marathi blog vishwa

Wednesday 3 June 2020

वेगळ्या कथा क्र.०३- भग्न


मंडळी, सुरुवातीलाच एक सूचना:-  साहित्यात जे विविध रस आहेत त्यातील रौद्र आणि करुण रसाचा वापर असलेली ही ताजी कथा. या कथेतील पात्रे काल्पनिक असली तरी कथेतील भूगोल आणि आक्रमकांचा संहारक इतिहास हा विविध सत्य घटनांशी साधर्म्य असणाराच आहे. ज्यांना रौद्र रस रुचत नाही त्यांनी कथा वाचू नये.

पारगाव. उर्वशी  नदीच्या तीरावर वसलेलं एक चिमुकलं टुमदार गाव. पंधराव्या- सोळाव्या शतकातला तो महाराष्ट्र. सर्वत्र धर्मांध आक्रमकांचा नंगानाच सुरु झालेला. मात्र त्याची झळ अजून इथवर आलेली नव्हती. गाव शांत सुखात होतं. शेजारी वाहणारी बारमाही नदी गावाला सुबत्ता देत होती. आसपासच्या शेतात पिकं डोलत होती. गावचे पाटील होते रामराव. गावाची नीट काळजी घेत होते.
गावात एक प्राचीन मंदिर होतं विघ्नेश्वराचं. अगदी यादवकालीन हेमाडपंती बांधकाम. ११ व्या शतकातलं. गावाच्या मागे डोंगरावर एक दुर्ग. त्याचं नाव चंद्रदुर्ग. पंचक्रोशीच रक्षण करणारा. तिथे जेंव्हा यादवकालीन शिलेदाराने आपलं स्वामित्व मिळवलं त्या युद्धापूर्वी त्यानं विघ्न दूर करायला पूजाविधी केले ते याच मंदिरात. मग विजय मिळाल्यावर इथल्या जुन्या लहानग्या मंदिराचा जीर्णोद्धार करत मोठं मंदिर उभं केलं. काही वर्षं खपून शिल्पकारांनी तिथं उत्तम शिल्पं घडवली. सुरेख असा नंदी मंडप उभा केला. तेंव्हा जे पुजारी त्याच्यासोबत आले ते इथेच स्थिरावले. या मंदिराची पिढ्यानपिढ्या पूजा-अर्चा करायचा आदेश त्याना मिळालेला. त्याच वंशातले होते सदाशिवपंत. उंचापुरा बांधा, गव्हाळ वर्ण, चेहऱ्यावर विद्वत्तेचे तेज आणि प्रेमळ सात्विक स्वभाव. यामुळे सर्व गावकऱ्यांना त्यांचा आधार वाटे. 
१३ व्या शतकात अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीवर स्वारी केली आणि विध्वंसाचं एक तांडव च महाराष्ट्रभर सुरु झालं. खिलजी घराणं, तुघलक घराणं यांच्यापाठोपाठ आले ते बहामनी घराणं. अल्लाउद्दिन हसन यानं १३४७ मध्ये कर्नाटकातील कलबुर्गा येथे बहामनी राज्याची स्थापना केली. त्या गावाचं नाव ही बदलून हसनाबाद असं केलं. त्यानंतर मग पहिला मुहम्मद, घियासुद्दिन, शिहाबुद्दिन अहमद, मह्मुद्शाह आदि एकापेक्षा एक सुलतान इथं तांडव करू लागले. प्रत्यक्ष हसन गंगू बहामनी हा देखील पूर्वीचा हिंदू ब्राह्मण होता असे म्हणतात.
या सर्वानीच इथल्या प्रजेवर अनन्वित अत्याचार केले. इथली मंदिरे फोडली. गावागावातील हजारो हिंदूंना जबरदस्तीने मुसलमान व्हायला भाग पडले.  ज्या लोकांनी धर्म बदलायला नकार दिला त्याना हाल हाल करून मारलं गेलं. त्यांच्या डोळ्यासमोर घरातील स्त्रीवर राक्षसी अत्याचार केले गेले. मंदिरात गायी कापल्या गेल्या. मंदिरातील मूर्ती विध्वसंल्या गेल्या. मंदिरात नेऊन स्त्रियांची विटंबना केली गेली. लहान मुलं, मुली, स्त्रिया, तरुण यांना गुलाम बनवलं गेलं. कित्येक पुरुषांचे खच्चीकरण करून त्यांची नेमणूक सुलतानांच्या जनानखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून केली गेली. त्याच पुरुषाच्या पत्नीची  तिथे सुल्तानाकडून, त्यांच्या सरदारांनी विटंबना होऊ लागली. कित्येक लहान मुलांच्या आई-बापासमोर क्रूर हत्या केल्या गेल्या. आणि अवघा महाराष्ट्र या हिस्त्र राक्षसामुळे भीतीने घाबरून गेला. 
पंढरपूर, सोलापूर,मंगळवेढा,कऱ्हाड, मिरज, तुळजापूर,अंबेजोगाई, जेजुरी आदि असंख्य गावातील मोठ मोठी मंदिरे फोडली गेली. अगदी पुण्यातही केदारेश्वर आणि नारायणेश्वर ही दोन प्रसिद्ध मंदिरे फोडून तिथे मशिदी उभ्या केल्या गेल्या. त्याही स्वतःला पीर...साधू समजणाऱ्या मुस्लीम व्यक्तींकडून.
महत्वाची शहरे अशी उध्वस्त होत असताना कित्येक लहान गावात मात्र अजूनही तशी शांतता होती. मात्र जुलमी आक्रमकांची आपल्यावर कधीतरी नजर वळणार या भीतीनेच खेडी, गावं भीतीने जणू गारठूनच गेली होती. 
या सगळ्या अस्वस्थतेत सदाशिवपंत मात्र गावकऱ्याना धीर द्यायचे. जवळच्या चंद्रदुर्ग वरही आता कुणी उरलं नव्हतं. ओसाड पडलेला तो. रामराव पाटलांच्या मदतीनं पंतानी तिथं जवळपासच्या २-३ गावातल्या युवकांना एकत्र केलं. रामरावांना त्या युवकांचे नेतृत्व करायला भाग पाडलं. तिथं तलवारबाजी, भालाफेक, धनुष्य बाण आदि शस्त्रांचे प्रशिक्षण सुरु केले. स्वतः पंत उत्तम घोडेस्वारी करायचे. मात्र त्याना युद्धाचा अनुभव नव्हता. त्यामुळे काही तरबेज व्यक्तींना गावात आणून त्यांच्यामार्फतही  प्रशिक्षण सुरु झाले.
त्या सगळ्यांच्या जेवणाची वगैरे व्यवस्था करण्याकडे पंतांचे लक्ष असे. पंतांच्या पत्नी अंबिकाबाई याही सात्विक. पंतांचा मुलगा श्रीधर हा देखील त्या युवकांच्या सोबत रोज सकाळी दुर्गावर जायचा. त्याची पत्नी भल्या पहाटे सासू सासऱ्यासह घरासह मंदिराच्या सेवेत असायची. संपूर्ण आवार स्वच्छ करणे, सडा रांगोळी घालणे, नदीवरून पाणी भरून आणणे, मंदिरातील पूजेसाठी फुले गोळा करणे, नैवेद्य यात दोघींचा कसा वेळ जाई हे कळत नसे. गावातील अनेक जण त्यांना विविध कामात मदत करत. सदाशिवपंत भल्या पहाटे शेतावर जाऊन येत. तिथल्या रयताच्या कुटुंबाला सूचना देत. येताना गाईचं दूध घरी घेऊन येत. मग नदीवर जाऊन अंघोळ.. घरातील देवपूजा आणि मग मंदिरातील. 
ते अत्यंत देखणी साग्रसंगीत  पूजा करायचे. उत्तम पुष्प सजावट करायचे. रोजचा त्यांचा लघुरुद्र कधीच चुकला नाही. आणि त्यांनी पूजेच्या वेळी येईल त्या गावकऱ्याशी कधी भेदभाव केला नाही. आरती, महाप्रसाद यात सर्वाना सामावून घेतलं.
पूजा अर्चा  नैवेद्य होईपर्यंत दुपार होई. जेवल्यानंतर मग जराशी विश्रांती. संध्याकाळी मग मंदिरात कीर्तन, प्रवचन रंगे. राम-कृष्णापासून अनेक देवता, संत सज्जनांच्या कथा रंगत. प्रत्येक युगात अन्याय, अधर्माचा निःपात करायला परमेश्वर कसा धावून आला हे सांगत. आज जे आपल्या देशात अराजक सुरु आहे त्याचाही विनाश करायला लवकर देवाधिदेव महादेव धावून येतील असा विश्वास व्यक्त करायचे. गोर-गरीब जनतेला धीर द्यायचे. रात्री मग देवळात भजनाचा कल्लोळ असे. भक्तिरसात आसमंत रंगून जाई.
मात्र हे सारं करताना पंतांच्या मनात सदैव भीती असे. आसपासच्या प्रदेशात घडणाऱ्या कहाण्या त्यांच्या कानावर येत. कुणी प्रवासी, कुणी व्यापारी उत्तरेकडून येई. कधी कुणी गोसावी कधी कुणी संन्यासी येई. तो जे काही सांगे ते ऐकून त्यांच्या मनाचा थरकाप उडे. अयोध्या, सोमनाथ, मथुरा, वाराणसी, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि आता महाराष्ट्रातील गावं, मंदीर कशी उध्वस्त होतायत हे ऐकून त्यांच्या एकाच वेळी प्रचंड राग आणि भीती दाटून येई. मग गाभाऱ्यातील विघ्नेश्वराला ते कळवळून साकडं घालत.

“देवा विघ्नेश्वरा, तूच तर जगाचा नियंता. मग का अशी सर्वांची परीक्षा पाहतोस. प्रसंगी कोट्यवधी दुष्टांचा कुरुक्षेत्री संहार करणारा, अनेक असुरांपासून पृथ्वीला मुक्त करणारा तू विश्वेश्वर...तूच महादेव...तूच विष्णू...का असा अंत पाहतोस.. लवकर ये आणि या त्रासातून आम्हा सर्वाना मुक्त कर. आजवर कधीच ऐकले, पहिले नाहीत असे अत्याचार हे यावनी सरदार आणि त्यांचे बादशहा करताहेत. याना कठोर सजा दे..परमेश्वरा...कठोर सजा दे...”
मात्र हे घडत नव्हतं. कुठं कुठं ज्यांनी प्रतिकार केला त्यांचा अनन्वित छळ केला गेला. आणि ते पाहून भ्यालेली जनता सगळं काही मूकपणे सोसत राहिली.
चंद्रदुर्गावर युवक एकत्र येऊन काही युध्द सराव करताहेत ही बातमी मग कर्णोपकर्णी शिरवळच्या ठाणेदारापर्यंत गेली. काही जणांनी अधून मधून येणाऱ्या वसुलीच्या तुकडीला प्रतिकार करायला सुरुवात केली. ही शेतजमीन आमची, इथे कष्ट आम्ही करतो तर तुम्हाला इतक्या वसुलीचा अधिकार कुणी दिला असं युवक आणि रामराव पाटील यांनी एकदा त्या तुकडीच्या प्रमुखाला सुनावलं. २५-२६  जणांची तुकडी घेऊन आलेले ते या गोष्टीनं एकदम भडकले.
“देखो पाटील, आजतक जैसे चुपचाप तुम अनाज देते थे वैसा करो..वरना इसका अंजाम बहुत बुरा होगा.” अशी धमकी देत वसुलीची तुकडी निघून गेली. जाताना वाटेत २-३ घरं पाडली. जाळली आणि घरातल्या दोन स्त्रियांना जबरदस्तीने घोड्यावर लादून पळवून घेऊन गेले.
गावात एकच गोंधळ माजला. मंदिरासमोरील भव्य पटांगणात रात्री सभा भरली. यापूर्वीच्या पिढीने काही अत्याचार सोसले होते. ते जेष्ठ लगेच एकत्र आले. एक जण  म्हणाला, “सुभेदार खिरातखान हा अत्यंत जुलमी क्रूर. त्याच्यासारखेच त्याचे सहकारी आणि हाताखालचे अधिकारी. त्यांच्या नादी लागू नका... अवघं गाव ते सहज चिरडून टाकतील...
दुसरा म्हातारा म्हणाला, “ बरोबर आहे.. नका या फंदात पडू. अजून त्यांचं आपल्या गावाकडे फारसं लक्ष नाही. ते इतर प्रांतात धुमाकूळ घालतायत. तोवर तेंव्हा तुम्ही त्याला शरण जा. क्षमा मागा. जे मागेल ते द्या पण वैर पत्करू नका....गाव जपा..”
मात्र गावातील तरुण आता भडकले होते. रामराव पाटील, सदाशिवपंत हेही चिडले होते. त्यांनी ठरवलं प्रसंगी जीव गेला तरी चालेल पण आता अन्यायाचा प्रतिकार करायचा. सुभेदार जर प्रेमाने काही मागू लागला तर अवश्य मदत करू... मात्र जर जोर-जबरदस्ती करू लागला तर लढायचं. मरेतोवर लढायचं. युवकांनी लगेच दुर्ग गाठला. गावातील अनेक वृद्ध, स्त्रिया याना दुर्गावरील वाड्यात नेऊन ठेवलं. गाव निम्मा रिकामा केला. त्यांना नक्की कळले की आता आपल्यावर हल्ला होणार.. स्वतः पाटीलही कुटुंब कबिला घेऊन दुर्गावर गेले. गावात उरली अगदी मोजकी माणसे. जी शेतावरील झोपडीत गेली. तर सदाशिवपंत आणि त्यांचं कुटुंब मंदिराखालील तळघरात जाऊन लपलं.
या गावात काय घडलं याची खबर सुभेदार खिरातखानाला मिळाली. एक टीचभर गाव. तिथली मोजकी माणसं. त्यांची ही मस्ती... त्याला उमगलं. हे बंड आहे. हे ठेचायालाच हवं. नाहीतर उद्या हेच लोण इतर गावात पोचेल. या गावाला असा धडा शिकवू आता की पुन्हा अवघ्या सुभ्यात कुणी मान वर करून बोलताही कामा नये...! 
काही दिवसातच प्रत्यक्ष सुभेदार खिरातखान त्याच्या सैन्याची एक तुकडी घेऊन भल्या दुपारी दौडत आला. त्याच्या सोबत त्याच्या इतकाच दुष्ट असा दाउदखान होता. आल्या आल्याच त्यांनी वेशीपासून दिसेल ते घर जाळायला सुरुवात केली. लगेच त्यांच्या लक्षात आलं की गावातील बहुतांश लोक गायब आहेत. अचानक एक माणूस शेतातून येताना दिसला...
त्याला पकडून आणलं सैनिकाने.. सुभेदार किंचाळला, “ बोल कहा गये सब लोग.” 
भीतीनं घाबरलेला तो म्हणाला.. “किला..किलेपर...” दुसऱ्या क्षणी सुभेदाराची तलवार हवेत चमकली आणि त्या माणसाचं मुंडके हवेत उडालं.
दाऊदखान.. तुम थोडे सैनिक लेके जाओ किलेपर..सबको कत्ल कर दो.. मै यहां कोई है तो देख लुंगा.... सुभेदार किंचाळला.
दाऊदखान दौडत गेला. तर गावातील विविध घरांची नासधूस करू लागले उरलेले सैनिक. खिरातखान पाटलांच्या वाड्यासमोर थांबला. 
दुर्गावरील त्या लहानशा गावकऱ्यांचा विरोध मोडून काढायला अगदी कमी वेळ लागला. दुर्गावर जणू रक्ताचा सडा पडला. सगळे युवक मारले गेले. रामराव पाटील आणि त्याचं कुटुंब, इतर म्हातारे कोतारे, बायका मुलं याना कैद करून सोबत  घेऊन दाऊदखानाची तुकडी लवकरच पुन्हा गावात आली.
तोवर गावातील बहुतांश घरांचा विध्वंस झाला होता. घरातील गाडगी-मडकी बाहेर फेकली गेलेली. सगळीकडे आगी लावलेल्या.आणि सगळे सैनिक मंदिराला भिडले होते...
दाऊदखान, खिरातखान आणि सगळे सैनिक आता मंदिरासमोर आले. तिथल्या मैदानात सर्व कैद्यांना उभं केलं गेलं. एव्हाना एका सैनिकाला मंदिरातील तळघरात जाणारी वाट सापडली. मग सगळे घुसलेच तिथं.
आत मध्ये असलेल्या पंतांच्या कुटुंबाला मारत-झोडत, फरफटत मैदानात आणलं गेलं. इथं होता विजय स्तंभ. आधीच्या विजयाची स्मृती जपणारा. ज्या मैदानात देवाची पालखी निघायची..जिथं लग्न-समारंभ साजरे व्हायचे तिथं...मारहाण सुरु झाली. रक्ताचा सडा पडू लागला.. पंतांची बायको, सून, पाटलांची बायको, मुलगी, सून आणि काही अन्य देखण्या स्त्रिया याना खिरातखान आणि दाऊदखानने आपापसात वाटून घेतलं. त्यांची रवानगी आता जनानखान्यात होणार होती. उरलेल्या सगळ्या कैद्यान्मधून ८ वर्षापेक्षा मोठ्या मुली, स्त्रिया...अगदी वृद्ध स्त्रियांना देखील बाजूला काढलं गेलं. लहान मुलांना बाजूला काढलं गेलं.
“इज्जत लुट लो सबकी.. इनपे इतना जुलूम करो की बाकी सब गाववालो को ये सुनकर ही डर पैदा हो...
खिरातखान ओरडला..
स्त्रियांवर अत्याचार सुरु होणार हे कळताच पंत,  पंतांचा मुलगा, पाटील त्वेषानं धावून गेले. एका सैनिकाच्या एकाच घावात पंतांचा मुलाचं मस्तक उडालं. 
“ पकडो इन दोनो को.. इन्हो ने सबको भडकाया है ..” एक सैनिक ओरडला.
पंत आणि पाटील या दोघांना मग मैदानच्या मध्यभागी असलेल्या विजय स्तंभाला बांधलं गेलं. 
खिरातखान हातात चाबूक घेऊन पुढे झाला. दोघांच्या अंगावर चाबकाचे फटकारे फुटू लागले. अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तरी त्यांच्या तोंडातून अक्षर येईना. मग त्यांच्या स्त्रियांवर ही अत्याचार सुरु झाले.
ज्या मंदिरात देवाला अनन्य भावाने शरण येत पूजेला नैवेद्य घेऊन स्त्रिया येत होत्या, त्याच मंदिराच्या आवारात त्यांची अब्रू लुटली गेली. एकेका स्त्रीवर किती बलात्कार झाले याची गणतीच नाही. इतक्याने ही त्या दुष्टांचं समाधान झालं नाही. मग..मग. . त्यांचे अवयव कापले गेले. त्या स्त्रियांना मारल्यावर विकृत सैनिकांनी मग मंदिरातील अप्सरांची शिल्प विटाळली. कुणाचे स्तन कापून टाकले कुणाचे हात. कुणाचा चेहरा विद्रूप केला तर कुणाचे पाय कापले. मंदिरासमोरील नंदी, अन्य देवतांची शिल्प तोडली-फोडली, खांब तोडले.. जे जे उध्वस्त करता येईल ते ते केलं गेलं... !
स्वतः खिरातखान गाभाऱ्यात शिरला. महादेवाच्या पिंडीवर घाव घातले. एका वृद्धाचे डोके पिंडीवर ठेऊन फोडले.
कर्कशपणे तो ओरडला, “भगवान हो ना तुम.. देख मैने क्या किया.. तुम्हारे सब लोगोको खत्म कर दिया. है हिम्मत तो सामने आ. तुझे भी खत्म कर दुंगा.”.
कुणी आणलेल्या गायी मंदिरात सर्वत्र कापल्या गेल्या. ज्या मंदिरात सकाळी प्रसन्न अशी सडा-रांगोळी होत असे तिथे सैनिकांनी लघुशंका केली.. रक्त, मुत्र, प्रेतं या सगळ्याच्या घाणेरड्या वासानं परिसर भरला. 
पंत आणि पाटील अर्धमेल्या अवस्थेत हा विध्वंस पाहत होते...
पंतांचा आता संताप संताप झाला. ते मोठ्यानं आक्रो9शात ओरडू लागले;
“हे विघ्नेश्वरा...किती नीच लोक आहेत हे. कसं तू यानं जन्माला घातलंस, का जन्म दिलास याना? ज्या निष्पाप गावकऱ्यांनी आयुष्यभर तुझी भक्ती केली त्यांना काय दिलंस तू? का त्यांच्या नशिबी अशा यातना? कुठे गेला तुझा धर्म? देवा, तूच म्हनालेलास ना.. जेंव्हा जेंव्हा अधर्म होईल तेंव्हा मी जन्म घेईन...मग कुठे लपलायस तू?? की तुझीही ताकद संपली?? देवपण संपलं का या जगातलं ? इतक्या अधम, विकृत माणसांना शिक्षा द्यायला आता देव कधीच येणार नाही पाटील... देव मेला.. देव संपलाय या जगातून..
पण पण...या निष्पाप लोकांवर ज्यांनी अत्याचार केले  ते तर ही पापं नक्कीच फेडतील. याच मातीतून एखाद्या सामान्य घरातून एखादा माणूस असा जन्म घेईल की तो या सर्वांचा निःपात करेल. आज जसे आपण भीतीने थरकापत आहोत तसेच एकदिवस हे क्रूर बादशहा, हे विकृत सरदार घाबरतील. त्यांना ठार मारून मगच हा महाराष्ट्र शांत होईल. या क्रूर बादशाहांच्या कबरी याच मातीत असतील..या सर्व निष्पाप लोकांचा  शाप आहे यांना. 
आणि हे विघ्नेश्वरा..तुलाही शाप आहे.. हा जो विध्वंस तू थंडपणे पाहत राहिलास, ज्या तुझ्या मंदिरात इतके विकृत कृत्य केले गेले ते मंदिर यापुढे कायम भग्न राहील...कितीही वेळा कुणीही हे मंदिर पुन्हा बांधू लागलं तरी ते पूर्ण होणार नाही. जोवर या धरतीवरून दुष्टांचा नायनाट होणार नाही तोवर इथं मंदिर पुन्हा उभं राहणार नाही... हा शाप आहे माझा..आमचा सर्वांचा...”
आरडाओरडा करणाऱ्या पंताना पाहून खिरातखान पुढे आला..
“अबे बम्मन.. क्यू चिल्ला रहा है ..” असं म्हणत त्यानं हातातील तलवार जोरात फिरवली. एकाच घावत पाटील आणि पंत शांत झाले. अवघ्या परिसरात मग केवळ एक भीषण शांतता भरून राहिली. 
सुधांशु नाईक, कोल्हापूर(९८३३२९९७९१ )
( आजही याच नदीकाठी नव्हे तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशीच शेकडो प्राचीन मंदिरे भग्नतेचा शाप घेऊन उदासीनपणे उभी आहेत. कधीतरी कुणीतरी पुन्हा या परिसरात चैतन्य आणेल याची वाट पाहतायत. आज गावोगावी शेकडो नवी मंदिरे, पुतळे उभे राहिले मात्र अनेक भग्न मंदिरांचे प्राक्तन आजवर बदललेले नाही, त्यांची काळजी घ्यावी असं फारसं कुणाला वाटत नाही याची खंत वाटते. त्यांच्या कहाण्या, त्यांचे चित्कार, त्यांचे उसासे, त्यांचे अश्रू आणि त्या मंदिरात सांडलेल्या रक्ताचा नकोसा वास मला आजही घायाळ करत राहतो. जगणं नकोसं करत राहतो, जगणं नकोसं करत राहतो....!)

4 comments:

  1. सुधांशुजी, गो. नी. दांडेकर यांचे साहित्य वाचतोय असे वाटले वाचताना...शब्दांकन सुंदर...अंगावर काटा, शहारा, राग.....

    ReplyDelete
  2. सुधांशुजी,
    तुमच्या शब्दकळेला ज्या त्या रसाप्रमाणे जे ते रूप धारण करणे साधते. गोनीदांविषयी लिहिताना फुलासारखे उमलून येणारे तुमचे शब्द अशी कथा लिहिताना काटेरी तर होतातच, शिवाय त्यातून अंगारही फुलतो. ते प्रसंग मग अंगावर येतात, सुन्न करून सोडतात. वाचताना असं जाणवतं की लिहिताना देखील त्या शब्दकाट्यांनी आधी तुम्ही स्वतःच जखमी होत गेला आहात.

    तुमच्यातला कलावंत आणि माणूस यांच्यामधला पडदा झिरझिरीत आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद उमेश जी. वाचत राहा. आवर्जून मनोगत सांगत राहा.

      Delete