marathi blog vishwa

Thursday 31 August 2023

नरहरी सोनार हरीचा दास...

 #सुधा_म्हणे: नरहरी सोनार हरीचा दास..

31 ऑगस्ट 23

विजयनगरच्या साम्राज्यातून संत भानुदास यांनी विठ्ठलाला पंढरपुरी आणले आणि या महाराष्ट्रदेशी भक्तिरसाची जणू गंगा वाहू लागली. कटीवर हात ठेऊन विटेवर उभ्या विठ्ठलाने अनेकांना भुरळ घातली. आपलेसे केले. त्या काळी आपल्या धर्मात विविध भेदाभेद होते. जात-पात-लिंग-धर्म-प्रांत आदि भेद तर होतेच पण त्याचबरोबर आपले उपास्य दैवत कोणते आहे त्यावरून विविध पंथदेखील आपापसात झगडत होते. मी ज्या देवाची भक्ती करतो तोच मोठा देव, तोच सर्वात शक्तिमान अशा मानसिकतेत हजारो जण होते. “सर्व देव नमस्कारम् केशवं प्रतिगच्छती..” असे जरी शंकराचार्यापासून अनेकांनी सांगितले तरी लोकांच्या मनात आजही ते पुरते रुजलेले नाही असे जाणवते.

पंढरपूर मधले नरहरी सोनार असेच एक व्यक्तिमत्व. आपल्या कौशल्यामुळे पंढरपुरात नावलौकिक मिळवलेले नरहरी सोनार कट्टर शिवभक्त होते. शंकराची पूजा केल्याविना त्यांचा जणू दिवस सुरूच होत नसे. कितीही जणांनी सांगितले तरी त्यांनी विठ्ठलमंदिरात जाणे, दर्शन घेणे नेहमीच टाळले.

सर्वाना माहिती असलेली एक कथा त्यांच्याबद्दल सांगितली जाते. एका विठ्ठलभक्ताने त्यांना देवाच्या कमरेसाठी एक सोनसाखळी बनवायला सांगितले. मी काय विठ्ठल मूर्ती पाहणार नाही त्यामुळे तुम्ही मला माप आणून द्या मी त्यानुसार बनवून देतो असे त्यांनी सांगितले. आणि मग गंमत घडली. त्यांनी बनवलेली साखळी घेऊन तो भक्त विठ्ठलमूर्तीकडे गेला मात्र ती साखळी सैल होऊ लागली. तो परत माघारी आला. त्यांच्याकडून पुन्हा दुरुस्त करून घेतली. पुन्हा तसेच. 

शेवटी नरहरी सोनार म्हणाले, मी येऊन माप तपासून पाहतो. मात्र मूर्तीचे मला दर्शन होता कामा नये. मग डोळ्यावर पट्टी बांधून त्यांना विठ्ठलमूर्तीजवळ नेण्यात आले. ते जेंव्हा हाताने मोजमाप घेऊ लागले तेंव्हा त्यांना त्या मूर्तीवर व्याघ्रचर्म आदि जाणवू लागले. “ही तर माझ्या महादेवांची मूर्ती..” असे म्हणून त्यांनी डोळ्यावरील पट्टी दूर केली तर समोर विठोबा दिसू लागला. पुन्हा त्यांनी डोळ्याला पट्टी बांधली. माप घेऊ लागले तर पुन्हा तसेच घडले. आणि मग त्यांचे डोळे उघडले. शिव-विष्णू आदि सगळे जण एकच. हे जे दिव्य परमेश्वर रूप आहे ते सर्व सगुण रूपांच्या पलीकडे अचल – अविचल आहे याचा साक्षात्कार झाला. आणि त्यांनी पुढील आयुष्य मग विठ्ठलाच्या चरणी समर्पित केले. 

“नरहरी सोनार हरीचा दास.. असे म्हणत ते विठ्ठलभक्तीमध्ये दंग होऊन गेले. एका सुरेख अभंगात ते म्हणतात,   

देवा तुझा मी सोनार । तुझे नामाचा व्यवहार ॥ १ ॥
देह बागेसरी जाणे । अंतरात्मा नाम सोनें ॥ २ ॥
त्रिगुणाची करुनी मूस । आंत ओतिला ब्रह्मरस ॥ ३ ॥
जीव शिव करुनी फुंकी । रात्रंदिवस ठोकाठोकी ॥ ४ ॥
विवेक हातवडा घेऊन । कामक्रोध केला चूर्ण ॥ ५ ॥
मनबुद्धीची कातरी । रामनाम सोनें चोरी ॥ ६ ॥
ज्ञान ताजवा घेउन हातीं । दोन्ही अक्षरें जोखिती ॥ ७ ॥
खांद्या वाहोनी पोतडी । उतरला पैलथडी ॥ ८ ॥
नरहरी सोनार हरीचा दास । भजन करी रात्रंदिवस ॥ ९ ॥

परमेश्वर अन्य कुठे नसतो. आपल्या कामात आपण एकाग्र होऊन गेलो की तो तिथेही दिसतो हेच खरे. निष्काम भावनेने आपले कार्य करणाऱ्या नरहरी सोनार यांना विठ्ठालाने पोटाशी धरले नसते तरच नवल होते. त्यांच्या आयुष्याचे सार्थक झाले. मायाळू विठोबाने त्यांना आपलेसे केले.!

-सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)



No comments:

Post a Comment