marathi blog vishwa

Friday 25 August 2017

🍁

आज रजनीताईंचा वाढदिवस. तोही पंच्याहत्तरीचा. एक खास दिवस. त्या मात्र गेले वीस दिवस सतत झुंजताहेत, तेही थेट मृत्यूसोबत.

झुंजणं, झगडणं हा तर त्यांचा जणू स्थायीभावच बनलेला. करणार तरी काय? १५ आॅगस्टला जेव्हा भारत स्वतंत्र होत होता तेव्हा कोकणातल्या तुरळ या एका लहानशा गावात एक चार वर्षांची चिमुरडी आजाराशी झुंजत होती. त्या पोलियोनं, तापानं तिला जन्मभर पुरेल असं अधूपण दिलं अन् त्याचबरोबर झुंजत रहायची एक अजोड ताकद.

तेव्हापासून गेली सत्तर वर्षं ती चिमुरडी झुंजतेच आहे..! नुकताच मृत्यूही थक्क होऊन मग लांबूनच दर्शन घेऊन परतलाय जणू.

सत्तर वर्षांपूर्वी महानगरातही अपंग व्यक्तींचं जिणं भीषण होतं, तिथं लहान लहान गावांतल्या परिस्थितीबद्दल काय बोलायचं? वाढत्या वयाबरोबर या मुलीनं कायकाय अन् कसं सोसलं असेल याची कल्पनादेखील अंगावर काटा आणते अन् डोळ्यात पाणी.

एखाद्या जिवलगाला सहज सोबत मिरवावं तसं मग रजनीताईंनी हे पांगळेपण सोबत मिरवलं. कधीच त्याचा बाऊ केला नाही व त्याचा वापर करत कुणाची दया, करुणाही मिळवली नाही.

स्नेहल रजनीताईंना दैवानं तीन महत्वाच्या गोष्टी मात्र दिल्या. कुशाग्र बुध्दी, धैर्य अन् कंठातला सुंदर कोमल सूर. केवळ अन् केवळ या तीन गोष्टींच्या जोरावर मग त्या जग जिंकत निघाल्या.


शिक्षण तर पूर्ण केलंच पण गाण्याचं शास्त्रीय शिक्षणही आत्मसात केलं. आज आपण किधीही प्रगतीच्या गप्पा मारल्या तरी आजही अपंग व्यक्तीची कुचेष्टा समाजात होतेच किंवा उगाच केविलवाण्या नजरांना सामोरं जावं लागतं त्यांना.

रजनीताई काखेत कुबडी घेऊन या दोन्हीविरुध्द कणखरपणे उभ्या राहिल्या.

आपल्या काॅलेजच्या दिवसांविषयी सांगताना एकदा म्हणालेल्या, " तुम्हाला सांगते सुधांशु, अख्खं काॅलेज, म्हणजे मुलं व शिक्षक सगळे घाबरायचे मला. काय बिशाद कुणी वेडंवाकडं वागेल. मी सरसावून तयारच असे. मीच नाही तर अन्य कुणाशीही कुणी वावगं वागलेलं मी कधीच सहन केलं नाही." नेहमी कोमल सूर गाणारा त्यांचा गळा तीव्र सुरांचं खास सौंदर्यही सहज दाखवून जायचा मग.

त्यांचा स्वभाव तर एकदम रोखठोक. 'एक घाव दोन तुकडे'वाला. वागण्या-बोलण्यातलं व्यंग त्यांना चटकन् समजतं, अन् मग थेट मुळावरच घाव. " उध्दटासी व्हावे उध्दट" असं आचरण असलं तरी त्यांच्याइतकी माया करणं फारच कमी लोकांना जमतं.

गेली काही वर्षे तर त्या अंथरुणालाच खिळून. तरीही शेकडो परिचितांचे वाढदिवस वगैरे सगळं त्यांना मुखोद्गत. त्या त्या दिवशी त्या व्यक्तीचं कौतुक होणारच. विविध माणसांच्या आवडीनिवडी ही त्यांनी अचूक टिपून ठेवलेल्या. त्यानुसार घरी डबा पोचणारच. पूर्वी स्वैपाकघरात स्वत: पदर खोचून निगुतीनं सारं करायच्या. हल्ली ते जमत नसलं तरी कोणत्या रांगेत कोणत्या डब्यात काय ठेवलंय हे बेडवरून सहज सांगू शकतात त्या.

खाणं अन् गाणं यावर मनापासून प्रेम.
मध्यंतरी एकदा अचानक त्यांच्याकडे गेलो. जाताना गरमागरम बटाटेवडे नेलेले. त्यादिवशी काहीतरी बिनसलेलं त्याचं.
वड्याचा पहिला घासही गिळता येईना. तिखट लागलं. अन् डोळ्यात पाणी आलं त्यांच्या.
वैतागून म्हणाल्या, " सुधांशु, सगळं सगळं नकोसं झालंय आज मला. मगाशी तर अनिताला म्हणत होते की मला पलिकडे रंकाळ्याकडे घेऊन चल. जीवच देते आता..."

गंमतीनं मी म्हटलं," ताई, अहो, जीव द्यायचाय ना, मग रंकाळा कशाला? वास मारतोय हल्ली पाण्याला. तुम्हाला चांगल्या निसर्गरम्य ठिकाणी नेतो आम्ही, तिथं हवंतर करा विचार मग..."

" तुम्ही गंमत करत माझा मूड चेंज करायचा प्रयत्न करताय हे कळतंय मला. पण नकोसं झालंय सगळं आता. मला खूप फिरायला आवडायचं तर माझं फिरणं बंद केलं देवानं. मला तिखट, चमचमीत खायला आवडायचं तर तेही आता खाता येत नाही. सतत तोंड आलेलं असतंय. गाणं म्हणायला आवडायचं तर आता गातानाही दम लागतोय हो. " सांग ह्या कोजागिरीच्या चांदण्याला.." ही ओळ म्हणतानाही आता दमतेय मी. कसं जगू हो या सुरांशिवाय???"

त्या मुक्तपणे रडत राहिल्या काही क्षण. आम्ही शांतपणे त्यांना मोकळं होऊ देत राहिलो.... काय करणार होतो आम्ही?

त्यांनी मात्र आयुष्यात इतरांच्या अडचणींवेळी नेहमीच धावून जात मदत केली. त्या व त्यांची मैत्रीण नसीमादीदी हुरजूक यांनी " अपंगांच्या मदतीसाठी व स्वावलंबी बनण्यासाठी संस्थेचं" स्वप्न पाहिलं. अनंत अडचणींवर मात करत उभं राहिलेल्या " हेल्पर्स आॅफ दि हॅन्डिकॅप्ड" या संस्थेचा आज वटवृक्ष झालाय. संस्थेच्या माध्यमातून अनेकांना नाजूक क्षणी मदत मिळत गेली व स्वत:चं अपंगत्व जमिनीत गाडून अनेक गुणवंत आज समाजात धीराने काम करु लागले.


या सगळ्या कामात रजनीताईंना कधीही कौतुकानं मिरवताना आम्ही पाहिलं नाही. आज किरकोळ कामं करुन पदव्या-पुरस्कार पदरात पाडून घेणारी मंडळी पाहिली की त्यांचं मोठेपण अजून भव्य वाटू लागतं. गायिका रजनी करकरे-देशपांडे व समाजसेविका रजनीताई या दोन्ही आघाड्यांवर त्या डौलानं कार्यरत राहिल्या. अनेकांना स्फूर्ती देत राहिल्या.

त्यांचं सर्वात मोलाचं काम कुठलं असेल तर अपंगाची लग्न जुळवणं. अपंगत्वाचे शेकडो प्रकार आहेत. मात्र याचा अर्थ असा नव्हे की त्यांचं सहजीवन असूच नये. दैवजात मिळालेलं एकटेपण भोगणं ही फार कठीण व वेदनादायी गोष्ट असते याचा प्रखर अनुभव असलेल्या रजनीताईंनी अनेक अपंगांचे, संस्थेच्या कार्यकर्त्यांचे संसार उभे करुन दिले. त्यापूर्वी त्यांना स्पष्ट व अत्यावश्यक सर्व समजावून देत उत्तम समुपदेशन केलं. त्याचं ऋण विसरणं अशक्यच.

तीच त-हा गाण्याची. अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी घडवताना त्यांच्याकडून कठोर मेहनत करुन घेतली त्यांनी. सर्वपरिचित कोसंबी बंधूंसारख्या अनेकांना त्यांनी केलेलं मार्गदर्शन भविष्यातील वाटचालीसाठी बळ देणारंच होतं.

इतरांचं सहजीवन फुलवणा-या, सुरांत रमलेल्या रजनीताईंचं भाग्य तरीही थोर म्हणायला हवं म्हणून पी. डी. देशपांडेंसारखा पती त्यांना लाभला. वयानं १६-१७ वर्षं लहान पीडींना लग्न करताना प्रखर विरोध सहन करावा लागला पण प्रेम जिंकलं शेवटी. संगीत, साहित्य, समाजकार्य अशा तिन्हीत रमणारा साथीदार व मित्रवर्ग यासह दिवस फार आनंदाचे होते !
म्हणतातच ना, " काव्यशास्त्रविनोदेन कालौ गच्छति धीमताम्" अन् म्हणूनच दिवस नव्हे वर्षं कशी गेली तेही कळलं नाही.

ते हल्ली हल्ली त्यांना जाणवू लागलं अंथरुणाला खिळल्यावर. तरीही काहीतरी करायची उर्मी असायचीय.

जानेवारीतलीच गोष्ट. माझी आई व सासरे कॅन्सरमुळे मृत्यूशय्येला खिळलेले. पहिलं कोण जाणार अशी जणू शर्यतच होती घरात. आमची धावपळ सुरु होती व अचानक पीडींना घेऊन रजनीताई दत्त म्हणून दारात उभ्या.

मी म्हटलं पीडींना, " अहो, त्यांची तब्येत बरी नाही, कशाला त्रास देत घेऊन आला त्यांना?"

ताडकन् म्हणाल्या, " त्यांनी मला नव्हे, मी आणलंय त्यांना. आज सकाळी उठल्यावर ठरवलेलं आज यायचंच. इथं तुमच्यावर पहाडावर संकट अन् मी घरात कशी बसून राहून हो?"

मग दोघांशीही बोलत बसल्या.
सास-यांनी खोल गेलेल्या आवाजात विचारलं, काही गाउन दाखवायला जमेल का?"

मग त्यांच्या आग्रहाखातर गळा साथ देत नसूनही गाणी म्हटली.  डोळ्यात पाणीच उभं राहिलं सर्वांच्या.

डोळे टिपत ताई म्हणाल्या," तुम्ही काहीतरी मागितलं व मी देऊ शकले.. फार बरं वाटलं बघा. नाहीतर मी काय देणार होते तुम्हाला...!"

त्यानंतर दहा दिवसांच्या दोघेही गेलेच. पण त्या ३-४ महिन्यात जवळपास रोज त्या फोनवरुन चौकशी करत होत्या. कुणाबरोबर तरी सूप, सार असं काहीबाही करुन पाठवत होत्या!

आज ७५ वा वाढदिवस त्यांचा. गेले वीस दिवस सर्वांच्या तोंडचं पाणी पळालेलं. झुंज देत त्या ICU मधून तर बाहेर आल्या आहेत व हळूहळू प्रकृती सुधारतेय. त्यातच योगायोगानं आज गणेशचतुर्थी.
भारावलेल्या मनानं व भरुन आलेल्या डोळ्यांनी इतकीच प्रार्थना करतो की
त्यांना सुखात ठेव. बाकी काही नको, बाकी काहीच नको.
- सुधांशु नाईक ( 9833299791) 🌿

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

No comments:

Post a Comment