marathi blog vishwa

Thursday 24 September 2020

जादूची पेटी - किस्सा 2 : कोरोनाग्रस्ताच्या मनातलं भीतीचं सावट

सध्याच्या परिस्थितीतच नव्हे तर इतर वेळीदेखील आपल्या ताणतणावांचा निचरा व्हावा यासाठी विविध प्रकारे बोलतं व्हावं याच उद्देशानं, तुमच्या मनातील दडपणं, भीती, चिंता, समस्येबाबत मोकळं होणं ह्यासाठी #जादूचीपेटी ही संकल्पना लोकांसमोर आणलीये. लोकांनी आपले प्रश्न मोकळेपणानं आम्हाला कळवावेत, संवाद साधावा, मन मोकळं करावं या आवाहनाला छान प्रतिसाद मिळतोय.
असाच एक संवाद.. एका कोविडग्रस्त पेशंटसोबतचा...
 ( अर्थातच नावं बदलून..)
#जादूचीपेटी #02

सुधांशुदादा, नमस्कार. मी जितेंद्र बोलतोय. कोल्हापुरातूनच. तुम्हाला वेळ आहे का जरा..मला थोडं बोलायचंय.
नमस्कार जितेंद्र. बोला.. मनमोकळं बोला. 
दादा, मला स्वत: कोरोना झालेला. गेल्या महिन्यात. सरकारी दवाखान्यात 15 दिवस अॅडमिट होतो. शेजारी काही पेशंट रोज मरत होते. माझ्या आईवडिलांचाही काही महिन्यापूर्वी अन्य आजारानं मृत्यू झालाय. माझा मोठा भाऊ दुर्घर रोगानं ग्रस्त होता.. तोही नुकताच गेला सर... गल्लीत, भागातही काही लोक मेले...मला प्रचंड भीती वाटतीये. मीही आता मरणार असं वाटतंय.. एका खोलीत बसून राहिलोय काही दिवस.. काय सुचत नाहीये.. खूप भीती वाटतीये. बाहेर गेलं की मला लगेच मरण येईल असं वाटतंय...नोकरीवरही इतक्यात येऊ शकत नाही असं कळवलंय. रात्री झोपेची गोळी घेतल्याशिवाय झोप येत नाही सध्या...

कोविडकाळात लोक किती भयभीत झालेत याचं हे उदाहरणच जणू. 
मी त्याच्याशी जरावेळ बोलत बसलो अवांतर काही. अजून अविवाहित आहे तो. एका संस्थेत नोकरी करतो. वाचनाची आवड आहे. देवाधर्मावर श्रध्दा आहे. दत्तमंदिरात जात होता नियमित. व्यसनही नाही.. असा एक हा सरळमार्गी युवक. अचानक आलेल्या संकटांनी एकदम भयव्याकुळ झालेला. मोठ्या भावाची मुलं शाळेत, काॅलेजात जातायत. घरी वहिनी सांभाळतेय बाकी सारं...

त्याच्याशी जनरल गप्पा मारल्यावर म्हटलं, " मित्रा जितेंद्र, मरण येईल म्हणून बाहेर जायचं नाही असं काही करु नको. तुला मरणच येणार असेल तर घरात बसल्याबसल्या देखील येऊ शकतं. जेव्हा मरण येणार तेव्हा येऊ दे. ते नशिबात असतं तेव्हा होईलच. पण त्या भीतीनं आजचा दिवस फुकट नको घालवूस. रोजचा दिवस आनंदी कसा जावा, रोज हातून नवं काही काम घडावं यासाठी सगळं जग प्रयत्न करत असतं. तूही करत होतासच की असं काही. 
सध्या या 6,8 महिन्यात आलेल्या जीवघेण्या दु:खानं तू गडबडून गेलायस. हे साहजिक आहे. अरे भलीभली माणसंदेखील अशा प्रसंगी व्यसनाधीन होतात किंवा निराशेनं आत्महत्याही करतात. तुला किमान तुझा प्रश्न समजतोय. तू विचार करतोयस त्यावर हेही मोठं आहे. आता तू रिकामा बसू नको अजिबात. म्हणतात ना रिकामं मन हे सैतानाचं.. तू मनाला गुंतवलं पाहिजे कशात तरी...

" बरोबर बोलताय दादा तुम्ही...पण नेमकं मी आता काय करु? काही सुचत नाहीये.."

" जितेंद्र, तू म्हणालास ना तुला वाचायची आवड आहे. जुनी गाणी ऐकायला आवडतात. दत्तमंदिरात जायला आवडतं. कोणती पुस्तकं आहेत का घरी तुझ्या? त्यातलं एखादं पुस्तक निवड. तुला बाहेर फिरायला जायला आवडतं तर सध्या गावाजवळच्या टेकडीवर सकाळी व संध्याकाळी चालत चालत जा. तिथे पुस्तक घेऊन जा. 2 तास वाचत बस. बरं वाटलं की घरी ये.घरी पुतण्यांसोबत गप्पा मार. त्यांनाही वडिलांच्या माघारी एकटेपण वाटत असेल. पत्ते, बुध्दिबळ, कॅरम असं काही खेळा. देवळात जाऊन काही प्रार्थना म्हणत बस.. पण मनाला एकटं सोडू नकोस. तुला कधीही अस्वस्थ वाटलं तर जवळचे कुणी मित्र असतील त्यांना किंवा मला काॅल कर...तू एक चांगला मुलगा आहेस असं तुझ्याशी बोलताना जाणवतंय. तू नक्की या परिस्थितीवर मात करशील बघ...बेस्ट लक.. "

बरं दादा.. प्रयत्न करतो.. तुम्हाला कळवेन मी. करेन फोन परत.. 

#
काल संध्याकाळी त्याचा फोन आला. 
" दादा, तुम्ही सांगितलेलं ऐकलं परवा. मग कपाटात शोधलं तर युगंधर हे पुस्तक दिसलं. दादानं आणलेलं. ते घेऊन मी बाहेर पडलो. दिवसभर गावाबाहेरच्या टेकडीवर वाचत बसलो. भगवान कृष्णाच्या चरित्रात रमून गेलो. मग घरी परतलो. गाणी ऐकली. देवापुढे दिवा लावून संध्याकाळी छान पूजा केली. वहिनीशी बोलत बसलो खूप वेळ. तीही खूप टेन्शनमध्ये होती. 
कालही सकाळी व संध्याकाळी चालत चालत फिरुन आलो. पुतण्यांना सोबत नेलेलं. बाहेरचा प्रसन्न निसर्ग पाहून कुठाय कोरोना असंच वाटलं. उगीचच आपण फार घाबरलोय असं वाटलं. कित्येक लोक रस्त्यावर भाजी वगैरे विकत होते. त्यांच्या नोक-या गेल्यात. त्यांच्यापेक्षा आपलं बरं.. किमान नोकरी तरी आहे हाताशी असं वाटलं बघा. आॅफिसच्या सायबाना काॅल करुन सांगितलं की मी 16 तारखेपासूनच नोकरीवर येतोय... उद्या सकाळी कामावर जातोच मी. तेवढंच कामात मन रमलं की बरं वाटेल.. घरासाठी मला उभं राहायचंय दादा..."

" व्वा जितेंद्र.. कौतुक वाटतं तुझं. इतक्या लवकर तुझं तुला समजलंय सारं. स्वत: ची जबाबदारी तुला कळतीये याचा आनंद वाटतोय मला. तुला खूप खूप शुभेच्छा.. बाहेर फिरताना स्वत:ची काळजी घे. मास्क वगैरे नीट वापर. तुझी जी औषधं सुरुयत ती न चुकता घेत रहा...."
आज सकाळी परत त्याचा फोन आला. दत्त भिक्षालिंग मंदिरात नमस्कार करुन पुढे कामावर जाताना मला फोन केला. तुमच्याशी दोन दिवस तास तासभर बोललो अन् खरंच मन मोकळं झालं. काल रात्री झोपेची गोळी न घेता शांत झोप लागली. आता एकदा तुम्हाला प्रत्यक्ष भेटूनही जाईन. नमस्कार दादा.."

###
निव्वळ मनमोकळं बोललं की इतकं छान काही घडू शकतं हे जाणवून आज मलाच खूप आनंद झालाय. कालच्या दै. सकाळ मध्ये हे एक सुंदर आर्टिकल आलंय. आनंदी जगणं का गरजेचे हे सांगणारं. सर्वांनी अवश्य वाचावं असं.
तुमच्यापैकी कुणाला काही मनातलं कुणाशी बोलता येत नसेल तर अवश्य आपल्याशी संपर्क साधा. तुमच्या परिचितांत कुणाला समुपदेशन हवं असेल तर अवश्य ही माहिती, ही पोस्ट त्यांच्यापर्यंत पोचवावी ही विनंती. 

#जादूचीपेटी ची किल्ली म्हणजे  आमचा नंबर  9833299791 व इमेल आयडी आहे nsudha19@gmail.com 

संपर्क व काॅलवर बोलायला कोणतीही फी नाही.
मंडळी, मनमोकळं बोलत राहूया. आनंदी राहूया..!
- सुधांशु नाईक, कोल्हापूर(९८३३२९९७९१)🌿

No comments:

Post a Comment