marathi blog vishwa

Friday 15 March 2013

बूटपालीश वाला..आणि एक नेता..!

" सुचेल तसं " लेखमालेतील हा पुढचा लेख एका सत्य परिस्थितीवर आधारित आहे.. रोजच्या जगण्यात अनेक गोष्टी समोर येतात पण आजकाल आपण अनेकदा त्यातील सत्य मात्र दुर्लक्षित करतो आहोत असे पुन्हा पुन्हा वाटत राहते...!


सुमारे वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेंव्हा बहारीनला आलो नव्हतो. मुंबईतच नोकरी करत होतो. एकदा ऑफिस टूरसाठी नागपूरला गेलो होतो. कामे संपवून रात्री नागपूर रेल्वे स्टेशनवर येऊन बसलो होतो पुस्तक वाचत..इतक्यात जरा गडबड ऐकू आली. काय झालं म्हणून पाहिलं तर एक नेता त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत तिथे येत होता. वाटेतील लोकांना धक्के मारत नेत्यासाठी जागा बनवत-बनवत ती मंडळी त्यांना तिथे फलाटावर घेऊन आली. स्वतःला "दीन दुबळ्यांचा" तारणहार समजणाऱ्या पार्टीचे ते एक नेते होते. (सत्तेत जाताना "हाताची" ताकद कमी पडली म्हणून हल्ली ते हातात "धनुष्यबाण" घेण्याचा प्रयत्न करताहेत म्हणे.)


दिवसभर भरपूर कामे किंवा भाषणे केल्यामुळे साहेबांचा आवाज भलताच "जड" झाला होता. (इथे पुलंच्या "म्हैस" मधील ऑर्डरली आठवायचा नाही हं..!) साहेब प्रथमश्रेणी विश्रामगृहात जागा नसल्याचे पाहून मग फलाटावरील एका बाकावर ऐसपैस बसले. एक कार्यकर्ता लगेच शेजारच्या दुकानाजवळ गेला. साहेबांसाठी खाण्याचे काही पदार्थ घेतले. शेजारच्या पेपरवाल्याकडून एक पेपर व "चटपटीत" फोटो असलेलं एक मासिक घेतलं. तसाच परत निघाला तेंव्हा त्या दुकानदाराने पैसे मागितले..
कार्यकर्ता गरजला, " साब के सामान के लिये पैसे मांगता है ..दुकान चाहिये या तोडना है ?" हताश दुकानदाराने परत कळवळून माफी मागितली आणि वर सांगितले, " और कुछ चाहे तो बताओ ..दुकान आपकीही समझो..!"
कार्यकर्ता मग सगळं घेऊन साहेबांकडे आला. झाल्या गोष्टीवर साहेबांचे लक्ष होतेच. त्यांनी ते मासिक पाहिले ..म्हणाले " हिंदी नको, इंग्रजीवाले आण, एसी डब्यातून जायचे आहे..!" पुन्हा कार्यकर्ता इंग्रजीवाले "चटपटीत" मासिक घेऊन आला..फुकटच..!

थोड्या वेळाने रेल्वे आली. लोकांची गडबड होण्यापूर्वीच कार्यकर्त्यांनी साहेबांना आत घुसवले आणि त्यांच्या जागेवर स्थानापन्न केले. साहेबांनी दिलेले नोटांचे एक बंडल कार्यकर्त्यांच्या नेत्याने नको नको म्हणत खिशात ठेवले... पुन्हा पुन्हा नमस्कार करून बिचारे गेले परत आपल्या घरी..!
मग इतर सगळी माणसे आपापल्या जागी बसली. गाडीत बराच केर-कचरा तसाच होता. लोकं आपल्याकडचा कचरा दुसऱ्याबाजूला ढकलत होती. "आजकाल रेल्वेवाले पण माजलेत. साधी स्वच्छता ठेवता येत नाही रेल्वेत..! सरकारनेच काही केले पाहिजे..पण सरकारला वेळ कुठाय?" सरकारचे नाव आल्यावर हे पुढारी चमकले पण न बोलण्यात शहाणपण आहे हे समजल्याने गप्प बसले..अर्थात रेल्वेत आपण घाण केली नाही तर रेल्वे आपोआप स्वच्छ राहील हे मात्र सर्व लोकांच्या लक्षातच येत नव्हते...

इतक्यात "टार्र कट्याक.." असा आवाज येऊ लागला. एक पांगळा मुलगा लाकडी फळकूटावर बसून डब्यातून फिरत येत होता. बिचाऱ्याचे दोन्ही पाय गुडघ्याखाली तुटलेले होते. तिथे फक्त एक मांसाचा गोळा बनला होता. पंधरा एक वर्षाच्या त्या मुलाच्या आयुष्यात काय घडलं होतं कुणास ठाऊक.. !
मात्र तो ठीक नीटनेटक्या कपड्यात होता. "बूट..पालीश..साब बूट पालीश.." करत तो डब्यातून फिरत होता. कुणी पालीश करून नाही घेतले की डब्यातील कचरा हातातील फडक्याने झाडत होता, मग कचरा एका प्लास्टिक पिशवीत भरत होता..त्यानंतर लोकांपुढे हात पसरायचा..कुणी दोन चार रुपये देत होते. असं करत त्याने तो डबा बऱ्यापैकी स्वच्छ करत आणला होता. माझे बूट बरे होते तरी उगाच त्याच्याकडून पालीश करून घ्यावसं वाटलं. वर त्याचे पैसे दिले.
तो मग "साहेबांकडे" वळला. "साब पालीश " म्हणून त्यांच्या पायाला हात लावताच साहेब ओरडले.."ऎ भिकारी, चल हटो दूर..साला हात क्यू लगाता है ?" तो पोरगा जाता जाता म्हणाला "साब, भिकारी नैय मै, काम करके पैसा लेता हू..!" परत साहेब ओरडले मग त्याच्यावर.. चिडून व हिरमुसून तो पुढे निघाला..
दरवाज्याजवळ पोचला. तिथे कुणीतरी बरेच सामान ठेवले होते. त्याचे ते फळकूट तिथून निघेना. तो कावराबावरा झाला. इकडे तिकडे पाहू लागला. माझे आणि दुसऱ्या एका पांढरपेशा माणसाचे तिकडे लक्ष गेले. आम्ही दोघेही चटकन उठलो. तिथे गेलो. आणि चक्क त्याला फळकूटासकट उचलले..! आम्ही तोंडाने "गणपतीबाप्पा .." म्हणताच हिंदी भाषिक असूनही तो स्वतःच म्हणाला.."मोरया.." आणि त्याच्या चेहऱ्यावर एक निर्मळ हसू फुलले..! त्याला फलाटावर ठेवला आणि आम्ही परत वळलो..तेव्हढ्यात त्याने त्या दुसऱ्या माणसाचा पाय पकडला...

"अरे पांव क्यू पकडा ? छोडो रे..ट्रेन छुट जायेगी.." तो माणूस म्हणाला.
"साब, आपका बूट बहोत गंदा है..रुको मै पालीश करता हू.." असं तो बोलला. ते लगेच म्हणाले.."नही नही रहने दो.."

तो पुन्हा म्हणाला, "साब पैसा नही चाहिये..आपने अभी मुझे ट्रेन से बाहर उतारा..और मै आपके लिये कुछ नही दू ये ठीक नही..! बस दो मिनिट.." आणि त्याने त्यांचे बूट पालीश करून दिले..! पुन्हा निर्मळ हसत आम्हाला त्याने "बाय" केले..
पाय जरी तुटले असले तरी जगातील कुठलीच गोष्ट फुकट नको असे मनाशी ठाम ठरवलेल्या त्या पांगळ्या युवकाला मी मनोमन सलाम ठोकला..सगळ्यांकडून बऱ्याच गोष्टी फुकट मिळवणाऱ्या त्या नेत्यापेक्षा हा मुलगाच मला "महान" वाटला होता..तुम्हाला काय वाटतं ?
---- सुधांशु नाईक, बहारीन (nsudha19@gmail.com)

4 comments:

  1. hriday sparshi athavan...Sarvach lok evadhe sanvedanshil asatil tar.. Ani vyangachitra pan sahi ahe

    Sudeep

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर कथा आवडली.धन्यवाद

    ReplyDelete
  4. कथा सुंदर आहे !!

    ReplyDelete