marathi blog vishwa

Friday 27 October 2023

माणसे: अपयश आणि सहकार्य

#सुधा_ म्हणे: माणसे: अपयश आणि सहकार्य 

27 ऑक्टोबर 23

आपल्या आयुष्यात आपण ठरवलेले ध्येय साध्य करता येणे यातला आनंद तर अवर्णनीय असतो पण जेंव्हा अपयशी होतो तेंव्हा? तेंव्हा काय करायला हवे? सगळे काही चांगले असते तेंव्हा अधिक विचार करावा लागत नाही. पण जेंव्हा सगळीच गणिते चुकतात तेंव्हा मात्र अधिक विचार करणे क्रमप्राप्त ठरते. अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे घासून गुळगुळीत झालेले वाक्य आपण सगळेच अनेकदा वापरतो. मात्र अपयशी झाल्यावर काय वाटते ते ज्याचे त्यालाच ठाऊक असते. यश, विजय हवी ती गोष्ट मिळणे यासाठी अनेक गोष्टी जुळून याव्या लागतात. योग्य ते प्रयत्न, अचूक नियोजन, पुरेशी आर्थिक तरतूद, कुशल कर्मचारी, ऐनवेळी येणाऱ्या अडचणी ओळखून तयार ठेवलेले प्लॅन बी, उत्तम जाहिरात तंत्र आणि शेवटी आपले नशीब हे सगळे एकत्र येते तेंव्हा यशाची शक्यता खूप जास्त असते. मात्र जेंव्हा यातील एखादी गोष्ट नीट घडत नाही किंवा आपल्याकडून चुका होतात तेंव्हा अपयश येणे, पराभूत होणे घडते. अपयशी होणे या घटनेपेक्षाही त्यानंतर आपण कसे वागतो, काय करतो हे जास्त महत्वाचे ठरते.


अपयशी झाल्यावर सगळे काही उदास उदास वाटू लागते. आर्थिक फटका बसला असेल, कर्ज वगैरे डोक्यावर वाढले असेल तर ते कसे भागवायचे याची चिंता भेडसावू लागते. त्यामुळे मानसिक ताण तणाव निर्माण होतात. ती व्यक्ती आणि तिच्या परिघातील घरचे, बाहेरचे अशा सर्वच लोकाना असंख्य नकोशा गोष्टीना तोंड द्यावे लागते. थकलेला जीव मग लोकाना टाळायला लागतो, घरातच बसून राहू पाहतो. लोक देखील त्या व्यक्ती टर उडवत राहतात. काहीजण हा तणाव सोसू शकत नाहीत आणि आयुष्य संपवून बसतात. मात्र यामुळे प्रश्न सुटतात का? 

जो निघून गेला त्याच्या माघारी उरणाऱ्या लोकानी काय करावे ? त्यांनी कसे जगावे? एखाद्याला आलेल्या अपयशाचा  लोक इतका बाऊ का करतात ? त्याऐवजी त्या व्यक्तीला खरेतर आपण मायेने वागवायला हवे. त्याची काही चूक नसताना जर अन्य कारणामुळे यश हुकले असेल तर दिलासा द्यायला हवा. त्याच्याच चुकीमुळे अपयश आले असेल तर ती चूक नीट दाखवून द्यायला हवी. मित्रहो, जेंव्हा एखाद्याला अपयश येते तेंव्हा त्याला सर्वात जास्त गरज असते ती सहकार्याची. 

अपयश पदरी पडण्यात कदाचित त्याची चूक कारणीभूत असते किंवा परिस्थिती. मात्र या क्षणी त्याला आधार हवा असतो. कुणीतरी पाठीवर हात ठेवण्याची गरज असते. मनात जो प्रचंड क्षोभ निर्माण झालेला असतो त्याला शांत करण्याची गरज असते. अपयश ज्याने कधीच पाहिले नाही अशी माणसे दुर्मिळच. 


सध्या क्रिकेट विश्वकपाचा माहोल आहे. या खेळात सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, कपिलदेव पासून सध्याच्या विराट, रोहित, शमी आणि हार्दिक पर्यन्त आपण अनेक खेळाडू पाहिले आहेत. वेळोवेळी त्यांना अपयशाचा सामना करावा लागला आहे. प्रसंगी त्यांची थट्टा केली गेली. त्यांच्यावर विनोदी मीम्स आलेले देखील आपण पाहिले. त्यांनीही पाहिले असतील. तरी त्यांचे त्यांचे कुटुंबीय, मित्र, मार्गदर्शक त्यांच्या पाठीशी राहिले. त्यांना भावनिक, मानसिक आधार दिला. मन शांत होऊ दिले. मग त्यांचे नेमके काय चुकते आहे हे दाखवून दिले. त्यांच्या सल्ल्याने खेळाडूनी पुन्हा अथक मेहनत केली. आपल्या चुका सुधारल्या आणि ते पुन्हा मैदान गाजवू लागले. जे क्रिकेटचे चाहते आहेत त्यांना ठाऊक असेल की ऑस्ट्रेलियाच्या एका दौऱ्यात सचिन कायम ऑफसाईडला खेळताना बाद होत होता. मग त्याने त्यावर विचार केला. मेहनत घेतली. कोचचे सहकार्य मिळाले. त्यानंतरच्या सामन्यात त्याने जेंव्हा शतक- द्विशतक झळकवले तेंव्हा अजिबात ऑफ साइडला फटका मारला नव्हता. आपल्या चुकांवर अशी मात करता यायला हवी.

पराभव किंवा अपयश हेच खरे गुरु असतात. आपल्याला ते जणू आरसा दाखवतात. त्यामुळे हातून घडून गेलेल्या चुकांवर, चुकलेल्या निर्णयांबाबत आपण विचार करू शकतो आणि नव्याने पुन्हा कार्यरत होतो. जी माणसे राखेतून पुन्हा उडणाऱ्या पक्षाप्रमाणे पुन्हा उसळून वर येतात त्यांच्यासाठी अवघे आकाश मोकळे असते हेच खरे. 

आपण शिक्षण घेत असताना आपला एखादा मित्र विशिष्ट विषयात मागे पडत असतो. त्यावेळी त्याची टर उडवणारे खूप असतात. पण जर आपण त्यावेळी त्याला सहकार्य केले, त्याला काय समजत नाहीये, कोणती चूक होत आहे हे प्रेमाने समजावले तर त्या अपयशावर तो सहज मात करू शकतो. जे शिक्षण घेत असताना घडते तेच नोकरीत देखील घडू शकते. तेच आपल्या नातेसंबंधात घडू शकते. जेंव्हा कुणीतरी अडचणीत आहे हे लक्षात येते तेंव्हा त्याला अधिक जखमी न करता त्याच्या मदतीला आपण धावून जायला हवे.

आर्थिक मदत, विशिष्ट किंवा एखाद्या वस्तूची मदत, काही कामात प्रत्यक्ष मदत, कधी फक्त मानसिक आधार हे जर आपण करू शकलो तर ती व्यक्ती पुन्हा नव्याने जीवन जगू शकते. आपल्या चुका सुधारल्यामुळे अधिक आत्मविश्वासाने काम करू शकते. आणि सहकार्य केले आहे त्यांच्याप्रती आयुष्यभर कृतज्ञ राहते. त्याचवेळी त्या व्यक्तीच्या व्यवसायावर अवलंबून असलेले त्याचे कर्मचारी, विक्रेते यांचेही आयुष्य सुरळीत सुरू राहते. अपयशी माणसाला हिणवणे, टिंगल करणे सोपे असते मात्र त्याला पुन्हा नव्याने कार्यरत करणे हे फार पुण्याचे काम आहे. सर्वजण असे करत राहिले तर कशाला जगात लोक दुःखी होतील ?

-सुधांशु नाईक (9833299791)

No comments:

Post a Comment