marathi blog vishwa

Tuesday, 24 June 2014

गंमत भाषेची !

“मनापासून” या लेखमालेतील पाचवा लेख आपल्या भाषेविषयी..

मूल जन्माला आलं की लगेच भाषेची गंमत सुरु होते..! त्यातही आपली मराठी भाषा शब्दांच्या दृष्टीने फार समृद्ध आहे. हे जे मूल जन्माला येतं ना, त्याला इतर प्राण्यांच्या पिल्लासारखं लगेच काही करता येत नाही. अनेक दिवस ते परावलंबीच असतं. मात्र त्याने बोलायला सुरुवात करायच्या आधी लोक जणू आपणच आता जन्मलोय अशा थाटात “बोबडं” बोलायला सुरुवात करतात. एखादी मावशी, आत्या लगेच सुरूच करते..

“शोनुल माजं ते..अ लो लो लो..ललू नको ले..काय पायजे माज्या लाजाला...” जर त्या बाळाला त्या क्षणी बोलता आलं असतं तर ते निश्चित म्हणलं असतंच,

“ मावशे, अगं बाळ मी आहे का तू? जरा मोठ्या मानसावानी बोल की..”


पण माणसे आपल्या आपल्या पद्धतीने बोलत राहतात. आपल्या देशात तर भाषा दर ३०-४० किमीवर बदलते. कोकणातली बोली वेगळी असली तरी त्यातही “बाणकोटी, चिपळूणी, संगमेश्वरी, आगरी, मालवणी, कारवार-गोव्याची कोकणी, कोळी-मुसलमानांची उर्दू मिश्रित बोली, चित्पावन ब्राह्मणी बोली” असे अनेक सुक्ष्मभेद आहेत. कोल्हापुरी, सातारी, वऱ्हाडी, खानदेशी, पुणेरी, पंढरपुरी, नागपूर कडील विदर्भी भाषा, बेळगावी कन्नड-मिश्रित मराठी, असे आपल्या मराठीचे अनेक अनेक प्रकार. जुन्या ग्रंथातील भाषा, बखरीची भाषा हे आणि काही वेगळे प्रकार. हे सगळे प्रकार ऐकायला विलक्षण सुंदर आहेत. प्रत्येक बोलीचा ठसका अस्सल..! आणि शब्दांचे सामर्थ्य तर केवढे..आणि एका शब्दाचे किती अर्थ..! एक उदाहरणच पाहूया ना.

एखाद्या घरात सकाळी एखादा खडूस म्हातारा पूजेला बसलेला असतो. त्याच्या लक्षात येतं की चंदनाचं “खोड” एकदम झिजून गेलंय. तो म्हणतो,

“सुनबाई, जरा चंदनाचे नवे खोड दे गं बाई. हे जुने खोड उगाळता येत नाही आता..”

सुनबाई आपल्या कामात. मुलांचे डबे, स्वैपाक, या सगळ्यात आधीच उशीर झाल्याने “करवदलेली”. धाड-धाड जात ती कपाटातले “खोड” काढून त्या सासऱ्यापुढे देते. जाताजाता हळूच पुटपुटते.. “ ही जुनी “खोडं” कधी संपणार कुणास ठाऊक...”

दूर तिथे खोबरं खवणत बसलेल्या सासूबाईंना कमी ऐकू येत असूनही हे मात्र नेमकं ऐकू येतं.. त्या तिथून पुटपुटतात,

“हिला आम्ही नकोसेच झालोय. काय हे वागणे हिचे. नाहीतरी मी म्हणालेवते चंद्याला, या मुलीत काहीतरी “खोड” काढून हिला नापसंत करूया..पण तो रुपाला भाळला होता नं तेंव्हा...!”

तेवढ्यात परसबागेत काम करत असलेला चंद्या घरात येतो, म्हणतो, “ अगं आई, आपल्या त्या जुन्या आंब्याचं काही बघायला पाहिजे. खोडाला वाळवी लागलीय आता..”

या छोट्याशा परिच्छेदातील मराठी ही “पुस्तकी सर्वसामान्य मराठी” आहे. तरीसुद्धा एक “खोड” हा शब्द किती प्रकारे वापरता येतो आणि त्यामुळे अर्थ कसे कसे बदलत जातात हे जाणवले की आपल्या भाषेच्या ताकदीचे कौतुक वाटते.


अशीच एकदा मी गंमत अनुभवली कोल्हापुरात.

सुट्टीत भावाकडे गेलो होतो. अंबाबाईच्या दर्शनाला गेलो. तिथे नेमकी त्या दिवशी ही गर्दी. लोकांनी रांगा लावलेल्या. मी महाद्वारातून नमस्कार करून परत फिरणार इतक्यात एक काका म्हणाले,

“आवो, जाता कशापाई..या इथं पाळीत उभारायला.. १५-२० मिन्टात पोचतोय की आत..” पाळी हा शब्द “वेगळ्या” अर्थाने माहीत. त्यामुळे “पाळीत” उभं कसं राहायचं ? असं क्षणभर वाटून गेलं..!! त्यातही रात्रपाळी, कानाची पाळी हे अजूनही  वेगळे अर्थ.

ओटीत घेणे, ओटीवर घेणे याचेही वेगळे अर्थ. एखाद्या “ओटीत घेणे” म्हणजे जवळ घेणे, दत्तक घेणे असा अर्थ. बायकांच्यात “ओटी भरणे” हा अजून वेगळा अर्थ सांगणारा शब्द. तर जुन्याकाळी विशिष्ट लोकांनाच घराच्या “ओटीवर” घेतलं जाई. बाकीच्यांना बाहेर पायरीशी तरी बसावे लागे किंवा पडवीत तरी.

पडवी, ओटी, माजघर, शेजघर, स्वैपाकघर, न्हाणीघर अशा भागात तेंव्हा घर विभागलं जात असे. आताच्या वन – टू बीएच-के च्या जमान्यात तशी मोठी घर पाहायला मिळणं शहरी लोकांच्या मात्र नशिबात नाही आणि ते शब्द ही कदाचित नामशेष होऊन जातील...!

अशीच मजा “सुपारी” या शब्दाची. लग्नाची सुपारी, खायची सुपारी, एखाद्याला “मारायची” सुपारी असे किती अर्थ..!


मारणे हा शब्द सुद्धा आपण किती प्रकारे वापरतो. एखादा नव्यानं “मराठी भाषा” शिकणारा निश्चित गोंधळून जाईल अशीच परिस्थिती.

एखाद्याच्या कानफटात मारणे, तोंडात तंबाखूचा बार मारणे, थापा किंवा बाता मारणे, मस्का मारणे, गाडीला किक मारणे, झक मारणे, फोन मारणे (एखादा वेळेवर आला नाही, की पूर्वी लोकं पट्कन म्हणत, त्याला एक फोन मारून बघ..कुठं झोपलाय कुणास ठाऊक..! हल्ली सगळे “कॉल” करतात / मारतात.) “मूठ मारणे” हा शब्दप्रयोग सुद्धा दोन अर्थी वापरला जातो...!


तर काही काही शब्द असे असतात की ते उच्चारले, ऐकले की मनात एक चित्र पट्कन उभं राहतंच.
बुळबुळीत, कुळकुळीत, झळझळीत, झुळझुळीत, सुळसुळीत, गुळमुळीत, खळखळत, मळमळत, किंचाळत, कळवळत, फळफळत असे सगळे “ळ” चा प्रभाव असणारे शब्द नुसते उच्चारून पहा. तुम्हाला खात्रीच पटेल त्यांच्या प्रभावाची. “बुळबुळीत शेंबूड”, झळझळीत सूर्यप्रकाश, गुळमुळीत उत्तरं, सुळसुळीत साडी हे शब्दप्रयोग क्षणात आपल्या समोर खणखणीत चित्रं उभी करतात.

तर आपल्या भाषेतील काही शब्द असतातच भारदस्त (हाही शब्द त्यातलाच एक). लफ्फेदार, तजेलदार, रुबाबदार, तडफदार, अहंमन्य, उद्विग्न, विद्वत्तापूर्ण, अभ्यासपूर्ण, भग्नावशेष, कारुण्यगर्भ, आनंदोत्सव, वरदहस्त, शुभाशिर्वाद, सौभाग्यवती, राजमान्य, लोकमान्य, प्रज्ञावंत, श्रीमंत, विद्याविभूषित इ.. एखाद्या वाक्यात त्यांचा वापर केला तरी ते वाक्य वजनदार होऊन जातं. तशीच मजा काही क्रियापदांची.

स्टोव्हचे फरफरणे, कुत्र्याचे गुरगुरणे, गरीबाचे थरथरणे, पाय लटपटणे, फोड टरटरुन फुगणे, तापाने फणफणणे, सापाचे सरपटणे, गाईचे हंबरणे, नवरा-बायकोचे एकमेकांवर खेकसणे, अधिकाऱ्याचे दरडावणे, घोड्याचे खिंकाळणे अशी शेकडो क्रियापदांची यादी सांगता येईल. मात्र विविध प्रातांत ही क्रियापद अशीच वापरतील याची मात्र खात्री नाही हं..!

उदाहरणार्थ एखादा मुलगा जर आपल्या ग्रुपमध्ये हसत असेल तर कोल्हापूरच्या मंगळवार-बुधवार पेठेतला एखादा दोस्त पट्कन म्हणून जातो, “का रं, लई खिंकाळायलाईस...” तर एखादा वऱ्हाडी- वैदर्भी माणूस दुसऱ्याला म्हणून जातो, “काहून हासून राहिलाय वो...”

या भाषेला अजून लज्जत येते ती बोली भाषेतील वेगळेपणामुळे. लोक बोलत असताना अनेकदा लिंग, वचन या सगळ्या सगळ्यांची उलटापालट होते, शिव्यांची झणझणीत फोडणी बसते, एकच “काला” होतो, पण जे काही ऐकायला मिळते ते माझ्यासारख्या शब्दप्रेमी माणसाला सुखावते.

एखाद्या कोकणी घरात संध्याकाळी गजाली रंगलेल्या असतात. चार सहा निरुद्योगी सहजच तिथं एकत्र असतात आणि नसलेल्याचे झकास उखाळे-पाखाळे काढले जातात.
गावभर उचापत्या करणाऱ्या, सगळीकडे कामात स्वतः सहभागी होणाऱ्या कुणा “अनंतासाठी” एखादा तात्या, बोलून जातो,

तो फोदरीचा अंत्या, च्यायझो कुठे झक मारायला जात असतो कुणास ठाऊक. आपली बायको नाय सांभाळता येत धड आणि चाललाय दुसऱ्याची लग्नं लावायला..! परवा आलीवती ती तक्रार घेऊन माझ्याकडे. म्हणाली, तात्या तुम्ही तरी सांगा हो त्यांना, जरा घरात लक्ष द्या म्हणून..! तिथं त्याच्या घराचं लाईट कनेक्शन तोडलंन त्या एमेसिबी वाल्यानं, आणि हा आपला बाझवत फिरतोय गावोगावी..!”

अत्यंत घाणेरड्या शिव्या असूनही ना ऐकणाऱ्याला त्यात काही वाईट वाटतं ना बोलणाऱ्याला...! खरं म्हणजे शिव्या हे एक वेगळा आणि स्वतंत्र विषय. मात्र गमतीची गोष्ट म्हणजे विविध भाषेतल्या शिव्या “ठराविक लैंगिकतेशी” येऊनच थांबतात. बहुदा आई-बहिणीवरून शिवी दिली की माणूस जास्त ते मनाला लाऊन घेतो, म्हणून जगभरातील सगळ्या भाषेतील शिव्या तिथेच येऊन पोचतात. एखादा कोकणी माणूस “रांडेच्या” म्हणतो, तर घाटावर “रांड्या, रांडलेका” असं म्हणतात. आणि इंग्रजीत ते थेट “bastard” होऊन जातं. एखादा मालवणी माणूस “मायझव्या” म्हणतो तर दुसरा “मादरचोद” तेच इंग्रजीत “mother-fucker” होऊन जातं.

अनेक घाणेरड्या म्हणी, वाक्यप्रयोग, शब्दप्रयोग हे शेकडो वर्षापासून समाजात प्रचलित आहेत. तर ज्या शब्दांना “घाणेरडेपण” चिकटायला हवे असे “गर्भगळीत, हतवीर्य, गलथान” इ. शब्द समाजात सर्रास वापरले जातात.

मुंबईमध्ये भाषेची तऱ्हा अजूनच निराळी. तिथे एकच अपार्टमेंटमध्ये कोकणी, वैदर्भी, खानदेशी, गुजराती, सिंधी, तमिळ असे सगळेच एकत्र. त्यामुळे भाषेची प्रचंड सरमिसळ. त्यातही इंग्रजीचं प्रस्थ भयंकर. किंबहुना इंग्रजी शब्द अधूनमधून पेरणे हे “प्रतिष्ठितपणाचे” लक्षणच...! मग मुलांच्या प्ले- एरिया जवळ बायकांच्या गप्पा रंगतात,

“ अय्या रितू, नवीन ड्रेस आहे गं हा. सो ब्युटीफुल. कसली क्युट दिसतेयस गं..! आणि काल नाही दिसलीस ती अर्शिताच्या बर्थडे पार्टीला ?”

मग ती दुसरी म्हणते, “नाय गं. मी काल एअरपोर्टवर गेली होती. स्मितु (म्हणजे तिचा नवरा अस्मित) लंडनला गेला नं बिझनेस ट्रीपला. त्याला नं मुळीच करमत नाही माझ्याशिवाय..म्हणाला मी प्लेनमध्ये बसेपर्यंत तू जवळ हवीस, पण नाही नं जाऊ देत तिथपर्यंत.. म्हणून मग किमान त्याला “सी-ऑफ” करून आले.”

तर त्याचवेळी लोकलमधून धक्के देत चढलेला “त्या पहिलीचा नवरा” दुसऱ्या धक्के देत चढणाऱ्यावर ओरडत असतो,

“दिखता नाय क्या? पाय के उपर पाय देके धक्का क्यू मारताय? एक तो खडा रय्नेको जागा नई उपरसे तुम धक्का मारता है ? हमभी डोंबिवली तक ही जायेगा, इधर डब्बा पयलेसे भरेला है..!”

एखाद्या पुणेरी, ब्राह्मणी शुद्ध बोलणाऱ्या कुटुंबात, संध्याकाळची वेळ. मैत्रिणींबरोबर आईस्क्रीम खायला मुलगी बाहेर गेलेली. अजून परतलेली नाही. दिवसभर नोकरी करून घरी परतलेल्या बापाचा त्रागा सुरु होतो. तो आपल्याच बायकोवर जाळ काढू लागतो,

“जा म्हणावं रात्र रात्र बाहेर. तुमचे लाड सगळे. एकदा तोंड काळे करून आली की समजेल. इथे आम्ही रक्त आटवून मर मर मरतोय, तुम्हाला काय त्याचं. बघावं तेंव्हा बाहेर जायचं आणि खावा आईस्क्रीमं..! कोणास ठाऊक मैत्रिणीबरोबर जातेय का कुणा मवाल्याचा हात धरून फिरतेय..”
रोज मुलाची अशीच बडबड ऐकताना चिडलेल्या त्या गृहस्थाचा म्हातारा बाप मात्र बेळगावी थाटात, विशिष्ट हेल काढत बोलून जातो, “कशाला उगाच बडबडून सोड्लायास रे. ती काय कुठे न सांगता नाही न गेली? आणि तू तरी कुठं लक्ष देऊन वाग्तोय्स म्हणतो मी? जरा घराकडं बगायचं सांगावं कशाला लागतंय रे तुला? लग्न तूच मनानं करून बसलायस न्हवं ? आपल्याच बायको-पोरांशी प्रेमानं बोलायला काय पैशे पडतात काय रे मग? बगाव तेंवा तोंड-गांड एक करून आपलं भडाभडाभडा बोलायचं म्हंजे बरं न्हवं बग..!

कोल्हापूरकडे तर “नपुसकलिंग” जास्त वापरलं जातं. नेमानं तिथे मटनपार्ट्या होतात त्यांना “रस्सा मंडळ” म्हटलं जातं. एखाद्या दिवशी एखादा भिडू दिसत नाही. मग पाटलाचा अरण्या (अरुण पाटील) म्हणून जातो, “ते रावल्या कुट  गेलय रं? कदी कुट टायमाला पोचनार नाय बग ते..! हितं आमी कवापास्न वाट बघा लागलोय, अनि ते बसलं आसल कुठतरी शेण खात..”
ते आलंय, ते गेलंय, ते बोलालंय, चालालंय, असं सगळं बोलणं. ऐन पेठेतली बाई सुद्धा शेजारणीला म्हणते, “आमचं ह्यांनी जेवा लागलेत गं, तर मन्या हगा लागलंय बग..त्यांचं आवरलं की येते मग बोलायला.”
त्याच वेळी गावाबाहेर एका झोपडीत तीन दगडांच्या चुलीवर तव्यावर भाकरी टाकली जाते. बाजूच्या गोणपाटावर नवरा अपराधीपणे मुकाट बसलेला. जगण्याच्या लढाईत थकून गेल्यानं, सगळं विसरायला दारू पिऊन आलेला. डोळ्याला पदर लाऊन बसलेल्या त्या माउलीचे शब्द मग तडतडत जातात..

“कशापायी ह्ये दारूचं लावून घेतलं मागं? दिसामाजी कायबाय मिलत होतं तेबी सगलं जाया लागलंय यापाई. पदरात दोन पोरं हायती, ती म्हातारी तिकडं मराया टेकलीया, त्याचा तरी इचार करावा म्हन्ते मी...दोन येलची भाकरी बी मिलल याचा भरोसा नाय, अनि तुमी बसलाय दारूची संगत धरून...कसं जगावं आमी?”

 


माणसाला बोलण्याचं वरदान मिळालं आणि भाषा ही आपल्या जीवनाचा भाग बनून गेली. लिहिण्या-वाचाण्यापेक्षाही बोलण्यातून  भाषा अंगी भिनते. आपली भाषा मागच्या शेकडो पिढ्यांनी घडवली, टिकवली, आपल्या परीने समृध्द केली. ते बोलत राहिले आपल्या भाषेत, म्हणूनच ती आपल्यापर्यंत पोचली. आपण भाषा अधिक समृद्ध नाही करू शकलो, तरी आपली भाषा पुढच्या पिढीकडे किमान तशीच तरी पोचवायला हवी ना? तुम्हाला काय वाटतं?

-    सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)

-    (पुढचा लेख – “इतिहासाचा अभ्यास कशासाठी?” )

इतिहासाचा अभ्यास ? कशासाठी?


बरेच दिवस हा विषय डोक्यात अर्धवट तयार होता. मात्र कामाच्या प्रचंड घाई-गडबडीत शब्दबद्ध करायलाच वेळ मिळेना. शेवटी कसंतरी स्वतःच्याच उरावर बसून आता हा लेख पूर्ण केलाय. कसा वाटतो ते मात्र जरूर कळवा..

इतिहास. शाळेतील अनेक विषयांपैकी एक विषय. ५०-१०० मार्कांचा. त्यातही पुढच्या आयुष्यात, उच्च शिक्षणासाठी बहुतेकदा मदतीला न येणारा. तारखा, सन, इ.स. पूर्व आणि विविध कॅलेंडर्सच्या जंजाळात अडकलेला. त्यातही स्वतःला इतिहास संशोधक समजणाऱ्या अनेकांचे, विविध दिनांकाविषयी मतैक्यापेक्षा मतभेदच जास्त. त्यामुळे या इतिहासाविषयी शाळा-शाळांतून मुलांची नाराजीही जास्त. खरं बोलायचं तर मुलांपेक्षा पालक जरा जास्त नाराज. कित्येकांचं ठाम मत तर असे की, “हे इतिहास-भूगोल असे विषय शाळेतून शिकवायचेच कशाला? आणि शिकवायचेच असतील तर त्याचे मार्क्स कशाला देता? उगाच आमच्या मुलांची टक्केवारी कमी होते ना?”

खरंच इतिहास इतका टाकावू विषय आहे ? आपण इतिहासाकडे का दुर्लक्ष करतोय? इतिहासाचा अभ्यास कशासाठी करावा हे खरंच आम्हांला का कळत नाही ? स्पष्ट बोलायचं तर, आम्हाला सगळं कळतंय, पण वळत मात्र नाहीये...

एकदा एका शाळेत मी शिव-चरित्राविषयी ४ दिवसांची व्याख्यानमाला करत होतो. त्यातला एक दिवस. सिद्दी जौहरचा वेढा, शिवरायांचं पलायन, बाजीप्रभू देशपांडे यांचं बलिदान आणि ती पावन खिंड हा विषय होता त्या दिवशी. काय मुलं रंगली होती सांगू त्या इतिहासात. काही हळव्या मुलांना तर बाजीप्रभूंचे ते बलिदान ऐकून रडूच आलं. चक्क ते शिक्षकच म्हणाले, “अहो, तुमच्या कथेत मुलं किती रंगून गेली होती. हेच आम्ही वर्गात शिकवायला गेलो तर मुलं वर्ग डोक्यावर घेतात. जरा म्हणून काही ऐकत नाहीत. एका प्रश्नाचं उत्तर त्यांना देता येत नाही.”

मग मी विचारलं, “सर, तुमचे प्रश्न कोणते? आणि तुम्ही त्यांना तो धडा नीट समजावून सांगितला का?”

ते म्हणाले, “प्रश्न तर सोपे आहेत नं, सिद्दी जौहर ने कोणत्या साली वेढा घातला? कोणत्या किल्ल्याला वेढा घातला? पन्हाळा या किल्ल्याची थोडक्यात माहिती कशी सांगाल? बाजीप्रभू देशपांडे शिवरायांना काय व का म्हणाले? पन्हाळगड व विशाळगड या दोन किल्ल्यातील अंतर किती आहे? असे काही प्रश्न आहेत. आणि एकदा वर्गात मी धडा वाचून दाखवला नं त्यांना. त्यात समजवायचे काय?”

मी डोक्याला हात लावला. आपण इतिहासात खरोखर घडलेला एक अद्भुत प्रसंग जर मुलांना नीट सांगितला नाही, तिथे घडलेल्या घटनेची, युद्धाची नकाशा बनवून जराही माहिती दिली नाही, ते ठिकाण शहराजवळ असूनही मुलांना सहलीच्या निमित्ताने दाखवले नाही तर कशी मुलं त्या इतिहासाशी समरस होणार?

 दुर्दैवाने आमच्या इतिहासाच्या पुस्तकातूनही आमच्या देशातील महान लोकांपेक्षा देशावरील आक्रमकांचाच इतिहास जास्त विस्ताराने लिहिला गेलाय. त्यामुळे या देशातील भव्य आणि महान इतिहासाशी मुलांची नाळ तुटू लागलीय. आपल्या देशातील अतिभव्य मंदिरे, अत्यंत पुरातन बंदरे, स्थापत्यकला, शिल्प-चित्र संगीत आणि नृत्य कला, प्राचीन महा-विद्यालये, एकेकाळी प्रगत असणारी विविध शास्त्रे हे अनेक पालकांना, शिक्षकानाही माहीत नाही. याच आमच्या देशात कोणत्याही आधुनिक उपकरणाशिवाय गणित, खगोलशास्त्र, विज्ञान, शरीरशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, यंत्रशास्त्र यात अनेक अचूक सिद्धांत मांडले गेले जे आजही परकीय अभ्यासक अभ्यासत आहेत आणि “ हे सगळं त्याकाळी या माणसांना कसं कळले?” या विचाराने अचंबित होताहेत.
 
मात्र हे आपल्या देशातील आजच्या अनेक पालकांनाच, शिक्षकांना जिथे माहीत नाही तिथे ते मुलांना कसं ठाऊक होणार? आजही तळपदे नावाच्या एका मराठी शास्त्रज्ञाने प्रथम विमानाचा शोध लावला हेच आम्हाला न सांगता राईट बंधूंचेच कार्य जर सांगितले गेले तर आपल्या मुलांना आपल्या देशातील अशा गोष्टींचं कौतुक कसं वाटेल? त्यांना प्रोत्साहन कसं मिळेल? त्यांना स्फूर्ती कशी मिळेल? त्यांचं देशप्रेम कसं वाढेल?

 “शिवाजीमहाराज की जय, विवेकानंद अमर रहे, बाबासाहेबांचा विजय असो, जय परशुराम, जय श्रीकृष्ण, जय श्रीराम, ” अशा घोषणा देत आपण नवा “दैववाद” जन्माला घालत आहोत. अशा घोषणा दिल्या, त्यांच्या पूजा केल्या, जागोजागी फोटो, पोस्टर्स चिकटवले, पुतळे व मंदिर बांधले म्हणजे आपलं काम झालं आता ते सगळ्यांनी जपलं पाहिजे असं म्हणत त्याच्या जोरावर काहीजण दहशतसुद्धा माजवत आहेत. समाजातून “वाईट आणि राक्षसी वृत्ती” नष्ट होण्यासाठी देवमाणसे तयार करण्याऐवजी आम्ही समाजाला पुन्हा “नवीन देव” देण्याचं कार्य इमाने-इतबारे करतोय. कर्तृत्वान व्यक्तींचे फक्त दैवतीकरण करत आहोत. इतिहासात डोकावलं तर असं सतत सुरु आहे हेच दिसतं. पण आपला इतिहास आपण शिकतो कुठं? आपल्याला नीट शिकवला कुठे जातो?

दुर्दैवाने इंग्रज काळापासून हेच सुरु आहे. भारताच्या इतिहासातील अनेक अमूल्य गोष्टी ज्या इंग्रजांनी जगासमोर आणल्या त्यांनीच ते सर्व ज्ञान भारतीयांपासून दूर ठेवले, कारण ती त्यांच्या सत्तेची गरज होती. पण मग आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तरी आपण काय केलं? काही फारसं वेगळं केलं नाही. आपल्याला सोईस्कर असा इतिहास विविध सरकारांकडून मात्र लिहिला गेला तो फक्त राजकीय फायदे तोटे पाहूनच. तरीही जेंव्हा जेंव्हा शाळा-कॉलेजच्या सहली विविध ऐतिहासिक स्थळांना भेटी देतात, तेंव्हा त्या मुलांचं मन मोहरून येतं. कारण शेवटी आपल्या देशाशी, आपल्या मातीशी, इथल्या प्राचीन घटनांशी, पूर्वजांशी कुठेतरी आपलं नातं असतंच. मात्र ते नातं जोडून देण्याचं काम पालकांनी आणि शिक्षकांनी करायला हवं. इथे इतिहासाचा अभ्यास कामाला येतो.

 बाकीच्या जगाचं राहूदे, आपण किमान आपल्या देशाचा विचार करू. कारण जगातील इतरांच्या तुलनेत सर्वात जुनी नागरी व्यवस्था (civilisation) आपल्या भारतात होती. गेल्या ४-५ हजार वर्षे या देशातील लोकं कशी राहात होती? त्यांच्या वेशभूषा, अन्न-संस्कृती, राहणीमान, घर व नगर बांधणीचे ज्ञान, संरक्षण व्यवस्था, उपजीविकेची साधनं, त्यांचे गुण-दोष काय होते? हे सगळं अभ्यासणं विस्मयकारक आहे.

कोणत्या काळात कोणती चांगली घटना घडली? कोणती वाईट घटना घडली, त्या-त्या वेळी आपले पूर्वज कसे वागले, त्यांनी जर योग्य निर्णय घेतले तर त्याचा त्यांना कसा फायदा झाला? त्यांच्या चुकीमुळे कशा आपत्ती आल्या? जनजीवन कसं विस्कळीत झालं? नैसर्गिक आपत्तीच्या वेळी त्या काळी कशी दक्षता घेतली गेली / किंवा दक्षता नाही घेतली गेली? कोणत्या आक्रमकांनी आपल्या देशावर आक्रमण केले? त्याला आपण कसे तोंड दिले? इथली पाणी संस्कृती कशी होती? इथली वन संस्कृती कशी होती? धातूंचा वापर कसा होत होता? त्याची शुद्धता कशी तपासली जात होती?  या सगळ्याचा माणूस जेंव्हा अभ्यास करतो तेंव्हा ते सगळं थोडंच फक्त मार्क्स मिळवण्यासाठी असतं का? यातून आपल्याला काहीच प्रेरणा मिळत नाही का? आपल्या पूर्वजांच्या चुका पाहताना नवीन काही शिकता येतं हे आपल्याला कळत नाही का?

 अशा इतिहासातून जरूर प्रेरणा मिळत असते. फक्त तो इतिहास कुणीतरी सोप्या भाषेत, सुसंगत पद्धतीने मांडायला हवा. कोणाच्या राग-लोभाची पर्वा न करता अत्यंत स्पष्टपणे सांगायला हवा. पुराव्यानिशी मांडायला हवा. तेंव्हा कुठे तो इतिहास केवळ एक सनावळी न उरता आपल्या मनात झिरपतो आणि मगच माणसांना प्रेरणा मिळू शकते. त्यातूनच इतिहासात अजरामर होणारे नवे व्यक्तित्व जन्माला येते.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतिहास हा केवळ महापुरुषांचा, समाजात प्रतिष्ठा मिळवलेल्यांचाच नसतो. तर इतिहास सर्व सामान्य जनतेच्या कष्टांचा, सुख-दुःखांचा, पराक्रमाचा, त्यागाचा, कलंकांचा, वाईट वर्तनाचा, निसर्गापुढील हतबलतेचा, संकटातून नवीन रस्ता शोधणाऱ्यांचासुद्धा असतोच. तो सुद्धा अभ्यासाला गेला पाहिजे. दुसरी एक सर्वमान्य समजूत अशी की इतिहासाची पुनरावृत्ती होतंच असते. ज्यावेळी एखाद्या घटनेला आपल्याला सामोरे जावे लागते, त्यावेळी जर आपण इतिहास अभ्यासाला असेल, तशीच घटना आपल्याला माहिती असेल, त्या लोकांनी काय चूक किंवा बरोबर केलं हे माहीत असेल तर आपल्यालाही त्याप्रकारे चट्कन निर्णय घेता येतो. इथे इतिहास तुम्हाला अक्षरशः ‘रेडीमेड उत्तरं’ समोर आणून देत असतो. मात्र एकतर आपल्याला त्याची जाणीव नसते किंवा आपण बेपर्वा असतो. आणि मग जेंव्हा महाभयंकर घटना घडते, तेंव्हा अशी मस्तवाल, बेपर्वा माणसे त्यात आपलं व समाजाचं जीवन धोक्यात घालतात. हे होऊ नये म्हणून इतिहासाशी सलगी करायलाच हवी.


 लहानगी, चिमुरडी मुलं सुद्धा ऐतिहासिक ठिकाणी किती रमून जातात. फक्त आपण त्यांना तिथं न्यायला हवं. सुदैवानं महाराष्ट्रातच नव्हे तर अवघ्या देशात अशी लाखो ठिकाणं आहेत ज्यांचाशी कुठला ना कुठला ऐतिहासिक संदर्भ जोडला गेलाय. त्या ठिकाणाचं जतन करणं हे आपलं पहिलं कर्त्यव्य आहे. सगळ्याच गोष्टी सरकार करेल अशा नकारात्मक सवयीचीच आपल्याला सवय लागली आहे. आणि त्यामुळे मग आपोआप फक्त पोकळ वादविवाद करणं, उठसूठ “सरकार हे करत नाही, ते अधिकारी तसं करत नाहीत” अशा टीका करण्यात, तावातावाने नुसत्या गरमागरम चर्चा करण्यात आपण धन्यता मानू लागलोय. आणि आजूबाजूचा इतिहास समजावून घेण्यापेक्षा, तिथे मुलांना  घेऊन जाण्यापेक्षा, आपली मुलं चकचकीत मॉलमध्ये कृत्रिम खेळण्यांशी खेळायला पाठवण्यात आपली इतिकर्तव्यता दिसून येत आहे. अनेक घातक समजुती, खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी, सामाजिक वर्तन, अंधश्रद्धा यात प्रचंड बदल होताहेत.

अंधश्रद्धांची गोष्ट घ्या. जुन्या इतिहासात पाहिलं तर दिसून येतं की गावागावातून अनेक भैरोबा, रोकडोबा, गरजाई, मरजाई इ. देवदेवता आणि त्यांच्या अंगावर शहारे आणणाऱ्या अनेक भयंकर प्रथा दिसून येतात. अनेक ठिकाणी तर स्त्रीच्या नशिबी अत्यंत वाईट भोग येत ते या देवतांच्या मुळेच. त्यांच्या नैवेद्याच्या कहाण्याही भयंकर. कुणाला बोकडाचा बळी लागे तर कुणाला रेड्याचा. शेवटी सगळं जाई माणसाच्या पोटात..! मग हळूहळू जशी संतांनी समाजात जागृती घडवली तशी काही माणसे शहाणी होऊ लागली. मात्र आता पुन्हा काय चित्र दिसतंय? आम्ही नवीन बाबा, महाराज निर्माण केलेत, त्यांच्या नव्या अंधश्रद्धा आत्मसात केल्या आहेत. नवा जातीयवाद, पंथवाद उदयास आला आहे. आमची नेते मंडळी सुद्धा आजकाल विशिष्ट बाबा-महाराजांना प्रोजेक्ट करतात. विशिष्ट महापुरुषांच्या नावाने फक्त दहशतीचे राजकारण करतात आणि सगळे त्यांच्यामागे लागतात. त्यातून फक्त आपला स्वार्थ साधतात.
समाज जेंव्हा अशा देव-देवतांच्या आहारी जातो, स्व-कर्तृत्वाने मोठं होण्याची स्वप्नं पहात नाही, देश आणि समाजहितापेक्षा वैयक्तिक स्वार्थात गुंतून जातो, परकीय गोष्टींनी भुलून जातो तेंव्हा आपण आपलं स्वातंत्र्य धोक्यात टाकत असतो हा इतिहास आहे. आणि हे पुन्हा पुन्हा सुरु आहे. मात्र आपण हे सगळं टाळून, फेकून देऊन पुढं जायला हवं. ‘या देशातील प्रत्येक व्यक्ती देश घडवू शकते’ या विश्वासाने सगळे वाद बाजूला ठेवून एकत्र यायला हवं. तरच एक समर्थ राष्ट्र म्हणून आपलं नकाशातील स्थान पक्कं राहू शकेल.

दुर्दैवाने “आमच्या या देशाने कुणावर कधी आक्रमणं केली नाहीत” असं छाती फुगवून सांगणारे, “आमच्या इतिहासाचं विस्मरण झाल्याने, आणि आपण त्याच त्याच चुका पुन्हा केल्याने गेल्या हजारो वर्षात परकीयांची हजारो आक्रमणं भोगली” हे कधीच आम्हांला सांगत नाहीत.

जो देश आपला इतिहास विसरतो, त्यातल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सावध व सज्ज रहात नाही, स्वतःला काळाप्रमाणे बदलून बलशाली बनवत नाही त्या देशाला स्वतंत्र राहण्याचा अधिकार टिकवता येत नाही हे एक जागतिक सत्य आहे.

आज जेंव्हा देश काही नव्या बदलांना सामोरा जात आहे, तेंव्हा आपण आपला इतिहास अभ्यासणे, व त्यातील उत्तम ते स्वतः अंगीकारणे आणि पुढच्या पिढीकडे सोपवणे ही काळाची गरज बनली आहे. अन्यथा इतिहास आपल्याला कधीच माफ करणार नाही..!

-    सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)
(पुढचा लेख – “पानी..पानी रे..” )

Saturday, 15 March 2014

माझे जीवन “गाणे”..!

“मनापासून” या लेखमालेतील हा पुढचा लेख, आयुष्य व्यापून टाकणाऱ्या गाण्याविषयी..!
संगीत हा मानवी आयुष्याचा एक अविभाज्य घटक. खोल अथांग शास्त्रीय संगीतापासून ते बहारदार हलक्या फुलक्या गाण्यापर्यंत शेकडो प्रकारांनी संगीत आपल्याला रमवते. भान विसरायला लावते. खेडोपाडीच्या, देशोदेशीच्या अनेकांना एकत्र आणायची ताकद संगीतात असते. म्हणूनच ताकदीचं गाणं कसं हवं या प्रश्नाचं एका वाक्यात उत्तर द्यायचं तर, ते अवघ्या विश्वाला एकत्र आणणारं हवं. तेही गाण्यातूनच सांगायचं तर;

“अक्षय गाणे, अभंग गाणे, गाणे हे गाणे

सर्व जगाचे मंगल, मंगल माझे गाणे,

या विश्वाची एकतानता, हे माझे गाणे...माझे गाणे, एकच माझे नित्याचे गाणे..!”

बालकवींच्या शब्दांत आणि लताच्या सुरातलं हे गाणं खऱ्या अर्थानं संगीताचं विश्वात्मक ऐक्य सांगून जातं असं मला वाटतं.


सुदैवाने आपल्या या भल्या मोठ्या देशाला संगीताची फार प्राचीन परंपरा लाभलीय. नुसतं प्राचीनच नव्हे, तर गेल्या २-3 हजार वर्षात परदेशातून आलेले विविध प्रकार या भारतभूमीत रुजले आणि विस्तारले. लाखो प्रकारचं काव्य, लोकगीतं हा तर खऱ्या अर्थी आमचा अमीट ठेवा. शेतकऱ्यांची, पोटासाठी भटकणाऱ्या शेकडो जमातींची, साधुसंतांची, माजघरातून कधीच पाऊल बाहेर न टाकलेल्या स्त्रियांची असंख्य गाणी लोकांनी  आपल्या मनात जपली. पिढ्यानपिढ्या हा वारसा पुढे सोपवला. अनेक प्रांतातील विविध प्रकारचं संगीत, किती गीतकार, गायक, किती वादक, किती संगीतकार...! विचार करू गेलं की हे सगळं सगळं स्तिमित करून जातं.

कधी परक्या भूमीत वावरताना, जेंव्हा एखादा शेजारचा माणूस, “कभी कभी, मेरे दिलमें खयाल आता है..” असं काही गुणगुणू लागतो, तेंव्हा देश, धर्म, प्रांत,भाषा असे सगळे भेद दूर होऊन तो क्षणात तुमचा दोस्त बनतो. त्याला कारण फक्त आणि फक्त संगीत..! हे मी अनुभवलंय.

माणसाच्या जन्मापासून त्याच्या मृत्युपर्यंत प्रत्येक टप्प्यावर संगीत आपल्या आयुष्यात असतंच. कधी ते अंगाई गीत बनून आपल्याला जोजवतं तर कधी दुःखांच्या क्षणी मोरपीस बनून मनाला सुखावतं. लहानपणासून अनेक प्रकारचं संगीत कानावर पडत गेलं आणि गाण्याचं व्यसन लागलं ते न सुटण्यासाठीच. आठवायलाच गेलं तर, अगदी लहानपणी रेडिओवर कानी पडणारी अनेक गाणी, अनेक कार्यक्रम आठवतात. मुंबई आकाशवाणीवरील संतवाणी, आपली आवड, कामगार सभा, विविध भारतीवरील जयमाला, ऑल इंडिया रेडिओ उर्दू सर्विस, रेडिओ सिलोन वरील हमेशा जवा गीत (अभी तो मै जवान हूँ.. हे लताचं १९५१ मधील “अफसाना” सिनेमातलं सदाबहार गाणं त्याची signature tune” होतं. लताने जेंव्हा ते गायलं होतं तेंव्हा माझे वडील सुद्धा ९-१० वर्षाचे असतील, तरीही ते गाणं आमच्या पिढीपर्यंत पोचलं कारण त्याचा गोडवा.), असे कितीतरी कार्यक्रम हे तेंव्हा लोकांना रिझवायचे.


प्रत्येक कार्यक्रमाची “signature tune” सुद्धा लाखो लोकांच्या लक्षात असेल अजून..! कारण ती नुसती एक धून नव्हती तर सर्वांचं  तेंव्हाच आयुष्य त्याच्याशी जुळलेलं होतं. या रेडिओने आणि त्या गाण्यांनी ते दिवस सुखद केले.

आठवायला गेलं तर लहानपणीची सगळ्यात पहिली गाण्याची आठवण आहे ती “घनु वाजे घुणघुणा..वारा वाहे रुणझुणा..” ची. सकाळचे सहा- सव्वा सहा वाजलेले. हवेत मस्त गारठा. आईचं काही काम सुरु स्वैपाकघरात. रेडिओवर भक्तीगीते लागलेली. गोधडीत स्वतःला गुंडाळून मी अर्धवट झोपेत. मात्र हे गाणं लागताच झोप खाड्कन उडते. लताचा तो स्वर्गीय आवाज, ज्ञानदेवांचे शब्द, तो वाद्यमेळ या सगळ्या वातावरणाला अश्या काही प्रफुल्लित, उल्हासित करून टाकतो की संमोहित झाल्यासारखा मी कितीतरी वेळ ते गाणं आठवत...गुणगुणत राहतो..! त्यानंतर खऱ्या अर्थाने गाण्याची गोडी लागली.

रेडिओने खूप सोबत केली कॉलेज संपेपर्यंत. शाळेत वा कॉलेजात असतानाही रात्री उशिरापर्यंत जागून कधी अभ्यास केला नाही. ऑल इंडिया रेडिओवरील उर्दू सर्विस चे कार्यक्रम तेंव्हा रात्री ११/ ११.३० ला संपायचे. तोपर्यंत काय ते जागायचं. एकीकडे गणितं सोडवताना दुसरीकडे आशा- रफीचं “अच्छा जी मै हारी चलो मान जाओ ना...” लागलेलं असायचं.

लता, रफी, मुकेश, किशोर, आशा, हेमंत कुमार, मन्नाडे, तलत मेहमूद, गीता दत्त, शमशाद बेगम, महेंद्र कपूर पासून सुमन कल्याणपूर, मुबारक बेगम, हेमलता, येसुदास, मनहर, भूपेनदा असे त्या आमच्या आधीच्या जुन्या जमान्यातले सगळे तर जवळचे बनले होतेच पण त्यांच्यापेक्षा जुन्या काळातले पंकज मलिक (पिया मिलन को जाना..), सुरैय्या (ये कैसी अजब दास्ता हो गयी है..(संगीतकार सज्जाद- सिनेमा- रुस्तुब सोहराब) हेच गाणं आधी आठवतं), नूरजहा( आवाज दे कहा है.. आणि तिची इतर अविस्मरणीय गाणी) आणि अर्थातच सैगल (बालम आये बसो मोरे मनमे, बाबुल मोरा, गम दिये मुस्तकील..अशी अमर गाणी)  हे दिग्गजही ओळखीचे बनले.


त्या शाळा-कॉलेजच्या दिवसात आम्ही नुसते रेडिओवरील गाणी ऐकत नसू तर त्या गाण्याचे शब्द, गाण्यात वाजलेल्या विविध वाद्द्यांचे तुकडे (म्युझिक पीसेस), दोन कडव्यांच्या मधलं संगीत (इंटरल्युड म्युझिक), गाण्याचे गीतकार, संगीतकार, वादक त्या संबंधीच्या विविध कथा- दंतकथा असं सगळं समव्यसनी दोस्तांच्या चर्चेचा भाग असायचं. किती कहाण्या होत्या..!

आपके हसीन रुख पे आज नया नूर है..” या रफीने गायलेल्या अप्रतिम गाण्याची धून ओ.पी. नय्यर यांनी पियानोवर तयार केली. त्या स्वरांच्या धुंदीत त्यांना वाटलं की आत्ताच्या आत्ता हे त्या “बहारे फिर भी आयेगी” सिनेमा बनवणाऱ्या गुरुदत्त ला ऐकवावं. ओपी जेंव्हा त्याच्या घरी पोचले, आणि पाहतात तो...तेंव्हा गुरुदत्त जगातून निघून गेलेला होता.. त्यानं नुकतीच आत्महत्या केलेली होती..!

असे कितीतरी किस्से आहेत. शैलेन्द्र, हसरत जयपुरी, शकील बदायुनी, साहिर लुधियानवी, मजरूह, इंदीवर, राजेंद्र कृष्ण कैफी आजमी, असे दिग्गज प्रतिभाशाली कवी, तर संगीतकारांच्या पंक्तीत  एस-जे, नौशाद, अण्णा चितळकर (सी. रामचंद्र), सज्जाद हुसेन, खेमचंद प्रकाश, गुलाम मोहम्मद, एन. दत्ता, अनिल विश्वास, हुस्नलाल-भगतराम, रोशन, एस.डी. बर्मन, सलील चौधरी, ओ.पी.नय्यर, खय्याम, रवी, जयदेव, मदनमोहन, चित्रगुप्त, दत्ताराम, उषा खन्ना, कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि पंचमदा अशी बहारदार मंडळी.

 
या सगळ्यांच्या कलाकारीतून निर्माण झालेल्या त्या अद्वितीय संगीताने त्या दिवसांना नुसतं सोनेरी बनवलं नाही तर “कान” तयार केला. (तरीही इथे मी फक्त हिंदी चित्रपट गीतांचाच संदर्भ देतोय, कारण मराठी भावगीतं, चित्रपट गीतं हा तर एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे!) चांगलं संगीत म्हणजे काय याची मुलभूत समीकरणं शिकवली.

कदाचित आयुष्यभर मी फक्त जुनी हिंदी गाणी, उत्तमोत्तम मराठी भावगीतं, १९९० नंतरच्या आजवरच्या नव्या सिनेमातील उत्तमोत्तम गाणी (मैने प्यार किया, कयामत से कयामत तक, डीडीएलजे, रोजा, बॉम्बे, रंगीला इ.) ऐकत राहिलो असतो. पण १९९२ मध्ये रत्नागिरीत एका सांस्कृतिक कार्यक्रमात “सूरत पियाकी छिन बिसराये..” हे वसंतराव देशपांडे यांचं नाट्यगीत व नंतर तराणा एका गायकाने म्हटला. ते ऐकलं आणि संगीताचं नवं दालन माझ्यासाठी खुलं झालं. तोवर शास्त्रीय संगीत हा प्रकार दुरून ऐकलेला. हे काहीतरी डोक्यावरून जाणारं असं इतरांप्रमाणे माझंही मत झालेलं.

मात्र त्या दिवसानंतर रागदारी संगीत, नाट्यसंगीत जरा अधिक बारकाईने ऐकायचा प्रयत्न करू लागलो. पुलंच्या पुस्तकातील कुमारजी, वसंतराव, मन्सूर यांच्यावरचे लेख वाचून गाण्यात खरं सौंदर्य कुठं व कसं ओळखावं ते शिकत गेलो. त्यांच्या गाण्याबरोबरच भीमसेनजी, प्रभाताई अत्रे, मालिनीबाई राजूरकर, वीणाताई सहस्रबुद्धे, किशोरीताई, गजाननबुवा जोशी, उस्ताद अब्दुल हलीम जाफरखां व उस्मान खां (सतार), रामनारायण (सारंगी), अली अकबर खां (सरोद), बिस्मिल्ला खां (सनई), सुप्रसिद्ध शिव-हरी, एन् राजम व पं.दातार (व्हायलीन), उस्ताद झाकीर हुसेन या सगळ्यांचं जे जे उत्तम सापडेल ते ऐकत गेलो. शेकडो कॅसेट्स एकेकाळी जमवल्या.
 
गुणीदास संमेलन, सवाई गंधर्व महोत्सवापासून कित्येक लहान-मोठ्या मैफिलीतून स्वरांचं ते अनुपम विश्व अनुभवले. कित्येक नवोदित गायक, विविध शहरातून तिथले स्थानिक नावाजलेले कलाकार ऐकले. संगीताच्या या दुनियेने अनेक मित्र मिळवून दिले. कित्येक थोरा-मोठ्यांच्या ओळखी झाल्या.

गमतीची गोष्ट म्हणजे दोन-चारदा गाणं, हार्मोनियम शिकायचे प्रयत्न करूनही पाहिले, पण नाही जमलं. (अर्थात त्यामुळेच हिंदुस्थानातील तमाम श्रोत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला..!)

मात्र या संगीतानं जणू आयुष्याचा एक कोपरा कायमचा व्यापून टाकलाय. आशेच्या, निराशेच्या, आनंदाच्या,  उद्विग्नतेच्या अनेक क्षणी निस्वार्थी सोबत केलीय. “पोटासाठी भटकत” दूरदूर कुठेही असताना निर्व्याज सुखद अनुभूती आणि आठवणी दिल्या आहेत. आजही जेंव्हा मला रायगडाच्या त्या “भवानी टोकावरून” पाहिलेला तो अविस्मरणीय सूर्योदय आठवतो तेंव्हा त्याचवेळी तिथं ऐकलेली “रैन का सपना..” ही “ललत”ची बंदिश कशी विसरता येईल?

मध्यप्रदेशातील भटकंती करून एका संध्याकाळी भेडाघाटला नर्मदेच्या घाटावर शांत बसलो होतो. संध्याकाळची वेळ. आकाशात ढग दाटून येत होते. तेंव्हा अचानक कानी पडलेलं “ तुम्हारी जुल्फ के साये में शाम कर लुंगा..” हे रफीचं गाणं काळजावर कायमचं कोरलं गेलंय ते कसं पुसायचं? एकदा परगावी असताना एका जिवलगाच्या अपघाती मृत्यूची खबर मिळाली, नेमकं तेंव्हा रस्त्यावरच्या हॉटेलात लताचं गाणं लागलं होतं...

जाना था हमसे दूर..बहाने बना लिये.. अब तुमने कितनी दूर.. ठिकाने बना लिये..”

त्याक्षणी भरून आलेले डोळे, तो दिवस, लताचा काळीज चिरत जाणारा स्वर..कायमचाच काळजात रुतून गेलाय..! आयुष्यातल्या शेवटच्या क्षणांपर्यंत “गाण्याची” सोबत अशीच राहावी हीच एक इच्छा आहे. कारण गाणं हे आमच्यासाठी “जीवन” बनलं आहे.
 
अभिषेकीबुवांच्या “त्या” अजरामर स्वरात सांगायचं तर..

व्यथा असो आनंद असू दे.. प्रकाश किंवा तिमिर असू दे..

वाट दिसो अथवा न दिसू दे.. गात पुढे मज जाणे..माझे जीवन गाणे...!

-    सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)

    (पुढचा लेख – गंमत भाषेची...)