marathi blog vishwa

Thursday 16 February 2023

मन मनास उमगत नाही... ( उत्तरार्ध )

मन आणि आपली मानसिकता ही सगळीच गुंतागुंतीची गोष्ट. 
मुलं आणि पालक, पती पत्नी , मित्र मैत्रिणी, कुटुंबीय याचबरोबर व्यवसाय किंवा नोकरीच्या ठिकाणचे नातेसंबंध आणि हल्लीच्या जमान्यातील लिव्ह इन रिलेशनशिप.... या सगळ्यांत इतक्या प्रकारे माणसं एकमेकांशी वागत असतात की मानवी मनाची अनेकदा घुसमट होते. सगळीच नाती कायमच आनंददायी असतात असं नाही. त्यामुळे जेंव्हा समस्या निर्माण होतात तेंव्हा जनरल ठोकताळे लावून त्या सोडवता येत नाहीत म्हणूनच योग्य प्रकारे समुपदेशन होणं आणि मग आवश्यकतेनुसार मानसोपचार घेणं गरजेचे ठरते.

मन आपलंच. खूप गुंतागुंतीचं. चांगलं वाईट सगळाच विचार करणारं. त्याला आपण वळण देऊ तसं वळणारं. कधीतरी ते असं काही वागू लागत की मग समस्या निर्माण होतात.
आपलंच मन आपल्याला कळणार नाही इतकं विचित्र कसं वागतं हे सगळं म्हणजे खोलवर अभ्यासाचा विषय. त्यातही पुन्हा लहान मुलं, मोठी माणसं त्यांच्याभोवती असलेली परिस्थिती हे सगळं जाणून घेतल्याशिवाय आपण समस्या सोडवू शकत नाही. मात्र हा खूप मोठा व्यापक विषय. तो एका लेखातून मांडणं अवघडच. लवकरच त्यावर सविस्तर लेखमाला लिहायला हवी.
आज आपण मुख्यत: विविध समस्या दिसू लागल्या की काय करायला हवं यावर लक्ष देऊयात.
सिनेमा, नाटकं, टीव्ही सिरीज सारख्या माध्यमातून मानसिक समस्या किंवा विविध वर्तनशैली बाबत अनेक गोष्टींचा आधार घेत कलाकृती घडतात. लोकप्रिय होतात. मात्र मूळ मुद्दा तसाच राहतो. सिगमंड फ्रॉईड, कार्ल युन्ग, ऍडलर, मॅसलॉ, पावलोव्ह या सारख्या अनेकांनी 19 व्या, 20 व्या शतकात यावर संशोधन केलं. त्यानुसार विविध थिएरीज मांडल्या. प्रसंगी एकमेकांचे मुद्दे खोडले. काही संशोधनात त्रुटी जाणवल्या तिथं अधिक संशोधन केलं गेलं.
लहान मुलांच्या वर्तन समस्या, नोकरी करियरच्या टप्प्यावर भेडसावणाऱ्या समस्या, हिंस्त्र वर्तन, न्यूनगंड, अति आत्मविश्वास आदी समस्यानी अनेक जण ग्रासलेले असतात. जीवनात हल्ली जीवघेणी स्पर्धा आणि ताण तणाव हे नित्याचेच. त्याचं योग्य नियोजन करता आलं नाही तर माणसं निराश होतात. मानसिक समस्यानें ग्रस्त होतात किंवा व्यसनाच्या आहारी जातात.

योग्य वेळी त्यांनी जर समुपदेशकाचे सहकार्य घेतले तर त्यांचे प्रश्न लवकर सुटू शकतात. योग्य वेळी आवश्यक असेल तर मानसोपचार सुरु करता येतात. 
समाजामध्ये सर्वाधिक प्रमाणात प्रश्न जाणवतात ते रिलेशनशिप मध्यें. माणसाच्या वाढीच्या विविध टप्प्यावर कामजाणीव विकसित होत जाते. ती योग्य प्रकारे हाताळता आली नाही तर विविध गंभीर प्रश्न उभे राहतात असं फ्रॉईड म्हणतो. याबाबत जेंव्हा संशोधन झालं तेंव्हाच सर्वात जास्त गदारोळ झाला फ्रॉईडमुळे.

मानसिक समस्येबाबत असलेल्या प्रत्येक कृतिमागे कुठं तरी कामप्रेरणा असते असं सांगत फ्रॉईड नें वेगवेगळे सिद्धांत मांडले. त्याचा इतरांनी प्रतिवाद ही केला. मात्र लहानपणापासून जी काम प्रेरणा विविध टप्प्यावर आपल्यामध्ये विविध रूपात असते त्यावर एक प्रकारे शिक्कामोर्तब ही झालं.
वयात आलेल्या स्त्री - पुरुषांच्या कामभावना योग्य तऱ्हेने तृप्त झाल्या तर त्या व्यक्ती अधिक तत्परतेने कार्यरत होतात, लहान वयात मुलांना चांगल्या प्रमाणे हाताळले गेले तर त्यांचं भावाविश्व अधिक चांगलं बनते. आसपासच्या वातावरणात जर लोकांच्या लैंगिक संबंधाबाबत विकृत दर्शन झालं तर मुलं तशा विकृतीची शिकार बनू शकतात. लहानपणी होणारे child abuse सारख्या प्रकाराने, नात्यातील लोकांनी किंवा अन्य कुणीही केलेल्या विनयभंग किंवा बलात्कारामुळे 
त्या व्यक्तीचं सम्पूर्ण आयुष्य उध्वस्त होतं. शारीरिक जखमा लवकर भरून काढता येतात पण मनाला झालेली जखम बरी व्हायला योग्य उपचार आणि वेळ द्यावा लागतो...!
प्राचीन कामसूत्र हा ग्रंथ असो, भारतीय लग्न संस्थेचा इतिहास सारख अभ्यासपूर्ण पुस्तक असो किंवा मराठीत डॉ. विठ्ठल प्रभू, डॉ. लीना मोहाडीकर, डॉ. शशांक सामक आदींनी केलेलं लेखन असो किंवा मास्टर्स अँड जॉन्सन सारख्यानी केलेलं संशोधन असो ... यांच्यामुळं लैंगिक जीवन अधिक मोकळेपणाने चर्चेत आले. त्यामुळे विवाहबाह्य संबंध, लैंगिक समस्या आणि माणसाचे वर्तन, शरीरिक आणि मानसिक दुर्बलता आणि त्यामुळे घडलेले मानसिक बदल अशा अनेक अंगानी मानसोपचार तज्ञ विचार करू लागले.
लोकांना सुरुवातीला एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे जाऊन उपचार घेतोय हे सांगणं अपमानास्पद वाटे. मात्र आता हळूहळू बदल होतोय ही स्वागतार्ह गोष्ट आहे. अनेकदा म्हंटल तर कुणीच चूक नसतो पण परिस्थिती त्याला एखादी कृती करायला भाग पाडते. हे लोक समजून घेऊ लागलेत. बदलत्या समाज व्यवस्था प्रत्येक काळात असतातच. त्या नुसार ही नातेसंबंधामध्यें अनेक बदल घडताहेत. लिव्ह इन रिलेशन्स, समलैंगिक संबंध आदि गोष्टी समाज हळूहळू स्वीकारत आहे.
माणसाच्या मनातील प्रश्नांची जितकी लवकर उकल होईल तितकं तें मन अधिक निर्मळ होतं. 
अशी निर्मळ मनं अधिक एकाग्रपणे कार्यरत होतात हेच खरं.
अनेकदा विविध समस्या घेऊन लोक आपल्याकडे येतात. प्रत्येकवेळी त्यांना सल्ला हवाच असतो असं नसतं. तर त्यांना त्यांचं मन मोकळं करायला एक हक्काचा कोपरा हवा असतो. 2 क्षण विसावता यावं म्हणून आधार देणारा खांदा हवा असतो. आपल्याला तसा आधार इतरांना देता यायला हवा. Empathy, compassion म्हणजेच आस्था, करुणा, दया आपण दाखवतोच मात्र अशावेळी लोकांना मैत्रीपूर्ण आधाराची जास्त गरज असते.
प्रसंगी त्यांच्याकडून चूक झालेली असताना देखील आपल्याला त्यांना प्रेमाने, मायेने वागवता आलं पाहिजे. त्यांना त्यांच्या मनाला झालेल्या दुखापतीतून सावरायला मदत करता यायला हवी ज्यायोगे तें पुन्हा आपल्या क्षेत्रात भरारी घेऊ शकतील. आणि नेमकं हेच काम समाजात विविध काउन्सिलर्स, हितचिंतक यांना करायचं असतं.

स्वतःविषयीं बोलू नये असा संकेत आहे. तरीही सांगतो की, मीं तसा इंजिनियर आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट क्षेत्रात कार्यरत माणूस. मात्र सामाजिक कार्याची आवड म्हणून विविध सामाजिक उपक्रमात गेली 25, 30 वर्षं आवड म्हणून कार्यरत आहे. ओरिसा महापूर, कच्छ भूकंप पुनर्वसन, दुर्बल मुलांचं शिक्षण - संगोपन यात सहभाग नोंदवला आहे. तसंच समाजातील स्त्रीला सबला बनवतानाच वेश्यांच्या प्रश्नावरही 30 वर्षापेक्षा जास्त काळ कामं करणारी ' वंचित विकास ' सारखी संस्था, अपंगांच्यासाठी अनेक दशके कार्यरत असलेली " हेल्पर्स ऑफ दि हँडीकॅप्ड" सारख्या संस्था... या ठिकाणी त्यांच्या कार्यात अल्पसा सहभाग देताना हे जाणवलं की शरीराच्या दुर्बलतेपेक्षा मनाच्या दुर्बलतेवर अधिक काम करण्याची गरज आहे.
त्यातच 2020 ला कोरोनाकाळात सगळं जग ठप्प झालं. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. उद्योग बंद पडले. आर्थिक नुकसानीसोबत शारीरिक त्रास, आसपास सतत दिसणारे मृत्यू, आपल्या घरावर असलेलं मृत्यूचं सावट, घरातच सतत सगळे एकत्र राहिल्याने नातेसंबंधा मध्यें निर्माण झालेले नवे प्रश्न सभोवती खूप प्रमाणात दिसलें. आणि एका आंतरिक प्रेरणेने " जादूची पेटी " हा टेली काउन्सिलिंगचा प्रयोग तेव्हा सुरु केला. ज्यांना आपल्या विविध समस्या कुणाशीही बोलता येत नाहीत त्यांनी अवश्य फोन कॉल किंवा ई-मेल द्वारे संपर्क साधावा असं आवाहन केलं.
सुरुवातीला मलाच वाटलेलं की फारसं कुणी कॉल करणार नाही. मात्र केवळ फेसबुक आणि व्हाट्सअपच्या माध्यमातून केलेलं हे आवाहन अनेकांपर्यंत पोचलं. राज्यभरातून शेकडो फोन आले. त्यात जास्त संख्या महिलांची होती. मीं एक परका माणूस त्यात पुरुष, असं असलं तरीही त्यांनी मन मोकळं केलं.
त्यावेळी जाणवलं की या बिचाऱ्या किती किती सोसत आहेत. काही गंभीर समस्या होत्या तिथं त्यांना काही संस्थांशी जोडून दिलं. त्यातून त्यांना मदत मिळाली. कोरोना चीं भीती, मुलांच्या समस्या, पती - पत्नी चं अवघडलेलं नातं, विवाह बाह्य संबंध, वयस्कर मंडळींच्या समस्या असं किती किती समोर येत राहिलं. माझ्या परीने मीं त्यांना फोनवरून बोलून मोफत सहकार्य करत राहिलो. त्यामुळे आता जाणवतंय की समाजात यापुढील काळात जसं ' आर्टिफिशियल इंटिलिजन्स' या गोष्टीला खूप महत्व येणार आहे तसंच किंवा त्याहून जास्त एखाद्या काउन्सिलर ला, मानसोपचारतज्ज्ञला महत्व असणार आहे. ' सांगेन गोष्टी युक्तीच्या चार ' असं म्हणणारा, समोरच्याला त्याच्या अडचणीच्या वेळी हक्काचा आधार असा कृष्ण आपल्याला होता यायला हवं. प्रत्येकाला जेंव्हा एखादा असा कृष्ण लाभतो तेंव्हा त्याच्या मानसिकतेत मोठं परिवर्तन शक्य होतं.

शेवटी एकच सांगावंसं वाटतं की तुम्हाला कुणाला एखादी व्यक्ती मानसिक त्रासात आहे असं वाटलं तर त्याला पटकन आधार देऊयात. आज क्षुल्लक गोष्टींसाठी आत्महत्या करणारी सर्व वयोगटातील माणसं पाहून मनाला यातना होतात. मिळालेलं सुंदर आयुष्य हे. तें का नकोस झालं असेल असं वाटतं. आपल्या परीने लोकांना मैत्र देऊयात. त्यांच्या आयुष्यात पुन्हा आनंद फुलवूया. मन मनास उमगत नाही असं म्हटलं असलं तरी एखाद्यासाठी 'मनापासून सहकार्य करणारा' मित्र बनूया.
- सुधांशु नाईक, 9833299791🌿

( टीप :- ज्यांना कोणत्याही प्रकारचे काउन्सिलिंग हवं असं वाटत आहे तें अवश्य माझ्याशी कधीही सम्पर्क साधू शकतात, यासाठी मीं योग्य ते सहकार्य नक्की करेन.) 

No comments:

Post a Comment