marathi blog vishwa

Tuesday, 12 December 2023

कबिराचे विणतो शेले..

#सुधा_म्हणे: कबिराचे विणतो शेले..

08 डिसेंबर 23 

मराठी भावगीते आणि भक्तिगीते यांच्या क्षेत्रात माणिक वर्मा यांचे स्थान फार वरचे. त्यांचा तो जरा ढाला तरीही मनात सहज उतरणारा सूर कानी पडला की आपली मनस्थिती पटकन बदलून जाते. अमृताहुनी गोड हे गाणे असू दे किंवा क्षणभर उघड नयन देवा हे गाणे असू दे, माणिकबाईंचा आवाज कानी पडला की एक प्रेमळ मायाळू व्यक्ती सोबत असल्यासारखे वाटू लागते. त्या जेंव्हा “घननिळा लडिवाळा...” गातात तेंव्हा तेही गाणे आपल्या हृदयापर्यन्त सहज पोचते. पु.ल. देशपांडे यांना तर त्यांचा आवाज कायमच आवडत असे आणि त्यांनी संगीतकार म्हणून काम करताना त्यांना महत्वाची गाणी दिली होती. 


देव पावला या चित्रपटासाठी गदिमानी एक सहजसुंदर भक्तीगीत लिहिले आणि संगीतकार पुलंनी त्याला यमन रागाचे सुरेख रुपडे दिले. गदिमा लिहिताना इथे धनुर्धारी राम, बंधविमोचन राम आदि सुप्रसिद्ध उपमा न वापरता कौसल्येचा राम असे म्हणत त्याला लोभसवाणे मूल बनवून टाकतात. हा राम शूर वीर पराक्रमी नाही तर अगदी मायाळू आणि कनवाळू असा आहे. आणि अगदी हीच भावना माणिकबाईंच्या सुरातून पाझरत राहते. आपल्याला शांतवत राहते.

कबिराचे विणतो शेले, कौसल्येचा राम

भाबड्या या भक्तासाठी, देव करी काम !

कबीर. 16/17 व्या शतकात असलेले एक महान व्यक्तिमत्व. उत्तम कवी असलेले कबीर तितकेच फक्कड होते. रोखठोक व्यक्त होणारे कवी होते. समाजाने सुधारावे यासाठी तळमळणारे होते. अशा कबिरासाठी राबणारा राम या पुराणकथेवर अवलंबून असलेले हे गाणे.  ईश्वर आपल्या भक्ताची खूप काळजी घेतो या भाबड्या भक्तीसाठी पूरक असलेले हे शब्द.

एक एकतारी हाती, भक्त गाई गीत

एक एक धागा जोडी, जानकिचा नाथ

राजा घनःश्याम !

दास रामनामी रंगे, राम होइ दास

एक एक धागा गुंते, रूप ये पटास

राजा घनःश्याम !

राजा असलेला राम, जानकीपती राम कबिरासाठी हे करत बसतो. जगाच्या दृष्टीने कबीर हा केवळ एक विणकर. समाजात अगदी खालच्या थरात असलेल्या एखाद्या भक्तासाठी ईश्वराचे हे रूप आपल्या स्वरातून माणिकबाई अगदी सगुण साकार करून दाखवतात.

विणुन सर्व झाला शेला, पूर्ण होइ काम

ठायि ठायि शेल्यावरती, दिसे रामनाम

गुप्त होई राम !

कबिराचे ते सगळे काम पूर्ण केल्यावर राम तिथे अजिबात थांबून राहत नाही. आपण केलेल्या कामाचा डंका पिटत बसत नाही ही गोष्ट गदिमा सूचकपणे लिहून जातात. आज काही लहान मोठी कामे केली तरी स्वतःची पाठ थोपटून घेत फिरतो आपण. इथे राजा रामासारखा एक महान माणूस कबिरासारख्या छोट्या व्यक्तीसाठी निःस्वार्थीपणे कसे राबतो हे सांगून आपण देखील जगावे कसे हे गदिमा नकळत शिकवून जातात असे मला वाटते.

-सुधांशु नाईक (9833299791)

Monday, 11 December 2023

कुठे शोधीसी रामेश्वर...

#सुधा_म्हणे: कुठे शोधीसी रामेश्वर..
11 डिसेंबर 23
ईश्वराविषयी आपल्याला कायमच कुतूहल. अगदी आदिमानव टप्प्यापासून प्रत्येक टप्प्यावर माणसाने कुणाला तरी देवत्व दिले आहे. अग्नी, वारा, नदी,समुद्र, पाऊस,सूर्य, चंद्र आदि निसर्गाची रुपे असोत किंवा अनेक ऋषि, महान माणसे असोत या सगळ्याना देवत्व द्यायची आपल्याला फार घाई असते.
आपल्याला कितीही काही मिळाले तरी मागण्या मात्र संपत नाहीत. त्यासाठी मग या देवाचे देऊळ, त्या संतांची समाधी, हे तीर्थक्षेत्र असे लोक भटकत राहतात. कित्येकदा देवाची कृपा व्हावी यासाठी फिरणारी ही माणसे आसपासच्या लोकांशी मात्र अजिबात माणुसकीने वागत नाहीत.
त्यांच्यावर सणसणीत चाबूक ओढताना मग मंगेश पाडगावकर म्हणतात;
कुठे शोधिसी रामेश्वर अन्‌ कुठे शोधिसी काशी
हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी..

ईश्वर काय फक्त मंदिरात असलेल्या दगडांच्या, धातूच्या मूर्तीत असतो का? जगायला उपयुक्त असे सगळे जिथून मिळते त्याला ईश्वर मानायला काय हरकत आहे? ही माणसे या सगळ्याकडे का देव समजून बघत नाहीत. त्यातही झाडे, नदी, पाऊस हे सगळे किती निःस्वार्थी असतात. जे आपल्याकडे आहे ते सारे मुक्तपणे इतराना वाटून टाकतात. माणसे मात्र अशी वागत नाहीत.

हे सोप्या भाषेत पाडगावकर सांगत राहतात;
झाड फुलांनी आले बहरुन, तू न पाहिले डोळे उघडुन
वर्षाकाळी पाउसधारा, तुला न दिसला त्यात इषारा
काय तुला उपयोग आंधळ्या दीप असून उशाशी..

सुधीर फडके यांच्या आवाजात मुळातच एक नैसर्गिक गोडवा. हे गीत त्यामानाने परखड. कठोर ताशेरे ओढणारे. तरीही या गीतातील तो भाव अगदी चटकन त्या सुरांतून आपल्या हृदयापर्यन्त पोचतो ही त्यांची जादू. आपला पोषाख, वर्तणूक यामधून जे विसंगत वर्तन विविध बुवा, महाराज करत राहतात ते देखील त्यांच्या नजरेतून अजिबात सुटत नाही.

रुद्राक्षांच्या गळ्यात माळा, लाविलेस तू भस्म कपाळा
कधी न घेउन नांगर हाती, पिकविलेस मातीतुनि मोती
हाय अभाग्या भगवे नेसून घर संन्यासुन जाशी..

ईश्वर कुठे आहे हे कितीदा सांगितले तरी लोकाना उमगत नाही. त्यामुळे त्यांना ते कळावे यासाठी पोटतिडकीने स्पष्टपणे सांगत बाबूजी गात राहतात;

देव बोलतो बाळमुखातुन, देव डोलतो उंच पिकांतुन
कधी होऊनी देव भिकारी, अन्नासाठी आर्त पुकारी
अवती भवती असुन दिसेना, शोधितोस आकाशी..

ज्याना या झाडा-फुला-पानात-शेतात आणि दीनदुबळ्या लोकांमध्ये ईश्वर दिसतो तीच खरी देवमाणसे. समाजातील असुरप्रवृत्ती नष्ट होऊन देवप्रवृत्तीची वाढ व्हावी यासाठी पथदर्शक असणारे हे गीत आपल्या सर्वानाच आवडते. ते नुसते न आवडता आपल्या आचरणात उतरावे याची आता अधिकाधिक गरज आहे असे मला वाटते.
-सुधांशु नाईक (9833299791)🌿

Saturday, 9 December 2023

या बकुळीच्या झाडाखाली...

#सुधा_म्हणे: या बकुळीच्या झाडाखाली...
12 डिसेंबर 23
विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर यांच्यासारखेच मराठी काव्यसृष्टीवर आपला सुरेख ठसा उमटवणारे कवी म्हणजे वसंत बापट. “गौरीशंकर उभ्या जगाचा मनात पूजीन रायगडा..” उत्तुंग आमुचि उत्तरसीमा इंच इंच लढवू, जय महाराष्ट्र प्रियतम देश महान.. अशी स्फूर्तिदायक गीते लिहिणारे वसंत बापट हे अत्यंत प्रतिभावंत असे कवी. त्यांची कविता एक अंगभूत अशी लय घेऊन येणारी. त्यामुळे संगीतकारांना देखील त्याला सुरांची अंगडी-टोपडी चढवणे सहज सोपे वाटत असावे.
अनेक नामवंत संगीतकरांनी त्यांच्या भावगीताना सुरेल संगीत देत अविस्मरणीय अशी गाणी बनवली. संगीतकार म्हणून भानुकान्त लुकतुके हे नाव खूप कमी जणांनी ऐकले असेल. त्यांनी वसंत बापट यांचे हे गीत निवडले त्याचे शब्दच पहा ना किती मुलायम आणि हळुवार आहेत.

जेंव्हा एखादी प्रौढा आपल्या माहेरी जाते, तिथल्या घराच्या दारातील बकुळीजवळ बसते, तिथली फुले ओंजळीत घेऊन तो गंध उरात भरून घेते तेंव्हा अवघा जीवनपट तिच्या नजरेसमोर दिसू लागतो. या भावगीताचे नुसते शब्द वाचताना देखील आपल्या मनात बकुळीचा गंध दरवळू लागतो;

*या बकुळीच्या झाडाखाली
आठवणींची लाख फुले
इथेच माझ्या स्वप्नासाठी
एक रेशमी झुला झुले...

इथेच माझी बाळ पाऊले
दवांत भिजली बाळपणी
दूर देशीच्या युवराजाने
इथेच मजला फूल दिले...

तिने आसवे पुसली माझी
हृदयामधला गंध दिला,
चांदण्यातले सोनकवडसे
माझ्यासाठी अंथरले...

बकुळी माझी सखी जीवाची,
जन्मान्तरीचे प्रेम जुने,
तिला पाहता खुलते मीही,
मला पाहता तीही खुले...

प्रत्येक माहेरवाशिणीचे आपल्या माहेरातील माणसे, तिथली झाडे, फुले यांच्याशी एक अबोध मुग्ध असे नाते असते. त्यातले नाजूकपण शब्दात उतरवणे किती अवघड. पण या कवितेत तिच्या नाजूक भावना भावना वसंत बापट अतिशय समर्थपणे व्यक्त करतात. बालपण ते पुढील आयुष्य सगळे 5-7 ओळीत इतक्या नजाकतीने रंगवतात की त्या शब्दांची मोहिनी कितीवेळ तरी मनात भरून राहते. आयुष्य असे गंधभारलेले असणे किती सुखाचे आहे ना?
-सुधांशु नाईक (9833299791)🌿

Friday, 8 December 2023

किलबिल किलबिल पक्षी बोलती...

#सुधा_म्हणे: किलबिल किलबिल पक्षी बोलती...

08 डिसेंबर 23

मराठी बालगीतांचे विश्व फारच मनोहर आहे. अनेक लहान थोर साहित्यिकानी मोठ्या जिव्हाळ्याने बालगीते लिहिली. “उठा उठा चिऊताई..” सारखे बालगीत कुसुमाग्रजांनी लिहिले आहे तर “घरात हसरे तारे असता मी पाहू कशाला नभाकडे..” असे सुंदर गीत द. वि. केसकर लिहून जातात. “टप टप थेंब वाजती.. गाणी गातो वारा.. असो किंवा सांग सांग भोलानाथ,पाऊस पडेल काय..  ” यासारखी कितीतरी बालगीते पाडगावकर लिहून जातात. तर “एक कोल्हा बहू भुकेला..” असे छान बालगीत गदिमा लिहून जातात. विंदांनी तर मुलांसाठी चांगली बालगीते कमी लिहिली जातात म्हणून “राणीचा बाग, सशाचे कान, परी ग परी..” असे संग्रह काढून त्यात सुंदर सुंदर बालगीते लिहिली. त्यात शांता शेळके यांचे नाव विसरून कसे चालेल ? श्रीनिवास खळे यांच्यासारख्या दिग्गज संगीतकाराने जी अनेक सुरेख बालगीते आपल्या संगीताने सजवली. त्यातलेच हेही एक गोड गाणे.

किलबिल किलबिल पक्षी बोलती, झुळझुळ झुळझुळ झरे वाहती,

पानोपानी फुले बहरती, फूलपाखरे वर भिरभिरती,

स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई !


असे चित्रमय बालगीत जेंव्हा त्यांच्या हातून उतरते त्यावेळी अवघे दृश्य डोळ्यासमोर दिसू लागते. आपल्या आसपासचा प्रदेश सुंदर हिरवाईने नटलेला असो वा रुक्ष वाळवंटी, हे गीत ऐकले की डोळ्यासमोर किती सुंदर जग येते. लहान मुलांना सतत आपण हे करू नको, तिकडे जाऊ नको असे सांगत असतो किंवा काकांचे ऐकायचे, बाबांचे किंवा दादाचे ऐकायचे असे सांगतो. मात्र जे गांव शांताबाई मुलांना दाखवतात तिथे सगळीकडे फक्त मुलेच मुले. छान आनंदाने नाचणारी, गाणारी.

त्या गावाची गंमत न्यारी, तिथे नांदती मुलेच सारी

कुणी न मोठे कुणी धाकटे, कुणी न बसते तिथे एकटे

सारे हसती, गाति नाचती, कोणी रडके नाही

असे गांव मुलांना आवडतेच आणि त्यात पुन्हा तिथे पुस्तकं-वह्या, शाळा, अभ्यास काही नाही. भरपूर खेळायचे आणि मनमुराद हुंदडायचे. तिथे पऱ्यांचे राज्य आणि ऐकायला आनंदगाणी. जे जे मुलांना हवे ते ते देणारे हे गाव. कोणत्या मुलांना असा गाव नकोसा वाटेल ?

नाही पुस्तक, नाही शाळा, हवे तेवढे खुशाल खेळा

तिथल्या वेली गाणी गाती, पऱ्या हसऱ्या येती जाती

झाडावरती चेंडु लटकती, शेतामधुनी बॅटी

म्हणाल ते ते सारे होते, उणे न कोठे काही..

सतत मुलांना उपदेशाचे डोस पाजण्यापेक्षा असे सुंदर स्वप्न रंजन मुलांना मिळायला हवे. ही गाणी टीव्हीवर, यू ट्यूबवर पाहण्यापेक्षा लहान मुलांनी ऐकायला हवीत. स्वर्गीय सुंदर गांव त्यांच्या नजरेसमोर साकार व्हायला हवं. जेंव्हा मुलांना असे गाव डोळ्यासमोर दिसते, तेंव्हा त्यांच्या चहऱ्यावरील निर्मळ निरागस हसू फुलते. त्यांचा तो आनंदी चेहरा पाहत राहणे किती मोहक असते ना?

-सुधांशु नाईक (9833299791)