marathi blog vishwa

Wednesday 27 September 2023

उत्सवातून जपले जावे सामाजिक भान..

#सुधा_म्हणे: उत्सवातून जपले जावे सामाजिक भान..

27 सप्टेंबर 23 

गणेशोत्सव असो, शारदीय नवरात्र असो, की गावातील अन्य एखाद्या देवतेचा उत्सव, आपण लगेच एक मोठा मंडप तयार करतो. प्रसंगी तिथे बाहेरून भली मोठी मूर्ती आणून बसवतो. त्यासाठी सगळीकडे प्रसंगी जबरदस्तीने वर्गणी गोळा करतो. मात्र या ऐवजी मूर्ती आणि नियमित पूजा- आरती या व्यतिरिक्त होणारे अनावश्यक खर्च टाळून त्याच वर्गणीतून एखादा सामाजिक उपक्रम करायाचे ठरवले तर लोक आपापल्या परीने नक्की सहकार्य करतील. डॉल्बीच्या मोठ्या आवाजाचा त्रास ही नाही आणि आपण दिलेले पैसे एका दृष्टीने आपल्याच आसपास असण्याऱ्या समस्या सोडवण्यासाठी उपयोगात येतील. सध्याच्या काळात आपल्याकडे पाणी प्रदूषण, कचऱ्याची विल्हेवाट, ट्रॅफिक समस्या, ई कचरा, इंधन समस्या, आरोग्याचे प्रश्न, डायबेटीस, कॅन्सर सारख्या मोठ्या आजारांचे वाढते प्रमाण, रस्त्यांची दुरावस्था आदि समस्या सर्व गावांमध्ये कमी जास्त प्रमाणात दिसून येतात.या समस्यांशी झुंजणारी कितीतरी व्यक्तिमत्वे आपल्याला ठाऊक आहेत. त्यांना आपण मदत करू शकतो किंवा स्वत:च्या विचाराने नवीन कार्य निर्माण करू शकतो.

एकेकाळी गणेशोत्सवा सारख्या विविध सामाजिक उपक्रमाचा वापर करून घेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी विविध जाती-जमातीचे सामुदायिक भोजन, स्त्रियांसाठी एकत्र एकत्र हळदीकुंकू आदि कार्यक्रम यशस्वी करून दाखवले होते. आपणही ते सहज करू शकतो. आपल्या आसपास विविध गोष्टीमुळे समाजात मतभेद, मनभेद निर्माण होत आहेत. ते दूर करण्यासाठी आपणच पुढाकार घेऊ शकतो. समाजातील आपल्या आसपास असे कित्येक लोक असतात की ज्याना लहानमोठ्या मदतीची गरज असते. त्यांची गरज लक्षात घेऊन आपणच स्वतःहून सहकार्याचा हात पुढे केला तर समाजात सौहार्दाचे, सलोख्याचे वातावरण वाढायला नक्कीच मदत होईल.

पोपटराव पवार, अविनाश पोळ, डॉ. राजेंद्रसिंहजी यासारख्या सुप्रसिद्ध लोकांपासून आनंदवन, स्नेहालय, पाणी फाउंडेशन, आदिवासी कल्याण संस्था, वंचित विकास आदि विविध समाजोपयोगी संस्था आणि त्यांचे शकडो कार्यकर्ते कार्यरत आहेत. आरोग्य, जल संवर्धन, नदीतलाव स्वच्छता, प्राचीन वास्तूचे संवर्धन, वृक्ष संवर्धन, औषधी वृक्षांचे जतन, अपंग, मतिमंद किंवा गतीमंद मुलांची देखभाल, क्रीडा कौशल्ये यासाठी कित्येक व्यक्ती आणि संस्था कार्यरत आहेत. आपापल्या परीने आपण त्यांच्यासाठी खूप काही करू शकतो.

उत्सवातील 10 दिवस पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा, आगमनविसर्जन मिरवणुकीला दिलेले लोभस रूप इतके अवश्य करावे. मात्र मोठमोठे स्पीकर्स, अचकट विचकट नृत्य आदि गोष्टींवरील खर्च आपण नक्कीच कमी करू शकतो. याच रकमेतून जर सामाजिक भान जपणाऱ्या कार्याला आपण मदत करू शकलो तर त्याचे समाधान नक्कीच जास्त असेल असे मला वाटते.

-सुधांशु नाईक (9833299791)



No comments:

Post a Comment