marathi blog vishwa

Friday 19 January 2024

आधी कष्ट मग फळ…

मना सज्जना... भाग : 05
आधी कष्ट मग फळ…
- सुधांशु नाईक
शुक्रवार 19/01/24
आपले मन किती उदंड विचार करत असते ना? जणू तिन्ही लोकांत भरारी मारत असते मन. कधी कोणते विचार करेल आणि त्यानंतर कोणती कृती करायला आपल्याला भाग पाडेल हे कधीकधी सांगताही येत नाही. मनात विचार येतो म्हणजे तो मेंदूत विचार तयार होतो, त्याआधी किंवा नंतर विशिष्ट संप्रेरके स्त्रवतात, मेंदूत केमिकल लोचे होतात त्यामुळे शरीरातील अवयवांना आज्ञा मिळते वगैरे सगळं आता विज्ञानाने सिद्ध केले आहे.ते आपल्याला माहितीही असतं पण जेंव्हा एखादं काम करायची वेळ येते तेंव्हा आपण चटकन ते करायला सुरुवात करतोच असं नाही. 
उत्साह, निराशा, राग, मत्सर, लोभ आदि सगळ्या भावना आपल्या कृतिमध्ये अडसर ठरू शकतात हे शास्त्रज्ज्ञानी आणि प्राचीन काळात ऋषीं मुनी, संतांनी सांगितलं आहे. या सगळ्यांत एक महत्वाची एक गोष्ट त्यांनी नोंदवली ती म्हणजे कृती करण्यातील आळस.
आपण कितीदा ठरवतो की हे असं काही करूया, या दिवसापासून करूया.. इतकेच नव्हे तर मनात स्वप्नांचे इमले रचतो. शेखचिल्लीसारखी कित्येक स्वप्नं पहातो. कृतीची वेळ आली की मात्र आपल्याला कुणीतरी हे सगळं करून द्यावे असं वाटते. दरवेळी काही कारणे देऊन आपण कृती टाळतो. इतरांना दोष देतो. आपणच आळस करतो आहोत याकडे मात्र दुर्लक्ष करतो. मानसशास्त्रात त्याला “डिफेन्स मेकॅनिझम” म्हणतात. आपल्या हातून कृती होत नाही म्हणून इतरांना दोष देणे, परिस्थितीला दोष देणे आदि प्रकार त्यात केले जातात.
‘आळसे कार्यभाग नासतो…’ आदि सुविचार माहिती असले तरी अंगातला आळस झटकून टाकणे ही मोठी गोष्ट. ती चटकन घडत नाही. त्यातही आपल्याला कष्ट न करता आयते काहीतरी मिळावे ही अनेकदा आपली मानसिकता असते. कमी कष्टात भरपूर पगार देणारी नोकरी, अभ्यास न करता परीक्षेत पास होण्याची हमी हे सगळं आपल्याला हवं असतं. जेंव्हा आपण आळस झटकून टाकतो तेंव्हा आपल्याला समोर सगळं लख्ख दिसू लागतं.

आपल्याला जे काम करायचे आहे त्याचा नीट अभ्यास करणे, त्यासाठी नियोजन करणे आणि नियोजनानुसार कृती केली तर यश नक्की मिळू शकते. या देशात अनेक थोर राजे, उद्योजक निर्माण झाले. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीमधूनच वाटचाल केली. आधी अपार कष्ट केले, प्रसंगी कित्येकदा अपयशाचा धीराने सामना केला मग हळूहळू त्यांना त्यांची योग्य वाट सापडली.
 समर्थ तर 400 वर्षांपूर्वी सांगून गेलेत;
आधी कष्ट मग फळ, कष्टची नाही ते निरफळ |
साक्षेपेवीण केवळ, वृथापुष्ट ||

इंग्रजीत देखील work, work, work until you achieve your goal ! असं म्हटलं जातं. कर्तृत्ववान व्यक्तीसाठी नवनवीन डेस्टिनेशन सतत तयारच असतात. या देशातील तुम्ही, आम्ही सगळेच जेंव्हा कष्ट करू, कर्तृत्व दाखवू तेंव्हा त्याची फळे आपोआप फक्त आपल्यालाच नव्हे तर सम्पूर्ण समाजाला, देशाला नक्की मिळतील असं मला वाटते.
- सुधांशु नाईक(9833299791)🌿

No comments:

Post a Comment