marathi blog vishwa

Monday 27 December 2010

शिवराय हे काय सुरु आहे तुमच्या राज्यात ..??

काल रात्री २ वाजता पुण्यातील लाल महालातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा प्रशासनाला न शोभेल अशा तत्परतेने हलवण्यात आला..याचा एक इतिहास प्रेमी नागरिक म्हणून मी निषेध करतोय. ज्यांनी हा पुतळा काढून नेण्यासाठी पडद्यामागील भूमिका निभावली त्यांचे विविध उद्योग पहिले तर असे वाटते कि आज शिवाजी महाराज असते तर त्यांनी या अशा नालायकांना तोफेच्या तोंडी दिले असते हे नक्की.
 
गेले कित्येक दिवस वा महिने आजूबाजूला जे चालले आहे ते पाहून मनात खदखदत आहे ते लिहायला हे एक निमित्त मिळाले. दादोजींचा पुतळा पुण्यातील लाल महालात का बसवला होता हे या तथाकथित शिवप्रेमींना माहित आहे का??
मुळात दादोजी हे शिवरायांचे गुरु असल्याचे ह्या पुतळ्यातून कुठेही दाखवण्यात आले नव्हते. हा पुतळा उभा केला त्यामागे एक व्यापक कल्पना होती.
एकेकाळी राया राव नावाच्या सरदाराने शहाजी राजेंच्या स्वराज्याच्या स्वप्नाचा गळा घोटण्यासाठी आदिलशहाच्या आदेशाने पुण्याची राख रांगोळी केली. तिथे गाढवाचा नांगर फिरवला. आणि कवटी टांगून ठेवली. तत्कालीन समजुतीप्रमाणे असे केल्यास त्या जमिनीत पुन्हा पिके येत नाहीत. ती जमीन , जहागीर स्मशानवत होते.. मात्र शिवबा लहान असताना शहाजी राजांनी आपल्या पत्नीला लहानग्या शिवाबासोबत पुण्याचा कारभार पाहण्यास सांगितले. त्यांच्याबरोबर दादोजींच्या सारखे इतरही इमानदार अधिकारी दिले. दादोजी हे कुणी सामान्य नोकर नव्हते तर कोंढाण्याचे सुभेदार होते. कामकाजात प्रवीण व न्यायदानात कठोर होते. ( प्रत्यक्ष औरंगझेब बादशाहने देखील त्याच्या न्याय निवाड्याची तारीफ केली होती.).  त्यांनी पाहता पाहता जहागिरी वर अंमल बसवला. वाडे बांधले. आमराया निर्माण केल्या. शेतकर्यांना सुविधा दिल्या. जमिनी पुन्हा पिकावू बनव्यात म्हणून मदत केली. ओढ्यावर बंधारे बांधले. या सगळ्या प्रयत्नांना जिजाऊ साहेबांची संमती होतीच पाठबळ hotech. पण लोकांच्या मनातील अंधश्रद्धा संपवण्यासाठी त्यांनी बाल शिवबाच्या हस्ते पुण्याची जमीन सोन्याच्या नांगराने नांगरून पवित्र केली. त्याचे हे स्मारक..त्यात दादोजींची जात येतेच कुठे?? पण एक स्वतःला पावरफुल समजणाऱ्या राजकारण्याला आपली पापे झाकण्यासाठी नेहमीच अशी करणे लागतात..आणि मग समाजात विषमतेची आग भडकवायला हे आपल्या भाडोत्री गुंडांना पुढे आणतात..!! 
आजच्या तथाकथित इतिहासकारांच्या सांगण्याप्रमाणे  दादोजी जर खरेच नालायक असते, समाजावर जुलूम करणारे फक्त एक ब्राह्मण अधिकारी असते तर त्यांनी एक तर हे केले नसते किंवा स्वतःची थोरवी दाखवण्यासाठी तो नांगर स्वतः हाती धरला असता.. पण त्यांनी असे केले नाही कारण ते खरेच एक स्वामिनिष्ठ अधिकारी होते. त्यावेळेसच नव्हे तर नंतरही अनेक वेळा शिवरायांचे प्रत्यक्ष नातेवाईक देखील त्यांच्या विरोधात लढत होते.. मग आजचे हे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले इतिहास संशोधक त्यांचे नाव मिटवून टाकतील का??
ब्राह्मणांना विरोध करायचा असेल तर तो तत्वाने अभ्यासाने करावा..त्यांच्यासारखे शिक्षणाचा ध्यास घेऊन करावा. पण त्यासाठी इतिहासाचे विडंबन का केले जात आहे?? आणि हे असे काही आव आणत आहेत कि जणू समाजात सर्वाधिक अत्याचार फक्त ब्राह्मणांनीच  केलेत..!!
जर इतिहास नीट वाचला तर यांना देखील कळेल कि पेशवाई चा काळात ब्राह्मणांनी अनेक चुकीच्या प्रथा सुरु केल्या हे खरे पण त्यापूर्वी व नंतर हि समाजातील दलित व दीन दुबळ्यांवर जास्त अत्याचार हे  समाजातील काही वजनदार  वर्गानेच केले आहेत. पण म्हणून सरसकट त्यांच्या  विरोधात आंदोलन करणे हे चूकच आहे.. मग हे इतिहास संशोधक कशासाठी फक्त ब्राह्मण वर्गाला लक्ष करत आहेत?? 
मध्ये असाच एका स्वताला थोर समजणाऱ्या इतिहास संशोधकाचा एक लेख वाचला. त्यात त्याने लिहिले होते कि मोरोपंत पिंगळे हा शिवरायांचा पंतप्रधान अत्यंत स्वार्थी व भ्रष्टाचारी होता म्हणून..!! जे शिवाजी महाराज आपल्या नातेवाईकाला देखील भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे कडक सजा देतात ते अशा   माणसाला थेट पंत प्रधान करतात याचा अर्थ काय?? मग हे इतिहास संशोधक राजांना अपराधी मानणार काय?? का या इतिहास संशोधाकाचीच बुद्धी भ्रष्ट झालीये??
या अशा इतिहास संशोधक मंडळीना एक समाजात नाहीये कि ते असे वाईट साईट लिहून थेट महाराजांचीच बदनामी करत आहेत. राजांनी आपल्या आयुष्यात नेहमीच जातीभेद नष्ट करायचे प्रयत्न केले ..  त्यांना ब्राह्मणापासून सर्व जमातीतील लोकांनी मदत केली. तसेच सर्व जमातीतील लोक विरोधातही होते. म्हणून एखाद्या माणसासाठी एखादी जात दोषी ठरू शकत नाही.. आणि ठरवयाचीच असेल तर राजांच्या काकापासून भावांपर्यंत जे काही त्यांचे विरोधक होते त्याची मराठा जात दोषी का नाही??? उद्या म्हणून संभाजी ब्रिगेड मराठ्यांची पण घरे जाळणार का? त्यांची नवे पण इतिहासातून वगळून खोटा खोटा इतिहास शिकवायला सांगणार का??
 आज विशिष्ट समाजाला मोठे करण्याच्या नादात हे असे कवडीमोलाचे इतिहास संशोधक संपूर्ण समाजालाच वेठीस धरत आहेत.. आपली पापे झाकण्यासाठी निमित्त शोधणारे राजकारणी यांना पाठबळ देत आहेत..  आणि आपल्या सारखे थोर थोर सामान्य लोक या सगळ्याकडे दुर्लक्ष करून त्यांना मोकाट रान मिळवून देत आहोत...शिवबा काय चाललाय तुमच्या स्वराज्यात??
---सुधांशु नाईक, कल्याण.

2 comments:

  1. समाजात जाती धर्म ह्या मध्ये द्वेष पसरुन स्वथाचे राजकारण करावयाचे अशी प्रव्रुत्ती सध्या वाढत आहे त्याचाच हा नमुना आहे.

    ReplyDelete
  2. खरे आहे सुधीर जी..
    आपण सगळे एक होण्या ऐवजी वेगळे होण्यासाठीच धडपडत आहोत..
    आता खरच सर्वांनी फक्त भारतीय म्हणूनच एकत्र येण्याची गरज आहे..
    जाती धर्माच्या भिंती पडायला हव्यात..

    -सुधांशु

    ReplyDelete