marathi blog vishwa

Saturday, 7 December 2019

एक होती आजी...


माझ्या लहानपणाच्या आठवणीतच एक चिमुकलं खेडेगाव आहे. आजूबाजूच्या विस्तीर्ण शेताच्या मध्यावर तिथे मातीचं एक घर. बाजूला लालबुंद फुललेला गुलमोहर अन समोर चिंचेचे गर्द सावली देणारं एक भलं थोरलं झाड. झाडाच्या पायाशी एक बैलजोडी बांधलेली, कुणी एखादं गडीमाणूस काही बाही काम करत तिथेच... अन त्या घराच्या कट्ट्यावर त्या चिंचेसारखीच मायेची गर्द सावली अशी बसलेली माझी आजी ....
आम्हाला दुरून येताना पाहूनच ती आनंदाने हरखून जायची. तिच्या पायाशीच बसलेला ‘खंड्या’ शेपटी हालवत आमच्याकडे येईपर्यंत ती आत जाऊन चुलीवर चहाच आधण ठेवायची. ‘आलात, बाबानो या.. रे... या.. हात-पाय धुवून घ्या, मागनं तुम्हाला चहा देते.’
तिच्या त्या मायभरल्या शब्दांनी सगळा शीण पळून जायचा. चहाबरोबरच एखादा चुरमुऱ्याचा किंवा मुगाचा लाडू हातावर मिळायचा...
बालपण ही मोठी मौजेची गोष्ट आहे नं ! लहान असताना आपल्याला लवकर मोठ होण्याची घाई झालेली असते अन मोठेपणी मात्र बालपणातल्या अनेक आठवणी मनात पिंगा घालत असतात, अस्वस्थ करतात तर कधी हेलावून सोडतात...


( हे प्रतीकात्मक क्षणचित्र इंटरनेटवर मिळालेलं) 
पूर्वी मुंबई इलाख्यात असलेलं पण नंतर कर्नाटकात गेलेल्या चिकोडीजवळचं हे चिंचणी गाव. इथे कधी काळी आमची शेतजमीन होती. काका चिकोडीत राहत असूनही आजी मात्र बहुतेक वेळा शेतात आजोबांच्या माघारीसुद्धा एकटी राहायची. किंबहुना ती तिचीच आवड होती.
मुळचा गोरापान रंग, वयानुसार पडलेलं सुरकुत्यांच जाळ अन अत्यंत प्रेमळ भाषा... आजीकडे कुणीही चटकन आकर्षित व्हायचंच.. चिपळूणला ती आली कि इथल्या सगळ्या बाळगोपाळांचा तिच्याभोवती गराडा असायचा पण इथे राहिली तरी तिचं मन कायम शेतात, गडीमाणसात, प्राण्यांच्यात गुंतलेलं असायचं. कुत्रामांजर, गाई-गुरं अशी सगळ्या प्राण्यांबद्दलची तिची आवडच बहुधा आमच्यात उतरलीय.
आजीचं संपूर्ण आयुष्यच तसं हलाखीत गेलं. खर तर तिचं माहेर श्रीमंत होतं. सगळीकडे सुबत्ता होती... पण सासरी आल्यावर सगळ दारिद्रही तिनं सोसलं. त्यात आजोबा म्हणजे जमदग्नीचा अवतार पण तिनं कुठेही कुरकुर केली नाही. त्याच्या संतापल्याच्या गोष्टीही ती नंतर आम्हा मुलांना हसत हसत सांगायची. सणासुदीलाही कित्येकवेळा घरात काही खायला नसायचं पण तिनं कधीच कुणापुढे पदर पसरला नाही... अन मुलांवरही असे संस्कार केले कि उपाशीपोटी सुद्धा ती अशी राहायची... जणू आत्ताच जेवून आली आहेत...
माझे मोठे काका नोकरीसाठी रंगून, काठमांडू, पोखरा, रांची, ग्वाल्हेर असे कुठेकुठे पोटासाठी भटकत होते तर दुसरे काका शेताकडे बघत गावात राहिले. आजोबांच्या माघारी आजीशेतातल्या घरात एकटीच राहिली. सगळं काहीमन घट्ट करून सोसत राहिली.
रिटायर्ड झाल्यावर मोठे काका देखील शेतातल्या घरात येऊन राहिले... घरात थोडीफार दुरुस्ती केली पण आजीला सुख नाहीच मिळालं. काकूकडून तर काही आरोप झाल्यावर ती खूपच दुखावली गेली. शिक्षणाला बाहेर पडलेले बाबा नंतर नोकरीसाठी सुद्धा बाहेरच राहिले त्यामुळे खरतर तिचा बाबांकडे ओढा कमीच...त्यामुळे आमच्याकडे अधेमध्ये आली तरी ती काही दिवसांपुरतीच राहत असे. 
पण १९८९-९० मध्ये मधल्या काकांच्या मृत्यूनंतर हट्टाने बाबा मग तिला चिपळूणला आमच्या घरी घेऊन आले... मग ती इथेही रुळली.
खरतर येताना ती एखाद्या निर्वासितासारखीच आली होती... गावाच्या घरच्या अनुभवांचे चटके सोसून शहाणी झाली होती... परक्यासारखीच रहायची सुरुवातीला. पण इथे मात्र तिचे आडाखे चुकले, आईने प्रेमाने तिची खूप सेवा केली अन ती पुन्हा खुशीत आली... मग घरच्या- दारच्या सर्वांवर अपार माया केली तिने.
माझ्यावर  तर तिचा जास्त जीव होता. कॉलेज संपल्यावर अवघ्या १८व्या वर्षी मी चिपळूण जवळ परशुराम लोट्यातील एका कंपनीत सर्व्हिसला लागलो... कधी दिवसाचे १६-१८ तास सुद्धा काम करावे लागे. मग आजीचा जीव कळवळायचा. ‘हिंडण्याफिरण्याचे वय हे... पोराला किती दगदग होते....’ असं सारखं म्हणायची... मी रात्री आल्यावर माझ्यासाठी गादी घालून ठेवायची... खरतर मी तिची गादी घालून द्यायची... पण मग म्हणायची, ‘ इथं घरात काय काम आहे? नुसतं बसून खातेय ना... जरा हालचाल हवी कि शरीराला.’
रात्री झोपल्यावर तिने चेहऱ्यावरून हात फिरवला नाही असं कधीच झालं नाही... सुरुवातीला आल्यावर गप्प गप्प राहणारी, विचारात हरवलेली आजी नंतर मात्र गाणी वगैरे म्हणायची. कितीतरी मराठी, कानडी गीत, अभंग तिला पाठ होते. देवाचे अभंग जरी ती म्हणायची तरी देवाचं नाव मात्र घ्यायची नाही... ‘काय माझ असं चांगलं केलंय देवाने म्हणून मी नाव घेऊ?’ असंच म्हणायची.
पण तिचा देव हा माणसांच्यात होता. स्वतः पुरेपूर दारिद्र्य भोगल्यामुळे गरीब, अडल्यानडल्या माणसांबद्दल तिला खूप कळवळा होता. स्वतःच्या ताटातली अर्धी भाकरीसुद्धा वाटून टाकण्याएवढी उदार वृत्ती होती अन कित्येकवेळा स्वतःचा घास तिने दुसऱ्याला दिलाही होता.
मला पहिला पगार मिळाल्यावर मी तिच्या हातावर त्यातले १००/- रुपये ठेवल्यावर तिचे डोळे पाणावले. ‘अरे तुझा काका एवढा म्हातारा झाला, पण कधी मला ५/- रुपये द्यावे असे त्याला वाटले नाही रे!’ असं थरथरत्या आवाजात बोलली... मला जवळ घेऊन म्हणाली, ‘हे ठेव रे तुझ्याकडे लागले तर मागून घेईन... असाच मोठा हो.’
तिला पैशाची हाव कधीच नव्हती पण कायम दारिद्र्यात राहिल्यामुळे पैशाचं आकर्षणही होतं... तिला पैसे लागायचे कशाला? तर कुणा गरिबाला देण्यासाठी... दारावर आलेल्या भिकाऱ्यालाही पटकन काहीतरी देऊन टाकायची. घरात आलेल्या कुणालाही काही देऊन टाकायची. घरात आलेल्या प्रत्येकाला  खायला घालावं असं कायम वाटायचं तिला. पण तिच्या याचं इच्छेमुळे एकदा काकूने तिला वाईट-साईट शब्दात बोलल्यामुळे तिची कुचंबणा व्हायची. एखाद्याची ओढग्रस्त अवस्था तिला कधीच बघवत नसे. ‘पैसा  काय रे आज आहे उद्या नाही, माणूस उपाशी रहायला नको’ असं म्हणायची. 

कुत्र्या मांजरावर पण तिचा खूप जीव. पूर्वी तर शेतात ‘खंड्या’ नावाचा कुत्रा होता. कायम तिच्याभोवती असायचा. जन्माचं दारिद्य्र, त्यात रूपाचं दान देवानं भरभरून दिलेलं पण एकटे राहतानासुद्धा तिला कधीच कसली भीती वाटली नाही... शहरात राहणारी माणसदेखील रात्री घराबाहेर पडायला घाबरतात पण त्या अंधारलेल्या खेडेगावात एक कंदील हाताशी घेऊन आजी बिनधास्त जगायची. कामसूपणा तर विचारायलाच नको. वयाच्या ८० व्या वर्षीसुद्धा एखादं छोट काम समोर आल्यावर ‘आता नको, नंतर करू’ असं ती कधीच म्हणाली नाही. सगळ कस झटपट! तिच्या हातालाही एक वेगळीच चव होती. शेतातल्या घरात हाताशी काही नसताना तिनं बनवलेली साध्या तिखटमिठाची आमटी-भाकरीसुद्धा तृप्त करून जात असे. 
शेवटपर्यत ती ठणठणीत राहिली. दिवाळीला पहिला बोनस मिळाल्यावर मी तिच्यासाठी एक साधी, छानसी साडी आणली होती. कितीजणांना तिने ती कौतुकाने दाखवली पण तिने ती साडी नेसावी असं नियतीच्या मनात नव्हतं. ती साडी तिच्या प्रेतालाच नेसवावी लागली शेवटी !!
सकाळी तेल लावून डोक्याला तिच्याकडून मसाज करवून घ्यायला मला आवडायचं. ती डोकं चोळत असतानाच कशी झोप येऊ लागायची. दिवाळीतही त्या दिवशी मला मस्त तेल लावून मसाज केला, आईलाही न्हायला घातलं... अन दुपारची जेवण उरकल्यावर तिला अॅटॅक आला. मेंदूतील यंत्रणा निकामी होऊन एक बाजू लुळी पडली, वाचा गेली... अन पुढचे आठ दिवस नुसती तिची तडफड होत होती. मुळात तिला दुसऱ्यांनी तिचं काही केलेलं आवडत नसे. ती नापसंती डोळ्यात दिसायची. त्या चार-पाच दिवसात आमची पण खूप धावपळ झाली... एक दिवस तिच्या बाजूला बसलो होतो.. थंडी होतीच.. अन माझा अंगावरचा टॉवेल खाली घसरला. तो परत खांद्यावर ठेवायला ती धडपडू लागली. एका हाताने स्वतः मृत्यूच्या दारात असतानाही दुसऱ्याची काळजी करणाऱ्या तिला पाहून भडभडून आलं...
पण ती गेली... खरंतर  आठच दिवसाची ती तडफड पाहताना तिने लवकर जावं असंच वाटत होतं. त्यानंतर गेल्या कित्येक वर्षात मग दिवाळीला काही अर्थच नाही उरला. घराघरातून फराळाचे पदार्थ, आकाश कंदील, फटाके, वगैरे सुरु झालं कि मला तडफडणारी आजी आठवते... मग दिवाळीतल्या सगळ्या मौजमजेकडे पाठ फिरवून मी डोंगरदऱ्यातून भटकत बसतो... पिसाटासारखा...!!!
-    सुधांशु नाईक, कोल्हापूर ९८३३२९९७९१
-    ( पूर्व प्रसिद्धी दै. सागर, चिपळूण)

Wednesday, 30 October 2019

उर्मट वाटणारा हळवा बुध्दिमंत

माणसं. भेटत असतात आपल्याला सर्वत्र. भली, बुरी, विक्षिप्त, साधीभोळी अशा सगळ्या प्रकारची. चांगली, वाईट  किंवा मिश्र गुणांची. गुणांसोबत अवगुणांची जोड असलेली. कशीही असली तरी मनावर एक चित्र कायमचं उमटवून जातात. ते त्यांचं चित्र असतं. त्यातले रंग खास त्यांचं व्यक्तित्व घेऊन आलेले. आजवर भेटलेल्या काही माणसांच्या गोष्टी सांगणारी ही माझी लेखमाला... 

त्यातील पहिला लेख  एका स्नेह्यांवरचा....

उर्मट वाटणारा हळवा बुध्दिमंत

चिपळूण मधून निघणारं दै. सागर हे वृत्तपत्र कोकणात बहुतेक ठिकाणी सर्वांना माहिती असलेलं. नाना जोशी अष्टपैलू आणि अष्टावधानी असं गुणवंत व्यक्तीमत्व. १९६० च्या दशकात त्यांनी हे वृत्तपत्र सुरु केलं. तिथं दिवाडकर काम करायचे. भालचंद्र दिवाडकर हे त्यांचं नाव. माझ्यापेक्षा खूप मोठे. वयाने, ज्ञानाने, अनुभवाने, वाचनाने आणि लेखनानेही. एक दोन नव्हे तब्बल ४५ वर्षे त्यांनी एकाच दैनिकात काम केले हीही आगळीवेगळी गोष्ट. “ मला लिहायला खूप आवडते... मी सागर साठी लिहू का” असं विचारत ते ४५ वर्षांपूर्वी सागर मध्ये आले आणि तिथेच रमले. मुख्य संपादक बनले. माझ्यासारख्या अनेक नवोदितांना लिहायला संधी देऊ लागले. खरं म्हणजे सागर च्या ऑफिसात जाणारा प्रत्येक जण तिथे दिवाडकर बसलेत असं दिसताच एकदम गंभीर होत असे. कारण ते खाड्कन कधी काय बोलतील याची शाश्वती नसे. कुणाचाही मुलाहिजा न ठेवता ते समोरच्या अत्यंत तुसडेपणाने जागेवर गप्प करायचे. कुणी नवखा असेल तर “ कोण हा उर्मट, तुसडा, माणूसघाणा माणूस” असं वाटायचं त्याला.

माझी त्यांची भेट ही १९९७-९८ च्या सुमारास झालेली. चिपळूणात विविध सांस्कृतिक कार्यक्रमात मी आपली नोकरी सांभाळून लुडबुड करायचो. त्यातूनच एकदा “दै. सागर” च्या ऑफिसात दिवाडकर भेटले. तिथल्या एका स्नेह्यानं मला लेखमाला लिहिण्याबाबत विचारलेलं. मात्र दिवाडकराना ते आवडलं पाहिजे तरच छापून येईल. त्यांनी “छापतो” असं सांगितलं तरीही ते छापून येईलच अशी आशा बाळगायची मात्र नाही... इत्यादि इत्यादि बरंच काही सांगितलेलं.  

मी गेलो. थेट त्यांना भेटलो. 
“ सर, नमस्कार. लेखमाला लिहायची इच्छा आहे...”
“ कशावर लिहिणार तुम्ही...राजकारण, कोकणच्या समस्या वगैरे दळण दळणार असाल तर नका लिहू..”
“ नाही...मी ते नाही लिहिणार. मी संगीतावर, संगीतातली, इतिहासातली आणि आसपास भेटलेली माणसे यांच्यावर लिहायचं ठरवलंय. निसर्गावर, विविध अप्रकाशित निसर्गरम्य ठिकाणांवर लिहायचं म्हणतोय..”
“ बरं.. परवा पहिला लेख आणून द्या. बरा वाटला तर छापू. तुमच्या लेखात मला वाटलं तर हवी तेवढी काट-छाट करू शकतो मी. तसंच जर आवडला नाही तर फेकून देणार. परत परत विचारायला यायचं नाही.. कधी छापणार हो म्हणत...”
“ ठीकाय सर...देतो तुम्हाला लेख.. तुम्हाला आवडलं तर छापा..”
दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी गेलो. त्या दरम्यान महमद रफीसाहेबांची पुण्यतिथी होती. मग “ तू काही आसपास है दोस्त” असा लेख त्यांच्यावर लिहिलेला. हा बहुदा आपला पहिला आणि शेवटचा लेख--- सागर मधला... असं समजून त्यांना गेलो.
“ सर लेख आणलाय.”
“ तिथं त्या फाईल मध्ये ठेवत जा. जरा वेळानं पाहतो.... जा तुम्ही...”
२ दिवसांनी आलेल्या दै. सागर च्या  “ रसिक” पुरवणीत तो लेख जसाच्या तसा छापून आला होता...! त्या लेखमालेला “प्राजक्ताची फुले” असं नाव द्यावे ही माझी विनंतीही मंजूर केलेली त्यांनी.  दर आठवड्याला ही लेखमाला छापली जाईल अशी नोंद लेखासोबत दिसत होती. 

२-३ दिवसानंतर पुढचा लेख घेऊन गेलो. तो एका सुंदर पण कमी गर्दीच्या पर्यटन स्थळाबाबत होता. 
“ लेख तिथं फाईल मध्ये ठेवत जा. मी माझ्या सवडीनं वाचत जाईन. मी नसलो तरी लेख तिथंच ठेवत जा. रफीवर लिहिलत परवा तुम्ही... रफीने गायलेलं बहादुरशाह जफरचं गाणं ऐकलंय का कधी..”
“ हो.. लाल किला सिनेमातलं ना.. न किसीकी आंख का नूर हू... संगीतकार एस. एन. त्रिपाठी होते.....”
“ अरे व्वा...” इतकंच म्हणताना त्यांच्या नजरेत झालेला बदल मीही टिपला.

तिथून पुढे मग मी लिहित गेलो. कित्येकदा नाना देखील आवर्जून बोलावून घ्यायचे. गप्पा मारत बसायचे. एकदा एक लघुकथा लिहिली. नेहमीप्रमाणे संध्याकाळी जाऊन फाईल मध्ये ठेऊन आलो. दुसऱ्या दिवशी घरी फोन. 
“जरा लगेच येऊन जा भेटायला..” 
मला वाटलं काहीतरी चुकलं. जरा घाबरत घाबरतच गेलो. दिवाडकर निवांत खुर्चीत रेलून बसलेले.
समोर माझी कथा पडलेली.
“ हा माणूस पाहिलाय का तुम्ही.. ज्यावर कथा लिहिलीये.” 
“ नाही हो.. असा माणूस मी पहिला नाहीये. मात्र विविध ऐकलेल्या गोष्टी, काही पाहिलेली माणसे यांचा आधार आहे त्याला. प्रसंग काही प्रमाणात खरेच आहेत.”
“ रडवलं तुम्ही आज मला. कित्येक वर्षानंतर असं भावोत्कट, तरल काही भिडलं मनाला.. लिहित राहा तुम्ही. तुमच्यामध्ये एक अत्यंत संवेदनशील माणूस दडलाय... त्याला मारू नका. जग खूप क्रूर आहे हो. तुम्ही लहान आहात खूप. खूप सोसायचंय तुम्हाला अजून... पण तरीही मनातलं हे हळवेपण जपा. चला आज तुम्हाला माझ्यातर्फे चहा..”
“ thank you सर...” मी म्हटलं.. 
लगेच खाड्कन म्हणाले.. “ ते सर वगैरे म्हणू नका हो.. नुसतं दिवाडकर म्हणा..”
त्यांच्या वयाचा मान राखत मग मी त्यांना “दिवाडकर काका” म्हणू लागलो.
आम्ही दोघं जवळच्या एका टपरीवर चहा प्यायला गेलो. पत्रकाराच्या हुषारीने ते गप्पा मारत अलगद माझ्याकडून माझी माहिती काढून घेत होते. मी काय करतो, काय वाचतो, काय ऐकतो हे सारं सारं...
तिथून मग आमच्यात एक वेगळाच दोस्ताना निर्माण झाला. 


-----
एकदा काहीतरी निमित्ताने घरी बोलावलेलं त्यांना. जेवायला आलेले. मोजकं जेवले.
“ अहो मला गावात सगळे टाकाऊ माणूस मानतात. माझ्या नादाला कोण फारसं लागतं नाही. मलाही ते बरं वाटतं. त्यामुळे लोक आपला वेळ खात नाहीत. निवांत लिहायला, वाचायला खूप वेळ मिळतो त्यामुळे. नाहीतर लोक उगीच वेळ घालवत बसतात आपला. वेळकाढू गप्पा मारत. त्यांना फक्त टाइमपास करायचा असतो...”
खरंच होतं ते. दिवाडकर कुणासोबत भरपूर वेळ गप्पा मारत बसलेत असं दृश्य दुर्मिळच होतं. एकदा सहजच कवी ग्रेस यांचा विषय निघाला.
ताड्कन उठलेच ते. मलाही बळजबरीनं उठायला लावलं.
“ चला.. पट्कन.. गाडीवर बसा.” त्यांनी एम-एटी सुरु केली. कुठे जातोय काही कळेनाच.
गावाबाहेर दूर डोंगराच्या कुशीत बांधलेल्या एका नव्या घरी पोचलो..
“समोर पहा... काय नाव घराचं...”
मी पाहिलं... “अरे व्वा.. मितवा.. ग्रेस च्या कविता संग्रहाचं हे नाव..!”
ते आनंदले. म्हणाले.. “ या.. हे माझं घर. आता तुमचंही घर. इथं समग्र ग्रेस आहे. तुम्हाला कधीही काही वाचावं वाटलं तर हक्कानं या. बिनधास्त वाचा.”
मग त्यांनी पत्नीसोबत, लेकीसोबत ओळख करून दिली. चहा पीत आम्ही सगळे गप्पा मारत बसलो. काकू ही म्हणाल्या, कितीतरी दिवसात कुणी आलंच नव्हतं घरी. तुम्ही आलात, आपण सगळे गप्पा मारत बसलोय... छान वाटतंय...!
ज्या माणसाला माझ्या घरासकट गावातली अनेक घरं तुसडा माणूस समजत होती तो माणूस मला आपल्या घरी घेऊन आला होता..! हे घर तुमचंही असं सांगत होता..!
मी कित्येकदा त्यांना म्हटलं, काका अहो मला नावाने हाक मारा हो. अहो जाहो नका करू. पण कधीही ऐकल नाही त्यांनी.
त्या दिवशी कवी ग्रेस, कुमारजी, शिवाजी महाराज, सावरकर आदि माझ्या विविध आवडत्या विषयावर ते माझ्यासोबत मनसोक्त बोलत होते. 
तसं पाहायला गेलं तर दिवाडकर जुन्यातले कट्टर मार्क्सवादी. अनेक गोष्टीवर कठोर प्रहार करणारे. ज्या प्रकल्पात मी काम करत होतो त्या एन्रोन प्रकल्पातील विविध समस्या, त्यामुळे परिसराची झालेली हानी यावर त्यांनी पुस्तक ही लिहिलेलं. मात्र त्यांची कठोर साम्यवादी विचारसरणी आयुष्य अनुभवताना मध्ये आली नाही.
संगीत, साहित्य, निसर्ग, माणसे हे सगळं ते उत्कटतेने अनुभवत राहिले. त्यांचं व्यक्त होणं कदाचित वेगळंच होतं, कित्येकांना न भावणारं होतं मात्र त्यांच्या प्रखर बुद्धीमत्तेविषयी कुणालाच शंका नव्हती.
एका दिवाळीत घरी एक पाकीट आले. त्यात दिवाळी ग्रीटिंग होतं. मला कुमारजी आवडतात हे लक्षात ठेऊन त्यांनी लेकीकडून छान चित्र काढून घेतलं होतं. 
त्याला शीर्षक होतं कुमारजींच्या धनबसंती रागातील बंदिशीचा मुखडा..” दीप की ज्योत जर रे..” आजही ती बंदिश कधी ऐकली की दिवाडकर, त्यांची लेक आणि ते ग्रीटिंग आठवत मला..!
----
पुढे मी चिपळूण सोडून कोल्हापुरात दाखल झालो दै. तरुण भारत ला. गावी गेलो की न चुकता भेटायला जात होतो. एकदा गेलो तेंव्हा कळलंच की त्यांच्या पत्नीला जीवघेणा आजार झालाय. दिवाडकर प्रथमच हळवे झालेले जाणवले.
“ ती बायको आहे माझी. आज न उद्या मारणार हे ठाऊक आहे. मी ते स्वीकारलं आहे. मात्र तिच्या वेदना पाहवत नाहीत हो... समोर असून काही करू शकत नाही मी...” असं ते थंड आवाजात जेंव्हा सांगत होते तेंव्हा माझेच डोळे भरून आले.
काही महिन्यांनी काकू गेल्याच. मग एकुलत्या एका लेकीला जपत ते एकुटवाणे जगत राहिले. दिवसरात्र कामात स्वतःला बुडवून घेत राहिले. सकाळपासून रात्री उशिरा पर्यंत वृत्तपत्राचे काम करताना विविध पुस्तकं लिहित राहिले.
आणि पुन्हा नियतीने अजून एक आघात केला. उत्तम संस्कार लाभलेली, हुषार, कलाकार अशा त्यांच्या लेकीनं भर दिवसा घरी गळफास लाऊन आत्महत्या केली. 
घरी आल्यावर आपल्या लाडक्या लेकीला तसं पाहताना त्या बापाला काय वाटलं असेल याची कल्पनाच करवत नाही.
त्यानंतर काही महिन्यांनी मी चिपळूण ला गेलेलो. मुद्दाम त्यांना भेटायला गेलो.
“ काय सांगू आणि काय बोलू हो... माझं अवघं कुटुंबच संपलं. भुतासारखा एकाकी उरलोय..” विचित्र खरखरत्या स्वरात ते म्हणाले आणि गदगदून रडू लागले. 
मलाही सुचेना की आपण यांचं सांत्वन कसं करावं...
जरावेळानं म्हणाले, “ किती गुणी होती लेक माझी. सगळ्या चांगल्या गोष्टी तिच्यासाठी हजर केल्या होत्या. लोक मला घाबरायचे. ती आजवर कधी घाबरली नव्हती. सगळ्या विषयावर मुक्त बोलायची माझ्याशी. त्या दिवशी तिला नेमकं कसला मानसिक त्रास झाला असेल, असं कोणतं दडपण आले असेल तिच्या मनावर की काही वेळापूर्वी फोनवर बोलतानाही मला तिनं हे असं काही करणार याचा थांगपत्ता लागू दिला नाही.. हरलो मी... माझ्या लेकीच्या आयुष्यात असं काय दुःख होतं की जे तिला माझ्याशी शेयर करावं वाटलं नाही. त्या दुःखापुढे तिनं हार मानून मृत्यू जवळ केला.. काय होतं ते मला कधीच कळणार नाही...”
त्यांच्यातल्या बापाचं ते आक्रंदन पाहताना मी अक्षरशः थिजून गेलो.
तिथून पुढे ते अधिकाधिक कामात गुंतून गेले. दै. सागर ला विविध अग्रलेख आणि “पडछाया” हे त्यांचं सदर यातून त्यांनी हजारो विषय हाताळले. कोणत्याही विषयाच्या मुळाशी जाण्याची त्यांची हातोटी जबरदस्त अशीच होती. त्यांच्यातला साक्षेपी संपादक सदैव जागृत असायचा. त्यांच्यातला रसिक सदैव प्रत्येक गोष्ट टिपायला उत्सुक असायचा. अनेक गरजू लोकांना कसलाही गवगवा न करता मदत करणारा तो एक हळवा सहृदयी माणूस होता आणि त्याचबरोबर आपल्या भोवती उर्मटपणाचे काटेरी कुंपण स्वतःच निर्माण केलेला तो एक बुद्धिमंत होता..! 
एकदिवस कळाले की त्यानाही मोठ्या आजाराने गाठले आहे. आणि फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांच्या मृत्यूचीही बातमी शेवटी आलीच. 
एकदा एका नातेवाईकाच्या मृत्युनं मी हळवा झालेलो तेंव्हा ते शांतपणे समजून घालत म्हणाले होते.. “जन्मलेला प्रत्येक जीव कधीतरी मरणार असतोच. मात्र जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रवासात त्याचं आयुष्य कसं वळणे घेत जातं हे खरंच आपल्याला कळत नाही. आणि कळलंच तरी आपणही त्यासाठी खूप काही करू शकतो असंही नाही. आपण त्याची सेवा, सुश्रुषा वगैरे जे काही करतो ते केवळ आपल्या समाधानासाठी करतो. तुम्ही जमेल ते केलं त्यांच्यासाठी त्यातच समाधान माना... कुणाच्याही जन्मानं आनंदी होऊ नका.. कुणाच्याही मृत्यूनं खंतावू नका. रामदास म्हणतात तसा सदैव मृत्यूच आपल्या सोबत चालत असतो... आपल्याला तो दिसत नाही इतकंच.”
जिवलगांचे मृत्यू सोसताना त्यांना काय वाटलं असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही... आणि त्यांच्या मृत्यूनंतर एक अध्याय संपला यापेक्षा जास्त काही आता लिहिवत नाही..!
सुधांशु नाईक, कोल्हापूर( ९८३३२९९७९१ )

Friday, 26 October 2018

“जयपुरी” स्वरांची अद्भुत अनुभूती देणारं आनंद पर्व...

आनंद पर्व. जयपूर-अत्रौली घराण्याच्या सध्याच्या बहुतांश गायक- गायकांनी घराण्याचे राग, बंदिशी, एकूण जयपूर गायकीचा आकृतिबंध याविषयी गायन आणि चर्चेच्या माध्यमातून साधलेला मैत्रीपूर्ण संवाद. एका घराण्याची गायकी समोर ठेवत त्याविषयी सर्वांनी अत्यंत जिव्हाळ्याच्या वातावरणात साधलेला असा संवाद आजवर संपूर्ण देशात बहुदा घडलाच नव्हता. त्यातही आपल्या मोठेपणाची, कीर्तीची सारी बिरुदे बाजूला ठेवत सर्व दिग्गजांनी केवळ शिष्यभावाने दिलेला मनमोकळा सहयोग हे या महोत्सवाचे वेगळेपण मानायला हवे..! जयपूर-अत्रौली घराण्याचे ज्येष्ठ गायक कै. आनंद लिमयेबुवा यांच्या २५ व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत त्यांचे शिष्य सुधीर पोटे यांनी या आगळ्यावेगळ्या संकल्पनेला प्रत्यक्षात आणले. त्याबद्दल त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. या महोत्सवाविषयी एक संगीतप्रेमी म्हणून काय वाटते याचं हे शब्दचित्र...

१७ आणि १८ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरातील गडकरी हॉलचा परिसर शास्त्रीय संगीतप्रेमी मंडळींनी सकाळपासून भरून गेला होता. पं.दिनकर पणशीकर, श्रुती सडोलीकर, अश्विनी भिडे-देशपांडे, अरुण द्रविड, उल्हास कशाळकर, मृत्युंजय अंगडी, शौनक अभिषेकी, रघुनंदन पणशीकर, मधुवंती देव, अलका देव- मारुलकर, प्रतिमा टिळक, मिलिंद मालशे, सुलभा पिशवीकर आदि दिग्गजांसोबत कोल्हापुरातील अरुण कुलकर्णी, विनोद डिग्रजकर, सुखदा काणे, भारती वैशंपायन यांच्यासह स्वतः सुधीर पोटे ज्यावेळी मंडपात प्रवेश करते झाले, तेंव्हा सर्व रसिकानी- विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना मानवंदना दिली आणि इथूनच या कार्यक्रमाचे वेगळेपण सर्वांसमोर येऊ लागले.


सगळेजण आत हॉलमध्ये गेले आणि जणू जागेवर खिळूनच राहिले कारण नेपथ्य. ज्ञानेश चिरमुले यांच्या रसिकमनाने, गुजरातमधील चम्पानेरच्या वास्तूच्या फोटोंचा वापर करत सभागृहाला जणू प्राचीन काळात नेऊन ठेवले होते.

जयपूर-अत्रौली घराणेही असेच प्राचीन. गेली अनेक शतके अनेक बुद्धीवन्तानी साकारलेली, वेगळ्या आकृतीबंधात बांधलेली ही गायली. प्रथमच ऐकणाऱ्याला चमत्कृतीपूर्ण गायकीने गुंग करून सोडणारी तर जाणत्या रसिकांना नागमोडी लयीच्या रस्त्याने स्वरविश्वाची अवर्णनीय अनुभूती देणारी. घराण्याचे अध्वर्यू अल्लादियाखाँसाहेब कोल्हापुरात आले आणि राजर्षी शाहू महाराजांच्या गुणग्राहक वृत्तीमुळे इथलेच झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र भुर्जी खां, मंजीखां, नातू अझीझुद्दीनखां उर्फ बाबा, केसरबाई केरकर, मोगुबाई कुर्डीकर, लक्ष्मीबाई जाधव, धोंडूताई कुलकर्णी, निवृत्तीबुवा सरनाईक, गोविंदबुवा शाळीग्राम, गजाननबुवा जोशी, मल्लिकार्जुन मन्सूर आणि पं. लिमयेबुवा असे अनेक शिष्य घडले. त्यांनी नवे शिष्य घडवले. या सर्वांची सध्याची शिष्यमंडळी संपूर्ण गायकी उकलून सांगणार होती, घराण्याची ख्याती असलेले कित्येक अनवट राग उलगडून दाखवणार होती,  त्यावर सर्वजण चर्चा करणार होते... अत्यंत दुर्लभ अशी ही जणू पर्वणीच.


प्रत्येकानं एक खास राग निवडावा, त्यातील स्वतः शिकलेली बंदिश मांडावी, त्यानंतर त्या रागाचे स्वतः शिकलेलं, स्वतःला समजलेलं स्वरूप उलगडून दाखवावं, इतरांनी त्याच पद्धतीने हा राग आपण मांडतो की काही अन्य प्रकार आपण शिकलोय हे सांगावे. मग त्यातील सौंदर्यस्थळे गाऊन दाखवावीत अशा पद्धतीने हे सत्र सुरु झाले.

खट तोडी, बिहारी, अडाणा बहार, असे खास जयपुरी स्पेशालिटी असलेले राग सादर होऊ लागले. खूप कमी वेळा गायले जाणारे राग, त्यावरील चर्चा ऐकताना किती समृद्ध व्हायला होत होते..! चर्चा सुरु होती म्हणजे कशी त्याचा एक नमुनाच सांगतो ना तुम्हाला...

तर्ज सोहनी नावाचा एक राग ज्येष्ठ गायक अरुण कुलकर्णी यांनी सादर केला. ते म्हणाले की निवृत्तीबुवांकडून हे शिकलोय मी. शुद्ध मध्यम हा सोहनीत वर्ज्य असलेला स्वर लावून हा राग सादर करावा असं मला शिकवलं आहे. त्यांनी गायलेली बंदिश होती, “जब चढ्यो हनुमंत..”.  त्यानंतर मग पणशीकरबुवा म्हणाले, अहो हीच बंदिश आम्हाला आमच्या गुरुजींनी “ हिंडोल पंचम” रागात शिकवली आहे. हा रागही सोहनीसारखाच उत्तरांगप्रधान. पंचम राग म्हणजे पाच स्वरांचा राग.. तो हिंडोल पंचम, ललितपंचम अशा प्रकारे जोडरागात गायला जातो हे सर्वाना माहिती आहेच. तर प्रतिमा टिळक आणि श्रुती सडोलीकर म्हणाल्या की हाच राग त्यांना “दोन माध्यमांची सोहनी” या नावाने शिकवला आहे...!


त्यानंतर मृत्युंजय अंगडी यांनी मंदार आणि बिलावली नावाचे दोन अनवट राग सादर केले. तर सुखदा काणे यांनी कुन्दावती राग सादर करण्यापूर्वी त्याची माहिती दिली. हा राग लिमयेबुवानी रचलेला. सुखदाताई यांची आई कुंदा ही लिमयेबुवांची पहिली शिष्या. तिचं अकाली निधन झाल्यानंतर बुवांनी तिची आठवण म्हणून या रागाची निर्मिती केली. गौडमल्हार आणि अरवी  रागाचं मिश्रण करून हा राग निर्माण झालाय.

सध्या अमेरिकेत राहणारे विश्वास शिरगावकर यांनी नट-नारायण आणि अडम्बरी केदार हे राग सादर केले. तर विनोद डिग्रजकर यांनी विहंग हा अनवट राग सादर केला. अश्विनी भिडे-देशपांडे यांनी गोधनी हा राग मांडला. रायसा कानडा, बसंती केदार, बसंती कानडा, संपूर्ण मालकंस, सावनी नट, पूर्वी, जयंत कानडा हे जयपूर ची खासियत असलेले राग मांडले गेले.

जरी हे राग घराण्याची खासियत असले तरी प्रत्येक गुरु परंपरेने त्यात काही न काही सूक्ष्म बदल होत गेले होते. वेगवेगळ्या शाखांतून रागाच्या चलनात कसा फरक होतो, कुठे दोन्ही निषाद लागतात का, कुठे शुद्ध धैवत ऐवजी आम्हाला गुरुनी कोमल धैवतचा अल्पसा वापर कसा करायला सांगितलं आहे... आदि चर्चा करताना सर्व दिग्गज गायकही कोणतेही पूर्वग्रह न ठेवता, कोणताही अभिनिवेष न दाखवता नोटस् काढत होते, एखादा वेगळा विचार आढळल्यास लगेच टिपून त्यावर विचार करत होते..!


शिष्यमंडळी आणि रसिक श्रोत्यांसाठी तर जणू हे जयपूर गायकीचं विश्वरूप दर्शनच होतं..! एक काळ असा होता की आपण कोणता राग सादर केलाय याविषयी प्रत्यक्ष अल्लादियाखाँ साहेब यांनीही वेगळीवेगळी नावं सांगितली होती असं कित्येकांनी तेंव्हा लिहून ठेवलेलं. तत्कालीन घराणी, त्यांची काटेकोर तटबंदी यामुळे जयपूर घराण्याचे राग ही काही गुढरम्य गोष्ट आहे असं अनेकांना वाटे. काळाच्या ओघात या तटबंद्या आता तितक्या काटेरी उरल्या नाहीत. उलट विविध घराण्याच्या  गायकीतील सौंदर्यस्थळे अनेकांना मोहवत आहेत आणि नवनवीन शिकण्यासाठी इतर घराण्यांचे गायक “जयपूर” च्या लयप्रधान गायकीकडे आकृष्ट झाले आहेत.

अशा योग्य वेळी आपल्याच घराण्याचे विविध राग एकत्रितपणे ऐकणे, त्यावर चर्चा करत, विविध प्रवाहांना सामावून घेत नवे प्रवाह घडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे ही घटना ऐतिहासिक मानायला हवी. सुमारे चार-साडेचार हजार वर्षांपासून हिंदुस्तानी संगीत परंपरा असेच विविध प्रवाह सामावून घेत या टप्प्यावर येऊन पोचली पण अस्तंगत झाली नाही. जगभरातील सांगीतिक इतिहासात म्हणूनच हिंदुस्तानी संगीत आपले वेगळेपण राखून दशांगुळे उरली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे शतकानुशतके होत गेलेल्या “आनंद पर्व” सारख्या चिंतनात्मक कृती. आपल्या जन्मात अशा एखाद्या कृतीचा आनंद घेत त्याचा साक्षीदार व्हायचा योग लाभणे ही म्हणूनच दुर्लभ आणि अविस्मरणीय गोष्ट होते. जयपूर घराण्यातील जाणत्यांना हे असं करावंसं वाटणं हेच त्यांच्या वेगळ्या विचारक्षमतेचे द्योतक मानायला हवे.

कार्यक्रमातील चर्चा, राग मांडणी सोबतच उत्तम अशी स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. तसेच एकेकाळी गोविंदराव टेंबे यांनी लिहिलेल्या “अल्लादियाखाँसाहेब” यांचे चरित्राची पुनरावृत्ती प्रकाशित करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून सांगतेपर्यंत प्रत्येक गोष्ट ही विशिष्ट दर्जा ठेऊन सादर करण्यात संयोजक नक्कीच यशस्वी झाले असं कौतुकाने म्हणावे लागेल.

याचप्रकारे आजच्या काळात घराण्यांच्या भिंती ढासळत असताना, यापुढील काळात सर्वच घराण्याच्या गायकीबाबत असं चिंतनात्मक संमेलन करता येईल. इतकंच नव्हे तर सर्व घराण्यांमधून नवी सर्वसमावेशक गायकी निर्माण होऊ शकते का, ती अधिक सखोल व्हावी यासाठी काय करता येईल यासाठीही गायन, चिंतन, नवे विचार मांडणं शक्य होऊ शकेल. माझ्यासारखा सामान्य संगीतरसिक मग नक्कीच सुखिया होऊन जाईल..!

  • सुधांशु नाईक, कोल्हापूर.(९८३३२९९७९१)
  • (काही क्षणचित्रे अनिलदा नाईक यांच्या सौजन्याने..)

 

राग समयचक्र-- एक अनोखी अनुभूती..!

🎼
राग समयचक्र. प्रतिज्ञा नाट्यरंग आणि नादब्रह्म समूह यांनी आयोजित केलेला एक आगळावेगळा राग महोत्सव. प्रहरानुसार रागांच्या सादरीकरणाची ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सात दिवस कोल्हापुरात चाललेली मैफल. एक महोत्सवच जणू.


नटभैरवनं सुरु झालेलं समयचक्र ललितपंचम- भैरवीनं सुफळ संपूर्ण झालं. सर्व गायक व वादक कलावंतानं ज्या आपुलकीनं अन् निष्ठेनं आपली कला सादर केली त्यांना सविनय प्रणाम.
सगळ्यांच्या उत्तम रागमांडणीची ही अनुभूती घेताना मलाच खूप समृध्द झाल्यासारखे वाटले. रागाचा स्वभाव, समयचक्रानुसार निर्माण होणारी स्पंदनं, कोणतीही दिखाऊगिरी न करता केलेली सुबक देखणी अशी स्वरांची सजावट मनभर पसरत मनात खोलवर रुजून गेली.
मी जे काही ऐकले त्यातील काही राग तर खास लक्षात राहिलेत.



उदा. विद्याताईंचा गावती, ब्रिंदावनी, पूर्वी, गायत्रीताईंचा मधुवंती, पूरिया, दरबारी, सोहनी हे राग खास लक्षात राहिलेत. सौरभ देशपांडे यांनी गायलेला कोमल धैवत बिभासचा तराणा, त्याची ती शांत उदात्त मांडणी लोभस होती. निनाद देव यांनी माझ्या प्रेमळ हट्टापायी सादर केलेला खोकर आणि भारदस्त असा शांतगंभीर ललत विसरताच येणार नाही.
मधुवंतीताईंनी सादर केलेला मारवा, मुलतानी, मालकंस, बसंतबहार मनाशी खूप जपून ठेवावेत असेच! त्यांचं संयमित गायन आणि रागांना जणू लहान बाळाप्रमाणे लडिवाळ हाताळणं खूप दिवस लक्षात राहील.
हल्ली कोण शास्त्रीय संगीत सलग ऐकतं हा प्रवाद कोल्हापुरी रसिकांनी खोटा ठरवला.




अशा कार्यक्रमांना हजारो माणसांनी यावं ही अपेक्षाच नसते, जी मंडळी आली ती सतत येत राहिली, शेवटच्या दिवशी रात्रभर जागून ऐकत राहिली याचं सुखद समाधान वाटतंय. संपूर्ण कार्यक्रमात कुठंही लोकानुनय नव्हता, सेमाक्लासिकल नव्हतं, गिमिक्स नव्हती, फक्त शुध्द रागसंगीत ऐकवलं जात असताना त्यांचं असं सोबत असणं फार अानंदायी आहे!

संपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्ताने या सर्व कलावंतांच्या निकट जाण्याची संधी मिळाली हा मला माझा जणू बहुमानच वाटतो. त्यांच्यापुढे माझी समझ म्हणजे जणू ऐरावतापुढं शामभट्टाची तट्टाणी... तरीही सर्वांनी माझ्या लहानसहान विनंतीचा मान राखत काही सादरीकरण केले हे त्यांचं मोठेपण.


प्रशांत जोशी नेमकं हे सगळं कसं जुळवून आणतो याबाबत माझ्या मनात संशयच आहे. बहुदा अल्लाऊद्दिनप्रमाणे त्याला एखादा जादूचा दिवा सापडला असावा. कुणी विचार मांडायचा अवकाश, हा थेट कार्यक्रमच मंचावर आणून मोकळा होतो! सगळं नियोजनही नेटकं असतं, वर स्वत: मिरवायला मात्र कुठेच पुढे येत नाही. त्याच्या प्रमाणिक धडपडीसाठी मग रमेशदादा सुतार, मंदार भणगे, रोहन, फोटोग्राफर नाना आदि सारे धावपळ करत रहातात. कार्यक्रम संपेपर्यंत कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता कष्ट करत रहातात...!
'रागसमयचक्र' च्या निमित्तानं खूप दिवसानंतर आठवडाभर रागसंगीतात डुंबून राहिलो. ऐकत राहिलो, चिंतन करत राहिलो, निवेदनाची जबाबदारी पार पाडत बोलत राहिलो. कित्येक वर्षांनंतर पुन्हा लाभलेला हा अमृतयोग मनाच्या तळाशी अलवारपणे जपून ठेवायचा अशीच माझी भावना आहे.
शरीरमनाला सुखावणा-या अशा मैफली ऐकत रहाताना सुख म्हणजे नक्की काय हे उमगू लागतं अन् जगी सर्व सुखी असा मीच आहे ही भावना मग अधिकच गहिरी होत जाते. जगण्याबद्दलची असोशी वाढवत रहाते...!
- सुधांशु नाईक, कोल्हापूर.(9833299791) 🌿
🎼