marathi blog vishwa

Saturday 11 April 2020

अघळ पघळ मायदेव काका...

कित्येक माणसे आपल्या आसपास वावरलेली असतात. कालांतराने आपण  कुठेतरी लांब निघून जातो, कधी ती माणसेही कायमची दुरावतात. मात्र एखादी गोष्ट अशी घडते की त्यांची पट्कन आठवण होते. मायदेव काका अशांपैकी एक. काही दिवसांपूर्वी रस्त्यावरून जाताना एक माणूस अचानक “गुरुदेव दत्त..” असं जोरात म्हणाला आणि मला पट्कन मायदेव काका आठवले. “गुरुदेव दत्त..” आणि “स्वामी समर्थ” या जयघोषावर जणू त्यांचाच कॉपीराईट असावा इतकं ते त्यांच्याशी जोडलं गेलं होतं..!

“वेष असावा बावळा परंतु अंतरी नाना कळा..” ही ओळ बहुदा त्यांच्या सारख्या लोकांसाठीच असावी. ढगळ खाकी कपडे, गळ्यात घाम पुसायला गुंडाळलेला मोठा रुमाल, हातात सायकल आणि कपाळावरचा घाम पुसत जाणारी व्यक्ती म्हणजे मायदेव काका. समोर कुणीही असो, दिसल्याक्षणी “गुरुदेव दत्त” अशी त्यांची हाक ऐकू यायची आणि मग सुरु होई त्यांचं अखंड बोलणं. त्यांना बोलणं अत्यंत प्रिय. समोर लहान-मोठी, गरीब-श्रीमंत अशी कुणीही व्यक्ती असू दे मायदेव काका त्यांच्याशी मनसोक्त बोलत बसायचे. अवघ्या चिपळुणात सर्वांना त्यांची ही सवय माहिती. त्यामुळे कित्येक जण अनेकदा “मायदेव हल्ली कुठे दिसला नाही..” असं औपचारिकपणे न म्हणता, “ गुरुदेव दत्त कुठायत सध्या? दर्शन नाही बरेच दिवस..” असंच विचारायचे.
 अघळपघळ बोलणारे मायदेव काका गावभर सर्वत्र सुखेनैव संचार करायचे. सर्वांशी खूप बोलायचे. कुणाला ते आवडायचं...कुणी त्यांची टिंगल करायचं. त्यांनी मात्र मोकळं वागणं कधी सोडलं नाही.
मायदेव काका उर्फ चंद्रकांत मायदेव हे पंचायत समितीत शिपाई होते. चिपळुणात पागेवर आम्ही तात्या चितळेंच्या घरी राहायचो. तिथं मला आयुष्यात पहिले दोन मित्र मिळाले. एक म्हणजे बर्व्यांच्या चाळीत राहणारा वासुदेव चंद्रकांत मायदेव आणि दुसरा पलीकडे गोडसे चाळीत राहणारा मिलिंद तांबे. बालवाडीपासून आम्ही तिघे एकत्र असायचो. वासुदेव ला आम्ही सगळे कायम “माय God” या नावाने हाक मारीत असू. त्यामुळे पागेवर सर्वत्र भटकणे, विविध उत्सवात सहभागी होणे, खेळणे, पोहणे हे सगळं सुरु असे.
बर्व्यांच्या चाळीत जिन्याच्या खाली साधारण १० बाय १० च्या खोलीत मायदेव काकांचा संसार. काका-काकू आणि माझा मित्र असे तिघे तिथे राहायचे. ती लहानशी खोली अजून आठवते. एका बाजूला अंघोळ करायला लहानशी मोरी, पलीकडे एका टेबलवर gas शेगडी, पलीकडे काही डबे ठेवायला लहानसं कपाट, मध्ये दोरीवर अनेक कपडे टाकलेले, पलीकडे असलेली एक कॉट म्हणजे तिथली बेडरूम. तरी त्या खोलीत काका सुखाने राहायचे. आपलं घर लहान आहे, इतरांच्या तुलनेनं खूप नीटनेटकं नाही यामुळे खिन्न न राहता आल्यागेल्याचं छान आदरातिथ्य करायचे. आम्ही कुणी कधी घरी गेलो की, “बस रे..चहा टाकतो पट्कन..” असं म्हणून चहाच्या तयारीला लागायचे. सोबत बोलणं सुरूच असायचं. शाळेत काय सुरु आहे.. नवीन पाठांतर काय केलं वगैरे चौकशा सुरु असायच्या.
मायदेव काका मूळचे माखजन जवळील बुरुम्बाड चे. गरीब ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या काकांचे प्राथमिक शिक्षण तिथे झाले. त्यासोबत पुरुषसूक्त, श्रीसूक्त, रुद्र, सौरसूक्त, पूजाविधी आदि गोष्टीही तिथेच शिकले. पुढे कवी वा. गो. मायदेव ( गाई घरा आल्या या प्रसिध्द कवितेचे कवी) यांच्या परिचयातून त्यांना अमरावतीला नोकरी मिळाली. तिथे २-४ वर्षे राहिले. तिथंच तबला ही शिकले. मात्र माडा-पोफळीत, आंब्या-फणसात रमणारा हा कोकणी माणूस तिथं रमू शकला नाही. मग चिपळुणात दाखल झाले. पडेल ते काम करू लागले. कधी लघुरुद्र कर, कधी पूजा कर, कधी कुणासाठी काही कामं कर हे सांभाळून नोकरी देखील.
आम्ही नंतर पागेवरचे घर सोडून पंचायत समितीसमोर पाटकर चाळीत राहायला गेलो, त्यानंतर बुरूमतळीला केतकरांच्या घरात. इथे दोन्हीकडे मायदेव काका नेहमी यायचे. कुणाच्याही घरी त्यांचा सहज संचार अगदी थेट स्वैपाकघरापर्यंत असायचा.
आमच्याकडे आले की थेट आईला सांगायचे, “ वहिनी घोटभर चहा टाका हो..”.. आणि मग थेट, “काय म्हणतायत सगळे..” असं काहीबाही विचारून गप्पांना सुरुवात. बाबा असले की म्हणायचे, “ तुम्ही रुद्र वगैरे संथा घनुअण्णांकडून घेतलीये. तुमचे उच्चारही खणखणीत आहेत. तुमचं वाचन भरपूर. तुमच्याकडून नवी माहिती मिळते..वगैरे..वगैरे..” बाबांना उगीचच मोकळ्या-धाकळ्या गप्पा आवडत नाहीत हे कधीतरी त्यांच्या लक्षात आले. मग अवांतर फारस बोलायचे नाहीत. ते घरी आले की आम्हा मुलांच्या पोटात मात्र गोळा यायचा. कारण ते किंवा भार्गवकाका काळे हे नेहमी आम्हाला स्तोत्रं किंवा सुक्तांची कोडी घालायचे.
मायदेव काका देखील आल्यावर जरा वेळानं विचारायचे.. “ अमुष्यत्वत्सेवा समधीगतसारंभुजवह...” च्या पुढचं सांग पाहू.. मग आमच्या मेंदूतलं केंद्र ही ओळ कशातली हे शोधायला धडपडे. जर पट्कन “ बलात कैलासेपित्वधीवसत...” असं आम्ही पुढे म्हटलं की एकदम खूष होऊन जात. कधी महिम्न, कधी सौरसूक्त कधी रुद्र यातील काहीतरी विचारायला आवडे त्यांना. आम्हा मुलांना मात्र भीती वाटे चुकलं तर ओरडतील याची. पण ते कधी ओरडले नाहीत. त्यांचा स्वभाव मायाळू होता. स्वतःच्या आणि इतरांच्याही मुलांवर जीव होता त्यांचा. पुढे मोठं झाल्यावर देखील अनेकदा ते हायस्कूलमध्ये किंवा कॉलेजला वगैरे आले तरी मला सांगायचे, “आमचा वासुदेव आहे ना रे नीट. करतो ना रे अभ्यास. त्याच्यावर सगळी आशा आमची. सांभाळून घ्या रे तुम्ही सगळे त्याला.” असं काहीतरी सांगून मग सगळ्या मुलांना काही खाऊ द्यायचे. कधी लाडू, कधी फरसाण, कधी चकली, कधी चिवडा... त्यांची परिस्थिती कशी हे पूर्ण माहिती होतं सगळ्यांना. त्यामुळे त्यांनी कधी काही दिलं नसतं तरी कधी राग आलाच नसता. मात्र ते कधीही रिकाम्या हाताने वावरले नाहीत. कित्येकदा रस्त्यात भेटले तरी पट्कन खिशातून चणे – शेंगदाणे काढून देत.
त्यांच्या अघळपघळ स्वभावामुळे, उगीचच प्रत्येकाशी घसट करत बोलण्यामुळे अनेकजण त्यांना नावंही ठेवत. त्यांची चेष्टा करत. मात्र त्या चेष्टेला त्यांनी कधी चिडून दुरुत्तरे केली नाहीत. कधी वादावादी केली नाही. मात्र स्वतःचा स्वभावही बदलला नाही. वासुदेवची आई अंगणवाडी सेविका होती. तिथे शाळेत शिकवायची. कधी त्याही आमच्याकडे यायच्या. आईसोबत गप्पात रमायच्या. नवऱ्याच्या तऱ्हेवाईक स्वभावाबद्दल, कधी कुठे दुखलं खुपलं असेल तर त्याबाबत सात्विक संतापानं बोलत बसायच्या. मन मोकळं करायच्या. हे असं सगळ्या संसारात असतंच. मात्र त्या दोघांचं नातं हे काही खास असायचं. दोघांचा आपल्या मुलावर प्रचंड जीव होता. आपला मुलगा मोठा व्हावा यासाठी खरंच अखंड राबले दोघंही.
त्यांना आपल्या मुलाचं मोठं होणं पाहता आलं. लहानशा त्या एक खोलीच्या संसारात या तिघांचं जगणं कसं असेल याची कल्पनाही करवत नाही. मात्र माझा मित्र हा वासुदेव उर्फ मायgod हाही वेगळाच. त्यानंही कधी जे नाही त्याबद्दल तक्रारीचा सूर काढला नाही. जे जसं मिळेल त्यात तोही मजेत राहिला. खेळ, नाटक, बासरी वाजवणे, अभ्यास या सगळ्यात मनापासून सहभागी होत राहिला. इंजिनिअर झाला. 
आपला मुलगा गुणी आहे याचा अभिमान मायदेव काकांच्या बोलण्यात नेहमीच असायचा. आज तो मुंबईत आहे. वीज कंपनीत मोठ्या पदावर आहे. तो तेंव्हा नुकता कुठे स्थिरावलेला. ते पाहून एकदिवस मग काका हे जग सोडून निघून गेले.
हल्ली माझंही चिपळूणला जाणंही कमी झालंय. कधी गेलो की रस्त्यावरून जाताना अवश्य वाटतं की कुठेतरी मायदेव काका सायकलवरून येताना दिसतील...आणि कानावर खणखणीत हाक येईल... “गुरुदेव दत्त..स्वामी समर्थ...”
 “कधी आलायस रे..घरचे सगळे कसे आहेत..?” असं विचारत नेहमीच्या पध्दतीने ते गप्पा मारायला सुरुवात करतील. बघता बघता २०-२५ मिनिटं निघून जातील. मग जाता-जाता हातावर थोडेसे चणे ठेवतील.. “ छान सुखी रहा रे सगळे..” असं सांगत सायकलवरून निघून जातील. त्या हातावरच्या चण्याना नेहमीप्रमाणे निःस्वार्थी स्नेहाचा सुगंध असेल.
दरवेळी असं वाटतं की लहानपणी पाहिलेली ही अशी माणसं अजूनही तशीच असतील..तशीच भेटत राहतील.. पण आता ते कधीच घडणार नसतं...कधीच घडणार नसतं..!
-    सुधांशु नाईक (९८३३२९९७९१), कोल्हापूर.

2 comments:

  1. छान व्यक्तिचित्रण केले आहे. मी ही चिपळूणला त्यांना भेटलो आहे आणि आज त्यांच्याबद्दल वाचताना आठवणी नव्याने ताज्या झाल्या.

    ReplyDelete