marathi blog vishwa

Thursday 19 October 2023

या देवी सर्वभूतेषू मातृरुपेण संस्थिता..

 #सुधा_म्हणे: या देवी सर्वभूतेषू मातृरुपेण संस्थिता..

19 ऑक्टोबर 23

स्त्री केवळ चूल आणि मूल यापुरतीच असे ज्यांचे विचार असतात ना त्यांना खरच स्त्री कळली नाही. जगातील प्राचीन काळापासून आजच्या काळापर्यंतच्या थोर थोर अशा स्त्रियांची किती उदाहरणे द्यावीत तितकी कमीच आहेत. स्त्री घर तर सांभाळतेच. मूल जन्माला घालून त्याचे पालनपोषण तर करतेच पण त्याशिवाय किती गोष्टी करते. घराला घरपण तिच्यामुळेच तर येते. समाजशास्त्र किंवा समूहजीवन याचा जर अभ्यास केला तर पुरुष हा खरेच निमित्तमात्र आहे. स्त्रीच्या उदरी बीज देण्यापुरता. त्याचे मुख्य काम कुटुंबाचे संरक्षण करणे आणि कुटुंबाच्या अन्न, वस्त्रादि गरजा भागवणे. मात्र नुसते धन कमवून पुरत नाही. प्रपंच करताना शेकडो व्यवधाने बाळगावी लागतात. ते सगळे जपले जाते स्त्री कडून. आपले माहेर, सासर हे तर ती जपायचे प्रामाणिक प्रयत्न करतेच पण वय वाढेल तसे ती आपल्याच आई-बापापासून, सासू-सासरे, मुले, दीर, नणंदा इतकेच काय तर प्रसंगी नवऱ्याची देखील आई होते. सगळ्यांसाठी राबत राहते. प्रेमाने प्रत्येकाच्या आवडी जपत राहते.

काळाच्या ओघात अनेक चांगल्या वाईट गोष्टी घडत राहिल्या तरी स्त्री ने आपली जबाबदारी कधी झिडकारली नाही. तिला मानसन्मान मिळो अथवा न मिळो, ती आपले कार्य इमाने इतबारे पार पाडतेच. त्या बदल्यात तिला असते फक्त प्रेमाची ओढ. स्त्रियांचे शॉपिंग वगैरे गोष्टींबाबत आपण कितीही विनोदाने बोलत असलो, तरी कोणतीही स्त्री घराचे बजेट याचाच आधी विचार करते. स्वतःला काही घेण्यापूर्वी इतरांचा विचार करते. मुळातच स्त्री ही multi-tasking सहजपणे करणारी आहे. पूर्वीच्या काळी घर सांभाळणे, स्वयंपाक, गुरे-ढोरे हे सगळं करताना ती शेतीच्या कामातदेखील सहभागी व्हायची. पतीचा जर व्यापार उद्योग असेल तर त्यात सामील होत असे. आणि एक काम करताना दुसरीकडे दुर्लक्ष झाले आहे असे सहसा तिच्याकडून कधी घडले नाही. पुन्हा हे सगळे करताना ती त्यात माया भरते. कधीच कोरडेपणाने वागत नाही. काही अपवाद वगळता प्रत्येक स्त्रीकडे एक जन्मजात मातृभाव असतो. अवघ्या जगासाठी मनात वात्सल्य भरलेले असते.


जेंव्हा जेंव्हा घर-कुटुंब किंवा देशाला एखादी अडचण येते तेंव्हा निःस्वार्थीपणे मदत करायला माऊली पुढे येतेच. आणि हे फक्त काहीतरी करून, उरकून टाकणे नसते तर त्यात सौन्दर्यदृष्टी असते. सारासार विचार असतो. नेताजींची आझाद हिंद सेना असो, स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकरकांचे योगदान असो किंवा सातारा प्रांतातील तत्कालीन पत्री सरकार असो, घराघरातील माऊलीने त्यासाठी सहज मदत केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पत्नी आणि वहिनीने केलेला त्याग, त्याची कहाणी ऐकली तरी डोळे भरून येतात. ऐनवेळी अनोळखी क्रांतीकारकांना घरात स्थान देणे असो किंवा प्रसंगी अंगावरील सर्व दागिने सहजतेने देशकार्यासाठी देणे असो, स्त्री अशा प्रसंगी कधीच मागे हटत नाही. जेंव्हा एखाद्या गावी एखादे मोठे सामाजिक कार्य ठरते तेंव्हा घरातील माताच त्यासाठी स्वयंपाक रांधून देतात. ज्याना त्यांनी पाहिले देखील नाही अशा लोकाना जेवण देताना त्यांच्या पोटात फक्त आणि फक्त ममता असते माया असते. तिच्यातील या मातृत्वाच्या जाणिवेचा सन्मान करताना म्हणूनच ओठांवर देवी स्तुतीतील श्लोक येतो,

या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता  

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।।

-सुधांशु नाईक(9833299791)



No comments:

Post a Comment