marathi blog vishwa

Saturday, 13 January 2024

मुलं आणि सामाजिक जाणीव

मना सज्जना... भाग : 04: मुलं आणि सामाजिक जाणीव 
- सुधांशु नाईक
शनिवार 13/01/24
काही दिवसापूर्वी मुलांसोबत फिरायला गेलो होतो. एका प्राचीन मंदिराचा तो नितांतसुंदर परिसर होता. चालता चालता लक्षात आलं की काही लोकांनी वेफर्सची पाकिटे, चॉकलेटचे व्रॅपर वगैरे इथं तिथं टाकलं आहे. पटकन मी एकेक उचलायला सुरुवात केली. मग आमच्या मुलांनीही कचरा उचलायला सुरुवात केली. ते पाहून इतर जे काही लोक आसपास होते त्यानी, त्यांच्या मुलांनीदेखील दिसेल तो कचरा उचलायला सुरुवात केली. पाहता पाहता अवघ्या 15,20 मिनिटात त्या प्राचीन मंदिराच्या परिसरातील सगळा कचरा उचलून बाहेर ठेवलेल्या पिंपात जमा झाला. ते पाहून तिथं जवळच बसून पाहणारे एक आजोबा पुढं आले. बाहेर टपरीवरून त्यांनी चॉकलेट आणली आणि सगळ्यांना बक्षीस म्हणून वाटली. त्याचवेळी “ आप ये चॉकलेट खाओ और उसका वो कव्हर मुझे वापस दो…” असं सांगून ते व्रॅपर स्वतः बाहेर नेऊन टाकले. आपण कचरा गोळा केला म्हणून या आजोबानी आपल्याला बक्षीस दिले याचा मुलांना खूप आनंद झाला.
एका छोट्याश्या कृतीमुळे मुलांना किती सहज संदेश गेला जो कदाचित मोठ्या व्याख्यानामुळेदेखील आचरणात आला नसता. आपलं घर आपण स्वच्छ ठेवतो मात्र आपल्या उंबऱ्याबाहेरचं जग देखील आपलंच आहे तेही स्वच्छ सुंदर राखायला हवं ही जाणीव मुलांमध्ये विकसित होणे खरंच खूप आवश्यक आहे.
लहान मुलं कायमच अनुकरणप्रिय असतात. जर आई किंवा वडील, रस्त्यावर चालत जाताना, कारमधून जाताना काही कचरा रस्त्यावर फेकत असतील तर मुलं तसंच वागणार ना? आपला मोठा दादा किंवा एखादा काका - मामा किंवा शाळेतले शिक्षक तंबाखू किंवा गुटखा खाऊन रस्त्यावर किंवा एखाद्या इमारतीच्या कोपऱ्यात पिचकारी मारताहेत हे जर मुलं पाहत असतील तर त्यांच्याकडून स्वच्छ राहणीमानाची अपेक्षा आपण कसं करणार? आपलं जग किती सुंदर आहे आणि ते अधिकाधिक सुंदर करणे, नीट जपणे ही आपलीच जबाबदारी आहे हे जेंव्हा आपल्या वागण्यातून, रोजच्या आपल्या लहानसहान कृतीमधून दिसत राहील तेंव्हाच मुलं आणि पुढील पिढ्या त्याचं अनुकरण करतील.
आज आपण अनेकदा किल्ल्यावर जातो, जुनी मंदिरे किंवा वास्तू पाहायला जातो तिथं नेमकं कसं फिरायला हवं, काय पाहायला हवं हे त्यांना आपण समजावून द्यायला हवं. स्वतःच घर आपण जसं स्वच्छ सुंदर ठेवायला धडपडतोय तसंच आपली गल्ली, आपला परिसर, आपलं गांव आणि आपला देश स्वच्छ सुंदर ठेवणं ही नुसतीच काळाची गरज नसून आपलंच कर्तव्य आहे ही सामाजिक जाणीव आधी आपल्या मनात रुजली तरच मुलांच्या मनात रुजणार आहे हे नक्की. तेंव्हा नवीन वर्षात आपल्या मुलांना, आसपासच्या तरुण पिढीला सामाजिक भान मनात जागृत करता यावे यासाठी तुम्हीही प्रयत्न करणार ना?
- सुधांशु नाईक(9833299791)🌿

Friday, 12 January 2024

बालमन आणि आपण...

मना सज्जना... भाग : 03 बालमन आणि आपण
सुधांशु नाईक
शुक्रवार 12/01/24
आपण जेंव्हा लहान असतो तेंव्हा लवकर लवकर मोठे व्हावेसे वाटत असते. मोठे झाल्यावर मात्र " बालपणीचा काळ सुखाचा…" असे वाटू लागते. लहानपणापासून अंगात भिनलेल्या किंवा आपल्याला आवडलेल्या सवयी, वागण्याची तऱ्हा आयुष्यात बरेचदा तशीच रहाते. कारण मुख्यत: लहानपणी आपण निरीक्षणातून किंवा अनुकरणातून शिकत जातो.
लहानपणी आई बाबा, काका काकू, मावशी आत्या, आजी आजोबा, दादा ताई इत्यादी नातेवाईकांइतकेच काही शेजारी देखील आपल्या आसपास असतात. त्यांच्याबाबत काहीतरी घडलेलं किंवा पाहिलेलं बरोबर लक्षात रहाते. त्या अनुषंगाने आपल्या वागण्याचा प्रयत्न होत रहातो.
लहान मुलांचं विश्व वेगळंच असतं. त्यामुळे लहान मुलांना नेमकं काय हवं हे समजून घेता येण्यासाठी आपल्याला पण मुलात मूल होता यायला हवं. कित्येकदा नेमकं आपल्याला काय हवंय हे त्यांना काहीवेळा सांगता येत नाही पण त्यांचं आणि आपलं ट्युनिंग जमलं की खूप मनमोकळेपणाने ती वागू, बोलू लागतात. लहान मुलांचा विश्वास मिळवणे, तो टिकवून ठेवणे यासाठी प्रामुख्याने गरज असते ती निरीक्षण करण्याची. एखाद्या मुलाचे बारीक निरीक्षण करून त्याच्या आवडीनिवडीचा अंदाज घेऊन आपण त्याला योग्य छंदात गुंतवलं तर त्या मुलाला अधिक उत्साहाने रोजच्या विविध गोष्टी करता येतात. 
“ बच्चे मन के सच्चे…” असं गाण्यात जरी आपण म्हटलं तरी कित्येकदा मुलांना नीट हाताळले नाही तर मुलं मनात कुढत बसून रहातात. त्यांचे गुण झाकलेले राहतात. एखाद्या माणसाची मनोवृत्ती विकसित होणे किंवा एखाद्याला मानसिक आजार होणे यासाठी बालपणातील कित्येक गोष्टी कारणीभूत ठरतात. त्यासाठी लहानपणापासून मुलांना विविध गोष्टी हळूहळू शिकवणे गरजेचे असते. बालमानसशास्त्र हे खूप महत्वाचे शास्त्र आहे आणि त्यासाठी मुलांचे विविध प्रसंगी बारीक निरीक्षण करणे ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे.
त्यांना प्रत्येक गोष्टीतून आनंद कसा मिळेल हे पाहणं महत्वाचं ठरतं. मुलांचा कल पाहून, त्यांची चित्तवृत्ती लक्षात घेऊन, त्यांच्या आवडीनिवडी जाणून जर मुलांना शिकवले तर अनेक गोष्टी मुलं पटकन शिकतात. त्यातला आनंद मुले अधिक चांगल्या प्रकारे अनुभवू शकतात.
बालमन हे टीपकागदासारखं असतं. त्यांना अधिकाधिक आनंददायी गोष्टी देण्यासाठी खूप पैसे लागत नाहीत. मुख्यत: जगाकडे, निसर्गाकडे डोळस नजरेने पाहायला शिकवता यायला हवं.इतकंच नव्हे तर यश आणि अपयश हे दोन्ही सहजपणे कसं स्वीकारावं हे देखील मुलांना आपल्या वर्तणुकीतून दाखवता यायला हवं. हे जमलं तर मुलं नक्की अधिक चांगल्या प्रकारे विकसित होत राहतात. एक सुजाण नागरिक बनू शकतात असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं?
- सुधांशु नाईक(9833299791)🌿

Saturday, 6 January 2024

दिनचर्या नियमित का हवी?

मना सज्जना...भाग : 02 : दिनचर्या नियमित का हवी?
- सुधांशु नाईक 
शनिवार 06/01/24 
मनाचे बोलणे आपल्याला ऐकता यायला हवे आणि मनाशी संवाद असायला हवा असं काल म्हटलं होते. हे इतक्या सहजासहजी घडत नाही कारण जन्मल्यापासून विविध गोष्टींमुळे आपल्या मनाचे कंडिशनिंग झालेले असते. आपल्या सवयी, आपल्या पालकांच्या किंवा घरातील इतर ज्येष्ठ सदस्यांच्या सवयी यामुळे मुलाचे मन तयार होत असते.
 सकाळी उठल्यावर प्रात:स्मरण करावे, ईश्वराची, या भूमातेची आळवणी करावी, त्यांना आणि घरातील मोठ्या माणसांना वंदन करावे असे संस्कार पूर्वी घरात शिकवले जात. हल्ली आपल्याला हे सगळं जुनाट वाटतं. पण त्यामागे असलेला विचार आपण समजून घ्यायला हवाय.
Gratitude किंवा कृतज्ञता हा गुण मुलांच्यात लहानपणी रुजला गेला तर त्यांना जगणे अधिक सुंदर जाते. त्यासाठी आपले पालक, गुरुजन, शेतकरी, हा निसर्ग, इथली झाडें फुले, प्राणी - पक्षी या सगळयाविषयीं मुलाच्या मनात आपुलकी आणि कृतज्ञता निर्माण झाली की एक उत्तम नागरिक बनण्याकडे त्याची वाटचाल सुरु राहते. समर्थ दिनचर्येविषयी सांगताना म्हणतात,
प्रात:काळी उठावे | काही पाठांतर करावे
येथाशक्ती आठवावे | सर्वोत्तमासी ||
यासाठी त्या दिनचर्येची सुरुवात वंदनाने व्हायला हवी. इथं समर्थ अमुक एका देवास आठवा असे म्हणत नाहीत तर सर्वोत्तमाचा ध्यास घ्या असं सांगतात हे लक्षात घेण्यासारखे आहे.
त्यानंतर शरीर स्वच्छता, व्यायाम या गोष्टी महत्वाच्या ठरतात. आपल्या प्राचीन योगशास्त्रात असं म्हटलं आहे की एका विशिष्ट वेळी, एखादी कृती सलग 33 दिवस केली तर मनाला त्याची सवय होऊ लागते. त्यामुळे सकाळी ठराविक वेळी उठणे, आवरणे, व्यायाम करणे, अभ्यास करणे या गोष्टींना फार महत्व आहे. आपण ठरवल्यानुसार वागायला सुरुवात जरूर करतो पण मध्यें अनेकदा मोहाचे क्षण येतात. कधी सकाळी उठायचा आळस येतो कधी व्यायाम करायचा कंटाळा येतो. एकदोन दिवस जरा खंड पडला की मग त्या आळसाचीच सवय होऊन जाते. त्यामुळे मनाला पुन्हा पुन्हा ठरलेल्या आखलेल्या मार्गाकडे वळवावे लागते.
आपलं मन कसं हे सांगताना बहिणाबाई म्हणूनच तर म्हणाल्या होत्या, 'मन वढाय वढाय…उभ्या पिकातला ढोर…' त्याला प्रसंगी चुचकारावे लागते, प्रसंगी वेसण घालावी लागते तर कधी मायेने समजावावे लागते.
हे सगळं करण्यासाठी जर नेमकी आखून घेतलेली दिनचर्या असेल तर मनाला नियंत्रित करण्यासाठी महत्वाचे आयुध आपल्याला मिळाले आहे असं समजायला हरकत नाही.
- सुधांशु नाईक(9833299791)🌿

Friday, 5 January 2024

माझिया मना...

मना सज्जना... भाग : 01
शुक्रवार 05/01/24
माझिया मना...
आपल्या शरीरातील न दिसणारी तरीही अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे मन. मनाची शक्ती इतकी मोठी की समर्थ रामदास तर "अचपळ मन माझे नावरे आवरिता..." असे म्हणून जातात. समर्थांसारख्या तनमनावर अतिशय कठोर नियंत्रण मिळवलेला सिद्ध पुरुष जिथं असं म्हणून जातो तिथं आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी मनावर विजय मिळवणे ही किती अवघड गोष्ट. मनावर विजय मिळवणे वगैरे दूरची गोष्ट. आपल्याला आपलंच मन धड उमगत देखील नाही.
आपलं मन कधी कोणता विचार करेल हेसुद्धा आपल्याला कळत नाही. त्यामुळे तर 'मन चिंती ते वैरी न चिंती' , ' मनी वसे ते स्वप्नी दिसें...' अशा कितीतरी म्हणी आपल्या बोलीभाषेत रुजल्या आहेत. कधी कधी मन अगदी छान सरळमार्गी असतं तर कधी वेडीवाकडी वळणे घेत आपल्याला गुंतवून टाकतं. कोणत्या क्षणी कोणता विचार करेल हेसुद्धा सांगता येत नाही.
एकदा एक मित्र सांगत होता, " अरे, नुकतीच एक गंमत झाली. सकाळी नेहमीसारखं पोहायला गेलो होतो. पोहताना मनात विचार आला की आपण एखाद्या डोंगरावर गेलोय आणि तिथं पाय घसरून पडलोय. पाय मोडलाय... आता पोहत असताना असा विचार का आला असेल? असं वाटलं. पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अचानक आमच्या ऑफिसची ट्रिप ठरली. आम्ही सगळे कर्नाळा किल्ल्यावर गेलेलो आणि येताना पाय घसरून पडलो. नशीब चांगलं की पाय मोडला मात्र नाही. किरकोळ खरचटलं फक्त... काहीच कुठले चिन्ह नसताना मला अचानक का असं वाटलं याचं अजूनही आश्चर्य वाटतंय..!" आपल्या योगाभ्यास आणि अध्यात्मिक क्षेत्रात असं मानतात की आपले मन आपल्याला अशा पूर्वसूचना देत असतं, फक्त आपण त्याच्याशी संवाद साधायला हवा.
इथं हल्ली आपला इतरांशी तर जाऊ दे पण स्वतःशी तरी कुठे फारसा संवाद होत असतो? आपली कामं, नोकरी - व्यवसाय, कौटुंबिक जबाबदारी, मीडिया आणि आसपास वावरणारी माणसे यांच्या कलाने वागताना आपल्याला नक्की काय हवंय हे आपले मन सांगत असूनही आपलं दुर्लक्ष होतं. एकामागून एका नव्या गुंत्यात अडकत जातो आणि मग त्यातून बाहेर पडणे अवघड होते.
कित्येकदा आपल्या मनातील गुंते आपल्याला कळतात पण त्यातून पुढं कसं जायचं हे समजत नाही. आपल्या शरीरावर अनेकदा आपण नियंत्रण मिळवून दाखवतो पण मुठीतून निसटणाऱ्या वाळूसारखे मनातले विचार आपल्या हातून निसटत राहतात. मनावर विजय मिळवणे अवघड नसते असं योगी किंवा विद्वान लोक सांगत असतात ते सत्यच आहे. पण आधी मनातले गोंधळ, मनोव्यापार आणि मनाचे गुंते आधी नुसते तटस्थपणे पाहता यायला हवेत. मग मनाशी संवाद साधायला हवा. ते जमू लागलं की मग आपण आपल्या मनाला सांगू शकतो, माझिया मना.. जरा थांब ना..!" 
सुधांशु नाईक(9833299791)🌿
(ही लेखमाला दर शुक्रवारी आणि शनिवारी दै. नवशक्तीच्या सर्व आवृत्तीमध्यें अग्रलेखाच्या खाली वाचायला मिळेल. ऑनलाईन ई पेपरवर ही पाहू शकता.)