marathi blog vishwa

Tuesday, 20 September 2016

इंजिनिअर डे..!

१५ सप्टेंबर च्या "इंजिनिअर डे" च्या निमित्ताने एका इंजिनिअरची ही धमाल...

आज इंजिनिअर डे! म्हटलं मस्त दिवस ढकलू.
उद्या पेपर नसल्यानं आज मिळतील तेवढे पेपर आल्याच्या चहासह चवीनं वाचू. 
मग निवांत बसून मन्सूरअण्णांचा यमनी बिलावल ऐकावा.
समोर आलेला गरमागरम नाश्ता हाणताना पुन्हा एकदा भाऊ पाध्येंचा " बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर" वाचावा...
 सावकाशपणे मुलींना आपल्या कळपात ओढून डीवीडीवर धमाल पिक्चर पहावा..
पण....
जणू या सगळ्याचा सुगावा हेरखात्यामार्फत मिळाल्यानंतर आकाशवाणी झाली, " उद्या आम्ही संपावर. सकाळी उशीरा उठणार व काही करणार नाही..."
मग....
शेवटी हाडाचा इंजिनिअर! अचानक जाहीर झालेल्या ओरलला जो कधीही निधड्या छातीनं सामोरा जातो तो अशा आव्हानांसमोर थोडंच गुडघे टेकणार??
सकाळी आपलाआपण मस्त चहा ढोसून पेपर वाचून काढले. नाश्त्याला हवेच काहीतरी म्हणून दडपे पोह्याची तयारी सुरु केली.
ट्रॉल्यांची सततची उघडझाप ऐकून आकाशवाणी झालीच.
" पोहे डावीकडच्या ट्रॉलीत आहेत, पातेलं उजवीकडे... इत्यादि इत्यादि..
" माहितेय मला, ते सगळं काढलंय, शेंगदाणे? "
" पोह्याशेजारी दिसले नाहीत वाटतं.. "
मग बारीक कांदा कसा आपल्यालाच चिरता येतो व कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येऊ नये म्हणून काय करावं यावरचा सेमिनार इंजिनिअरनं नवोदित मेंबर्स ना दिला.
मग तयार झालेले सुंदर पोहे सर्वांनी मनसोक्त दडपून खाल्ले. 
तरीही तांब्याभर पाणी पिऊन मग जाताजाता कुजकेपणानं लेक बोललीच, "पोहे चविष्ट होते रे, पण चार दिवसाचं तिखट बहुदा एकदम वापरलंस तू.."
नवीन काही शिकायचं तर कष्ट करायची तयारी हवी याविषयी अजून एक सेमिनार! देत त्यांच्याकडून हळूच चहाची भांडी, कपबशा, प्लेटस् विसळून घेण्यात आल्या. शेवटी प्रत्येक इंजिनिअरच्या आत एक सुपरवाइजर कम् मॅनेजर जन्मजात दडलेला असतोच!
नाश्ता संपेतो जेवणही करायला हवं हे उमगलं.
फ्रीजमधल्या भाज्यांचं आधीच पुढच्या तीन दिवसांसाठी रिझर्वेशन केलेलं. मग कपाटं शोधावी लागली.
मे महिन्यात काश्मीर ट्रीपवेळी " ह्या राजम्याला भिजवून ठेवावं लागत नाही" म्हणून हौसेनं घेतलेला राजमा अंग चोरुन बसलेला!
त्याला उचलला. बुर्जी व अंडाकरीसाठी राखून ठेवलेल्या " एव्हरेस्ट मटन मसाल्या" कडे बरेच दिवस दुर्लक्ष झालेलं. तो आज मदतीला धावून आला.
चमचमीत राजमा, भात तयार झाला पण चपात्यांचं काय?
शेवटी " तुझ्या हातच्या गरम चपात्यांची मजा न्यारीच" अशा स्तुतीवर चपात्यांचं आउटसोर्सिंग करण्यात आलं.
सोबत कांद्याची व घोसावळ्याची भजी असा चविष्ट मेनू तयार झाला. 



मधल्या वेळेत स्वत:च्या व दुस-यांच्या आंघोळीचं प्रकरण उरकण्यात आलं व अवघं कुटुंब जेवायला सज्ज झालंय...

तुम्ही पण येताय ना? सोबत आइसक्रीम घेऊन यायला विसरु नका. नाही म्हणजे तिखट लागलं जेवण तर बरं असतं ना आईस्क्रीम... 
- सुधांशु नाईक. ( nsudha19@gmail.com)

Friday, 26 August 2016

पावनखिंडीचे युध्द, युद्धापूर्वी व नंतर...

कोणत्याही नेत्याच्या “महान” होत जाण्याच्या वाटचालीत ३-४ मुख्य घटनांचा समावेश असतोच. राजासाठी स्वतःहून बलिदान देणाऱ्या, मरणाच्या दारात आपणहून जाणाऱ्या सैनिकांच्या ज्या मोजक्या घटना जगभरात आहेत, त्यात पावनखिंडीतले बलिदान ही अजोड घटना आहे ! 

आषाढ पौर्णिमे-प्रतिपदाला झालेल्या या युद्धाच्या स्मृतीनिमित्त शेकडो शिवभक्त व निसर्गप्रेमी ही पदयात्रा गेली कित्येक वर्ष जुलै –ऑगस्ट महिन्यात करतात, तेंव्हा मला वाटलं तसं या पावनखिंड घटनेपूर्वीचे व नंतरचे काही...

पावनखिंडीच्या कथानकाची खरी सुरुवात होते अफजलखान वधानंतर. कारण पावनखिंडीत बलिदान केलं ते बांदलाचे सैनिक प्रतापगड युद्धात विशेष त्वेषाने लढले. साऱ्यांच्या पसंतीला उतरले.
ज्या कान्होजीराव जेध्यांनी या मोहिमेपूर्वी सर्व मराठा सरदारांची एकजूट घडवून आणली त्यांचा “मानाची पहिली तलवार” (ज्याला मानाचे पहिले पान असं त्याकाळी म्हटले जाई) देऊन सत्कार केला राजांनी या युद्धानंतर. यामुळे शौर्यासोबत अन्यत्र केलेली मोठी कामगिरीही कशी गौरविली जाते त्याचं प्रत्यक्ष उदाहरण साऱ्यांना पाहायला मिळाले.
त्यानंतर मात्र प्रतापगडाच्या पायथ्याला खानाला संपवल्यावर मराठी सैन्य कोणताही विजयोत्सव न करता पुढच्या मोहिमेवर निघालं.

कौटिल्यनीतीत अगदी असंच सांगितलं आहे... तिथे म्हटलंय की शत्रूचे सैन्य कमकुवत झालंय, भयभीत झालंय हे दिसताच राजाने आपल्या पराक्रमी सैनिकांना सोबत घेऊन त्वरित शत्रूच्या अन्य भागावर आक्रमण करून अधिकाधिक प्रदेश ताब्यात घ्यावा. शिवरायांनी व त्यांच्या सोबतच्या सल्लागार मुत्सद्यांनी अनेकानेक ग्रंथांचा अभ्यास केलेला. त्यात कौटिल्यनीती अभ्यासली असेलच का हे तसं सांगता येत नाही. पण शिवकालाकडे पाहिलं की ते कृष्ण व चाणक्य यांच्याप्रमाणेच धूर्तपणे पाऊले उचलतात असं मला नेहमी जाणवते.

तर प्रतापगड परिसरतील घमासान युद्धात आदिलशाही फौजेला पूर्ण नेस्तनाबूत केल्यावर पुढील २-३ दिवसातच सरनोबत नेतोजी पालकर व शिवराय दोन तुकड्यांनीशी आदिलशाही मुलुखात घुसले. वाई, पाचवड, सातारा, उंब्रज, कराड, मसूर, आष्टा, वाळवा ताब्यात घेत अवघ्या २०-२२  दिवसात शिवराय कोल्हापूरजवळ आले. मोठा भूभाग स्वराज्यात आल्याने मराठी फौजेचा उत्साह द्विगुणीत झालेला. कोल्हापूर व पाठोपाठ पन्हाळा जिंकला गेला. पन्हाळ्याची ख्याती सर्वांना आधीच माहिती. त्यामुळे गड जिंकताच रातोरात तिथं पोचून भर रात्री मशालींच्या उजेडात शिवरायांनी दुर्गदर्शन केलं असं इतिहास सांगतो.  
मंडळी जरा विसावाताहेत तोवर बातमी आली की आदिल्शाहाने दिलेल्या आदेशानुसार, पळून गेलेला फाझलखान रुस्तुम-ए-जमा याला सोबत घेत मोठी फौज घेऊन राजांवर चालून येत आहे. या बातमीने घाबरून जाण्याऐवजी लढाईसाठी सज्ज मराठी सैन्य तलवारी घेऊन दौडत निघाले. शत्रूसैन्य पोचायच्या आधीच सांगली-कोल्हापूर दरम्यान खिंडीजवळ मोक्याची जागा पकडून सज्ज झाले. टेकडी चढून वर आलेल्या आदिलशाही फौजेला शस्त्रसज्ज मावळे दिसताच त्यांचे मनोधैर्य खचले. स्वराज्यासाठी झालेल्या या पहिल्या मैदानी लढाईत मराठ्यांनी शत्रूला अक्षरशः उधळून पळवून लावले.

मग आदिलशाहीला धडा शिकवण्यासाठी नेतोजीराव चिकोडी, रायबाग, अथणी, कुडची असे विजापुरकडे दौडत निघाले तर शिवरायांनी मिरजेच्या बुलंद भुईकोट किल्ल्याला वेढा घातला. मात्र इथे त्यांना विजय मिळाला नाही. कित्येक दिवस गेले. मग बातमी आली की आदिलशहाने शिवरायांच्या पाडावासाठी कर्नूलचा सुभेदार सिद्दी जौहर याला नामजद केले आहे. त्याला सुमारे ४५ हजार खडी फौज व २० हजारचे अन्य सेवक दिले. खास किताब दिले. सिद्दी जौहर हा रांगडा व काटेकोर शिस्तीत वागणारा सरळमार्गी शिपाई गडी. अफझलखानासारखा इकडे तिकडे वेळ न घालवता तो सरळ मिरजेकडे दौडू लागला.

मग शिवरायांनी सल्लामसलत करून एक अफलातून निर्णय घेतला. मिरजेतून माघार घ्यायची मात्र पुन्हा पुण्याकडे स्वराज्यात न जाता, ही लढाई नुकत्याच जिंकलेल्या पन्हाळ्यावर बसून लढायची. यामागे दोन प्रमुख कारणे होती. एक म्हणजे सोबत असलेल्या सुमारे ६-७ हजार सैन्यासाठी पन्हाळ्यावर भरपूर धान्य, दारुगोळा व पाणी उपलब्ध होते तसेच परिसर डोंगर व लहान टेकड्यांनी भरलेला असल्याने झटपट युद्धासाठी, छापेमारीसाठी सुयोग्य होता. राजे गडावरून लहान लहान तुकड्या अचानक युद्धासाठी पाठवू शकत होते व त्या तुकडीला बाहेर असणारे मराठी सैन्य मदत करू शकणार होते.
तर दुसरे कारण म्हणजे हा भाग नुकताच स्वराज्यात आलेला. इथे युध्द झाल्यास स्वराज्याचा गाभा असलेले मूळ प्रदेश, राजगड, प्रतापगड, पुणे पट्टा, पुरंदर व कोकण यांना युद्धाची झळ लागणार नव्हती. युद्धाचा काहीही निर्णय लागला तरी त्यावेळी तयार झालेलं ते लहानसे स्वराज्य अबाधित राहणार होते. तर जेथे शिवाजीराजे जातील तेथेच युद्धाला जायचा निर्णय सिद्दी जौहरने घेतला. भक्कम शिपाईगडी असलेल्या सिद्दी जौहरचा हा निर्णयसुद्धा लष्करी दृष्ट्या योग्यच होता.
“एकदा का हा शिवाजी कब्जात आला की मग सगळे स्वराज्य आपलेच” हे त्याचे म्हणणे संयुक्तिक होते व त्याला स्वतःचे बळ नक्की ठाऊक होते. 


पाहतापाहता शिवराय सोबतच्या ६-७ हजार फौजेनिशी पन्हाळ्यावर पोहोचले. त्र्यंबकपंत या गडाच्या हवालदाराने (किल्लेदाराने) तत्कालीन व्यवस्थेनुसार चहू बाजूनी चोख बंदोबस्त केला. मोक्याच्या बुरुजांवर चांगल्या तोफा सज्ज केल्या. सर्वांच्या राहुट्यांची विविध भागात राहण्याची सोय केली. त्यांच्यासाठी अन्न, चारा-पाणी याची सोय केली.
अशा तऱ्हेने सर्व मंडळी सिद्धीचे स्वागत करायला उत्सुकतेने सज्ज झाली. सिद्दीने मोठ्या जोमाने पन्हाळगडावर हल्ला चढवला. त्याच्या सोबत शिवरायांच्या कुटुंबियांचा कायमचा वैरी बाजी घोरपडे, फाजलखान, रुस्तुम-ए-जमा, सिद्दीचा कर्तबगार जावई सिद्दी मसूद असे सर्व सरदार होते.
मात्र ज्या वेगाने आदिलशाही सैन्य गडाला भिडले त्याच वेगानं मागे सरकले. कारण होते गडावरून तोफा-बंदुका, गोफणी, बाण यांच्या सहाय्याने झालेला प्रखर हल्ला..!
मग सिद्दीने सुबुरीचे धोरण स्वीकारले. सैन्याची विभागणी केली. चौफेर वेढा आवळायला सुरुवात केली. गडाच्या सभोवती सुमारे ७-८ मैलाच्या परिसरात जागोजागी चौक्या, मेटे उभारली. गडाकडे रसद व सैनिक जाऊ शकतील असे सारे लहानमोठे मार्ग बंद केले. गडाचा तीन दरवाजा, चार दरवाजा, वाघ दरवाजा याच्या समोर मुख्य तुकड्या नेमल्या. उत्तामोत्तम तोफांनी या दरवाज्यावर व तटबंदीवर मारा करायला तोफखाना सज्ज केला. वैशाखाच्या महिन्याच्या त्या तापत्या उन्हात दोन्ही सैन्यं वेळ मिळेल तेंव्हा भांडू लागली. गडावरून होण्याऱ्या तोफेचा मारा टाळण्यासाठी सिद्दीने आपल्या तोफा त्या पल्ल्याच्या बाहेरील बाजूस ठेवल्या. यामुळे गडावर मारा होईना पण नाकेबंदीला उपयोग होऊ लागला.

अधूनमधून गडावरून उतरून मावळी फौजा खालच्या सैन्यावर हल्ला करत. कडवा प्रतिकार होऊ लागताच परतून गडावर परत जात. यामागे शत्रुसैन्याला जरब बसवणे, त्यांच्या मनात भीती निर्माण करणे तसेच वेढयाची कमकुवत बाजू पाहून तिथे आघात करणे असे विचार असंत. याचबरोबर त्याचवेळी जर बाहेरील मदत मिळाली तर शत्रुसैन्याला मोठा धक्का देणे हा प्रयत्न असे.
मात्र सिद्धी जौहरने त्याच्या सरदारांवर अशी कडक नजर ठेवलेली की कुठेही कामचुकारपणा होत नव्हता. झालेल्या प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले जात होते. त्यातच बाहेरून नेतोजी पालकर यांनी केलेले प्रयत्न अयशस्वी झाले. त्यांना हताशपणे परतावे लागले. भक्कम वेढयामुळे राजे गडामध्ये कोंडले गेले.
याच दरम्यान आदिलशहाच्या सततच्या विनंत्यांना होकार देत बादशहा औरंगजेब यानं आपली मोठी फौज लहानसं स्वराज्य बुडवायला पाठवली. याचं नेतृत्व होतं त्याचा पराक्रमी मामा शाहिस्तेखान याच्याकडे. अशा तऱ्हेने मोठं संकट पुणे प्रांतावर आलेलं असताना राजे जास्त काळ अडकून पडणे धोकादायक होतं. त्यामुळे आता राजांना प्रतीक्षा होती पावसाची.
पन्हाळा, विशाळगड, गगनगड, आंबा –अणुस्कुरा घाट इ. प्रांतात कोकणासारखाच सुरुवातीचा पाऊस मुसळधार बरसतो. या पावसात जेंव्हा सिद्दीचा वेढा अस्ताव्यस्त होईल तेंव्हा काही नं काही प्रकारे आपण धडक देऊन इथून पलायन करू असं शिवरायांनी ठरवले.
मात्र....
एखादी जबरदस्त टोळधाड यावी तसा पाऊस परिसरात धुमाकूळ घालू लागला. तरीही सिद्दी जौहर जराही बिचकला नाही. तो शिवरायांच्या अपेक्षेपेक्षा हुषार निघाला. त्यांनं सगळ्याचा उत्तम बंदोबस्त करायचं नियोजन आधीच केलेलं. चौक्या, मेटे, लपायच्या जागा इ. सगळ्या ठिकाणी गवताची छप्परं उभी राहिली. तोफांना तेलपाणी केलं गेलं. जणू पाऊस पडतच नाहीये अशा थाटात वेढा सुरु राहिला.
त्यात भर म्हणून नवी समस्या उभी राहिली. सिद्दीच्या फौजेत लांब पल्ल्याची तोफ व ती चालवणारे टोपीकर इंग्रज दाखल झाले..!

त्याचे असे झाले की, आदिलशाही सैन्याला खबर मिळालेली की इंग्रजांकडे लांब पल्ल्याच्या तोफा येत आहेत. जागरूक सिद्दीच्या वकिलाने मग राजापूरच्या इंग्रजांना तोफा देण्याची मागणी केली.
काही काळापूर्वीच दाभोळ पट्ट्यात पोचलेल्या मराठी सैन्यानं इंग्रजांना धमकावलं होतं. कोकण प्रांतात व्यापार करण्यापूर्वी परवाने घेण्यास भाग पाडलेलं. इथल्या राजकारणापासून दूर राहण्याचं स्पष्ट सुचवलेलं. शिवरायांच्या वाढत्या हालचालींच्या धसक्याने इंग्रजांनी ते ऐकलेलं तेंव्हा. मात्र आता राजापूरच्या इंग्रज अधिकारी मंडळीनी असा विचार केला की, “ या पन्हाळ्याच्या वेढ्यात बहुदा शिवाजी कैद होईल व आपली भीती संपेल व शिवाजीचे सैन्य पुन्हा आपल्याला त्रास देऊ शकणार नाही”. तसेच यापुढे पुन्हा आदिलशहाला सामोरे जावे लागेल. मग त्यांना विरोध करणे, तोफा द्यायला नकार देणेही आपल्याला कसे परवडणार असा विचार करून हेनरी रेविन्गटन, गिफर्ड आदि मंडळी त्या लांब पल्ल्याच्या तोफांपैकी एक तोफ घेऊन पावसाच्या तोंडावर दाखल झाले. दुसरी तोफ पावसानंतर येणार होती.
ती तोफ दक्षिण बाजूस, चार दरवाजा ते तीन दरवाज्यासमोरच्या प्रमुख बाजूला नेमली गेली.
एक दिवस जेंव्हा ती तोफ गडावर मारा करू लागली. यामुळे गडाची सुरक्षा धोक्यात आली. हे पाहून शिवराय प्रचंड संतापले. विश्वासघातकी इंग्रजांना कायमची अद्दल घडवण्याचे तेंव्हा ठरवलंच. इंग्रज व्यापारी इथे व्यापार करण्यापुरते आलेले नाहीत हेच या प्रसंगातून दिसलं. त्यानंतर नेहमीच शिवरायांनी इंग्रजांना कठोर वागणूक दिली त्याचे मूळ या पन्हाळ्याच्या वेढ्यात होते..!
त्यातच पुण्यात पोचलेल्या मोगली सरदार शाहिस्तेखान याने थेट लालमहालात तळ ठोकला होता. सुमारे लाखभराची फौज घेऊन आता तो चाकणला भिडला होता. त्याचे सरदार इतरत्र स्वाऱ्या करत होते. अशावेळी राजांनी एका जागी अडकून पडणे जास्त धोकादायक होते. या सगळ्या परिस्थितीत आता निर्णायक काही करण्याची गरज निर्माण झाली.
निर्णायक परिस्थिती येते तेंव्हा जो वेगळा विचार करतो त्याचं नायकत्व इतिहासात ठसठशीतपणे अधोरेखित होतं. शिवराय त्यातलेच एक..!
शिवरायांनी वरकरणी निर्णय घेतला की सिद्दी जौहरला शरण जायचं. ती बातमी चहूकडे गडाखाली पसरेल याची निश्चिती केली. त्यानुसार पांढरे निशाण घेऊन वकील शत्रूच्या छावणीत वाटाघाटींसाठी पाठवला गेला.
आषाढसरी जोरदार बरसत असल्या तरी इंग्रजी महिन्यानुसार या जुलै महिन्यात रात्र मोठी असते. बऱ्यापैकी चंद्रप्रकाश असतो वातावरणात. त्यामुळे शत्रू सैन्यातील कमकुवत जागा हेरून तिथून पलायन करायचं हा अंतस्थ बेत पक्का केला गेला.
पश्चिम-नैऋत्यकडील पहारा तसा दोन चौक्यात अंतर राखून असलेला. कारण मसाई पठार व त्याखालील रान अशी अडचणीची भौगोलिक परिस्थिती. पळायचं शक्य झालं तर तिथूनच पळावे व विशाळगड किंवा रांगण्याकडे जावे अशी बातमी हेरांकडून कळलेली. रांगणा तसा दूर त्यामुळे इथून थेट विशाळगड गाठायला हवा हे नक्की ठरलं.
मात्र आजच्या पद्धतीनं सांगायचं तर हे अंतर सुमारे ५०-५५ किलोमीटर. त्यामुळे तेवढे अंतर झपाझप जाऊ शकतील अशी निवडक माणसे गोळा करायची आज्ञा झाली. काही महिन्यापूर्वी झालेल्या प्रतापगडच्या युद्धात बांदल-देशमुखांच्या तुकडीने मोठं काम केलेलं. बाजीप्रभू देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली ती तुकडी गडावर सज्ज होतीच. मग ती ६-७०० लोकांची तुकडी शिवरायांसोबत जाईल व उर्वरित ५-६००० मंडळी गड लढवत राहतील हेही निश्चित झाले.
चाणक्य त्याच्या लेखनात म्हणतो की हातघाईच्या प्रसंगी राजाने आपली प्रतिरूपे चतुराईने वापरावीत. प्रसंगी वेशपालट करावा. या प्रसंगी नेमकं शिवाजीराजे तेच करताना आढळतात. खरंतर अफझल प्रसंगी सुद्धा असा सल्ला मिळालेला. पण ते शक्य नव्हतं.
याप्रसंगी खरा सलाम करायला हवा तो शिवा काशीद यांना..! 


आपण नक्की मारले जाणार हे माहित असूनही शिवा काशीद यांनी प्रति-शिवाजी बनायचं कबूल केलं. ते शिवरायांच्या सपोर्ट सर्विसेस मध्ये होते. राजासोबत त्यांची आन्हिके सांभाळणारे, कपडे सांभाळणारे, निरोपांची देवाण घेवाण करणारे असे जे काही विश्वासू कर्मचारी असतात त्यातीलच हे शिवा काशीद. 

मात्र त्यांनी सिद्दीच्या छावणीत विटा हे शस्त्र चालवले असे काही वाटत नाही. त्यांचा तोंडवळा शिवरायांसारखा होता हे एक कारण, व राजांसोबत राहिल्याने हावभाव, वर्तणूक यांची तोंडओळख होती म्हणून बहुदा त्यांची निवड केली गेली.
त्यांना एक गोष्ट स्पष्ट सांगितली गेली असावी, “की जेवढा वेळ घालवता येईल तितका घालवावा” म्हणजे त्या वेळात राजे जरा दूर पोचतील.

त्या दिवशी राजे पालखीतून गेले असं सर्वजण म्हणतात. पण या वाटेवरून काही वेळा चालून आल्यानंतर ते तितकसे योग्य नसावे असेच मला वाटते. ज्या वाटेवर पावसात, चिखलातून, ओढ्यातून नुसते चालणे आजदेखील जरा कठीण जाते तिथं पालखीतून जाणे जास्त जिकीरीचे व वेळकाढू आहे. त्यामुळे “राजे पालखीतून पळताहेत” हे सिद्ध व्हावे म्हणून शिवा काशीद नक्कीच ५०-६० माणसांसह पालखीतून मलकापूर मार्गे निघालेत. मात्र बाजीप्रभू व शिवरायांनी बहुदा वेष बदलून सामान्य मावळ्यांच्या वेषात आतल्या वाटेने पलायन केले असावे हे माझे मत.


राजे ज्या दिंडीतून बाहेर पडले तिथून खालपर्यंत आजदेखील झाडी आहे. त्यामुळे साधारण म्हाळुंगे मार्गे मसाई पठार गाठेपर्यंतच्या पुढच्या तासाभरात शत्रूला तसे काही कळणे कठीण होते.
तसेच जी तुकडी मलकापूर मार्गे जाणार, त्यांना त्या मार्गाजवळ असलेल्या शत्रूच्या चौकीतून अडवणूक होणार हे निश्चित होतं. त्याप्रमाणे झाली. व “शिवाजी पळून जात होता, आम्ही पकडला” ही बातमी त्वरीत छावणीभर झालीच.
 “आपल्या रणनीतीला यश आले, प्रत्यक्ष शिवाजी ताब्यात म्हणजे त्याचे अवघे राज्य ताब्यात” या भावनेत तो कदाचित १-२ दिवसासाठी निश्चिंत झाला असावा व त्यात ही बातमी..! सिद्दी जौहरची तर झोपच उडाली.
मात्र बातमी काळातच सर्व पहारे कठोरपणे तपासण्याचे फर्मान सुटले. म्हणजे पहारे असतील त्याच्या चौफेर १-२ मैलाचा प्रदेश बारकाईने पाहायचा असतो. ही तपासणी सुरु होईपर्यंत राजनसोबत असणारी ५-६०० जणांची तुकडी मसाई पठारावर पोचली असावी.
इकडे छावणीत सिद्दी सोबत फाझलखान, बाजी घोरपडे आदि शिवरायांना ओळखणाऱ्या सरदारांसोबत अन्य सैनिकही होतेच. त्यामुळे पकडला गेलेला माणूस शिवाजी नाही हे अल्पावधीत त्यांच्या लक्षात आले. शिवा काशीद व सोबत जे सैनिक होते ते धारातीर्थी पडले. या बलिदानाचे मोल अपार आहे...!
मात्र मरण्यापूर्वी बहुदा त्यातील कुणी सांगितले असावे की शिवराय वेगळ्या तुकडीसह विशाळगड कडे निघून गेलेत.
मग सिद्दी जौहर ने आपला कर्तबगार जावई सिद्दी मसूद याला २-२५०० च्या फौजेनिशी ताबडतोब पाठलागावर जायचा आदेश दिला. त्यात मुख्यत्वे हजारभर घोडदळ व उर्वरित पायदळ असावे.
सिद्दी मसूद मलकापूरच्या नेहमीच्या मार्गे निघाला.

दरम्यानच्या कालावधीत राजे व सोबत असणारे बांदल-तुकडीचे प्रमुख बाजीप्रभू देशपांडे मसाई पठार उतरून कुंभारवाडा, चापेवाडी, मांदलाईवाडी, करपेवाडी, आंबेवाडी, कळकवाडी, पाटेवाडी मार्गे विशाळगड कडे धावत होते. या मार्गे आज बहुसंख्य ट्रेक-मोहिमा दोन दिवसात अंतर पूर्ण करतात. तर काही अधिक तरबेज ट्रेकर्स हे अंतर एक दिवस किंवा एका रात्रीतही कापतात. त्यामुळे अधिक वेगाने हे सैन्य चालत-धावत गेले हे पटण्यासारखे आहे.



या वाटेवर आजदेखील फार कमी वस्ती आहे. तसेच एका बाजूला उंचावर मसाईचे पठार व पुढील डोंगर रांग आहे. तसंच परिसरातील झाडी अधिक भौगोलिक संरक्षण देते. त्यामुळे तरी रात्री १०-११ नंतर साधारण पाटेवाडी पर्यंत सुमारे ६ - ७ तास राजांच्या तुकडीने निर्धास्त वाटचाल केली असावी.

मग घोडदळ घेऊन येणाऱ्या सिद्दी मसूद च्या सैन्याची दूरवर चाहूल लागली असावी. किंवा त्याच्या सैन्याची ही घोडदळाची तुकडी शिरोळे –मालेवाडी या मार्गाने राजांच्या पाठलागावर पुढे आली असावी. राजांची तुकडी जी धावत होती, त्या मार्गावर राजांचे खबरे आधीच पोचले असावेत. त्यांनी मार्ग निर्धोक असल्याचं सांगितल्यावर तुकडी पुढे जात असावी. पाटेवाडी दरम्यान खबर पक्की झाली की शत्रूसैन्याची मोठी तुकडी मागावर आहे. मलकापूर कडून मुख्य मार्ग पाटेवाडी ते पांढरपाणी या दरम्यान या मार्गाला मिळतो. तेथे या तुकडीसोबत मुकाबला होईल. त्यामुळे होणारी निर्णायक लढाई पांढरपाणी ते गजापूर या पट्ट्यात होणार हे चित्र स्पष्ट झाले.

तिथे जी खलबतं झाली त्याविषयी इतिहास फारसे काही बोलत नाही. तो इतकंच सांगतो की, “बाजीप्रभू व फुलाजी प्रभू राजांना म्हणाले, “निम्मी तुकडी घेऊन विशाळगडला निघावं. तोपर्यंत पुढचे काही तास आम्ही शत्रूला या परिसरात रोखतो. विशाळगडी पोचताच इशाऱ्याची तोफ करावी  मग आम्ही त्वरेने तिकडे पोचू. काही अधिक उणे झालेच, साहेबकामी खस्त झालो तर सरकारातून कुटुंबाची जबाबदारी घेतली जाईल याचा भरवसा वाटतो. राजांनी अधिक वेळ न घालवता त्वरीत पुढे जावे.” यावर शिवराय म्हणाले, ” उत्तम. आम्ही गडावर पोचताच इशाऱ्याची तोफ डागतो. तुम्ही आपला जीव सांभाळून यावे.”

इथून विशाळगड गाठायला सुमारे ३ तास लागतात. त्यामुळे ३-४  तास शत्रू सैन्य रोखून धरणे मराठ्यांच्या तुकडीला तसे शक्य होतेच.
एव्हाना शत्रूच्या तुकड्या तिथे पोचल्या. हा सर्व भाग लहान-मोठ्या टेकड्यांनी, ओढे-ओघळीनी भरलेला आहे. त्याचा साहजिकच मावळी सैन्याला फायदा मिळाला व घोडदळाला फार काही करता येईना. त्यांना माघार घ्यावी लागली. यात किमान २ तास गेले असावेत. मावळी सैन्य सुद्धा कराराने लढले. मग बहुदा सैन्यानं घोडे बाजूला केले असावेत किंवा तोपर्यंत पायदळाचे सैन्य तिथवर पोचले असावे.
पायदळाचे सैन्य पोचताच गनिमाची ताकद वाढली व मराठ्यांना कडवा प्रतिकार होऊ लागला. बाजीप्रभूंची ही तुकडी हळूहळू नेहमीच्या पद्धतीने माघार घेत हल्ले करत होती. हे सगळे युध्द त्या एवढ्याश्या खिंडीत झाले नाही हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे. तो सगळा ६-८ किमीचा जो पट्टा आहे त्या पट्ट्यात हे युध्द झाले.
टप्प्याटप्प्याने मावळी सैन्य मागे रेटले जात होते. प्रत्येक मावळा जीवाची शर्थ करत होता. मारण्यापूर्वी गनीमाच्या किमान २-५ जणांना लोळवत होता. अत्यंत विजोड परिस्थितीत सर्वांनी रणकंदन माजवले होते कारण त्यांच्या लाडक्या राजांचा जीव वाचवायचा होता...!!
ज्या राज्यासाठी कोणत्याही अमिषाशिवाय लोकं स्वतः प्राणाहुती देतात तो राजा, ते राज्य व ती माणसे खरंच महान..!
आता मागच्या ३-४ तासातले युध्द अंतिम टप्प्यात आलेलं. हा टप्पा म्हणजे आता जो कासारी नदीचा धबधबा दाखवला जातो त्याच्या वरचा, त्या लहान दरीतला भाग. इथे वर हल्ली लहानसा बंधारा बांधलाय. याच दरीत मग शेवटचे घणाघाती युध्द झालं. ही दरीतील खिंड चढून वर गेलं की विशाळगड पर्यंत वेगाने जाता येतं. म्हणून इथेच मावळे शत्रूच्या वाटेवर उभे होते.
बाजीप्रभूंच्या सह अनेक जण घायाळ झालेले. मात्र लक्ष विशाळगडच्या संदेशाकडे होतं. तिथं काय चाललंय, राजांना पोचायला उशीर का झालाय याची त्यांना कल्पना नव्हती.
शेवटी अचानक तोफेचा आवाज वर डोंगरमाथ्यावर उभ्या, टेहळणी करणाऱ्या मावळ्यांनी ऐकला. इतरांनी मग पुढचे तोफेचे बार ऐकले. जखमेने भरलेलं शरीर थकले असले तरी इच्छाशक्तीच्या जोरावर लढणाऱ्या बाजींच्या तोंडचे शेवटचे शब्द होते, “ गनिमास खिंड चढो दिल्ही नाही...राजे मुजरा...”


सुमारे २५० मावळे व ७-८०० चं शत्रुसैन्य या युद्धात धारातीर्थी पडले असं काहीसं वाचलंय. म्हणजे प्रत्येक मावळ्याने मारण्यापूर्वी शत्रूच्या किमान तीन सैनिकांना कंठस्नान घातले होते..!
मग उरलेल्या मावळ्यांनी सहकार्यांची प्रेतं ताब्यात घेऊन रणक्षेत्रातून माघार घेतली. ते आडवाटेने जंगलात पळाले.
सिद्दी मसूद मग विशाळगडच्या वाटेला लागला.
या ५-६ तासात विशाळगडला दुसरं नाट्य घडलेलं. तिथे शिवराय पोचले सुमारे ३ तासात. तिथे आधीच सुर्वे व दळवी या आदिलशाहीला सामील झालेल्या कोकणातील सरदारांनी सिद्दी जौहर च्या सूचनेनुसार विशाळगड जिंकण्यासाठी कित्येक दिवस आधीच मोर्चे लावले होते. मात्र गडावर असलेल्या मोठ्या शिबंदीने त्यांना चोख उत्तर दिलेले.
आता प्रत्यक्ष शिवराय तिथे पोचले हे दिसताच गडावरचे सैन्य उत्साहाने तुटून पडले. मग तासाभरात त्या वेढ्याला उधळून लावत शिवराय गडात प्रवेशले... धावत गड चढणाऱ्या राजांनी पहिला आदेश दिला, “ तोफांचे बार करा..”
विशाळगडवर ती संध्याकाळ दोन मिश्र भावनांचा कल्लोळ घेऊन आली. राजे सुखरूप सुटले हे वर्तमान सर्वत्र आनंदाची लहर घेऊन पसरलं तर बांदलांच्या तुकडीने केलेल्या बलिदानाने सर्वांचे डोळे ओलावले. रात्री गडावर सर्वांचे मृतदेह आले. त्यावर इतमामात अंत्यसंस्कार केले गेले. त्यावेळी राजांच्या मनात काय आले असेल हे इतिहासालाच ठाऊक..!
तिथवर पाठलाग करत आलेल्या सिद्दी मसूदच्या सैन्याने आता विशाळगडला वेढा दिला. पण आता वेळ गेली होती. तो वेढा घट्ट आवळण्यापूर्वीच मावळ्यांनी जोरदार हल्ले केले. मग सिद्दी जौहरने ते सैन्य माघारी बोलावले.
स्वराज्याचं एक ग्रहण सुटलं...!
मग कोकणात उतरून राजे त्वरेने राजगड कडे निघून गेले. शाहिस्तेखानच्या पारीपत्याच्या तयारीसाठी..!
------------------------------------------
यावेळी एक वेगळी गोष्ट राजगडच्या सदरेवर घडली.
एकदिवस राजे कान्होजी जेध्याना म्हणाले, “ नाईक, तुम्ही रागावणार नसाल तर एक विचारू का?”
जेधे म्हणाले, “ राजे विचारता काय, आज्ञा करा. तुम्ही सांगावं व आम्ही ऐकावं...”
राजे म्हणाले, “ बांदलांची एक पिढी या झुजात खस्त झाली. बांदलांच्या तुकडीने शर्थ केली.. मानाचे पहिले पान त्यांना द्यावं असं मनात आहे. तुमची हरकत नसेल तर देऊया का..?”
कान्होजी जेधे नाईक खरेच दिलदार..! जेंव्हा लहानमोठ्या मानपानासाठी तत्कालीन सरदार एकमेकांचे जीव घेत, तेंव्हा नाईकांनी क्षणार्धात आपल्या कमरेची ती मानाची तलवार काढली व राजांच्या हाती ठेवली..! भारावलेल्या राजांनी कान्होजीना गळामिठीत घेतलं. कान्होजींसाठी ती मिठीच लाखमोलाची होती..!! शेकडो मानाच्या तलवारी ओवाळून टाकाव्यात अशी..!
राजांनी मग बाजीप्रभू व अन्य लोकांच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यांची वास्तपुस्त केली. त्यांच्या चरितार्थाची सोय केली. अफझलखान मोहिमेसाठी बाहेर पडलेले राजे स्वतःही सुमारे ८-९ महिन्याने राजगडी परतले होते.
या ८-९ महिन्यात जिवावरची दोन धाडसे करून त्यांनी स्वराज्य विस्तारले होते. सह्याद्रीच्या कडेकपारीतील या लहानशा राज्याचे नाव आता दूर दूर अरबस्तानापर्यंत, युरोपपर्यंत पोचले होते..!
एकावेळी दोन शत्रू अंगावर घेण्यात शहाणपण नसते. हे ठाऊक असल्याने आदिलशहासोबत तह केला गेला.
प्रसंगानुरूप युद्धनीती कशी बदलावी लागते याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही तीन युद्धे. तसेच आदिलशाहीसोबत केलेला तह हे उत्तम मुत्सद्दीपणा दर्शवते.
------------------------
आज या परिसरात दरवर्षी हौशी भटके, ट्रेकर्स व इतिहासप्रेमी येत असतात. मात्र हा उत्साह एक-दोन महिन्यापर्यंत असतो. काही संस्था या दुर्गम भागात वाडी-वस्त्यांवरील माणसांसाठी कार्यरत आहेत. त्यांना अधिकाधिक मदत मिळायला हवी. या परिसरात पाणी, आरोग्य, प्राथमिक शिक्षण, आपत्कालीन व्यवस्था, प्रातर्विधी आदि मुलभूत गरजांसाठीच्या सोयी करायला हव्यात. ज्याचा स्थानिक ग्रामास्थानाही लाभ मिळू शकेल. आज विविध शहरीकरण, चंगळवाद, रिसोर्ट संस्कृती इथेही रुजायला सुरुवात झालीय. त्यामुळे हा परिसर मद्यपींचा अड्डा बनू नये यासाठी समाज व शासन पातळीवरील प्रयत्नांची गरज आहे.


या परिसरात पर्यटनास व त्यानुसार रोजगाराच्या संधींसाठी उत्तम वाव आहे मात्र ही रणभूमी, धारातीर्थ आहे याचा विसर पडता कामा नये.
दुर्दैवाने आता सर्वत्र गड-किल्ल्यांची, अन्य पर्यटनस्थळे यांची जी अवस्था आहे ती होता कामा नये.
जागच्या इतिहासात पावनखिंड प्रकरणासारखी युद्धे क्वचित घडली व जिथे घडली तिथे उत्तम स्मारके, तत्कालीन परिस्थितीनुसार बनवलेली पर्यटनस्थळे आहेत. त्याच धर्तीवर इथे काही घडावे अन्यथा काहीही न केलेले जास्त उत्तम. किमान ते निसर्ग सौंदर्य तरी डागाळता कामा नये असे वाटते.
-         -  सुधांशु नाईक, कोल्हापूर. ( +९१ ९८३३२९९७९१, ईमेल – nsudha19@gmail.com)

(आपल्या परिसरात ऐतिहासिक शिवाकालासंबंधी व्याख्याने आयोजित करून याबाबत अधिकाधिक जागृती करावी ही वाचकांना विनंती.)

Wednesday, 25 May 2016

कोकण आणि शिवाजी महाराज

शिवाजी महाराजांचा “राजकीय कारकिर्दीतील आवडता प्रांत कोणता ?” असं जर कुणी विचारले तर निःसंशय मी उत्तर देईन की कोकण प्रांत हा शिवरायांच्या अत्यंत आवडीचा विषय होता.
शिवरायांची उपलब्ध पत्रे, पंत अमात्यांचे आज्ञापत्र, अन्य चरित्रविषयक साधने याचे वाचन करताना मला तरी असेच जाणवले. का बरे त्यांना या कोकणभूमीचे इतके महत्व वाटले असेल? हे माझ्या परीने मांडायचा केलेला हा प्रयत्न.



….. तोरणा व मुरुंबदेवाचा डोंगर शिवबा राजेंच्या ताब्यात आल्यानंतरचे ते दिवस. सळसळते युवा शिवबा तोरण्यावर उभे होते. समोर स्वच्छ आकाशातून पश्चिमेचा भाग पाहताना अचानक त्यांच्या नजरेला दूर डोंगराआडून हळूच खुणावणारा एक सुळका दिसला. राजांनी शेजारच्या दोस्ताला विचारलं त्याविषयी.
तो म्हणाला, “शिवबाराजे, अहो त्यो तर लिंगोबा किंवा लिंगाण्याचा परबत...लई मोठं गचपण हाय तिथं, कोकनात उतरणाऱ्या २-३ वाटा हैत की त्या बेचक्यात...”
कोकण म्हणताच राजांचे डोळे चमकले. निसर्गाचं ते कवतिक पाहायला उतावीळ झाले. त्यांचे कशातच लक्ष लागेना.

काही वेळात त्या अडचणीच्या डोंगर दऱ्यामधून २५-३० जणांची तुकडी सुसाट दौडत ते कवतिक पाहायला गेलीसुद्धा. झाडी-झुडपं, अजस्त्र वेली, कमरेइतक्या गवतातून वाट काढत अचानक सगळे कड्याच्या टोकावर येऊन थांबले. सरळ सुमारे २५०० फूट तुटलेल्या त्या कड्याच्या पायथ्याशी किर्र जंगल होतं. तर अगदी पट्कन उडी मारायचा मोह व्हावा अशा समोरच्या खाईपलीकडे तो लिंगाणा जमिनीपासून निघून आकाशापर्यंत उंचावला होता. निसर्गाचे ते भव्य कवतिक पाहताना राजांचे भान हरपले.

किती भव्य ते दृश्य..! सभोवती पसरलेल्या सह्याद्रीच्या अजस्त्र डोंगर रांगा, त्यातून माथे उंचावलेली शिखरं, डोंगरातून फुफाटत वाहणाऱ्या ओढे-नाल्यांनी बनवलेल्या घळी, कड्यांच्या पोटातून उतरणाऱ्या इवल्याश्या वाटा, दूर तळातून वाहणाऱ्या नद्यांची पात्रे, स्तिमित होऊन शिवबा ते सारं पाहत राहिले....!

पहिल्या प्रथम त्यांच्या मनात विचार आला की क्षितिजावरील त्या दूर डोंगरांपलीकडे असलेल्या समुद्रापर्यंत कोकणातलं हे सारं आपल्या स्वराज्यात कायमस्वरूपी हवं. मग कितीही मोठ्या शत्रूला सहज अंगावर घेऊ शकतो आपण...”


कोकणपट्टी. हा तसं पाहिलं तर एक अडचणीचा चिंचोळा पट्टा. सह्याद्रीच्या अक्राळ विक्राळ डोंगररांगेच्या माथ्यापासून ते समुद्रापर्यंत सुमारे ४० किलोमीटर रुंदीचा हा पट्टा. थेट डहाणू तलासरी पासून गोव्यापर्यंतचा. त्यातूनच लहान मोठे डोंगर अधे मध्ये उभे. मात्र या सगळ्या पट्ट्यात सह्याद्री अफाट वेगळेपण देऊन जातो. उंच पर्वत रांगांमुळे इथे दरवर्षी सुमारे ३-४००० मिलिमीटर पाऊस पडतो. त्यातच फोफावलेली सदाहरित व पानगळीची जंगले. साधारण वर्षाचे ८-१० महिने वाहणाऱ्या नद्या, बारमाही भरलेल्या खाड्या, मोक्याच्या ठिकाणी बंदरे, तिथून सुरु असलेला देशो-देशीचा व्यापार, आल्या परिस्थितीशी धीराने सामना करणारी मेहनती लोकं. नारळ, पोफळी, आंबा, काजू, मीठ, भात, नाचणी, वरी अशा उपयुक्त व किंमत मिळवून देणाऱ्या गोष्टींची निर्मिती करणारा हा कोकण प्रांत.
म्हणूनच तर कोकण प्रांताला एके ठिकाणी शिवराय “नवनिधी” असेही म्हणून जातात..!

हा कोकण प्रांत शिवरायांच्या गरुडासारख्या नजरेतून सुटला असता तरच ते नवल होतं. वयाच्या १४-१५ व्या वर्षी राजांच्या खटाटोपाला सुरुवात झाली. रोहिडा, तोरणा, राजगड उभे राहू लागले स्वराज्यासाठी. मगाशी सुरुवातीला माझ्या कल्पनेतला प्रसंग सांगितला तसं कदाचित कधीतरी शिवबा त्या “रायलिंगच्या पठारावर” नक्कीच उभे राहिले असतील. समोरच्या दरीतून उंचावलेला लिंगाणा सुळका, पल्याडचा रायरी, त्यापलीकडचे कोकणदिव्यासारखे डोंगर-सुळके, त्यातल्या अनघड वाटा, व या साऱ्यांचे रक्षण लाभलेला तो कोकणी प्रांत. आजही आपण भारावून तो नजारा पाहतो, तर राजांची अवस्था काय त्याहून वेगळी असणार?


सुरुवातीच्या काळातील हे काही किल्ले घेतल्यानंतर लगेचच उत्तर व मध्य कोकण ताब्यात घ्यायला राजे साधारण एकाच वेळी आतुरलेले दिसतात.
म्हणूनच जरा काही सैन्य व रसद हाताशी तयार झाल्या-झाल्या राजांनी मोहिमा उघडल्या त्या जावळीच्या खोऱ्यात व कल्याण-भिवंडीकडे. हे काही सोपं होते का? तर मुळीच नाही. जावळीचे खोरे हे वाई प्रांताला लागून. वाई प्रांत धिप्पाड व बलदंड अफझलखान याची सुभेदारी. जावळीतील चंद्रराव मोरे यांच्या माघारी ते खोरं जणू आपलंच असा त्याचा जणू ठाम समज. तर कल्याण-भिवंडी ते जुन्नर हा सगळा व्यापारी दृष्ट्या मोलाचा वव मोक्याचा प्रांत थेट युवराज औरंगजेब याच्या ताब्यात.
शिवारायांशिवाय दुसरा कुणी असता तर त्याने हे धाडस कदापि केले नसते. राजानी मात्र धडाक्यात जावळीवर आक्रमण केले आणि कल्याण भिवंडीवर सुद्धा. १६५०-१६५९ या काळात अवघ्या पंचविशीत असलेला हा कोवळा युवक सोबत्यांच्या साथीने किती जीवावरचे धाडस करत होता याची कल्पनासुद्धा थरार निर्माण करते. ज्या दोघांची कीर्ती संपूर्ण हिंदुस्तानभर पसरलीय त्यांना थेट ललकारून शिवराय स्वराज्य वाढवू लागले ते कोकणात..!
“एका लहान चिंचोळ्या अवघड किनारपट्टी प्रांतासाठी किती का अट्टाहास ? कशाला त्या कोकणाकडे एवढे लक्ष द्यायला हवे?” असं नक्कीच त्यांना काही थोरामोठ्यांनी सुनावले असेलच (जसं आपल्या राज्यकर्त्यांनी १९४७ ते १९९० पर्यत कोकणाकडे दुर्लक्षच केले होते तसेच..!)
मात्र त्या कोवळ्या युवकाचे, त्याच्या मार्गदर्शक व सोबती मंडळींचे नियोजन पक्के होते.
जावळीचे खोरे जिंकताच तिथले पूर्वीपासूनचे किल्ले हाती लागले. रायरी, चंद्रगड, मंगळगड इ.  सभोवतीचा परिसर हातात येताच स्वराज्याची सीमा सागराच्या जवळ पोचली. अफझलखानाची आदिलशाही, मोगल यांच्यासोबत राजांना नवा व ताज्या दमाचा शत्रू लाभला- सिद्दी..! इंग्रज, पोर्तुगीज इ. मंडळी कुरबुर करायला होतीच.
वयाच्या पंचविशीत जिथे आज अनेक मुलांना राज्यातील गावेसुद्धा माहित नसतात तिथे हा युवक दुसऱ्या प्रांताला आपल्या राज्यात सामील करायला उतावीळ झाला होता..!

तसंच नुसतं नवे प्रांत जिंकून आपण मोठे होत नाही याचे भान शिवरायांना व त्यांच्या टीमला होतेच. नवा प्रांत हाती येताच त्याच्या सुरक्षेसाठी प्रतापगडची उभारणी सुरु झाली. संपूर्ण पट्ट्यात रहदारीचे व माल-वाहतुकीचे १५-२० मुख्य घाट व इतर काही कमी वापरातील घाट-वाटा होत्या. त्याच्या रक्षणासाठी काही पूर्वीचे किल्ले होतेच. त्यांची डागडुजी व नव्या किल्ल्यांची निर्मिती सुरु झाली. कल्याण पासून रत्नागिरी राजापूर पर्यंतचा प्रांत ताब्यात यावा, व आल्यानंतर हातातून कधीच निसटू नये यासाठी अथक परिश्रम सुरु झाले. अलिबाग, चौल या पट्ट्यापासून ते विजयदुर्ग बंदरापर्यंत विविध बंदरांच्या रक्षणासाठी फौजा धाऊ लागल्या.
मात्र या पट्ट्यात दुहेरी युद्ध करावे लागणार होते. डोंगरी युद्धात मावळे तरबेज होतेच पण त्यांना मर्यादा पडत समुद्राच्या / खाडीच्या.
सिद्दीसारखा शत्रू हा पराभव समोर दिसताच पट्कन खाड्या-समुद्रातून पलायन करे व मावळ्यांना हात चोळत मागे फिरावे लागे. पुन्हा त्याने अचानक हल्ला करताच पुन्हा गडबडीने धावून जावे लागे. सुरुवातीच्या काही संघर्षातून मग महाराजांना क्रांतिकारी कल्पना सुचली. ती म्हणजे आपलं आरमार, नौदल असावं याची.!

काही जण हल्ली सांगतात की भारतातील पहिले आरमार हे शिवाजी महाराजांचे. ते तितके खरे नव्हे. राजांच्या पूर्वी सातवाहन, गुप्त, विजयनगर, कदंब, चालुक्य, पुलकेशी, तामिळनाडू प्रांतातील चोला व पांड्य आदि राजवटींच्या काळात आपल्याकडे उत्तम नौकानयन होते. म्हणूनच तर भारतीय लोक प्राचीन काळी थायलंड, कंबोडिया, मलेशिया आदि प्रांतात गेले होते. मात्र १२९६ पासून उत्तरेतून मुस्लीम आक्रमक भारतावर ज्या क्रूरपणे तुटून पडले त्यानंतर त्याच्यासमोर सर्व काही थंड होऊन गेलं. बहामनी सुलतान, मोगल, बहामनी राजवटीतून निर्माण झालेल्या आदिलशाही, निजामशाही सारख्या राजवटीनी मग सागरी बंदरांवर सुद्धा आपले वर्चस्व निर्माण केले. दाभोळ बंदर तर आदिलशाहीचे खास बंदर. व्यापाराबरोबर हाज यात्रेसाठी सुद्धा मंडळी इथूनच रवाना होत असायची.
या सगळ्यांनी मग स्थानिक कोकणी जनतेला फार फार लुबाडून घेतलं. त्यांचं पीक उध्वस्त करायचं. असेल ते सारं लुटून न्यायचं. १०-१२ वर्षापासूनच्या सर्वाना गुलाम म्हणून राबवायचं, स्त्रियांवर दिसेल तिथं अत्याचार करायचे यात अवघी कोकणपट्टी भरडून निघत होती. आपल्याच हक्काच्या जागेत गुलामगिरीचे जिणे त्यांच्या नशिबी आले होते.

हे सारं बदलायला सुरुवात केली शिवाजी राजांनी. वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी स्वतः स्वराज्याचे नौदल / आरमार उभं करायला सुरुवात केली ती कल्याणच्या बंदरात. उल्हास नदीकिनारी असलेले कल्याण व पनवेल पर्यंतचा प्रांत स्वराज्यात नुकताच आला होता. पनवेलच्या मागे उभा असलेला बलदंड मुरंजन दुर्ग “प्रबळगड” म्हणून स्वराज्यात दाखल करून घेतला गेला. त्याचे लहान मोठे जोडीदारही पाठोपाठ स्वराज्यात आले. बोर घाटातली श्रीवर्धन- मनरंजनची दुर्गजोडी स्वराज्यात आली. त्यांच्यासोबत अन्य गडकोटही ह्या नव्या उपद्व्यापाला संरक्षण पुरवू लागले. पोर्तुगीज मंडळी आधीच राजांच्या घोड्दौडीने धसकून गेलेली. त्यांची योग्य ती नाकेबंदी झाल्यामुळे त्यांनी मुकाट्याने मग काही नाव बांधणारे तंत्रज्ञ शिवरायांना दिले.

नौदलाच्या ताफ्यात नव्या नव्या नौका, गलबते, शस्त्र सामग्री सामील करून घेण्याचा उद्योग मग अखंड चालूच राहिला. नौदलाच्या मजबुतीसाठी किनाऱ्यावर नवे जलदुर्ग विकसित होऊ लागले.

अफझलखान, सिद्दी जौहर, शाहिस्तेखान यांच्यासह अन्य सरदारांच्या स्वाऱ्या झाल्या तरी कोकणातील उद्योंगात कधी खंड पडला नाही. राजांनी कधीच तिकडे दुर्लक्ष केले नाही.

सिंधुसागरातील मुरूडच्या किनाऱ्यावर दिमाखात उभ्या असलेल्या “जंजिरे मेहरूब” ने शिवरायांना सतत सतर्क ठेवलं. स्वतःच्या व अन्य सेनानीच्या मोहिमातून जलदुर्ग जिंकून तिथल्या सिद्दीला कायमचं पराभूत करणे शक्य होईना म्हटल्यावर शिवरायांनी नवी खेळी केली. त्या परिसरात कित्येक गड-जलदुर्गांची साखळी तयार करून त्याची कोंडी केली. ज्या सागरी किनाऱ्यावर पूर्वी मराठी नौकांना पोर्तुगीज परवाना लागत असे, तिथे १०-१५ वर्षात मराठी झेंडा असलेली गलबते तोऱ्यात संचार करू लागली. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, रत्नदुर्ग, पद्मदुर्ग, खांदेरी, गोपाळगड, हिंमतगड अशा बलदंड दुर्गानी खाड्या, सागरकिनारे संरक्षित केले. मग प्रसंगी मराठी आरमाराने  सिद्दी, इंग्रज व पोर्तुगीज यांनाही आपल्या अंकुशाखाली ठेवले. संपूर्ण व्यापार आपल्या ताब्यात घेतला.

कोकणच्या सुरक्षेचे काम समाधानकारक झाल्यावर इतर प्रांतासारखेच शिवरायांनी महसूल गोळा करण्याला महत्व दिले. लोकांच्या जीवनाचा अभ्यास केला. कोकणातील कित्येक गावात जमिनी पाडून होत्या. त्या कसायला कुणी तयार नव्हते. त्या जमिनी मेहनती शेतकऱ्यांना दिल्या. सारा वसुली वस्तू-रूपाने सुरु केली. कोकणात ज्या नारळ-सुपारीला जास्त भाव मिळत नाही, ती येथे खरेदी करून घाटावर चढ्या दराने विक्री करायचे धोरण अवलंबले. यामुळे शेतकऱ्यांना मोबदलाही मिळू लागला व अधिक दराने विक्री केल्याने नफा होऊ लागला.
वाटेतील रस्ते, घाट याठिकाणी चौक्या लावून जकातीची व सुरक्षेची व्यवस्था केली.
नुसतं इतकंच करून स्वराज्याचे शिलेदार गप्प बसले नाहीत. एका कागदपत्रात तर अशी नोंद आहे की राजांनी तळकोकणात मोहिमेला जाताना आपला जुना साथीदार तानाजी मालुसरे यांना चिपळूण-संगमेश्वर परिसरातील रस्ते व घाट दुरुस्त करायचे, रुंद करायचेच काम दिले होते...!

राजांनी जी शेकडो पत्रं लिहिली त्यातील काहीच उपलब्ध आहेत. सुदैवाने कोकणातील घडामोडींबाबत त्यात जास्त पत्रे दिसतात. कुडाळच्या सुभेदाराला त्यांनी लिहिलेल्या एका पत्रात मिठाचा मामला समोर येतो. कोकणातील मीठ जास्त खपावे, बारदेशातील पोर्तुगीजांच्या प्रांतातील मिठापेक्षा आपले मीठ स्वस्त उपलब्ध व्हावे म्हणून राजे सुभेदाराला त्यांच्या मिठावर “चढ्या दराने जकात लावायचे आदेश” देतात. यामुळे साहजिकच आपले मीठ स्वस्त होऊन जाते.

राजांनी वापरलेली ही साधी व्यापारी नीती पुढच्या काळात आपल्या अन्य राज्यकर्त्यांना स्वातंत्र्यानंतर सुद्धा वापरावीशी वाटली नाही.

मिर्झा राजे जयसिंह यांची स्वारी, माघार घ्यावी लागल्याने झालेला तह यातून सुद्धा राजांनी कोकणातील जास्तीत जास्त प्रांत आपल्याकडेच कसा राहील यासाठी मुत्सद्दीपण पणाला लावलेले दिसते. त्यावेळची धामधूम, नंतर आग्र्याची नजरकैद या सगळ्यातून सुद्धा राजांच्या माघारी जिजाबाईसाहेब सर्व कोकणावर लक्ष ठेवून असल्याचे दिसते. राजांचे याच काळातले एक पत्र सिंधुदुर्गची उभारणी होत असतानाचे आहे. त्यात बांधकामाविषयीच्या बारीक बारीक सूचना देताना म्हटलं आहे की, “ चुन्यात, वाळूत भेसळ होणार नाही याची दक्षता घ्या. वाळू धुऊन घ्या. इंग्रजांशी व्यापार करताना सावध राहा. मजुरांना पुरेशी मजुरी द्या.”


तसंच एक पत्र आहे शिवरायांच्या शेवटच्या ५ वर्षाच्या काळातलं. मुरुड-जंजिरा ताब्यात येत नाही हे दिसल्यावर समोर समुद्रातील खडकावर पद्मदुर्गचे बांधकाम सुरु झालेलं तेंव्हा. त्यासाठी सैनिकी सुरक्षा तर मिळाली पण त्या तुकडीला रसद पुरवठा करणाऱ्या प्रभावळीच्या जिवाजी सुभेदाराने ढिलाई दाखवली. त्याला लिहिलेले कडक पत्र उपलब्ध आहे.
एकूण पत्राचा सूर पहाता तो बहुदा शत्रूला सामील होण्याच्या स्थितीत असावा असे वाटते. राजे लिहितात त्यातील काही ओळी अशा आहेत, “पद्मदुर्ग वसवून राजपुरीच्या उरावरी दुसरी राजपुरी उभी केली आहे. त्याची मदत व्हावी, पाणी, फाटी आदिकरून सामान बेगीने पावावे ते नाही. पद्मदुर्गी तेथे हबशी फौजा चौफेर जेर करत असतील, आणि तुम्ही आरमारास मदत न खोळंबा करा. एवढी हरामखोरी तुम्ही कराल त्यावर साहेब रिझतील काय? ऐशा चाकरास ठीकठाक केले पाहिजे. ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो? मोरोपन्तांचे पोटास पावोन आरमार घेऊन पद्मादुर्गाचे मदतीस राहणे. याउपरी बोभाटा जालीयावर तुमचा मुलाहिजा करणार नाही...”

या पत्राप्रमाणेच दुसरे पत्र आहे कोकणातील चिपळूणजवळ दळवटणे गावात असलेल्या सैन्य-छावणीच्या प्रमुखाला लिहिलेले. येथे शिवरायांच्या सैन्याची मोठी छावणी असे. राज्याभिषेकापूर्वी या छावणीला दिलेली भेट कागदपत्रातून नोंदली आहे. तसेच तिथल्या प्रमुखाला लिहिलेलं पत्र खूप प्रसिद्ध झाले आहे. घोड्यांची वैरण, दाणा-पाणी, सैन्याची रसद याची काळजी कशी घ्यावी, आसपासच्या गावातील रयतेला जराही त्रास देऊ नये इ. सूचनांची जंत्रीच या पत्रात पाहायला मिळते.
किती बारकाईने स्वराज्याचे काम सुरु असे व त्यात कोकणातील राज्यकारण कसे प्राधान्याने येई याचे ठोस पुरावे म्हणजे ही पत्रे..!

कोकणावर राजांचे प्रेम होतेच पण विश्वास होता तिथल्या दुर्गमतेवर. म्हणूनच अडचणीच्या काळात सर्जेराव जेधे यांच्या सारख्या शिलेदाराला प्रसंगी “घाटाखाली कुटुंब कबिला शिफ्ट करून सुरक्षित ठेवण्याचे” आदेश देणारे शिवबा राजे अन्य एका पत्रात दिसतात.
चारी दिशांची सुरक्षा, व्यापार, दुर्गम घाटवाटा, जंगलं, काटक व अचाट सहनशक्ती लाभलेली माणसे यासोबत राजांना इथले अफाट निसर्गसौंदर्य भुरळ घाले. म्हणूनच एका कागदपत्रात राजे रायगडहून बाणकोट परीसरात समुद्रस्नानाला गेल्याचा मनोहारी उल्लेख आढळतो..!

पश्चिमेकडे जवळ असलेला समुद्र, परिसरातील दुर्गम डोंगर-रांगा, सरळ उठवलेला उंच कातळी पहाड, माथ्यावरील विस्त्रीर्ण पठार असे “स्पेसिफिकेशन” जेंव्हा राजधानीसाठी तयार होत होते तेंव्हा म्हणूनच जे दोन गड निवडले गेले ते सुधागड व रायगड कोकणातील होते हे मुद्दाम अधोरेखित करायला हवे.


स्वराज्य जसे विस्तारत गेले तसे राजे गोवा प्रांत ताब्यात आणायला आसुसलेले दिसतात. गोवा व मुंबई हस्तगत करायचे त्यांचे मनसुबे त्यांच्या हयातीत जरी पूर्ण झाले नाहीत तरी इंग्रज व पोर्तुगीज यांना त्यांनी जबरदस्त शह दिला. गोव्याच्या सीमा बंदिस्त करायला पारगड, महादेवगड, मनोहर- मनसंतोषगड, रांगणा, इ. गडकोटांची साखळी निर्माण केली. मुंबईचीही अशीच नाकेबंदी केली. त्यांच्या माघारी शाम्भूराजेनीही त्यांचे धोरण इतक्या कठोरपणे राबवले की पोर्तुगीज एका पत्रात म्हणून गेले की “शिवाजी राजांच्या पेक्षा संभाजी राजे जास्त भयंकर आहेत...!”
देशाच्या संरक्षणात सागरी किनारा सुरक्षित असावा हे आपल्या शिवरायांचे धोरण मात्र स्वातंत्र्योत्तर काळात विस्मृतीत गेले. विविध दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या काही वर्षात आता सरकार कोकणाकडे डोळे उघडून पाहायला सुरुवात करते आहे. त्यातही प्रदूषणाने इथल्या निसर्गाला अजून डागाळत आहे. मात्र शिवकालाचा जर योग्य अभ्यास केला गेला तर या कोकणाचा अजूनही “नवनिधी” म्हणून उपयोग होऊ शकतो हे नक्कीच समजू शकते.

स्वराज्याचा व शिवकालोत्तर स्वातंत्र्ययुद्धांचा इतिहास पाहिला तरी कोकणाने दिलेले योगदान नक्कीच लक्षात येते. बहुदा म्हणूनच ही स्वातंत्र्यप्रिय भूमी शिवरायांच्या मर्मबंधातली ठेव बनून गेली असावी. अखेरच्या दिवसात उभ्या हिंदुस्तानात स्वराज्य विस्तारायचे ध्येय बाळगताना, जालन्यापर्यंत घोडदौड करताना विश्रांतीसाठी राजे नेहमीच रायगड व किनाऱ्याच्या प्रदेशाला आठवत राहिले. जंजिरा, गोवा स्वराज्यात यावेत म्हणून धडपडत राहिले.


कोकणातून वर घाटावर चढत गेलेल्या प्राचीन नाणेघाटाच्या परिसरात शिवनेरीवर जन्मलेल्या या थोर राजाने शेवटी प्रिय अशा या कोकणातील दुर्गम व बलाढ्य अश्या रायगडावर शेवटचा श्वास घेतला हाही योगायोगच म्हणावा लागेल....! 

-         -  सुधांशु नाईक. ( +९१ ९८३३२९९७९१, ईमेल – nsudha19@gmail.com)