marathi blog vishwa

Monday 23 October 2023

सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके...

#सुधा_म्हणे: सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके..

23 ऑक्टोबर 23

आपण माणसे ही ईश्वराची निर्मिती. लाखों वर्षांपासून विविध जीवांच्यात बदल होत होत माणूस निर्माण झाला. यापुढे कोणत्या आणि नव्या प्रजाती जन्माला येतील हे आज नीटसे आपल्याला ठाऊक नाही. मात्र आज आपण माणसे स्वतःला जणू प्रति ईश्वर समजत आहोत. आपण अनेक नवनवे शोध लावले. टाचणीपासून अवाढव्य विमान आणि उपग्रहा पर्यन्त लाखों वस्तू निर्माण केल्या. तरीही आपल्याला आजही असंख्य गोष्टी समजत नाहीत. विश्वातील विविध आश्चर्ये, विविध घडामोडी याबद्दल आजही आपण अनभिज्ञ असतो. महापूर, भूकंप, वादळे, महामारीच्या साथी, त्सुनामी, पर्वत ढासळणे आदि अनेक आपत्तीच्या बाबत आपल्याला आधी काही पुरेसे समजत नाही. काही प्रमाणात सूचना मिळाली तरी ती तितकीशी पुरेशी नसते. रोजच्या जगण्यात देखील कोरोनासारख्या साथी जेंव्हा आल्या आणि त्यामुळे जगभर जो हाहाकार माजला तो आपण सर्वानी हल्लीच अनुभवला आहे. त्यामुळे विश्वातील त्या एका शक्तीला आपण अनन्यभावे शरण जाणे इतकेच सामान्य माणूस करू शकतो. म्हणूनच त्या शक्तीरूपी, मातृरूपी जगन्मातेला प्रार्थना करताना,

सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके।

शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते।।

असे म्हणत जगात सर्वांचे मंगल व्हावे, कुणीही दुःखी, कष्टी असू नये यासाठी आपण प्रार्थना करायला हवी. जगात जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे. आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्यांचा जीव घेणारी ही मनोवृत्ती नष्ट होण्यासाठी आपण प्रार्थना करायला हवी. आपले मन हे फार विचित्र असते म्हणूनच तर आपण म्हणतो की “मन चिंती ते वैरी न चिंती..”. आपल्या मनातील वाईट विचार नष्ट होत जावेत आणि विश्वकल्याणाचे विचार सर्वांच्या मनी रुजावेत यासाठी आपण प्रार्थना करायला हवी. 

माणूस जसा सर्वात बलिष्ठ होत गेला आणि त्याने अन्य जीवांवर आपला अंकुश निर्माण केला त्यात इतर अनेक प्रजाती धोक्यात आल्या. आपल्या विकासासाठी झाडे, डोंगर, समुद्र, नदी यांचा हवा तसा वापर केला गेला. विश्वातील या गोष्टी विश्वासाठी आवश्यक अशाच. या सगळ्याची तोडमोड करायची बुद्धी कशी होते काही जणांना ? त्यांना केवळ आपल्याच फायद्याचे विचार न सुचता इतरांच्या कल्याणासाठी कृतिशील होता येऊ दे अशी प्रार्थना आपण करूया. जिथे जिथे अन्याय, अत्याचार दिसेल तिथे तिथे त्याचे निर्मूलन होण्यासाठी आपल्याला बळ मिळावे आणि जिथे आपली ताकद कमी पडेल तिथे ईश्वराने वाईट गोष्टींचे परिपत्य करावे अशी प्रार्थना करूया.

सर्वात बलिष्ठ होण्याची मानवाची महत्वाकांक्षा आता लपून राहिलेली नाही मात्र त्याने विश्व आपल्या मर्जीने हवे तसे उद्ध्वस्त न करता विश्वातील इतर जीवांचा मोठा बंधू बनून सर्वांच्या आयुष्यात सगळे काही मंगल असावे यासाठी प्रार्थना करू या. केवळ माझे, माझ्या कुटुंबाचे कल्याण इतकीच संकुचित वृत्ती न ठेवता जगाच्या कल्याणासाठी किमान एक छोटेसे पाऊल प्रत्येकाला उचलावेसे वाटू दे अशी प्रार्थना आपण करूया असे मला वाटते.

-सुधांशु नाईक(9833299791)



No comments:

Post a Comment