marathi blog vishwa

Wednesday 25 October 2023

माणसे : ध्येय आणि टप्पे

#सुधा_म्हणे: माणसे : ध्येय आणि टप्पे

25 ऑक्टोबर 23

विजयादशमीला सीमा ओलांडून माणूस बाहेर पडत असे ते काहीतरी नव्याने घडवून दाखवायला. प्रत्येकाच्या आयुष्याची कोणती न कोणती उद्दिष्टे असतात. आणि एखादे विशिष्ट ध्येय असते. व्यवस्थापन कौशल्याचा एक महत्वाचा भाग असतो ध्येय निश्चिती करणे. मग हे व्यवस्थापन आपल्या वैयक्तिक आयुष्याचे असो किंवा आपण जिथे नोकरी / व्यवसाय करतो तिथले असो. आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर आपली उद्दिष्टे वेगवेगळी असू शकतात पण ध्येय मात्र बऱ्याचदा अविचल राहते. कुणाला खूप श्रीमंत व्यक्ती बनायचे असते. कुणाला उत्तम तबलावादक किंवा गिटारवादक बनायचे असते. तर कुणाला स्वतःचा व्यवसाय निर्माण करायचा असतो. तर कुणाला एखादा तपस्वी किंवा संन्यासी व्हायचे असते. आपापली ध्येये साध्य करणे ही जणू एक दीर्घ तपश्चर्या असते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण त्यासाठी नेमके काय करतो हे म्हणूनच महत्वाचे ठरते. त्यासाठी मार्गदर्शक तत्वे किंवा strategies तयार कराव्या लागतात.

 
आपल्याला जे बनायचे आहे, जे घडवायचे आहे त्यातील शिक्षण घेणे ही पहिली अतिशय महत्वाची गोष्ट असते. समजा, एखाद्याला संन्यासी व्हायचे आहे तर त्यासाठी आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन, मनन आणि चिंतन आवश्यक असते. कोणती साधना करायची, त्यातील टप्पे कोणते हे जाणकार व्यक्तीकडून समजून घ्यावे लागते. आपण त्या वाटेवरून चालू लागलो की अनेक अडथळे येतात. मोहाचे क्षण येतात. त्याला कसे तोंड द्यायचे हे आधीच समजून घ्यावे लागते. त्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींच्या भेटीगाठी, त्यांच्याशी चर्चा करून आपली वाट तयार करावी लागते. इतके केले म्हणजे लगेच उद्दिष्ट, ध्येय साध्य होईलच असे मात्र नसते. आयुष्य असे असते की एकाला लागू झालेली गोष्ट दुसऱ्याला चालेलच असे ठामपणे सांगता येत नाही. अध्यात्माच्या वाटेवर आपले परिश्रम, आपली प्रचिती या गोष्टी फार महत्वाच्या ठरतात. आपल्या ध्येयावर अविचल नजर ठेऊन नियमित परिश्रम घ्यावे लागतात.

अगदी असेच एखाद्याला गायक व्हायचे असेल तर त्यासाठी स्वरसाधना करावी लागते. अथक रियाज करावा लागतो मग कुठेतरी आपण एकेक टप्पे गाठू लागतो. कित्येकदा असे होते की अर्ध्या वाटेवर गेल्यावर जाणवते की वाट चुकते आहे. त्यावेळी स्वतःचे, आपल्या कामाचे मूल्यमापन करता यायला हवे. हट्ट, अहंकार, अभिमान हे बाजूला ठेऊन जाणत्या व्यक्तीला शरण जाऊन त्याच्याकडून आपल्या चुका समजावून घ्यायला हव्यात. त्यानुसार स्वतःमध्ये सुधारणा करायला हवी. कित्येकदा खूप कष्ट केल्यावर अशी वेळ येते. तेंव्हा वाटते की बास, पुरे आता सगळे. मात्र तेंव्हा आपण स्वतःच किंवा योग्य गुरुने जर मार्गदर्शन केले तर पुन्हा उमेदीने आपण कामाला लागतो. आणि अचानक पटकन ध्येय गवसते. तेंव्हा जाणवते की आपण ध्येयप्राप्तीच्या किती जवळ पोचलो होतो. इथून मागे फिरलो असतो तर मोठी चूक झाली असती.

आयुष्यात ठरवलेले ध्येय गवसण्यासाठी एखाद्याला अवघे आयुष्य खर्ची घालावे लागते तर एखाद्याला खूप लवकर सारे मिळून जाते. ध्येयप्राप्तीनंतर जे समाधान मिळते ते शब्दातीत असते. आयुष्यभर काढलेले कष्ट, सोसलेले त्रास सगळ्याचे सार्थक होऊन जाते आणि आपला आत्मा सुखिया झाल्याची अवर्णनीय अनुभूती मिळून जाते. यापेक्षा आणि काय हवे असते आपल्याला?

-सुधांशु नाईक (9833299791)



No comments:

Post a Comment