा गोष्टी हसण्यावारी नेऊन त्याकडे दुर्लक्ष करू नका. कदाचित तो माणूस काय करतोय हे मुलांना समजत नसेल. त्यांना सांगता येत नसेल.

४.      अनेक घडलेल्या घटना असं सिद्ध करतात की लहान मुलांनी आपल्या काका, मामा, तर कधी प्रत्यक्ष बापाविरुद्ध आईकडे किंवा अन्य कुणा मोठ्या माणसाकडे वारंवार तक्रार केली होती. ते आपल्याशी नीट वागत नसल्याचे सांगितले होते. मात्र त्यांनी दुर्लक्ष केले आणि त्यातून मग पुढे अजून जास्त भयंकर प्रकार घडत गेले.

५.      अनेक घरात मुलं सांभाळायला बाई ठेवलेली असते. तिथे अशा घटना घडल्या आहेत की ती बाई किंवा घरात येणारा तिचा प्रियकर हेसुद्धा मुलीचं/ मुलांचं शोषण करतात. आणि घाबरलेली मुलं रात्री आपल्या आई-बापाला काही सांगू शकत नाहीत. त्यामुळे आपल्या घरात असं मुलं सांभाळायला कुणी असल्यास कधीतरी अचानक घरी या. आपल्या मुलाला नीट सांभाळलं जातंय का याची खात्री करा.

६.      आपल्या मुलांना सांगा की कोणत्याही ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तीकडून घराबाहेर आईस्क्रीम, चौकलेट, खाऊचे पदार्थ घ्यायचे नाहीत. जरी त्यांनी दिले तरी आधी घरी आईला किंवा शाळेत शिक्षकांना दाखवल्याशिवाय खायचे नाहीत हे सतत रोज सांगा. त्यांच्या मनावर कोरलं जाईपर्यंत सांगत राहा. कधी गोष्टीतून सांगा.

 “एका मुलीनं असं दिलेलं आईस्क्रीम खाल्लं, मग तिला झोप आली. त्यानंतर जेंव्हा तिला जाग आली तेंव्हा तिला दुसऱ्या गावी नेऊन तिथे तुरुंगात ठेवलं होतं. नंतर तिला भिकारी बनवलं” अशी एखादी गोष्ट त्यांना जास्त परिणामकारक रित्या समजू शकेल. त्यामुळे असा खाऊ देणाऱ्यापासून आपली मुलगी कायम सतर्क राहील.

७.      आपल्या नात्यातील, ओळखीतील कुणी व्यक्ती, रिक्षामामा, स्कूल बस चा ड्रायव्हर, शाळेतील शिक्षक, शेजारील मुलगा असं कुणीही आपल्या किंवा दुसऱ्यांच्या मुलांशी चाळे करताना आढळले  तर त्यांना स्पष्ट शब्दांत समज द्या. जर फरक दिसला नाही तर सरळ पोलिसात तक्रार दखल करा.

८.      आपल्या मुलांची शाळा, परिसरातील शाळा या ठिकाणी अशा विषयांवर कार्यक्रम केले जातील, मुलांना जागृत करणारे कार्यक्रम केले जातील यासाठी प्रयत्न करा.

असे अनेक उपाय प्रत्येकाला सांगता येतील. अंमलात आणता येतील. प्रत्येकाने आपल्याला शक्य होईल असं योगदान दिलं पाहिजेच. पण याचबरोबर जर कुणा लहानग्याचं आयुष्य वाईट चक्रात सापडलं असेल तर त्यालाही तिथून बाहेर निघण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

मग लहान मुलांच्या लैंगिक शोषणाची ही अत्यंत भयानक गोष्ट आपण निश्चित रोखू शकू. आजची लहान मुलं पुढे जाऊन देशाचं भविष्य घडवणार आहेत त्यामुळे त्यांचं वर्तमान सुरक्षित असेल आणि त्यांना प्रगतीसाठी चांगलं वातावरण मिळेल याची आपणच काळजी घेतली तर त्यांनाही “हे जीवन सुंदर आहे” असं निश्चित असं वाटू लागेल...!

-    सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)

Saturday 29 November 2014

मुक्त निवांतपणाचा मस्त अनुभव !


नुकतंच जुन्नर जवळच्या " पराशर कृषी पर्यटन केंद्र" या ठिकाणी मुक्कामाला जाण्याचा योग आला. गेल्या ४-५ महिन्यातील अत्यंत व्यस्त दिनक्रमामुळे “मनापासून” या माझ्या लेखमालेतही काहीच लिहिले नव्हते. म्हणून या वेळी जरा वेगळंच लिहितोय, या कृषी पर्यटन केंद्राविषयी...

 
आपलं आयुष्य किती आणि आपण ते कसं जगतोय याचा विचार करायला सुद्धा हल्ली आपल्याला वेळ नसतो..! सतत आपण आपले गडबडीत. कामाची गडबड. कमवायची गडबड. कमवलेलं दुप्पट करायची गडबड आणि खर्च करायची सुद्धा गडबडच. रोज सकाळी उठून आपण कामाला लागतो. प्रत्येकाची कामं वेगळी. मात्र प्रत्येकाची गडबड तर इतकी की अनेकांना सकाळचा नाश्ता (घरात असो किंवा ऑफिसात) किंवा दुपारचे जेवण चांगलं होतं का वाईट हेसुद्धा ठाऊक नसतं. बरेच वेळा तर एका हाताने काही काम करता करता हातातलं sandwitch किंवा अन्य काही खाल्लं जातं. ज्या पोटासाठी आपण राबतो, त्या पोटाला नीट खायला मिळतंय की नाही हेच पाहायला जिथे आपल्याला वेळ नाही तिथे जगण्याच्या इतर गरजांची गोष्ट न बोलणंच बरं. तीच गोष्ट मोकळ्या वातावरणाची आणि जागेची. खर म्हणजे मोकळं आवार, घरातील भरपूर मोकळी जागा ही कमीच झालीय कारण ती हल्ली आपल्याला परवडत नाही. मात्र असलेलं घर आज शेकडो वस्तूंनी भरणे यालाच लोक प्रतिष्ठा / स्टेटस् समजू लागलेत. त्यामुळे मुक्त रिकामपण हरवत चाललंय.

माणसाला मुक्त रिकामपणाची आणि निवांतपणाचीही गरज आहे हे हजारों लोकांना खरंच वाटणार नाही. पण रोजच्या धावपळीच्या जगण्यातून मानसिक शांतता मिळवायला, जगण्याच्या लढाईसाठी पुन्हा नवा उत्साह मिळवायला असं निवांतपण खरंच गरजेचं आहे.

असं निवांतपण अनुभवण्यासाठी अनेक ठिकाणं आपल्या आजूबाजूलाच असतात. त्यातीलच एक उत्तम ठिकाण म्हणजे पराशर कृषी पर्यटन केंद्र (Agritourism). मनोज व नम्रता हाडवळे यांनी Hachiko tourism अंतर्गत उभारलेली ही मस्त अशी जागा.जुन्नर मावळातील आळेफाटा हे एक मुख्य गाव. कल्याण- नगर व पुणे- नाशिक हे दोन महामार्ग इथे एकमेकाला छेडून जातात. त्यामुळे सततची वर्दळ. मोठी बाजारपेठ. याचं आळेफाट्यापासून पुढे नगर कडे निघायचं. जरा पुढे ४-५ कि.मी.वर एक छोटंसं गाव. राजुरी. या गावाच्या बाहेर एका मस्त मोकळ्या जागी हे कृषी पर्यटन केंद्र आहे.

 
आम्ही मित्र-मंडळींनी जेंव्हा या ठिकाणी जायचं ठरवलं तेंव्हा माझ्या छोट्या मुलींना सांगितलं होतं की शेताजवळच्या हॉटेल मध्ये राहायला जायचंय. त्यामुळे जेंव्हा आम्ही रात्री ८-९ वाजता तिथे पोचलो, तर गाव शांत. मस्त झोपायच्या तयारीत. गावाबाहेर च्या “पराशर” मध्ये आलो, तर मुली पट्कन म्हणाल्या, “ अरे, हे काय बाबा, तू तर आम्हाला झोपडीत घेऊन आलायस की..! इथे सगळ्या झोपड्या दिसतायत, हॉटेल असं असतंय का?”


तेवढ्यात मनोज व नम्रता यांनी फुलांचे हार घालून पाहुण्यांचं स्वागत केलं. या स्वागताने मुलींसकट सगळे आनंदले. मग प्रत्येकाला आपापल्या खोल्या दाखवल्या. झापाच्या / तट्ट्याच्या भिंती, दरवाजे, खिडक्या, लाकडाचे पलंग, मातीच्या सारवलेल्या जमिनी हे मुलांना सोडाच पण शहरातील मोठ्या माणसांना तरी हल्ली कुठे माहीत असतं? हल्ली आपल्या घरात सगळ्या कृत्रिम वस्तूच तर असतात. त्यामुळे ते वेगळेपण, त्या नैसर्गिक गोष्टी हे सगळ्यांना आवडलंच.
रात्रीचं जेवणसुद्धा साधं घरगुती. तेही डायनिंग टेबलवर नव्हे.  मस्त अशा छोट्या बैठकांवर बसून जेवायचं. समोर ताटात चुलीवर शिजवलेले गरम गरम पदार्थ. असं जेवण हे ओव्हन मध्ये गरम केलेल्या पदार्थापेक्षा छानच लागतं ही जाणीव आवश्यक होतीच..!

मी नेहमी डोंगर- दऱ्यामध्ये हिंडत राहणारा माणूस. मला निसर्गाच्या जितकं जवळ राहता येईल तितकं जास्त आवडतं. त्यामुळे माझ्यासाठी हे सर्व फार नवीन नसलं तरी माझ्या मुली, मित्र-मंडळी, माझ्या सोबत भटकंतीला येणारे या सगळ्यांनी असं वातावरण अनुभवावं असं मला नेहमी वाटतं. त्यामुळे मी नेहमी अशा ठिकाणांच्या शोधात असतोच. “पराशर कृषी पर्यटन केंद्र” यासाठी अगदी समर्पक असं ठिकाण आहे.

मोकळं माळरान, किंचित दूरवर असणाऱ्या डोंगर रांगा, पलीकडे काही अंतरावरील शेतं, आसमंतात भरून राहिलेलं पहाटेचं प्रसन्नपण, पक्ष्यांचा किलबिलाट. आजूबाजूला प्राजक्त, जास्वंद, मदनबाण अशी फुलं उमलेली. पहाटेचं दव मातीवर, गवतावर पडल्यानं येणारा व हवेत भरून राहिलेला मंद गंध. आपल्या खोलीबाहेर पडून बाहेरच हे वातावरण, ती मुक्त आणि स्वच्छ हवा भोगताना शरीराचा रोमरोम ताजातवाना न झाला तरच नवल.

गवती चहाची पात वापरून केलेला चहा त्या आनंदात अजूनच भर टाकतो. जेंव्हा तुम्ही कधी इथे जाल, तेंव्हा अशा प्रसन्न सकाळी जवळच्या एका छोट्याशा जंगलात सकाळचा फेर फटका मारायला मुळीच विसरू नका, अर्थात, मनोज तुम्हाला तिथे घेऊन जाईलच म्हणा..!

गावापासून ५-६ कि.मी.वर निलगिरीचे जंगल आहे. इतरही अनेक वृक्ष आहेत पण वन-विभागाने खास तिथे निलगिरीचे वृक्ष लावून नवं जंगल बनवलंय. बांध घालून एका छोट्या नदीचं पाणी अडवलंय. त्या लहानशा धरणामुळे आजूबाजूच्या शेतीला अगदी मार्चपर्यंत पाणी मिळू शकतं.

 सकाळी सकाळी जेंव्हा आपण तिथे फिरायला जातो, तेंव्हा आसमंतात निलगिरीचा मंद गंध जाणवतो. शांत स्तब्ध असं त्या जलाशयाचं पाणी नकळत आपल्या मनालाही शांत शांत करून जातं. त्या पाण्यातील बाजूच्या झाडांची प्रतिबिंब पहात तुम्ही कितीही वेळ तिथं बसू शकता. आजूबाजूला मोर दिसतात. त्यांचा केकारव, इतर पक्ष्यांचा किलबिलाट, सकाळची लोभस प्रसन्न सूर्यकिरणे हे सगळं सगळं मनामनात झिरपत जाते.
रोजच्या दगदगीच्या आयुष्यामुळे निर्माण झालेल्या मानसिक व शारिरीक थकवा मग कधी कमी होऊ लागतो ते कळतच नाही. फक्त त्यासाठी हा निसर्ग उघड्या डोळ्यांनी-मुक्त मनांनी अनुभवायला हवा. स्वतःचं आभासी वेगळेपण विसरून निसर्गाचं खरं वेगळेपण पाहायला हवं.

 सकाळच्या त्या रपेटीने मनोवृत्ती उल्हसित झालेल्या असतात आणि पोटातून भुकेची जाणीवही.
आपण “पराशर” मध्ये परततो, तर तिथं गरमागरम नाश्ता तयारच असतो. थालीपीठ, पोहे असं अस्सल मराठमोळं काहीतरी समोर येतं. सगळे अगदी जाम तुटून पडतात. मनसोक्त नाश्ता कसा करायचा असतो, हे पुन्हा उमगतं. मग आपण “किती दिवसापूर्वी असं मस्त हादडलं होतं” हेच आठवू लागतो..!

 
नाश्ता, आंघोळ इ. उरकून तुम्ही जेव्हा तयार झाल्यावर दिवसभरासाठी विविध पर्याय (मराठीत सांगायचं तर “ऑप्शन” हो..) आहेत. तुम्हाला पाहिजे तर बाजूच्या छोट्या मचाणावर तुम्ही नुसतेच निवांत बसून राहू शकता. काही वाचायचे असेल तर इथे ऑफिसमध्ये छोटे ग्रंथालयपण आहे.

आणि बाहेर आजूबाजूच्या परिसरात भटकंती करायची असेल तर अनेक पर्याय खुले आहेत.
त्यातले एक रम्य व अद्भुत ठिकाण म्हणजे सुमारे ११ कि.मी.वरील गुळंचवाडीचा नैसर्गिक दगडी पूल किंवा शिला सेतू. नगर रोडवर बेल्हे गावाच्या पुढे “अणे घाटात” डाव्या बाजूच्या लहानशा दरीत हे निसर्गरम्य ठिकाण आहे.

आपला सह्याद्री हा ज्वालामुखीच्या उद्रेकातून बनलाय वगैरे आपण भूगोलाच्या पुस्तकात कधीतरी वाचलेलं असतं. मात्र पर्वत बनताना ते वेगवेगळ्या थरांनी (layers) बनलेले असतात. बसाल्ट खडक, मुरूम किंवा जांभा दगड, चुनखडीचे खडक असे जमिनीतील खडकांचे विविध प्रकार आहेत.

 गुळंचवाडीजवळील या ठिकाणी हे आपल्याला लगेच पाहायला मिळते. या ठिकाणी डोंगराच्या कुशीतून एक मोठा झरा किंवा छोटीशी नदी वाहत येते. उतारामुळे इथे वेगवान झरा, धबधबा तयार होतो. मात्र हजारो वर्षापूर्वी इथे दगडावरून उडी मारून खाली उतरायच्या ऐवजी पाण्याच्या या लहानशा पण वेगवान प्रवाहाने तिथे बोगदा तयार केला. बोगद्यातील ठिसूळ खडक पोखरून पाणी पुढे निघाले आणि दुसरीकडून बाहेर पडले. वरचा घट्ट कठीण खडक तसाच तिथे राहिला आणि एक नैसर्गिक सेतू किंवा पूल तयार झाला ! सुमारे २१ मी. रुंदीचा हा पूल आहे. या पुलाखाली तसेच पुलाच्या वरील बाजूसही आपल्याला सहज जाता येते.
संपूर्ण जगात अशाच अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच काही जागा आहेत. त्यापैकी एक जागा इथे या गुळंचवाडीजवळची !! म्हणून हे निसर्गाचं देणं आपण पाहिलं पाहिजे, त्यामागचे विज्ञान मुलांना समजावून दिले पाहिजे आणि पुढच्या पिढ्यांसाठी त्याचे जतन केले पाहिजे.

घाटाच्या रस्त्यावरून खाली १० मिनिटात जाता येते. झाडीतून दरीत उतरत जाणारी पायऱ्यांची छोटीशी वाट आहे. दरीत देवीचं छोटेसे देखणे मंदिर आहे. बाजूला वाहणारा झरा व हा दगडी सेतू आहे.
या ठिकाणी छान वेळ घालवून जेंव्हा परत आपण “पराशर” कडे जाऊ लागतो तेंव्हा वाटेतील बेल्हे गाव पाहायला हरकत नाही. पंचक्रोशीतील हे एक मुख्य खेडेगाव आहे. इथे मोठा बाजार भरतो. बैलांचा बाजार असतो. खेड्यातलं वातावरण, बाजारहाट पहायची इच्छा असेल तर आपण इथे फेरफटका मारू शकतो.




या शिवाय जुन्नर परिसरात शिवरायांचे जन्मस्थान शिवनेरी, चावंड, जीवधन असे प्राचीन दुर्ग, लेण्याद्री व ओझरचा अष्टविनायक, पळशीचा पेशवेकालीन वाडा  तसेच नदीकाठील मंदिरे, वडगाव दर्या चे लवणस्तंभ, निघोजचे रांजणखळगे, खगोल विज्ञानासाठी उपयुक्त ठरलेल्या खोडद जवळच्या अजस्त्र दुर्बीणी , नारायणगड असं खूप काही पाहण्यासारखं आहे. मात्र त्यासाठी किमान 3-४ दिवस इथं राहायलाच हवं.
 
“पराशर” मध्ये दुपारी परतला की मस्त सुग्रास जेवण तयार असते. एक मुद्दाम सांगायला हवे की इथे मांसाहार, मद्यपान चालत नाही. अस्सल ग्रामीण चवीचं शाकाहारी जेवण मात्र त्याची कमतरता भासून देत नाही. हिरव्या/ लाल मिरचीचा ठेचा, लोणचं, चटण्या, आमटी-भात, भाजी, चपाती/भाकरी याबरोबर “जुन्नर भागातील स्पेशल अशी मासवडी” रस्श्यासोबत खायची मजा काही और आहे. आणि असं तुडुंब जेवल्यावर तास-दोन तास झकास ताणून झोपायला हवंच ना...!

 जेंव्हा मोठी माणसे खाऊन मस्त घोरत पडलेली असतात तेंव्हा मुले मात्र छान दंगा-धुडगूस करू शकतात.
इथे कृत्रिम अशी कोणतीही खेळणी नाहीत. आजकाल शहरात बिचाऱ्या मुलांना अशा खेळण्यांशिवाय काही पर्याय नसतो. मात्र मुलांना त्या खेळण्यापेक्षा निसर्गात मनसोक्त हुंदडायला आवडते हे अनेकांच्या लक्षात येते ते “पराशर” सारख्या विविध ठिकाणी आल्यावरच..!

इथं मुलं गवतात खेळतात, मातीत खेळतात आणि झाडं-पानं-फुलांच्यात रंगून जातात. इथे असलेल्या छोट्या नावाच्या कुत्र्याशीही ती खेळू शकतात. लाकडाच्या लहानशा पुलावरून इकडे तिकडे धाऊ शकतात.शहरात कधी बुजल्यासारखी वावरणारी मुलं इथं मोकळी मोकळी होतात.

संध्याकाळी हवं तर tractor मधून आजुबाजुच्या शेतावर जाता येतं. विविध मोसमाप्रमाणे कुठे, कुठे नांगरणीसुरु असते, तर कुठे पेरणी. कुठे धान्य तयार होऊन खळ्यावर पडलेलं असतं. शेतीच्या विविध अवजारांची माहिती घेता येते. ग्रामीण भागात गेल्या अनेक पिढ्यांनी कोणत्याही लौकिक शिक्षणाशिवाय जोपासलेलं “इंजिनिअरींग” पाहता व अनुभवता येते. जगायला आवश्यक अशी त्यांची “वास्तववादी योजना” समजून घेता येते. चालताना मध्येच नीट बनवलेली शेत-तळी दिसतात. कुणाच्या शेतात काकड्या, कुणाच्या शेतात द्राक्षं, कुणाच्या शेतात डाळिंबाची लागवड केलेली असते. आपल्या मुलांना या वस्तू कशा निर्माण होतात हे दाखवता येतं. त्यांनाही एखादी काकडी झाडावरून तोडून विकत घ्यायला मजा वाटते. इथे परिसरात  दुग्ध व्यवसायाच्या निमित्ताने गावठी व जर्सी गाईंचे / म्हशींचे गोठे आहेत. गाईचे दूध काढणे मुलांना इथं जरूर पाहता येतं. आज काही एकरावर पसरलेलं “पराशर कृषी पर्यटन केंद्र” हे या अशा आजूबाजूच्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा उपयोगी ठरलंय. इथे येणाऱ्या पाहुण्यांनी केलेल्या खरेदीतून त्यांनाही काही उत्पन्न मिळू लागलंय.

इकडे तिकडे असं हुंदडत, नवं काही पहात असताना संध्याकाळ होते. आकाशातील रंग क्षणा-क्षणाला बदलतात. सूर्यास्ताची रमणीय गंभीरता शांतपणे पाहताना भान हरपून जातं. मग जाणवतं की शहरातील आपल्या वातानुकुलीत ऑफिसमध्ये उशिरापर्यंत काम करताना आपण कितीतरी महिन्यात अशी शांत संध्याकाळ पाहिलीच नाहीये..!

रात्री “पराशर” मध्ये प्रत्येकाला आपले कलागुण दाखवायची संधी मिळते. कुणी गावं, कुणी नकला कराव्यात, कुणी नाचून दाखवावं. जे आवडतं ते मुक्तपणे करावं. गावातील स्थानिक कलाकार सुद्धा इथे सामील होतात. संबळ वाजू लागते. “आई भवानीच्या” नावानं गोंधळ रंगू लागतो...! एक मुक्तपणे जगलेला दिवस पाहता पाहता संपलेला असतो.

अन्न-वस्त्र-निवारा या गरजानंतर, रात्रीच्या वेळी लुकलुकणाऱ्या लाखो ताऱ्यांचं निरभ्र आकाश, प्रदूषण-मुक्त हवा, मस्त वाहणारा गार वारा, वेलीवर भरभरून फुललेली जाई किंवा रातराणी आणि आपल्या जिवलगाची सोबत...! जगायला खरं म्हणजे आणि काय हवं असतं?

आता थोडंस हे पर्यटन केंद्र उभं करणाऱ्या मनोज-नम्रताविषयी. कायमस्वरूपी नोकरीत रुजू असलेला मनोज काहीतरी वेगळंच जगण्याच्या इच्छेने अस्वस्थ होतो. एकेदिवशी घरच्यांसमोर आपला निर्णय सांगतो आणि त्याचे आईवडील, भाऊ सर्वतोपरी मदत करायला सरसावतात. घर आणि घरातील दागिने मदतीला धावुन येतात आणि “hachiko tourism” चे कृषी पर्यटन केंद्र बनवण्याच्या इच्छेने प्रयत्न सुरु होतो..बघता बघता यशस्वी होतो.. इथल्या प्रत्येक गोष्टीला  “ग्रामीण टच” देण्याचा त्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

त्याला व त्याच्या पत्नीला- नम्रताला छायाचित्रण (फोटोग्राफी)ची आवड आहे. उत्तम पुस्तकं वाचायची आवड आहे. नम्रता छान चित्रंही काढते. एकमेकांना अनुरूप असं हे तरुण जोडपं आहे. त्यांच्या या ठिकाणी कामाला असणाऱ्या ताई-दादा यांच्याकडे त्यांचं लक्ष आहे. त्यांच्या कुटुंबांची काळजी घेण्याइतकं मोठं मन दोघांच्याकडे आहे.

आमच्याशी बोलताना मनोज म्हणाला, “वडिलांनी कायम वेगळे जगायची प्रेरणा दिली. आत्मविश्वास दिला. इतर लोकं एखादी गोष्ट करतात म्हणून करण्यापेक्षा तुम्हाला जे मनापासून करायला आवडेल ते करा. वडिलांच्या अशा पाठिंब्याने आम्हा भावंडाना रस्ता सापडला. भाऊ मंगेश हाडवळे हा चित्रपट -दिग्दर्शक बनला. “टिंग्या [लेखक, दिग्दर्शक, संवाद], देख इंडियन सर्कस [हिंदी चित्रपट अजुन प्रदर्शित व्हायचाय-,लेखक, दिग्दर्शक] टपाल [निर्माता, लेखक] हे त्याने केलेले चित्रपट लोकांना खूप आवडलेत.
तसंच माझंही. त्यामुळे जेंव्हा नोकरी सोडायची ठरवलं तेंव्हा जास्त त्रास नाही झाला. पुढचे कित्येक दिवस प्रचंड मेहनत केली. एकेकाळी अगदी आळेफाट्यावरून ट्रक भरून कांदे नेऊन केरळात विकलेत. पण ठरवलेलं करायचं अशी जिद्द होती. आता लग्नानंतर नम्रताची पण साथ मिळालीय. ती तर पुण्यातलं शहरी सुखासीन जगणं सोडून इथं माझ्याबरोबर राहतीय. दोघे मिळून आलेल्या लोकांना जास्त आनंद मिळावा म्हणून काही नं काही करत राहतो.” 
प्रत्येकाला खरं तर असं काही वेगळं करायचं असतंच. पण आजूबाजूची परिस्थिती, स्वतःचा आत्मविश्वास आणि आपल्या भोवतीचा “कोष” तोडायची तयारी नसते. आपल्या comfort zone मधून बाहेर पडायची भीती वाटत असते. मात्र मनोजसारखे तरुण जेंव्हा असे कोष तोडायची ताकद दाखवतात तेंव्हा तीच त्यांच्या यशाची खरंतर पहिली पायरी असते.

Hachiko (ह्याचिको) हे एका जपानी कुत्र्याचे नाव. कृषी विभागातील प्राध्यापक असलेल्या आपल्या धन्याला - रोज शिबुया या रेल्वे स्टेशन वर घ्यायला येणारा हा कुत्रा. एक दिवस तो प्राध्यापक मरून जातो आणि स्टेशनवर येऊ शकत नाही. मात्र तरीही पुढची नऊ वर्षे हा इमानी कुत्रा धन्याची इथे रोज ठरलेल्या वेळी वाट पहात उभा राहतो. शेवटी १९३५ मध्ये मरून जातो. “इमानीपणा” चे प्रतीक बनलेल्या या कुत्र्याची कहाणी जपानमध्येच नव्हे तर जगभर लोकप्रिय आहे. 
जपान मध्ये त्याचं स्मारकसुद्धा उभं आहे.


रिचर्ड गेरे या सुप्रसिद्ध अभिनेत्याने या कहाणीवरील गाजलेल्या चित्रपटात कामही केले आहे. “Hachiko tourism” च्या माध्यमातून याच इमानीपणाने “कृषी पर्यटन” क्षेत्रात काम करण्याची मनोजची दृढ धारणा आहे. आणि त्यासाठी तो कायम प्रयत्नशील आहेच.

“पराशर कृषी पर्यटन” केंद्रामधील किमान २-३ दिवसाचं वास्तव्य तुम्हाला जगण्याचं खरं सुख अनुभवायला नक्कीच शिकवतं. इथे तुमच्या किमान गरजा भागवण्यासाठी सर्व आहे. मात्र टीव्ही, अद्ययावत चकचकीत यंत्र नाहीत. किंबहुना ती नाहीत म्हणूनच “पराशर” सुंदर आहे. आजवर देश-विदेशातील अनेकांनी इथे येऊन इथल्या नैसर्गिक राहणीमानाचा मुक्त अनुभव घेतलाय. तुम्हीही इथे जरूर भेट द्या. शक्यतो मोबाईल बंद ठेऊन आलात तर उत्तमच. नपेक्षा त्याला तुमचं इथलं वास्तव्य डिस्टर्ब करू देऊ नका.

 आम्ही जेंव्हा परत निघालो तेंव्हा, माझ्या मुली नम्रताला बिलगल्या. “बाबा, हे कुठे झोपडीत घेऊन आलायस आम्हाला?” असं म्हणणाऱ्या या मुली तिसऱ्या दिवशी तिला सोडून आमच्या बरोबर यायला जराही तयार नव्हत्या.

हीच इथल्या मोकळ्या वातावरणाची गंमत आहे. हे मोकळेपण, हे निवांतपण तुमचा थकवा तर दूर करतंच पण पुढच्या दैनंदिन लढाईसाठी तुम्हाला उर्जा देऊन जातं. म्हणूनच माझी खात्री आहे की माझ्या चिमुरड्या मुलींप्रमाणे इथून निघताना तुमचाही पाय जड झाल्याशिवाय राहणार नाही. आणि बाहेर पडत असतांनाच पुन्हा कधी यायचं याचा प्लान तुमच्या डोक्यात नक्कीच तयार होऊ लागेल...!!

- सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)
 
संपर्कासाठी पत्ता :-
मनोज हाडवळे, पराशर कृषी पर्यटन केंद्र, राजुरी.
कल्याण-नगर हायवे, ता- जुन्नर
संपर्क : +91 9970 515 438,+91 9028 844 222, +91-7038 890 500

 

Wednesday 23 July 2014

पानी पानी रे....

“मनापासून” या लेखमालेतील हा लेख आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याच्या पाण्यावर..!


गेल्या काही दिवसांपूर्वी कोयना धरणाचा फोटो पाहिला आणि धक्काच बसला. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस ज्या सह्याद्रीत पडतो, त्या ऐन सह्याद्रीच्या घाटमाथ्याजवळचे कोयना धरण पावसाची वाट पहात होतं..! निम्म्या महाराष्ट्राला ज्या धरणामुळे एकेकाळी वीज पुरवठा होई आणि सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात अनेकांना (आणि कोकणातील चिपळूण तालुक्यातल्या काही भागांना) पाणी मिळून जाई ते धरण ठणठणीत कोरडे पडले होते. याला कारण आपण सगळे..!
 
१९६४-६५ मध्ये धरणात पाणी अडवण्यापूर्वी त्या धरणात बुडून जाणाऱ्या गावातील अनेक गावकऱ्याना तिथून हुसकावले गेले. काही तुटपुंज्या मदतीवर समाधान मानून दूर कुठे कुठे विस्थापिताचे जिणे जगावे लागले. अनेकांना तर आजवर केवळ आश्वासनंच मिळाली आहेत. तरीही आजही कोयना धरण हे केवळ पाणी साठवायचे आणि वीजनिर्मिती करण्यासाठीचे एक साधे धरण असे सामान्य जनता मानत नाही कारण हे धरण महाराष्ट्राचा एक मानबिंदू आहे.

मात्र गेल्या १५-२० वर्षात अधिकाधिक गाळात रुतत गेलेले राजकारण व सत्तेच्या हव्यासात बुडून गेलेल्या माजोरड्या पुढारी व नेते मंडळींच्या वर्तणुकीने राज्याची काय परिस्थिती झाली, हे दर्शवणारे उत्तम उदाहरण म्हणजे आटून गेलेलं कोयना धरण. राज्यातील नेहमीच आटून जाणाऱ्या इतर धरणांमध्ये यंदा कोयना धरणाचा नंबर लागला आणि राज्यकारभाराची शोकांतिका अधिक गडद व गंभीर झाली असं मला वाटतंय.

पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला दुष्काळ काही नवा नाही. गेल्या शेकडो वर्षापासून इथे दुष्काळाची परंपरा आहे. दर ५-१० वर्षांनी कमी पावसाचं एखाददुसरे वर्षं येते आणि आपल्या सगळ्यांचे जीवनमान विस्कटून टाकते. अनेक वर्षांपूर्वी कित्येक पिढ्या दुष्काळामुळे अशाच विस्थपित होत गेल्या. पण मग आपण इतिहासातून काय शिकतोय? काहीच नाही का? मस्त वाहणारे झरे, धबधबे, तुडुंब भरलेलं नदीचं सुंदर रूप, आपल्या शहराचं वैशिष्ट्य असणारा आणि पाण्याने भरलेला एखादा तलाव पाहायला सर्वांना आवडतंच. मात्र हे सर्व असंच कायम राहावं यासाठी आताच आपण सर्वांनी जर प्रयत्न केले नाहीत तर भविष्यातील चित्र फार विदारक असू शकते.


सुदैवानं आपल्याकडे “जल-जागृती” साठी कार्यरत असणारी अनेक प्रामाणिक मंडळी आहेत. पण “पावरबाज” नेत्यांच्या वैयक्तिक हव्यासापायी आणि दडपशाहीमुळे  संपूर्ण महाराष्ट्रात “जलसंधारण” नावाखाली जो नंगानाच गेली १०-२० वर्षे सुरु आहे, त्यातच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सर्वत्र पाण्याचा जो अतिवापर चालवला आहे त्यांचेच परिणाम आता आपण भोगू लागलो आहोत हे एक उघड व कटू सत्य आहे.

आजही आपल्या राज्यातील  हिरवे बाजार, राळेगणसिद्धी, दहिवडीच्या परिसरातील लोधवडे सोलापूर जवळील अंकोली अशा अनेक गावातून अत्यंत कमी खर्चात “पाणीबचतीचे” प्रयोग यशस्वी होत आहेत. जमिनीखालील पाणी टिकवले जात आहे. मुख्य म्हणजे ही गावे कमी पावसाच्या प्रदेशातील आहेत. अथक प्रयत्नातून पाण्याच्या बाबतीत गावे स्वयंपूर्ण बनली आहेत. “पाणी वाचावण्यासाठीची शिस्त” लोकांनी अंगी बाणवली आहे. तसेच लातूर, औसा भागातील घरणी, तावरजा या नद्यांचे लोकसहभागातून आणि “आर्ट ऑफ लिविंग”च्या मदतीने पुनरुज्जीवन करण्यात आले. “जल तज्ञ राजेंद्रसिंहजी” यांच्या सहकार्याने माणदेशातील माणगंगा, येरळा आदि नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र या सगळ्यातून समाजाचा भरपूर सहभाग आहे असे दिसत नाही.
कुण्या अभिनेता-अभिनेत्रीच्या तथाकथित संबंधाविषयी भरभरून चर्चा करणारी सर्वसामान्य माणसे अशा चांगल्या प्रयत्नांविषयी बऱ्याचदा अनभिज्ञ असतात. त्यासाठी मदत करणं तर दूरच पण त्या कामांची प्रसिद्धीसुद्धा करताना सापडत नाहीत. हे चित्र बदलले पाहिजे.

कंत्राटदारांना भरभक्कम सवलती देऊन धरणांचे अनेक मोठे प्रकल्प राज्यात उभे राहिले खरे. मात्र या प्रकल्पांनी खरंच आपल्याला पाणी दिले का हा एक वादाचा मुद्दाच आहे. कित्येक धरणांचे उपलब्ध पाणी आज प्राधान्याने विशिष्ट उद्योगांना आधी दिले जाते आणि मग शेतकऱ्याना..! हे अशा देशात घडते आहे जिथे देशांचे अर्थकारण ७०% शेतीवर अवलंबून आहे.

मुळात अनेक धरणे चुकीच्या जागी बांधली गेली. अनेक धरणांनी, उद्योगांनी जंगले नष्ट केली. निसर्गाचा समतोल बिघडवला. याचा अर्थ धरण असूच नये असा नव्हे. लहान-मोठी धरणे ही आवश्यक आहेतच पण त्याचे काम विक्रमी वेळेत आणि समाजहित डोळ्यासमोर ठेवूनच केलं तरच..! जर समाजातील प्रत्येकाने पाण्याच्या बचतीसाठी, जमिनीतील पाणीसाठा वाढवण्यासाठी प्रयत्न केले तर आणि तरच पुढच्या पिढीत पाण्यासाठी युद्ध आणि भांडणे होणार नाहीत.

चाळीत नळावर होणारी भांडणे आणि दोन तालुके, राज्ये अथवा देशांनी एकमेकांशी केलेली भांडणे यांचं मूळ तत्व एकच असतं. ते म्हणजे, “दुसऱ्याला पाणी मिळाले नाही तरी चालेल पण फक्त मला आणि मला पाणी मिळालेच पाहिजे. मी पाण्याची कितीही उधळपट्टी केली तरी मला हवे तेवढे आणि हवे तेंव्हा पाणी मिळालेच पाहिजे”. यामुळेच पाण्यासाठी सगळेच दहशतवादी बनून जातात. आपला एखादा शेजारी घरात पाईपला चोरून मोटर लावून पाण्याचा अधिक वाटा मिळवतो. तर एखादा देश/ राज्य नदीचं पात्र बदलतो, त्यावर मोठी धरणे बांधून पुढे जाणारे पाणी कमी करतो. आपल्याला पाणी मिळत नाही म्हणून अशा कारणांचा आपल्याला फार काळ आधार घेता येणार नाही कारण त्यापलीकडे जाऊन आपण बरेच काही निश्चित करू शकतो.

अगदी सामान्य शहरी माणसांचा विचार केला तरी पुढील काही उपाय महत्वाचे ठरू शकतील;

१.      आपल्या घरातील, सोसायटीतील पाण्याची उधळपट्टी बंद करणे. पाण्याच्या मीटरचा वापर करून ठरविक लिटरचा रोज पुरवठा करणे.

२.      ड्रेनेज मधून वाया जाणाऱ्या पाण्यावर पुनर्प्रक्रिया करून त्याचा toilet साठी वापर करणे.

३.      फ्लश tank चे सेटिंग कमीत कमी पाण्यासाठी असावे. ज्यायोगे बेसिन, संडासात आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी टाकले जाणार नाही.

४.      घरात आलेल्या नळावरील आपले परावलंबित्व दूर करायला हवे. त्यामुळे आपल्या हातून पाण्याची उधळपट्टी होणार नाही.

५.      आपल्या परिसरात जेवढी जास्त झाडे लावता येतील तशी लावावीत. सर्वांनी सामाईक पणे त्यांची जोपासना करावी. झाडांमध्ये केवळ शोभेची खुरटी झाडे लावू नयेत. तर आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या वेगाने जमिनीची धूप होणार नाही इतके झाडांचे आच्छादन पृथ्वीवर असले पाहिजे.

६.      अति कॉंक्रीटच्या मागे लागून घर, सोसायटीच्या परिसरातील जमीन नष्ट करु नये. जमिनीत पाणी मुरण्यासाठी जमिनीचे, मातीचे असणे फार आवश्यक आहे. अन्यथा खाली पडलेले सर्व पाणी ड्रेनेज मध्ये जास्त जाते आणि निरुपयोगी बनते.

७.      आपल्या आजूबाजूचे रस्ते, मैदाने, टेकड्या, डोंगर यांच्यावर जेवढी जास्त झाडे लावता व वाढवता येतील तेवढे जास्त चांगले. डोंगरउतारावर चर खणून पाणी आणि मातीचे वाया जाणे थांबवले पाहिजे. जमिनीची धूप थांबवली पाहिजे.

८.      आपल्या परिसरातील विहिरी, लहान-मोठे तलाव, तळी, नदी, ओढे, नाले यांची नियमित स्वच्छता केली पाहिजे. त्यातला गाळ काढला पाहिजे. अनेकदा विहिरी व तलावात गाळ साचल्याने त्याखाली झरे बुजून जातात. आणि जलसाठा मृतवत होतो. पूर्वी गावातले सगळे पावसाळ्यापूर्वी एकत्र येऊन गाव-तळ्यातील गाळ काढत असंत. गावाच्या नदीची, घाटाची स्वच्छता करायचे. आता आपण एकतर फक्त सरकारवर विसंबून राहतो किंवा  सरकार काही करत नाही म्हणून तावातावाने भांडत राहतो...! हे चित्र बदलले पाहिजे.

९.      नद्यांमध्ये सांडपाणी सोडण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया होणे अत्यावश्यक बनले आहे. सर्व नद्यांची स्वच्छ पाण्याची क्षमता आता सांडपाण्यामुळे जवळपास संपुष्टात आली आहे. त्यामुळे त्याची सुरुवात आपल्या घरापासून करायला हवी. प्रत्येक घरात, सोसायटीत “सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा” असणे आता बंधनकारक करायला हवे. तसेच दरवर्षी यंत्रणेच्या कार्यक्षमतेची तपासणी झाली पाहिजे.

१०.  आपल्या गावातील नदी, तलाव यामध्ये प्रदूषणामुळे जलपर्णी वाढते. ती वेळोवेळी काढून टाकली पाहिजे.

११.  आपल्या परिसरातील नद्या, ओढे यांना जोडून आपण “लहान नदीजोड” निश्चितच करू शकतो. त्याचा खर्च कमी असेल आणि त्यामुळे जास्त भूभाग पाण्याखाली येऊ शकेल. याकामी सर्व नागरिकांनी सहभागी झाले पाहिजे. ज्याला शक्य आहे त्याने आर्थिक आणि ज्याला शक्य आहे त्याने श्रमदानाची मदत करावी.

१२.  जिथे जिथे पाणी गळती, पाणी चोरी होत आहे त्याविरुद्ध पक्ष, संघटना आदि गोष्टी बाजूला ठेवून एकजुटीने विरोध केला पाहिजे. या अनधिकृत गोष्टींना आळा घातला पाहिजे

१३.   आपल्या राज्यात पोपटराव पवार, जलतज्ञ अरुण देशपांडे, अण्णा हजारे यांच्यासारखे शेकडो निरलस आणि पाणी बचतीसाठीचे मार्गदर्शन करणारे कार्यकर्ते आहेत. त्यांना सन्मानाने वागवून त्यांचे सल्ले अंमलात आणले पाहिजेत.

१४.  ऐतिहासिक जुन्या विहिरी, तलाव यांना बुजवून नष्ट न करता त्यातील गाळ काढून झरे पुन्हा जिवंत करायला हवेत.

१५.  जिथे जिथे बोअर (कुपनलिका) मारून पाणी मिळवले जाते. तिथे जास्तीत जास्त खोल बोअर मारण्यावर सगळ्यांचा भर असतो. पण यामुळे भूगर्भातील पाणीसाठा मात्र झपाट्याने कमी होतो. कालांतराने संपून जातो. त्यामुळे जिथे बोअर मारायचे असतील, तिथं पाण्याचे पुनर्भरण होण्यासाठी उपाय केले पाहिजेत.
याचबरोबर शेतकरी बंधूनी कमीत कमी पाणी लागेल अशा पद्धतीने पीकपद्धत विकसित करायला हवी. ठिबक सिंचन सारख्या योजना वापरायला हव्यात. ऊसशेतीत वाया जाणारे जास्तीचे पाणी कमी करायला हवे. जेंव्हा सर्व बाजूने असे चौफेर प्रयत्न होतील तेंव्हा आपल्याला पुढच्या काही वर्षात पुरेसे पाणी वापरायला मिळू शकेल.
तसेच मीडियामधून जास्त प्रमाणात जन-जागृती झाली पाहिजे. पाऊस पडत नाही म्हणून “उदास शेतकऱ्यांचे” फुटेज दाखवणारे थोर च्यानलवाले, जरा पाउस झाला की लगेच धबधब्यात भिजत गोंधळ घालणाऱ्या तरुणाईची चित्रे दाखवून लागतात. त्यांनी किमान हे पाऊस-पाणी कसे साठवावे याविषयी अधिकाधिक कार्यक्रम दाखवणे गरजेचे आहे.

शेवटी महत्वाची गोष्ट म्हणजे सरकार. हे काही आकाशातून पडलेले नाही. तुमच्या-आमच्यातील माणसे आपणच तिथे बसवली आहेत. मात्र आपल्या परिसरात जेंव्हा ते चुकीची कामे करतात तेंव्हा त्यांच्या दडपशाहीला न जुमानता आपण सर्वांनी एकजुटीने त्यांना विरोध केला पाहिजे. जेंव्हा एखाद्या गावाजवळ एखादे चुकीचे धरण बांधले जात असते, तेंव्हा विरोध हा व्हायला हवा पण तो विज्ञानावर, तंत्रज्ञानावर आधारित असावा. त्या कामाला चुकीच्या पद्धतीने न करता चांगल्या पद्धतीने कसे करता येईल हे सांगणारा विरोध हवा. तात्पुरत्या किंवा फक्त स्वतःच्या फायद्यासाठी जे लोक विरोध करतात त्यांनाही दूर ठेवून चांगल्या सरकारी कार्याला आपणही मदत करायला हवी. देश आणि धर्मासाठी सामान्यतः बलिदान करावेच लागते. कधी ते आयुष्याच्या रुपात, कधी आर्थिक रुपात तर कधी आपली जमीन देऊनसुद्धा करावे लागते. आपण ते केले पाहिजे.


 “धोंडी धोंडी पाणी दे”, “पानी पानी रे..” असं केविलवाणेपणाने आक्रोश वेळ आपल्यावर पुनःपुन्हा येऊ नये म्हणून आपण सगळे असे सकारात्मक विचाराने आणि एकजुटीने कामाला लागूया. मग निसर्गसुद्धा आपल्याला निश्चित साथ देईल आणि पुढच्या पिढ्यांसाठी आपल्याला काही आश्वासक असं मागे ठेवता येईल हे नक्की..!
-    सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)