marathi blog vishwa

Sunday 3 March 2013

सिनेमा... सिनेमा...


"सुचेल तसं" लेखमालेतील हा पाचवा लेख..या वर्षी सिनेमाला १०० वर्षे पूर्ण झाली..त्यानिमित्ताने..
सिनेमा... सिनेमा...
खरं सांगतो, चित्रपट हा शब्द मला नेहमीच परका वाटतो. शासकीय कार्यालयातील अनाकलनीय पाट्या वाचाव्यात तसे वाटते..! लहानपणी सुद्धा पहिल्यांदा तो "पिक्चर" म्हणून भेटला आणि मग पुढे त्याचा "सिनेमा" झाला आणि आपल्यासारख्या करोडो लोकांचे भावविश्व त्यात अडकून गेलेय..कधी काळी पडद्यावर चित्रे हलू - बोलू लागली तेंव्हा म्हणे लोकं भुताटकी म्हणून पळून जात होते..! पण आज सिनेमाने सगळ्यांना असे काही झपाटले की ही भुताटकी कधी संपणारी नाहीच.

लहानपणीची आठवण म्हणजे रस्त्यावर किंवा जरा मोकळ्या जागी बसून पडद्यावरचा पिक्चर पाहणे हीच. तेंव्हा खूपच लवकर जाणे आणि सतरंज्या टाकून जागा अडवणे ..हेच सर्वात महत्वाचे असे..! कित्येकदा मग जागा मिळालेली लोकं पडद्याच्या पलीकडेही बसून पिक्चर पहात. ते रीळं फिरवणारे मशीन, मध्ये रीळ तुटल्यावर होणारा आरडा ओरडा हे सगळे छान गमतीशीर होते...! लोकांच्या गरजा कमी होत्या, अपेक्षा कमी होत्या म्हणा किंवा आहे त्यात समाधान मानायची वृत्ती म्हणा पण त्या तेवढ्या मनोरंजनावर लोक खूष असत. कारण प्रत्येक तालुक्याच्या गावी थेटर नसायचे..त्यामुळे पडद्यावरचे, तंबूत बसून पाहिलेले सिनेमे हे सिनेमा व्यतिरिक्त अनेक गोष्टीमुळे लक्षात रहात.
त्याकाळापासून नुसते मनोरंजन नव्हे तर कित्येकांच्या व्यवसायाची लिंकही सिनेमाशी जोडली गेली आहे. पानवाला, गोटी-सोडावाला, वडापाव वाला, आईस्क्रीम वाला आणि black तिकीट वाला असे अनेक जण सिनेमाच्या जगाशी संबंध ठेऊन असतात इतकंच नव्हे तर वेश्या आणि त्यांचे दलाल हेही सिनेमागृहाजवळ सापडायचे..किंबहुना सांगलीच्या "स्वरूप" सारख्या अनेक थिएटर जवळ वेश्या वस्ती वाढल्याचीही उदाहरणे आहेत..समाजाच्या या खालच्या विविध थरातील अशा लोकांप्रमाणेच समाजातील वरचा वर्ग देखील सिनेमावर अवलंबून...मग त्यात फायनान्सर पासून ते जाहिरातदारापर्यंतचे अनेकजण आहेत. निव्वळ सिनेमासाठी निघणाऱ्या मासिकं, साप्ताहिकं यांचेही उदरभरण सिनेमाच तर करतो ना..? मात्र या वरच्या वर्गातील लोकांचे जग वेगळे आहे.
 

वाढत्या वयाबरोबर सिनेमा, सिनेसंगीत . बाबतचे आकर्षण ज्ञान वाढत गेले पण मन मात्र सिनेमापेक्षा गाण्यांतच जास्त गुंतून राहिले असे वाटते. भारतात सिनेमा लोकप्रिय करायचे खरे काम कुणी केले  असेल तर सिनेसंगीताने..! तो १९५०-६० पासूनचा सुवर्णकाळ होताच तसा. अर्थात ती सगळी गाणी जरी ऐकली असली तरी तेंव्हाचे किस्से, बिनाका गीतमाला वगैरे हे माझ्या पिढीसाठी ऐकीवच आहे. मात्र तेंव्हापासून सिनेमा लोकप्रिय करण्यासाठी  गाणी” हे महत्वाचे माध्यम ठरले ते कायमचे..!
तटस्थपणे अभ्यासले तर, किंवा जुने सिनेमा आता पुन्हा पहिले तर असे लक्षात येते की ज्या सिनेमाची गाणी अफाट गाजली ते सगळेच काही अफलातून नव्हते..(उदा. अनारकली, बरसात की रात .) आणि काही गाजलेल्या सिनेमासाठी गाणी हा दुय्यम निकष होता..(उदा. शोले). प्रदीपकुमार, भारतभूषण,जॉय मुखर्जी अशी मंडळी काही सुपर हिट सिनेमे करू शकली ती केवळ गाण्यांच्या जोरावर..!

सिनेमात काम करायच्या उर्मीने डेरेदाखल झालेल्या मंडळींच्या कहाण्या,दंतकथा वर्षानुवर्षे चवीने ऐकल्या-सांगितल्या जातात त्या फक्त भारतीय सिनेमाबाबतच..! आधीचा एखादा बस कंडक्टर पुढे मागे सिनेसृष्टी गाजवून मोकळा होतो..तर कधी सिनेमात गाजलेला एखादा नंतर सिग्नलजवळ हात पसरून उभा असतो...! अक्षरशः रस्त्यावरून उठून एखादी इथे सुपरहिट होते तर सौदर्याचे प्रतिक मानली गेलेली एखादी बेवारस अवस्थेत मरून जाते...सुदैव-दुर्दैवाचे दशावतार दाखवणारी ही आगळी वेगळी दुनिया..! इथे बरचसं नियमबाह्य किबहुना नियमाच्या चौकटीत बसवता येणारं..
या झगमगत्या रंगीन आणि रंगील्या दुनियेतील पडद्यामागच्या शेकडो कहाण्या मात्र दर्दभऱ्या आहेत. अनेकांची आयुष्यं इथे पैसा, मदिरा आणि मदिराक्षी साठी बरबाद झाली आहेत. अनेकांच्या मेहनतीचे श्रेय मात्र त्यांना कधीच मिळाले नाही तर पाहतापाहता एखाद्याच्या पदरात नियतीने भरभरून दान टाकले आहे..! पोस्टर रंगविणाऱ्या कलावंतापासून ते कपडेपट सांभाळणाऱ्यापर्यंत , मेकपमन पासून ते हेअर ड्रेसर पर्यंत अनेकांचे आयुष्य आपल्याला कधीच कळत नाही आणि आपण ते जाणून घेण्याचा कधी प्रयत्नही करत नाही..!
तीन तासांच्या त्या भासमान आयुष्यात स्वतःची सुख दुक्ख, वासना आणि संताप आपण ओतून देतो आणि बाहेर पडताना "चला, छान टाईमपास झाला.." म्हणून मोकळे होतो ! कदाचित यासाठीच सिनेमा बनतो का? मनोरंजन वा करमणुकीला जरी प्राधान्य असले तरी सिनेमाने त्याव्यतिरिक्त काहीतरी देणे गरजेचे आहे असे प्रामाणिकपणे वाटते.


मात्र एखादा सिनेमा असा असतो जो आपल्या आयुष्याला कलाटणी देतो. वर्षानुवर्षं आपण शोधत असलेलं प्रेयस आपल्याला अचानक शोधून देतो. डोळ्यासमोरच धूसर स्वप्न स्वच्छ सुंदर आणि आपल्या आवाक्यातील दिसू लागतं, आपल्याच आत दडून बसलेला तो खरा "मी" सापडतो आणि एका वेगळ्या प्रवासाची सुरुवात होऊन जाते..!
 
इथे एक आठवण आवर्जून सांगावीशी वाटते..पुण्यात वंचित विकास नावाची एक समाजसेवी संस्था आहे. या संस्थेचे संस्थापक विलास चाफेकर हे एक विलक्षण व्यक्तिमत्व. अक्षरश: रक्त आणि घाम गाळून त्यांनी संस्था व विविध समाजोपयोगी कार्ये उभी केली आहेत तेही प्रसिद्धीच्या मागे न लागता..

एकदा मी गप्पा मारताना विलास काकांना विचारले.."तुमच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले असतील की जेंव्हा तुम्ही व्यवस्थेशी लढताना थकला असाल, निराश झाला असाल, मग त्यातून बाहेर पडून पुन्हा जोमाने कामाला लागण्यासाठी कुठून ताकद मिळायची?"  ते पटकन म्हणाले, "तुला सांगतो सुधांशु, मी सगळ्या कामातून जेव्हा वेळ मिळेल तेंव्हा जाऊन सिनेमा पाहायचो..अगदी भान विसरून पाहायचो..त्या सिनेमा पाहण्यातून बहुदा माझा थकवा निघून जायचा..आणि पुन्हा नव्या जोमाने मी कामाला लागायचो...!.." विलास काकांसारख्या अनेक कार्यकर्त्यांना पुन्हा मानसिक उभारी देणारा एक सिनेमा असू शकतो हेच किती विस्मयकारक पण आवश्यक आहे ना....!

सिनेमातून प्रत्येकाला आपली अशी वाट सापडावी की त्यामुळे त्याचे इतरांचेही जीवन सुखी समृद्ध व्हावे आणि याचसाठी "सुमित्रा भावे" पंथातील निर्माता दिग्दर्शक जास्तीत जास्त निर्माण व्हावेत ही अपेक्षा यापुढे बाळगावी का?

-सुधांशु नाईक, बहारीन (nsudha19@gmail.com)

No comments:

Post a Comment