marathi blog vishwa

Thursday 24 September 2020

जादूची पेटी- किस्सा 1 : लाॅकडाऊन अन् आर्थिक अडचण

मंडळी, सध्याच्या धूसर वातावरणात मनावरचं मळभ हटवायला बोलतं व्हा, माझ्याशी संवाद साधायला कधीही काॅल, मेसेज करा असं सांगितल्यावर सर्वदूरवरुन विविध मेसेजेसचा , काॅल्स चा वर्षाव झाला. तुमच्या मनातील चिंता दूर करायला आमची #जादूचीपेटी अवश्य वापरा हे आवाहन अनेकांना मात्र नक्की आवडलंय.
अनेकांसह मलाही वाटलेलं की लोकांना प्रश्न आहेत, लहानसे किरकोळ किंवा मोठे गंभीरही. पण शक्यतो लोक विविध काॅम्प्लेक्सेस मुळे बोलायला धजावत नाहीत. कुणाला त्यात न्यूनगंड वाटतो, तर कुणाला खरं सांगून स्वत:चं आभासी चित्र उघड कसं करायचं असंही वाटतं. कुणाच्यात बोलायचं धाडस नसतं तर कुणाला इतकं भरुन आलेलं असतं की बोलायला शब्दच सापडत नाहीत...मात्र काहीजणांनी खरंच काॅल केला. 
त्यातील तुलनेनं साधं, हलकंसं उदाहरण आज सांगतो. त्यांना कसं लगेच बरं वाटलं याविषयी...कोविड पेशंट असलेल्यांच्या एका गंभीर प्रश्नाबद्दल जी एका व्यक्तीशी चर्चा झाली त्याबद्दल उद्या सांगेन.
#जादूचीपेटी  कहाणी क्र #01
 ( कहाण्या सांगताना सर्वांची नावं व स्थळंही बदलूनच सांगणार आहे. त्यामुळे गोपनीयतेचा भंग अजिबात होऊ देणार नाही.)
तर काल सकाळीच काॅल आला एक. त्यांचं नाव निलीमा आहे असं समजूया.

निलिमा : सर, नमस्कार. तुमची पोस्ट सोशलमिडियात पाहिली व लगेच बोलावसं वाटलं. मला माझ्या मिस्टरांबद्दल बोलायचंय. ते गेले 2 महिने माझ्याशी जवळपास बोलतच नाहीत हो.
' नमस्कार. काय करतात तुमचे मिस्टर.. तुम्हीही नोकरी वगैरे करता का?. अाणि सर नका हो म्हणू.. सुधांशु म्हणा फक्त...
' अहो आमचा व्यवसाय आहे. दुकान आहे इंडस्ट्रियल मटेरियल्सचं. 3,4 महिने बंद होतं. आॅगस्टपासून पुन्हा हळूहळू सुरु केलंय.
' धंदा सध्या होत नाही, आर्थिक अडचण आहे असं काही बोलले का ते तुम्हाला यावर आपण नंतर बोलू. आधी मला सांगा, घरी त्यांचं एकंदरीत वागणं कसं असतं नेहमी, घरी कोणकोण असता तुम्ही, तुमची जराशी माहिती...वगैरे.'

त्या बोलू लागल्या;
' सुधांशु सर, ते खूप शिस्तीचे आहेत. एकदम सगळं नीटनेटकं, जागच्याजागी लागतं त्यांना. रोजच्या वेळाही ठरलेल्या असतात..
घरी आम्ही दोघं व माझा इंजिनियरिंगचा मुलगा. सासूसासरे वारलेत. घरी जवळची अशी कुणी नातेवाईक मंडळी नाहीत फारशी. माझी नणंद असते याच गावात पण असं खूप रोज बोलणं वगैरे नसतंय. माझे भाऊ व वहिनी नाशिकला असतात. इथं मनमोकळं कुणाशी बोलावं असं खूप जवळचं कुणी नाहीये. मीही रिकाम्या वेळेत शाळेतील मुलांचे गणित इंग्रजीचे क्लासेस घ्यायचे, उगीच हौस म्हणून पण सध्या बंद आहे सगळंच.. एकदम सगळं थांबल्यासारखं झालंय हो...

' होय खरंय. तुम्हाला मिस्टरांचं वागणं अचानक खटकायला लागलं की हे असं अधूनमधून अबोला वगैरे असतं घरी.'

' तसे ते कमी बोलतात. चिडत वगैरे नाही कधी. सकाळी लवकर उठून आपलं आवरणं, देवपूजा वगैरे करुन नाश्ता करुन दुकानात जातात. दुपारी बहुदा घरी येत नाहीत कुणाला तरी डबा आणायला घरी पाठवतात. संध्याकाळी 7,8 पर्यंत येतात घरी. मग टीव्ही, बातम्या, व्हाटसअप असतं. कधी बोलतात कधी नाही. पण या 2 महिन्यात ते गप्प गप्प झालेत. मुलाशीही फारसं बोलले नाहीयेत. परवा मी काही म्हणायला गेले तर फाडकन् म्हणाले जीव द्यायला हवा म्हणजे सुटू सगळेच...' 

मला भीती वाटू लागलीये हो असं म्हणत त्या रडू लागल्या. त्यांचा आवेग ओसरु दिला. जरासा इतर काही बोललो. मग म्हटलं;
" हे पहा निलिमा, आज तुम्ही तुमची सगळी कामं लवकर आवरुन ठेवा. ते आले की प्रसन्नपणे त्यांना सामोरं जा. चहा नाश्ता वगैरे हवं तर तुम्ही द्यालच पण जरा शेजारी हात हाती घेऊन बसा. आईच्या मायेनं विचारपूस करा... तुम्ही त्यांची बायको आहातच.. जरासा आज आई व्हायचा प्रयत्न करुन पहा.
 जमल्यास कुठंतरी बाहेर जाऊन या. गाडीतून जा, मंदिरात जायला आवडत असेल तर तसं जा किंवा नुसतंच एकत्र बाहेर जोडीनं चालून या... जे काही सहज वेगळं बोलता येईल ते बोला.. त्यांना बाहेर भेळ वगैरे आवडत असेल तर खिलवा...मग येऊन जेवण...त्यांना आज तुमच्यातील आई किती प्रेमळ आहे हे दिसेल यासाठी जे जमेल ते करा. कारण पुरुषाला नेहमी बाई हवी असतेच हो पण त्यापेक्षा जास्त अनेकदा त्याला आई हवी असते, पॅम्पर करणारी..माया करणारी... आधार देणारी. त्यांना सांगा की त्यांच्या अडचणीत तुम्ही सदैव सोबत आहात...हा एक प्रयत्न करा.. मग उद्या बोलू परत आपण...गुडलक👍.

##
मी आपलं त्याक्षणी पटकन् जे मनापासून सुचलं ते सांगितलं. त्यांना कितपत पटलं, त्या करतील का याचा खरंच अंदाज आला नाही. आज साधारण 10.30 च्या दरम्यान त्यांचा काॅल आलाच... आवाजातला बदलच सांगत होता की त्यांचा ताण हलका झालाय...

#
" सुधांशुसर, गुडमाॅर्निंग. तुमचे खरंच मनापासून धन्यवाद हो. काल संध्याकाळी त्यांच्याजवळ बसले. मायेनं विचारपूस केली. नंतर त्यांच्यासह मी बाहेर पडले. इथलं गणपतीमंदिर प्रसिध्द आहे. सध्या बंद असलं तरी परिसरात जाऊन बसता येतं. बरं वाटतं. आम्ही चालत चालत गेलो. तिथे मग बसलेलो. कसल्या टेन्शनमध्ये आहात, मला नाही का सांगणार? काहीही अडचण असली तर सांगा आपण दोघं मिळून लढूया. तुम्ही एकटं नाही हे बोलले. 
मग म्हणाले की ज्यांना मटेरियल दिलंय 6 महिन्यांपूर्वी त्यांचे पैसे आले नाहीयेत. आपण ज्यांच्याकडून घ्यायचो ते, त्यानं तगादा लावलाय. त्याचीही अडचण, याचीही अडचण, माझीही अडचण... कुठून कोण कसे पैसे देणार??मग आम्ही त्या व्यक्तीला काॅल केला. त्यांना मी स्वत: सांगितलं की साहेब आम्ही तुमचे पैसे बुडवणार नाही यावर विश्वास ठेवा. त्या पार्टीकडून आले की नक्की देऊ. तुमचा विश्वास बसत नसेल तर घरी या. माझे दागिने तुम्ही घ्या. तारण म्हणून... नंतर परत द्या. 
त्या साहेबांनी लगेच सांगितलंय की बहेनजी दागिने नही चाहिये लेकीन 1-2 महिने में पैसे मिल जाने के लिए कुछ करना होगा... मै भी मुश्कीलमें हू. मग हप्तानं काही पैसे देता येतील का याबाबत तिन्ही पार्टी एकमेकांशी बोललो. खरंच खूप हलकं झाल्यासारखं वाटलं.
हे म्हणाले, मी सगळ्यांशी बोलतोय पण कुणी मानायलाच तयार नव्हतं. तू एकदम दागिन्यांचा विषय कशाला काढलास? त्यांनी दागिने मागितले असते तर...
मी म्हटलं अहो दिले असते की. तुम्ही सगळं पार पाडायला, पुन्हा मिळवायला खंबीर असताना मी का दागिन्याच्या मोहात अडकू... कितीतरी दिवसांनी यांचा चेहरा छान प्रसन्न वाटला मला...

घरी आलो. छान जेवलो. रात्री एखाद्या लहान मुलासारखे  मला मिठी मारुन शांत झोपले ते कुशीत शिरुन. कितीतरी वेळ थोपटत बसले मी.. खरंच बरं वाटलं. सकाळी रोज मुलगा जाॅगिंगला जातो तर आज त्याला म्हणाले, मीही येतो रे तुझ्यासह. जरा चालून येऊ. तू धावू नको आज. गप्पा मारत चालून येऊ. येताना मस्त गरमगरम भजी घेऊन आले आज... लेक ही म्हणाला आई बाबा आज किती फ्रेश दिसताहेत गं... असेच मस्त वाटतात बाबा नेहमी...!

" खरंच सुधांशु सर, तुमच्याशी बोलले हा योगायोगच. पण एकदम सगळं स्वच्छ झाल्यागत वाटलं पहा. यापुढेही अधूनमधून  बोलत राहीन हं मी. तुम्ही हवंतर चार्ज घ्या माझ्याकडून.. 

" निलिमाजी, अहो मी निमित्तमात्रच हो. सगळं तुम्हीच तर केलंत. हे असंच असतं. मन मोकळं झालं की आपोआप नवं काही सुचतं. मार्ग सापडतात. म्हणून बोललं पाहिजे. मनाचं आभाळ स्वच्छ राहिलं पाहिजे. आता तुमच्या ह्यांची आई बनला ना, असं कधीतरी करावं लागतं हे लक्षात ठेवा. पण म्हणून सतत आईपण नका हं दाखवू. नाहीतर यांनी ' बायको' सारखंही प्रेम करावं म्हणून वेगळं काऊन्सिलिंग करावं लागेल आम्हाला...'

निलिमा खळखळून हसल्या... ' तुमची फी...'
' छे, हो, साध्या एक दोन काॅल्स ना कसली आलीये फी. हाती फोन आहे, जेव्हा वेळ मिळंल तेव्हा बोलत रहायचं. तुम्हाला छान वाटलं हीच आमची फी. मात्र जर काही प्रसंगी प्रत्यक्ष भेट, चर्चासत्र, काऊन्सिलिंग, ट्रीटमेंट असं काही गरजेचं वाटलं तर नक्की आम्ही फी घेऊच.मात्र मनातल्या चिंता, टेन्शन्स, भीती, राग, हे सगळं आमच्या #जादूच्यापेटीत टाकायला काहीच चार्ज नाही. तुम्ही असंच इतरांनाही अवश्य सांगा काॅल करायला. आम्ही त्यांच्याशी बोलायला नेहमीच तयार आहोत..!

##

मंडळी, निलिमाताईंना एकदोन काॅलवर काही मिनिटं बोलून छान वाटलं. त्यांनाच त्यांचा मार्ग सहज दिसू लागला. नातेसंबंध घट्ट झाल्यासारखं वाटलं त्यांना.
हीच तर गंमत आहे. तुमच्यासाठीही आहे  आपली #जादूचीपेटी. यात टाकून द्या तुमचे प्रश्न, चिंता...
तुम्हाला किंवा तुमच्या मित्रमंडळीत कुणाला मनस्वास्थ हरवल्यासारखं वाटतंय का? तसं वाटत असेल तर अवश्य आम्हाला काॅल करा 9833299791 या नंबरवर. व्हाटसअप काॅल, मेसेजेसही चालतील. किंवा बोलायचं कसं असं वाटत असेल तर nsudha19@gmail.com  यावर मला इमेल पाठवा. 

जे कोरोना संकटातून जातायत, घरात वगैरे आजारपण सोसतायत त्यांनीही मानसिक आधार हवा असल्यास काॅल करावा ही विनंती.

नि:संकोचपणे मनमोकळं बोलत राहूया!
- तुमचाच 
सुधांशु नाईक, कोल्हापूर ( 9833299791)🌿
( सध्या आत्महत्यांच्या प्रमाणात जी वाढ झालीये त्याबद्दलच्या बातमीचं कात्रण अवश्य पहा. लोकांनी मनमोकळा संवाद साधला तर नक्कीच आत्महत्यांचं प्रमाण कमी होऊ शकतं. म्हणून सुखसंवाद अत्यावश्यकच. इतरांशीही ही पोस्ट अवश्य शेयर करा!)

No comments:

Post a Comment