marathi blog vishwa

Monday 25 September 2023

उत्सव विधायक व्हावेत...

#सुधा_म्हणे: उत्सव विधायक व्हावेत...

25 सप्टेंबर 23  

घरगुती गणपतीचे विसर्जन झाले की लोकांची पावले सार्वजनिक गणपतीकडे वळतात. लोकानी आपापसातील मतभेद, राग-रूसवे, अहंकार हे सारे विसरून एकत्र येणे समाजाच्या हिताचे असते. नुसतेच एकत्र या असे म्हटले की कुणी येईलच असे नव्हे. यासाठी एखाद्या निमित्ताची आवश्यकता असते. प्राचीन काळी गावातील मंदिरे, तिथे होणारे उत्सव यासाठी निमित्त ठरायचे. लोक एकत्र येत, ग्रंथ वाचत, नृत्यगायनभजन- कीर्तन यांचा आस्वाद घेत. नवी नाती जुळत. जुने स्नेहबंध वृद्धिंगत होत असायचे. नंतरच्या मुसलमानी आणि ब्रिटिश आक्रमण काळात बऱ्याच गोष्टीना धक्का लागला. 20 व्या शतकात लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने ही सुसंधी पुन्हा निर्माण झाली. ज्या उद्देशाने हे सुरू झाले त्याला सध्या आपण न्याय देत आहोत का हा प्रश्न विचारणे आता आवश्यक ठरले आहे.

एकजूट निर्माण व्हावी या उद्देशाने निर्माण झालेले हे उत्सव सध्या तर फाटाफुटीसाठी निमित्त ठरत आहेत. एखाद्या वर्षी एका गल्लीत सुरू झालेल्या गणेशोत्सव मंडळाची पुढील दोन तीन वर्षात 4-5 मंडळे झालेली असतात. याच्या मंडपातील डॉल्बी सिस्टिम जास्त आवाज देते की त्याच्या मंडळातील, असले उद्योग आपल्या आसपास सुरू असतात. ढोल पथक, लेझिम पथक समजा मिरवणुकीसाठी मागवले तरी त्यावेळी त्या ढोलापेक्षा साऊंड सिस्टिमचाच आवाज मोठा असतो. संपूर्ण उत्सवात प्रत्येक गोष्ट करताना भरून उरते फक्त चढाओढ. त्यातून त्या डॉल्बी सिस्टिमवर सकाळची आणि रात्रीची आरतीची वेळ वगळता फक्त तडकतीभडकती गाणी सुरू असतात. मोठ्या मुलांच्या मागोमाग त्या मंडपात किंवा रस्त्यावर 7-8 वर्षाची चिल्लीपिल्ली मुले देखीलआंख मारे हो लडकी आंख मारे..” सारख्या गाण्यावर नाचत असतात, त्या बिचाऱ्यांना काही कळत देखील नसते. मात्र नकळत त्या मोठ्या मुलांचे अनुकरण करत असताना नको ते संस्कार मात्र सहज होऊन जातात. अशा प्रकारे काय काय करू नये, किंवा काय चुकीचे घडत आहे हे आता आपल्याला सर्वाना ठाऊक झाले आहे. त्याची यादी जितकी देऊ तितकी थोडीच. त्यामुळे या पुढील काही लेखातून आपण विधायक पद्धतीने सार्वजनिक उत्सव कसे साजरे करता येतील याबद्दल बोलावे असे मला वाटते.

एकेकाळीएक गाव एक गणपतीसारखी अत्यंत सुंदर कल्पना आपल्या राज्यात मांडली गेली होती आणि त्याचे अनुकरण होत होते. मधल्या काळात हे सगळे बाजूला पडले आहे. ते आपण पुन्हा सुरू करायला हवे. प्रत्येक गावाचे, प्रत्येक जिल्ह्याचे काहीतरी वैशिष्ट्य असते त्याला अनुसरून आपण नवीन कल्पना मांडायला हव्यात. तरुण पिढी ही कायम तडफदार असतेच. त्यांच्याकडील ऊर्जा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्या उर्जेला योग्य वाट मिळेल हे आपण नक्कीच पाहू शकतो. 







यंदा नुकत्याच झालेल्या यशस्वी चंद्रयान मोहिमेमुळे कित्येक घरी त्याबाबतचा देखावा लहान मुलांनी बनवला ही किती सुंदर गोष्ट आहे. कित्येक मुलीनी आपल्या परिसरातील फुले, पाने गोळा करून उत्तम अशा फुलांच्या रांगोळी तयार केल्या. काही मुलीनी शालेय साहित्य वापरुन गणपतीची आरास केली. असे छान काहीतरी आपण घडवले तर युवा पिढीला समाधान तर लाभतेच शिवाय आपल्या अंगी असलेल्या कलेची, आपल्या आवडीनिवडीची नव्याने जाणीव देखील होते. त्या निमित्ताने आपल्या आसपासच्या माणसांशी छान नाते तयार होते. विविध कलेच्या, सामाजिक जाणिवेच्या उद्देशाने एकत्र आलेली अशी माणसे मग नक्कीच वेगळे विश्व घडवू शकतात. स्वत: आत्मविश्वासाने फुलतात आणि इतराना देखील प्रेरणा देतात असे मला वाटते. तुम्हाला काय वाटते ?

-सुधांशु नाईक (9833299791)



No comments:

Post a Comment